बागुलराजवंशांचा राजदुर्ग - मुल्हेर
स्थान:- ता .सटाणा जि . नाशिक
मार्ग - नाशिक - सटाणा - ताहराबाद - मुल्हेर
बागलाण प्रांतामधील अत्यंत समृद्ध अशी बाजारपेठ म्हणून मुल्हेर प्रसिद्ध होते . सुरत मार्गावरील असल्याने देखील एक वेगळे महत्व प्राप्त झाले होते . सुमारे ३५० वर्ष बागलाण मधील राठोड वंशीय बागुल राजांचे राज्य होते त्यामुळे बागलाण नाव या विस्तीर्ण भागास पडले . बागुल राजांच्या राजधानीचा हा दुर्ग होता .बागुल राजानंतर मुघलांच्या ताब्यात हा प्रांत गेला . औरंगजेब जेव्हा दक्षिणेचा सुबेदार होता तेव्हा त्याने हा किल्ला जिंकून याचे नाव औरंगगड ठेवले होते . १६७२ मध्ये मोरोपंत पेशव्यांच्या नेतृत्वात मुल्हेर दुसऱ्यांदा स्वराज्यात आला होता . मोरागड - मुल्हेर - हरगड असे तीन किल्ले एकाच रांगेत आहेत त्यापैकी मुल्हेर हा बालेकिल्ला आहे . मुल्हेच्या पोटाशी मुल्हेर मोरा खिंडीच्या खालच्या भागात असलेली तटबंदी व नैर्सगिक समृद्धी लाभलेली सुसज्ज मुल्हेर माची या किल्याचे महत्व अधिकच वाढविते .
मुल्हेर गावापासून तीन कि.मी अंतरावर हा किल्ला येतो . गाव प्राचीन बाजारपेठ असल्याने जुन्या इमारती आहेत शिवाय उद्धव महाराजांचा मठही या ठिकाणी आहे . खाजगी वाहन असल्यास अगदी पायथ्या पर्यन्त आपले चारचाकी वाहन घेऊन जाता येते. पायथ्यापासून चढाईची पाऊलवाट आहे आता रस्ता बनविण्याचे काम सुरु आहे. मुल्हेर माची बुरुज व तटबंदीचे संवर्धनाचे कामही सुरु आहे पुन्हा तसेच बनविने शक्य नाही पण त्या सारखे बुरूज व तटबंदीचे काम सुरु दिसते .
मुल्हेर माचीवर पोहचण्यासाठी तीन दरवाजे पार करावी लागतात सर्वच दरवाजे आता कोसळलेल्या अवस्थेत आहेत . या तीनही दरवाज्याची बुरुजांची रचना ही शत्रूंवर बारीक नजर ठेवण्याच्या योजनेने बनविण्यात आली आहे . तिसरा कमानयुक्त दरवाजा पार केल्यानंतर समोरच गणेश मंदिराचे दर्शन होते मंदिरा समोरच तटबंदीला समांतर असलेले दगडी भिंत बांधून मोठा तलाव दिसतो . प्राचीन काळातील पाणी व्यवस्थापनाचे तंत्र यावरून लक्षात येते . तलावाच्या काठावरच कमान युक्त नक्षीकाम केलेले गणेश मंदिर आहे या मंदिरावर मुघल शैलीची छाप दिसून येते मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग व श्री गणेशाची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. मंदिरावर अत्यंत बारीक कलाकुसरीचे नक्षीकाम केलेले दिसते शिवाय या ठिकाणी एक शिलालेख आहे राजा प्रतापशहा बागुल यांनी १६१२ मध्ये या मंदिराची निर्माण केले असावे असे सांगितले जाते . याच मंदिराच्या पाठीमागे अत्यंत दाट झाडी मधून आणखी एका प्राचीन जीर्ण मंदिराकडे एक पाऊलवाट आपल्याला घेऊन जाते या ठिकाणी जाताना खूप काळजी घ्यावी लागते. हत्तीची अत्यंत सुंदर शिल्पाकृती कोरलेले रामेश्वर मंदिर त्या दाट झाडीमध्ये आहे . बाजूला भव्य असे पाण्याचे टाके देखील आहे आजही त्या टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी असते . पुन्हा त्याच वाटेने परत येऊन अगदी जवळच एका ओट्यावर महिषासुर मर्दिनी मातेचे छोटे खाणी शिल्प आहे मनोभावे त्या ठिकाणी स्थानिक लोक या मातृदेवतेची पूजा करतात त्याच वाटेने समोर चालत गेल्यावर या माचीवर काही सिमेंटची सभागृह उभारण्यात आली आहे याच दाट झाडी मधून पुढे सोमेश्वर मंदिराकडे रस्ता जातो प्रचंड मोठी आंबे आधी फळांची वृक्ष या माचीवर दिसून येतात . अत्यंत गर्द झाडीमध्ये लुप्त पावलेली एक षटकोनी आकाराची बारव आम्ही बघितली . जमिनीमध्ये सुंदर नक्षी कामासह उतरण्यासाठी पायऱ्या असलेली बारव ही जवळपास अर्धी केरकचरा व गाळाने भरलेली त्या ठिकाणी दिसली .
समोरच दोन तोफा ठेवलेल्या दिसतात . ओतीव स्वरूपाच्या या तोफा आजही त्या ठिकाणी शाबूत आहेत या तोफेवर रामप्रसाद व शिवप्रसाद असे त्यांची नावे कोरलेली आहेत . या तोफेच्या वरील बाजूस सोमेश्वर मंदिर आहे मंदिरात चढण्यासाठी पायऱ्या असून संपूर्ण मंदिराला दगडी कुंपण केलेले आहे . सहा कमानीवर भव्य सभामंडप आणि या सभामंडपामध्ये सुंदर असा नंदी आहे . मंदिराची गाभाऱ्याची रचना ही अलौकिकच आहे द्वारा समोरील छोट्याशा दगडी खिडकीतून शिवलिंगाचे दर्शन होते डाव्या बाजूला गर्द अंधारातून एकच व्यक्ती जाईल अशी एल आकाराची दगडी पायऱ्यांचा जिना त्या गाभाऱ्यात घेऊन जातो गाभाऱ्यातून दर्शन झाल्यावर पुन्हा त्याच वाटेने वर यावे लागते मंदिर परिसरामध्ये अनेक प्राचीन देवदेवतांची शिल्पे आहेत. मंदिराच्या अगदीच पाठीमागे प्रचंड असे गुलाब टाके आहे . या ठिकाणावरून दोन बाजूने मूल्यांच्या बालेकिल्ल्यावर जाता येते डाव्या बाजूची मोराखिंड व उजव्या बाजूने राज मार्गाने पोहोचता येते . राज मार्गाने मंदिराच्या उजव्या बाजूने पाऊल वाट दाट झाडीतून एका पाण्याच्या टाक्या जवळ पोहचते . या ठिकाणचे मजबूत दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरून तलाव तयार केले . या तलावात वरून काताळातील तुटलेल्या महाकाय व अजस्र अश्या शिळा पडलेल्या आहेत उजव्या बाजूस कपारात कोरलेले मोठे व खोल व स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे . येथून खडी चढाई करत राजमार्गावरील दरवाज्यांसमोर येऊन पोहचतो . उजव्या बाजूस काताळावर कोरलेले वीर हनुमंताचे शेंदूर लावलेले शिल्प आहे . अगरी त्यावरच काताळात कोरलेल्या लेणी आहेत . राज मार्गावरील घळीत एक आड एक दरवाजा आहे आता मात्र त्याची खूप मोठी पडझड झाली आहे . बाजूलाच काताळात कोरलेले मोठे पाण्याचे टाके आहे आहे .सर्वात वरील भागातील दोन दरवाजे मात्र अजूनही मजबूत आहेत . नक्षीदार कमानी व दोन ठिकाणी चढत्या पायऱ्या सह काटकोनात वळावे लागते गडावर येणारा शत्रू येथे सहज गाठता येतों . या दरवाज्यातून वर येताच पाठीमागे बालेकिल्ल्यावरील लांब व निमुळती माची आहे . समोरच चिरेबंदी तलाव व त्या समोर पाण्याची ८ मोठी टाकी आहेत . या सर्वोच्च पठारावर इमारतीचे काही अवशेष आहे . समोरच राजवाडयाचे एकमेव सुंदर नक्षीयुक्त दरवाजा पर्यटकांना आकर्षीत करतो. समोर मोरगड दिसतो त्या दिशेने जातांना काही गाळलेली पाण्याची टाकी आहेत . उजव्या बाजूस दोन मोठी तलाव आहे किल्ल्याच्या अगदी तटबंदीच त्या तलावांची भिंत आहे त्यापैकी एका तलांवात पाणी आहे . दोन्ही तलावात मधोमध पाणी मोजण्यासाठी उंच शीळा कोरल्या आहेत . किल्ल्याच्या सर्वोच्च भागवर एकमेव औंदुबर वृक्ष आहे . वृक्षा खाली श्री भडगनाथाचे छोटे मंदिर असून त्यात तांब्याचा मुखवटा आहे .आजुबाजूला मूर्तीचे अवशेष पड़लेले आहेत . मोरगडच्या बाजूने या खिंडीत उतरणारा एक चोर दरवाजा आहे . या दरवाज्यात महाकाय शिळा पडलेल्या आहे . तेथून खाली उतरणाऱ्या पायऱ्या आता तुटलेल्या आहेत . या ठिकाणी खूप काळजी घ्यावी लागते . समोरच मोरागडाचा दरवाजा व पायऱ्या दिसतात .



