शनिवार, ११ जानेवारी, २०२५

स्वराज्याच्या शौर्याचे प्रतिक- रामशेज*

 *स्वराज्याच्या शौर्याचे प्रतिक- रामशेज*

🔸🔸🔸🔸🔸🔸

स्थान : ता. दिंडोरी जि. नाशिक


उंचीः ३२७०फुट


नाशिक वरून १५ किमी.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

महाभूमित शेकडो वर्षानंतर हिंदवी स्वराज्याच्या रुपानं रयतेचं राज्य उभं राहिलं होतं . राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं अन अर्कज्ञ शहाजीराजे भोसले यांच्या संकल्पनेचं एक महान ऐतिहासिक महापर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीमत्ता , शौर्य ,साहस, धाडस अन पराक्रमातून स्वांतत्र्य ,स्वाभिमान जागृत करत " हिंदवी स्वराज्या " च्या रुपाने उभं राहिले . सहयाद्रीने पदोपदी शिवरायांना अन त्यांच्या स्वाभिमानी मावळ्यांना स्वराज्यउभारणीत साथ दिली . या सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक अन एक गड कोट स्वराज्याच्या रक्षणार्थ छातीठोकपणे येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यास तप्तर होता . सहयाद्री सोबत मराठ्यांच्या युक्ती-शक्ती पुढे मोगलशाही , आदिलशाही , इंग्रज - डच - पोर्तुगीजही हतबल झाले होते . अश्या अभेद्य अन अनेक वर्ष अजिक्य ठरलेल्या गडा पैकीच असलेला गड म्हणजे रामशेज आहे 

 नाशिक जवळ असलेला हा गड त्याच्या नावा वरुनच त्याचे पौराणिक व धार्मिक महत्व सांगून जातो . राम शेज या मध्ये शेज म्हणजे झोपण्याचे किंवा आराम करण्याची जागा असा अर्थ होतो . पौराणिक कथेनुसार प्रभु श्रीराम सितेच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करत असतांना या डोंगरावर थांबले होते . या ठिकाणी त्यांनी बंधु लक्ष्मणासह विश्रांती घेतली होती म्हणून या वास्तुला रामशेज असे नाव पडले असे सांगितले जाते . प्राचीन काळा पासून सपाट भूप्रदेशात असलेल्या या डोंगरावरील गड म्हणजे एक पहारेकरी म्हणूनच काम करत होता . मुघलांनी अनेक वेळा या गडावर आक्रमणे केली .प्रभु श्रीरामांनी जशी या गडावर विश्रांती केली तशीच जालना स्वारी नंतर काही काळ शिवरायांनी विश्रांती केलेला विश्रामगड हा देखील याच नाशिक परिसरात येतो हा एक योगा योगच म्हणावा लागेल .

             नाशिक पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले या रामशेज गडावर पोहचण्यासाठी मुख्य मार्गापासून आशेवाडी या गावातून रस्ता आहे . वाहने पार्क करण्यासाठी पायथ्याशी जागा आहे येथून पायी चढाई करत जावे लागते . अर्ध्या - पाऊन तासात आपण या वाटेने गडाच्या पठारावर पोहचतो . या वाटेने वर जात असतांना उजव्या बाजूस एक गुफा आहे यामधे आता शिवपिंड आहे .चोर वाटेचे एक छोटे छिद्र वरच्या भागात दिसून येते. डाव्या बाजूने खडकात कोरलेल्या वाटेने श्रीराम मंदिरा पर्यन्त जाता येते या मंदिरात प्रभू श्रीरामा सह लक्ष्मण व हनुमंताची मुर्ती आहे . येथून वर पठारावर पोहचतांना दोन बुरुजा मधील दरवाज्याचे अवशेष दिसतात . लांब निमुळता असलेला हा गड या ठिकाणी निमुळता आहे . समोरच एक छोटा दरवाजा आहे .समोर पठारावर अगदी टोकावर एक भगवा ध्वजस्तंभ लावलेला आहे . या परिसरात काही पाण्याचे टाकी व भग्न अवस्थेतील इमारतीचे अवशेष आहे . पुन्हा परत फिरत गडाच्या उंच भागाकडे जात असतांना ज्या ठिकाणापासून आपण वर आलो त्याच्या अगदी बाजूला काताळात कोरलेल्या मोठ्या पायऱ्या दिसतात अगदी बारवेत उतरण्या साठी जशी रचना असते तश्या पायऱ्या आपल्याला खाली दरवाज्या पर्यन्त घेवून जातात . काताळ पाषाणात कोरलेला हा दरवाजा आहे . दरवाज्यावर सुंदर नक्षीकाम दिसून येते थोडे समोर गेले की आणखी चोर दरवाज्या सारखी वाट खोल काताळात जाते व समोर मात्र मार्ग संपतो व खडकाच्या फटीतून फक्त हात जाईल अशी लांब चिऱ्या सारखी कोर आहे . यातून फक्त नजर बाहेर पडू शकते . येथून पुन्हा परत येतांना असे दिसते की बाहेरील बाजूस शत्रूस केवळ हा डोंगराचा कडा दिसतो पण यात दरवाजा लपलेला आहे .पठारावर येताच त्याच्या विरूध्द बाजूसही पुन्हा खोलगट भागात पाच - सहा पायऱ्या उतरून छोटासा दरवाजा आहे . हा पुन्हा दुसऱ्या बाजू करील शत्रूची टेहाळणी करतो ,येथूनही खाली उतरता येत नाही पण बाजूला खडकात कोरलेले खांब असलेले पाण्याचे टाके आहे .

                     गडाच्या उंच असलेल्या भागाकडे जात असतांना गोल चुन्याचा घाना दिसतो व समोरच रामशेज वरील सर्वात मोठा बांधीव तलाव दिसून येतो . बाजूलाच आनखी खडकात कोरलेल्या पाण्याचा टाकींचा समुह आहे . गडावर फेर फटका मारतांना अशी अनेक पाण्याची टाकी आहेत . पाण्याची चोख व्यवस्था स्थापत्य करतांना ठेवलेली दिसते आणि गडाच्या अजिक्य ठरण्यात हे महत्वाचं काम करते . समोरच गडावरील देवीचं मंदिर आहे . गणेशाची दगडी मुर्ती देखील या परिसरात स्थापित केलेली दिसते . छत्रपतींची मुर्ती देखील आता या ठिकाणी ठेवण्यात आली आहे . जय जिजाऊ जय शिवराय ! हा पर्यटकांचा आवाज या ठिकाणी सतत दुमदुमत असतो . गडाच्या उंच शिखरावर काही उध्वस्त इमारती आहेत . डाव्या बाजूस खाली उतरत गेल्यावर एक दरवाजा आहे ."किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब(दोष)आहे,याकरिता गड पाहून एक-दोन-तीन दरवाजे तसेच चोरदिंड्य़ा करुन ठेवाव्यात" असे  आञापत्रात लिहले आहे. नेमके या चोर दरवाज्याला पाहून आज्ञा पत्रात सांगितलेले महत्व कळते .जवळ जाईपर्यन्त  तर दरवाजा आहे हे समजतही नाही गडा खाली उभे असलेल्यानां तर आजीबात लक्षात येत नाही .

           शहाजहानच्या आजारपणामुळे औरंगजेब दख्खनेच्या जहागिरीतून १६५६ ला परत फिरला होता . छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर १६८१ ला मराठा साम्राज्य संपविण्यासाठी दख्खनेकडे वळला . रामशेज घेण्यासाठी शहाबुददीन खान १०००० सैन्य घेऊन वेढा बसविला . मराठ्यांच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही . नंतर फतेह खान आला त्याला देखील अपयशच आले होते . कासम खान याने देखील रामशेज घेण्यासाठी प्रयन्त केले . पण मराठ्यांच्या केवळ ६०० मावळ्यापुढे हजारोच्या संख्येत आलेले मोगली सैन्य हतबतच ठरत होते . गड घेण्यासाठी अनेक प्रयत्न मोगलांनी केले तोफा डागल्या , गडा येवढी लाकडी मचाने उभारली या बाबत मुघलांच्या दरबारी असलेला भिमसेन सक्सेना या औरंगजेबाचा चरित्रकारने तारिखे-दिल्कुशा मधे या लढाईचे वर्णन केले आहे . हा गड जरी मराठ्यांच्या हातून गेला असला तरी साडे पाच वर्ष मोघलांना मोठा संघर्ष करावा लागला होता . मराठ्यांचा एक किल्ला जिंकण्यासाठी एवढा काळ लागतो तर पुढे इतर किल्ले घेण्यास किती काळ लागेल याच विवंचनेत मोगली सैन्य असावे .


संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*

 *प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*            यशाचं असामान्य शिखर गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या यशामागचं गमक समजण्य...