मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

नाणेघाटाचा पहारेकरी"किल्ले चावंड"

 

नाणेघाटाचा पहारेकरी '"किल्ले चावंड "


हिंदवी परीवाराची कोरोना काळात योग्य ती काळजी घेत या वर्षीची हिवाळी मोहींम पार पडली .आमचे मार्गर्शक इतिहासकार डॉ शिवरत्न शेटे सरांच्या प्रेरणेतून ,दुर्गअभ्यासक श्रीकांत कासट सर परीवाराची धुरा आपल्या खांदयावर घेणारे संभाजी भोसले,अमोल मोहीते यांच्या नियोंजन पूर्वक कृती कार्यक्रमातून  अतिक्षय उत्साहवर्धक वातावरणात जुन्नर परिसर दोन दिवसात अभ्यासपूर्णरित्या जाणून घेतला .

     मोहीमेंचा पहिला दिवस ओझर येथील बेस कैम्प वरील आदरनिय शिवरत्न शेटे सरांचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्रगीताचे गायन करुन मोहीमेंला सुरूवात झाली .

    ओझर वरुन जुन्नरकडे आम्ही मार्गस्त झालो तेथून आपटाळे -नाणेघाट मार्गावर भव्य काताळरूपी डोंगरावर चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहचलो .औझर वरुन हा रस्ता एक ते दिड तासाचा आहे .नाणेघाट कडे जाणाऱ्या या मार्गावरून जातांना उजव्या बाजूला लोखंडी कमान दिसते .कमानीतून आत गेल्यावर १ की मी पुढे गेलो की आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो.पुढे हा रस्ता चावंडवाडीला जातो .भव्यदिव्य अश्या चावंड दुर्गाचे रूप समोर उभे राहते .याची उंची १०६५ मीटर येते. आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा सूर्यही या गडाच्या पाठीमागे  झाकलेला होता.

      या गडाला महाराजांनी स्वराज्यात घेतल्यावर प्रसन्नगड असे नाव दिले .या गडाला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली .

 या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली .कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .

      आता वनविभागाने काही अंतरापर्यन्त पायऱ्या बांधलेल्या आहेत .या नळीच्या वाटेने पुढे गेल्यावर प्रवेश द्वार दिसते .या पाषाणाच्या दरवाजावर मध्यभागी गणेशमूर्ति आहे .दरवाजातून वर गेल्यावर पाषाणात कोरलेल्या पायऱ्या आहेत वर जाताच एक छोटी तोफ आता बऱ्यापैकी तयार केलेल्या लाकडी चाकावर ठेवलेली आहे .डोंगरमाथ्यावर प्रचंड दगडाचे अवशेष नजरेस पडतात .जुने वाडे इमारती याचे जोते व त्याचे पडलेले भाग दिसतात .दाट झुडपातून डोंगर माथ्याकडे एक पाऊल वाट जाते या वाटेत झुडपात इमारतीचे  अवशेष दिसतात .ही वाट या गडावरील चावंडा देवीच्या मंदीराकडे घेऊन जाते .चर्तुभूज देवीची मूर्ती या मंदीरात आहे .दोन माणसा एवढी जागा असलेलं हे मंदीर आहे.मंदीराबाहेर दिपमालेचे अवशेष दिसतात .मंदीरापासून पूर्वेकडे गडाच्या पठारावर उतरत गेले की बरीच पाण्याची टाकी आहेत .पिण्यायोग्य पाणी एवढया उंचीवर उन्हाळ्यातही असते .गडाच्या उत्तर दिशेकडे ही पाऊलवाट चालत जात असता पुष्कर्णो बारव आहे या बारवेला कोरीव काम केलेले दिसते .बरीच शिल्पे ,खांब तुटलेली आहेत बाहेर नंदी आहे व शिव मंदीर आहे बारवेत जिवंत पाणी आहे .गडावर पाऊलवाटेवर कुठे काय आहे याचे छोटे फलक असल्याने बरीच अडचण दूर होते .याच परिसरात सप्तमातृका पाण्याचे टाके  आहे .सात प्रचंड मोठी टाके या काळ्या दगडात कोरलेले आहे .त्यात गडाव२ वर्षभर पुरेल येवढे पाणी आहे .या टाक्यात उतरण्यासाठी एका बाजूने दगडात कोरलेला पायऱ्यासह दरवाजा आहे त्यावर गणेशमूर्ति आहे एखादया वाडयात प्रवेश करावा असा हा दरवाजा आहे तो पाण्यापर्यन्त जातो .सातही टाके एकमेंकांशी जोडलेली आहे पण प्रत्येक टाकयाच्या पाण्याची पातळी वेगवेगळी आहे हे विशेष .साती आसरा या पाण्याच्या ठिकाणी असतात त्या सप्तमातृका याच्याशी संमधीत असाव्यात .कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत .ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .

    गडाच्या उत्तरेकडील कातर कडेवर यादवकालिन गुफा आहेत .या गुफा सैनिक आधिवासासाठी वापरल्या जात असाव्यात .या ठिकाणाहून हजार मीटर उंचीवरुन कुकडी नदीवरील मणिकडोह जलाशय म्हणजेच शहाजीसागर जलाशयाचे निळेशार पाणी मन प्रसन्न करुन टाकते .येथून निमगिरी,हडसर ,शिवनेरी दृष्टीक्षेपात येतो .हरीशचंद्र डोंगररांगासुद्धा येथून दिसतात .पुन्हा वर सप्तमातृकाकडे चालत येऊन गडाचा नळीच्या वाटेकडे परत जातांना गडावर दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात .प्राचीन काळातील स्वच्छता गृह आजही त्या ठिकाणी बघायला मिळते .दगडात कोरलेले हे स्वच्छतागृहाचे भांडे आहे .पाण्याची व मलमूत्राची विल्हेवाट लावण्याची रचनाही स्पष्ट दिसते .गडाला खालून वर येणाऱ्या शञूला रोखण्यासाठी तटबंदीची गरज नाहीच एवढी ही प्रचड कातरकडा आहेत पण वरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही धोकादायक ठिकाणी तटबंदी आहे . गडावर राहण्या खाण्यासाठी व्यवस्था नाही पण गडाखालील चावंड वाडीत व्यवस्था होते असा हा प्रसन्नदूर्ग मनाला प्रसन्न करून जातो .



संजय खांडवे

9011971122






गडाच्या पायथ्याशी


काही अंतरापर्यन्त वनविभागाने केलेल्या पायऱ्या


अवघड ठिकाणी केलेली रिलिंग



पूर्वीच्या दगडी पायऱ्या




 गणेश मूर्ती कोरलेला गडाचा  मुख्य दरवाजा


वर पोहचतास ही तोफ 
दिसते




चावंंड देवीचेे मंदिर



गडाच्या पूर्व भागात असलेले पाण्याचे टाके



पुष्कर्णी बारव व महादेवाचे मंदीर



सप्तमातृका टाके

गडाच्या उत्तर दिशेला खाली दिसणारा कुकडी नदीवरील माणिकडोह धरण
(शहाजीसागर जलाशय)



यादवकालिन गुफांचा समुह (लेण्या)


गडावर असलेले प्राचीन काळातील शौच्छालय

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

दोन हजार वर्षा पूर्वीचा प्रसिध्द व्यापारी मार्ग -नाणेघाट

 

नाणेघाट
 

जीवधन किल्ल्यावरुन 
         दिसणारा नाणेघाट


                  
           

देशाकडून कोकणात कल्याणकडे उतरणारा नाणेघाट
हजारो वर्षाच्या रहदारीने मार्गातील दगडही गुळगुळीत झाले आहेत

नाणेघाटापर्यन्त कोणतेही वाहन पोहचते


नाणेघाटातील वाटेवरील राजंण



 


नागनिकाचा लेणीमधील शिलालेख


सातवाहन राजवंशातील हीच ती नष्ट होत आलेली शिल्पे



 

लेणीबाहेरील पाण्याची टाके


पाठीमागे नानाचा अंगठा




दंतकथेतील गुणाने खोदलेला उत्तरेकडील अपुर्ण मार्ग






 इतिहास 
 चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या काळात वापरले जाणारे मार्ग-रस्ते समजून घेणे गरजेचे असते .यामुळे इतिहास समजून घेण्यास अधिक चांगली मदत होते.  आज जसे आपण दळण-वळणाच्या सोईसाठी महामार्ग बघतो अगदी तसेच महामार्ग प्राचीन काळी देखील अस्तित्वात होते .
याच उद्देशाने आमची दरवर्षी प्रमाणे हिंदवी पारिवार हिवाळी मोहींम असते ती यावर्षी नाणेघाटातून होती .
      नाणेघाट म्हणजे २२०० वर्षापूर्वीचा देशातून -कोकणात जाण्याचा महामार्ग होता .महाराष्ट्रात सातवाहनाचे अत्यंत प्रभावशाली अशी राजसत्ता होऊन  गेली .कला,साहित्य,व्यापार,उद्दयोग या क्षेत्रात या काळात खूप भरभराटी मिळाली होतीं .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सोपरिय,कलियण या सारखे बंदरे विकसित झाली .या बंदरात येणारा माल देशावरच्या प्रमुख शहरात जाण्यासाठी सह्याद्रीच्या महाकाय डोंगर रांगेतून वाट करुन आणने गरजेचे असल्याने नाणेघाट मधे डोंगर कोरुन हा मार्ग काढण्यात आला .या वाटेने वर आल्यावर त्या काळात व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले शहर जुन्नर लागते .नाणेघाट -जुन्नर -पैठण हा त्याकाळचा व्यापारी मार्ग  होता .पैठण तर सातवाहनांची राजधानीच ! त्याच भागात प्राचीन व्यापारी पेठ असलेले भोकरदनही येते .
     नाणेघाटा बाबत जुन्नर परीसरात एक दंतकथा संगितली जाते की नाना व गुणा या दोन भावांनी ही वाट डोंगर फोडून तयार केली .त्यासाठी दोन भावांनी स्वतंत्र ठिकाणी खोदकाम सुरु केले यात नानाने दक्षिणबाजूकडून व गुणाने उत्तर बाजूकडून काम सुरू केले .नानाने काम पूर्ण केले जो मार्ग आज दिसतो पण गुणा मात्र अपयशी ठरला त्याची वाट अपूर्ण राहिली .अपूर्ण वाट जीवधन किल्याच्या बाजूस दिसते.नानाची वाट पूर्ण झाली म्हणून त्याला नाणेघाट म्हणतात पण ही दंतकथा आहे याला ऐतिहासिक आधार नाही .ही दंतकथा मात्र प्राचीन काळापासून प्रचलीत आहे .
     गुणा व नाना या दोघाच्या मधे प्रचंड उंच कडा आहे त्या कड्याला नानाचा अंगठा म्हणतात .हजारो फुट खोल दरी आहे त्या कडयावरून खूप मोठा परीसर पाहता येतो पण पर्यटकांनी या ठीकाणी अत्यंत सावधनतेने वागावे अशी ही जागा आहे .
   डॉ शोभना गोखले यांच्या मते  'नना'ही कुषाणाच्या नाण्यावरील देवता होती .ही नाणी भारतात खूप प्रसिद्ध होती .पुढे या देवतेचा नना वरून नाणे असा अपभ्रंश झाला त्यावरून नाणे हा शब्द तयार झाला व ढोबळमानाने असे म्हणतायेईल की नाणे घाट ही एक पैसे देवाण घेवाणीची जागा असल्याने त्याला नाणेघाट असे नाव पडले .या घाटात उतरतांना सुरूवातीलाच एक दगडी रांजणं आहे सातवाहन काळात या वाटेने जाणाऱ्यास व व्यापाऱ्यास या राजणात कर ,जकात रुपाने नाणे टाकावे लागत असे .असे सांगतात दिवसातून दोन वेळेस हा रांजंणं चांदीच्या नाण्यानी भरून जायचा .सातकर्णो राजा व नाणेघाट मधील व्यापारासंमधी माहीती इतिहासात आढळते.ही वाट म्हणजे महाराष्ट्र व पाश्चात्य देश यांचा संबंध जोडणारी होती त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची बरीच  ओळख झाली .
     नाणेघाटात काही लेण्या खोदण्यात आल्या आहेत .याला वर्षावास असे म्हणता येईल .लयनम् असे संस्कृत मध्ये ,प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणे म्हटल्या जाते .प्रवासात  व्यापारी वर्गास मुककाम  यासाठी ही बनविली गेली असावी यात शंका नाही .पाण्याच्या व्यवस्थेसाठी काही हौद देखील या ठीकाणी आहेत .यामध्ये दोन महत्वपूर्ण लेण्या आहेत यामधे नयनिका हीचा ब्राम्ही लिपी मधील माहीतीपूर्ण लेख भिंतीवर कोरण्यात आला आहे.सातवाहन राजवंशीय घराण्याचे नागवंशीयांशी संबंध प्रस्तापीत झालेले होते .या शिलालेखात यज्ञ व दान दिलेल्या मौल्यवान देणग्यांचे सविस्तर वर्णन आलेले। आहे.त्यांनी बौध्द धर्मास आश्रय देऊन परिसरातील बौद्ध लेणी खोदण्यास उदारपणे मदत केली .या शिलाले।खावरून नयनिका /नागनिका ही सातवाहनाचा मूळ पुरूष सिमूर /सिमूक /श्रीमुख याची सून आहे,सार्वभौम सम्राट सातकर्णोची पत्नी,महारठी त्रणकथिर यांची कन्या आणि भायल ,वेदश्री व शक्तीश्री या सातवाहन पुत्राची माता होती .नागनिकेचे वर्णन करतांना प्राचीन काळातील स्त्रीयांच्या आदर्श प्रतिमेंचे चित्र उभे केले आहे.नागनिका या नावातच नाग स्त्री ही माहीती मिळते ,ती महारथी त्रणकथिर नावाच्या महारठीची कन्या होतीं .नाग ही एक जमात होतीं .सातवहन काळात महाराठी ,महाजन ही पदे होतीं.पराक्रमी सरदारांच्या मुलीशी विवाह केली जात असत. नागनिकाचा एक वेगळा प्रभाव त्या काळात होता .तिच्या लेखावरून व शिल्पावरून हे लक्षात येते.नागनिकाशी संमधीत अनेक नाणी या परीसरात सापडली आहे .या ठिकाणच्या लेण्यात सातवाहन राजवंशांच्या मूर्ति व त्यांची नावे कोरली आहे मात्र काळानुसार आता केवळ पाय शिल्लक दिसतात .यामधे सिमूक,नागनिका,श्रीसातकर्नी,कुमार भायल,महारठी,त्रणकथिर,कुमार हुकश्री,कुमार सातवाहन यांचे अवशेष दिसतात .
      कोकणातून देशांवर येणारा हा मुख्य रस्ता म्हणजे नाणेघाट याच्या रक्षणार्थ बाजूलाच जीवधन किल्ला बांधलेला आहे .पुढे याच मार्गाच्या रक्षणार्थ हडसर ,चावंड,शिवनेरी या किल्याची निर्मिती याच काळात झाली .या मार्गाने सातवाहन राजधानी पैठण पर्यन्त व्यापारी राबता चाललेला दिसतो .


संदर्भ
नाणेघाट -श्री लहु गायकवाड
लेणी महाराष्ट्राची -डॉ दाऊत दळवी
जुन्नर परिसरातील प्रत्यक्ष भ्रमंती

संजय खांडवे
बुलढाणा












बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

अजिठा डोंगर रांगेतील कालिंकादेवी मंदीर परिसर

अलिकडील टेकडीवर भव्य दगडात पायऱ्या कोरलेल्या दिसतात जणूकाही हा हा एका मोठ्या खोलीचा पाया असावा असे दिसते
कातरलेला दगड मंदिराकडे जाताना लागतो
पठारावरुन दिसणारे कालिंका देवी मंदीर

अजिंठा डोंगररांग 


                              पठार

                              पठार

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

१६ व्या शतकातील पातुर येथील नानासाहेबांचा वाडा (मंदिर)



 वाड्यातील शिष्यांची समाधी

 
वाड्यात चारही बाजूने असलेल्या तटबंदी तील कमानी

                         दीपमाळ


कोरीव नक्षीकाम केलेला हत्ती



१६ व्या शतकातील पातुर येथील नानासाहेबांचा वाडा 

➖➖➖➖➖➖
अकोला जिह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल पातुर शहरात नानासाहेबांचा प्राचीन वाडा (मंदिर )ही अंदाजे १६ व्या शतकातील प्राचीन वास्तु आहे.वीटा,दगड,चुना व माती मध्ये अप्रतिम बांधकामशैली असलेले हे ठिकाण आहे .टेकडीवरील प्रसिध्द रेणूका देवीच्या मंदीराच्या पाठीमागे हा वाडा आहे .आता नवीन बाळापूर वरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपास ला लागूनच हा वाडा आहे .बायपास अंजून अपूर्ण असल्याने त्या मार्गाने सध्या जाता येत नाही .
    वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला आहे व त्यावर नगारखाना आहे .सपूर्ण वाडा हा बंदीस्त आहे ,चार कोपऱ्यावर चार बुरुज आहे .वाडयाच्या मध्यभागी मंदीर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे .गाभाऱ्याच्या बाहेर सभामंडप आहे त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षिकामासह कमानी आहेत .मंदीराला देवळ्या असून त्यात आता तुटलेल्या अवस्थेतील मूर्ति आहेत्त .सभामंडपातच गोड पाणी असलेली बंदीस्त विहीर आहे.मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते .त्या पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आनखी दोन समाधी आहेत त्यावर एक दगडात कोरीव नक्षीकाम केलेली अंबारीसह अशी सुंदर हत्तीची मूर्ती आहे .
संपूर्ण वाड्याला मजबूत कोट आहे .या कोटात कमानीसह बांधकाम करुन त्यावर वीटाचेंच छत असलेले निवासादी साठी तयार केलेले दिसतात .एकाच वेळी शेकडो व्यक्ती सुरक्षितपणे राहतील अशी व्यवस्था या वाड्याचा बांधकाम रचनेनुसार आहे .कमानीच्या खोलीमधून अरुंद असा जीना वर कोटावरील छतावर घेऊन जातो .या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते .याच इमारतीचा तळघरही असल्याचे दिसते पण त्याचा रस्ता बंद आहे .मंदिरासमोर तीन एकत्र स्वरूपाच्या दिपमाळा आहे .या वाडयात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पूर्वी झालेले आहे.नानासाहेबांचे पातुर अशी या शहराची ओळखच आहे .या वाटेवरून जात असतांना  अवश्य बघावा असा हा वाडा आहे.


संजय खांडवे
9011971122



गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

पातुर येथील बुद्ध लेण्या



 

 





इस पूर्व २रे ३ रे शतकापासून इ स १४ व्या शतकाचा कालखंड म्हणजे आपल्या भारतवर्षात शिल्पकलेचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. या काळात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन  भव्य दिव्य अश्या वास्तूंची निर्मिती झाली . यात अंजिठा वेरुळ लेणी  म्हणजे शिल्प कलेचा अप्रतिम खजिनाच .....
 त्यात पुढे यादव काळातही यादवकालिन स्थापत्य शास्त्राचे दर्शन मंदिर निर्माणातून घडले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या लेण्याचे कमी अधिक खोदकामाचे पुरावे आजही आहेत.बरेच ठिकाणे दुर्लक्षित आहेत ,पर्यटक जवळून जातात पण माहीती अभावी ते त्या ठिकाणी पोहचत नाही .
    आम्ही अशाच एका विदर्भातील प्राचीन लेणीला भेट दिली .अकोला जिल्हयातील पातूर ....
बोर्डी नदीच्या तीरावर बसलेले हे प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .पातूरला सुवर्णनगरीच म्हणतात ७० च्या दशकात बोर्डी नदीच्या पात्रात सुरत येथील टाकसाळात बनविलेल्या व फारशी भाषेत त्यावर प्रार्थना असलेल्या हजारो मुद्रा सापडल्या होत्या .एक पार्वतीची तीन फुटाची मूर्ति देखील होती ह्या वस्तु नागपूरच्या संग्राहालयात पाहण्यास मिळतात .
     शहराच्या पश्चिम भागात बाळापूर मार्गावर  उंच टेकडीवर मुख्य रस्त्याला लागूनच आता पुरातत्व खात्याने पक्के कुंपन केलेले निदर्शनास । येते .समोरच रेणूका देवीचे बाजूच्या उंच टेकडीवर मंदीर आहे . आम्ही मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून लेणीकडे निघालो, पुरातत्व खात्याचा  त्या ठिकाणी वॉचमन  असल्याने लेणीचे बरेपैकी काळजी घेतलेली दिसली आम्ही सरळ वर डोंगरावर निघालो पातुर शहराच्या अगदी पश्चिमेकडील हा हा भाग आहे या टेकडीवरून  संपूर्ण पातुर शहर दिसते.
     लेणीत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत .सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने भिंतीचे बांधकाम आहे .वळण घेताच लेणीच दर्शन होते .काळा पशान असलेला हा काहीसा दगड आहे त्यात इतर झीज होणाऱ्या दगडांचे चरे  दिसतात .गारगोटीचा चरी असलेला पदरही दिसतो .मुख्य लेणी प्रशस्त आहे .भव्य खांबावर उभी असलेली दिसते .खांबाच्या वर कडा तुटलेंल्या अवस्थेतील संस्कृत लेखही दिसतो .मुख्य लेणीत पायऱ्या असून आत मुख्य ठिकाणी मध्यभागी ओटया सारखा भाग आहे .दरवाज्याच्या बाजूला ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे .इतिहास कारांच्या मते इ स 3रे ४ थे शतक ह्या लेणीच्या निर्माणाचे असावे .या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजा हरीसेन व त्याचा प्रधान वराहदेव यांनी केले असावे .या लेणीची माहीती १७३० मध्ये ब्रिटिश पुरातत्वज्ञ एंडमन लायन व राबर्ड गील यांनी गोळा केली .पाली लिपीतील शिलालेखाचे फोटो त्यांनी घेतले होते त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता सध्या तो ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे उपलब्ध आहे .१९०२ साली कुझेन्स हेन्री भारतात आला होता त्याने आपल्या अहवालात पातुरच्या लेण्या बुध्द लेण्या असल्याचे म्हटले आहे .भारताच्या इंडीयन प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल पाहयाला मिळतो .मुख्य लेणीच्या बाजूला आणखी दोन छोटया लेण्या आहे .या संपूर्ण लेणीत मूर्त्या सध्या नाहीत  पण त्या पूर्वी असाव्यात असे जाणवते .लेणी ही अपूर्ण असावी त्या ठिकाणचा दगड किंवा त्या काळच्या  काही अडचणीने काम बंद पडले असावे  .
     प्राचीन वास्तुशी निगडित काही पौरानिक दंतकथाही तशी या बाबतीतही काही दंतकथा सांगितल्या जातात  कालायन नावाचा राक्षस महादेवाची आराधना करुन अमरत्व प्राप्त झाला होता तो सर्वाना त्रास देवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालायनाशी युद्ध पुकारले पण कालायनाशी आपण जिंकू शकत नाही हे पाहता श्रीकृष्ण याच पातुर लेण्यात येवून लपला होता तेव्हा पाराशर ऋषी या लेणीत तपचर्या करत होते .कालायन तेथे आला असता त्याने पाराशरांची तपचर्या भंग केली त्यांनी डोळे उघडताच तो भस्म झाला .या पाराशर ॠषीच्या नावावरून पातुर हे नाव पडले अशी दंतकथा आहे .या लेणीचा संदर्भ महाभारतातील दंतकथेतही येतो पण हा संदर्भ केवळ दंतकथेशीच निगडित आहे.
 हा परिसर चक्रधरस्वामीच्या पद स्पर्श लाभलेला ही भूमी आहे .अनेक ऐतिहासिक वास्तु या परीसरात आहे त्यांचे जतन व संवर्धन व्हावे हीच अपेक्षा.

संदर्भ :
उद्ध्वस्त वास्तू समृध्द इतिहास
लेखक :विवेक चांदुरकर 
प्रत्यक्ष भ्रमंती
विवेक चांदुरकर सर (शिल्पअभ्यासक ,लेखक तथा लोकमत उपसंपादक)
डॉ शाम देवकर (इतिहासकार)
प्रा पी जी सवडतकर (इतिहास अभ्यासक)
किशोर वाघ (अनिस प्रदेशाध्यक्ष)
किशोर काकड (स्थानिक शिक्षक )


संजय खांडवे
बुलढाणा
9011971122

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

यादवकालिन आन्वा ता भोकदन जि जालना येथील शिव मंदीर

 









🛕आन्वा येथील यादवकालिन शिव मंदीर🛕

➖➖➖➖➖➖➖

सर्व देवामधे श्रेष्ठ......


 मस्तकी चंद्र धारण केलेला........


सर्व लोकांचा एकच अधिपती.........


देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात .....


असे देवादिदेव महादेव म्हणजेच 'शिव '

  महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आढळतात बरीच मंदिरे ही यादवकालिन आहेत .असेच एक प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम  अविष्कार असलेले मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे .जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .

     मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार 'शस्त्रोंत्कीर्णा 'हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी 'शैलजा' 'हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .

      तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे साहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत .

उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो .आत गेल्यावर त्या मंडपात अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला  होतोच.

या मंदीराला ५०  गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे .ताराकृती उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण साहे .मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते .मध्यम नवतालातील यक्ष ,अप्सरा,प्राणी,पक्षी यांची शिल्पे आढळतात .उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो .दुरुस्तीचे काम सुरू दिसते पण पर्याप्त वाटत नाही .एवढा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे .त्या पाठीमागचा इ|तिहास समोर आला पाहीजे .त्या  भव्य दिव्यतेची व आपल्या पूर्वजाच्या अपार मेहणतीमधून साकारलेली जागतिक दर्जाची संस्कृती जगासमोर गेली पाहीजे या उद्देशाने आमची निर्सग-इतिहास प्रेमी टिम सतत नवनवीन ठिकाणी भटकत असते .यावेळी लोकमत बुलढाणाचे उपसंपादक तथा शिल्प अभ्यासक विवेक चांदुरकर सर ,इतिहास अभ्यासक प्रा पी जी सवडतकर सर व किशोर वाघ सर (अनिस मराठवाडा प्रदेशध्यक्ष) आमच्या सोबत होते .



संजय खांडवे

बुलढाणा

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

स्वराज्यातील दुर्गसंपदा भाग ३


 ।स्वराज्यातील दुर्गसंपदा भाग ३


छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या बुधभूषण या  संस्कृत ग्रंथात दुर्ग निरूपणामध्ये  दुर्गाचे महत्व विषद करत त्यांनी मांडलेले बारकावे हे आजच्या हजारो अभियंत्यानी व शास्त्रज्ञानी एकत्रीत येऊन मांडणी करता येणार नाही ती केवळ एकटया शंभूराजेंनी केलेली दिसते. यामध्ये या दुर्ग निरुपमातील प्रत्येक श्लोकातील शब्द अन शब्द बरेच काही सांगून जातो . एका झुंजार योध्यातील अपूर्व वास्तुविशारदता की जी शास्त्राच्या कसोटीवर टिकते ,यातील बारकावे हे सटीकतेने अभेद्यता वाढवितांना दिसतात .एक दुर्ग आपल्या राज्यासाठी कश्या पद्धतीने सज्ज असावा याचे भाष्य करताना संभाजीराजे म्हणतात -

         दुर्गावर एकाच वेळी १०० च्या वर लोकांचा नाश करणारी  यंत्रे दुर्गावर असावी शेकडो यंत्रानी तो दुर्ग सगळीकडून सज्ज असावा .राजाने या किल्याच्या मधोमध संपूर्ण साधनांनी युक्त असा ,सर्व बाजूनी काळजीपूर्वक विचार करुन विविध आयुधे,सुरक्षितते साठी गुप्त असा ,सर्व ॠतुमध्ये फळे ,फुले ,वृक्ष व जल देणारा शुभ्र असा राजवाडा तयार करावा.असा राजवाडा हा किती सुरक्षित असेल याची आपण कल्पना करू शकतो .अश्या देश कोश आदि सर्व साधने व वस्तु याच्या योगाने सुरक्षित झालेल्या उत्तम,स्वच्छ ,निर्मल,शुभ्र गुणांनी युक्त अर्थात पवित्र नगरात ,राजकीय चिन्हे संपन्न अश्या राजमंदिरात राजाने वास करावा.

       दुर्गामध्ये लांबलचक आयाताकार रांगा तयार कराव्यात .त्यापैकी एका पत्किंच्या टोकास चौथऱ्यावर प्रार्थनास्थळ असावे .दुसऱ्या रांगेच्या चौथऱ्यावर राजाचे राहण्याचे ठिकाण निर्माण करावे .तिसऱ्या चौथऱ्यावर धर्माध्यक्षाचे स्थान असावे .चौथ्या चौथऱ्यावर अग्रभागी गोपुरांची रचना करावी .अश्या स्वरूपाची चौरस, आयताकृती किंवा गोलाकार अशी तीन प्रकारची नगरचना करून घ्यावी असे संभाजी राजे सांगतात .


*अर्धचंद्रप्रकारं च वज्रकारं च कारयेत्*


शेवटी त्रिकोन यामधे याप्रमाने अर्धचंद्राकार किंवा वज्र आकाराची रचना करावी .

       राजवाडयाच्या दक्षिण दिशेला कोशागार करणे योग्य आहे व त्या कोशागाराच्या दक्षिण भागात गजशाळा म्हणजे हत्तीशाळा असावी .धनरक्षणाची ही रीत प्रशंसनिय आहे .अशी रचना ही संभाजी राजे यांच्या दुरदृष्टी व वास्तु विशारद असल्याचाच भाग म्हणावा लागेल .

       दुर्गावरील यज्ञशाळेचे मुख हे गजशाळेच्या पूर्वेस किंवा उत्तरेस करावे .दक्षिणपूर्वमध्य म्हणजे आग्नेय दिशेला आयुधागार बनविणे योग्य आणि तेथेच शेजारी रथ,शकटशास्त्र,धर्मज्ञ व दुसऱ्या कर्मशाळा असाव्यात .थोडक्यात या दिशेला सर्व औद्योगिक विभाग असावा .पुरोहीताचे घर राजवाड्याच्या डाव्या बाजूला करावे त्या भागात मंत्री ,ज्योतिषशास्त्र वेत्ता आणि राजवैदयाचे निवासस्थान असावे .महाभागांची निवासस्थानेही तयार करावीत .गाईचे गोठे,द्योडयाच्या पागा तयार कराव्यात .अश्वशाळा उत्तराभिमुखी असावी .राजाने अश्व रात्रभर नजरेखाली ठेवावेत व त्या अश्व शाळेत कोंबडे ,वानर,ठेवावीत .

गाई,हत्ती,घोडे इ.च्या मलाचे उत्सर्जन,देवदैवादिक कृत्ये सूर्य मावळल्यानंतर  करू नये असे संकेत दुर्ग निरूपणात संभाजी राजे देतात .

    योद्धे,शिल्पशास्त्रज्ञ अशा सर्वांना उत्तर घरे द्यावीत आणि मंत्रविदयाजाणकार व ज्योतिषांना तसेच घरे द्यावी .किल्यामधे मोठमोठे रोग उद्भवतात .राजाने गाई ,घोडे,हत्ती यांच्या रोगाचे निदान करण्यासाठी व रोगस्वरूप त्यांचे परिणाम यांचा सर्व अंदाज व्यक्त करून त्यावरील औषधांचे जाणकार वैद्याना किल्यात राहण्यास जागा  द्यावी .कुशल शीलवान ब्राम्हणांना दुर्गामध्ये स्थान असावे पण काही काम नसलेल्यांनी तेथे गर्दी करू नये .असे संभाजी राजे सांगतात .बुधभूषण या ग्रंथाच्या द्वितिय अध्यायातील दुर्ग निरुपणातील या बाबी संभाजीराजे एक कुशल योद्धा,सर्वश्रेष्ठ युवराज,थोर साहित्यीक,विचारवंत,तत्ववेत्ता त्याचबरोबर वास्तुज्ञास्त्र विशारद असल्याचेही स्पष्ट होते .दुर्गशास्त्राचे असलेले ज्ञान व त्यांनी केलेली बुधभूषण मधील दुर्गाविषयीची संपूर्ण मांडणी याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून मांडणी केल्यास अधिक स्पष्टता येईल.


संदर्भ

बुधभूषण




संजय खांडवे

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी



 🚩🚩🚩🚩🚩🚩

स्वराज्याच्या आणाभाका घेत स्वराज्य वाढू लागले ,असंख्य किल्ले स्वराज्यात शिवरायांच्या बुद्धीचातुर्य,शौर्य,धाडस व किर्तीने येऊ लागले यासाठी स्वराज्याच्या आड येणाऱ्या स्वकियांचाही बंदोबस्त शिवरायांना करावा लागला .जावळीचा विजय हा त्यातलाच एक भाग होता .या विजयाने कोयने पासून लांब कोकणपर्यन्त स्वराज्य विस्तारले ,नव्हे दुप्पटच झाले .

     जावळी च्या दाट किर्र अश्या खोऱ्यात ,अरुंद वाटा,डोंगर दऱ्या हया जंगली श्वापदांचा वावर असलेली अशी होती .जावळी जनू वाघाची जाळीच !हयाच ठिकाणी शिवरायांच्या बुध्दीचार्तुयाचा एक भाग म्हणजे महाराजांचे पुर्वानुमान कौशल्य येथे दिसून येते .पुर्वानुमान म्हणजे पुढे काय होणार किंवा परिस्थिती कशी असणार हे आपल्या बुध्दीपटलावर घासून अनुमान काढणे होय.

       महाराजांनी याच ठिकाणचा भोरप्या डोंगर हेरला .त्याचा आकार, रचना ,दगड व पाणी याचा अभ्यास करून मोरोपंताना या ठिकाणी गड बांधण्याचा आदेश दिला .स्वराज्यातील स्थापत्यशास्त्र विशारद अर्जेाजी यादव यांनी हा अभेद्य असा प्रतापगड  १६५६ साली बांधून काढला .स्वराज्याचा भगवा ध्वज प्रतापगडावर डौलाने फडकू लागला .हाच प्रतापगड जेव्हा स्वराज्यावर अफजल खानाचे संकट आले तेव्हा स्वराज्य रक्षणासाठी सिद्ध झाला .रडतुडीच्या घाटातून खानाला बोलावून याच जावळीच्या भागात प्रतापगडाच्या साक्षीने त्याच्या चरणी अफजलखान रूपी स्वराज्यावरील संकट संपविले.हे आजही त्या खानाची कबर  गडावरून पाहतांना लक्षात येते.

    या मोहिमेंत महाराजांचे शौर्य तर दिसतेच त्याचबरोबर अलौकिक बुद्धीमत्तेचेही दर्शन घडते . शञूलाही चक्राउन सोडणारी युद्धाची व्यूहरचना त्याच सोबत विश्वासू जीवाला जीव देणारे शूर स्वराज्याचे मावळे .

         *"आम्ही तर जीवीत तृणप्राय समजून शत्रुच्या अंगावर चालून जात आहो.यात यश आले तर ठिकच आहे ;परंतु काही भलताच प्रकार घडला तर तुम्ही घाबरुन जाऊ नका .ठरविलेल्या बेताप्रमाने शत्रुवर चालून जाऊन त्याचा मोड करा व राज्याचे रक्षण करा .तुम्ही सर्व शूर व पराक्रमी आहा .आमची सगळी मदार तुमच्यावर आहे .तुमच्यासारखे इमानी  व विर्यशाली पुरुष सहाय्य आहैत म्हणून आम्हास यवनांची पर्वा वाटत नाही .या समयी सर्वाना आपआपल्या शौर्याची व पराक्रमाची पराकाष्टा करावी .तुमची अनुकुलता आहे म्हणून मला अफझुलखानाचा मुळीच हिशोब वाटत नाही .आजपर्यन्त केलेली कमाई  आपल्या सहकार्याचे व शौर्याचे फळ आहे .ती आपली कमाई कायम राखण्यास जिवाची पर्वा न करता ह्या कठीण प्रसंगी झटाल तर तुमची किर्ती अधिकच वाढेल ! हे असे वीर्योत्सहाचे उद्दीपन करणारे भाषण ऐकूण सर्व लोकांच्या अंगात स्फुरण आले. ते म्हणाले " आपण आम्हास जी जी आज्ञा कराल तदनुसार वागण्यात आम्ही यत्किंचितही कसूर करणार नाही .त्यासाठी आमचे प्राणही बळी पडले तरी त्याची आम्हाला क्षिती नाही .हे प्राण आपल्या चरणी एकवार  वाहिले आहेत .ते आता आमचे नव्हेत ते स्वामिकार्यी गत  झाले  तर ते आम्ही मोठे भूषण समजू ."*


    (कृष्णराव केळूसकर गुरुजी लिखित शिवचरीत्रातून )


सामाजिक स्वांतत्र्य साठी  प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता मोहीमेत उतरणारे पहीले राजे म्हणजे शिवराय .

   या मोहीमेत महाराजांनी असंख्य बारकावे अवलंबविले ते आपण पुढे यथावकाश अभ्यासूच !

     आज वीर जीवाजी महाले यांची  जयंती  या निमित्ताने जीवाजी महाले यांच्या स्मृतीस प्रणाम करतो

शिवाजी महाराजांनी या मोहीमेंत अंगरक्षक म्हणून दहा मावळ्याना सोबत घेतले .प्रत्येकाला प्रत्येकाचे काम नेमुण दिले ,महाराजांच्या गुप्तहेर खात्यानुसार शञूचे अनेक बारकावे अभ्यासून त्याच्या तोडीस तोड व्यूहरचना  करणे हे ही महाराजांची युद्धनितीच होती .

🚩

*तथैव माहिलो जीवो विश्वजिच्च मुरुबक:।*

🚩

या आशयाचा श्लोक महाराजांच्या समकालिन असलेल्या "शिवभारत "या ग्रंथात २१व्या अध्यायात आला आहे . यात जे दहा अंगरक्षक आहेत त्यांची नावे आढळतात .

*संभाजी कावजी*

*जिवाजी महाले*

*काताजी इंगळे*

*कोंडाजी कंक*

*येसाजी कंक*

*कृष्णाजी गायकवाड* 

*सुरजी काटे*

*विसाजी मुंरंबक*

*इब्राहीम सिध्दी*

*संभाजी करवर*

अश्या *शिवराज रक्षक* दहा महावीरांनी  गर्जना करून,म्यानातून प्रचंड तलवारी उपसून पर्वतांनी जसे वाऱ्यास अडवावे तसे खानाच्या सैन्यास अडविले असा उल्लेख आढळतो .

ह्या दहा महावीराना आपआपल्या युद्ध व शस्त्र कौशल्यानुसार शञूकडील नेमुन दिलेल्या कामावर पापणीही लवता कामा नये ,जेने करून शञूस संधी मिळेल .

  जीवाजी महाले यांची सैय्यद बंडावर बारीक नजर होती .हवेतल्या हवेत मारा करण्यात तरबेज ,चाणक्ष,चपळ महावीर !

 खानाच्या पडल्याने शत्रूपक्षात प्रचंड गोंधळ निर्माण झाला ,ठरल्या प्रमाणे मावळे लढू लागले .चवताळून बंडा महाराजांवर वार करणा२ तोच जीवाजीने त्याचा हात हवेतच कलम केला . लाखाचा पोशिंदयाचं रक्षण झालं .

महाराजांचे प्राण वाचले .याच जीवाजीच्या पराक्रमाने  महाराजांचे पुढचे २१ वर्ष  स्वराज्यासाठी मिळाले .



" *होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी* " ही म्हण रूढ झाली .या महावीर योध्याची आज जयंती 

सर्व शिवप्रेमीना हार्दिक

शिवशुभेच्छा



*जय जिजाऊ*

🚩🚩🚩🚩🚩🚩


*संजय खांडवे*

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

स्वराज्यातील दुर्गसंपदा भाग २



 



सकलशास्त्रकोविद छ्त्रपती संभाजी राजे भोसले यांनी बुधभूषण या ग्रंथांच्या द्वितिय अध्यायात दुर्ग निरूपण या भागात दुर्ग प्रकार सांगितले त्याची माहीती या भागात आपण घेऊ या .

        'दुर्ग 'या शब्दाचा मूळ अर्थच दुर्गम असलेला ,जाण्या येण्यास अत्यंत कठीण,अवघड असा हा दुर्ग असतों दुर्गाला किल्ला असेही म्हटले जाते या सर्व बाबींचे विवेचन संभाजीराजे दुर्गाविषयी देतात .तो कसा असावा ,गडाचा कुठला भाग कोठे असावा याचे शास्त्र शुद्ध विवेचन  छत्रपती युवराजांच्या शास्त्रानुसार आपण पुढील भागात पाहणार आहोतच .



धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।

वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥


छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .

 १)नरदुर्ग

 २)वार्क्षदुर्ग

 ३)धन्विदुर्ग

 ४)अम्बु दुर्ग

 ५)महीदु र्ग

 ६)गिरि दु र्ग


असे सहा प्रकार शंभूराजे बुधभूषण या ग्रंथात द्वितिय अध्यायामध्ये सांगतात .


  नरदुर्ग 

हा दुर्ग म्हणजे माणसांनी वेढलेला ,शूरविरांची दुर्गम व्युहरचना केलेला,गूढ भूलभुलैय्या ,चक्रव्युव्हाप्रमाणे एकमार्गी लढवैय्यानी तटासह वेढलेला किल्ला तर्क चतुरंगसैन्याने तयार होतो


वार्क्षदुर्ग (वनदु र्ग )

घनदाट जंगलाचे सरक्षण असणारा दुर्ग ,वन ह्या दुर्गाचे सरक्षण करतो .हा गर्द झाडी मध्ये सशस्त्र सैन्याने सज्ज असा किल्ला असत्तो .


 धन्विदुर्ग

हा दुर्ग म्हणजे धर्नूधारींनी सुसज्ज असा असतो .हा अनेक प्रकारच्या प्रगट -अप्रगट योध्यानी व्युहरचना केलेला असतो.     


अब्दुर्ग (जलदुर्ग)

चारही बाजूने पाण्याने वेढलेला हा दुर्गप्रकार आहे .पाण्यामधील मजबूत खडक असलेल्या बेटावर हा दुर्ग उभारला जातो.शेकडो वर्षापासून अश्या दुर्गाची प्रचंड दगडापासून बनविलेली तटबंदी या दुर्गाचीं वादळ वाऱ्यात ,प्रचंड लाटातही सरक्षण करत असतात .पिण्याच्या गोड्या पाण्यासह लागणाऱ्या इतर सर्व सोयी गडावर आढळतात .जंजीरा ,विजयदुर्ग,खांदेरी,सिधुदुर्ग ही महाराष्ट्रातील जलदुर्ग होय .जंजीरा स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजे यांनी त्याचा बाजूलाच पदम् दुर्गाची निर्मिती केली होती .


महीदुर्ग 

हा भूईकोट किल्याचा प्रकार आहे.खंदकांनी वेढलेला जमीनीवरील हा भूईकोट किल्ला असतो .बारा हात उंच बुरुज /तटबंदी त्यावर फिरण्यास प्रशस्त फांजी व तटबंदीवरील चर्या किल्ला अजिंक्य बनवतात .चाकण ,अहमदनगर ,सोलापूर येथील किल्ले भूईकोट प्रकारात येतात .

लाल किल्ला याच प्रकारात येतो .किल्याच्या चारही बाजूने खंदक खोदून त्यात सुसर मगरी सोडून त्याला अधिक दुर्गम केले जात असे .नळदुर्ग हा भूईकोट किल्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे .


गिरिदुर्ग

या प्रकारात किल्याच्या चारही बाजूने पर्वत ,दरी,कातरकडा असतात .चारही बाजूने दुर्गसरक्षणार्थ तटबंदी व बुरुज असतात .

संभाजी राजे यांनी गिरिदुर्ग हा अत्यंत प्रशंसनिय मानला आहे .गिरिदूर्गाविषयी विवेचन करतांना स्वतंत्र श्लोक बुधभूषण मध्ये आला आहे.


सर्वेषामेव दुर्गाणां गिरिदुर्ग प्रशस्यते ।

दुर्ग च परिखोयेतं वप्राट्टालकसंयुतम ॥


या सहा दुर्गामध्ये गिरिदु र्ग हा प्रशंसनिय व प्रशस्त मानला जातो .दुर्ग हा वप्र आणि अट्टालक यांनी युक्त असावा .असे शंभूराजे म्हणतात .स्वराज्याचे तोरण तोरणागड हा गिरिदुर्ग जिकूनच बांधले गेले .स्वराज्याची पहीली राजधानी राजगड हा गिरिदुर्गच !

दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड हा सुद्धा गिरिदूर्ग प्रकारातच येतो .स्वराज्यातील बहुतेक किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारात येतात .

     असे सहा दुर्गप्रकाराचे विश्लेषण शंभूराजे यांनी केले आहे .महाराष्ट्राचे खरे वैभव या दुर्गातच आहे .हे शंभूनृपाने जाणले होते .

         या व्यतिरिक्त दुर्गाचे त्यांच्या वैशिष्टयावरून इतर प्रकार पडतात .

मृददुर्ग 

मातीपासून तयार केलेला किल्ला

अश्मदुर्ग

निव्वळ दगडापासून तयार केलेला किल्ला.

इष्टीकादुर्ग

विटा व चुन्यामध्ये बांधलेला किल्ला.

मरुदुर्ग

वाळवंटात बांधलेला किल्ला.

दारूदुर्ग व मेंढेकोट

वेळू व लाकडांनी बांधलेला किल्ला .

नृदुर्ग

हत्ती,घोडे,रथ,पायदळ असे चतुरंग सेनेचे सरक्षण असलेला किल्ला.

असे इतरही प्राचीन ग्रंथात दुर्गाविषयी नोंदी आहेत .पुढील भागात आपण शंभूराजानी दुर्गावरील प्रत्येक भागाचे महत्व व उपयोगीतेचे विवेचन केले आहे ते आपण पाहणार आहोच शिवाय गडाचे प्रत्येक भाग व त्याचे महत्व जाणून घेणार आहोत .



क्रमश:


सदर्भ

 १)बुधभूषण

२)दुर्ग शोध गड किल्याचा



संजय खांडवे



गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

प्रकांड पंडीत कृष्णराव अर्जुनराव केळूसकर गुरुजी

 


धर्मशास्त्र,अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र,समाजशास्त्र,तत्वज्ञान,इतिहास हया विषयावर आपल्या साहित्यातून विस्तृत स्वरूपात लिखान करनारे प्रकांड पंडीत ,बहुजनसमाजाचे वाड़मयमहर्षोंच ज्यांना म्हणता येईल असे कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचा साहित्य विश्वातील कार्य पाहता नतमस्तक व्हावे असेच आहे .
        आज त्यांचा जन्मदिवस एक आठवण म्हणून का होईना वाचून जे काही लिहावसं वाटलं ते मांडतोय !
    गीताशास्त्राचे वास्तविक रहस्य सामान्य लोकांना उत्तम रितीने अवगत व्हावे ,गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अन्वय व त्यातील प्रत्येक पदाचा अर्थ वाचकास कळावा या उद्देशाने त्यांनी सान्वय,सार्थ,सटीक गीतेवरील भाष्य केले आहे .८९० पानाचा हा श्लोकासह विधिध अंगानी टिपनी सह हा महाग्रंथ मांडला आहे .विदवानापासून विदयार्थापर्यन्त आवडेल अश्या ग्रंथाची रचना केली .
        संत तुकाराम,गौतमबुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषांचे चरित्र सर्वप्रथम मराठीतून लोकासमोर मांडले .
पुढे हेच गुरुजींचे बुद्धचरीत्र बाबासाहेंबांच्या जीवनातील प्रेरणादायी भाग ठरुन ऐतिहासिक क्रांती घडवून गेले .
१८९६ साली  पद्य स्वरुपातील तुकोबांचे र्चारत्र जगासमोर मांडले.
        तात्कालिन उपलब्ध इतिहास साधनांचा अभ्यास करून १९०६ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे  विस्तृत स्वरूपात ,क्रमवांर घटनासह अभ्यासपूर्ण असे चरित्र लिहून काढले .
     या ग्रंथासाठी श्री छत्रपती शाहू महाराज सरकार ,श्रीमत महाराज बापूसाहेब कागलकर,श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड या ग्रंथासाठी उदार आश्रय दिला .इंदूरचे श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांनी या शिवचरित्राच्या ४००० प्रति खरेदी करुन जगभरातील ग्रंथालयाला वाटप केल्या .शिवराय जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचविले .१९२० साली या ग्रंथाची दुसरी आवृती प्रकाशित झाली .
         या महान कार्याला मानाचा मुजरा !
   आपण नककीच हया दुर्मिळ,अभ्यासपूर्ण साहित्याचा लाभ घेऊन महान युगपुरूषांची चरित्र जाणून घ्यावी ही अपेक्षा .

जय जिजाऊ

संजय खांडवे

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे

जागतिक आदिवासी दिवस










आज जागतीक आदिवासी दिवस
विश्वाची निर्मिती कशी झाली ,माणूस कसा तयार झाला याबाबत असंख्य संशोधने आहेत ,संकल्पपणा आहेत पण या पृथ्वीवरील पहिला मानवी वंश विकसित होत समुहाने राहू लागला तो म्हणजे आदिवासी !
 मातृभूमीत आपल्या मातीशी एकनिष्ठ असलेला समाज !
महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पसरलेल्या भव्यदिव्य अश्या सहयाद्रीमध्ये  पदभ्रमंती करत असतांना नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात ,नेम राजुर परिसरात तीन दिवस भ्रमंती करतांना आदिवासी समाजातील क्रांतीकारी क्रांतीवीरांचा अपरिचित इतिहास प्रथमच स्थानिक व इतर संदर्भतून कळाला .पराक्रमी व वैभवशाली इतिहासापासून आपण अनभिज्ञ राहिलो याची जाणिव मात्र नककीच झाली .
    आदयक्रांतीवीर राघोजी भांगेरे यांची मातृभूमी म्हणजे हा परिसर ,कळसूबाई परिसरातील देवगाव हे त्यांचे जन्मगाव .
रमाबाई व रामजी यांच्या पोटी राघोजीचा जन्म झाला ,बालपणापासूनच विविध शस्त्र चालविण्यात त्यांना त्यांच्या वडीलांनी पारंगत केले होते .त्या परिसरातील डोंगरदऱ्या, गड कोट,कातरकडा,वाटा,पडवाटा ,गुफा आदि राघोजीनी बालपणीच पिंजून काढल्या होत्या .
    क्रांतीकारी विचारांची बीजे आपल्या मनात घेत ,स्वराज्याचा विचार म्हणजे स्वाभीमान बाळगणारा हा मावळा आपल्या मातृभूमी व माणसे यांच्या रक्षणार्थ सज्ज झाला होता .उंचपुरे पिळदार शरीर ,धारदार डोळे ,शञूला पाहूनच धडकी भरायला लावणारे होते ,नुसत्या नावाने थरकाप उडायचा असे व्यक्तीमत्व !
       "इंग्रजांचा येथे अधिकार नाही ,ही मावळी मायभूमी आहे आमची तिच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे " 
पारतंत्र्याच्या जोखंडाला उलटविणारा हा क्रांतीकारक होता . जीवाला जीव देणारे साथीदार म्हणजे घेवाजी आव्हाळ,बाळा ठाकूर,धर्मा मुंडा,राया ठाकर,शिवा न्हावी,जाणकु धौंडगा,अंतोबा लाटे ,खंडू साबा,देवाजी नाना अशी कितीतरी क्रांतीकारकांची नावे स्थानिक पटा पटा सांगत होती .
    रतनगडावर राघोजीने पहिले बंड केले .जुलमी सरकार व सावकाराविरोधात राघोजी व त्यांच्या साथीदारांनी पहीले बंड केले .राघोजी कुणावरही अन्याय होऊ नये या मताचा होता .स्त्रियाबद्दल त्याच्या मनात अत्यंत आदराची भावना होती .त्या परिसरात राघोजीचे शौर्य व कार्य दुमदमू लागले .

राघोजीने केला बंड
बागडीच्या पाण्यापाशी !

हे गाणे गुणगुणले जाते .बागडीची माची त्या परिसरात प्रसिद्ध आहे .उंच अश्या भव्य डोंगरावर हा सपाट भाग ,या ठीकाणी गुरे चरायला असतात .त्या ठिकानी असलेल्या गुहामध्ये राघोजी व त्यांच्या सहकार्याचे वास्तव्य होते .इंग्रजाना अश्या ठिकाणी पोहचणे फार कठिण ! ही जागा त्यांच्या वास्तव्यासाठी त्यांनी काही काळ निवडली .त्या माथ्यावर वर्षभर पिण्याचे पाणी त्या बागडीत असते .बागडी म्हणजे भांडे ,भाडयासारखा तो पाणी साठविण्याचा भाग  त्या माचीवर आहे .याच ठिकाणाहून त्यांनी इंग्रजाविरूद्ध,जुलमी सावकाराविरूद्ध  बंड पुकारले .
     त्यांचा तळकोकणातील प्रसंग,गौरीपुरी येथील इंग्रजांच्या छावणी वरील हल्ला ,नाशीक हवेली वरील आदी प्रसंग स्थानिक सांगतात .सामान्याच्या न्याय हककासाठीचे हे कार्य दिसून येते .
     त्यांचा बुधा नावाचा साथीदार इंग्रजांनी पकडले होते ,रघुजीचा पत्ता सांग त्यांना पकडून दया यासाठी पाच हजार देऊ केले .नाहीतर गोळया खा अशी धमकी दिली .जीवाचा जीवलग इंग्रजांना उंच टेकडी कडयावर घेऊन गेला व वरुन शेकडो फुट दरीत उडी मारून मृत्यु पत्कारला पण दगाबाजी केली नाही .या मातीला राघोजीची गरज आहे याचे भान या बुधाजीला होते .अशी माणसे तयार केली राघोजीने .
   सातऱ्याचे प्रतापसिहराजे भोसले यांनी राघोजीचे कार्य बघून त्यांना सातऱ्याला आमत्रित केले .त्यांना शस्त्र सैन्य आदीची मदतही केली होती त्यांचा आदर सत्कारही केला होता.
     १८४५ साली जुन्नर येथे इंग्रजाविरूद्ध  उठाव केला यात मुंबई प्रांतापासून इंग्रजांनी दखल घेत १०००० सैन्य तोफगोळयासह राघोजी व त्यांच्या सहकार्या विरोधात उभे केले .मैदानी भागात आल्याने त्यांचे असंख्य साथीदार मातीसाठी कामी आले .हतबल होऊन राघोजीनी त्या ठिकाणाहून आपली सुटका केली .पुढे गोसाव्याच्या वेषात भूमीगत राहून आपले कार्य सुरू ठेवले .इंग्रज त्यांच्या मागावर सुरुच होते .त्या भागातील अनेक गडाच्या पायऱ्या इंग्रजांनी ब्लास्टीग करून उडविल्याच्या खुणा आहेत .आजही अंनंद,मदन,कुलंग यासारख्या गडावर सामान्य माणूस सहज जाऊचं शकत नाही .
        ह्माच स्वातंत्र्यंच्या लढाईत ,भूमीगत असतांना इंग्रजांनी पढ़रपूर येथे राघोजीना कैद केले .एकतर्फि निर्णय देत त्यांना फाशी सुनवली .२ मे १८४८ ला आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे या मातीसाठी शहीद झाले .

आज ऑगष्ट् क्रांती दिवस ,भारतीय स्वातंत्र्य लढयाचे रनशींग फुकले गेले या लढयात कामी आलेल्या हुतात्माना नतमस्तक होण्याचा दिवस !
   तसाच जागतिक आदिवासी दिवसह आजचं !
आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे सारखे त्यांच्यासोबत लढणारे असंख्य आदिवासी बांधव या मातीच्या प्रेमापोटी आपला स्वाभिमान जपत अमर झाले ,त्यांच्या कार्यासही सलाम !

संजय खांडवे
बुलढाणा



प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...