शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

आमच्या लेखणीस धार आली.......

 आमच्या लेखणीस धार आली.......



जिजाऊ रथयात्रा २०२५ विशेष



प्रियः प्रजानां दातैव  न पुनर्द्रविणेश्वर: ।

आगच्छन्काड्र.क्ष्यते   लोकैर्वारिदो  न वारिधिः।


         छत्रपती संभाजी राजे आपल्या प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.

       आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ.

         कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश सेवा संघाने पुढे चालवला .

*"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा.*

      मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला.शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. मराठा सेवा संघ हे एक विचारांचे संघटन असल्याने मानवतावादी मूल्य रुजविण्याचे कार्य न्याय , स्वातंत्र्य , समता व बंधुता हा महामानवांचा विचार प्रबोधनाचा जागराचे शिवकार्य  गेल्या अनेक वर्षापासून करत आहे . चिकित्सक व विवेक बुद्धीचा वापर करण्याची सवय असल्याने महाविद्यालयीन काळापासून  आमच्या सारखे नवतरुण सपूर्ण महाराष्ट्र भरातून पहिल्या जिजाऊ रथ यात्रेत मोठ्या संख्येने जोडल्या गेलो. आपल्या विचारधारेची आपली माणसं आपल्या महापुरषांच्या सत्य विचारांच्या पेरणी साठी सोबत असतांना पाहून अधिकच बळ आले . त्या काळात तरुणांमधील  वैचारीक प्रबोधनाचा आलेख चढता होता . सामाजिक माध्यमे नसल्याने वाचनाकडे कल अधिक होता .

"आता आमच्या धडावर आमचेंच डोके असेल"

वीस वर्षापूर्वी हे पुस्तक आमच्या वाचण्यात आले अन खऱ्या अर्थाने आमच्या विचार करण्याच्या शैलीत अधिकच बदल झाला .अन जीवनाकडे चिकित्सक दृष्टीकोनाने बघु लागलो .प्राचिविदयाप्राप्त,संस्कृतचे गाढे अभ्यासक,जगातील जवळपास सर्व सस्कृतींचे अभ्यासक,संत साहित्यावर अगाध लेखन असलेले  ऋषीतुल्य डॉ आ . ह . साळुंखे   सरांचे "विद्रोही तुकाराम " वाचले व विद्रोहाचा अर्थ समजला,जगतगुरुचे सपूर्ण जीवनचरित्र कळाले व तुकोबाच्या या पुस्तकाने माझ्या वाचनछंदाला बळ मिळाले . आज त्यांनी सांगितलेले शब्दरुपी धनाने कुबेराचा शेजारीच झालो की काय अस कधी कधी वाटत अन शब्द रुपी शस्त्रे सदैव सत्याच्या लढाईत सोबत आहेत . रोज लेखणरूपी तलवार घासण्याचे काम याच विचार धारेतून मिळाले .


सांगावे ते बरे असते हे पोटी ।

दुःख देते खोटी बुद्धी मग ॥

आपला आपण करावा वेव्हार ।

जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥  

     गाथेतून ही वैचारिक ताकद मिळणे सुरु आहे.

     "बळीवंश" मधून तर आपली ५००० वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती सरांच्या गाढया अभ्यासातून,आपण कल्पणाही करु शकत नाही येवढी मेहनत ,संस्कृतचे गाढे अभ्यासक ,सर्व प्राचीन ग्रंथाचे अभ्यासपूर्ण विवेचन करुन केलेली मांडणी विचार करायला लागणारी आहे

  "पुस्तक लिहतांना सरांनी वापरलेली सदर्भ सूची ,ग्रंथ याचेच एक पुस्तक बनते हे महत्वाचे "

      जाणण्याची इच्छा ही जीवन अधिक सुदर बनविते हे यातूनच कळाले .

         सरांनी मांडलेले चार्वाक समजून घेतांना सर्व सदर्भ जुळत गेले ,अन चार्वाकापासून वैचारिक प्रवासाला सुरूवात झाली आणि ती शिव - शाहू - फुले अन बाबासाहेबापर्यन्त आम्हाला कळाली . आ ह सरामुळे तर लाखों बहुजनांना  खऱ्या अर्थाने तथागत कळाले " सर्वोत्तम भूमीपूत्र गोतमबुद्ध"

या पुस्तकामुळे आम्हाला बुध्दविचार कळाले येवढच नाही तर बुद्धसाहित्य जाणण्याची ओढ वाढली. त्यांनी विचारांची चिकित्सा तर केलीच पण  त्या चिकित्सेची चिकित्साही केली व त्याचे लिखान सर्वापुढे मांडले ,बहुतेक लेखक लिखान करतात व त्यावर केलेली चिकित्सा मात्र त्यांना मांडता येत नाही ,उत्तरे देता येत नाही ,सदर्भही जुळत नाही. 

" देव माणता की नाही याही पेक्षा माणूसपण जपता की नाही हे महत्वाचे "

        जगत असतांना ही "माणूसपणाची शिकवण व उच्चकोटीतील नम्रपणा " सरांचे अगाध साहित्य सांगून जाते . त्यांच्या ह्या आदर्शातून आमच्या सारख्यांच्या लहान - लहान लेखणीच्या तलवारी रोज घासण्याच बळ मिळत राहते . कॉम्रेड शरद पाटलांच्या साहित्याची ओळख झाली अन समजून घेण्याचे काम आम्ही करतोय .प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळचं  होते . त्यांच्या समग्र साहित्यातून डोळ्यात अंजन घातल्या गेले .प्रा डॉ अशोक राणा सरांच्या सहवासात तर मिथकशास्त्र समजून घेऊन आम्ही त्यावरही लिहायला शिकलो . मंदिर, लेणे  अन गडकोटाची ओढ लागून जतन अन संवर्धनाचं महत्वही कळाले . मुलुख मैदानी तोफ गंगाधर बनबरे सरांकडून परखडपणा व चळवळीतील सातत्य शिकलो . अनेक चांगली माणसे भेटत गेली .हे केवळ घडलं क्रांतिपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी उभारलेल्या मराठा सेवा संघाच्या वटवृक्षामुळेच ' ! स्वराज्यजनि राजमाता व महाबली शहाजीराजे यांच्या त्याग व संघर्षातून विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार आहे . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघाने आकार घेत देशभरात या विचाराने अनेक मोठी माणसे घडविली

त्यांना  लढायला शिकविले......

सत्यासाठी.....

वाचायला शिकविले....

चिकित्सेसाठी.......

बोलायला शिकविले .....

न्यायासाठी.......

आज जिजाऊ रथ यात्रेच्या निमित्ताने " मराठा जोडो अभियानातून " सर्वांनी सर्व अंगाने एकत्र यावे हीच अपेक्षा .


 



संजय खांडवे

बुलढाणा जिल्हाध्यक्ष  इतिहास कक्ष मराठा सेवा संघ

9011971122

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...