शनिवार, १८ जानेवारी, २०२५

प्रवरेचा उगम - अमृतेश्वर मंदिर*

 *प्रवरेचा उगम - अमृतेश्वर मंदिर*




स्थान :

ता. अकोले, जि .अहिल्यादेवी नगर

संगमनेर - अकोले - भंडारदरा ,समृद्धी महामार्गावरून भारवीर इंटरचेंज जवळून उतरून जाता येते .





भारतात मूर्तिपूजेची सुरुवात कधीपासून झाली यामध्ये संशोधकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मूर्ती पूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून आपल्याला काल निश्चितीसाठी मदत होते. हडप्पा व मोहेंजोदडो मधील सापडलेले अनेक अवशेष आपल्याला याची साक्ष देतात .मध्य एशियामधील पर्वतमय प्रदेशातील सुमेरियन या संस्कृतीमध्ये मानव देहधारी देवतांचा उल्लेख मिळतो. ही संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. प्राचीन मेसोपोटोमियातील संस्कृतीमध्येही पुरातत्त्व अवशेषावरून मूर्ती व शिल्पे आदींचे निर्माण झाल्या विषयाची माहिती मिळते. ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजेस सुरुवात झाली, स्वाभाविकच आहे त्या अगोदरच मूर्ती शिल्प बनविण्याच्या कलेचा विकास झाला असावा. मेसोपोटोमिया मध्ये इसवीसन पूर्व 15 शतकात मिश्र लोकांनी त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती भव्यसमारंभात विधीपूर्वक आणली होती. ही घटना मूर्ती पूजेच्या त्या काळापासून असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. पतंजलीभाष्य, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, महाभारत, आदिग्रंथामध्ये मूर्ती शिल्पे ,मंदिरे याचा उल्लेख आढळतो. पाणिनी देखील आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख करतात.


बौद्ध धर्मात लेणी निर्माणाची सुरुवात केली गेली त्या काळात शैलाश्रये ही ध्यान साधनेसाठी वापरली जात असत. हीनयान लेणीमध्ये स्तूपांची चैत्यगृहाची निर्मिती झाली ,पुढे महायानांनी मोठ्या प्रमाणात लेण्यांमध्ये बुद्ध मूर्तीचे निर्माण केले. महाराष्ट्रात जवळपास शेकडो च्या वर लेण्या आढळतात या लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला आपल्या देशात जवळपास सर्व धर्मात मूर्तिकलेला व शिल्पकलेला फार महत्त्व दिले गेले व यामधून मूर्ती पूजनासही सुरुवात झाली. शिव उपासनेला भारतात विशेष महत्त्व आहे. गुप्तकाळात मूर्तिकलेच्या दृष्टीने ठरलेला सुवर्णकाळ हा शिवाच्या मानव रुपी मूर्ती निर्माणास पोषक ठरला अशा मूर्तींची संख्या कमीच आहे पण लिंगमूर्ती ची संख्या अधिक निर्माण झाली. यामध्ये एकमुखी, बहुमुखी, द्विमुखी, पंचमुखी,  अष्टमुखी असे प्रकार आहेत पण गुप्तकाळात एकमुखी लिंग अधिक निर्माण झालेले आढळते. जीवाला शिवाची प्राप्ती आणि प्रकृती व पुरुष या प्रतीकांच्या रूपाने लिंग पूजेस प्रारंभ झाला. याचे आणखीही काही प्रकार आहेत यामध्ये स्वयंभू लिंग की जे नैसर्गिक भूमी मधून निघालेले असते .बाणलिंग  काकडी किंवा अंड्याच्या आकाराचे असते व ते पवित्र नदी मधून प्राप्त होते.




*छत्रभं त्रपुषाकारं कुक्कुं टाण्डनिभं तथा ।*


*अर्धेंन्दु सदृशं चाथ बुब्दुदाभं पंचमम्।।*




शिल्परत्नाच्या उत्तर भागात, दुसऱ्या अध्यायात छत्राप्रमाणे, काकडी प्रमाणे, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे तसेच अर्धचंद्र सदृश्य आणि जल थेंबाप्रमाणे अशा पाच प्रकारचा लिंगाचा वरचा भाग असतो असे म्हटले आहे. राजलिंग ,घटितलिंग मानुषलिंग ही बसवून तयार केली जातात .याचा आकार मोठा असतो.  राज लिंगामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे एक मुखी ,बहुमुखी असे प्रकार असतात घटित लिंगामध्येही अष्ठेत्तर लिंग, सहस्रलिंग असेही प्रकार येतात. 


 नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अनेक शिवमंदिरांचे निर्माण झाले. ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर  यासारखी ज्योतिर्लिंगे तर आपण ओळखतोच. याशिवाय महाराष्ट्राच्या अनेक भागात शिव मंदिरांचे निर्माण झाले मार्कंडेश्वर ,धुपेश्वर, माणकेश्वर, सिद्धेश्वर पाताळेश्वर ,हरिश्चंद्रेश्वर अमृतेश्वर ,असे अनेक मंदिरे सांगता येतील अशापैकीच एक अमृतेश्वर या शिवमंदिरास भेट देण्याचा योग आला नावाप्रमाणेच निसर्गाच्या सौंदर्यातून सतत अमृत वर्षाव होत रहावां असंच हे ठिकाण .अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या गंगेत सामावणाऱ्या प्रवरेचा उगम याच स्थानावरून होतो हेच ते शिवस्थळ आहे. प्राचीन मंदिराच्या पाठीमागे पाठीराखा सारखा वाटणारा प्रचंड असा प्राचीन रतनगड आपल्याला दिसतो.


  सानंददरी ,कळसुबाई, हरिश्चंद्रगड ,अलंग, मदन कुलंग ही सह्याद्रीची वैभव संपदा याच अमृतेश्वराच्या परिसरात आहे. पुण्यावरून 200 तर मुंबईवरून 180 किलोमीटर अंतरावर हा अमृतेश्वर येतो .संगमनेर- अकोले -राजुर - भंडारदरा मार्गे देखील पोहोचता येते. कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भागात हे मंदिर आहे.  भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरवर येणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे. भूमीज प्रकारातील नागरशैलीमधील सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या या काळ्या दगडात अप्रतिम नक्षीकाम असलेल्या प्राचीन मंदिराचे निर्माण झाले आहे. मुख्य मंदिरावर शिखरी-शिखर प्रकारातील छोटी छोटी शिखरे अगदी सूक्ष्म शिल्पकलेतून साकारलेली दिसतात. आमलकापर्यंत दोन्ही बाजूने चौकोनाकार लता कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे त्यासमोरच गाभारा आहे.  गाभाऱ्यातून पुढे सभामंडपात जाता येते.  सभामंडपातील खांबावरील कोरीव काम 1000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेच्या सुवर्ण युगाची आठवण करून देते. या सभा मंडपात आपण हरवून जातो. जणू काही पुन्हा त्या काळात गेलो की काय असा भास होतो भूमिती- बीजगणिताच्या कसोटीच्याही पलीकडे असणाऱ्या भौमितिक रचना, मूर्तिकाम, शिल्पपट ही आजच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानाला मागे टाकताना दिसतात.


यक्ष ,भारवाहक, प्राणी, पक्षी, वेदिका,  देव, दानव, अप्सरा, सुरसुंदरी आदी शिल्प येथे कोरलेली आहेत.  मंदिरावर काम शिल्पे देखील आहेत. पुराणातील समुद्रमंथनाचा देखावा येथे शिल्पीत केला आहे. गर्भगृहाच्या वर कीर्तीमुख, शंख व कमळ वेली आहेत बाहेरच्या भागातही कीर्ती मुख्य कोरलेली आहेत .प्रकाश योजनेसाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक प्राचीन मंदिराजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून पुष्करणी अथवा बारावाची व्यवस्था ही मंदिर स्थापत्यचा एक भाग असतो या ठिकाणी सुद्धा जवळच  20 फूट लांब-रुंद पुष्करणी आहे. यात चारही बाजूला देवकोष्टके आहेत.त्यात गणेश व विष्णूची मूर्ती स्थापित केलेली दिसते. बारावातील पाणी हे अमृतेश्वरासारखेच अमृतमय व नितळशार आहे. समुद्रमंथनातील प्राप्तरत्नांपैकी एक अशी ही पुष्करणी असल्याची कथा सांगितली जाते. समुद्रमंथनातून प्राप्तरत्नांपैकीच हा अमृतेश्वराचा निसर्गाचा परिसर आहे की काय असंच वाटायला लागतं. येथून काढता पाय घ्यावा असं कधी मुळी वाटतच नाही. इथेच अमृतेश्वराच्या कुशीत रमावं असंच वाटतं. पश्चिमेकडून रतनगड अडवतो त्याचा अंगठा ही आनंदाचा संकेत देत इथेच थांबा असं म्हणतो. पूर्वेकडील निळाशार भंडारदरा गारवा देत हेच म्हणतो  की तुम्हीही एकदा या अमृतेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अमृततुल्य जीवनात या अमृत रुपी निसर्गाचा आस्वाद घ्या.


जगात कुठेही जा सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही अगदी सूक्ष्मपणे न्याहाळा  असे सौंदर्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही.






संजय खांडवे


९०११९७११२२

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

स्वराज्याच्या शौर्याचे प्रतिक- रामशेज*

 *स्वराज्याच्या शौर्याचे प्रतिक- रामशेज*

🔸🔸🔸🔸🔸🔸

स्थान : ता. दिंडोरी जि. नाशिक


उंचीः ३२७०फुट


नाशिक वरून १५ किमी.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

महाभूमित शेकडो वर्षानंतर हिंदवी स्वराज्याच्या रुपानं रयतेचं राज्य उभं राहिलं होतं . राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं अन अर्कज्ञ शहाजीराजे भोसले यांच्या संकल्पनेचं एक महान ऐतिहासिक महापर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीमत्ता , शौर्य ,साहस, धाडस अन पराक्रमातून स्वांतत्र्य ,स्वाभिमान जागृत करत " हिंदवी स्वराज्या " च्या रुपाने उभं राहिले . सहयाद्रीने पदोपदी शिवरायांना अन त्यांच्या स्वाभिमानी मावळ्यांना स्वराज्यउभारणीत साथ दिली . या सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक अन एक गड कोट स्वराज्याच्या रक्षणार्थ छातीठोकपणे येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यास तप्तर होता . सहयाद्री सोबत मराठ्यांच्या युक्ती-शक्ती पुढे मोगलशाही , आदिलशाही , इंग्रज - डच - पोर्तुगीजही हतबल झाले होते . अश्या अभेद्य अन अनेक वर्ष अजिक्य ठरलेल्या गडा पैकीच असलेला गड म्हणजे रामशेज आहे 

 नाशिक जवळ असलेला हा गड त्याच्या नावा वरुनच त्याचे पौराणिक व धार्मिक महत्व सांगून जातो . राम शेज या मध्ये शेज म्हणजे झोपण्याचे किंवा आराम करण्याची जागा असा अर्थ होतो . पौराणिक कथेनुसार प्रभु श्रीराम सितेच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करत असतांना या डोंगरावर थांबले होते . या ठिकाणी त्यांनी बंधु लक्ष्मणासह विश्रांती घेतली होती म्हणून या वास्तुला रामशेज असे नाव पडले असे सांगितले जाते . प्राचीन काळा पासून सपाट भूप्रदेशात असलेल्या या डोंगरावरील गड म्हणजे एक पहारेकरी म्हणूनच काम करत होता . मुघलांनी अनेक वेळा या गडावर आक्रमणे केली .प्रभु श्रीरामांनी जशी या गडावर विश्रांती केली तशीच जालना स्वारी नंतर काही काळ शिवरायांनी विश्रांती केलेला विश्रामगड हा देखील याच नाशिक परिसरात येतो हा एक योगा योगच म्हणावा लागेल .

             नाशिक पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले या रामशेज गडावर पोहचण्यासाठी मुख्य मार्गापासून आशेवाडी या गावातून रस्ता आहे . वाहने पार्क करण्यासाठी पायथ्याशी जागा आहे येथून पायी चढाई करत जावे लागते . अर्ध्या - पाऊन तासात आपण या वाटेने गडाच्या पठारावर पोहचतो . या वाटेने वर जात असतांना उजव्या बाजूस एक गुफा आहे यामधे आता शिवपिंड आहे .चोर वाटेचे एक छोटे छिद्र वरच्या भागात दिसून येते. डाव्या बाजूने खडकात कोरलेल्या वाटेने श्रीराम मंदिरा पर्यन्त जाता येते या मंदिरात प्रभू श्रीरामा सह लक्ष्मण व हनुमंताची मुर्ती आहे . येथून वर पठारावर पोहचतांना दोन बुरुजा मधील दरवाज्याचे अवशेष दिसतात . लांब निमुळता असलेला हा गड या ठिकाणी निमुळता आहे . समोरच एक छोटा दरवाजा आहे .समोर पठारावर अगदी टोकावर एक भगवा ध्वजस्तंभ लावलेला आहे . या परिसरात काही पाण्याचे टाकी व भग्न अवस्थेतील इमारतीचे अवशेष आहे . पुन्हा परत फिरत गडाच्या उंच भागाकडे जात असतांना ज्या ठिकाणापासून आपण वर आलो त्याच्या अगदी बाजूला काताळात कोरलेल्या मोठ्या पायऱ्या दिसतात अगदी बारवेत उतरण्या साठी जशी रचना असते तश्या पायऱ्या आपल्याला खाली दरवाज्या पर्यन्त घेवून जातात . काताळ पाषाणात कोरलेला हा दरवाजा आहे . दरवाज्यावर सुंदर नक्षीकाम दिसून येते थोडे समोर गेले की आणखी चोर दरवाज्या सारखी वाट खोल काताळात जाते व समोर मात्र मार्ग संपतो व खडकाच्या फटीतून फक्त हात जाईल अशी लांब चिऱ्या सारखी कोर आहे . यातून फक्त नजर बाहेर पडू शकते . येथून पुन्हा परत येतांना असे दिसते की बाहेरील बाजूस शत्रूस केवळ हा डोंगराचा कडा दिसतो पण यात दरवाजा लपलेला आहे .पठारावर येताच त्याच्या विरूध्द बाजूसही पुन्हा खोलगट भागात पाच - सहा पायऱ्या उतरून छोटासा दरवाजा आहे . हा पुन्हा दुसऱ्या बाजू करील शत्रूची टेहाळणी करतो ,येथूनही खाली उतरता येत नाही पण बाजूला खडकात कोरलेले खांब असलेले पाण्याचे टाके आहे .

                     गडाच्या उंच असलेल्या भागाकडे जात असतांना गोल चुन्याचा घाना दिसतो व समोरच रामशेज वरील सर्वात मोठा बांधीव तलाव दिसून येतो . बाजूलाच आनखी खडकात कोरलेल्या पाण्याचा टाकींचा समुह आहे . गडावर फेर फटका मारतांना अशी अनेक पाण्याची टाकी आहेत . पाण्याची चोख व्यवस्था स्थापत्य करतांना ठेवलेली दिसते आणि गडाच्या अजिक्य ठरण्यात हे महत्वाचं काम करते . समोरच गडावरील देवीचं मंदिर आहे . गणेशाची दगडी मुर्ती देखील या परिसरात स्थापित केलेली दिसते . छत्रपतींची मुर्ती देखील आता या ठिकाणी ठेवण्यात आली आहे . जय जिजाऊ जय शिवराय ! हा पर्यटकांचा आवाज या ठिकाणी सतत दुमदुमत असतो . गडाच्या उंच शिखरावर काही उध्वस्त इमारती आहेत . डाव्या बाजूस खाली उतरत गेल्यावर एक दरवाजा आहे ."किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब(दोष)आहे,याकरिता गड पाहून एक-दोन-तीन दरवाजे तसेच चोरदिंड्य़ा करुन ठेवाव्यात" असे  आञापत्रात लिहले आहे. नेमके या चोर दरवाज्याला पाहून आज्ञा पत्रात सांगितलेले महत्व कळते .जवळ जाईपर्यन्त  तर दरवाजा आहे हे समजतही नाही गडा खाली उभे असलेल्यानां तर आजीबात लक्षात येत नाही .

           शहाजहानच्या आजारपणामुळे औरंगजेब दख्खनेच्या जहागिरीतून १६५६ ला परत फिरला होता . छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर १६८१ ला मराठा साम्राज्य संपविण्यासाठी दख्खनेकडे वळला . रामशेज घेण्यासाठी शहाबुददीन खान १०००० सैन्य घेऊन वेढा बसविला . मराठ्यांच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही . नंतर फतेह खान आला त्याला देखील अपयशच आले होते . कासम खान याने देखील रामशेज घेण्यासाठी प्रयन्त केले . पण मराठ्यांच्या केवळ ६०० मावळ्यापुढे हजारोच्या संख्येत आलेले मोगली सैन्य हतबतच ठरत होते . गड घेण्यासाठी अनेक प्रयत्न मोगलांनी केले तोफा डागल्या , गडा येवढी लाकडी मचाने उभारली या बाबत मुघलांच्या दरबारी असलेला भिमसेन सक्सेना या औरंगजेबाचा चरित्रकारने तारिखे-दिल्कुशा मधे या लढाईचे वर्णन केले आहे . हा गड जरी मराठ्यांच्या हातून गेला असला तरी साडे पाच वर्ष मोघलांना मोठा संघर्ष करावा लागला होता . मराठ्यांचा एक किल्ला जिंकण्यासाठी एवढा काळ लागतो तर पुढे इतर किल्ले घेण्यास किती काळ लागेल याच विवंचनेत मोगली सैन्य असावे .


संजय खांडवे

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

ब्रम्हगिरीचा उपदुर्ग - दुर्गभंडार

 



ब्रम्हगिरीचा उपदुर्ग - दुर्गभंडार


(भाग - २ )


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक


उंचीः ४२४८ फुट


नाशिक वरून ३६किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


दुर्गवैभवाच्या दृष्टीने महाराष्ट्र संपन्न आहे . भारतातील एकूण किल्ल्या पैकी जवळपास १ /३ किल्ले केवळ महाराष्ट्रात आहेत . दुर्ग निर्माणाचा कालखंड हा हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे . महाराष्ट्रात असे अनेक किल्ले येतात की ज्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे . त्याच्या निर्माण शैली वरून त्याचा कालखंड लक्षात येतो . ब्रम्हगिरी देखील असाच एक पुराण काळापासून धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा जपत रोपी लाव्हा खडकावर उभा असलेला एक अभेदय किल्ला आहे . नैसगिक हजारो फुट खोल कातळ कडेची तटबंदी व भव्यता हे ब्रम्हगिरीचं प्रमुख वैशिष्ट आहे . त्याचा एक उपदुर्ग असलेला अत्यंत अवघड व चित्तथरारक अनुभव देणारा दुर्गभंडार हा ब्रम्हगिरीच्या उत्तरेकडील टोकावर निमुळता होत जातांना दिसतो . राजगड आपण पाहिला तर त्याचा भव्यतेनुसार तो चार भागात विभागलेला दिसतो असाच ब्रम्हगिरी वरील दुर्गभंडार आहे . तो त्र्यंबकगडाचा उपदुर्ग आहे .

        " ज्यांना दुर्गाचे सरक्षण आहे त्यांना उच्छेद होत नाही . असे दिसून येते कारण दुर्गाची प्राप्ती झाली आहे म्हणजे स्वतः च्या प्रदेशाचे सरक्षण व शत्रूचा प्रतिकार करता येतो जो राजा निर्सग निर्मित हल्ला करण्यास अवघड आणि कमी खर्चात बांधून होणारा दुर्ग बांधून घेतो तो इतरावर मात करतो " असे इ. पूर्व ४ थ्या शतकात कौटिल्य लिहतो . दुर्गभंडाराची रचना अत्यंत अवघड आहे . निर्सगदत्त अभेदयता त्यामधे आहे याची रचना कोणत्या राजाने केली हे निश्चित सांगता येणार नाही मात्र देवगिरीचे यादव , बहामणी , निजाम व मोगलासह स्वराज्यातही हा किल्ला होता व पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेला .

             पवित्र ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेऊन पाठीमागे दिसणारा ब्रम्हगिरी प्रत्येकास आर्कर्षित करतो त्यामुळे ब्रम्हगिरीवर नेहमी पर्यटकांची गर्दी असते . त्र्यबकेश्वर शहरातून जाणारा मार्ग पर्यटक वापरतात कारण हा पायरी मार्ग असल्याने चढाई करण्यास फारसा अवघड नाही .गडाच्या कातळास लागून अत्यंत गर्द झाडी आहे यामधून रस्ता काताळात कोरलेल्या पायऱ्या कडे जातो . वाटेत पर्यटकासाठी अनेक स्टॉल आहेत . उजव्या बाजूला एक दगडी इमारत लागते ही धर्मशाळा होती . यासारख्या जुन्या इमारती वाटेत लागतात .त्याच्या जवळच एक दगडी बारव आहे .विशेष म्हणजे या बारवेचे बांधकाम शैली खूप सुंदर असून तळापर्यन्त उतरण्यास पायऱ्या आहेत . पुढे प्रंचड मोठ्या एक संघ असलेल्या काळया खडकात कोरलेला पायरी मार्ग सुरु होतो . ८० ० पेक्षा अधिक असलेला हा मार्ग जीण्या प्रमाणे वळणे घेत वर घेऊन जातो . मधे लोखंडी रिलिंग असल्याने ये -जा करण्यासाठी स्वंतत्र  एकरी मार्ग तयार केला आहे. वाटेत दोन दरवाजे लागतात . अखंड कोरीव असल्याने कुठेही बांधकाम नाही व आत दोन्ही बाजूने कोरलेल्या देवड्या आहेत . वाटेत काही गुफा लागतात वीर हनुमंताची सुंदर मुर्ती तथा ऋषी - मुनींचे शिल्प कोरलेले आढळतात . येथे महत्वाची काळजी घ्यावी लागते ती माकडापासून दूर राहण्याची त्यांना खाण्यास दिल्याने ते मागावरच असतात काही वेळा चावायला ही मागे पुढे बघत नाही . 

             हा मार्ग पार केल्यावर आपण थोड पठारावर येतो  .गडाची ही कातळकडा इतर कडा पेक्षा कमी उंचीची आहे . येथून समोर अंजनेरी पर्वत दिसतो . थोड़ी चढाई केली की मोठ्या पठारावर येतो . एका बाजुला सुंदर त्र्यबकेश्वराच्या मंदिरासह शहराचे व दुसऱ्या बाजूला हर्षगड आपल्या नजरेस येतो . या पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते .पश्चीमेकडून पठारावरून खाली एक रस्ता गोदावरी नदीच्या उगमाकडे जातो . पृथ्वी , आप , तेज , वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत . यामधे जल हे सर्वोत्तम मानले जाते व यामधे गंगाजल हे श्रेष्ठ व पवित्र मानले जाते ही गंगा गौतम ऋषीने पृथ्वीलोकी आणली होती अशी मान्यता आहे . गोदावरी ही दक्षिण गंगा मानली जाते . उत्तरेकडे जाण्याऱ्या पाय वाटेने आपण जटा मंदिराकडे जातो . या मंदिरा जवळ पाण्याचे टाकी आहेत . दगडी मंदिरात शिवाच्या जटा खडकात दिसतात . भगवान शिवाने येथे जटा आदळल्याचे शिव पुराणात आहे . धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र जागा मानली जाते . या मंदिराच्या पाठीमागून एक पाऊलवाट १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या दुर्गभांडाराच्या पायऱ्या लागतात . या वांटेने जातांना दाट धुके असल्यास काळजी घ्यावी कारण डाव्या बाजूस हजारो फुट खोल दरी आहे . हवा सुद्धा प्रचंड वेगाने वाहते .दुर्गभांडाराचा खरा चित्तथरारक अनुभव या खोल चरी सारख्या कोरलेल्या पायऱ्या पासून सुरु होतो . या ठिकाणी देखील सरक्षक देवता वीर हनुमंताची मूर्ती काताळात कोरलेली आहे .दोन तीन फुट रुंद व जवळपास १०० फुट खोलात हा मार्ग पुढे वळण घेवून छोटया दरवाज्यातून नैर्सगिक दगडी पुलावर जातो . प्राचीन स्थापत्य शैलीचा हा अप्रतीम नमुना व त्यापेक्षाही निर्सगाच एक वेगळं रुप या जागेवरून बघायला मिळते . दोन्ही बाजूने हजारो फुट खोल दरी व अत्यंत अरुंद पायवाट हा थरार अनुभवतांना खूप काळजी घ्यावी लागते . दाट धुके व प्रचंड वेगाने वाहणारा वारा येथे सावध करतो . काही ठिकाणी तर अत्यंत अरुंद वाट आहे . हा निर्सगाचा दगडी पुल ओलांडून पुन्हा एक छोटा कोरलेता दरवाजा लागतो व पुन्हा तशीच घळीत कोरलेला पायरी मार्ग दुर्गभंडारावर घेऊन जातो . वरील पठार अगदी लहान आहे . पिण्यायोग्य पाण्याची दोन टाकी यावर आहेत . पाच-दहा मिनिटात यावर फिरुन होते . या ठिकाणावरुन निर्सगाच अप्रतीम सौदर्य अनुभवता येते सहयाद्री ची भव्यता येथे आल्यावरच कळते .थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काताळातील पायऱ्या शेवटच्या टोकावर घेऊन जातात . खडकात कोरलेता एक छोटा बुरुज या ठिकाणी आहे . चिलखती बुरुजासारखा हा आहे . या बुरुजावरून अगदी ३६० अंशात सर्व भागावर अगदी दुर पर्यन्त शत्रूवर नजर ठेवता येते . जटा मंदिरापासून सुरु होणारा हा प्रवास या बुरुजावर संपतो या मार्गात झालेली छोटीशी चुक देखील आपलं अस्तीत्व क्षणात संपवू शकते .हुल्लडबाजी ,अतीसाहस व सेल्फी आदि गोष्टीवर संयम ठेवण्याची क्षमता अंगात असेल तरच या दुर्गभंडारा कडे यावे असे वाटते .



संजय खांडवे

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

गोदावरीचे उगमस्थान- ब्रम्हगिरी* (भाग - १ )

 *




गोदावरीचे उगमस्थान- ब्रम्हगिरी*

(भाग - १ )

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक

उंचीः ४२४८ फुट

नाशिक वरून ३६किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

त्र्यंबक डोंगर रांगेमधे ब्रम्हगिरी , अजनेरी , राजनगिरी ,गडगडा , बहुला व सर्वात उंच उतवड या सोबत असलेला बसगड म्हणजे भास्करगड हे महत्वाचा किल्ले येतात . त्र्यंबकेश्वराच्या पश्चिमेस दिसणारा महाकाय पर्वत म्हणजे ब्रम्हगिरी होय . याला त्र्यंबकगड असेही म्हणतात . उत्तरेस दिसणारा भंडारदुर्ग हा त्याचाच उपदुर्ग आहे . त्र्यंबकेश्वर हे ज्योर्तिलिंग असून या ठिकाणी कुंभ मेळ्याचे आयोजन होते . पुराणामध्ये विविध पौराणिक कथेत याचा उल्लेख येतो ब्रम्हगिरी पर्वताचेही  दक्षिण गंगेच्या उगमासह पुरानकथेनुसार वेगळे महत्व आहे . येथून उगम होणारी दक्षिण गंगा गोदावरीचे सातवाहन काळातील " गाथा सप्तशती " मध्ये उल्लेख आढळतो .ब्रम्हगिरी पर्वताची खडतर २० कि.मी ची परिक्रमा शिवभक्त आजही मनोभावे करतात याला देखील धार्मिक महत्व आहे . तेथे दुर्ग वसविले गेल्याने ऐतिहासिक महत्व देखील तेवढेच आहे .

               ब्रम्हगिरीवर पोहचण्यासाठी मुख्य दोन मार्ग वापरले जातात . त्यापैकी एक त्र्यंबकेश्वर शहरातून जाणारा पायरी मार्ग की ज्याचा वापर नियमित होतो व दुसरा मार्ग  दक्षिणे कडून किल्ल्याला वळसा घालून हत्ती मेट कडून घळीतून असलेला हत्ती दरवाजा मार्ग होय हा मार्ग सहसा वापरात नाही .अत्यंत अवघड असा हा मार्ग आहे . या ठिकाणास हत्ती मेट असे नाव प्रचलीत आहे आणि मेट म्हणजे पूर्वीच्या काळची चौकी असायची . या मेटेच्या प्रमुखास मेटकरी म्हणत . खडकवासला (पुणे ) येथील प्रा नंदकिशोर मते यांनी सिंहगडावर PHD केली .त्यांनी सिहगडास सात मेंटे होती असे सांगितले त्यापैकी आमरीचे म्हणजे अमृतेश्वराचे मेट येथील खंडोजी नाईक कोळी या मेटकऱ्यास विश्वासात घेऊनच तानाजी मालुसरे लढले होते . त्याच तानाजी कड्याच्या खाली हे मेट येते . गडावर येण्यासाठी ज्या वाटा असायच्या तेथे हे मेट असत . गडाची चौकी पहारे म्हणजे आताच्या काळातील चेक पोष्ट सारखे ते काम करायचे .तसेच हे हत्ती मेट असावे . या परिसरात असे अनेक मेट आहेत .हिंदवी परिवामुळे मोहिमेतून या मार्गाने ब्रम्हगिरी अभ्यासता आला .

                     महाकाय हत्ती सारखा पुढे आलेला बेसाल्ट खडकाच्या कड्या खालून पाय वाटेने पुढे जात दाट झाली मध्ये मंदिराचा भगवा ध्वज नजरेस पडतो . जवळ गेल्यावर त्या ठिकाणी रेणुका मातेचे मंदिर दिसते .त्या परिसरात अनेक वीरगळ व सतीशिळांचा समूह आहे . तेथून वर चढणारी दाट झाडी मधून जाणारी पायवाट आहे ही पायवाट घळीकडे वळन घेत चढाई वाढवत जाते . महाकाय पर्वताची झिज होऊन मोठ मोठे दगड या घळीत पडलेले दिसतात . दरड कोसळत असल्याने ही या भागातील आताची मोठी समस्या बनली आहे . महत्वाच म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरनेच हे उगमस्थान आहे.त्याच घळीतून हा प्रवास आहे .अर्ध्या तासाची चढाई झाल्यावर  घळीत प्रचंड मोठे दगड कोसळलेले दिसतात . तुरळक हौसी व जानकार भ्रमंती करणारे अन जंगली प्राणी व लाल माकडं याशिवाय इकडे कुणी सहसा भटकत नाही . हत्ती दरवाजा पूर्णपणे दगड मातीत गाडला गेलेला असल्याने बाजुने पंधरा वीस फुटाची लोखंडी शिडीला धरून वर पोहचता येते. डाव्या बाजूला उंच कपारीवर चिलखती तटबंदी सारखा भाग आहे पुढं एक छोटी गुहा व छोटे शिवमंदीर आहे येथून या मार्गाने येणाऱ्या शत्रूवर सहज मारा करता येतो . त्यासाठी सैनिकाच्या निवाऱ्या साठी येथील छोट्या गुहेची रचना आहे . येथे जातांना काळजी घ्यावी लागते कारण खाली खोल दरीचा भाग आहे . परत येऊन चढाई करण्यासाठी लवकर मार्गच सापडत नाही . मोठे मोठे दगड असल्याने रस्ता सुचत नाही . हिंदवी परिवाराच्या पायलट ट्रेकीग मुळे मात्र अशी साहसी मोहिम सहज शक्य होण्यास मदत होते .

                या भूलभुलैय्याच्या मार्गात थोड वर आले की या काळया दगडात कोरलेला दरवाजा नजरेस येतो विशेष म्हणजे कोणतेही बांधकाम न करता हा अखंड एकाच दगडात आहे .यात भले मोठे दगड फसलेले आहेत व अर्धा दरवाजा गाळात गाडला गेला आहे . या तासीव व कमानीच्या दरवाज्यावर सुंदर नक्षी काम आहे दोन्ही बाजूने दोन सिंहाची शिल्पे मध्यभागी लटकलेली घंटा कोरलेली असून त्या खाली गणेश शिल्प आहे . याच नळीच्या मार्गात भितीवर वीर हनुमानाची मोठी मूर्ती कोरलेली आहे .ही मुर्ती देखील अर्धी गाळात आहे . हा किल्ल्याचा भाग अत्यंत दुर्लक्षीत असून संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहे . या दरवाज्याचं मुख वळण घेतल्यानं पूर्व दिशेस येते व समोर पुन्हा प्रचंड मोठे ब्रम्हगिरीचे नजर न पोहचणारे शिखर दिसते . या समोरील बाजूस पुन्हा चिलखती व प्रचंड मजबूत तटबंदी आहे ज्या ठिकाणी कुणी सहसा जात नाही तसा जाणारा मार्गही सापडत नाही .हत्ती दरवाज्यातून या दुसऱ्या दरवाज्या पर्यन्त शत्रू प्रचंड संघर्ष करून पोहचलाच तर तो वरील तटबंदीवरील सैन्याच्या टप्प्यात येतो अन इथेच थांबतो .अशी ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असलेली ही प्राचीन गड स्थापत्य शैली या नाशिक परिसरातील किल्ल्यावर विशेष आढळते .

         दरवाज्यातून जाण्यास मार्ग नसल्याने या दरवाज्याच्या वरील कपारीने पायवाट आहे . ही पायवाट उंच गवतातून व दाट झाडीमधून गोदावरी नदीच्या उगम स्थानाकडे जाते . ब्रम्हगिरीचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे या गडास जवळ पास सर्वच बाजूस नैर्सगीक कातरकडा आहे आणि हा शेकडो फुट प्रचंड खोल असून खाली दाट जंगल आहे . या बाजूची पायवाट काही ठिकाणी अगदी कड्याच्या अगदी जवळून जाते मधे काही झुडपे व झाडांची जाळी असल्याने धोका कमी होतो . वाटेत दोन ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली आहे . वरील महाकाय पर्वतामधील पाणी खाली झिरपत असल्याने हे जीवंत वाहते पाणी पिण्यायोग्य असते . या पाण्याची चव अत्यंत गोड वाटते . येवढी चढाई केल्यावर आम्ही आमच्या सोबत असलेले पाणी झाडांना टाकून निर्सगाने गार व चवीला गोड बनविलेल्या पाण्याने बाटल्या भरून घेतल्या व पुढे निघालो .

         ब्रम्हगिरीच्या कडयावरून पाऊल वाटेने जातांना उजव्या बाजूस ब्रम्हगिरीचे भव्य डोंगर दिसतो . पुढे आल्यावर श्रीचक्रधर स्वामी मंदिर व त्याच्या समोर दक्षिण गंगा गोदावरीचे उगमस्थान आहे . दगडी मंडपात एका लहान कुंडातून हा उगम होतो . पुढे गेल्यावर एक दगडी कमान असलेले दगडी बांधकामातील बारव आहे . त्याच्या समोरच ब्रम्हगिरी मंदिर आहे त्यामध्ये एक लहान कुंड असून गोमुखातून पाणी त्या कुंडात पडते व या गोमुखाच्या वर  गंगा गोदावरी मुर्ती आहे . मंदिराच्या पाठीमागे प्रचंड खोल कातळकडा आहे येथून हरीहर व भास्करगड दिसतो .

            देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात हा गड होता . त्र्यंबकेश्वरमुळे १२ व्या शतकात या भागास धार्मिक महत्वही तेवढेच होते . पुढे बहामनी व नंतर निजामशाही मधे असतांना १६३६ च्या काळात शहाजी राजे यांनी याच भागातून राज्य कारभाराचा स्वंतंत्र अंमल करून या महाभूमिस स्वातंत्र्याचे वेड लावले होते .



संजय खांडवे

सोमवार, १६ डिसेंबर, २०२४

दुर्ग दुर्गेश्वराशी साम्य असलेला- सुधागड*

 * 


*दुर्ग दुर्गेश्वराशी साम्य असलेला- सुधागड*


स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली - पाली १३८कि. मी ., मुंबई वरून - पनवेल - नागोठाना - पाली मार्गे १३०कि .मी . उंची -२०३० फुट


दुर्गदुर्गेश्वर रायगड हे एकमेव असे तीर्थ आहे की त्या ठिकाणी नतमस्तक झाल्यावर आयुष्य सार्थक झाल्यासारखे वाटते . हे आपल्या स्वातंत्र्य अन स्वाभिमानाचे ते क्रांतिकेंद्रच आहे . महाभूमितील अठरा परगड जाती धर्माच्या लोकांची वज्रमूठ बांधून ' हिंदवी स्वराज्य ' येथेच साकारले .स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगड़ाशी बहुतेक बाबी मध्ये साम्य असलेला गड म्हणजे सुधागड होय . हा गड पाहतांना रायगडाची झलक जाणवते . महाराजांनी सुद्धा काही अंशी राजधानी साठी या गडाचा विचार केला होता . नयाने युक्त असलेल्या छत्रपती शिवरायांना अभेद्य राजधानी कुठे व कशी असावी याचे ज्ञान होते म्हणून दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे निर्माण करविले .

           पाली गावाच्या पूर्वेस असलेल्या सरसगडाच्या पायथ्यापासून एक रस्ता सुधागडाकडे जातो . या गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत पहिला पाश्चापूर - ठाकूरवाडीतून व दुसरा धोंडसे गावातून महादरवाज्या पर्यन्त घेवून जाणारा मार्ग आहे . आम्ही हिंदवी परिवाराच्या मोहिमेत या दोन्ही मार्गाचा वापर केला . धोंडसे गावात वाहने उभी करून अत्यंत दाट झाडी मधून हा मार्ग जातो .नदीचा पुल ओलांडल्यावर असाव्यस्त पडलेले मोठ -मोठे धोंडे व त्या दाट झाडीतून जाणारी वाट ही भुलभुलैय्या ठरू शकते त्यामुळे स्थानिकांच्या सहकार्याविना धाडस करणे योग्य नाही.सुधागडाच्या जवळ दोन हजार वर्षापूर्वीच्या ठाणाळे, खडसांबळे बौद्ध लेणी आहेत यावरून या गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते. या वाटेने गडाच्या भव्य पठारावर पोहचण्यास दोन ते अडीच तास लागतात .

          या वाटेत पुढे आपल्या परंपरेत प्रसिद्ध असलेल्या सरक्षक देवतेचा मारोती पार लागतो . थोड़े पुढे वर चढाई करत गेल्यावर तानाजी टाके लागते काळ्या पाषणात हे भूयारात कोरलेले दोन टाके असून पिण्यायोग्य पाणी यात असते. बाजूला तलवार व ढाल हातात घेतलेला वीर योध्याची दगडी शिल्प कोरलेले आहे . गडावरील वास्तुचे तासीव दगड खाली या वाटेत पडलेले दिसतात . चौकी पहारे साठी उभारलेली एक उध्वस्त वास्तू पाहून पुढे गेले की पुन्हा काही पाण्याची टाकी आहेत .या पुढे मार्ग काढत गेल्यावर आपल्याला भली मोठी तटबंदी सारखा भाग दिसतो . जवळ गेल्यावर दोन बुरुजांच्या मधे असलेला गोमुखी महादरवाजा दिसतो . दोन क्षरभ चिन्ह व त्यावरील नक्षीकाम व आतील वळण घेणारा मार्ग रायगडाच्या महाद्वाराची आठवण करून देतांना थोडावेळ आपण रायगडी पोहचल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. गडाखालील वाटेवर अचूक मारा करणाऱ्या बुरुजाचा फेरा मारून पायरी वाटेने वर गेल्यावर उजव्या बाजूस  भोराई देवीचे मंदिर आहे . या गडाचे पुर्वीचे नाव भोरपगड हे या मातृदेवते वरूनच पडले . स्वराज्यात आल्यावर याचे नाव महाराजांनी सुधागड ठेवले . या ठिकाणी गडावर मुक्काम झाल्यास थांबता येते . प्राचीन मोठी घंटा व लाकडी वाघाची मूर्ती येथे आहे . भोर संस्थानाची ही कुलदेवता होती . बाहेर दगडी दिपमाल आहे . समोरच अनेक सती शीळा व विरगळ येथे आहे . बाजूलाच अनेक नक्षीकामासह असलेल्या दगडी समाधींचा समूह आहे. 

             पुढे चालत गेल्यावर गडवरील भव्य पठारावर अनेक इमारतीचे अवशेष दिसतात . थोड्या पराड्या सारख्या भागात दाट झाडी आहे व उजव्या बाजूला पायवाटेने खाली उतरल्यावर एक पाण्याचे पिण्यायोग्य पाणी असलेले टाके आहे . लांब अशी तटबंदी या ठिकाणी नजरेस पड़ते . तटबंदीत L आकारात एकच व्यक्ती जाईल अशी अंधारलेली बुरुजातून गेलेली वाट आहे काळजी घेत गेल्यावर यातून आपण भव्य तटबंदीच्या खाली येतो येथून पूर्वी गड उतार होता येत असे पुढे हा मार्ग दाट जंगलात जातो आता मात्र कुणी इकडे जात नाही . हा याचा चोरदिंडी दरवाजा आहे . असाच रायगडास साम्य असलेला वाघ दरवाजा आहे .

            येथून पुन्हा वर आल्यावर उजव्या बाजूस पंत सचिवाचा वाडा आहे .पेशवेकाळात बांधला गेलेला हा चौरसाकृती मजबुत वाडयात प्राचीन दगडी उखळ व जाती आहेत . आजही हा वाडा चांगल्या स्थितीत आहे . छत्रपती राजाराम महाराजानी शंकराजी नारायण यांना पंतसचीव ही पदवी देऊन सन्मान दिला होता . भोर संस्थानाची मुहर्तमेढ येथेच रोवली गेली . इंग्रजानंतर काही काळ हा गड भोर संस्थानाच्या देखरेखीत होता .

               थोडे वर पुन्हा आपणास भव्य पठार दिसते या ठिकाणी सुद्धा अनेक इमारतीचे अवशेष आहे पूर्व बाजूस खाली छोटी पायवाट आहे या  वाटेत पुढे दोन मोठी पाण्याची टाकी आहे . पठारावर एक तलाव दिसून येतो पुढे सारख्या आकाराच्या चार इमारती आहेत ही धान्यकोठार आहेत .या गडास रायगडा प्रमाणे बहुतेक बाजूने नैसगिक तरबंदी लाभली आहे . दुसरे एक विलक्षण साम्य म्हणजे टकमक टोक अगदी रायगडा प्रमाणे टोकदार व उंच व खाली प्रचंड खोल दरी व दाट झाडी मधील जंगली भाग अशीच ही केवळ रायगडची भव्यता सोडली तर निर्सगाची जुळी रचनाच म्हणावी लागेल . करवंदाच्या जाळीतील मुबलक रानमेवा व त्यातून दरवळणारा फुलांचा सुगंध तेथून मनमोहक दिसणारा तैल - बैलाची डोंगर शिळा व छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीतून पाय निघतच नाही पण संध्याकाळ होत चालल्याने घाई करावीच लागते म्हणून पाश्चापूर दरवाज्याकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळलो . गडाच्या पश्चीमेस सिद्धेश्वर महादेवाचे मंदीर उजव्या बाजूस आहे . या मंदिरा बाहेर दगडी गणेश शिल्प व नंदी आहे . बाजूलाच पाण्याने भरलेला कमल तलाव आहे . परिसरात दगडी पाण्याची टाकी देखील आहेत .

                पाश्चापूर मार्गाने खाली उतरतांना पूर्व व पश्चीम बाजूस दोन चिलखती बुरुज आहे. या बुरुजात जाण्यास एक मार्गी पायऱ्या असून पुढील भागात पूर्ण वाकून जावे लागते . बुरुजाची ही दुहेरी सरक्षण यंत्रणा या मार्गाची प्राचीन सुरक्षा व्यवस्था किती अभेद्य होती हे दर्शविते . दगडी पायऱ्या वरील शत्रू  येथून सहज माऱ्यात घेता येतो. पूर्वी येथे द्वार असावे ते आता कोसळलेले आहे . या मार्गाने खाली उतरतांना लोखंडी पायऱ्या व रिलिंग वनविभागाने लावल्या आहे . चढ - उतर करतांना काळजी घ्यावी लागते कारण दोन्ही बाजूने खोल दऱ्या व घनदाट जंगल आहे . दिड दोन तासात आपण ठाकूरवाडीत पोहचतो . या ठिकाणी पायथ्याशी असलेल्या पाश्चापूर गावात औरंगजेबचा बंडखोर पुत्र अकबराची छावणी होती त्यावेळी तो स्वराज्यात शरण आला होता .छत्रपती संभाजीराजे व त्याची भेट याच गावात झाली होती .छ छत्रपती संभाजी महाराज यांचेही वास्तव्य या गडावर होते . याच परिसरात परळीचा माळ आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि चिटणीस बाळाजी, आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी  व त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिले होते आज त्या ठिकाणी बाळाजी आवजी चिटणिसांची समाधी देखील आहे. हा परिसर प्राचीन काळापासून इतिहातील अनेक घरामोडी चा साक्षीदार आहे म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा वाटतो .



संजय खांडवे

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

पालीच्या बल्लाळेश्वराजवळील - सरसगड*


 ,*पालीच्या बल्लाळेश्वराजवळील - सरसगड*


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली ११ ८ कि. मी ., मुंबई वरून - पनवेल - नागोठाना मार्गे ११० कि .मी .

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

        महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर मंदिराच्या पूर्वेस अगदी लागून प्रचंड महाकाय दिसणारा पर्वत मला अनेक वेळा खुणवत होता. हा गड आहे हे बऱ्याच पर्यटकांना कळतही नाही दुर्ग भ्रमंतीच वेड लागल्यावर याची चढाई करण्याची संधी हिंदवी परिवाराचा सदस्य म्हणून मिळाली . पाली या ठिकाणी भक्त निवासात थांबण्याची चांगली सुविधा आहे.सकाळीच उठून जवळच 3 किं मी अंतरावर असलेल्या उन्हवरे या गरम पाण्याच्या झऱ्यात अंघोळ करून पालीच्या गणेशाचे दर्शन करून मार्गस्त होता येते . मंदीराच्या बाजूने पूर्व दिशेने गावा बाहेर जाणा-या रस्त्याने आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत पोहचतो . तेथून पायवाटेचा मार्ग छोटया बाण खुणांनी दर्शविलेला आहे. गडाच्या माहीतीचा फलकही येथे दिसतो . झाडी -झुडपा मधून चढणीची वेडी वाकडी पाऊल वाट दहा पंधरा मिनिटाच्या चढाईने आपल्याला गडाचे दर्शन घडविते . काळ्या पाषाणातील महाकाय सरसगड अधिकच लक्ष वेधून घेतो . झाडा - झुडपातून जाणारी घसरंडीची पायवाट जशी जशी आपल्याला उंचावर घेऊन जाते तसे तसे पाली शहराचे सुंदर दर्शन होत जाते . वाटेत एक पाण्याचे टाके आहे .पूर्वी येणारे - जाणारे व चौकी पहारेकऱ्यांसाठी अशी टाकी गडाच्या चौफेर असत . चालत राहिल्यावर चढाई अधिक तीव्र होत जाते . पुढे दगडात कोरलेल्या खाचे असलेल्या पायऱ्या लागतात . ही चढाई सावधतेने करत जावे लागते . खाली खोलगट भाग असल्याने काही ठिकाणी एकमेकांना सरक्षण देत वर चढत जावे लागते . आपण पहील्या कातर पाषाणा जवळ पोहचल्यावर त्या ठिकाणी एक गुहा दिसते . चौकोनी असलेली ही गुहा आत निमुळती होत जाते व पुढे यात एक छोटी खोली आहे सैन्याच्या आश्रयासाठी ही व्यवस्था होती . येथूनच दोन भव्य पाषाणातून वर जाणाऱ्या घळीतून पायरी मार्ग आहे . खालून चालत आलेल्या साठी अगदी दमछाक करणाऱ्या हया ९६ पायऱ्या आहेत . याची उंची दोन फुटाची आहे . वर जातांना येथे मोठा थरारक अनुभव येतो ,शरीराचा तोल पुढे ठेवतच वर चढावे लागते . पुढे आपल्याला दिसतो दोन बुरुजामधे एकाच पाषाणात कोरलेला दिंडी दरवाजा हजारो वर्षापासून शाबुत असलेली ही वास्तु एक अदभूत वास्तुशास्त्राचे वैभव आहे . आत प्रवेश केल्याबरोबर सैनिकासाठी काताळात कोरलेल्या ऐसपैस देवड्या आहेत . उजवीकडे वळण घेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याने आपण बुरुजावर पोहचतो तेथून खाली घळीतीत  पायऱ्याचे दृष्य कॅमेऱ्यात टिपल्या शिवाय कुणीही पुढ जात नाही येथून वर चढल्यावर बाले किल्ल्याचा भव्य कातळ कडा दिसतो याला गोल फेरा मारता येतो व यावर बालेकिल्ला आहे . तरबंदी मजबूत आहे पण फिरतांना काळजी घ्यावीच लागते .याच्या कुशीत काताळात पाण्याची असंख्य टाकी कोरलेली आहेत . उत्तरेकडे चालत जातांना या काताळात भव्य व विर्स्तीर्ण गुहा आहेत . याचा उपयोग निवास , भांडार , दारूगोळा आदि साठी होत असे . अशी मान्यता आहे की या गुहेत पांडवांनी वास्तव्य केले आहे. कोरीव शैलगृहावरून हा गड अत्यंत प्राचीन आहे . प्राचीन काळी देशावर व्यापार चालायचा बंदरावरून जाणारा माल या भागातून जात असे तेव्हा पासून चौकी पहारा आदि साठी हा गड महत्वाचा होता .निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणाकडे आल्यावर सुधागड , घनगड , कोरीगड सोबतच सरसगडही घेतला होता . नारो मुकुंद यांनी हा गड स्वराज्यात घेतला होता .त्यांच्या कडे या गडाची सबनिशी होती . पेशवाई नंतर हा गड भोर संस्थानाकडे गेला .१८१८ नंतर इंग्रजांचा ताब्यात होता .

          गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहे दक्षिणेकडून दिंडी दरवाज्यातून येणारा मार्ग व दुसरा उत्तरे कडून महादरवाज्यातून येणारा दुसरा मार्ग होय होय . या दरवाज्याच्या वर एक उध्वस्त इमारतीचा पाया व त्याच्या समोर एक बुरुज आहे . या इमारतीच्या बाजूनेच बालेकिल्ल्यावर जाण्यास मार्ग आहे . चढाई करतांना थोड़ा अवघड मार्ग असल्याने शिस्तीने व काळजी घेत जावे लागते . वाटेत एक पाण्याचे टाके आहे .बालेकिल्ल्यावर पोहचताच इमारतीचे अवशेष दिसतात उंच गवता मधून पायवाटेन पुढं आपणास पीर दिसतो . या बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे . या ठिकाणी प्राचीन मंदिराच्या खांबाचे व इतर अवशेष दिसतात .सतीशीळा देखील आहेत . हे मंदिर बांधीव तलावात आहे या तलावातील पाणी आटत नाही एवढ्या उंचावरही पाण्याची सुविधा हे सरसगडचे मुख्य वैशिष्ट्येच म्हणावे लागेल या तलावात कमळाची फुले देखील आहेत .व बालेकिल्ल्या वरून सुधागड , कोरीगड, माणिकगड कर्णाळा व इंद्रायणी नदीचा उगमस्थान जवळील नागफणी टेकडी येथून दृष्टीस पडते . अंबा नदीचे विस्तीर्ण खोरे व वळण घेत येणारा प्रवाह मनमोहक दिसतो .

           सरसगड हा अवघड चढाईचा आहे . पाली गावातून निघतांना पाणी सोबत ठेवावे . अवघड ठिकाणी फोटो व सेल्फीचा मोह टाळावा . गडउतार होतांना उत्तरेकडील महादरवाज्याने खाली आलो लॉकडाऊन मधे हा मार्ग कुणी वापरला नसल्याने गवत वाढलेले होते . हिंदवी परिवाराच्या मोहिमेत गवत काढत खाली उतरलो वाटेत गवतात सापही दिसले त्यामुळे काळजी घ्यावीचं लागते . बहुतेक ठिकाणी दोरखंड वापरून उतरावे लागले या मार्गाने उतरतांना माहीती घेवूनच उतरावे पुढे जंगलातून एका डांबरी रस्त्याला लागून रामअळीतून पाली गावात पोहचता येते .



संजय खांडवे

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

*दुर्ग निकष पूर्ण करणारा: वेताळवाडी किल्ला*

।* *दुर्ग निकष पूर्ण करणारा: वेताळवाडी किल्ला*
➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. सोयगाव , जि . छत्रपती संभाजी नगर उंची : ६२५ मी.बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - उंडणगाव -  हळदा घाटात हा किल्ला दिसतो पुढे हा रस्ता सोयगावला जातो . सिल्लोड - अजिंठा रोड वरील गोळेगाव या गावावरून वरील मार्गाला जाता येते .➖➖➖➖➖➖➖➖➖ 
विदर्भ - मराठवाडा - खान्देश या सिमेलगत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी समूह आहे . या लेणी पाहण्यासाठी अन अभ्यासण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात . याच लेणी समूहाच्या पाठीमागे छत्रपती संभाजी नगर जिल्हात असलेला वेताळवाडी किल्ला आहे . याला स्थानिक लोक हळदी घाटामुळे  हळदया किल्ला  म्हणतात . तसेच वाडीचा किंवा वसईचा किल्ला असेही याला म्हटले जाते . वरील दिलेल्या मार्गापैकी गोळेगाव वरून उंडणगाव व तेथून उजव्या बाजूला वळून सोयगाव रोडने आपण हळदा या गावात पोहचतो . याच रोडने दोन - तीन कि .मी . अंतरावर हळदा घाट लागतो एक दोन वळण घेतले की आपल्याला हा किल्ला दिसतो . पाहताच क्षणी कुणीही असो त्या वास्तुला पाहून हर्ष झाल्या शिवाय राहत नाही कारण या भागात दूर - दूर पर्यन्त किल्ला नावाची वास्तु दृष्टीस पडतच नाही त्यातल्या त्यात हा गिरिदुर्ग असल्याने त्याचे बुरुज व तटबंदी पाहून अधिकच आकर्षक वाटतो  . हळदा घाटात बाजूला गाडी पार्कीग साठी काही जागा आहे . हया परिसर जाणारे येणारे तुरळक वाहणे सोडता जवळपास कुणीही आढळत नाही . सार्वत्रिक सुटी असली तर काही तुरळक पर्यटक येतात कारण हा सुंदर किल्ला अजूनही लोकांपर्यन पोहचलेला दिसत नाही .           एक पूर्ण दुर्ग म्हणजे अर्थात गिरिदुर्गा साठीचे जे निकष असतात ते सर्व निकष हा दुर्ग पुर्ण करतो . महाद्वार , इतर द्वार , चोर दरवाजा , एकेरी व दुहेरी मजबूत तटबंदी , तोफ ,नगारखाना ,बालेकिल्ला , महल आदि अवशेष , धान्य कोठार , पाणी तलाव ही सर्व आपल्याला या किल्ल्या वर आपल्याला बघायला मिळतात . दोन किंवा तीन तासात हा किल्ला बऱ्यापैकी पाहता येतो काही पाऊल वाटा सोडल्या तर हा चढाई करण्यास फारसा अवघड किल्ला नाही . गाडी पार्क करून पाऊल वाटेने पाच दहा मिनिटात दरवाज्या पर्यन्त पोहचतो . प्रथम दर्शनी दुरून हा दरवाजा नाही तर बुरुज वाटतात . दोन बुरुजाच्या मधून वळण घेतले की आपल्याला दरवाजा दिसतो . या दरवाज्याच्या दोन्ही  वरच्या बाजूस जंजाळा किल्ल्यावर जसे क्षरभ चिन्ह आहे तसेच या ठिकाणी सुद्धा आहे . पाठीमागच्या बाजूला दरवाज्यापेक्षा ही मोठा व उंच बुरुज आहे . यावर ( मॅची कोलेशन ) म्हणजे जंग्या आहेत अश्याच पूर्ण तटबंदीला व दराज्याच्या वरही आहेत . बाहेर आलेले सज्जे नक्षीकाम केलेले असून ते बुरुजाची शोभा अधिक वाढवतात , या शत्रूचा हल्ला झाल्यावर यातून गरम पाणी , तेल , शिसे किंवा रेती ओतून शत्रूवर हल्ला करता येत असे दरवाज्या वरील जंग्या मधून किल्ल्याचा दरवाजा जर बाहेरून शत्रूने पेटवून दिला तर पाणी सुद्धा ओतता येत असे व लक्षही ठेवता येत असे अशी ही रचना आहे व महत्वाचे म्हणजे आजही ते मजबूतीने जसेच्या तसे शेकडो वर्षापासून उभे आहे . दगड , चुना ,शिसे आदि मजबूत बांधकाम केलेला हा दरवाजा म्हणजे जंजाळा दरवाजा  आहे . साधारणपणे किल्ल्याच्या दरवाजांना स्थानिक दिशा दर्शकानुसार व वैशिष्टयानुसार नावे दिली जात असत ह्या बाजूला जंजाळा किल्ला असल्याने याचे नाव त्यावरून पडलेले दिसते आत आल्याबरोबर उजव्या बाजूला सैनिकांच्या विश्राम तथा किल्ल्या वरील कामकाजासाठी ही असावी . पायरी चढून पुढे आपल्याला किल्ल्याची पहिली तटबंदी दिसते . संपूर्ण किल्ल्याला ही तटबंदी गोल फिरून पाठीमागील वरील उंच बुरूजाला मिळते . जागोजागी या तटबंदीला बुरुज आहेत या जंग्या आहेत या तटबंदीवरून सैनिकास शस्त्र - दारूगोळा व इतर रसद पोहचविता येत असे . उजव्या बाजूला कपारात एक पाण्याचे टाके आहे . तटबंदी व बुरुजावरील सैनिकांसाठी येथूनच पाणी पुरविल्या जात असे आता मात्र त्या गुहेत मोठ्या प्रमाणात वटवाघूळींचे वास्तव्य आहे . पाठीमागे बुरुजावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहे . बुरूजा वरून खाली बुरुजावर बांधलेल्या खोलीत जाण्यासाठी L आकाराचा एकमार्गी जीना आहे हा रस्ता दरवाज्या वरील बुरुजाच्या खोलीत पोहचतो आत कमानी आकाराची मोठी खोली असून यात दारुगोळा व राहण्याची व्यवस्था केली जायची . बुरुजावरील जंग्या खाली दरवाज्यापर्यन्त येणाऱ्या शत्रूवर व हळदा घाटावर लक्ष ठेवणे व मारा करण्यासाठी आहे हे पाहताच क्षणी लक्षात येते . पुढच्या तटबंदीवर गडावरील एक तोफ आहे आता साग वाणी तोफ गाड्यावर ती डौलात उभी आहे .         या किल्ल्याच्या बुरुजांचा अभ्यास केला तर या बाजूने चढत्या क्रमाने हे बुरुज एकमेकांच्या संपर्कात असल्याचे दिसतात . यावरून या किल्ल्याची अभेदयता सिध्द होते .सर्वोच्च शिखरावर असतेल्या दुसऱ्या तटबंदीमधील बुरुजा वरुन पहिल्या तटबंदी व बुरुजावर लक्ष ठेवता येते . शत्रूने पहिली तटबंदी जरी भेदली तरी त्याला दुसरी त्यापेक्षाही अवघड आहे . या तटबंदीवरही बालेकिल्ला शाबूत ठेवून गड लढत ठेवता येतो . पूर्व बाजूस वळण घेत बालेकिल्ल्यावर पोहचता येते . पूर्वेकडील पहिली तटबंदी व बुरुज झाडा झुडूपात दिसतात . वर आल्यावर सिताफळींच्या झुडूपात अनेक इमारतीचे अवशेष आहेत .जमीनीत असलेला दगडी तेल तुपाचा रांजण व त्याच्या बाजूला पडका बुरुज व धान्यकोठार आहे . पाश्चिम-पूर्व बाजूस भव्य तटबंदी व बुरुज आहे . वेताळवाडी धरण व जंजाळा किल्ला येथून दिसतो . उत्तरेकडे जातांना या गडाचा भाग निमुळता होत जातो वाटेत एक भव्य कोरीव व बांधिव तलाव आहे त्याच्या समोरच छत नसलेली पडकी इमारत आहे .       उत्तरेकडे आपल्याला अनेक कमानीची छत नसलेली इमारत दिसते . याला बारादरी किंवा हवा महल स्थानिक लोक म्हणतात . जेव्हा ही इमारत परिपूर्ण होती तेव्हा येथील सौदर्य व वातावरण कसे असेल याची कल्पना येथे आल्यावर कळते . समोर खाली वेताळवाडी गाव व पुढे सोयगाव शहर दिसते . या बाजूने अत्यंत चांगल्या स्थितीत असलेला वाडी दरवाजा आहे . या ठिकाणी सुध्दा प्राचीन इमारतीचे चांगल्या स्थितीतील अवशेष आहे . कपारीत या ठिकाणी छोटे पाण्याचे स्त्रोत आहे . पूर्वी याचा वापर होत असे . पूर्व बाजूस गडाच्या बाहेर जाणारा एक छोटा चोर दरवाजा आहे .             प्राचीन काळापासून या भागाला विशेष महत्व होते हे पूर्वेकडील बाजूस असलेल्या रुद्रेश्वर लेणी वरून समजते पण ती अर्धवटच आहे .बहामणी, मोगल , निजाम या मध्ययुगीन राजवटीत या किल्ल्यावर विशेष वावर होता व्यापारी व प्रशासकीय शहर बऱ्हाणपूर मुळे या मार्गास पहारेकरी म्हणून वसलेला हा किल्ला होता . प्राचीन  काळापासून या परिसरातील असलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास समोर येणे आवश्यक आहे

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

वेताळगड/वसईचा किल्ला। एक भ्रंमंती

वेताळगडावरील उत्तरेकडील भाग

गडावरील घसरंडीची वाट

बारादरीची कमान


 गडावरील तलाव

हळदाघाटातून दिसणारा वेताळगड



हेमाडपंथी मंदीर


आन्वा येथील हेमाडपंथी मंदीर


वेताळगडावरील गुहा

बांगडीतोंफ

बालेकिल्लावरील भाग

जमीनीमधील राजणं

गडावरून पश्मिम भागात दिसणारा जंजाळा किल्ला व वेताळवाडी धरण



गडावरील इमारती

गडावरील तलाव

वेताळवाडी गाव


गडावरील घुमट असलेली छोटी इमारत

निमुळती पाऊलवाट

गडावरील दरवाजावरील शिल्प
आमची इतिहासप्रेमी टिम



वेताळवाडी गड /वसईचा किल्ला /हळदा


सुटीचा दिवस आला म्हणून जमेल तशी सवड काढून दुर्ग अथवा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळाना भेट देत भ्रमंती करणारी आमची टीम सदैंव तत्पर असते .आजच्या काळात व्यस्त जीवनशैलीत वेळ काढणे ही फार मोठी गोष्ट आहे त्यातल्या त्यात आम्ही  राऊत सर,किशोर पंवार सर ,सुशिल पनाड सर,आणि इतिहासाचे अभ्यासक राजेश साळवे सर  सोडले तर  कामाचा मोठा व्याप असूनही भ्रमतीचे नियोजनाची आखणी सुरेश देवकर सरांचीच असते .आमचे काही मित्र ,मार्गदर्शक वेळेअभावी आमच्या सोबत वेळेअभावी येऊ शकले नसले तरी ते पूर्णवेळ आमच्या भ्रंमंतीचा आढावा घेत असतात बरींच आल्यांनंतर चर्चेसाठी तत्पर असतात येवढी ही माणसे आपल्या वासश्या विषयी आपुलकी जपतात हे पाहतांना असे मार्गदर्शक व सहकारी असल्याचा अभिमान वाटतो .
    खर तर आम्ही निघालो होतो अंतुर या किल्ल्यासाठी भराडी ,करजखेड या मार्गे पण भोकरदन तालुक्यातील हेमाडपंथी मंदीराला भेट दिली .प्राचीन नक्षीकाम ,असलेले  असे सुंदर मंदीर आजही  आहे आता त्याला लोखंडी खांबाने आधार देत त्याचे काम सुरू आहे .काहीस्वरूपात दुरूस्तीचे कामही सुरु आहे मंदिराच्या आतील कोरीव काम शेकडो वर्षानंतरही जसेच्या तसे आहे त्या दगडावर मारलेती पॉलीशही स्पष्ट जाणवते ,पुढील गड फिरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तेथून आम्ही निघालो व स्थानिकांच्या सूचनेनुसार ह्ळदा घाटातील किल्ला जवळ व पाहण्यासारखा आहे असे कळाले म्हणून किल्ला महत्वाचा या आशेने हळदा गावाकडे निघालो ,गोळेगाव -उंडणगावमार्गे -हळदा या गावात पाउण तासात पोहचलो व हळदा घाटात उतरतांना वेताळगडाचे /वसईचा किल्ला दर्शन् झाले बुलढाणा शहरापासून दोन अडीच तासाच्या अंतरावर असलेला वेताळगड आजपर्यन्त पाहीला नव्हता .आपण जवळ येवढा सुंदर किल्ला आहे हे पाहूण खूप आनंद झाला .घाटातून जात असतांना गडाची मजबुत तटबंदी व बुरुज लगेच दिसतात पण किल्ल्याचे प्रवेशद्वारमात्र समजत नाही .
         गडाच्या बाजूला घाटातूनच वर जाण्यास निमुळती पाऊलवाट आहे ती आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते .घाटात बाजूला गाडी लावून आम्ही त्या वाटेने मुख्य प्रवेश द्वारा पर्यन्त पोहचलो .आजही मुख्यप्रवेशद्वार मजबूत स्थितीत आहे या हे द्वार निमुळते असून जवळ येईपर्यन्तं दरवाजा दिसत नाही दरवाज्याच्या वर दोन प्रचंड सुस्थितीमधील बुरुज आहे शत्रू आत येणे शक्यच नाही तोफा,दगड,तेल,अंगार ओतण्यासाठी चाऱ्या आहेत .मुख्य द्वाराच्या बाजूला प्राण्याचे चित्र असलेले शिल्प आहे याच पद्धतीचे शिल्प पुढे जंजाळा /वैशागडावर सुद्धा आहे त्याची चर्चा पुढच्या लेखात स्वतंत्र करू .
        दरवाज्यातून येताना भव्य खोली दिसते दगडी बांधकामात कमानीमधून केलेले बांधकाम आहे वर आल्यावर एका निमूळत्या वाटेतून बुरूजावरील एका खोलीत उतरणारा रस्ता आहे त्या छोटयाश्या खोलीमधून गडात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर मुख्य द्वारापासून हळदाघाटात व जंजाळा गडापर्यन्तच्या हालचालीवर लक्ष ठेवता येते .पुढे गड चढावा लागणार म्हणून त्या थंडगार खोलीत आम्ही जेवन केले व पुढे निघालो ,वर जातांना एक मोठी गुहा आहे  त्यात निघालेले दगड या गडासाठी वापरले असावेत त्यात पाणी आहे व प्रचंड बटवाघुळीचा आवाज आत जाणे योग्य नाही म्हणून पुरेसे पाणी घेऊन निघालो. येवढया मोठया गडावर वरून येतांना दोनच औरंगाबाद येथून आलेले दुर्गवेडे भेटले व वर गड सुंदर व खूप मोठा आहे असे सांगीतले व पाणी सोबत ठेवा सांगून गडउतार झाले
       गडाचे दुरूस्तीचे काम बऱ्यापैकी चालू असल्याचे दिसले ढासाळलेली तटबंदी व बुरुज बांधणी(दुरूस्ती) काम सुरु आहे  .मुख्य दरवाज्याच्या वर एक तोफ आहे बांगडी प्रकारातील ही लोखंडी तोफ बुरुजावर् आता व्यवस्थितपणे उभी केली आहे  .थोडा वळसा घेत काही अंतर चढाई केल्यावर आपण गडावर पोहचतो' ,गडाचे क्षेत्र मोठे आहे आता वर सिताफळांची दाट झाडी आहे. थोडे चालत गेल्यावर त्या झाडीमध्ये जिर्ण अवस्थेमधील इमारती आहे ,जमीनीमध्ये दगडापासून तयार केलेला भला मोठा राजंण आहे तेलतुपाचा राजंण त्याला म्हटलं जाते ,त्याच्या बाजूला कमाणीचे  छत असलेली इमारत आहे वर प्रकाश येण्यासाठीचे झरोके आहेत ही धान्यकोठी असावा असे वाटते
त्याच इमारतीसमोर काहीवर्षापूर्वीच छत कोसळलली इमारत दाट झाडीत आहे हा बालेकिल्ला असावा .त्या दाट झाडीत खूप मो०या इमारतीचा पाया आहे दगड पडलेल आहे,प्राचीन विटा,कौलारु /भांडी तुकडे यांचे अवशेष दिसतात. थोड पुढ गेले की प्राचीन तलाव आहे मार्च मध्ये सुद्धा तलाव ६०% भरलेला दिसला गडाला याच तलावाचे पाणी वर्षभर पुरत असावे .त्या तलावासमोरच एक प्राचीन इमारत आहे छत नसलेली पण आजही मजबूत स्थितीमध्ये आहे कोरिव काम केलेले पायाचे दगड दिसतात .
        गडाच्या उत्तरेकडे थोड चालत गेले की एक जिर्ण कमानीची बारादरी इमारत आहे त्या कमानीमधून खाली वेताळवाडी गाव दिसते या ठीकाणाहून संपूर्ण खान्देश भागात लक्ष ठेवता येते .त्या इमारतीच्या खाली वेताळवाडीकडे निघणारा गडाचा जंजाळा किल्याकडे जाणारा दरवाजा आहे. संपूर्ण गडाला मजबूत तटबंदी व बुरूज आहेत या तटबंदीवरून संपूर्ण गडाला वेढा मारता येतो ,गडाला म्हणजे बालेकिल्यालाही तटबंदी असावी असे अवशेषावरुन वाटते. गडाच्या दक्षिण बाजूस एक दुहेरी तटबंदीमधील बुरुज दिसतो त्याच्याच बाजूला घुमट असलेती एक छोटी समाधीसारखी नक्षीकाम केलेली इमारत आहे यात दोन्ही बाजूला एक माणूस उभा राहील येवढयाच झरोका असलेल्या खोल्या आहेत अतिक्षय दाट झाडी व पडझड ह्यामुळे बऱ्याच गोष्टी गडावर दबून पडलेल्या आहेत.
सैन्याची मोठी रसद व दारुगोळा मुबलक असल्यावर हा किल्ला कुणीही जिंकू शकणार नाही  अशी रचना आहे उत्तरेकडील हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधला असावा,किल्याच्या पश्चिमेस जंजाळा /वैशागड दिसतो त्याच वाटेत असलेले वेताळवाडीचे धरण दिसते . या दोन्ही किल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी या भागातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात  अंतूर, लहुगड नांद्रा, तालतम, भांगसीमाता, सुतोंडा , राहिलगड, मस्तगड असे तब्बल आठ दुर्लक्षित गड-किल्ले आहेत ह्यांना भेट दिल्यानंतर सविस्तरपणे मांडू या
             तेथून आम्ही परत फिरलो एक परिपूर्ण असा किल्ला पाहण्याचे आम्हा सर्वांना समाधान झाले दुपारचे दिड वाजले होते व पुढे आम्ही रूद्रेश्वर लेणीकडे वेताळवाडी मार्गे निघालो  ..........


( हा किल्ला बुलढाणा,जालना,औरंगाबाद,सिल्लोड,जळगाव या शहरापासून एका दिवसात होईल असा आहे या पारिसरात रूद्रेश्वर लेणी ,घटत्कोच लेणी व जंजाळा किल्ला पर्यटनासाठी आहे )

क्रमशः.....................

संजय खांडवे
बुलढाणा 9011971122
       

रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. सिल्लोड , जि . छत्रपती संभाजी नगर
उंची : ६२५ मी.
बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - अंभई मार्गे ९० कि मी., सिल्लोड किंवा अंजिठ्या वरुन गोळेगावला येवून जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
छत्रपती संभाजी नगर जिल्हयात सात महत्वाचे किल्ले आहेत . यामधील देवगिरी हा इतिहास प्रसिद्ध किल्ला सोडला तर इतर किल्ले हे दुर्लक्षितच वाटतात .त्यापैकीच एक म्हणजे वैशागड होय .याला जंजाळा किल्ला किंवा तालतम किल्ला असेही म्हणतात . छत्रपती संभाजीनगर - अजिंठा रोड वरील गोळेगाव पासून उंडणगाव अंभई मार्गाने जंजाळा गावात पोहचता येते व पुढे कच्च्या वाटेने दोन तीन किलोमीटर शेतातून पाऊल वाटेने जावे लागते . दुसरा मार्ग सोयगाव वरून जरांडी गावातून पुढे पाऊल वाटेने पश्चिमेतील जरांडी दराज्यातून गडावर पोहचता येते . जंजाळा गावातून जाणारा मार्ग सोपा वाटतो . दुर्गाचे गिरिदुर्ग , जलदुर्ग, भूदुर्ग, वनदुर्ग असे प्रकार पडतात पण जंजाळा म्हणजे गिरिदुर्ग व भूदुर्ग प्रकाराचा संगम आहे . दक्षिण बाजूस भूदुर्ग व इतर बाजूस गिरिदुर्ग प्रकारात येतो . अजिंठा डोंगर रांगेत असलेला हा दुर्ग विस्ताराने खुप मोठा आहे . यावर भ्रमंती करायची म्हणजे दोन अडीच तास लागतात .  गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने जंजाळा गावातून पाणी सोबत घ्यावे . पाऊल वाटेने तासाभरात गडाच्या बुरुजा पर्यन्त पोहचतो ही बाजू भुदुर्गाची असल्याने पूर्व - पश्चिम मोठा खंदक त्या काळी खोदून मजबूत तटबंदी दुहेरी बुरुजासह उभी केलेली आहे . सपाट भूप्रदेशावरून येणारे दोन तीन किलो मीटर अंतरावरील शत्रू टेहाळता येतो व माऱ्याच्या कक्षेत येतो . आता या बुरुजाची तटबंदी फोडून किल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी  मार्ग केलेला दिसतो  . पूर्व बाजूची तटबंदी आजही अस्तीत्वात आहे . या तटबंदीत एक छोटा कमानीचा दरवाजा आजही अस्तीत्वात आहे .पश्चिमेस खोल दरी असल्याने काही गरज असलेल्या ठिकाणी तटबंदी दिसते . या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी बुरुज बांधलेले आहेत . पूर्वेकडील तटबंदी वरून खोल दरीत वाकाटकांच्या काळात पाचव्या शतकात कोरली गेलेली घटत्कोच लेणी समूह दिसतो व समोरच वेताळवाडी धरण व त्या पलिकडे वेताळ वाडी किल्ला नजरेस पडतो . आता या किल्ल्याचे संवर्धनाचे काम सुरु आहे . या तटबंदी खाली उतरून पाऊल वाटेने चालत गेलो की दरवाजा दिसतो . हा महादरवाजा  घटकोत्कोच लेणीच्या दरीत जातो . आता मात्र हा रस्ता वापरात नाही .प्रथम दर्शनी दूर वरून पाहिले की हे दोन बुरुज वाटतात पण दोन बुरुजाच्या मध्ये हा आजही कमानीच्या वर नगारखाना व दुमजली इमारतीच्या पडक्या भिंतीसह संवर्धनाच्या प्रतिक्षेत दिसतो  .या दरवाज्यातून येणाऱ्या व्यक्तीवर व त्याच्या हालचाली वर  चौफेर नजर ठेवता येते .सैनिकांच्या राहण्या साठी व चौकी साठी सुंदर कमानीच्या देवड्या चांगल्या स्थितीत आहेत . खाली कोरीव नक्षीकाम केलेले अनेक दगड पडलेले आहेत .दरवाज्यातून वर आल्यावर उजव्या बाजूला दारुगोळा कोठारा सारखी आजही भक्कम मजबूत असलेली मोठी दगडी इमारत आहे . संपूर्ण किल्ल्यावर जागो जागी सिताफळे व इतर तत्सम झाडे मोठ्या प्रमाणात आहेत व या मधेच किल्ल्यातील अनेक महत्वाच्या इतर इमारती झाकल्या गेल्या आहेत . पठारावर चार पाच तलाव आहेत त्यापैकीच हा दक्षिण बाजूच्या पठारावरील मातीचा गोल तलाव आहे . पूर्वी या किल्ल्यावर मोठी मानवी वस्ती असावी हे त्या ठिकाणा वरील अवशेषावरून कळते . या तलावाच्या पश्चीम दिशेला थोडे चालत गेले की जरांडी दरवाजा आहे .किल्ल्याच्या पायथ्यापासून हा बुरुज भासतो कारण याचे द्वार उत्तर दिशेला आहे . या ठिकाणी एक पारशी शिलालेख आहे . या दरवाज्यात पोहचणेही अडचणीचे आहे . पश्चीम बाजूस एक समोर आलेल्या डोंगर कड्याच्या टोकावर एक बुरुज आहे . या बुरुजावरून उत्तर - पश्चीम भागातील बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवता येते . किल्ल्याच्या मध्यभागी झुडपात एक कमान दिसते व आतमधे अनेक पडक्या भिंती आहेत  . हा शाहीमहल असावा असे दिसते बाजूला दोन मोठे बुरज आहेत बुरुजावर इमारत असावी असे अवशेष आहेत . हा बालेकिल्ला आहे . या बुरुजावर दगडात कोरलेले सिंहच्या पंजात  हत्ती असल्याचे क्षरभ चिन्ह आहे .पडक्या राणी महलापासून पुढे गेलो, दाट झाडीमधे छत कोसळलेला सहा खोल्यांचा वाडा दाट सिताफळाच्या झाडी उगवलेल्या अवस्थेत दिसतो . तेथून पूर्वेला प्रचंड दोन झाडे भिंतीवर घेऊन उभी असलेली एक चांगल्या स्थितीमधील इमारत दिसते थोडी वाट शोधतच तेथे पोहचावे लागते .थोड चालत गेल्यावर उंच टेकडीवर पूर्व दिशेला तोंड असलेले प्रचंड नक्षीकाम केलेले ते प्रार्थनास्थळ आहे . ही इमारत अजूनही चांगल्या स्थितीत आहे .समोरच गडावरील आणखी एक तलाव दिसतो . पूर्वकडील पठारही खूप मोठे आहे त्या बाजूला देखीत काही बुरुज व तटबंदी नजरेस पडते . सोयगाव - वेताळ वाडी  या दिशेने दोन बुरुजाच्या मध्ये पडझड झालेल्या इमारती सह दरवाजा आहे . कामकाज व चौकशी साठी दोन्ही बाजूनी दोन कमानीच्या  इमारती आहे पूर्वी त्यावर छत होते आता दगडांचा ढाचा शिल्लक दिसतो .
          टेकडीरून उजव्या बाजूला पाऊल वाटेने सय्यदपीर बाबाच्या दर्ग्या पर्यन्त येतो बाजूलाच मोठा खोदलेला तलाव आहे या तलावाला बालेकिल्ल्या च्या बाजूने पायऱ्या दिसतात .दर्गा परिसरात दोन दगडी शिलालेख आहेत . असा हा विस्तीर्ण किल्ला पावसाळयात अगदी हिरवळीने नटलेला असतो .
          उत्तरेचे प्रवेशद्वार  असलेले ऐतिहासिक बऱ्हाणपूर शहर हे जवळ असल्याने या डोंगर रांगेतीत अंतुर , जंजाळा , वेताळवाडी हे किल्ले मध्ययुगीन इतिहासात महत्वाचे होते .१५५३ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाननिजामशहाने हा जिंकला व त्यानंतर १६३१ मध्ये शहाजहानने जिंकला अशी माहीती मिळते . या किल्ल्या वरून उत्तरेतीत मोठ्या भूभागावर टेहाळणी करत पहारा ठेवता  येत असे हे आजही कळते . या परिसरात रुद्रेश्वर लेणी , वेताळवाडी किल्ला ,घटत्कोच लेणी , अंभई व अन्वा येथील प्राचीन मंदिर या ठिकाणांना भेटी देता येतात .


संजय खांडवे

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*

*त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*


➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
उंचीः१०८६ मी.
नाशिक पासून त्र्यंबकेश्वर मार्गे ४७ किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
नाशिक जिल्हयात ५० पेक्षा अधिक लहान मोठे किल्ले आहेत . यामधील बरीच ही गिरीदुर्ग प्रकारात असून बहुतेक किल्ले अत्यंत दुर्गम आहेत . चढाई करण्यासही अवघड आहेत . सहयाद्रीची विस्तिर्ण पर्वत रांग जिल्हयाच्या पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेली आहे .  सेलबारी , हिंदबारी, घोलबारी , सातमाळ , अजिंठा , त्र्यंबक आदि डोंगर रांगा आहेत . नाशिक जिल्हात प्राचीन लेणी समूह देखील या डोंगर रांगेत आढळतात . आकाशा सोबत स्पर्धा करणारी उंच आणि महाकाय डोंगर निर्सगाचे सौदर्य अधिकच वाढवतात . याशिवाय त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तीलिंगा पैकी एक हे नाशिक मधेच आहे . दर १२ वर्षानी या ठिकाणी सिहस्थ कुंभमेळा भरतो . रामायण , महाभारत या पौराणिक ग्रंथात नाशिक व त्या परिसरातील उल्लेख येतो मध्ययुगीन कालखंडात हा प्रदेश म्हणजे अत्यंत धामधुमीचा होता . या परिसरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या हे या परिसरातील गडकोटावरून दिसून येते , पण या ऐतिहासिक घटना अजूनही पडदया आड गेलेल्या दिसतात . याचे शास्त्रशुद्ध संशोधन होणे गरजेचे आहे . दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी याच त्र्यंबक रांगेतून उगम पावते .
        याच त्र्यंबक डोंगर रांगेमधे ब्रम्हगिरी , अजनेरी , राजनगिरी ,गडगडा , बहुला व सर्वात उंच उतवड या सोबत असलेला बसगड म्हणजे भास्करगड हा एक महत्वाचा किल्ला आहे . उंच डोंगरावर खालून टोपीच्या आकाराचा दिसणारा हा किल्ला पाहताच क्षणी मन वेधून घेतो . गोंडे घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्लयाची निर्मिती झाली . त्रिंबक वरून गोंडे घाटातून उतरून प्राचीन काळी कोकणातून दाभोसा - खानवेल - वापी - गणदेवी - सूरत असा व्यापारी मार्ग असावा . म्हणूनच त्यावेळी या परिसरातील किल्ल्याना विशेष महत्व होते .भास्कर गडावर पोहचण्यासाठी त्र्यंबकेश्वर वरून निर्गुडपाडा येथे पोहचता येते तसेच मुंबई - नाशिक महामार्गावरून सुदधा या पाडया पर्यन्त पोहचता येते .निर्गुडपाड्या वरून हरिहरगडावर सुद्धा जाता येते . या पाड्यात जेवणाची चांगली व्यवस्था होते . निर्गुडपाड्या वरून जांभुळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने चारचाकी वाहनाने नागफणी टेकडी व भास्करगडच्या खिंडीत वाहने उभी करून डाव्या बाजूला जंगलातून जाणारी पायवाट आपल्याला भास्करगडावर घेवून जाते .या गडावर भ्रमंती करतांना अत्यंत महत्वाचे म्हणजे आपण समुहाने भ्रमंती करावी . पाऊल वाट दाट झाडी मधून जाते करवंदीच्या दाट किर्र करणारी जाळी मधून वाट काढत पुढे जावे लागते . फणसादि सारखी काही मोठी वृक्ष असल्याने गडाची निश्चीत दिशा न समजल्याने भूलभुलैय्या सारख्या पाऊल वाटा आपला मार्ग भटकवू शकतात . दुर्ग प्रेमीनी वाटेवर केलेल्या खुणा समजून घेत जावे लागते त्यामुळे शक्यतो स्थानिकांची मदत जरूर घ्यावी . दिड ते दोन तास गडाच्या पठारावर पोहचण्यासाठी लागतात . वाटेत व गडावरही पिण्याच्या पाण्याची सोय नाही . त्यामुळे सोबत पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे . तासाभराची पायपीट केल्यावर दाट झाडी मधून आपण छोटया मोकळ्या पठारावर येतो तेव्हा समोर गडाचे कातळ टोक दिसते . पाठीमागे डाव्या बाजूला आपल्याला नागफणी डोंगर व हरिहर गड दिसतो व त्या पाठीमागे त्र्यंबक गड ही दिसतो . पुन्हा थोडी चढाई केली की गडाच्या कातळाच्या जवळ पोहचतो .हा जहानासारखा समोर आलेला त्रिकोणी भाग आहे . याच्या डाव्या बाजूला कातळ पाय वाटेने गेले की एक भली मोठी गुफा आहे व या गुफेत ग्रामदेवता आहे . गडावर जायचे असल्याने आपल्याला डाव्या बाजूने न जाता उजव्या बाजूने पुढे कातर कड्याला लागून पाऊलवाटेने चालत जावे लागते वर उंच सरळ कडा व खाली खोल दरी आहे . बहुतेक ठिकाणी दरड कोसळल्याने दगड पडलेली आहे काही ठिकाणी काळजी घ्यावी लागते . हरिशचंद्र गडावर जातांना सुद्धा अशीच वाट लागते . कपारात नैसगीक गुहा तयार झालेल्या दिसतात . हिवाळ्यात गेल्यावर हा ट्रेक करताना जाणवणाऱ्या थंडीची म जाचं वेगळी वाटते चालून घामही येतो अन थंडीही जाणवते . पक्षांचा किलबिलाट अन मंजूळ वाहणारा वारा सुखावून टाकतो . पुढे आपल्याला दिसतात काताळात कोरलेल्या पायऱ्या अगदी हडसर किल्लयावर जश्या आहेत त्या पद्धतीच्याच ह्या पायऱ्या आहेत . प्रचंड मोठी दगड या मधे पडलेली आहे . थोडे वर गेल्यावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो . पूर्वी अर्धा हा दरवाजा माती दगडांनी भरलेला होता पण गडवाट तथा शिवछत्रपती परिवार व इतर दुर्गप्रेमींनी या ठिकाणी हा रस्ता व गडावरील पाण्यांची टाकी गाळातून मुक्त करण्याचे काम केले आहे व अजूनही करत आहेत . वळण घेवून जावे लागते त्यामुळे अगदी जवळ जाईपर्यन्त दरवाजा दिसत नाही . पायरीसह  सर्व ढाचा एकाच दगडात कोरलेला आहे . दरवाज्यावर दोन्ही बाजूने चक्राकार दोन फुले कोरलेली आहेत दरवाज्याची उंची मध्यम आहे आत मध्ये देवळ्या कोरलेल्या आहेत .
                     दरवाज्या पासून थोडे वर चालत आले की दोन मार्ग आहे . किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर दोन्ही वाटेने जाता येते . या ठिकाणी अनेक उध्वस्त इमारतीचे केवळ अवशेष दाट गवतामधे दिसतात . संपूर्ण पठारावर फेर फटका मारतांना किल्ल्याची जागोजागी उध्वस्त झालेली तटबंदी नजरेस पडते . ७ ते ८ पाण्याची टाकी आढळतात . एका दगडी समाधी ची शिळा देखील या किल्ल्यावर आहे . एका तलावाच्या बाजूला वीर हनुमानाची शेंदूर लावलेली दगडी मूर्ती आहे मंदिराला पडलेल्या दगडांची चार पाच फुटांची भिंत रचलेली आहे आत काही कोरीव दगडवरून त्या ठिकाणी छोटे मंदिर असावे असे दिसते . समोरच कातरकड्याची खोल दरी आहे अश्या ठिकाणी निश्चितच काळजी घ्यावी लागते .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे . यादव ,बहामणी , मुघल , मराठे, इंग्रज आदि शासकांचे या किल्ल्यावर राज्य होते . शहाजी राजें यांनी देखील हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता . १८१८ नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला . दिड दोन तास जंगलातून पायपीट करत जाऊन गडावरील पायऱ्यामधील गाळ व मोठमोठी दगड हटविण्याचे काम करणाऱ्या तथा पठारावरील गाळाने  गच्च भरलेल्या दगडी कोरीव पाण्याच्या टाक्या गाळातून मुक्त करणाऱ्या सर्व गड किल्ले संवर्धन करणारे विविध सेवाभावी संस्थाचे मावळे हे खऱ्या अर्थाने शिवरायांचे सच्चे मावळे म्हणून काम करतांना दिसतात हे या भागाचे विशेष .

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )



शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )

➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . अकोले जि. अहमदनगर
उंची : १३९१ मी
मार्ग :  समृध्दी महामार्गावरून सिन्नर किंवा भारवीर इंटरचेंज जवळून उतरून, किंवा संगमनेर वरून अकोले - राजूर मार्गे जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्सगाचं अप्रतीम सौदर्य हे सहयाद्रीत च बघायला मिळते . याच कुशीत अहमदनगर व नाशिकच्या अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात . सर्वतीर्थ जटायु मंदिर टाकेद व सिन्नर येथील प्राचीन गोंडेश्वर  मंदीर जवळच आहेत . एका भल्या मोठ्या लांब पट्टया सारखा दिसणारा हा गिरीदुर्ग पट्टा गड मन प्रसन्न करतो . शिवाजी महाराजांनी या किल्यावर काही दिवस विश्रांती केली होती म्हणून याचे नाव विश्रामगड पडले . वरील मार्गाने आपण पट्टावाडी जवळ पोहचलो की डांबरी रोडने थोडे पुढे गेले की आधुनिक काळातीत एक सिमेन्टची कमान दिसते . या ठिकाणी चौकी आहे .नाम मात्र प्रवेश फी भरून प्रवेश मिळतो . वनखात्याच्या माध्यमातून या परिसरात सवंर्धनाचे काम झालेले दिसते . समोरच एक तोफ व आताच्या काळात बसविलेला हत्ती दिसतो . समोरच किल्याच्या माहिती विषयीचे नकाशासह फलक दिसून येतात यावर नजर फिरवून गेले म्हणजे भ्रमंती करतांना किल्ला चांगला समजून घेता येतो . वळणदार चढाई करत गेले की वन खात्याने बनविलेला पायऱ्या लागतात वाटेतच आताच्या काळात बनविलेला एक दरवाजा वजा स्वागत कमान लागते . तटबंदीचे अवशेषही नजरेस येतात . या वाटेने चढाई करत असतांना काताळात कोरलेल्या लहान मोठ्या गुफांचा समूहच आहे . सैनिकांच्या निवाऱ्या साठी वापरला जात असावा असे दिसते . यामधे एक लक्ष्मणस्वामी गुफा आहे  बाहेर देवदेवतांची सुंदर शिल्पे आहेत .येथूनच आपल्याला दोन काताळाच्या मध्ये असलेल्या चीऱ्यात भव्य तटबंदी बांधलेली दिसते . पुढे वर  चढत आल्यावर एक प्रशस्त गुफा आहे २५ ते ३० व्यक्ती राहू शकतील अशी आहे . थोड्याच अंतरावर एक छोटा भुयारी मार्ग आहे आत पाणी साचलेले दिसते . उजव्या बाजूला मजबुती ने उभा असलेला त्र्यंबक दरवाजा आहे . या वाटेने पट्टावाडीत उतरता येते . काळ्या दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून गेले की एक पाण्याचे टाके आहे .या टाक्याचे दोन भाग आहेत अगदी शिवनेरीवरील साखळी मार्गा जवळ असलेल्या टाक्यासारखे आहे . अष्टभूजाधारी पट्टादेवी मंदिर या टाक्याच्या परिसरात आहे . 
              पठारावर पोहचत आलो की मेघडंबरी मधे असलेला शिवरायांचा अर्धाकृती पुतळा पाहिल्यावर येणाऱ्या  मावळयाचा थकवा नाहीसा होतो अन प्रत्येकजन जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देत आपसूकच नतमस्तक होतो . पाठीमागे अंबरखाना दिसतो . किल्यावरी ही वास्तु सुस्थितीत आहे आत शिवचरित्रातील अनेक प्रेरणादायी प्रसंग उठावदार शिल्पामधे आहे . शिवराज्याभिषेकाचा प्रसंग जीवंत वाटणाऱ्या मूर्ती रूपाने उभारला आहे .अंबरखान्याच्या आजू बाजूला जुन्या वाडे व वास्तुचे अवशेष आढळतात . हा किल्ला नैर्सगीक कातळाची तटबंदी लाभलेला आहे हे प्रचंड लांबलचक पठारावर गेल्यावर  कळते . येथून सोन टेकडी व त्याच्या विरुध्द बाजूस जाता येते . पाण्यासाठी अनगिणत टाके हजारो वर्षापूर्वी येथे निर्माण केले गेले व ते आजही वापरात आहेत .
     कोकणवाडीच्या बाजूला कडेलोट दरवाजा आहे . त्याच्या पुढे कोकण दरवाजा आहे दोन्हीचेही आता फक्त अवशेष दिसतात . शिवकालिन बंधारा आजही पाणी साठवून ठेवण्याचे काम करतो . त्याच्या खाली सुद्धा अजून एक तलाव आहे म्हणजे पट्टा किल्या वरील थोड देखील पाणी वाया जात नाही त्याच्या बाजूला तटबंदी व बुरुज दिसतात . पठारावर काताळात कोटलेल्या अजस्त्र पाण्याच्या टाकी आहेत . समोरच बारा टाके समुह आहे . बरेच टाके भूमीगत पद्धतीने आतुन जोडलेली आहेत पाणी अत्यंत शुद्ध व थंड आहे . बारा टाकी समुहा पेक्षा आकाराने मोठ्या  सात टाक्यांचा समूह आहे . यासोबतच अनेक गुहा किल्यावर आहेत त्यापैकी एक धान्यकोठार म्हणून आहे .ऐसपैस जागा असलेल्या या गुहेत जमीनीत धान्यसाठवणी साठी दोन खोल राजंणा सारखे कोठ्या आहेत प्राचीन काळापासून याचा उपयोग होत असावा .
          किल्यावरील सर्वात उंच भाग म्हणजे सोनटेकडी या टेकडीकडे जातांना डाव्या बाजूला कातरकडा आहे सुरक्षेसाठी लोखंडी रिलिंग आहे . सोनटेकडीच्या सर्वोच्च शिखरावर सुरक्षित केलेला व्हयु पॉईन्ट आहे . वारा प्रचंड वाटत असल्याने काळजी घ्यावी लागते .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C आकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे आहे .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे .पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी अहोरात्र रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड  केली .त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते , शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या किल्यास विशेष महत्व आहे . महाराजांनी१६ ते १९ नोव्हेंबर १६७९ मध्ये जालनापूरवर स्वारी करून लुटले . महाराजांनी व्यकोजीराजे यांना लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख येतो .मुघल मुलुखाच्या या स्वारीत त्यांनी चांंगला वचक बसविला त्यावेळी शहजादा मुअज्जम हा औरंगाबादातच होता . त्याला वळसा घालून महाराज संगमनेरकडे निघाले त्यावेळी अहमदनगरहून येणाऱ्या  रणमस्तखा, आसिकखान व जाबताखान यांच्या ८ ते १० हजार फौजेने महाराजांच्या सैन्यावर हल्ला  केला . त्यावेळी सिदोजी निंबाळकर , हंबीरराव मोहिते , संताजी घोरपडे , मानाजी मोरे हे महाराजा सोबत होते . सिदोजी व हंबीररावांनी रणमस्तखा सोबत लढाई केली व महाराजांना स्वराज्य कार्यासाठी लागणारी लूटीच्या सर्व सामानासह पट्टा किल्याकडे पाठविले या लढाईत सिदोजीराव धारातीर्थी पडले स्वराज्य कार्यासाठी इतरही सरदारांनी जीवाची पर्वा न करता लढाई जिंकली या महान बलीदानानेच महाराजांना पुढे जाणे शक्य झाले .ही लढाई पावनखिंडच्या लढाईची आठवण करून देते . महाराज बर्हीर्जी नाईकांच्या सुचविलेल्या मार्गानुसार म्हाळुंगी नदीच्या काठाने 30 नोव्हेंबर १६७९ रोजी  पट्टा किल्यावर पोहचले . या ठिकाणी ते १७ दिवस होते . हा किल्ला अत्यंत मजबूत होता मुबलक पाणी ,तटबंदीची व घनदाट जंगलाची सुरक्षितता व मोठी शिबंदी ह्या कारणाने महाराज येथे थांबले . रमणीय निर्सग व आरोग्यास उत्तम असे वातावरणाने महाराज समाधानी झाले असावे . महाराजांच्या आयुष्यातील ही शेवटची मोहीम ठरली . या किल्यावर केलेली विश्रांती यामुळे या किल्यास विश्रामगड असे नाव पडले. 



संजय खांडवे

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

चावंड किल्ला

प्राचीन व्यापारी मार्गाचा पहारेकरी : किल्ले चावंड
➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . जुन्नर जि. पुणे
उंची : ३४०० फुट
मार्ग : जुन्नर वरून आपटाळे मार्गे २० कि मी., छत्रपती संभाजी नगरहून नगर - आळेफाटा किंवा समृध्दी महमार्गारून सिन्नर जवळून उतरून जाता येते 
➖➖➖➖➖➖➖

जुन्नर परिसरातील शिवनेरी नंतर अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणजे चावंड किल्ला होय . याला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद ,प्रसन्नगड अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली . गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला आहे . हा किल्ला दुर वरून पाहताच एक महाकाय दगड़ा सारखा दिसतो . चारही बाजूने नैर्सगिक कातरकडा आहेत . त्यामुळे पूर्वीच्या युध्दतंत्रा नुसार शत्रूंना  हा गड चढाई करण्यास अशक्य असे . त्या कातरकडावरही काही ठिकाणी तटबंदी केल्याचे अवशेष आजही दिसतात .
            जुन्नरवरून नाणेघाट मार्गावरील आपटाळे मार्गे तास दिड तासात आपण चावंडवाडी कमान असलेल्या फाट्यावर पोहचतो कमानीतून थोड आत गेले की डाव्या बाजूला एक छोटी घरघुती हॉटेल व पार्कींग साठी जागा आहे . उजव्या हाताला समोर महाकाय चावंड किल्ला दिसतो आम्ही सकाळी नऊच्या  सुमारास किल्ल्याच्या छायेत होतो सूर्य त्यामागे लपला होता . वनविभागाच्या हददीतून चालत असतांना आताच्या काळातील बाधीव पायऱ्याने चढाईस सुरुवात करावी लागते . १५ ते २० मिनिटाची बांधीव पायऱ्याची वळण घेत जाणारी श्रृंखला संपली की खडकात फसविलेले लोखंडी रिलिंग दिसतात पूर्वी पायऱ्या होत्या पण त्या ब्लांस्टींग करून इंग्रजांनी उडविल्या . वाट एकेरी आहे पण लोखंडी आधाराने खोल दरीची भिती कमी होते . कमी अधिक ठिकाणी लोखंडी वायर रोपही आधाराला आहेत . थोड पुढं गेले की नळीच्या आकाराच्या खोलगट चरीतून दगडी पायऱ्या चढत गेले की , थोड्या ओट्या सारख्या भागात येतो . या ठिकाणी आलेला शत्रू बरोबर दोन बुरुजांच्या टापूत येतो .  डाव्या हाताला गणेश दरवाजा दिसतो . येथील दरवाजा व बुरुजाच्या अर्ध्याच्या अधिक भाग त्याच जागेवरील अखंड दगडात कोरलेला आहे व उर्वरीत वरील भाग दगडाने बांधीव आहे . मध्यभागी सुंदर गणेशाची मूर्ती शिल्प आहे . पुढे काही पायऱ्या चढून गेले की  तोफ नजरेस पडते . इथपर्यन्तच्या चढाईस तास दिडदासाचा वेळ लागतो . आजूबाजूला अनेक इमारतीचे दगडी अवशेष आढळतात . उंच वाढलेले गवत अन दाट झाडीमधेही वाडे आदि इमारतीचे भाग दिसतात . या उंच गवतामधे अनेक पायवाटा आहेत त्या भुलभुलैय्या सारख्या वाटतात . किल्ल्याच्या मध्य भागाकडे उंच टेकडीकडे चालत गेल्यावर  चावंड देवीचे दगडी मंदिर दिसते . मंदिर अगदी छोटे आहे आजू बाजूला कोरीव दगडांचे अवशेष आहे . हा भाग बाले किल्या सारखा वाटतो . समोरच एक दगडी दिपमाळ आहे . समोर मिळेल तशी पायवाट चालत गेले की पाण्याची काही टाके वाटेत लागतात . या ठिकाणी एक दगडी शौचकुप बघायला मिळतो . ड्रेनीज ची व्यवस्था सह याचा वापर कसा होत असावा याचीही प्रचीती येते. थोड चालत गेलं की एक पुष्करणी आहे त्याच्या समोर अत्यंत कोरीव दगडांचे पडझड झालेले शिव मंदिर व समोर नंदी आहे . पुष्करणी मधे पाणी असून त्या ठीकाणी सात 
कोनडे कोरलेले आहे. उजव्या बाजूला पायवाटेने  गेले की माणिकडोह (शहाजी सागर ) धरणाचे विहंगम दृष्य दिसते व ही वाट आपल्याला लेणी समुहाकडे घेवून जाते . दगडात कोरलेल्या लेण्या हया धान्य कोठार किंवा सैन्याच्या निवासासाठी वापरत असावे . पुन्हा परत वर येऊन थोडे पुढे गेले की सप्तमातृका टाके नजरेस येते . पाण्याची ७ टाके एकमेकांना जोडलेली दिसतात . एकाच दगडात ही पाण्यासाठी कोरली गेली . खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आत जाण्यासाठी दगडात दरवाजा कोरलेला आहे त्यावर गणेशाची मुर्ती आहे . सप्तमातृका ह्या पाण्याचा देवता आहेत ह्या जलस्त्रोताचे रक्षण करतात . प्रत्येक पाण्याच्या टाक्यांची पाण्याची पातळी वेग वेगळी आहेत. वेरूळ च्या कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत . पटना येथील बिहार म्युझिअम मध्ये या सात मातृ कांची सुंदर शिल्पे जतन करून ठेवली  आहेत . तशीच छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्राहलय मुंबई येथे सुद्धा अशी सुंदर शिल्पे बघायला मिळतात.ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली . येथूनच उगम पावणाऱ्या कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .
      किल्ल्यावर मुककामाची सोय नाही पण जेवण्याची सोय पायथ्याशी चावंडवाडीत होते .  किल्ल्यावर जातांना पाणी सोबत घेवून जावे . चढाई साठी ग्रीफ असलेले बुट वापरावे . पाण्याच्या खाली बाटल्या परत येतांना खाली आणाव्यात .कातरकडा काटकोनात असल्याने फोटो किंवा सेल्फी काढतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

महा वारसा

*महा वारसा*

विश्वाची निर्मिती संदर्भात चर्चा करतांना जो महत्वाचा विचार समोर येतो की,   एका मोठ्या महाविस्फोटातून विश्वाने आकार घेतला . अगणित धुलीकण व वायु पासून ही आकाशगंगा तयार झाली .आईनस्टाईन व स्टिफन हॉकीन्स सारख्या जगविख्यात शास्त्रज्ञांनी याची मांडणी केली . असंख्य कोटी वर्षाच्या कालखंडाच्या उत्क्रांती नंतर पाणी- सूक्ष्मजीव - जलचर आदि जीवांचे स्थित्यांतरे होऊन मानवी उत्क्रांती होत मानव अश्मयुगापर्यन्त आला . निर्सग शक्ती पुढे लीन होत ताम्रपाशान काळापर्यन्त आला .पृथ्वी , जल , वायू, अग्नी या निर्गुण शक्ती ची उपासना करत जंगलात समूहाने पर्वत गुहा आदि अधिवासात राहू लागला . मध्यप्रदेशातील  भोपाळ जवळील भिमबेटका या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यावर दहाहजार वर्षापूर्वीचा मानवी संस्कृतीची कल्पना येते . आजही शाबूत असलेल्या भित्ती चित्रावरून त्या काळच्या लोकजीवनाची प्रचीती येते . पुढे हाच मानव वसाहतीच्या समृध्दी बरोबरच सृजन व सुफलतेच्या मातृदेवतांचे उपासना करत तो निर्गुण उपासनेकडे वळू लागला . मग याच गरजेतून कृत्रीम अधिवास , वर्षावास , शैलगृहे , लेणी , मंदिरे , सुरक्षितते साठी  दुर्ग, गावांना तटबंदी ,प्रार्थना स्थळे आदि निर्माण झाली विविध राजवटीत त्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक तथा सुरक्षाविषयक व सांस्कृतीक परिस्थिती नुसार वास्तु निर्माण कार्य केले गेले .
      ऋग्वेदामधे तटबंदी करून लोक राहत व ही तटबंदी जल , गिरी , वाळवंट, खंदक, कृत्रीम तटबंदी , विषारी वनस्पती याची असत व त्या अधिवासास 'पूर ' म्हणत . सिंधू संस्कृतीमधेही अशीच कृत्रीम  तटबंदी पूरांना होती. ही पूर म्हणजे दुर्गच !  महाभारतातही शांतीपर्वात दुर्गाची माहिती येते . रामायणातही दुर्गाचा उल्लेख आलेला आहे . कौटिल्याच्य अर्थशास्त्रात सुद्धा अध्याय 2 मधे दुर्गरचना व किल्याची नगररचनेचे विवेचन केले गेले आहे . 'अभिलाषितार्थचिंतामणी ' या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर दुर्गाचे नऊ प्रकार सांगतो .रघुनाथपंत हनुमंते कृत 'राज्यव्यवहारकोषात ' दुर्गवर्ग म्हणून स्वंतत्र प्रकरण आहे . 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ' असे रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहलेल्या आज्ञापत्रातील दुर्ग या प्रकरणात येते.
धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।
वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥
छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .
           लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली . सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो.   दुर्ग हे व्यापारी मार्गावरील पहारेकरी तर लेणी ह्या आश्रयगृहे म्हणून होती . नाणे घाटाच्या व्यापारी मार्गातील सर्वच किल्ले व लेणी याची साक्ष देतात . लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला . सातवाहन , वाकाटक ,गुप्त , राष्ट्रकूट , चालुक्य , यादव आदि काळात अनेक मंदिर व शिल्पे निर्माण झाली. पुढील काळात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार केला. शेकडो बारव, तलाव घाट व पाणवठे लोकोपयोगासाठी  बांधले . अशा या समृध्द व भव्य निर्माणा मागे आपल्या पूर्वजांची एकजूट दिसते . हजारो वर्षानंतर आजही टिकून असल्याने या निर्माण कार्यातील प्रामाणिकपणा, वैज्ञानिक अचूकता , स्थापत्य निपुणता , भौगोलिक ज्ञानाची परिपूर्णता जाणवते . हा आपल्या महाभूमिचा समृद्ध वारसा आहे. आज मात्र हा काळाच्या ओघात नष्ट होत आहे . गडकोट, बुरुज ' तटबंदी ढासाळतांना दिसत आहे . बहुतेक वारसास्थळे तर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली दिसतात .अनेक प्राचीन मंदिरे व लेण्या सर्वधनाच्या प्रतिक्षेत आहेत .लेण्या मधील प्राचीन चित्रशैली पुसत चालली आहे. कोणे एके काळी मुबलक पाणी पुरवणारी प्राचीन बारव , पुष्कर्णी व तलाव गाळवटत आहेत . प्राचीन मंदिराचे सिमेंटीकरण व त्यावरील आधुनिक रंगलेपन हे मूळ वास्तु पासून दूर घेवून जात आहे . स्मृतीपटलातून दूर होत आहे . आपल्या पूर्वजांच्या डोळयांनी जे पाहीले ते पुढच्या पिढीतील डोळ्यांना आता आहे तसे तरी  बघायला मिळेल की नाही याची शाश्वती कमीच वाटायला लागली आहे . *दै महाभूमि मध्ये प्रत्येक सोमवारला " महा वारसा " या साप्ताहिक सदरामध्ये आपल्या महाराष्ट्र भूमितील प्रत्यक्ष भेटी दिलेल्या गड किल्ले ,लेणी , मंदिरे , बारव आदि प्राचीन वारसा स्थळांचे ऐतिहासिक महत्व विश्वासर्ह संदर्भासह आम्ही वाचकापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत . गड किल्ले ,लेणी ,मंदिरे या विषयी सविस्तर माहिती सह भ्रमंतीकारांना पोहचण्याचा मार्ग व त्या ठिकाणची महत्वाची ठिकाणे , संभाव्य धोके टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आदि विषयी माहिती देणार आहे या माध्यमातून आपल्या प्राचीन महा वारसा  संवर्धन व जतनाच्या कार्याची छोटीशी सुरुवात करत आहोत .*


संजय खांडवे
इतिहास अभ्यासक 
9011971122

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

मराठा सेवा संघ

 मराठा सेवा संघ : एक विचार


 १ सप्टेबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना युग पुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली . विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार होता . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघ हा आकार घेत होता . याच उद्देशांने शासकिय ,निमशासकिय ' कार्पोरेट  अधिकारी , कर्मचारी तथा इतर खाजगी क्षेत्रात काम करणारे पगारदार लोकांचे संघटन, "मी या समाजाचा घटक आहे आणि त्याचे मला काही देणे लागते " या कृतज्ञतेच्या भावनेने समाजभिमुख लोकांचे संघटन आदरनिय साहेबांच्या प्रेरणेने कामास लागले व आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत .  मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते.  स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते . मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मराठा सेवा संघाने राजमाता जिजाऊ यांचे चरित्र, विचार व कार्य हा आदर्श ठेवून मातृशक्तीच्या प्रेरणेने मातृतीर्थ सिंदखेड राजा जगाच्या नकाशावर आणण्याचे महान कार्य केले .इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मराठा सेवा संघाने या मातीतल्या माणसाला दिली . राजमाता जिजाऊंचा  दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले अनेक दंतकथा रचल्या गेल्या .ज्यांना कुठलाही तर्कशुध्द आधार नाही समकालिन विश्वासअर्ह साधन साहित्याचा पुरावाही नाही .अर्कज्ञ शहाजीराजे भोसले , राजे लखुजीराव जाधव , छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे यांचा अत्यंत पराक्रमी इतिहास मराठा सेवा संघाच्या तालमित घडलेल्या अनेक इतिहासकारांनी तथा अभ्यासकांनी समोर आणण्याचे मोठे ऐतिहासिक काम केले आणि आजही ते होत आहे . महात्मा बसवेश्वरांनी जातीअंताची चळवळ सुरु केली त्यानंतर मानवी मनांची साखळी जोडणारे समतेचे सेतू  संत श्रीचक्रधर स्वामी ठरले त्यानंतर संतशिरोमणी संत नामदेवांनी उभारलेली प्रबोधनाची भगवी पताका पुढच्या काळात वारकरी संत परंपरेने पुढे चालवत आणली . अनेक भाषिक अन सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित समाजाला उभारणी देण्याचं काम केले . सकलशस्त्रशास्त्र कोविद छत्रपती संभाजीराजे यांनी लिहलेल्या बुधभूषणम या संस्कृत ग्रंथातील एक महत्वाचा श्लोक इथे सांगावासा वाटतो , 

प्रियः प्रजानां दातैव  न पुनर्द्रविणेश्वर: ।


आगच्छन्काड्र.क्ष्यते   लोकैर्वारिदो  न वारिधिः।


         छत्रपती संभाजीराजे आपल्या या महान ग्रंथातील प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.

      देत राहणाऱ्यांची प्रचंड मोठी श्रृंखला आपल्या पवित्र भूमिची आहे मग ती धन संपत्ती असो की ज्ञान ! संतांनी मेघाप्रमाणे देण्याचेच काम केले . जगतगुरू तुकाराम महाराजांनी तर आपल्या जवळील धना सोबतच आयुष्य भर शब्द रुपी धन वाटण्याचे काम निर्भिडपणे केले .याच  महान संत व महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी म्हणून मराठा सेवा संघ आपले काम करत आहे .आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ होय . महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपली वैचारीक बैठक मजबूत असणारा हाडामासाचा  सच्चा मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता हा लाखा येवढा ठरतो . तो कधीही आपल्या विचारापासून दूर जात नाही . कधीही आपली चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन तो सोडत नाही .आज मी सेवा संघाच्या विचाराचा आहे असे बोलतांना अनेकदा ऐकतो . त्याचे कारण हेच आहे . आज आपल्या 33 कक्षाच्या माध्यमातून जगभर आपले विचारांचे जाळे विणले आहे . कृषी, उदयोग , कला , साहित्य, क्रिडा , संशोधन , विज्ञान आदि विविध क्षेत्रात काम करत समाजातीत अगदी शेवटच्या घटका पर्यन्त संधी निर्माण करून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे .

         कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश मराठा सेवा संघाने पुढे चालवला .

"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा. "

      मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला. मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जागतीक स्तरावरील जिजाऊ जन्मोंत्सवाच्या निमित्ताने लाखो जिजाऊ प्रेमी एकत्र येवून जिजाऊ चरणी नतमस्तक होतात . विचारांची देवाव घेवाण होऊन करोडो रुपयांची केवळ पुस्तकाची उलाढाल होते .शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. या देशातील ऐतखाऊ व्यवस्था नष्ट करून उत्पादक समाज व्यवस्थेला समाजात त्याचे स्थान निर्माण करून देणे . तथा तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक देण्याचे काम सेवा संघ करत आहे . कोणत्याही व्यवसायाची लाज न बाळगता तरुणांनी बुट पॉलिश ते तेल मालिश पर्यन्तचा कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहीजे . विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणारे सततचे परिवर्तन तरुणांनी लक्षात घेऊन त्यामधे संधी शोधली पाहीजे . शेतात काय पिकत या पेक्षा बाजारात काय विकतं याच भान ठेवत शेतकर्यांनी आधुनिक तत्रज्ञानाची कास धरली पाहीजे . तरुणांनी आपले स्वहीत तथा राष्ट्रहीत  जपत  आजच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत त्याचा शोध घेतला पाहीजे . असे कुटुंब अन आपोआपच मग समाज घडविण्याचे काम मराठा

सेवा संघ करत आहे .

हे एक विचारांचे संघटन असल्याने खेड्यापाड्यातही आज हा विचार घराघरात पोहोचलेला आहे.

       आमच्यासारख्याच्या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघ काय आहे, तर मराठा सेवा संघ 

एक दिशा.......एक परिवर्तन.......एक विचार.......एक मार्ग.......मन -मस्तक  अन मनगट मजबूतीचं .........!!!!

नतमस्तक व्हायला शिकलो.....विचार आणि आदर्शा पुढे......!!! लढायला शिकलो......सत्यासाठी......!!

वाचायला शिकलो....चिकित्सेसाठी.......!!

बोलायला शिकलो ....न्यायासाठी.......!!

🌿🌿🌿🌿🌿

॥ तुमच आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय॥

🌿🌿🌿🌿🌿

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🌿🌿🌿🌿

संजय खांडवे

 बुलढाणा जिल्हाध्यक्ष इतिहास कक्ष

9011971122


बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

महाभूमि

 *मायभूमीशी नाळ जुळलेला : दै महाभूमी*


शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते शब्द ही शस्त्र आणि अस्रही असतात . या शब्दाचे महात्म्य याच भूमीत म्हणजे महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी जनसामान्याच्या मुखा -मुखात रूढ केले . कोणे एकेकाळी ज्या शब्दज्ञानाने आमचा नाश केला होता त्याच शब्दांना शस्त्र करण्याचा मार्ग आम्हाला तुकाराम महाराजांच्या गाथेतून मिळाला . हीच या महाराष्ट्र भूमीची शिकवण आहे . या मातीत जन्मलेला प्रत्येक जण या पवित्र माती प्रति निश्चितच कृतज्ञ असतों . हीच शिकवण आहे . महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी राहिली आहे याच संत परंपरेतून वारकरी संप्रदाय उदयास आला या मातीत जन्मलेल्या अगदी शेवटच्या व्यक्तीच्या उन्नती आणि उद्धारासाठी त्याच्या कल्याणार्थ वारकरी विचारधारेने काम केले. संत नामदेव - संत ज्ञानेश्वर -संत एकनाथ - संत सावता - संत गोरोबा काका - संत चोखोबा अन - संत तुकोबा पर्यंत हातात टाळ मृदुंग घेऊन गावागावात अन घराघरात अभंग - भारुडे  अनओवीच्या रूपाने मुखदगत होऊन ही शब्दरूपी शस्त्रे पोहोचत गेली  अन समाजप्रबोधन होऊन जनसामान्यांना जगण्याचा सोपा मार्ग मिळाला . परमेश्वरापर्यंत सहज पोहोचणारा भक्तिमार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी दूर होऊन सामान्य माणूस अगदी सहजपणे कुठलीही आडकाठी न घेता भक्ती मार्गावर मार्गस्थ झाला .

      आजच्या काळात शब्द हे प्रमाण मानले जाते. विश्वासअर्हता आणि लोकमान्यता मिळाली की शब्दाची किंमत अधिकच वाढते  आणि या शब्दाची नाळ जर मायभूमीशी जुळलेली असेल तर मग यासाठी शब्दच नाही ! असं म्हणावे लागेल .याच लोकप्रबोधनाचा आणि लोककल्याणाचा प्रामाणिक वसा घेऊन दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा संस्थापक सुरेश देवकर यांनी जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणजे त्यांचे शब्द हे प्रखरतेने प्रत्येक जबाबदार व्यवस्थेकडे पोहोचावेत, त्यांच्या व्यथा आणि संघर्ष सर्वांना कळावा याचबरोबर या मातीत जन्मलेल्या लेखक , कवी, समिक्षक तथा संशोधक यांचे शब्द विचार घराघरात पोहोचावे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुखातील शब्द व्यवस्थेने जाणावे, कर्तबगार संघर्ष कन्या आणि महिला तथा यशस्वी उद्योजकांची प्रेरणा जिजाऊंच्या महा भूमीत प्रत्येक महिलेने घ्यावी हा मानस त्यांनी ठेवला . शिक्षण अन अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी या आपल्या मराठी मुखपत्रातून या मातीच्या कल्याणार्थ झटणारी युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील अन कृतिशील होऊन दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात दैनिक महाभूमीचा जन्म झाला .

      संस्थापक तथा मुख्य संपादक यांचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय आहे . प्रसंगी काळ्या पाषाणातूनही पाणी काढण्याचे सामर्थ्य त्यांनी याच महाभूमीत जन्मलेल्या महापुरुषांच्या विचारातून आणि प्रेरणेतून घेतले आहे . प्रचंड वाचन आणि त्याचे विश्लेषण करून यथायोग्य आचरण हा त्यांचा स्वभाव गुण . माता-मातृभूमी आणि आपली माणसे ही त्यांची बलस्थाने .या तीन मकारांसाठी ते सदैव तत्पर असतात या शुद्ध विचारातून त्यांचा उत्तम व्यवहार आपसूक लोकांपुढे येतो म्हणून आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा तथा जालना - छत्रपती संभाजीनगर - जळगाव - मुंबई आदी जिल्ह्यातून सहकार क्षेत्रात एक विश्वास निर्माण केला आहे .

      दैनिक महाभूमीस आज एक वर्ष पूर्ण होत आहे या एका वर्षातच मराठवाडा विदर्भ या दोन प्रांतांना जोडणारे विश्वास अर्ह मराठी मुखपत्राच्या रूपाने ते समोर आले आहे आजही ग्रामीण मराठवाडा अन वऱ्हाड ही त्यांची विशेष असलेली एकूण १२ पानापैकी सकाळीच त्या त्या प्रांतातील वाचकांसाठी एक पर्वनीच ठरत आहे .खेड्यापाड्यात अन वाडी वस्तीवरही महाभूमी शब्द रूपाने पोहोचला आहे ही मातृभूमीशी असलेली नाळ अतूट आहे .निर्मळ - निकोप अन निपक्ष असलेल्या महाभूमीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन हे शब्दरूपी शस्त्र अंन धन जनमान्यात वाटण्याचे पवित्र कार्य अखंड अविरत चालू राहो हीच शुभेच्छा .




संजय खांडवे

9011971122

बुलढाणा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...