सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

चावंड किल्ला

प्राचीन व्यापारी मार्गाचा पहारेकरी : किल्ले चावंड
➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . जुन्नर जि. पुणे
उंची : ३४०० फुट
मार्ग : जुन्नर वरून आपटाळे मार्गे २० कि मी., छत्रपती संभाजी नगरहून नगर - आळेफाटा किंवा समृध्दी महमार्गारून सिन्नर जवळून उतरून जाता येते 
➖➖➖➖➖➖➖

जुन्नर परिसरातील शिवनेरी नंतर अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणजे चावंड किल्ला होय . याला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद ,प्रसन्नगड अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली . गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला आहे . हा किल्ला दुर वरून पाहताच एक महाकाय दगड़ा सारखा दिसतो . चारही बाजूने नैर्सगिक कातरकडा आहेत . त्यामुळे पूर्वीच्या युध्दतंत्रा नुसार शत्रूंना  हा गड चढाई करण्यास अशक्य असे . त्या कातरकडावरही काही ठिकाणी तटबंदी केल्याचे अवशेष आजही दिसतात .
            जुन्नरवरून नाणेघाट मार्गावरील आपटाळे मार्गे तास दिड तासात आपण चावंडवाडी कमान असलेल्या फाट्यावर पोहचतो कमानीतून थोड आत गेले की डाव्या बाजूला एक छोटी घरघुती हॉटेल व पार्कींग साठी जागा आहे . उजव्या हाताला समोर महाकाय चावंड किल्ला दिसतो आम्ही सकाळी नऊच्या  सुमारास किल्ल्याच्या छायेत होतो सूर्य त्यामागे लपला होता . वनविभागाच्या हददीतून चालत असतांना आताच्या काळातील बाधीव पायऱ्याने चढाईस सुरुवात करावी लागते . १५ ते २० मिनिटाची बांधीव पायऱ्याची वळण घेत जाणारी श्रृंखला संपली की खडकात फसविलेले लोखंडी रिलिंग दिसतात पूर्वी पायऱ्या होत्या पण त्या ब्लांस्टींग करून इंग्रजांनी उडविल्या . वाट एकेरी आहे पण लोखंडी आधाराने खोल दरीची भिती कमी होते . कमी अधिक ठिकाणी लोखंडी वायर रोपही आधाराला आहेत . थोड पुढं गेले की नळीच्या आकाराच्या खोलगट चरीतून दगडी पायऱ्या चढत गेले की , थोड्या ओट्या सारख्या भागात येतो . या ठिकाणी आलेला शत्रू बरोबर दोन बुरुजांच्या टापूत येतो .  डाव्या हाताला गणेश दरवाजा दिसतो . येथील दरवाजा व बुरुजाच्या अर्ध्याच्या अधिक भाग त्याच जागेवरील अखंड दगडात कोरलेला आहे व उर्वरीत वरील भाग दगडाने बांधीव आहे . मध्यभागी सुंदर गणेशाची मूर्ती शिल्प आहे . पुढे काही पायऱ्या चढून गेले की  तोफ नजरेस पडते . इथपर्यन्तच्या चढाईस तास दिडदासाचा वेळ लागतो . आजूबाजूला अनेक इमारतीचे दगडी अवशेष आढळतात . उंच वाढलेले गवत अन दाट झाडीमधेही वाडे आदि इमारतीचे भाग दिसतात . या उंच गवतामधे अनेक पायवाटा आहेत त्या भुलभुलैय्या सारख्या वाटतात . किल्ल्याच्या मध्य भागाकडे उंच टेकडीकडे चालत गेल्यावर  चावंड देवीचे दगडी मंदिर दिसते . मंदिर अगदी छोटे आहे आजू बाजूला कोरीव दगडांचे अवशेष आहे . हा भाग बाले किल्या सारखा वाटतो . समोरच एक दगडी दिपमाळ आहे . समोर मिळेल तशी पायवाट चालत गेले की पाण्याची काही टाके वाटेत लागतात . या ठिकाणी एक दगडी शौचकुप बघायला मिळतो . ड्रेनीज ची व्यवस्था सह याचा वापर कसा होत असावा याचीही प्रचीती येते. थोड चालत गेलं की एक पुष्करणी आहे त्याच्या समोर अत्यंत कोरीव दगडांचे पडझड झालेले शिव मंदिर व समोर नंदी आहे . पुष्करणी मधे पाणी असून त्या ठीकाणी सात 
कोनडे कोरलेले आहे. उजव्या बाजूला पायवाटेने  गेले की माणिकडोह (शहाजी सागर ) धरणाचे विहंगम दृष्य दिसते व ही वाट आपल्याला लेणी समुहाकडे घेवून जाते . दगडात कोरलेल्या लेण्या हया धान्य कोठार किंवा सैन्याच्या निवासासाठी वापरत असावे . पुन्हा परत वर येऊन थोडे पुढे गेले की सप्तमातृका टाके नजरेस येते . पाण्याची ७ टाके एकमेकांना जोडलेली दिसतात . एकाच दगडात ही पाण्यासाठी कोरली गेली . खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आत जाण्यासाठी दगडात दरवाजा कोरलेला आहे त्यावर गणेशाची मुर्ती आहे . सप्तमातृका ह्या पाण्याचा देवता आहेत ह्या जलस्त्रोताचे रक्षण करतात . प्रत्येक पाण्याच्या टाक्यांची पाण्याची पातळी वेग वेगळी आहेत. वेरूळ च्या कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत . पटना येथील बिहार म्युझिअम मध्ये या सात मातृ कांची सुंदर शिल्पे जतन करून ठेवली  आहेत . तशीच छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्राहलय मुंबई येथे सुद्धा अशी सुंदर शिल्पे बघायला मिळतात.ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली . येथूनच उगम पावणाऱ्या कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .
      किल्ल्यावर मुककामाची सोय नाही पण जेवण्याची सोय पायथ्याशी चावंडवाडीत होते .  किल्ल्यावर जातांना पाणी सोबत घेवून जावे . चढाई साठी ग्रीफ असलेले बुट वापरावे . पाण्याच्या खाली बाटल्या परत येतांना खाली आणाव्यात .कातरकडा काटकोनात असल्याने फोटो किंवा सेल्फी काढतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...