मंगळवार, २६ मे, २०२६

बागुलराजवंशांचा राजदुर्ग - मुल्हेर

 बागुलराजवंशांचा राजदुर्ग - मुल्हेर



स्थान:- ता .सटाणा जि . नाशिक

मार्ग - नाशिक - सटाणा - ताहराबाद - मुल्हेर


बागलाण प्रांतामधील अत्यंत समृद्ध अशी बाजारपेठ म्हणून मुल्हेर प्रसिद्ध होते . सुरत मार्गावरील असल्याने देखील एक वेगळे महत्व प्राप्त झाले होते . सुमारे ३५० वर्ष बागलाण मधील राठोड वंशीय बागुल राजांचे राज्य होते त्यामुळे बागलाण नाव या विस्तीर्ण भागास पडले . बागुल राजांच्या राजधानीचा हा दुर्ग होता .बागुल राजानंतर मुघलांच्या ताब्यात हा प्रांत गेला . औरंगजेब जेव्हा दक्षिणेचा सुबेदार होता तेव्हा त्याने हा किल्ला जिंकून याचे नाव औरंगगड ठेवले होते . १६७२ मध्ये मोरोपंत पेशव्यांच्या नेतृत्वात मुल्हेर दुसऱ्यांदा स्वराज्यात आला होता . मोरागड - मुल्हेर - हरगड असे तीन किल्ले एकाच रांगेत आहेत त्यापैकी मुल्हेर हा बालेकिल्ला आहे . मुल्हेच्या पोटाशी मुल्हेर मोरा खिंडीच्या खालच्या भागात असलेली तटबंदी व नैर्सगिक समृद्धी लाभलेली सुसज्ज मुल्हेर माची या किल्याचे महत्व अधिकच वाढविते .

        मुल्हेर गावापासून तीन कि.मी अंतरावर हा किल्ला येतो . गाव प्राचीन बाजारपेठ असल्याने जुन्या इमारती आहेत शिवाय उद्धव महाराजांचा मठही या ठिकाणी आहे . खाजगी वाहन असल्यास अगदी पायथ्या पर्यन्त आपले चारचाकी वाहन घेऊन जाता येते. पायथ्यापासून चढाईची पाऊलवाट आहे आता रस्ता बनविण्याचे काम सुरु आहे. मुल्हेर माची बुरुज व तटबंदीचे संवर्धनाचे कामही सुरु आहे पुन्हा तसेच बनविने शक्य नाही पण त्या सारखे बुरूज व तटबंदीचे काम सुरु दिसते .

        मुल्हेर माचीवर पोहचण्यासाठी तीन दरवाजे पार करावी लागतात सर्वच दरवाजे आता कोसळलेल्या अवस्थेत आहेत . या तीनही दरवाज्याची बुरुजांची रचना ही शत्रूंवर बारीक नजर ठेवण्याच्या योजनेने बनविण्यात आली आहे . तिसरा कमानयुक्त दरवाजा पार केल्यानंतर समोरच गणेश मंदिराचे दर्शन होते  मंदिरा समोरच तटबंदीला समांतर असलेले दगडी भिंत बांधून मोठा तलाव दिसतो . प्राचीन काळातील पाणी व्यवस्थापनाचे तंत्र यावरून लक्षात येते . तलावाच्या काठावरच कमान युक्त नक्षीकाम केलेले गणेश मंदिर आहे या मंदिरावर मुघल शैलीची छाप दिसून येते मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग व श्री गणेशाची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. मंदिरावर अत्यंत बारीक कलाकुसरीचे नक्षीकाम केलेले दिसते शिवाय या ठिकाणी एक शिलालेख आहे राजा प्रतापशहा बागुल यांनी १६१२ मध्ये या मंदिराची निर्माण केले असावे असे सांगितले जाते . याच मंदिराच्या पाठीमागे अत्यंत दाट झाडी मधून आणखी एका प्राचीन जीर्ण मंदिराकडे एक पाऊलवाट आपल्याला घेऊन जाते या ठिकाणी जाताना खूप काळजी घ्यावी लागते. हत्तीची अत्यंत सुंदर शिल्पाकृती कोरलेले रामेश्वर मंदिर त्या दाट झाडीमध्ये आहे . बाजूला भव्य असे पाण्याचे टाके देखील आहे आजही त्या टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी असते . पुन्हा त्याच वाटेने परत येऊन अगदी जवळच एका ओट्यावर महिषासुर मर्दिनी मातेचे छोटे खाणी शिल्प आहे मनोभावे त्या ठिकाणी स्थानिक लोक या मातृदेवतेची पूजा करतात त्याच वाटेने समोर चालत गेल्यावर या माचीवर काही सिमेंटची सभागृह उभारण्यात आली आहे याच दाट झाडी मधून पुढे सोमेश्वर मंदिराकडे रस्ता जातो प्रचंड मोठी आंबे आधी फळांची वृक्ष या माचीवर दिसून येतात . अत्यंत गर्द झाडीमध्ये लुप्त पावलेली एक षटकोनी आकाराची बारव आम्ही बघितली . जमिनीमध्ये सुंदर नक्षी कामासह उतरण्यासाठी पायऱ्या असलेली बारव ही जवळपास अर्धी केरकचरा व गाळाने भरलेली त्या ठिकाणी दिसली .

         समोरच दोन तोफा ठेवलेल्या दिसतात . ओतीव स्वरूपाच्या या तोफा आजही त्या ठिकाणी शाबूत आहेत या तोफेवर रामप्रसाद व शिवप्रसाद असे त्यांची नावे कोरलेली आहेत . या तोफेच्या वरील बाजूस सोमेश्वर मंदिर आहे मंदिरात चढण्यासाठी पायऱ्या असून संपूर्ण मंदिराला दगडी कुंपण केलेले आहे . सहा कमानीवर भव्य सभामंडप आणि या सभामंडपामध्ये सुंदर असा नंदी आहे . मंदिराची गाभाऱ्याची रचना ही अलौकिकच आहे द्वारा समोरील छोट्याशा दगडी खिडकीतून शिवलिंगाचे दर्शन होते डाव्या बाजूला गर्द अंधारातून एकच व्यक्ती जाईल अशी एल आकाराची दगडी पायऱ्यांचा जिना त्या गाभाऱ्यात घेऊन जातो गाभाऱ्यातून दर्शन झाल्यावर पुन्हा त्याच वाटेने वर यावे लागते मंदिर परिसरामध्ये अनेक प्राचीन देवदेवतांची शिल्पे आहेत. मंदिराच्या अगदीच पाठीमागे प्रचंड असे गुलाब टाके आहे . या ठिकाणावरून दोन बाजूने मूल्यांच्या बालेकिल्ल्यावर जाता येते डाव्या बाजूची मोराखिंड व उजव्या बाजूने राज मार्गाने पोहोचता येते . राज मार्गाने मंदिराच्या उजव्या बाजूने पाऊल वाट दाट झाडीतून एका पाण्याच्या टाक्या जवळ पोहचते . या ठिकाणचे मजबूत दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरून तलाव तयार केले . या तलावात वरून काताळातील तुटलेल्या महाकाय व अजस्र अश्या शिळा पडलेल्या आहेत उजव्या बाजूस कपारात कोरलेले मोठे व खोल व स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे . येथून खडी चढाई करत राजमार्गावरील दरवाज्यांसमोर येऊन पोहचतो . उजव्या बाजूस काताळावर कोरलेले वीर हनुमंताचे शेंदूर लावलेले शिल्प आहे . अगरी त्यावरच काताळात कोरलेल्या लेणी आहेत . राज मार्गावरील घळीत एक आड एक दरवाजा आहे आता मात्र त्याची खूप मोठी पडझड झाली आहे . बाजूलाच काताळात कोरलेले मोठे पाण्याचे टाके आहे आहे .सर्वात वरील भागातील दोन दरवाजे मात्र अजूनही मजबूत आहेत . नक्षीदार कमानी व दोन ठिकाणी चढत्या पायऱ्या सह काटकोनात वळावे लागते गडावर येणारा शत्रू येथे सहज गाठता येतों . या दरवाज्यातून वर येताच पाठीमागे बालेकिल्ल्यावरील लांब व निमुळती माची आहे . समोरच चिरेबंदी तलाव व त्या समोर पाण्याची ८ मोठी टाकी आहेत . या सर्वोच्च पठारावर इमारतीचे काही अवशेष आहे . समोरच राजवाडयाचे एकमेव सुंदर नक्षीयुक्त दरवाजा पर्यटकांना आकर्षीत करतो. समोर मोरगड दिसतो त्या दिशेने जातांना काही गाळलेली पाण्याची टाकी आहेत . उजव्या बाजूस दोन मोठी तलाव आहे किल्ल्याच्या अगदी तटबंदीच त्या तलावांची भिंत आहे त्यापैकी एका तलांवात पाणी आहे . दोन्ही तलावात मधोमध पाणी मोजण्यासाठी उंच शीळा कोरल्या आहेत . किल्ल्याच्या सर्वोच्च भागवर एकमेव औंदुबर वृक्ष आहे . वृक्षा खाली श्री भडगनाथाचे छोटे मंदिर असून त्यात तांब्याचा मुखवटा आहे .आजुबाजूला मूर्तीचे अवशेष पड़लेले आहेत . मोरगडच्या बाजूने या खिंडीत उतरणारा एक चोर दरवाजा आहे . या दरवाज्यात महाकाय शिळा पडलेल्या आहे . तेथून खाली उतरणाऱ्या पायऱ्या आता तुटलेल्या आहेत . या ठिकाणी खूप काळजी घ्यावी लागते . समोरच मोरागडाचा दरवाजा व पायऱ्या दिसतात .

शुक्रवार, २२ मे, २०२६

सहयाद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*

 *सहयाद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*



भाग -2


मागील भागात आपण वाघांबे गावातून चढाई करत सालोटा किल्ल्याच्या बाजूने चढाई करत  चौथ्या दरवाज्यापर्यंत आलो होतो .   हा दरवाजा लहान असून त्यावर नक्षीकाम केलेल्या दगडी शीळा आहेत . या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पूर्व -पश्चीम लांबट पसरलेल्या साल्हेरच्या पहिल्या पठारावर पोहचतो . डाव्या बाजूस एक वाट सर्वोच्च शिखर असलेल्या परशुराम मंदिराकडे जाते व पश्चीमेकडून समोर जाऊन देखील या ठिकाणी पोहचता येते . पश्चीमेकडे जात असतांना उजव्या बाजूस प्रचंड खोल दरी आहे. साल्हेरास अशी नैर्सगिकच सुरक्षा सर्वांगाने लाभलेली आहे त्यामुळे हा अत्यंत अवघड आहे . या पठारावरच राजवाड्यासह गडावरील आवश्यक असलेल्या इमारतींचे केवळ दगडी अवशेष शिल्लक आहेत . किल्ल्यावर बाराही महिने पाणी असणे ह्यावरून त्या गडाचे महत्व,जसे पाणी तसा किल्ला अधिक उपयोगी म्हणून साल्हेर त्यापैकीच एक आहे . समोरच प्रचंड उंचीवर असलेला काताळ कोरून व आवश्यक त्या ठिकाणी दगडी चिरेबंदी करून शेकडो वर्षापासून पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ न देणारा गंगासागर तलाव आहे . बाजूलाच दोन आयाताकृती समांतर असलेली पाण्याची टाकी आहे . आजही अत्यंत थंडगार व काचासारखे पारदर्शक पिण्यायोग्य पाणी त्या टाक्यात आहे . बाजुला एक उंबराचे झाड असून त्या ठिकाणी गुफेसारखा भाग आहे . दगडी शिळेमध्ये अत्यंत कलाकुसरीने कोरलेले रेणूका देवीचे मंदिर आहे .मंदिरासमोरच काताळात कोरलेल्या दोन मोठ्या लेण्या आहेत . किल्ल्यावर थांबणाऱ्यासाठी हे विसाव्याचे ठिकाण आहे. येथून पुन्हा वर सर्वोच्च शिखराकडे जाणारी पाऊल वाट आहे . खडी चढाई करत वेडे वाकडे वळण घेत अर्ध्या तासात दुसऱ्या पठारावर पोहचतो . हे लांबट निमुळते पठार विश्रामगडा सारखेच असून येथे हवेचा वेग प्रचंड वाढतो . दक्षिण बाजूस तर कोकण कड्यासारखीच प्रचंड काताळकडा आहे . पूर्वेस पुन्हा एक निमुळते शिखर दिसते व अशीच थोड़ी चढाई करणारी पाऊलवाट या  दुसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर घेऊन जाते . येथे पाच पन्नास लोक थांबू शकेल येवढीच जागा असून परशुरामाचे छोटेसे मंदिर असून त्या ठिकाणी दगडी मुर्ती देखील आहे . परिसरातील लोक या ठिकाणी दर्शनास येतात .

        येथून संपूर्ण बागलान प्रांत न्याहाळता येतो . मोरागड -मुल्हेर व हारगड हे त्रिकूट त्याचबरोबर रतनगड ,सालोटा ,भिलाई ,चौल्हेर मांगीतुंगी ,पिंडवल, धोडप,कन्हेरा, देरमाळ, पिसोळं,अचला आदि किल्ले इथून स्पष्ट दिसतात गडपारखी ते  लगेच ओळखू शकतात . धामन्या दिघई डोंगर देखील समोरच दिसतो .पुन्हा याच पाऊलवाटेने रेणुका माता मंदिरापर्यंत खाली परत यावे लागते आणि मग साल्हेर गावाच्या बाजूने असणाऱ्या दुसऱ्या मार्गाने खाली उतरता येते . वाटेत पहिल्या पठारावर असलेले पाण्याच्या टाक्यांचा समूह लागतो बाजूलाच एक यज्ञ कुंड सदृश्य जागा आहे . स्थानिकांच्या माहितीनुसार वैशाख शुद्ध तृतीयेस या ठिकाणी परशुराम जयंतीनिमित्त मोठी यात्रा भरण्याची परंपरा आहे ती याच पठारावर भरते . या परिसरातही अनेक इमारतींचे अवशेष दिसून येतात . किल्ल्याच्या पश्चिम दिशेकडून साल्हेर गावात उतरताना एकूण सहा ते सात दरवाजे लागतात उतरण्यासाठी मध्यम गतीने उतरत गेल्यास दोन तासही लागू शकतात . साल्हेराची उंची आणि या किल्ल्याची अभेद्यता, प्राचीन कातळात अत्यंत अवघड ठिकाणी असलेला लेणी समूह व पाण्याची सुबद्धता व साल्हेर गावाकडून उतरत असताना असलेले दगडी स्थापत्य शैली यामुळे या साल्हेरास जागतिक वारसा स्थळात जागा मिळाली असावी . साल्हेरचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला असलेले द्वार हे बरीच लहान आहेत . एक आड एक द्वारानंतर तिथून खाली असलेल्या शत्रूवर नजर ठेवून या ठिकाणाहूनही त्याला भेदता येते अशी रचना दिसून येते .

        खाली उतरत असताना ह्या पहिल्या द्वारातच नागदेवतेचे शिल्प आहे छोटी कमानीदार नक्षीयुक्त दरवाज्यातून पुन्हा दगडी पायऱ्याने खाली उतरल्यानंतर पुढचा दरवाजा लागतो या दरवाज्याच्या बाजूसही पहारेकऱ्यांसाठी बसण्या उठण्यासाठी गुहा कोरलेली आहे. पुन्हा वळण घेत आणखी पुढचा दरवाजा लागतो या दरवाज्याची उंची फार कमी आहे एक व्यक्ती बऱ्यापैकी जाऊ शकेल अशी त्या दरवाजाची रचना आहे .पुढे तीव्र उतार असलेल्या दगडातच कोरलेल्या पायऱ्या लागतात आता काही पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते . वाटेत काताळात कोरलेल्या पायऱ्या पूर्वी होत्या पण आता काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अवघड जागेतून उतरत गडाच्या तिसऱ्या मानवनिर्मित तटबंदीकडे आपण येतो . किल्ल्याच्या पश्चिम बाजूस साल्हेरवाडीच्या  असलेला तटबंदीने पूर्णपणे घेरलेला आहे . शत्रूला साल्हेर सर करायचा असेल तर ही पहीली तटबंदी पार करावी लागते . येथेच शत्रू हतबल होतो या वरचा टप्पा गाठणे तर अशक्यच आहे . आयताकृती मोठ्या विस्तीर्ण पठारावरुन तटबंदी व बुरुजावरून दूर पर्यन्त व अधिककाळ शत्रूस थांबवता येते. यापठारावरही बऱ्याच इमारतीचे अवशेष आढळतात  येथे किल्ल्यावरील अनेक सैन्यांचा किंवा कारागिरांचा राबता असावा बऱ्यापैकी मोठी फळ झाडेही या ठिकाणी दिसून येतात . तरबंदी सोबत दक्षिणेकडे जातांना उजव्या बाजूस साल्हेरवाडी व डाव्या बाजूस साल्हेरची महाकाय कातर कडा दिसते . अर्ध्या तासाची या पठारावरील पायपीट तरबंदी लगत दरवाज्याकडे घेवून जाते . हा दरवाजा आकाराने मोठा व याची दिशा किल्ल्याच्या बाजूने आहे समोरच भव्य सदरीचा खुला भाग आहे पुढे यु आकारात वळण घेऊन पुढचा दरवाजा लागतो . या दोन्ही दरवाज्यात आलेला शत्रू वरील तटबंदीमुळे सहज काबूत ठेवता येतो . येथे एक देवनागरी लिपी मधील शिलालेखही आढळून येतो . आजही ही तरबंदी अगदी अभेद्य आहे . खडकात कोरलेल्या पायऱ्या काही ठिकाणी वेडेवाकडे वळण घेत खाली जातांना दिसतात . दरवाज्यांची मालिका अजूनही संपत नाही पुढे साल्हेर गावातून येणारे पहिले द्वार लागते . उतरत असतांना डाव्या बाजूला दाट जंगलात मंदिराच्या घंटयाचा आवाज ऐकू येतो . आता आधुनिक काळातील सिमेन्ट मंदिर असून आजू बाजूला मात्र  प्राचीन मंदिराचे अवशेष दिसून येतात . अनेक वीरगळ या परिसरात आहेत म्हणजे या ठिकाणी अनेक मोठ्या लढाई झाल्याची साक्ष देतात . अजूनही आपला पूर्ण गडउतार होत नाही तोच दाट करवंदीचे दाट जाळवण पुढे येते व खाली पुन्हा तीव्र उतारावरून साल्हेर वाडी व तेथील हॉटेल दिसताच जीवात जीव येतो कारण वाघंबे गावातून चढून साल्हेरवाडीत उतरणे हा साधा ट्रेक नाही व साल्हेर सर केल्याच समाधान डाबरी रोडवर आल्यावर जाणवते . पुढील भागात आपण पाहू या इतिहासात गाजलेली अन शिवरायांच्या पराक्रमाची उत्तरेत वचक निर्माण करणारी साल्हेरची लढाई .



क्रमशः

सुरतेवर वचक बसविणारी साल्हेरची लढाई

 सुरतेवर वचक बसविणारी  साल्हेरची लढाई





बागलाण प्रांतात प्रवेश करून विजय संपादन करणे हा स्वराज्यासाठी फार महत्वाचा विषय होता . प्रत्यक्ष त्या प्रांतात घुसून समोरा समोरची लढाई करुन मराठ्यांनी विजय मिळविणे हा त्या काळात उत्तरेकडील भागाशी जुळलेल्या भूभागामुळे एक प्रकारे घरात घुसुन आपले वर्चस्व सिद्ध करत बलाढ्य मोगली साम्राज्याची दहशत संपविणारा होता. येथूनच सुरत जाणारा मार्ग असल्याने सुरतेवर वचक निर्माण होऊन . खान्देशाकडून स्वराज्याकडे येणारी संकटे देखील थांबण्यास मदत झाली. ह्या मोहिमे पूर्वी म्हणजे १६७० मध्येच सुरतेवर छापा टाकून महाराजांनी  औरंगजेबाला मोठा धक्का दिला . ६६ लक्षाची लुट स्वराज्यासाठी मोगली प्रांतांतून मिळाली होती होती . सुरतेवरून पुढे त्या काळात असलेल्या मुल्हेरच्या व्यापारी पेठावरही छापे घातले . वाटेत वणी - दिंडोरीची प्रसिध्द असलेली मोठी लढाई झाली . महाराज स्वतः ह्या लढाईत पराक्रम गाजवत पुन्हा मोगलांचा मोठा पराभव केला . वऱ्हाडातील कारंज्यात मोहिम फत्ते करत खान्देश, बागलाणही मराठ्यांनी लुटले हे ऐकून आता औरंगजेब अधिकच हतबल झाला होता .

           औरंगजेबाने १६७१ मध्ये महाबतखानास दक्षिणेत पाठविले तो बऱ्हाणपूर ओलांडण्याच्या आतच मराठयांनी बऱ्हाणपूरासही मोठा धक्का देत पुन्हा बागलाण प्रांत गाठला होता .महाबतखान येताच त्याने बागलाणातील किल्ले घेण्यास सुरुवात केली . कन्हेरगडाच्या पायथ्याशी झालेली लढाई प्रसिध्द आहे या लढाईत उवघे ६०० मावळे रामजी पांगेरा यांच्या नेतृत्वात मोठ्या पराक्रमाने लढले . दिलेरखान या पराक्रमाने अचंबीत झाला होता. महाबतखान बागलाणात मराठ्यांना गुंतवून दिलेरखान पुण्यावर चालून येत होता . बागलाणात सुरु असलेल्या मराठ्यांच्या कोंडीस तोडण्यासाठी अजिंठा घाट -चाळीसगाव - सटाणा मार्गे प्रतापराव गुजर तर त्र्यंबकमार्गे मोरोपंत पिंगळे यांनी किल्ले जिंकत बागलाणात घुसण्याची योजना आखली . याच वेळी मुघलाकडून इकलासखानाने साल्हेरास वेढा दिला होता . त्याच्या बाजूने  औरंगजेबाचा दुध भाऊ बहादुरखान, राव अमरसिंग चंद्रावत, मोहकमसिग सह ४० ते ५०००० चे सैन्य होते . दुसऱ्या बाजूने मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर, आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले,सिदोजी निंबाळकर,खंडोजी जगताप, गोदाजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, सूर्याजी काकडे, मुकुंद बल्लाळ, नागनाथ ही सरदारासह केवळ १०००० चे सैन्य होते . फेब्रु १६७२ मध्ये झालेले हे युद्ध समोरा समोर लढले गेले पण मराठ्यांची सैन्य क्षमता कमी असल्याने नेहमी प्रमाणे व्युहरचना करून चारही बाजुने हल्ला चढवून शत्रूस हतबल केले . बारा तास ही लढाई चालली . सभासद  या लढाईच वर्णन करतांना म्हणतो " युद्ध होताच पृथ्वीचा असा धुरळा उडाला की तीन कोर्स औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा झाले घोडी उंट हत्ती याची गणना नाही रक्ताचे पूर वाहिले रक्ताचे चिखल झाले त्यामध्ये लोक रुतो लागले .मोरोपंतांना प्रचंड लूट मिळाली 6000 घोडे सव्वाशे हत्ती सहा हजार उंट आणि अगणित बिछायत कापड चोपड मालमत्ता जवाहर खजिना  हाताशी लागला . वजीर नामांकीत धरले . खासा इकलास व बेलोलखान पाडाव झाला ".

     या लढाईत शिवरायांचे बालपणीचे साथीदार सूर्याजी काकडे स्वराज्याच्या कामी आले . महाराजांना याचे खुप दुःख झाले , " माझा सूर्यराज म्हणजे महाभारतातील कर्ण " असे गौरव उदगार त्यांनी  वीर सुर्याजी साठी काढले . या लढाईने बागलाण प्रांतामधील मोगली दहशत पूर्णपणे संपून मराठ्यांची उत्तरेत वचक निर्माण झाली . मदतीला आलेला दिलेरखान बातमी मिळताच धास्तावून चांदवड कडे निघून गेला .इकलासखान जखमी होऊन पळाला,राव अमरसिह चंद्रावत मारला गेला . औरंगजेब त्याच्या हरलेल्या सरदारांना संतापाने म्हणाला " साल्हेरीच्या युद्धात तुम्ही मेला का नाहीत ?" अशी मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ठरलेली साल्हेरची लढाई सूर्याजींसह अनेक स्वराज्य वीरांच्या रुपाने अमर ठरली . वीर सुर्याजी काकडे यांची वीर भूमी ठरली .

मंगळवार, ५ मे, २०२६

सह्याद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*

 *सह्याद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*




स्थान :- छत्रपती संभाजी नगरहून २०० कि.मी ता. सटाणा जि नाशिक


जागतिक वारसा स्थळे म्हणून महाराष्ट्रातील अकरा किल्ले जुलै २५ मध्ये नव्याने समाविष्ठ करण्यात आली ही आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे . स्वराज्याच्या स्वाभिमानी क्रांतीकारी कालखंडात राजधानीचा दर्जा मिळालेला व शिवरायांच्या किर्तीने दुमदुमलेला तामिळनाडू मधील जिंजीचा किल्ला देखील याच वेळी या यादीत आला. या वारसा स्थळात असलेला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजे किल्ले साल्हेर . महाभूमितील कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरानंतर साल्हेरची उंची क्रमांक दोन वर येते . १५६७ मीटर उंच असलेल्या या किल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामधेही आढळतो . तंजावरचे राजे व्यंकोजीराजे भोसले यांच्या आज्ञेने कवी जयराम पिंडये यांनी पर्णालयपर्वतग्रहण्याख्यान या ग्रंथाची रचना केली या ग्रंथात स्वराज्यातील इतर किल्ल्या सोबतच साल्हेरचाही उल्लेख आढळतो . सहयाद्रीचा मुकुट म्हणून या सर्वोच्च दुर्गास शेकडो वर्षापूर्वी सन्मानित केले गेले . उत्तर दक्षिण पसरलेल्या सहयाद्रिच्या कुशीत रयतेचे राज्य सर्व अंगाने फुलले याच सह्याद्रिच्या सर्वात उत्तरे कडील टोकावर अगदी मुकुटा सारखा हा साल्हेर दिसतो .

       बागलाण प्रांतात बागुल राजाचे वर्चस्व होते त्याच बागुल घराण्याच्या ताब्यात हा किल्ला होता . मुघलांनी जेव्हा हा किल्ला घेतला त्यावेळी सुलतान गड असे नाव मुघलांनी दिले होते .५ जानेवारी १६७१ मधे हा किल्ला स्वराज्यात आला .त्यानंतर मुघलांशी या प्रांतात सतत संघर्ष सुरुच होता होता . पुढे फेब्रुवारी १६७२ ला साल्हेरची लढाई झाली .या लढाईत मोगली दहशत संपून साल्हेरच्या पराभवाने औरंगजेब हतबल झाला होता . येथूनच सुरत कडे जाण्याचा मार्ग येतो. सुरतेची स्वारी वेळी महाराजांनी याच मार्गाचा वापर केला होता .कांचनघाट , तेलतवाघाट, बाभुळनेघाटातून गुजरात मध्ये उतरता येते. मुघलाच्या आर्थिक संपन्न असलेल्या सुरत या व्यापारी पेठेवर येथून बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येत होते त्यामुळे बागलान प्रांत स्वराज्यात येणे ही स्वराज्यासाठी मोठी उपलब्धी होती .उत्तरेतही यामुळे स्वराज्याचा प्रभाव वाढला .

    नाशिक जिल्हयातील सटाणा तालुक्यात असलेला साल्हेर परिसर हा अत्यंत निसर्गरम्य आहे . सटाणा - ताहराबाद - मुल्हेर मार्गे वाघांबे गावात पोहचता येते . पुढे हाच पक्का डांबरी रस्ता साल्हेर गावाकडे जातो . किल्ल्यावर पोहचण्यासाठी आजच्या परिस्थितीत दोन मार्ग बर्‍यापैकी आहेत . साल्हेर गावातून जाणारा मार्ग अधिक सुरक्षित आहे . वाघांबे गावातूनही जाता येते मात्र हा थोडा अवघड मार्ग आहे . आम्ही वाघांबे गावातून किल्ला चढाईस सुरुवात केली .गावातून किल्ल्याकडे जातांना  उजव्या बाजूस महाकाय साल्हेर व डाव्या बाजुस सालोटा किल्या दिसतो . दोन्ही च्या मध्ये एक खिंड आहे त्या खिंडीत हा मार्ग जातो . साधारणतः एक ते दिड तासाची चढाई करत या वाघांबा खिंडीत पोहचता येते . ही खिंड किल्ल्याच्या पूर्व बाजूस आहे . खिंडीत दोन्ही बाजुस खोल दरी आहे . डाव्या बाजुची पाऊल वाट सालोटा किल्ल्यावर घेवून जाते . उजव्या बाजूस वळसा घेत एकेरी पाऊल वाट झिकझॅक वळण घेत वर जाते येथून एकेरी वाट असल्याने प्रत्येक पाऊल हे सावधानतेनेच टाकावे लागते . सह्याद्रीच्या प्रचंड मजबूत अग्नीजन्य खडकावर वाट निमुळती जरी असली तरी ती आजीबात ढळणार नाही या मोठ्या विश्वासाने प्रत्येक पाऊल आपसूखच पुढं पडत जाते . काही ठिकाणी खडकात कोरलेल्या पायऱ्या लागतात व समोरच या वाटेतील पहिला दरवाजा लागतो . शत्रूला पायथ्यापासून या दरवाज्याचे दर्शन दुर्लभच अशी रचना आहे . समोर सालोटा व दक्षिण पूर्व भागातून येणाऱ्या शत्रूवर येथून अत्यंत बारीक नजर ठेवता येते असे . दरवाजा लहान असून त्यावर नक्षी काम दिसून येते . दरवाज्यातून येणारा शत्रु गडाच्या आतील बाजूकडून सहज टिपता यावा अशी स्थापत्य रचना असून सैनिकांना थांबण्यास त्या ठिकाणी जागा केलेली आहे . काळ्या अखंड दगडात पुन्हा पायऱ्या कोरलेल्या आहेत तोफांच्या माऱ्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी त्या तुटलेल्या आहेत . ही मोठी चढाईकरत दुसरा दरवाजा लागतो येथून किल्ल्याच्या उत्तर पूर्व बाजूकडे दुरवर लक्ष ठेवता येते. ज्या गावातून चढाईस सुरवात केली ते वाघांबे गाव येथून नजरेस पडतो व दोन तासा पासून च्या वाटेने आपण वर आलो ती वाट स्पष्टपणे न्याहळता येते . साल्हेर - सालोटा खिंडीतील वरच्या बाजूस हा दरवाजा असल्याने खिंडीतून जाणारी हवा ही प्रचंड वेगाने वाहते . या दरवाज्यावरही बरीच नक्षीकामे व तासिव दगड आहेत . याच ठिकाणी हा दगड फोडत मधून पायरी मार्ग काढला असून या ठिकाणी निघालेले दगड दरवाजा, बुरुज व तटबंदीस वापरलेले दिसतात . काळाच्या ओघात वरुन घरंगळत आलेल्या महाकाय शीळा  या पायरी वाटेत पडलेल्या आहेत .चढाई करत पुढे गेले की तिसरा दरवाजा लागतो हा देखील मजबूतपणे उभा आहे .

       या पुढचा मार्ग किल्ल्याच्या   काताळात कोरलेल्या प्राचीन लेण्या व पाण्याच्या टाकी जवळून जातो . काही ठिकाणी ही वाट अत्यंत अरुंद आहे व खाली हजारो फुट खोल दरी आहे त्यामुळे सावधानता  ही प्रमुखता या ठिकाणी ठेवावी लागते . माकडांचा वावरही येथे बराच आहे . काताळात कोरलेली ही बरीच पाण्याची टाकी व वास्तव्यास उपयोगी अशी रचना असलेली गुफा प्राचीन काळापासून किल्ल्यावरील वास्तव्यास व पाण्याच्या नियोजनासाठी वापरात येत असावी . उत्तर बाजूस असलेल्या काताळातील हया गुफा दुरवरून लक्षात देखील येत नाही . पुढे चालत गेल्यावर वळण घेऊन लगेच किल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो . हा दरवाजा लहान असून त्यावर नक्षीकाम केलेल्या दगडी शीळा आहेत . या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पूर्व -पश्चीम लांबट पसरलेल्या साल्हेरच्या पहिल्या पठारावर पोहचतो . डाव्या बाजूस एक वाट सर्वोच्च शिखर असलेल्या परशुराम मंदिराकडे जाते व पश्चीमेकडून समोर जाऊन देखील या ठिकाणी पोहचता येते . साल्हेर वरील या पहिल्या पठारावरच किल्ल्यातील महत्वाच्या इमारती होत्या आता केवळ त्यांचे अवशेष आहे . या पुढील प्रवास आपण साल्हेर गावाच्या बाजूने कसे उतरायचे, सर्वोच्च शिखरावर असलेल्या परशुराम मंदिरा संदर्भातील अख्यायिका व स्वराज्यात गाजलेली साल्हेरची लढाई  पुढच्या भागात भाग -2 मध्ये बघू या! क्रमशः




संजय खांडवे

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*  ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः । मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापक...