सोमवार, २२ जानेवारी, २०२४

जगतगुरू तुकोबाराय -जयंती विशेष

 जगतगुरू तुकोबाराय -जयंती विशेष




  




भक्ती चळवळीचा पाया महाराष्ट्रातच घातला गेला.भारतात ही चळवळ दक्षिणेकडून उत्तरेकडे कालांतराने सरकत गेली .पुंडलिकाची विठ्ठल भक्ती सर्वश्रृत आहे .अनेक अभ्यासकाच्या मते पुंडलिकाचा कालखंड काढता आला तर वारकरी पंथाचा उदय काळही समजेल .कृतयुगातील हरी,त्रेतायुगातील राम,द्वापरातील कृष्ण हे तिन्हीमिळून साकारलेल्या कलयुगीचा समचरणी विटेवरी उभा असलेला, सर्वाभूती समदृष्टी असलेला विठ्ठल हे वारकरी पंथाचे वैष्णवांचे एकमेव दैवत होय . संतशिरोमनी नामदेवांनी  पंढरीचे वर्णन करतांना म्हटले आहे




 "जेव्हा नव्हते चराचर |तेव्हा होते पढ़रपूर ॥








या पूर्वी विठ्ठल उपासना होत होती विठ्ठल संप्रदायही होता पण संघटीत पध्दतीने वारी करण्याची वारकरी परंपरा संत नामदेव,संत ज्ञानेश्वर यांच्या काळात सुरु झाली .पुढे संत एकनाथांच्या भारुड,किर्तनातून व संत तुकारामाच्या अंभगातून हा विठूरायांच्या वारकरी प्रबोधनाचा मेळा अखंड सुरू होता .संत बहीणाबाईच्या नुसार या वारकरी भक्ती परंपरेचा कळस  तुकारामांच्या रूपाने पूर्ण झाला . तुकारामांच्या गाथेतून भागवत धर्माचे सार सोप्या भाषेत जनमानसात पोहचले.जगण्याचे सार सांगणारी व जगण्याचं बळ देणारे तुकारामांचे जीवनही तेवढेच संकटमय होते .त्याच्या आयुष्यात त्यांनी असंख्य घाव सोसले ,आत्मकेद्री व चिंतनशील तुकारामांनी समाजाप्रती आपले आयुष्य वाहीले होते .स्वतःच्या संसाराबरोबर समाजाच्या संसारासाठीही तुकाराम महाराज जगले .बोल्होबा व कनकई यांच्या पोटी तुकारामांचा जन्म झाला .सावजी व कान्होबा हे त्यांचे बंधू .देहू परिसरातील एक प्रतिष्ठीत धनधान्य सपन्नता त्यांना लाभलेली होती.१३ वर्षाचे असतांनाच त्यांचे लग्न झाले  वडील लवकरच वारले पाठोपाठ आई सुद्धा त्यांना सोडून गेल्या . त्यावेळी तुकारामांचे वय १७ -१८ वर्षाचे होते .त्यांच्या पत्नी रखमाबाई  हया दम्याच्या आजाराने लवकरच गेल्या .त्यांचा मुलगा संताजी सुद्धा आजारपणातच गेला .त्याच वेळी त्यांचे मोठे बंधू सावजी यांच्या पत्नी सुद्धा गेल्या यामधे सावजी घर सोडून गेले .हा सर्व दुःखाचा डोंगर तुकारामांच्या सुरूवातीच्या आयुष्यातच त्यांच्यावर कोसळला.जगण्याचा मंत्र देणारे तुकाराम महाराज कधीही डगमगले नाही.आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेने सांभाळली .त्यांच्या डोक्यात कधी नकारात्मक विचार आलाच नाही .त्याच काळात प्रचंड दुष्काळही पडला होता .तत्कालीन धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक व राजकिय समाजजीवनाचा अभ्यास तुकारामांना होता .बुडणाऱ्या समाजाला जर वाचवायचे असेल तर मला काहीतरी केले पाहिजे नव्हे तर करावेच लागेल ही भावना त्यांची होती .तुकारामांना अवघे  ४२ वर्षाचे आयुष्य लाभले .त्यांचे चरित्र हे सदैव प्रेरणादायी ठरते.धर्मशास्त्र,वेद,पुराने आदिची चिकित्सा करून मानवजातीच्या कल्याणार्थ आदर्श समाजरचनेचा पाया त्यांनी जगासमोर मांडला .त्यांच्या अभंग गाथेतून मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक मुद्दा साध्या व सोप्या भाषेत हातळला गेला.मानवी जीवनात सार्वकालिक मार्गदर्शक ठरणारे विचार या गाथेतून तुकारामांनी मांडले .संत तुकारामांचे अभंगशतक या पुस्तकातुन आईवडील,संत,संगत,हितासाठी उपदेश,शब्द,अनुभव,चमत्कार,संसार,शेती,प्रयत्न,आघात,सत्य,शुद्धता,नम्रता,क्षमा,शांती,प्रसिध्दी,किर्ती,मन,आनंद या विषयावर आधारीत त्यांचा गाथेतून निवडक १०० अभंगांचे विश्लेषण डॉ आ ह साळुके सरांनी त्यांच्या समपर्क भाषेतून केले आहे.शब्द हेच धन,शस्त्र तुकारामांनी तत्कालीन शोषण व्यवस्थेवर थेट पणे प्रहार केलेला दिसतो .तुकोबांनी मांडलेला एक एक शद्ब या स्वातंत्र्य युद्धातील एक एक शस्त्रच होते .व त्यांनी मांडलेला एक एक शद्ब म्हणजे समाजाच्या नव्या रचनेसाठी काळजीपूर्वक ठेवलेला एक एक वीटही होता असे डॉ आ ह साळुके सर मांडतात .त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे एक पुस्तकच म्हणावे लागेल .आज आमच्या सारख्या नव वाचकांना तुकारामांच्या अभंगाची गोडी डॉ आ ह साळुंखे सरासारख्या महाविद्वान विचारवंताच्या लेखनातून झाली .विद्रोही तुकाराम या माध्यमातूम तुकारामांचा विद्रोह कळाला.अलिकडच्या काळात विजय गवळी सरांच्या तुकास्त्रामधून अधिकच तुकाराम जवळचे वाटू लागले .गाथा परिवारातील उल्हास पाटिल सरांचे अभंगानुसार प्रत्येक अभंग कसा सार्वकालिक आहे आजही तो आधुनिक समाजव्यवस्थेत कसा लागू पडतो हे उल्हास पाटील सरांच्या विश्लेषणावरून लक्षात येते .या ना त्या कारणाने संत तुकाराम जवळचे वाटू लागतात त्यांचा संघर्ष आजही आपला संघर्ष वाटू लागतो .त्यांचा विद्रोह हा आजही आपला विद्रोह वाटून त्यांच्या विचारांचा अनुयायी बनण्याची प्रेरणा देत राहतो .सर्व जाती धर्माच्या माणसाला संतपदापर्यन्त नेवून पोहचविणारे ; अध्यात्मीक लोकशाहीचा पाया रचणाऱ्या व आपल्या संस्कृतीचे प्रातिके निर्माण करणाऱ्या वारकरी सप्रदायात तुकारामांची गाथा मैलाचा दगड ठरते .




        का जुळते ही नाळ तुकारामांशी ? का भिडतात त्यांचे शद्ब त्रीक्ष्ण हत्याराप्रमाणे ?का वाटत नाही भिड भाड प्रश्न विचारायची ?का गळून पडतो अहंकार ?




का आग्रह धरावासा वाटतो सत्याचा ?




का वाटू लागतात वृक्ष वेली आपली सगी सोयरी ? असे ना ना विध प्रश्न पुढे उभे राहतात प्रत्येक अभंग एक तरी प्रश्न पुढे उभा करतो व ते हयदयाला भिडतात .








  सिद्धीचा दास नव्हे श्रृतीचा आंकिला । होईल विठ्ठला सर्व तुझा ॥




कोणत्याही बाहय शक्तीच्या अधिन न जाता ,अंकित न होतां सर्वशक्तीमान अश्या विठ्ठलाचा पर्याय सामान्याला देतात .कोणत्याही पाप पुण्याचे भय विठोबा समोर त्यांना राहीले नव्हते. पूर्ण पणे विठ्ठला।ला स्वाधिन झाल्याने कशाचेही भय उरले नव्हते .सावळे रूप डोळ्यानी पहावे ,देच सहा शास्त्रे ,चार वेद व अठरा पुराने यांचे सार आहे.शास्त्राचे सार आणि वेदांची मूर्ती असलेला ईश्वर हा माझा प्राणसखा सांगाती आहे .म्हणून मला इतर कोणाची इच्छा नाही ,विठ्ठलाच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवणें हाच माझा धर्म व हीच अवघी निती होय . या वारकरी चळवळीत आपल्या कुटुंबाची सेवा व रक्षण करणे हे विठ्ठल उभारणीचे एक कारणच म्हणावे लागेल .समचरणी उभा असलेला विठ्ठल हे समतेचे तत्व आहे.एकादशी,कार्तिकी ,आषाढीला एकत्र येणे ही अध्यात्मीक लोकशाहीची बांधणीच आहे.समतेची भगवी पताका ही त्याचे प्रतिकच आहे.या सामाजिक व सास्कृतिक लढयात साक्षात देवांनाही प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य निर्माण करुन ईश्वराच्या वर्तनालाही नैतीकतेची कसोटी लावली . त्याच परंपरेने वेदांनाही आव्हाण दिलेले आहे .








वेदांचा तो अर्थ आम्हाची ठावा । येरांनी वाहवा भार माथा ॥








या नंतर तुकारांमांना कोणत्या प्रसंगाना सामोरे जावे लागले तो वेगळा भाग आहे त्याचे विवेचन स्वतंत्र होऊ शकते .




      आता आम्हा भय बा कोणाचे ।




बळ विठोबाचे आले ऐसे ।।




  




 कुणाचेही भय न बाळगता सर्व सामान्याना  कोणत्याही आडकाठी न ठेवता सहज भेटणारा विठ्ठलाचे बळ त्यांच्यात निर्माण झाले .कोणत्याही मूर्तीपूजेचा आग्रह न धरता निर्गुण भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.निर्गुण भक्ती  म्हणजे कुणीही केवळ गंध टिळा लावून नामस्मरण केले तरी तुम्हाला परमेंश्वर भेटू शकतो .कुणीही सान थोर न ठरता समतेची मांडणी करुन आपला व्यवसाय व कुटुंबाचे पालन निष्ठेने करत  ह्या भक्तीमार्गात दृढता निर्माण केली.








कासाया एकांत सेवू वाडा ।




आनंद जो जनामाचि असे ॥








मी जंगलात,वनामधे एकटा राहुण काय करणार आहे ?माझा खरा आनंद माझ्या कुटुंबात, माझ्या समाजात ,माझ्या लोकात राहून त्यांच्या साठी झिजण्यात आहे हा निर्गुण भक्तीचा आदर्श त्यांनी घालून दिला .








योग तप याचि नावे ।




गळीत न्हावे अभिमाने ।।








कोणत्याही प्रकारचे बडेजावपणा न करता योग आणि तप कशाला म्हणायचे तर अहंकार गळून पडतो तोच योग व तप आहे येवढया तोडक्या शद्वात अलौकिक वाटणाऱ्या संकल्पणा तुकारामांनी जन सामान्यात मांडल्या आणि त्या त्याच्या पर्यन्त अभंगाच्या रूपाने पोहचविल्या .हीच भावना सामान्याच्या हयदयात आजही भिडलेलीच आहे .या पवित्र मातीत अशी कुठली जागा नसेल ,त्या ठिकाणा पर्यन्त तुकारामांची  शब्दवाणी  पोहचली नसेल .चराचही  उत्साहाने आज त्यांचे अभंग व्यक्त होतांना जाणवतो .तुकारामांची गाथा बुडविणाऱ्या हातांनी आणि त्यामागच्या शक्तीनेही  कधी  गाथा बुडवत असतांनाही विचार केला नसेल ! आज या मातीत जगतगुरुच्या रूपाने संत तुकाराम वास करत आहे.




       जनमानसात ,घराघरापर्यन्त पोहचलेले अन मुखोतगत झालेले तुकाेबांचे अभंग हाच  परिवर्तनासाठी सर्वात सोपा मार्ग वाटतो,प्रत्येक घरात  जगतगुरू तुकाेबांची गाथा असणे अत्यंत आवश्यक वाटते,तुकोबांची शब्दरत्ने ही खूप महत्वाची मानवी मूल्ये ,नैतिकमूल्ये जपणारी आहेत ,अगदी जन्मापासून मृत्युपर्यन्त जीवनातील प्रत्येक पैलूवर अगदी निर्भिड भाष्य आढळते .




        आजच्या काळात माणूस परिर्वतन आपल्या सोईने स्वीकारतो व घोळ होतो,सुईच न घेता सोईच स्वीकारतो आधुनिकतेच्या गप्पा मारणारे आपण आपल्या मूळच्या आदर्शोंना विसरतो,वास्तवतेला विसरुन कल्पना विलासातील बाबी खऱ्या मानायला लागतो मग श्रद्धा-अंधश्रध्देचा घोळ होतो . मानवी स्वभावच असा आहे की तो अदभूत,विलक्षण,चमत्कारीकबाबीकडे वास्तविक गोष्टीपेक्षा अधिक आकर्षित होतो व त्याच्या कुतुहलाच्या कल्पनाविलासात गुंग होतो .तुकाेबांचा गाथेत वास्तविकता आहे ती समाजाभिमूख ,विज्ञानवादी मन मनाला भिडणारी आहे .




      जगतगुरू तुकोबांचे सपूर्ण चरित्र हे प्रेरणादायी आहे.आज जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या आदर्शाना जपू या ! विचारांच्या रूपाने जीवन सार्थकी करणाऱ्या तुकारामांच्या गाथा ह्या प्रत्येक कुंटुंबात पोहचवू या ! एक नवा संकल्पाने जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंती सोहळा घराघरात या वर्षी पासून साजरा करू या !
















संजय खांडवे




9011971122

मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता

 मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता




🚩🚩🚩🚩🚩🚩




आपल्या महाराष्ट्राच्या या  शौर्य भूमीकडे शिवजन्मानंतर पुढची दिडशे वर्ष तरी वाकडी नजर करण्याची कुणाची मजल झाली नाही,ज्याने हा प्रयन्त केला त्याला याच मातीत दफन व्हावं लागलं हा या मातीचा इतिहास आहे .शेकडो वर्षानंतरही स्वातंत्र्याची ज्योत आपल्या हयदयात तेवत ठेवत रयतेच्या कल्याणार्थ यदु- भोसलेवंशीय या स्वांतंत्र्य संग्राम आपल्या परिने लढत होते.रयतेच्या कल्याणाची भावना व या भूमीविषयीचा आदर हा त्यांच्या चरित्रातुन वारंवार जाणवतो.तत्कालीन परिस्थितीनुसार आपली बुध्दीमत्ता,शौर्य,स्वाभिमान, त्याग,संघर्ष,पराक्रम या जोरावर दोन्ही वंशीयांनी आपले अस्तित्व दाखवत एक दरारा निर्माण केला होता .या विषयावर मातृतीर्थ बुलढाणा जिल्हयाचे इतिहासकार श्री संतोषराव बाहेकर सर यांनी जाधव_भोसले घराण्याचा सखोल अभ्यास करून राजे लखुजी जाधवरावा सह महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचे चरित्र आपल्या अखंड परिश्रमातून जगासमोर आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.जाधव -भोसले वंशातील आजपर्यन्त ज्ञात नसलेल्या वीरांचा इतिहास सरांच्या लेखणातून आमच्यासारख्या वाचकांना कळाला या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जुन वाचावा.




       खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याची पाया भरणी या दोन वंशीयाच्या त्याग व संघर्षात दिसते .मनात स्वाभिमान जागृत ठेवत त्यांच्या नेतृत्वात याच मातीतील अनेक ज्ञात-अज्ञात नरवीरांनी आपले बलीदान दिले.




बाबाजीराजे भोसले यांच्या वंश बेलीत त्यांना मालोजीराजे व विठोजी राजे हे दोन पराक्रमी पुत्र होते.मालोजीराजे यांचा विवाह फलटणचे देशमुख जगपाळराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई यांच्याशी झाला .मि.किक्रेड व रा ब. पारसनीस शेडगावकरांच्या बखरीनुसार असे म्हणतात की ,लखुजीजाधवरावांच्या शिफारशीवरून जगपाळरावाने आपली बहीण दिपाबाई मालोजीराजास दिली होती .त्यांच्या पोटी शहाजी व शरीफजी या पराक्रमी वीरांचा जन्तम झाला .विठोजीराजे यांना सुध्दा कर्तबगार आठ पुत्र होती .




     जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते.हेमाद्रिकृत व्रतखंडातील राजप्रशस्ती मधील यादवांची वंशावळ इतिहासकार श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या आधिकच्या संशोधनातून मांडलेली आहे .




जाधव, आदय देवगिरी घराणे




रामदेव यादव 




शंकर देव (मृत्यु १३३२)




गोविंद देव(१३१२-१३८०)




 ठाकूरजी (१३८० -१४२९)




भुकण देव उर्फ भेतोजी (१४३०-१५००)




 अचलकर्ण उर्फ अचलोजी(१५००-१५४०)




विठ्ठल देव उर्फ विठोजी(१५४० -१५७०)




लक्ष्मण देव उर्फ लखुजी(१५७०-१६२९)




   सिंदखेडराजा ही जाधवांची  राजधानी या ठिकाणी त्यांनी भव्य वाडयाचे निर्माण केले .या परिसरात अनेक पेठा वसविल्या .निळकंठेश्वर ,रामेश्वर,केशवराज आदि मंदिराचा जिर्णोद्धारासह अनेक लोकउपयोगी कामे केली .रंगमहाल,नृत्यमहाल आदि वास्तूची निर्मिती केली,साहित्य ,कला,स्थापत्य यामधे त्यांना ज्ञानासह रुची होती हे यावरुन दिसते .एका स्वतंत्र राज्याची ही नांदीच होती . २४००० पायदळ ,१५००० घोडदळ व ५२ चावडयांचे वतन पुढच्या काळात लखुजी राजे जाधवांनी स्वकर्तुत्वावर उभे केले होते.   




राजे लखुजी व म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ ला जिजाबाईचा जन्म झाला .




       भोसले -जाधव या दोन घराण्यामधील कर्तबगार वीरांनी त्या काळच्या सामाजिक,आर्थिक,राजकिय व वास्तव परिस्थितीचे भान ठेवत आपला स्वाभीमान राखत वाटचाल केलेली दिसतें.या सर्व बाबी जिजाबाईनी अगदी जवळून अनुभवलेल्या होत्या.




      महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाबाई यांचा विवाह हा मध्ययुगीन इतिहासाला वळण देणारा ठरला.वेरुळचे भोसले व सिंदखेडचे जाधव हे दोन्ही तुल्यबळ मराठा घराणे होती .या विवाहाने दोन्ही कुटुंबात आनंद व उत्साह होता .प्रामुख्याने या विवाहसंमधी उत्तरकालिन लिखानामधे शहाजी -जिजाबाई यांच्या विवाहातून जाधव -भोसले वैराची कथानके सांगितली गेली .रंगपंचमीच्या दिवशी या दोघाचा विवाह बाबत दरबारात मालोजी राजेनी घोषणा केली होती व विवाह निश्चित केला पण याला जाधवाकडील स्त्रीयांनी लखुजीराजे सोबत ते आपल्या तोडीचे नाहीत असा वाद घातला व दुसऱ्या दिवशी लखुजी जाधवांनी आपण सहज बोललो असे मालोजीस सांगितले.पुढे मालोजीस व विठोजीस नोकरीवरून काढले व ते वेरुळला परत गेले .तेथे त्यांना गुप्त धन सापडले .त्यामधून त्यांनी  आपली फौज जमवली व सिंदखेडला येऊन विवाहाचा दावा केला .यापुढे त्यांनी निजामाचेही लक्ष वळवून विवाहासाठी दबाव आणला  व हा विवाह पार पडला पण या कथानकाला काही अर्थ उरत नाही हे लिखान उत्तर कालिन आहे.मालोजीराजे व दिपाबाई यांच्या विवाहासाठी राजे लखुजी जाधवांनी मध्यस्ती केली नसती.यावरून  त्यांचे नाते संबध त्यांच्या तोडीचे होते असे यावरून दिसते . समकालिन शिवभारतात अशी कोणतीच कथा नाही .परमानंद या विवाहाचे खूप सुंदर वर्णन करतो .शहाजीराजांना ऊतम लक्षणांनी युक्त,दयाशील,युद्धकुशल,महातेजस्वी असे म्हणतो व जिजामातेस विजयलक्षण ,कमलनेत्रा,कुळवान संबोधतो व यासाठी कुबेरासमान लखुजीजाधवांची अनुकुलता दर्शवितो .








सा तं महाशयं प्राप्य वपुरुज्वलम्।




गंगेव गुणगंभीरा व्यराजत महोदधिम् ।।




ज्याप्रमाणे शुभ्र खोल गंगा सागरास मिळाली असता शोभते त्याप्रमाणे तेजपुंज शरीर धारण करणारी गुणवती जिजाबाई गुण गंभीर थोर मनाच्या शहाजी पतींशी संयोग पावून शोभू लागली.हा समकालिन संदर्भ आहे .या  अनैतीहासिक विवाहा प्रसंगीच्या कथानकाचा संदर्भ पुढे खंडागळे हत्ती प्रकरणाशी जोडला जातो व त्यांच्या हाड वैराच्या कथा सांगितल्या जातात .वास्तविक हत्ती प्रकरण हे तात्कालिक प्रासंगिक होते. पुढे भातवडीच्या लढाईत लखुजीराजे यांच्या भमिकेवरून हे लक्षात येते .शिवभारतकारही याचा खुलासा करतो .श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या लिखानातून विश्वसनिय संदर्भ देवून याबाबत मांडणी केली आहे. भोसले जाधव असा कोणताही वाद नव्हता हे समकालिन संदर्भावरून दिसून येते.वास्तविक पाहता त्या काळात मराठा सरदारांचा वरचढपणा हा निजाम,आदिल व मोगलशाहीमधील सरदारांना खुपत असे .मलिक अंबरसारखे सरदार त्यांचा द्वेष करत.त्यांना महत्वाच्या मोहीमेंपासून दूर ठेवले जाई .त्याच्या पराक्रमाची दखलही त्या काळात त्यांच्या लेखनकारांनी घेतलेली दिसत नाही .या संघर्षामधून ही सर्व मंडळी जात होती .




राजे लखुजी यांचे वर्चस्व पाहून ,शहाजी राजे सारखी ही दोन शक्ती एकत्र येऊ नये म्हणून की काय ,खंडागळे हत्ती प्रकरण घडविण्यासाठी हवा दिलेली असू शकते यात शंकेला वाव मिळतो .२५ जुलै १६२९ म्हणजे देवगिरीवर निजामाच्या भेटीसाठी आलेले राजे लखुजी,पुत्र अचलोजी,नातू यशवंत तथा अमात्य अशी ४० जनांची अमानवी हत्या करण्यात आली .निजामाच्या डोक्यात त्याच्या वजीराने विष कालवून हा रक्तपात घडवून आणला होता.




      जिजाबाईच्या समोर हे सर्व प्रसंग घडत होते .रयतवत्सल जाधवरावांची ही लेक भोसले कुळाची लक्ष्मी आपला वारसा पुढे तेवत ठेवत स्वराज्याची प्रेरणादायी ठरली .अर्कज्ञ,सहस्रकरविक्रम महाबली शहाजीराजे यांची संकल्पणा त्यांचा त्याग,संघर्ष,पराक्रमातून स्वातंत्र्याची पहाट होण्यास सुरूवात झाली ." शहाजीराजे भोसले यांनी एक निजामपुत्र गादीवर बसवून ,त्यास एका किल्यात बंदीत ठेवून ,नाशिक,त्र्यबकेश्वर,संगमनेर,जुन्न२,ताब्यात घेऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला होता .''असे बादशहानामा सांगतो.१६२९ ते १६३६ पर्यन्त त्यांनी हा कारभार पाहीला.




       जिजाऊमासाहैबांनी स्वराज्यासाठी दोन वीर पुत्राना जन्म दिला .या मधे थोरले पुत्र संभाजी व छत्रपती शिवाजी राजे . शिवनेरीवर १९ फेब्रु १६३० ला  हा शिवसुर्य उगवला .मातृ-पितृ तथा स्वकुलीन पूर्वजांच्या अथक संघर्षाचा ,पराक्रमाचा,त्यागाचा वारसा मातेच्या संस्कारातून सतत पाझरत होता .शिवाजी राजे वयाच्या सहा वर्षापर्यन्त महाराष्ट्रातच होते .शिवनेरी व काही काळ सिंदखेडराजा येथे माता जिजाऊंच्या संस्कारात ते वाढत होते .शिवरायांच्या जन्मानंतर शहाजीराजे यांच्या यशात अधिकाधिक भर पडत गेली .कर्नाटकात बंगलुरु येथे शिवरायांचे बालपण वयाच्या बाराव्या वर्षापर्यन्त गेले .सातव्या वर्षोच शिवबाना लिपिचे ज्ञान झाले .त्यांच्यासाठी शहाजी-जिजाऊंच्या तालमित निष्नात आचार्य नेमले गेले.राजकारण,युद्धकौशल्य या सारखी राजा होण्यासाठी लागणारे संस्कार जिजाऊ-शहाजीराजेंनी शिवबावर केले व वयाच्या १२ व्या वर्षो  शिवबा 'सनय ' होऊन महाराष्ट्रात आले असे समकालिन शिवभारत सांगतो .एका राजाला लागणाऱ्या सर्व बाबी ध्वज,राजमुद्रा,अमात्य तथा विश्वासु सेवक शहाजीराजे यांनी जिजाऊ-शिवबा यांना  पुण्याच्या जहागिरिवर पाठविले.दुसऱ्या बाजू।ला थोरले पुत्र संभाजीराजे  ,तुकाबाई व पुत्र व्यंकोजीराजे यांना सोबत दक्षिणेत ठेवले.ही खऱ्या अर्थाने जिजाऊ-शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील व प्रेरणेतील "स्वराज्य " म्हणजेच पुढच्या काळातील "मराठा साम्राज्याची" पायाभरनीच होती .स्वराज्यजननीचा हा महान त्याग होतां पती- पुत्रा पासून दुर राहून बाल शिवबाला घडवत रयतेचे राज्य निर्मायचे होते . स्वराज्यासाठी दोन छत्रपती घडविणाऱ्या या मातेचा आदर्श पुढे येसूराणीसाहेब,ताराराणीसाहेब यांनी घेतलेला दिसतो ."श्री सखी राज्ञी जयती ।"  ही शिक्का कटयार घेत आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळणारी संस्कृती आमची ,आणि त्या संस्कृतीचा वारसा त्यांना जिजाऊ मॉसाहेबाकडूनच मिळाला होता . एका छत्रपतींनी स्वराज्य उभं केल व दुसऱ्या छत्रपतींनी ते आपल्या खांदयावर शेवटच्या श्वासापर्यन्त तोलून धरलें.या पाठीमागे जिजाऊचेंच संस्कार होते .स्वराज्य स्थापनेपासून तर राज्यभिषेकापर्यन्त वेळोवेंळी मॉसाहेबांची प्रेरणा शिवरायासोबत होती. अफजल खानाच्या भेटी वेळी स्वराज्यासाठी पुत्र मोह बाजूला ठेवून छत्रपतींना विजयी आर्शिवाद देणारी राजमाता या मातीने बघीतली.....छत्रपती पन्हाळावेढयात असतांना प्रसंगी हातात तलवार घेऊन राजमाता सज्ज होतांना याच मातीने बघीतलं .......




जननी शिवराजस्य सा राजगिरी वर्धिनी।




महाराजांच्या आग्राभेटीच्या वेळी ते नजरकैदेत असतांना यशश्वीपणे स्वराज्य सांभाळण्याचं काम याच मातेने केले.....




एक लोककल्याणकारी छत्रपती  रायगडी सुवर्ण सिंहासनाधिश्वर होतांना याची देही आणि याची डोळा या मातेने बघीतले.....रायगडी छत्रपती सिहासनाधिश्वर होणे ही गोष्ट काही सामान्य नव्हती.हा शेकडो वर्षाच्या गुलामगिरीचा अंत होता ,ही एक सार्वभौमत्वाची नांदी होती नव्हे तर मध्ययुगीन इतिहासातील पहिला स्वातंत्र्य दिवसच होता .




      पुढच्या काळात या स्वराज्य रक्षणार्थ अनेक बलिदाने झाली याचे कारण एकच मॉसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आदर्श,स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण हेच आहे .यातूनच पुढे " मराठासाम्राज्य " अटकेपार गेले.दिल्लीच्या तत्खाला हलविण्याची ताकद मराठयात निर्माण झाली .




शंभूछत्रपतींनी ९ वर्ष आपल्या खांद्यावर स्वराज्य तोलून ठेवले त्यांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी आपल्या हयातीत ११वर्ष औरंगजेबास झुलत ठेवले ,रायगडावरून प्रतापगड,सज्जनगड,सातारा,पन्हाळा असा प्रवास करत छत्रपती राजाराम महाराज मोगलांना शह देत होते ,येसूराणीसाहेबांनी शंभूराजानंतर राजारामाचे मंचकरोहन केले व या मराठयाच्या राजास पकडण्यासाठी ओरंगजेबाने आपले सैन्य जंग जंग पछाडले होते




     पन्हाळगडावर राजाराममहाराज असतांना मोठया शिताफिने आपल्या अनेक सरदारासह वेषांतर करून ते जिंजीकडे निघाले




संताजी ,धनाजी,बहिजी ,खंडो बल्लाळ व आपले गुप्तहैरासह मार्ग क्रमण करत होते 




वाटेत अनेक मावळे शहिद झाले यात एका बेटावर छावणी असताना मोगलीसरदारानी (अबदुल खान)अचानक छापा टाकला  मराठयांनी जोरदार शह दिला यात मराठयाचा राजा पकडला गेला म्हणून त्यांना आनंद झाला पण तो नकली निघाला ,शिवा काशिदांसारखे एका अनामिक मावळयाचे आत्मबलिदान स्वराज्यासाठी झाले पुढे पन्हाळगड ते वेल्लोर हे अंतर ३३ दिवसात कापले 




   शिवरायांनी जिंजीचा किल्ला अभेदय करून ठेवला होता स्वराज्याची पुढची राजधानी जिंजी ,मद्रासकडील समुद्र किनाऱ्यापासून तर नाशिक पर्यन्त ,सहयाद्रीच्या कान्या कोपऱ्यात राजारामांच्या नेतृत्वात स्वराज्यच भगवं निशान फडकत होत  या काळात बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले ,।बिदनूरच्या चन्नमा राणी,मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादीनी मोलाची साथ दिली .महाराणी येसूबाई व छत्रपती शाहूनी २९ वर्ष स्वराज्यासाठी वनवास भोगला.संताजी घोरपडे,धनाजी जाधवासारखी नरव्याघ्र आपल्या पराक्रमाची शर्थ लावून लढत राहिली  .पुढची सात वर्ष महाराणी ताराराणी साहेबांनी मोघलांना सळो की पळो करुन सोडले .लाखाचा लवाजमा घेऊन येणारा इराणपासूनचा बादशहा याच मराठा साम्राज्यात हतबल होऊन संपला.




 "जिजाऊ -शहाजी राजेची प्रेरणा,शिवरांयांचे प्रजावात्सल्य म्हणजेच स्वराज्य ,आणि स्वराज्य म्हणजेच स्वातंत्र्य   पुढे ते साहित्यवीर,स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांनी आपल्या खांद्यावर पेलले या स्वातंत्र्य युद्धात छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाईसाहेब सरकार,संताजी घोरपडे,धनाजी जाधव छत्रपती थोरले शाहूराजे ,द ग्रेट मराठा महादजी शिंदे पर्यन्त त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माची मावळे या स्वांतत्र्यसमरात लढली.




अटकेपार भगवा झेंडा फडकविणारे हेच स्वराज्यजननी जिजामातेचे "मराठा साम्राज्य ".




















संजय खांडवे




9011971122

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

जिजा माऊली गे तुला वंदना ही.

 🚩🚩🚩🚩🚩🚩

*जिजा माऊली गे तुला वंदना ही......*..

🚩🚩🚩🚩🚩🚩

इसवीसनाच्या शेकडो वर्षा पूर्वी पासूनच या भारतवर्षात सोन्याचा धूर निघत होता याचे पुरावे आजही या देशात आहेत .आर्थिक समृध्दता लाभलेला आपला देश सामाजिक दृष्टयासुद्धा एकसंघ होता .कला ,साहित्य,संस्कृती यामधेही पुढेच होता .सुरत बंदर मार्गे रोम ,युरोप आदी देशासोबत आपला मसाले,हस्तीदंत या सारखा व्यापर चालत असे .आजच्या भाषेत आपला GDP ग्रेड नुसार म्हटले तर A+होता  असे म्हणावे लागेल .

       आठव्या शतकात अरबचा सेनापती महम्मद बीन कासिम च्या रुपाने झाले .त्याने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केला .इ.स़ १० व्या शतकाच्या अखेरीस महम्मद गझनी आला .१२ व्या शतकात महम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन दिल्ली जिंकली .पहील्या आक्रमणापासून ५०० वर्षा पर्यन्त लुटीचा मुख्य उद्देश ठेवत आक्रमणानी उत्तर भारत त्रस्त होता .पुढे या आक्रमणी सत्ता दिल्लीच्या सत्तेवर आल्या .देवगिरीच्या आतिक्षय समृध्द अश्या साम्राज्याचाही अस्त झाला .१४ व्या शतकात हया सत्ता पुढे दक्षिणेकडे सरकल्या .विजयनगरचे साम्राज्य लयास गेले व बहामणी साम्राज्य आले .या सर्वामधे अंर्तगत सत्ता संघर्ष सुरु झाला .उत्तरे कडे अकबर,जहागिर,शहाजहान,औरंगजेब यांचा अंतर्गत सत्ता संघर्ष सुरुच होता .दक्षिणेतही बहामणी साम्राज्याचे विघटन होऊन जसे बहामनी साम्राज्याच्या काळात देवगिरी म्हणजे आत्ताचा दौलताबाद वर त्या प्रांताचे सुभेदार त्यांनी नेमले होते ते स्वतंत्रपणे कारभार करून पुढे १४९८ च्या काळापर्यंत निजामशाहीत रूपांतरित झाले होते .अगदी तशाच वैयक्तिक महत्त्वाकांक्षे पोटी अदिलशाही,कुतुबशाही,बरीदशाही,इमादतशाही, याशाह्या अस्तित्वात येऊन संघर्ष करू लागल्या .गुलामगिरीच्या काळोखात रयत त्रस्त होत चालली होती पाचही शाह्या सत्ता पिपासून वृत्तीने आपसात भांडत होत्या . सुरूवातीला लुटीच्या उद्देशाने आलेल्या हया परकीय सत्ता येथे स्थिरावल्या व महसूली कर, जिझिया कर,सारा,खंडनी आदी माध्यमातून ह्या सत्ता शोषण करू लागल्या .जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याची क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते स्थानिक सरदारांची मदत घेत असत त्यांना चाकरीत ठे वून या कामात त्यांना स्थानिक जमीनदार,जहागीर दार त्यांच्या पदरी आपल्या लष्करी सामर्थ्यनुसार मदत करुन त्यांच्या दरबारी राहून आपल्या पदरात पाडून घेण्यात धन्यता मानत असत .

          सामान्य रयतेचे मात्र यात शोषण होत असे . शेकडो वर्षाची गुलामगिरीची जळमटे एवढी साचली की त्याचे ओझे सोसण्यातच आयुष्य संपून जात असे . सामान्य रयतेला तर वारकरी, महानुभाव, नाथ आदि संतांच्या प्रबोधन परंपरा सोडल्या तर या मातीतल्या माणसांच्या मनामध्ये कुठल्याही स्वातंत्र्याची आस उरली असावी असे दिसत नव्हते .

          याच काळात देवगिरीच्या यादव साम्राज्याचे वारस या परकीय आक्रमणा मुळे देवगिरी पासून दूर राहून मनात स्वराज्याची ज्योत तेवत ठेवून होते .जदूराय म्हणजे राजे लखुजी जाधवराव .सिंदखेडराजा येथे आपली स्वतंत्रतेचीच तयारी त्यांनी सुरु केली होती .२४००० पायदळ,१५००० घोडतळ व ५२ चावडयाचे वतन सांभाळूत रयतवत्सल राजाच्या रूपाने हे जाधवराव घराणे शेकडोवर्षापासून हिरावून घेतलेल्या या मातीच्या मुक्तीसंग्रामासाठी झटत होत . आडगाव राजा ,मेहूणाराजा,देऊळगाव राजा ,किनगावराजा या सिंदखेडराजाच्या चार दिशेला असणाऱ्या गावांना(राजा) किल्ल्याचे स्वरूप देत त्या ठिकाणी आपले मजबूत असे गडकोट निर्माण करण्याचे काम सुरू करून त्या ठिकाणी आपल्या घरातील कर्तबगार जाधव रावांना नियुक्त करत त्या त्या दिशांची जणू जबाबदारीचं दिली असल्याचे जाणवते. युद्धाचा प्रसंग ज्यावेळेस नसे त्यावेळेस ही जाधव राव मंडळी रयतेत रममान होत असे.        सिंदखेड राजा परिसरात त्यांनी अनेक लोक उपयोगी कामे केलेली दिसून येतात . याच जाधवराव कुलवंशीयांच्या समकालात महाराष्ट्रात भोसले वंशीयांची  मूळवस्ती झाली .मालोजी राजे या भोसले कुलवंशातील कर्तबगार पुरुष होते पुढे इंदापूरच्या लढाईमध्ये त्यांना वीर मरण आले त्यांच्या पत्नी दीपाबाई उर्फ उमाबाई या सती जाण्यासाठी निघाल्या त्यावेळेस विठूजींनी दीपाबाईंचे सांत्वन करून मुले लहान आहेत हे सांगून त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले होते. शहाजी व शरीफजी याच विठोजींच्या तालमीत तयार होऊन पुढे सिद्ध झाले होते. याच काळात म्हाळसाई आणि राजे लखुजी यांच्या पोटी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांनी जन्म घेतला. जाधवांच्या पदरी असलेले बजरंग भाट यांचे एक कवन उपलब्ध आहे. त्यामध्ये ते म्हणतात,


 जगदंबे कृपेने झाली मुलगी म्हाळसाबाईला।

 तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वांना।

 फसली सन १००७ पौष पौर्णिमा सूर्योदयाला।

 राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोणाला।

    12 जानेवारी 1598 रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा पौष पौर्णिमेला सूर्योदयासमयी सकाळी सहा वाजता, गुरुवारला जन्म झाला.


अगदी बालपणापासून हातात तलवार घेणाऱ्या व रयतेत रमणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना स्वातंत्र्याची प्रेरणा येथेच मिळाली. सत्य व न्यायासाठी स्वाभिमानाने लढणे त्यांना याच संस्कारात मिळाले. मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर वाटणाऱ्या या लखुजी जाधवांना जिजाई चे व तिच्या स्वाभिमानाचे नवल वाटे. अर्कज्ञ,सहस्त्रकरविक्रम ,महाबली अश्या नानाविध बिरुदावली इतिहाला ज्या शहाजीराजे यांना लावाव्या लागल्या . त्या महापराक्रमी शहाजीराजे यांच्यासोबत जिजाऊंचा विवाह झाला. 


सा तं महाशयं प्राप्य विभ्रती व पुरुज्वलम ।

गंगेव गुणगंभीरा व्यराजत महोदधिम।।


ज्याप्रमाणे शुभ्र व खोल व गंगा सागरास मिळाली असता शोभते तशीच तेजपुंज शरीर धारण करणारी गुणवती जिजाबाई या गुणगंभीर शहाजीराजास संयोग पाहून शोभू लागत आहेत असे वर्णन शिव भारतकार दुसऱ्या अध्यायात करतो.

भोसले - जाधव या कुटुंबियांच्या बाबत बखरकारांनी ऐकिव माहितीवरून अनेक कल्पित कथा रचलेल्या दिसतात. जिजाऊ शहाजीराजे यांच्या विवाहापासून अशा कल्पित कथा रचल्या गेल्या .शिवरायांच्या समकालीन शिवभारतातही बखरकारांनी दिलेल्या कथा येत नाहीत. रंगपंचमीच्या कथा कल्पित असल्याचे अभिप्राय इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे देतात. त्याच पद्धतीने मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ इतिहासकार संतोष बाहेकर यांचे "सिंदखेडचे जाधव आणि त्यांचे मराठ्यांच्या इतिहासातील कार्य'" या संशोधनपर प्रबंधामध्ये त्यांनी भोसले- जाधवां च्या संबंधावर सविस्तरपणे संशोधन केल्याचे दिसते. दोन कुटुंबातील निर्माण झालेले वितुष्ठ हे खंडागळे हत्ती प्रकरणातून झाले व त्याचे कारण तात्कालिक होते. निजाम पुत्र आपल्या मांडीवर बसून स्वतः सिंहासनावर आरूढ होऊन त्यांनी स्वतंत्र राज्यकारभार चालविला नाशिक, त्रंबक ,संगमनेर ,जुन्नर कोकण ताब्यात घेऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला होता असे बादशहानामा स्पष्टपणे नोंदवतो. शिवनेरी सह अन्य गड ताब्यात घेऊन गोदावरी ,प्रवरा, नीरा, भीमा आदी नद्या काठचा प्रदेश क्रमाक्रमाने पादाक्रांत करून सह्याद्री सुद्धा ताब्यात आणला होता. दिल्ली येथील मुघल बादशहा याने शहाजीराजे यांचे महत्व जाणून आदिलशहा सोबत करार केला व शहाजीराजे यांची रवानगी कर्नाटक प्रांतात केली.

      या  या अगोदरच्या  काळात निजामशहाच्या एका मंत्र्याने त्याचे कान भरून राजे लखुजी यांच्या विरुद्ध द्वेष निर्माण करून लखुजीराजे स्वतंत्र राज्य निर्माण करू पाहत आहे या भीतीने जाधवराव घराण्यातील राजे लखुजीरावसह त्यांचे भावंड, अमात्य आदी 40 जणांचा दौलताबाद येथे 25 जुलै 1629 रोजी निर्दयपणे रक्तपात केला गेला. प्रत्यक्ष शिवभारतात नोंद आहे की ज्यावेळी जाधव रावांचा अंत झाला त्यावेळी मेरू पर्वत जणू पडला , सूर्य जसा खाली पडला, वरुणाचा जसा दाह झाला तसा जाधरावाचा अंत अत्यंत अहितकारक झाला अशी नोंद आहे .

 स्वातंत्र्याची ज्योत या या दोन्ही घराण्यात सदैव तेवत होती . एखाद्या प्रवाहासोबत वाहत जाणे त्यांना कधी जमलेच नाही.

    या सर्व घटना आई जिजाऊंनी अगदी जवळून पाहिल्या होत्या . या दोन्ही कुळांचे संस्कार जिजाऊ वर होते . आपल्या डोळ्यासमोर वडील, भाऊ, दिर यांच्या चिता जळताना त्यांनी बघितल्या होत्या. याच धामधुमीच्या काळात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ,आई जिजाऊंच्या गर्भामध्येच संघर्षाचा काळ अनुभवत होते. हत्तीवर, गडावर, वाघावर आरोहण करावे. शुभ्रछत्राखाली सुवर्ण सिंहासनावर स्थिर बसावे. झेंडा उंच उभारावा व फडकवावा. धनुष्यबाण, भाला चिलखत, तलवार धारण करून लढाया कराव्यात व विजयश्री मिळवावी धर्मस्थापना करावी असे डोहाळे पडणे म्हणजेच  एत्तदेशीयांचे हिंदवी स्वराज्य उभे राहण्याचे संकेतच होते. शिव जन्मानंतर आई जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी बाल शिवबांना काही काळ महाराष्ट्रात आणि जवळपास बारा वर्षाचे होईपर्यंत कर्नाटकामध्ये छत्रपती होण्यासाठी जे काही संस्कार लागतात ते सर्व संस्कार बाल शिवबांवर केले म्हणजेच त्यांना "सनय" होऊन पुण्य नगरीत म्हणजेच पुणे येथे तत्कालीन राजकीय परिस्थिती नुसार जिजाऊ सह पाठविले. बेचिराख झालेले पुणे पुन्हा वसविले. लाल महाल बांधण्यात आला आणि हा लाल महाल स्वराज्याच्या स्थापनेचे क्रांतीकेंद्र ठरला. या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला तारण्यासाठी जिजाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले.आईजिजाऊ साहेबांचे स्वराज्याचे स्वप्न व शहाजीराजे यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी बऱ्याच गोष्टीचा त्याग करत योग्य नियोजनासह त्यांनी सत्यात उतरविले .ही गोष्ट काही सामान्य नव्हती .गुलामीची जाणिव करून देत ,प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान निर्माण केला .अन्याय ,अत्याचार,असत्य या विरोधात शेकडो वर्षाची मनावरील जळमटे काढून लढायला शिकवले. स्वराज्यासाठी दोन महान छत्रपती घडविले. या सोबतच लखुजीराजे यांच्या निधनानंतर त्यांनी आई म्हाळसाबाई व अचलोजी यांची विधवा पत्नी तथा त्यांचा पुत्र सृजनसिंह उर्फ संताजी याला आपल्यासोबत  ठेवले.  संताजी वर देखील आई जिजाऊंची खूप मोठी माया होती. संभाजी राजे सोबत संताजी उर्फ सृजनसिंह हे अगदी सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असायचे संताजी हा संभाजी राजे सोबत एका युद्धात मारले गेले. त्यानंतर संताजींची बायका मुलं आई जिजाऊ यांच्या सोबत होती याच संताजींचा मुलगा शंभू सिंह उर्फ संभाजी जाधव हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवाला जीव देऊन स्वराज्यासाठी लढत होता. अफजलखानाच्या प्रसंगी संभाजी जाधव यांनी शिवरायांच्या अंगरक्षकाची जबाबदारी पार पडली होती. 13 जुलै 1660 रोजी  पावनखिंडीच्या लढाईत महाराजांच्या रक्षणार्थ संभाजी उर्फ शंभू सिंह जाधव हे सिद्धी जौहरचा जावई सिद्धी मसुद यांच्यासोबत लढत असताना धारातीर्थी पडले होते. या शंभूसिंहासही घडविण्यात आई जिजाऊंचा महत्त्वाचे योगदान होतं. एवढं जाधव भोसले कुळाचं नातं आई जिजाऊ जपत होत्या. पुढील काळात धनाजी जाधव यांचे सुद्धा स्वराज्यकार्यात मोठे योगदान राहिले. संकट समई प्रसंगी हातात तलवार घेऊन त्या लढण्यासही सज्ज झाल्या.

या लोककल्याणकारी ,रयतेच्या राज्यासाठी त्या काळच्या व्यवस्थेविरुध्द रयतेची एकजूट करुन त्यांच्या मन,मस्तक अन मनगटाला बळ दिले.

          माता,मातृभूमी व माणसे हे तीन मकार लोककल्याणकारी राज्याची स्थापना करून मना मनात रुजविले . दुर्ग दुर्गेश्वर रायगडी पुत्र शिवरायांना सिंहासनाधीश्वर पाहून राजमाता धन्यता पावली.

स्वराज्यजननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.

➖➖➖➖➖➖

संजय खांडवे

बुलढाणा,९०११९७११२२

गुरुवार, ११ जानेवारी, २०२४

जिजाईस वंदितांना

 *जिजाईस वंदितांना....*


मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते.  स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही.

      मराठ्यांनी इतिहास घडविला, लिहिला मात्र नाही! मराठा आपल्या आणि आपल्या मातीचा इतिहास कधी विसरले नाही म्हणून पराक्रमांचा इतिहास घडविणे शक्य झाले. भोसले -जाधव वंशियांमध्ये प्रखरतेने जाणवते .महाराष्ट्रात इतरही घराणे होते, पण प्रश्न तोच येतो इतिहास लिहिण्याचा !अनेक पराक्रम घडले पण लेखणी आपली नव्हती, मुघलांच्या दरबारी ही व्यवस्था पूर्वापार चालत आलेली होती. तीच आदिलशाहीत होती, तीच निजामशाहीत होती. त्यांनी केलेला पराक्रम ते लिहून ठेवत परंतु मराठ्यांच्या बाबतीमध्ये हे शक्य नव्हतं. मराठ्यांचं खाणं, पिणं अन झोपणंही घोड्यावरचच! सर्व काळ धामधुमीचाच! इतिहासाच्या पानापानात हे आपल्याला जाणवते. शहाजीराजे कुठे! तर कर्नाटकात!! राजमाता जिजाऊ शिवबासह लोककल्याणकारी राज्याची घडी बसवण्यासाठी कुठं, तर पुण्यात! सुखाचे जीवन जगू शकत होते, पण रयतेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेल्या महामानवांना कुठलं सुख! त्यांचं सुख म्हणजे रयतेचे पालन हेच होते. वडील लखुजीराजे जाधवांची हीच परिस्थिती, दौलताबादी असतांना निजामशाहीच्या कपट-कारस्थानात बेसावध असतांना 40 आप्त-स्वकीय व अमात्यासह रक्ताच्या थारोळ्यात पडले, कारण एकच राजकीय स्वातंत्र्याची मशाल पेटवत स्वाभिमानाच्या लख्खप्रकाशाकडे घेऊन जाणारा या महापुरुषांचा प्रवास होता. शाह्या, पातशाहयांच्या दरबारी असलेल्या लेखनिकांनी जशी दखल मराठ्यांच्या पराक्रमाची घ्यायला हवी होती ती घेतलेली दिसत नाही. आपल्या बादशहाच्या हातचं राखून पराक्रमाची नोंद करणे हे पदरी असलेल्यांच काम! हे अनेक समकालीन नोंदी व पत्रव्यवहारावरून लक्षात येते, तेव्हाही वाघांच्या पराक्रमांच्या इतिहासाचे लेखन शिकारी करत होता.

      बखरकार आणि कथाकारांनीही बहुतेक कथानकातून तोच अन्याय केलेला दिसतो . इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास केल्यावर समकालीन असो वा उत्तरकालीन असो त्यामधील निरर्थक कल्पनेला कवडीचाही आधार सापडत नाही. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी सेतू माधव पगडी यांचे "शिवचरित्र- एक अभ्यास" हे पुस्तक प्रकाशित केले यामध्ये संपादित पहिल्या भाषणामध्ये ते म्हणतात म्हणतात "केवळ इतिहास वाचल्यानंतर तो इतिहास खरा आहे असे समजण्याची वृत्ती राहू नये, ते म्हणतात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हा इतिहास लेखक कोण आहे. हा कोणत्या वातावरणात वाढला आहे .याच्यावर कोणते संस्कार झाले आहेत. कोणत्या गोष्टीचा यांना आनंद वाटतो आणि कोणत्या गोष्टीचे याला दुःख होते. कोणत्या गोष्टी अनुल्लेखनाने तो टाळतो आणि कोणत्या आवर्जून लिहितो या गोष्टी आपण पहिल्यांदा लक्षात घेतल्या पाहिजेत". समकालीन शिवभारत, सभासद बखर पासून उत्तरकालीन मराठ्यांच्या इतिहासातील साधनांचा काही घटनांचा तर्कशुद्ध मांडणी करून उहापोह केलेला आहे .ते आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगतात की "ना मूलं लिख्यते किंचित" आधार असल्याशिवाय लेखणी उचलणार नाही हे भारतीय परंपरेचे ब्रीद आहे. वाचताना कोणतीही गोष्ट प्रमाण मानू नका तुम्ही मुळाकडे जा Rational Thinking म्हणजे तर्कशुद्ध विचारसरणी तुम्ही शिका. इतिहासकार कृष्णराव केळुसकर, इतिहासाचार्य वा सी बेंद्रे, डॉ जयसिंगराव पवार, डॉ संतोष बाहेकर ,डॉ आ ह साळुंखे, कॉम्रेड शरद पाटील या महान व्यक्तींच्या साहित्यातून इतिहासाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी निर्माण होते.

     राजमाता जिजाऊंच्या दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले. समकालीन शिवभारत या परमानंद कृत संस्कृत काव्यग्रंथाचा अभ्यास करता त्या ग्रंथात मात्र या कथा, दंतकथा येत नाहीत. भोसले -जाधव घराण्यातील बरेच लिखाण हे ऐकिव माहितीवर झाले असेच दिसते या दोन्ही घराण्यात विवाह संबंधातून वितुष्ठतेला सुरुवात झाली असे बखरकार सांगतात ,पण इतिहासकार  डॉ संतोष बाहेकर यांनी लिहिलेल्या जिजाऊंच्या चरित्र ग्रंथात केलेले चिकित्सकपणे विवेचन बखरकारांच्या लेखणीस पुराव्यासह उत्तर देतात. रंगपंचमीची कथा देखील कल्पित असल्याचा अभिप्राय इतिहासाचार्य वा सी बेंद्रे देतात. शिवभारत कार शहाजींना उत्तम लक्षणांनी युक्त, दानशिल, दयाशील ,युद्ध कुशल व महातेजस्वी असल्याचे वर्णितो . जिजाऊंना विजय लक्षणा, कमलनेत्रा गुणवान, गुणगंभीर आणि कुलवान असलेली कुबेर पुत्री संबोधितो.

         जिजाऊ विवाहनंतर भोसले कुळात आल्यावर मोठे वैभव प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जणू काही पृथ्वीची शोभा असलेली विनयशील जिजाईने या कुळात प्रवेश केला .सेवेत तत्पर असलेली कुलवान सून म्हणून त्यांनी जागा मिळवली .आपल्या पतीशी अत्यंत प्रिय बोलणारी , शीलाचे रक्षण करण्यास अत्यंत दक्ष असलेली ,विनयाची मूर्तीमंत देवता जिजाई होत्या. पतीव्रता स्त्रियांना आदर्श वर्तनाचा आदर्श पत्नी धर्माचा मार्ग दाखविणारी मार्गदर्शिका होत्या .दोन्ही कुलांना मान्य असलेली व आपल्या नातेवाईकांना आपला आदर्श आचरणातून वागण्या- बोलण्यातून आनंद देणारी ती एक आदर्श शाक्ती होती. पतीप्रमाणेच सदगुण, सतशील असलेल्या जिजाऊंचे परमानंद पहिल्या अध्यायात वर्णन करतो हे वर्णन फार महत्त्वाचे आहे. जिजाऊंच्या इतिहासातील अनेक पैलू शिवभारतातून स्पष्ट होतात.

     मराठा सेवा संघाने जिजाऊंचा सत्य इतिहास जगासमोर मांडण्याचे फार मोठे काम केले आहे .आज सिंदखेडराजा या जिजाऊ जन्मस्थळी लाखो लोक 12 जानेवारीला एकत्रित येतात आणि हा जागतिक स्तरावरील जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. अनेक वर्षापासून अपेक्षित असलेल्या जिजाऊ जन्मोत्सवास जागतिक मान्यता मिळाली. "जय जिजाऊ" या जय घोषाची भारतासह साता समुद्रा पार ख्याती गेली. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या प्रयत्नांनी शेकडो एकरवर हजारो कोटीची जिजाऊ सृष्टी आता साकारत आहे. दरवर्षी या महोत्सवात लाखो रुपयांची पुस्तकांची विक्री होते. विचारांची देवाण-घेवाण होते. इतिहासाचं चिकित्सक, विश्वासअर्ह साधनांचा वापर करून तर्कशुद्ध मांडणीतून आम्ही इतिहास लेखन व वाचन करायला शिकलो ते याच तालमीतून आज हा लेख त्यामुळेच लिहू शकलो.


" जय जिजाऊ जय शिवराय" .


♾️♾️♾️♾️♾️

संजय खांडवे

बुलढाणा

9011971222

रविवार, ७ जानेवारी, २०२४

सत्यशोधक येतोय

 *सत्यशोधक येतोय.......!!!*

➖➖➖➖➖➖      

राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे कार्य एवढे मोठे  आहे की त्यांच्या कार्यावर कितीही साहित्य  निर्माण झाले तरी ते त्यांच्या कार्यापुढे कमीच म्हणावे लागेल. आज परिस्थिती अशी झाली आहे की वाचायला कुणाकडे वेळ नाही. सर्वांना आयते हवे आहे. चित्रपटे, नाटके, सिरीयल्स, वेब सिरीज एवढीच माध्यमे काय ती उरलीत की काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ! असे वाटायला लागले आहे. अन यातही सत्य असत्याचा मेळ बघावाच लागतो नाहीतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच नाटके, कथा ,कादंबरी , चित्रपटातून विकृत मांडणी होत राहणार. पण आता ते शक्य नाही त्यानंतर अनेक इतिहासकारांनी आपले आयुष्य खर्ची घालून सत्यशोधनाचे काम केले आहे आणि आता त्या सुपीक भूमीत अनेक नवतरुण अभ्यासक त्यांचा प्रचार व  प्रसार करताना आजकाल दिसतात. मग  अनैतिहासिक बाबी महापुरुषांच्या चित्रपट, नाटकांमधून जोडण्याची हिंम्मत आता तरी मात्र कुणाची उरली नाही. मागच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा चिकित्सकपणे अभ्यास करून छत्रपती संभाजी राजे हे छोट्या पडद्यावर मांडले. तळागाळात ते पोहोचल्याने चिरकाल लक्षात राहण्यासारखे आहे. बरीच आपली माणसे छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनाशी संबंधित घटनांची चर्चा करताना अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे या सिरीयल मध्ये दाखविलेल्या बाबीवर चर्चा करताना अन संदर्भ देतांना दिसून येत होती. नाटके आणि चित्रपटाच्या माध्यमातून सत्य मांडणी झाली तर ते प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहते.

      सामाजिक दायित्व समोर ठेवून महापुरुषांचे विचार जनमानसात पोहोचले पाहिजे याच उद्देशाने सत्यशोधक हा महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावर 1950- 52 मध्ये प्र .के. अत्रे दिग्दर्शित पहिला चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाच्या मुहूर्ताला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अमर शेख स्वतः उपस्थित होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात स्वतः संत गाडगेबाबांनी अभिनय केला होता. पण हा चित्रपट पडद्यावर टिकू शकला नाही. जवळपास 70 वर्षानंतर निलेश जळमकर दिग्दर्शित, प्रवीण तायडे, सुनील शेळके ,आप्पा बारोटे, भीमराव पट्टेबहादूर ,विशाल वाहूर वाघ यांनी निर्मित केलेला सत्यशोधक चित्रपट हा  5 जानेवारीला म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांची पुतणी, मुक्ता साळवे यांच्या जयंतीला प्रदर्शित होतोय. 2016 मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली प्रचंड अभ्यास व माहिती घेऊन या सर्व टीमने महात्मा फुले यांचा सत्य इतिहास या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाला प्रदर्शित होण्याअगोदरच दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे. जर्मनीचा बेस्ट डायरेक्टर पुरस्कारही या चित्रपटाला मिळालेला आहे.

      सत्यशोधक हा चित्रपट सत्याच्या अगदी जवळ नेणारा ठरणार आहे यात शंकाच नाही. महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांनी निर्मिलेल्या चळवळीचा, सत्याच्या आग्रहाचा, समाजोध्दारार्थ निर्मिलेल्या साहित्याचा, परिवर्तनाच्या विचारांचा अन त्यांनी केलेल्या संघर्षाचा, त्यांच्या वरील झालेल्या आघातांचा हा चित्रपट त्या प्रसंगांना जीवंतपणा निर्माण करणारा असणार आहे.

      1855 ला तृतीय रत्न या नाटकातून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी सांगितलं .अज्ञानातून अस्तित्व संपते आणि गुलामगिरी येथे हा संदेश त्यांनी या साहित्यातून दिला. सार्वजनिक सत्यधर्म यामधून संवादात्मक शैलीतून व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चिकित्सा करत प्रस्थापित व्यवस्थेवर प्रचंड घाव घातले. स्त्री- पुरुष समानतेचा मंत्र देऊन संपूर्ण देशभर मानव समूहाच्या जातपात विरहित समाज जागृतीचे कार्य केले. कृषीच्या आधुनिकीकरणाचा आग्रह धरत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला .आजही शेतकऱ्यांचा संघर्ष काळात या महात्म्याच्या आसुडाचा आवाज कानात कडाडतांना दिसतो. निश्चितच समता फिल्म्स निर्मित व अभिता फिल्म प्रस्तुत या चित्रपटात या महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा समावेश असेल.

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यावर कुळवाडी भूषण हा पोवाडा रचून रायगडावरील महाराजांच्या समाधीचा शोध लावला. "श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय" हा ट्रेलर मधील शिवरायांचा जयघोष सर्व काही सांगून जातो. आदर्श पती कसा असावा व पत्नी धर्म काय असतो हे या चित्रपटाचे सार मानावे लागेल. सावित्रीबाईंची ज्योतिरावांना मिळालेली आयुष्यभराची साथ व या प्रस्थापित व्यवस्थेत विद्रोहाची भूमिका घेऊन समाजातील शूद्र अति शुद्रांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा संघर्ष ,स्त्री शिक्षणासाठी घेतलेला ध्यास  थरार निर्माण करणारा असणार आहे. त्यातच वस्ताद लहुजी साळवे यांची भूमिका ही चित्रपटातील त्यांच्या संवादावरून लगेच लक्षात येते की हा सत्यशोधकाचा सत्य इतिहास प्रेक्षकांना संपूर्ण तीन तास खेळवून ठेवणारा असणार आहे. या माध्यमातून या संघर्षमय इतिहासाचं जागरण निश्चितच होणार आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी हा चित्रपट "संस्काराची शाळा" आहे असे म्हटले आहे. मग विद्यार्थ्यांनी अवश्य बघावा असा हा चित्रपट आहे. ज्ञानाने स्वयंप्रकाशित असलेल्या ज्योतिबांनी अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी क्रांती केली ही क्रांती फुले वाहणारा प्रत्येक जन निश्चितच प्रेरित होणार आहे. शिक्षणाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व जाणणार आहे .अविद्येने अज्ञानाच्या अंधारात चाचपडत बसलेल्यांची गुलामगिरी तोडणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातील आसूड कडाडणार आहे. अशी खात्री या चित्रपटाच्या निमित्ताने वाटते. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हा चित्रपट सहकुटुंब आपल्या मित्र परिवारासह बघावा असाच हा चित्रपट आहे. सत्याची कास धरणारा महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस ताकदीने या विचारामागे उभा राहणार आहे. निश्चितच या चित्रपटाच्या पडद्यापर्यंत खेड्यापाड्यातूनही माणसं येतीलच, या मातीशी प्रामाणिक राहून प्रत्येक सत्यशोधकी अनुयायाचे हे सामाजिक दायित्व आहे. आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याची  सत्यशोधकी चळवळीशी  जवळचे नाते आहे. 1882 साली याच विचारांनी प्रेरित होऊन "स्त्री- पुरुष तुलना" हा क्रांतीकारक ग्रंथरचना करणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील आपल्या बुलढाण्याच्याच! महात्मा फुले यांचे पहिले चरित्र लेखन करणारे सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील  की ज्यांनी विदर्भात सत्यशोधकी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण क्षेत्रातही फार मोठी क्रांति केली ते देखील या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचेच! त्यांच्यासोबतच पुढील काळात बुलढाणा जिल्ह्यात अनेक सत्यशोधकी विचारवंतांनी समाजासाठी आपला देह झिजवण्याचे  काम केले आहे .   चित्रपटाचे निर्माते बुलढाणा येथील अभिता फिल्म्स प्रोडक्शन लिमिटेड चे सुनिल शेळके हे सुद्धा आपले सामाजिक दायित्वाचे भान ठेवत महापुरुषांचे विचार पोहोचण्याचे काम करत आहे. या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा.


➖➖➖➖➖♾️


संजय खांडवे, बुलढाणा

9011971122

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

नवा आचार विचार धर्म शिकवणारा संत..!!*

 *नवा आचार विचार धर्म शिकवणारा संत..!!*



 प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे संत गाडगेबाबांचे चरित्र 1952 ला त्यांनी लिहिले. अतिशय प्रभावी मांडणी प्रबोधनकारांनी केली संत गाडगेबाबांच्या असामान्य कार्याचे विवेचन अतिशय मार्मिकपणे व त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना जिवंत करून मांडलेल्या आहेत. लोकश्रद्धेला वळण लावणाऱ्या महापुरुषांचे जीवन चरित्र पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरते याची जाणीव प्रबोधनकारांना होती.  आपल्या प्रबोधनात्मक व परखड शैलीत संत गाडगेबाबा पुढील हजारो वर्षासाठी चरित्र रूपाने व शब्द रूपाने जिवंत केले . त्यांच्या आवाजातील मुंबई येथील त्यांचे शेवटचे कीर्तन तर नवीन आचार विचार धर्म शिकवते. परखड आवाजातील कीर्तन मेंदूत प्रचंड वैचारिक मंथन निर्माण करणारे ठरते.

     "नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू म्हणा, संत म्हणा, महात्मा म्हणा, काय वाटेल ते नाव द्या श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढेही लोकोत्तर परंपरा कोणी टिकवून चालवेल असेही वाटत नाही "असे प्रबोधनकार बाबांचे चरित्र लेखन करताना आपल्या मनोगतात लिहितात .अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव या गावी सखुबाई आणि झिंगराजी यांच्या पोटी डेबूजींचा जन्म झाला. झिंगराजी हे शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचे नातू होते.

   सुख वस्तुने अगदी सर्वकाही संपन्न होते. गुरे- ढोरे ,शेती आदि सर्व काही चांगलं सुरू होतं, पण अनेक अडाणी ,रुढी परंपरेने नेहमीच्या द्याव्या लागणाऱ्या कोंबडे- बकरे, दारूच्या नवसाने त्या काळात कहर केला होता .वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडगूस घालून दारूच्या पाटात बकऱ्याची कंदुरी प्रत्येक घरात झाली पाहिजे अशी रीतच होती .यातच झिंगराजींना दारूचे व्यसन लागलं यामुळे सखुबाई आणि छोट्या डेबुजी शिवाय झिंगराजी कडे शेवटी काहीच उरलं नव्हतं. "आता माझ्या डेबुजीचा सांभाळ कर, तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडेल, पण त्याला बोकड खाऊ दारुड्या देवांच्या नादी लावू देऊ नकोस." इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला होता. डेबुजी लहान असले तरी पुढील काळात त्यांच्या मनावर याचा प्रचंड परिणाम झाला असावा. चंद्रभान मामाने बहीण सखुबाई सह डेबुजी चा सांभाळ केला. मामाची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. याच व्यवस्थेत वावरत असताना सावकाराच्या कर्जापोटी चंद्रभान मामाचा ही बळी गेला. घर खर्चाला आळा घालत कष्ट करून सर्वकाही सुरू असताना शेतावर ताबा घेण्यासाठी आलेल्या तिडके सावकाराला डेबुजींनी मोठ्या हिमतीने पळून लावले होते. मातीत कष्ट करून घाम गाळून सोनं पिकविणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा ही डेबुजी जाणून होते. स्वाभिमानानं अन मेहनतीने काम करून सुखाचा घास खावा. ताठ मानेने जगावे, पण सावकारी पाशं, त्यातच अनिष्ट रूढी- परंपरेत, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला हा समाज मुक्तपणे श्वास आणि घासही घेऊ शकत नव्हता. डेबुजी हे जवळून पाहत होते पण करणार काय लहान असल्याने कोणी ऐकतही नव्हतं .त्यापुढे त्यांनी स्वीकारलेला मार्ग हा लोकोत्तर महापुरुषाकडे नेणारा ठरतो .गोवारी -भजन पार्टी पासून दगडांच्या चिपळांची टाळ करून भजन कीर्तनातून अभंगातून प्रबोधनाची सुरुवात त्यांनी केली.


तुका म्हणे सुख घेतले गोपाळी।

 नाचती कांबळी करुनि ध्वजा.।।

 करूनिया टिरी आपुलिया मांदळ।

 वाजविती टाळ दगडाचे।।

     खरे अन्नदान काय असते हे गोवारी -भजन पार्टीतून डेबुजीने दाखवून दिले." गड्याहो आपण तर सारेच जेवतो" पण ज्यांना कधी खायला सुद्धा भेटत नाही अशा उपेक्षितांसाठी त्यांनी खऱ्या अर्थाने कृतीतून अन्नदानास सुरुवात केली. असे अन्नदानाचे उत्सव दापुला डेबुजींनी अनेक केले. डेबुजींच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. "बुडती हे जन न देखावे डोळा" हा तुकोबारायांचा विचार डेबुजींच्याही मनात होताच. त्यांना मुलगा आणि मुलीही झाल्या परंतु त्यांनी कधीही कोंबडे -बकरे कापून प्रसंग साजरा केला नाही. मुलगा मुदगल याच्यात डेबुजींचा मोठा जीव होता. सहा महिन्याचा असताना तो अचानक गेला त्यावेळी त्यांच्या भाऊबंदांनी कोंबडे- बकरे न कापल्याने  असे अरिष्ट ओढावले असे ते म्हणू लागले ,पण स्थिर चित्त आणि असामान्य ध्येयाकडे धावणारे हे लोकोत्तर महापुरुष होते. 1 फेब्रुवारी 1905 रोजी पहाटे तीन वाजता मातोश्री सखुबाईचे हळुवारपणे दर्शन घेऊन कुंताबाई ह्या मुलगी आलोका व कलावतीला कुशीत घेऊन झोपलेले असताना भल्या पहाटे या क्रांतिकारी प्रयाणाचा प्रसंग घडला.

        तहानलेल्यांना पाणी पाजणारा, भुकेलेल्यांना अन्न देणारा, नग्न असणाऱ्यांना वस्त्र देणारा परमेश्वर त्यांनी सांगितला. संत विचारांचा व वारकरी परंपरांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता. संत कबीर ,संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांचे दाखले ते आपल्या कीर्तनातून सतत देत असत . या संतांसमोर मी कोणत्या झाडाची पत्ती! असे ते  म्हणत असत. प्रेम ,सहानुभूती ,करुणा, भूतदया हा त्यांच्या विचारांचा पाया होता. अविद्येचे अनर्थ त्यांनी त्यांच्या जीवन संघर्षातून जाणले होते, म्हणून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारा दिवा तुमच्या घरात प्रकाशमान ठेवा असे ते कीर्तनातून आवर्जून लोकांना सांगत असत. प्रसंगी घरातील ताट विका अंगावरील कपडयावर कमी खर्च करा पण लेकराले शिकवा.  हा त्यांचा कळवळा असे.

      माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत  गाडगेबाबा! देव शोधता- शोधता देव होणाऱ्या तुकोबारायाच्या अभंगाचे दाखले त्यांच्या कीर्तनातून ते सतत देत.


देह असूनिया देव।

 वृथा फिरतो निर्दैव।।

 देव आहे अंतर्यामी ।व्यर्थ हिंडे तिर्थग्रामी।।

    बाबा दरवर्षी पंढरपूरला जात असत नाशिक आळंदी देहू अशा अनेक तीर्थस्थळावर त्यांनी भेटी दिल्या पण ते मंदिरात कधी दर्शनासाठी क्वचितच गेले असतील. तीर्थस्थळावरील परिसर स्वच्छ करून ते जनसेवा करत असत. त्या ठिकाणी घाट, धर्मशाळा, आश्रमशाळा, छात्रालय ,सदावर्त आदि लोकसेवा जोपासणारी लोककल्याणकारी स्थळे निष्काम कर्मयोगाने राष्ट्रकल्याणार्थ उभी केली. तीर्थक्षेत्री आलेल्या श्रद्धाळूंचा बुद्धिभेद त्यांनी कधी केला नाही. बाबांना पंढरपुरी आल्यानंतर कुणी विचारले "बाबा देवदर्शन घेऊन आलात का देवळातून?" त्यावर फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे नि घाटाकडे बोट दाखवत बाबा म्हणत," हा समोर जागता ,बोलता, नाचता विठ्ठल असताना देवळात जायचे कशाला? देव काय देवळात बसलाय वाटतं ?जिकडे नजर टाकावी तिकडे तो अपरापार भरलेला आहेच!."

       बाबा कीर्तना अगोदर त्या गावची स्वतः खराटा घेऊन स्वच्छता करायचे. सोप्या प्रचलित ओघवत्या भाषेत, जनमानसात रुजलेल्या शब्दात, त्यांच्याच बोलीभाषेत बाबांचे किर्तन असायचे. शाब्दिक चर्चेत ते कधीच अडकायचे नाही. तुकोबारायांनी जशी लोकभाषेतून अभंग रचना केली ,रसाळ दृष्टांत दिले तशीच वाणी बाबांचे असायची .जीवनात नेहमी घडणाऱ्या घटनांचे ते दाखले देत. कीर्तनस्थळी असलेल्या जेवणावळीत ते कधीच दिसले नाही ,उलट बाजूला जाऊन आपल्याजवळ असलेली अर्धी कोरी भाकर खाऊन ते लगेच कीर्तनाला हजर होत असत. कीर्तनाचा विकरा त्यांना तुकोबारायाप्रमाणेच मान्य नव्हता.


जेथ किर्तन करावे।

 तेथ अन्न न सेवावे।।

 बुक्का लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।।


हा त्यांचा नियम ते आवर्जून पाळायचे.


तुका म्हणे द्रव्य देती।

 घेती दोन्ही नरका जाती।।

     हा शोषणाचा बाजार त्यांनी कधीच तोडला होता. या शृंखला तोडणे गरजेचे होते. कोणत्याही शाळेत न गेलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा एक चालते बोलते विद्यापीठ होते. नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू आजच्या काळात अधिक समजून घेणे फार आवश्यक आहे. माणुसकीची पूजा करून देव शोधा ......!!!!आता असे लोकोत्तर कर्मयोगी युगपुरुष होणे नाही......!!!



संजय खांडवे बुलढाणा 90 11 97 11 22

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

हिवऱ्याच्या अनंतनाथास

 *हिवऱ्याच्या अनंतनाथास उदंड आयुष्य लाभो!!!!!!!*

♾️♾️♾️♾️♾️♾️🌷


#जे जे जेथे पावे । ते ते तेथे सर्मपावे सेवे ॥


#तुका म्हणे


नित्यानंद सेवा केद्राच्या माध्यमातून तुम्ही करत असलेली सेवा शद्वात बसणे शक्य नाही .


#फोडीले भंडार धन्याचा हा माल ।

#मी तो हमाल भार वाही।


या भावनेतून आपण हे काम करत आहात . आजच्या चमकेगीरीच्या काळात कोणताही लाभ ,मोह न ठेवता  कृतीशील समाजसेवेचा आदर्श आपण घातलात !

आम्ही आमच्या जवळ जे आहे ते देऊ शकत नाही आणि तुम्ही तुमच्याजवळ जे आहे- नाही ते भरभरून देता हा आमचा करंटेपणाच !

आम्ही आमचा वाढविला  तो पसारा अनं तुमच्या जवळ जो आहे तो पिसारा हे मात्र नककीच ! आपल्या कार्यास अनंत शुभेच्छा !

आम्ही मणभर नाही परंतु कणभराचे भागीदार नककीच असू !

तुमचा वाढदिवस आमच्या साठी शुभेच्छा देणारा पण त्या निरागस निराधारांसाठी मात्र आयुष्यात प्रकाश देणारा  !  दाखविणारा सूर्यचं जणू !

जो कधी मावळणार नाही तो अनंत ..........

सदैव चैतन्य ज्याच्यात खेळत राहते असा सचेतन......

गणिताच्या व्याख्येत  अमर्याद,अमाप.......

कोणत्याही मापात टाका,

#एक आदर्श शिक्षक

#वक्ता

#लेखक

#कवी

#निवेदक

#मित्र

#ज्याच्या ज्या नात्यात असेल त्या नात्यातही !

अगदी परिपूर्ण बसणारे आमचे मित्र ,

अगदी पहिल्या भेटीपासून ज्यांना आम्ही प्रेमाने "महाराज" म्हणतो. पण तुम्ही कधी "संधी साधू" मात्र वाटला नाही.......!!!! . तुम्ही उपेक्षितांना संधी देणारे आम्हाला दिसले. आपल्या मराठी भाषेलाच नव्हे तर इंग्रजीलाही अलंकार चढवणारे तुम्ही थोर सुवर्णकारही आहात. तुमच्या सहवासात हे आम्हाला पदोपदी जाणवत राहायचं . यात कुशल सुवर्णकाराच्या हातातून निर्माण झालेला हस्ताक्षर ही तितकंच माणिक मोत्यासारखं सुंदर .........!! हेवा वाटायचा आम्हाला !!!अश्या अष्टपैलू समाजशील, अनाथांचा नात असलेल्या असामान्य काम करणाऱ्या व्यक्तीमत्वास उदंड़ आयुष्य असायलाच हवे!!!

      अनंतनाथा .......!!!!

आम्ही आमचे घरटे कधीचेच विणले, त्या घरटयात आमच्या पिलांना आम्ही रोज त्यांच्या चोचीत दाणे भरवतोय, त्यांना आम्ही सर्व काही देतोय पण तू दुसऱ्याच्या अनाथ असाहय असलेल्या पिलांना आजच्या खुज्या युगात घरटी बांधून त्यांना दाणी भरवण्या सोबत उडणेही शिकवतोय,  हे  असामान्य काम सामान्य करूच शकत नाही ! आपल्या कार्यास आपल्या वाढदिवसा सह अनंत शुभेच्छा!बापमाणूस अनंता !



♾️🙏🏻 संजय खांडवे, बुलढाणा

शिवनेरी

 *शिवनेरी* 



*स्थान*- शिवनेरी ता. जुन्नर जि. पुणे , उंची 3500 फूट

*मार्ग*- पुणे पासून १०० कि.मी., पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव पासून 18 कि.मी., छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगर- बेल्हे- आळेफाटा मार्गे 208 कि.मी.


'"संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग "असे रामचंद्रपंत अमात्यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले आहे. अनेक प्राचीन ग्रंथातही किल्ल्याचे महत्व विषद केले गेले आहे. एक किल्ला हजारो सैन्याचे काम करत असे,  एक बुरुज म्हणजे एक मोठी फलटणच असे, त्याचा अभेद्यपणा हा त्या राज्याच्या शक्तीचा भाग असे. सातवाहन काळापासून किल्ले-दुर्ग यांची निर्मिती सुरू झाली. त्यापैकीच एक शिवनेरी हा गिरीदुर्ग सातवाहन काळात  महत्त्वाचे केंद्र होता. समुद्रमार्गे ग्रीक ,रोमन, इजिप्त यांचा व्यापार भारताशी होत असताना जुन्नर -पैठण- भोकरदन- तेर आदी शहरांना जोडणाऱ्या मार्गातील महत्त्वाचे केंद्र जुन्नर होते. कोकणातून कल्याण ,सोपारा अशा पश्चिम किनारपट्टीवरील बंदरातून देशावर येण्यासाठी नाणेघाट या मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. नाणेघाटातून वर आल्यानंतर जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी या पहारेकरी किल्ल्यासोबतच आकाराने मोठा व तेवढाच अभेद्य ,चढाईस कठीण तथा सर्व सुख सोयीने युक्त असा शिवनेरी किल्ला होता.  हा किल्ला शिवनेर या खोऱ्यात येतो. महाकाय प्रचंड असा जमिनीवरून जहाजासारखा दिसणारा व आकाशातून महादेवाच्या पिंडीसारखा आकार असलेला या शिवनेरी किल्ल्याच्या दक्षिणेला मीना नदीवर वडज धरण आहे. किल्ल्याच्या उत्तरेला अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री दिसतो. पूर्व बाजूस मानमोडी लेणी समूह आहे व पश्चिमेस तुळजा लेणी समूह आहे. शिवनेरीच्या कातळात सुद्धा अनेक बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी या किल्ल्यावर झाला म्हणून शिवप्रेमींच्या हृदयात या किल्ल्याचे विशेष स्थान आहे .


यत: शिवगिरेर्मून्र्धि जात:स पुरुषोत्तम:।

तत: प्रसिद्धा लोकsस्य शिव इत्याभिधाsभवत।।

 

 समकालीन शिवभारत या ग्रंथामध्ये वरील श्लोक आला आहे. यामध्ये शिवनेरी गिरीदुर्गावर शिव या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला या किल्ल्याच्या नावावरून जनमानसात शिव हे नाव प्रसिद्धीस पावले.  रोज हजारो शिवप्रेमी या शिवजन्म स्थळावर नतमस्तक होतात. 

          जुन्नर शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून (चौकातून) किल्ल्याच्या दक्षिण बाजूने बरेच वरपर्यंत मोठ्या वाहनाने वाहनतळापर्यंत पोहोचता येते. इथूनच आपण पहिल्या क्रमांकाच्या दरवाजापर्यंत पोहोचतो याच वाटेने आपल्याला सात दरवाजे लागतात. थोड्या दगडी पायऱ्या चढून झाल्यावर महादरवाजा लागतो. असाच परवानगी दरवाजा, हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा ,पीर दरवाजा, शिवाबाई दरवाजा, फाटक दरवाजा, कुलापकर दरवाजा पार करत पुढे जात असताना किल्ल्याला असलेल्या भक्कम ततबंदीचे दर्शन होत जाते. यादव, शिलाहार ,बहामनी, मोगल काळात या किल्ल्यावर बांधकामे होत गेली .जवळ येईपर्यंत दरवाजे दिसत नाहीत पण प्रत्येक दरवाजे हे परस्परांच्या टापूत आहेत असे दिसतात. प्रवेशद्वारावर गणेशपट्टीचे दर्शन होते. समोरच कातळ कपारीतील शिवाई देवीचे मंदिर आहे .मूळ गाभारा प्राचीन आहे. मंदिराचे इतर बांधकाम बांधकाम पेशवेकालीन दिसते. कुलापकर दरवाजा ओलांडल्यानंतर उजव्या बाजूस खोल दरी आहे व त्या कपारीत पानपुढे आहेत त्यांना गंगा -यमुना असे म्हणतात. गडावर पाण्याची व्यवस्था मुबलक आहे असंख्य पाण्याची टाकी व तलावही आहेत. विशेष म्हणजे दुष्काळातही या टाक्यात पाणी राहते. याच पानवठयाच्या टाक्यातून व तलावातून काढलेला दगड बहुदा गडावरील इमारती बांधकामासाठी वापरला जात असे. विविध सत्ताधीशांच्या काळात परिस्थितीनुसार बुरुज, तटबंदी व इमारतीचे बांधकाम केले गेले तिथेच आपल्याला अंबरखाण्याची मोठी इमारत दिसते .यात धान्य ठेवले जात असे .मलिक अहमदच्या काळात अंबरखाण्याचे काम झाले. थोडे चालत गेल्यावर उजव्या बाजूस वर टेकड्यावर शिवकुंज इमारत दिसते ती आधुनिक काळातील आहे. येथे जिजाऊ व बाल शिवबा यांची धातूची मूर्ती आहे. समोरच कमानीची मशिद आहे. या मशिदीवर वरच्या बाजूस फारशी भाषेत दोन शिलालेख कोरलेले दिसतात .त्याखालीच पानपोढी आहे. ही अर्धी उघडी व अर्धी बंदिस्त आहे . ही प्राचीन काळातील आहे. याच पानपुढीच्या बाजूने खाली जुन्नर शहरात उतरणारा साखळीचा मार्ग आहे. ही वाट कातळ कडेतून जाते व अवघड आहे या वाटेतूनच बौद्ध लेण्यांमध्ये पोहोचता येते. मशीदच्या पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष दिसतात. या ठिकाणी हमाम खाना आहे .भूमिगत पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था यात दिसते. इस्लामी राजवटीत हे बांधकाम झाल्याची प्रचिती येते. असा हमामखाना म्हणजे स्नानगृह बऱ्हाणपूरच्या ताप्ती नदीच्या बाजूला असलेल्या महालात आजही चांगल्या अवस्थेत आहे. शिवनेरीवर अवशेषच दिसतात .समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळ असलेली दुमजली इमारत आहे. खालच्या खोलीत पाळणा ठेवलेला आहे. याच खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वर जाण्यास पायऱ्या आहेत. येथून पुढे समोरच्या टोकावर बदामी तलाव आहे. बदामी तलावाच्या मध्ये दगडी खांब आहे. खापरी पाईपचे अवशेषही या ठिकाणी दिसतात. त्या ठिकाणी त्या काळामध्ये कारंजाची व्यवस्था केलेली असावी असे दिसते .समोरच्या टोकावर इमारतीच्या अवशेषही आहेत तेथे कारागृह होते व त्या कारागृहाच्या समोरचा भाग हा कडेलोट म्हणून ओळखला जातो. तेथून गुन्हेगारांचा कडेलोट केल्या जायचा. 

         किल्ल्याचा एकंदरीत इतिहास पाहता हा किल्ला स्वराज्यात कधीच नव्हता. बहामणी, निजामशाही, मुघलशाही  या मध्ये हा किल्ला झुलत राहिला. शहाजीराजांच्या जहागिरीत हा किल्ला होता. 1630 ते 1636 हा कालावधी शहाजीराजांच्या जीवनातील एक अत्यंत धामधुमीचा कालावधी होता. स्वातंत्र्याची आस या मातीला लावून देणारे शहाजीराजे यानी  त्याकाळात या शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते. या किल्ल्याचा किल्लेदार विश्वासराज याची कन्या जयंती हिचा विवाह शहाजीपुत्र संभाजींशी झाला होता .तो याच शिवनेरी किल्ल्यावर झाला अशी नोंद आहे. यामुळेच जिजाऊ देखील शिवजन्माच्या वेळी सुरक्षिततेसाठी या किल्ल्यावरच शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था केली होती. 1636 नंतर निजामशाहीवर वचक बसवण्यासाठी शहाजहानने हा किल्ला  आपल्या ताब्यात घेतला होता. १६५७ व १६७८ अशी दोन वेळा या किल्ल्याला स्वराज्यात घेण्याची मोहीम आखली गेली परंतु ती अयशस्वी राहिली .पुढे पेशव्यांच्या वीरेश्वर चितळे या सरदाराने शिवनेरी किल्ला घेण्यात मोठी कामगिरी बजावली होती.  परंतु २० मे १८१८ रोजी पुन्हा इंग्रजांनी तो आपल्या ताब्यात घेतला .हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत रमणीय आहे. या किल्ल्याच्या परिसरात अनेक लेणी समूह आहेत . रमणीय असा माळशेज घाटही येथून जवळच आहे. एकट्या शिवनेरीच्या डोंगरातच 78 लेणी आहेत शिवाय अनेक पाण्याची टाकी देखील आहेत या लेण्यांमध्ये शिलालेख सुद्धा आढळतात आत मध्ये चैत्यगृह सुद्धा आहेत त्या ठिकाणी पोहोचणे मात्र अत्यंत अवघड आहे. दोन अष्टविनायक याच परिसरात येतात. ओझर, लेण्यांद्री व जुन्नर या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था आहे. निसर्ग सौंदर्य  मनमोहक आहे त्यामुळे हा परिसर निसर्गप्रेमी व इतिहास प्रेमींना सतत खुणवत असतो.




संजय खांडवे बुलढाणा

9011971122

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

लोकसंस्कृतीचा अविष्कार जपणारा सण: दिवाळी*

 *लोकसंस्कृतीचा अविष्कार जपणारा सण: दिवाळी*


जशी आपली प्राचीन सिंधू संस्कृती आहे तश्याच अनेक संस्कृती आपल्या पृथ्वीतलावर नांदून गेल्या. त्यांना 'सभ्यता' असेही म्हणतात. सभ्य लोकांनी निर्माण केलेली संस्कृती म्हणजे 'सभ्यता'. हजारो वर्षानंतरही आज जगाला प्राचीन संस्कृती विषयी विलक्षण आकर्षण आहे. याचे कारण त्यांच्या लोकजीवनातील परंपरेतून निर्माण झालेले आदर्श, आजही आपल्या जीवनाशी जुळून पहिले तर ते सरसच ठरतात. जगातील जवळपास संस्कृतीच्या मुळाशी माता आहे. जसे व्हिनस, इश्तार , मिनर्व्हा, आदि स्त्रीरूपदेवता इतर संस्कृतीत आढळतात. तशाच आपल्या मोहेंजो-दडो -हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या प्राचीन शहरातील उत्खलनात मातृदेवतांची प्रतीके सापडली आहेत .पूर्वी समूहाने राहत असताना स्त्री त्या समूहाची प्रमुख असे .पुढे गण व्यवस्था अस्तित्वात आल्या व ती गणाची प्रमुख झाली. सृजनशीलता स्त्रीच्या अंगी होती. ती नवनिर्मितीची प्रेरणा होती .तिच्यामध्ये असलेल्या विशेष कार्याने ती मातृदेवतेच्या स्थानावर पोहोचली. निरीक्षणातूनच तिने शेतीचा शोध लावला. जन माणसांच्या नेणीवेत असलेली 'निऋती ' ही शेतीचा शोध लावणारी पहिली स्त्री ठरली.

     आपल्या प्राचीन संस्कृतीची नाळ कृषी परंपरेची अगदी घट्ट बांधलेली आहे .भाद्रपद अमावश्येच्या दुसऱ्याच दिवसापासून सणसमारंभाची रेलचेल दिसते .प्रदिर्घ वर्षाकाल संपल्यानंतर भूमाता धन, धान्य आणि सौंदर्याने भरून जाते. अश्विन शु. पासून नवरात्र उत्सवास म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजनास सुरुवात होते .अश्विन शु. पौर्णिमेला लक्ष्मीच्या आगमनानिमित्त जागरणातून "को जागर्ति" म्हणजे कोण जागे आहे अशी विचारणा करून आपल्या लेकरांच्या कृतीशीलतेची चाचपणी मातृदेवता करत असल्याची जाणीव होते. धन ,धान्य, समृद्धीचा व विचार ,आचार सदाचारांचा व परंपरेचा कोजागिरी हा मेळावा आपल्या कृषी परंपरेचा भाग ठरतो.

     महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा डॉ सरोजिनी बाबर यांनी 1990 ला संपादित केलेला दसरा दिवाळी हा ग्रंथ महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आरसाच ठरतो. आपल्या वाडवडिलांनी चालवत आणलेल्या प्रथा, परंपरेचे पुण्यस्मरणच या निमित्ताने होते. दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा सण आहे. इ. स. पूर्व पासून याचे पुरावे आढळतात. हीच समिक्षा या ग्रंथाच्या संपादनातून संपादकांनी केली आहे. दिवाळीला इ.स. 1 ते इ. स. 400 या काळात "यक्षरात्री" म्हटले जायचे. वात्सायनाच्या "कामसूत्र" या ग्रंथात हे नाव वापरल्याचे आढळते. आज पासून 1700 वर्षांपूर्वी "दिपप्रतिपदुत्सव" असे कनोजच्या राजाने आपल्या नागानंद या नाटकात म्हटलेले आढळते .कश्मीरमध्ये इ. स.800 च्या काळात नीलमन पुरानात "दिपमाला "असे संबोधले गेले. इ.स.949 मध्ये सोमदेव सूरीने लिहिलेल्या "यशस्तिलक" या ग्रंथात दिवाळीची वर्णने येतात. संत नामदेव ,संत ज्ञानेश्वराच्या समकालीन असलेल्या महानुभाव साहित्यातील "लीळाचरित्रात" तेलंग स्नान व ओवाळणीचा सोहळा वृत्तांत येतो. अबुल फजलच्या "एने अकबरी" मध्ये दिपावलीचे वर्णने आढळतात .अकबरही त्याच्या संपूर्ण महालात दीवे लावायचा .दौलत खांण्या समोर 40 फुट उंच स्तंभ रोवला जायचा व 16 दोरखंड लावून त्या स्तंभावर विशालदीप लावला जात असे. जैन धर्मातही चार दिवस दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. भगवान महावीरांच्या मोक्षानंतर या उत्सवास सुरुवात झाली. 2500 वर्षांपूर्वी अमावश्येच्या दिवशी त्यांचे निर्माण झाले होते .आता ज्ञानाचा दीप निघून गेले आहेत म्हणून आपण मातीचे दीवे पेटवून प्रकाश प्रज्वलित केला पाहिजे म्हणून ही परंपरा जपली जात आहे. प्रभू रामचंद्रांचे 14 वर्षे वनवासातून आगमन होणे या क्षणालाही या उत्सवाची दीपोत्सवाच्या रूपाने जोडले जाते.

      अश्विन महिन्यातील 12 वा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसालाच वद्य द्वादशी असे म्हणतात .गाई, म्हशी, शेळ्या ,मेंढ्या ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती. "गाई, म्हशींनी भरला वाडा, बळीच राज्य '! अशी म्हणायची प्राचीन प्रथा आहे. वसुबारस हा कामेधेनूची पूजा करण्याचा दिवस आहे. कामेधेनू ही मनाची इच्छा पूर्ण करणारी असते. कामे धेनूचा समुद्रमंथनाचा संदर्भ कालिका पुरवण्यात येतो. दिवसभर उपवास करून कृषक संस्कृतीत गाई- वासरा विषयीचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवसाला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात.

     अश्विन महिन्यातील 13वा दिवस हा  धनत्रयोदशीचा असतो. वैद्यकशास्त्रात पूजनीय असलेल्या धन्वंतरी देवतेचा जन्म अश्विन शुद्ध त्रयोदशीला झाला अशी मान्यता आहे. समुद्रमंथनातून अमृत कलश याच देवतेने वर आणला होता असे पुराणात सांगितले जाते. दक्षिण दिशेला दिप लावून दीपदान करण्याची प्रथा या दिवशी आहे. यातून दक्षिण दिशेचे महत्त्व विषद होते .जैन धर्मात या सणास 'ध्यान तेरस' असेही म्हणतात. भगवान महावीर हे निर्वाणाच्या आधी योगनिद्रेत गेले म्हणून असे म्हटले जाते.  नरकचतुर्दशीला सुद्धा दिवाळीच्या सणात विशेष महत्त्व आहे. नरकासुराची कथा आपण ऐकत आलो आहोत नरक राजा आणि इंद्र यांचे वैर होते.पण श्रीकृष्णाने  नरकासुराचा वध केल्याची कथा पुरानात आहे. नरक राजाचे नाव या दिवशी या सणाला दिले गेले. रोगराई ,दुर्गंधी दूर व्हावी म्हणून घर स्वच्छ व पवित्र केले जाते न चुकता साफसफाई ,रंगरंगोटी नंतर तैलमर्दन व अभ्यंगस्नान अपरिहार्य असते. शरद काळामध्ये थंडीची चाहूल लागलेली असते आणि वातावरणामध्ये बदल झालेला असतो. आरोग्य विषयक बाबींशी संबंधित या गोष्टी जीवन सुखी आणि समृद्ध करणाऱ्या असतात. राजस्थानात हा दिवसाला "रूपचौदस" म्हणतात.अश्विन अमावश्येला येणारा लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा दिवस असतो कृषी परंपरेतील हा दिवस धान्य लक्ष्मीपूजनाचा मानला जातो नवीन घरात आलेल्या धान्याच्या राशीचे फळांचे पूजन या दिवशी केले जाते .धन हे धान्य नंतर आले. आजही आपण नववधूला घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने येत आहे असे मानतो .त्या नववधूच्या हातात धान्य घेऊनच घरात प्रवेश करतो. अगोदर देवाला नैवेद्य (शेतात पिकवलेल्या धान्यापासून) मगच कृषी संस्कृतीतील लोक भोजन करतात यामधून आपले आपल्या परंपरेची असलेले नाते किती दृढ आहे हे समजते. खरं तर लक्ष्मीचा संमंध पृथ्वीशी आहे. ती भूमाता आहे. कर्दमातून कमळ फुलतो व या कमळात लक्ष्मीचे वास्तव्य आहे म्हणून या भूमातेची पूजा म्हणजे कृषी आराधनाच आहे. पुरानांनी आठ लक्ष्मी सांगितल्या आहेत. धान्यलक्ष्मी ,धनलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी व राजलक्ष्मी या सर्व क्षेत्री मातृशक्तीच आहे जैन व बौद्ध साहित्यातही लक्ष्मीचा उल्लेख येतो पितळखोरा लेणी मधील गजलक्ष्मीचे पॅनल आजही मुंबईच्या संग्रहालयात आहे. लोणावळ्यातून उंबरखिंडीत उतरताना आम्हाला अनेक ठिकाणी गजलक्ष्मीची शिल्पे बघायला मिळाली होती. गजलक्ष्मी मध्ये दोन्हीही बाजूला गज म्हणजे हत्ती आपल्या सोंडेतून भूमीवर पाण्याचा वर्षाव करत आहे. हे सुफलतेचे प्रतीक आहे आज आपण नवीन चित्रांमध्ये गजांच्या सोंडेतून धनाचा वर्षाव होताना बघतो. आता सोन्या चांदीचे मूर्ती तथा शिक्के आपल्याला दिसतात. गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, कुललक्ष्मी यामधून मातृशक्तीचा सन्मान होताना दिसतो.

       कार्तिक महिन्यातील प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. बळीराजाच्या स्मरणाचा दिवस, सम्राट बळीराजाच्या गौरवाचा दिवस." इडा पिडा टळो बळीच राज्य येओ" हे मौखिक परंपरेतून आपण ऐकत आलो आहोत विशेष करून ओवाळणी करत असताना स्त्रियांनी हा कानमंत्र पुढे पुढच्या पिढीला देत राहण्याचं काम केलं. पुरानकथांमध्ये बळीराजाची कथा सांगितली जाते. वामनाने कपटाने बळीला पातळात घातल्याची कथा आहे. प्राचीविद्यापंडित डॉ आ. ह. साळुंखे यांच्या बळीवंश या ग्रंथामध्ये बळीराजाची समीक्षा करण्यात करून बळीराजाला न्याय दिला आहे. महात्मा फुले यांनी देखील बळीराजाला कुलस्वामी संबोधिले आहे .हजारो वर्ष ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे .असा दानशूर ,जिवलग, आमचा लाडका, बळीराजा. तसेच महान तत्ववेता, संविभागी स्वतः सर्वज्ञ, समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना एकमेकांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी सम्राट बळीराजा. निर्मितीगर्भ कृषीला जपणारा, शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक सकारात्मक क्रियाशील समाज रचना घडवून आणणारा समाज शिल्पकार, कारस्थान कपटांना निर्मळ निरागस मनाने सामोरे जाणारा उन्नत महामानव, पराभवातही पराभूत न होणारा ,शांतताचित्त तत्त्ववेत्ता इतका जिवलग की सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका हा बळीराजा उदार व उदात्त होता.

जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात

*बळी सर्वस्वे उदार।* *जेणे उभारीला कर।*

       बळीराजा हा सर्व अंगाने उदार असा आहे. दान देण्यासाठी त्याने आपला हात वर केला आहे. पण वामनाने 'कहार' करून बळीराजाला पाताळात घालण्याचं काम केलं आहे .

*करूनी  काहार।*

*तो पातळी घातला।।* समतावादी संस्कृतीचा महानायक कार्तिक प्रतिपदेला म्हणजेच बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा राजा बळीराजा प्रजेला भेटायला येतो. अशी उदात्त भावना आहे या दिवशी ग्रामीण भागात बहीण भावाला ओवाळताना "इडा पिडा टळो बळीच राज्य येओ". असे पुटपुटते त्याच दिवशी वामनाने कपटाने बळीराजाला पातळात घातले आणि आपला बळीराजा आपल्याला पुन्हा भेटायला येतो तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा .याच दिवशी प्रजा आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करून बळीपूजन करत असते आणि आपल्या दानशूर संविभागी न्यायप्रिय अशा राज्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असते.

      कार्तिक वद्य द्वितियेस भाऊबीज साजरी होते .त्याला यम द्वितीय असेही म्हणतात. हा दीपावलीचा शेवटचा दिवस यमाने आपल्या बहिणीच्या म्हणजे यमीच्या घरी जाऊन ओवाळणी करून घेतली.  भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा सण आहे. पूर्वीच्या काळी दळण-वळण अभावी जवळची माणसं भेटणं अवघड व्हायचं त्यासाठी या सणास विशेष असे महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या सणाच्या दिवशी गाईच्या शेणाचे दहा गोळे करून अंगणात ठेवत असत. त्यावर पळसाची डहाळी टोचून ते वाळल्यावर छतावर फेकून दिले जाई. त्याला मेढे असे म्हणत. भाऊबीजेला भाऊ घरी आला की त्या  गोळ्यावर तापविलेल्या पाण्याने त्याला अभ्यंगस्नान बहीण घालत असे. लहानपणी भाऊरायांसाठीची जात्यावरची गाणी आपण आई ,आजी, आत्या यांच्या तोंडून  रामप्रहरी जात्यावर ऐकली आता मात्र हा लोकसंस्कृतीचा अविष्कार लोप पावत चालला आहे . जैनांमध्ये  देखील महावीरांचे भाऊ नंदीवर्धन  व बहीण सुदर्शनाची भाऊबीजची आठवण सांगितली जाते.

        सणांची नाळ ही लोकसंस्कृतीशी आपल्याला जुळलेली दिसते .विशेष करून कृषीसंस्कृतीशी ती अगदी जवळचं नातं सांगत असते. प्रत्येक भागा नुसार प्रथा व परंपरा या वेगवेगळ्या असतात आपल्या परंपरेत अनेक धार्मिक मिथके देखील सांगितली आहेत. पुराना मधूनही अनेक मिथके आलेली आहे. ही मिथकं आपल्याला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतात. कथा, दंतकथा, जातक कथा व मिथकं हे आपल्याला काहीतरी सांगून जातात. ती खोटी निश्चितच नसतात त्यातून सत्यता शोधावी लागते. या मिथकांच्या साह्याने आपण सत्यशोधन करू शकतो .यालाच मिथकशास्त्र असेही म्हणतात. या  आणि आपल्या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आपल्या परंपरेच्या माध्यमातून त्याचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून आपण आपल्या संस्कृती सवर्धन व जतन करण्यासाठी साठी काम करू शकतो ही काळाची गरज आहे. नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण आधुनिकतेच्या काळात आपल्या  मूळ प्रथा -परंपरेमध्ये सतत सर- मिसळ करून भेसळ देत राहू अशी भीती वाटते.



संजय खांडवे

9011971122

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

प्रयोगशील शिक्षकाची सेवापूर्ती*

 *प्रयोगशील शिक्षकाची सेवापूर्ती*

〰️〰️〰️〰️〰️✒️

न लगे चंदना सांगावा परीमळ।

वनस्पतिमेळ हाकारुनी।।

 अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी।

 धरिता ही परी आवरे ना।।


जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की चंदनाला आपल्याकडे सुगंध आहे हे सांगण्यासाठी त्याला वनस्पतींचा मेळावा भरून जाहीर करावं लागत नाही किंवा सांगावं लागत नाही. त्याचा असलेला सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत राहत असतो ते अंतर्यामी असतं ते स्वभावतःच बाहेर धावत अविष्कृत होण्यासाठी ते उतावीळ होत असतं चंदनाने ते आपल्या आत कितीही आवरून धरायचं म्हटलं तरीही त्याला ते आवरता येत नाही असा तो सुगंध असतो. नेमकं असंच चंदनासारखे झिजणारं आणि सुगंध देणारं व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू धंदर सर!

 जे मुळात आत मध्ये दडलेल असतं त्या सुगंधाला अन झिजण्याला वारसा देखील असतो. अगदी चंदना प्रमाणेच तो मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपणारा असतो. आपल्या महाराष्ट्र भूमीच्या पवित्र मातीचा वारसा देखील चंदनाप्रमाणे झिजणारी आणि सुगंध देणारी माणसं तयार करण्याचाच आहे.

       मराठवाडा -विदर्भ सीमेवर असलेल्या बुलढाणा तालुक्यातील डोमरूळ या गावांमध्ये बळीवंशीय कुटुंबात विष्णू धंदर सरांचा जन्म झाला. शिक्षणाचा वसा आणि वारसा या कुटुंबाला आपल्या वडिलांपासूनच मिळाला. वडील स्व हिरामण धंदर हे निवृत्त मुख्याध्यापक होते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढल्याने त्यांना सर्व सामाजिक समस्येची जाण होती. धाड परिसरातच जि प शाळतूनच आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य आपल्या वडिलांप्रमाणेच हाती घेतले. 1985 ला लोणार तालुक्यातील गुंजखेड या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून त्यांनी शिक्षणाचे हे महान कार्य सुरू केले. प्राथमिक शिक्षणापासून दूर गेलेली खेड्यापाड्यातील मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे त्यांना दर्जेदार व गुणवत्तार पूर्ण शिक्षण आपण दिलं पाहिजे हा ध्यास  मनात घेऊन गणित,विज्ञान व क्रिडा या आवडीच्या विषयाने त्यांनी या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आपल्या सेवेतील पहिली तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांनी धामणगाव धाड या ठिकाणी दिलेल्या आपल्या दहा वर्षाच्या सेवेत एक्स्ट्रा क्लास,रात्रीचे वर्ग,ग्रामिण क्रिडा स्पर्धेत धामणगावच्या क्रिडापटूनी खो-खो,कबड्डी,कुस्ती स्पर्धेत अनेकवेळा राज्य स्तरावर यश मिळवले असे अनेक उल्लेखनीय कामे केली. आजही या परिसरात सरांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतल्या जाते. त्यानंतर गिरडा बिरसिंगपूर,ऊबाळखेड,दाभा, व दहिद या अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या ग्रामीण भागात सरांनी आपली  सेवा पूर्णत्वास नेली . यामध्ये जिल्हा परिषद शाळा गिरडा तीन वर्ष व जिल्हा परिषद शाळा बिरसिंगपूर येथे आठ वर्ष आणि सेवानिवृत्त होताना ते "आय एस ओ" मान्यांकन मिळवून दिलेल्या दहिद बुद्रुक या गावातून उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून सेवा मुक्त होत आहेत.

         "विज्ञानाचा विष्णू" म्हणून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात ख्याती मिळवली. यामागे त्यांच्या परिश्रमाचा, मेहनतीचा,जिद्दीचा आणि एक विज्ञाननिष्ठ शिक्षक असल्याचा भाग आहे. 2002 मध्ये त्यांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा सूर्य पुरस्काराने मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत किनवट या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. बळीवंशीय कुटुंबातून आल्यामुळे त्यांच्या विज्ञानाच्या प्रकल्पावरही कृषी ची छाप होती. गिरडा या ठिकाणी असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मातीचे विविध प्रकार सर्वांच्या समोर आणले व त्यांच्या या विज्ञानाच्या प्रकल्पाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. म्हैसूर येथे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये अंड्याची टरफलं व वापरलेली चहा पावडर पासून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या बालवैज्ञानिकांनी प्रयोगातून मांडला. राष्ट्रिय बालविज्ञान परिषदेत जिल्हा परिषदेची बिरसिंगपूर एकमेव शाळा सहभागी झाल्याने त्या वेळचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले होते."चहा पावडर" चे सेंद्रिय खत या विज्ञानाच्या प्रयोगाला राज्यस्तरावर नागपूर या ठिकाणी सादर करण्याचा बहुमान त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला मिळाला. म्हैसूर या ठिकाणीही त्यांची निवड झाली. 2003 साली त्यांनी तालुका शिक्षण सल्लागार समितीवर काम केले. मा.नंकुमार जंत्रे साहेब व संभाजीराव सरकुंडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्याने जिल्हास्तरावर महत्त्वाचा सहभाग नोंदविला. 2004 मध्ये "पाणी फक्त मुळांना" हा गोहाती (आसाम) येथे राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनातील त्यांचा प्रयोग खूप गाजला. हा भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मणिंद्र शुक्ल यांच्या "धम्माल सुट्टी" या सदरामध्ये त्याची नोंद घेण्यात आली. 2006 मध्ये लातूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये "सुगरण चूल" ही मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावणारी ठरली. यावेळी मा. विलासराव देशमुख व आताचे आपले पालकमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा त्यांच्या या प्रकल्पाला भेट दिली होती. भविष्यात विजेचा तुटवडा निर्माण होणार याची भान ठेवत त्यांनी चंद्रपूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये आधुनिक वॉटर हीटर हा प्रकल्प मांडला होता. या प्रकल्पाचे दखल सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री मा. वसंत  पुरके यांनी घेतली शेगाव या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुद्धा "जैविक कीटकनाशक" या प्रकल्पातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारे सहकारी शिक्षक यांचेही नाव घ्यायला ते विसरत नाहीत. बिरसिंगपूर या शाळेत असताना  मा. उमेश जैन सरांची व मा सुभाष देवकर सरांची त्यांना फार मोठी साथ मिळाली होती. जि प उच्च प्राथमिक शाळा दहिद बुद्रुक या शाळेला आदर्श शाळा व आयएसओ मान्यांकन मिळून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्याचबरोबर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी जी साथ दिली त्यांचेही आभार ते मानायला विसरत नाहीत. आपण करत असलेलं काम हे एक टीम वर्क असते अशी त्यांची सतत भावना काम करताना असायची . या सामूहिक प्रयत्नातूनच मला हे साध्य करता आले असेही ते म्हणतात.

          विज्ञानाच्या विष्णूची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची, ज्या समाजात आपण लहान चे मोठे झालो त्या समाजाप्रती सदैव कृतज्ञ असणं हे त्यांना आवडते. म्हणून त्यांनी त्यांच्या या कार्यासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी की जे एमबीबीएस, इंजीनियरिंग यासारख्या उच्च शिक्षणासाठी मोठी फी भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचं ध्यास त्यांनी अंगी घेतला आहे व त्या दिशेने त्यांचे कामही सुरू आहे आतापर्यंत त्यांनी तीन विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी फी उपलब्ध करून देण्याचे मोठं काम केलं आहे. हे काम सुद्धा एका सामूहिक जबाबदारीने ते करत आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना अधिकचा वेळ मिळेल आणि त्या वेळेत ते या पद्धतीने समाजाची सेवा करून समाजासाठी या देशासाठी आदर्श नागरिक घडवत राहतील असा त्यांचा मानस आहे. विज्ञानाच्या विष्णूने त्यांना शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या संधीचं सोनं केलं .आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले ते विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत बरेचसे सातासमुद्रा पारही आहेत. निश्चितच त्यांनी केलेल्या या कामाचं त्यांना या सेवानिवृत्तीच्या वेळी समाधानच आहे. येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडत राहो या सदिच्छासह त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच कामना.



संजय खांडवे

9011971122

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

*शरद पौर्णिमा: एक महोत्सव*

 *शरद पौर्णिमा: एक महोत्सव*



चंद्र आणि पृथ्वी या दोघांचं अतूट नातं आहे. पृथ्वीतलावर राहणारे जीव या चंद्राशी अनादी अनंत काळापासून जुळलेले आहेत. पृथ्वीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी चंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचे सौंदर्य हे चंद्रा मुळेच बहरले गेलं आणि या पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारे सौंदर्य हे तर फार मोठे विलोभनीय! हा झाला विज्ञानाचा भाग, अनादी अनंत काळा पासून जगातील जवळपास सर्वच धर्मामध्ये चंद्राला फार महत्त्व आहे. काल गणना देखील चंद्राच्या कलेशी संबंधित आहे. डोंगर, दऱ्यात ,वाडी, वस्तीमध्ये विकसित होत जाणारे आमचं लोकजीवन हे चंद्राच्या अमावस्या आणि पौर्णिमा यावर चालत आले आहे. आपले आजे- पंणजे हे त्यांच्या जीवनातील घडलेल्या महत्त्वाच्या घटना  कालबद्ध करत असताना पौर्णिमेच्या अगोदर इतके दिवस पौर्णिमेच्या नंतर तितके दिवस अशा स्वरूपामध्ये संचित ठेवायचे. आपले बहुतेक सण आणि उत्सव हे पौर्णिमा किंवा अमवश्या या सणाशी संबंधित आपल्याला दिसतात यामध्ये राखी पौर्णिमा ,वटपौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा तशीच कोजागिरी पौर्णिमा सुद्धा येते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. शरद ऋतूमध्ये येणारी ही अद्वितीय पौर्णिमा आहे. आपण साजरे करत असणारे सण हे कृषी परंपरेशी आपली नाळ जोडणारे आपल्याला दिसतात. त्यापैकीच एक कोजागिरी पौर्णिमा देखील आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. अश्विन शु. पौर्णिमा म्हणजे निरभ्र, निकोप, स्वच्छ ,सुंदर वातावरणात निसर्ग खुलून दिसावा असा हा क्षण ! धरती मातेने मानवाला धन धान्याच्या रूपात दिलेला प्रसाद म्हणजे घरे धन -धान्याने रूपाने भरभरून गेलेली आहे. निसर्ग आनंदी आहे आणि माणूसही आनंदी आहे. गाई -म्हशी दूध -दुपत्यांनी युक्त झालेल्या आहेत. नदी- नाले प्रचंड तुडुंब भरून वाहत आहेत. नदीपात्रही अगदी स्वच्छ झाले आहे. निसर्गात चोही बाजूंनी सुगंध दरवळत आहे. चांदणी रात्र ,निरभ्र आकाश सर्वकाही आल्हाददायक आहे. या आनंदी वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करत , उत्सव साजरा करणारा सण म्हणजे "कोजागिरी पौर्णिमा", अगदी प्राचीन काळापासून आपल्या भारतीय परंपरेत या सणाला विशेष असे महत्त्व आहे .उद्यान, एखाद्या मोकळ्या जागी किंवा उंच ठिकाणी सर्व जण एकत्रित येऊन रात्रीचे जागरण करत हा सण साजरा केला जातो. दूध- दुपत्यांचा काळ असल्यामुळे संथ आहारावर दूध आटवत या निरभ्र चांदण्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात हे दूध आटवले जाते आणि गप्पागोष्टी, प्रबोधन, गाणी, लोकगीते ,प्रवचन ,कीर्तन या माध्यमातून ही रात्र जागवली जाते. गुजरात मध्ये गरबा उत्सवाच्या माध्यमातून जागरण करून ही पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या भारतीय धार्मिक परंपरेनुसार रात्री लक्ष्मी माता घरोघरी जाणार आणि कोण कोण जागी आहे ? याची विचारणा करणार." को जागर्ति" म्हणजेच कोण कोण जागे आहे? याची विचारणा करणे असा अर्थ होतो. मानवाच्या कृतीशीलतेची ही चाचपणी या ठिकाणी होते .अश्विन प्रतिपदे पासून ते दशमी पर्यंत स्त्री- शक्तीचे महत्त्व आपल्या सण -समारंभामधून दिसते तेच पुढे या अश्विन पौर्णिमेत सुद्धा प्रतीत होताना दिसते .येथेही स्त्रीशक्ती रूपानं लक्ष्मी मातेचे आगमन होऊन ती आपल्या प्रजाजनांची विचारणा करते.  दारात उभी राहून त्यांना दर्शन देते, दारात आलेली लक्ष्मी परत जाऊ नये म्हणून हा जागरणाचा उत्सव आपण प्राचीन कालापासून करत आलेलो आहोत. त्या दिवशी लक्ष्मीपूजनालाही महत्व असते. प्राचीन पुरानानुसार महिषासुर मर्दिनी मातेची देखील कथा याबाबतीत सांगितली जाते. महिषासुरमर्दिनीचे जागरण या दिवशी केले जाते. आपल्या पूर्वजांनी लक्ष्मीचा अर्थ केवळ धन,दौलत अशा भौतिक बाबी किंवा सुख, समृद्धी असा नसून तो आपल्या जीवनमानाशी देखील संबंधित आहे. आपण जीवन जगत असताना कोणताही मोह ,माया, द्वेष ,मत्सर आदी च्या अधीन जाऊ नये. त्यापासून मुक्त असावे चंद्रा प्रमाणे शितल आणि स्वच्छ असावे. आपण चंद्राप्रमाणेच देणाऱ्याची भूमिका आपल्या जीवनात पार पाडावी. ऋतू परिवर्तनाचा मध्य साधणारा हा सण एक बौद्धिक , कला व विकास सामाजिक विकास साधणारा आहे. आपल्या प्राचीन लोकसंस्कृतीचा अभ्यास करत या लोकसंस्कृतीच्या खुणा जर आपण शोधू शकलो तर ही कृषी परंपरा आपल्या धार्मिक परंपरे ला कशी सलग्न आहे हे स्पष्टपणे जाणवते. 16 कलेमधून जाणारा हा चंद्र देवादिदेव आधी योगी महादेवांच्या शिरावर शोभून दिसतो. प्रकाशमान असलेला चंद्र त्याच्या शीतलतेतून आमच्याही जीवनमानामध्ये शितलता निर्माण करतो .


बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

शक्ती रुपे*

 *शक्ती रुपे*


भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

    रूपमंऽनोक्त आणि अपराजित सूत्रात खालिल नवदुर्गाचे स्वरूप सांगितले आहेत .

१)महालक्ष्मी


सहा भूजा असलेली वरद,त्रिशूल,ढाल,पानपात्र,नाग धारण केलेला आहे .


२)नंदा

ही चारभूजा धारी यक्षसूत्र,खडग,ढाल,पानपात्र धारी आहे.


३)क्षेमकरी

चार भूजा असलेली वरद, त्रिशूल, कमल, पानपात्र धारण केलेली आहे.


४) शिवदुती

ही चार भुजाधारी कमंडल, चक्र,ढाल पानपात्र घेवून आहे .


५)महाचंडी

ही खडग,त्रिशूल,घंटा,ढाल चार भूजाधारी आहे .


६)भ्रामरी

ही सुध्दा चार भूजाधारी खडग,डमरू,ढाल,पानपात्र धारी आहे.


७)सर्वमंगला

चार भूजा धारीणी माला,वज्र,घंटा,पानपात्र घेवून आहे .


८)रेवती

दंड,त्रिशूल,खडवांग,पानपात्र धारिणी देवी आहे .


९) हरिरिध्द

ही चार भूजा असलेली कमंडल,खडग ,डमरु व पानपात्र धारीणी आहे.

अशी नऊ नवदुर्गास्वरुप यामधे सांगितली आहे .

सप्तशती या ग्रंथा मधे नवदुर्गाची रूपे खालील प्रमाणे  एका श्लोकामधे सांगितली आहे .


प्रथमं शैलपुत्रीति द्वितिय ब्रम्हाचरणी ।

तृतीय चंद्रघंण्टेति,कुष्मण्डेती चर्तुर्थकम् ॥

पंचमं स्कधंमातिति,षष्ठं काव्यायनिति च ।

साप्तमं कालरात्रिती,महागौरिति चाष्टमम् ॥

नवम् सिध्दीदात्री च नवदुर्गा प्रर्कितिताः ।

उक्तान्येतानि नामानि ,ब्रम्हानैव महात्मनाः ॥


वृषभवाहन असलेली 'शैलपुत्री'


माला ,कमंडल धारण केलेली द्वि भूजा असलेली 'ब्रम्हाचरिनी'


व्याघ्र वाहन असलेली 'चंद्रघंटा'


व्याघ्र वाहन असलेली सहा भूजा असलेली धनुष्य,चक्रगदा,त्रिशूल आदी शस्त्र हाती असलेली 'कूष्मांडा'


सिंह वाहन असलेली चार भूजा धारी 'स्कंधमाता'


सिह वाहन असलेली चार भूजा धारी 'कात्यायनी'


गर्दभ वाहन असलेली अभय,खडग,त्रिशूल व पाश धारिणि 'कालरात्री '


नंदी वाहन असलेली 'महागौरी '


कमल वाहन असलेली चार भूजा धारी गदा,चक्र,पुस्तक ,कमलधारिणी 'सिद्धीदायी'


ही नव स्वरूपे या प्राचीन ग्रंथात येतात . याशिवाय स्त्री शक्तीची रूपे असलेल्या सप्त मातृका सुद्धा आपल्या परिसरात आपल्याला आढळतात त्यापैकीच ब्राम्हणी,माहेश्वरी,कौमारी,वैष्णवी,वाराही,इंद्राणी,रक्तचामुंडा

ह्या सप्तमातृका सुद्धा प्राचीन काळापासून पूजल्या जातात .या सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे देखील आहेत .वेरुळ लेण्यामध्ये या सप्तमातृकाचा पट आहे.यांच्या काखेत किंवा मांडिवर बालक सुद्धा बसलेले आढळतात . पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या सप्तमातृकाचे वास्तव्य आपल्याला दिसते.

भद्रकाली,महाकाली,चंडी,चामुंडा,रक्तचामुंडा ,महीषासूर मर्दिनी, लक्ष्मी महालक्ष्मी, महा सरस्वती ,श्रीदेवी सरस्वती, अंबा ,अंबिका भुवनेश्वरी ,अन्नपूर्णा गायत्री, गंगा, यमुना शितला, तुलसी, दुर्गा अशी अनेक देवीची म्हणजेच शक्तीचे रूपे आहेत ह्या शक्ती किंवा ही रूपे ओळखण्यासाठी त्यांच्या बहुकरांमध्ये असलेली शस्त्र त्यांनी धारण केलेले वाहन यावरून आपणास ती ओळखता येतात. या स्त्री शक्तींचा जागर अनंत काळापासून आपल्या पवित्र भूमीत होत आलेला आहे.



संदर्भ -भारतीय शिल्पसंहिता ,प्र ओ सोमपुरा तथा मंदिर लेणी भ्रमंती व शिल्प अभ्यासातून



संजय खांडवे

विजयादशमी :एक प्राचीन परंपरा* 〰️〰️〰️〰️〰️

 *विजयादशमी :एक प्राचीन परंपरा*

〰️〰️〰️〰️〰️


धन्य आजि दिन ।

जाले संतांचे दर्शन।।

 जाली पापातापा तुटी।

 दैन्य गेले उठाउठी।।

 जाले समाधान।

 पायी विसावले मन।।

 तुका म्हणे आले घरा। तो चि दिवाळी दसरा।।



 संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात दिवाळी, दसरा या दोन्ही सणाचा उल्लेख येतो .यामध्ये जगद्गुरु म्हणतात संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्यतेचा असतो. सगळी पाप- ताप  नाहीसे होत असतात आणि आपल्या जीवनातील दिनवाण्या  गोष्टी  दूर होतात आणि या संतांच्या पायी मन विसावलं की त्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होतं. जीव सुखावतो . त्यांचं घरी येणं म्हणजे तोच आपला दिवाळी आणि दसरा आहे. प्राचीन काळापासून दिवाळी आणि दसरा हे सर्वात मोठे सण मानले जात होते. संतांचे घरी येणे याचा संमंध जगद्गुरुंनी दिवाळी आणि दसरा या सणाची जोडला आहे. यावरून आपल्याला प्राचीन काळातील चालत आलेल्या या सणांचे महत्त्व समजते. मुळात भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव हे कृषी परंपरेशी निगडित आहेत जवळपास सर्वच सण हे कृषीशी नाळ जोडलेले आपल्याला दिसतात. सण आणि उत्सव हा समृद्धीच्या आणि भरभराटीच्या काळातील एक कौटुंबिक व समाज जीवनाशी समरस असलेला भाग आहे. अश्विन प्रतिपदे पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती पूजेचा कालखंड मानला जातो. शरद ऋतूमध्ये येणारा हा शक्ती पूजेचा उत्सव म्हणजे या काळात सृष्टी अत्यंत प्रसन्न झालेली असते. वर्षाकाळ संपून गेलेला असतो शेतकऱ्याच्या शेतात समृद्धी आणि संपन्नता ही ओतप्रत भरलेली असते सर्व बाजूने आनंदच आनंद असतो हा सर्वकाळ सुखाचा असतो. शेतीचा शोध स्त्रीने लावला. तिने तिच्या निरीक्षणातून हे संशोधन घडवून आणले. नवरात्रात नऊ दिवस मातीमध्ये नऊ प्रकारचे धान पेरून एक प्रकारे त्या धानाची उगवण क्षमता तपासली जाते की काय असेच वाटते.  स्त्री व माता म्हणजे भूमाता या सृजनतेच्या प्रतीक मानल्या गेल्या. नवनिर्मितीचा हा काळ मातृ शक्तीशी जोडणे सहाजिकच आहे. कोल्हापूरची अंबाआई, तुळजापूरची भवानी आई, पुण्याची जोगेश्वरी, आंबेजोगाईची जोगाई, माहूर, वणी ही जशी आपली शक्तीपीठे आहेत तशीच प्रत्येक गावागावात जाखाई,भोनाई, जोखाई, डोंगराई, मसाई, वांजाई, सोजाई, खामजाई, रेणुकाई, काली, मातृका, यल्लमा, मरीआई ,मरदडी, तेलाई, पोलरमा, शिवाई ,तुकाई,आजुबाई अशी प्रत्येक गावोगावी देवीची दैवत आपण अनादी अनंत कालापासून पूजत आलो. या दैवतांच्या सानिध्यात राहून आपण आपले कौटुंबिक संस्कार जसे लग्न ,मुंज ,जावळे ओटी भरणे, जोगवा मागणे जणूकाही त्यांच्या उपस्थितीतच करत आहोत असे जाणवते. त्या गावची लेक बाळ एकदा का होईना बाळ जन्मल्यानंतर त्याचं मस्तक  आईच्या पुढे टेकून आणते . आईचं ओटी भरणे आणि दहीभाताच बोनं देणे ही ती माऊली कधीही विसरत नाही. या परंपरा आपल्याला हेच दर्शवितात म्हणून नवरात्र हा शक्तीच्या कृतज्ञतेचा उत्सव मानला जातो.

        आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी हा या नवरात्रातील दहाव्या दिवशी येणारा महत्त्वाचा सण मानला जातो.

" दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा."

       बालपण चा प्रसंग आठवतो एकत्रित कुटुंब पद्धतीत आम्ही त्या काळात दसरा साजरा करण्यासाठी आमच्या आई-वडिलांसोबत आम्हीही गावाकडे सर्व एकत्रित यायचो. सर्वांनी नवीन कपडे घेतल्याचं कुतूहलही असायचं. त्यावेळेस  अगदी दुपारपासूनच घरच्या बैलगाड्या सजवण्याची लगबग सुरू होत असे. लाकडी बैलगाड्यांना गेरूच्या रंगाने रंगवून त्यावर चुन्याचे ठिपके मारून बैल जोडी अगदी पोळ्या मधल्या बैलांसारखी सजवून आम्हाला कामावरचा गडी त्या बैलगाडीत बसून शेताकडे शिलंगण खेळण्यासाठी घेऊन जायचा.गावातील पाच पन्नास गाड्या त्या वाटेने धुराळा उडवत धावत जायच्या आणि आपल्या शेतात असलेल्या आपट्याच्या झाडाची पानं तोडून सोनं म्हणून आम्ही ती लुटायचं याशिवाय शेतात असलेल्या ज्वारीची पानं आणि कंणस सोनं म्हणून घरी घेऊन यायचो. घरी आल्याबरोबर ती आपल्या दैवतापुढे ठेवून घरी ओवाळणी केली जायची व सर्वप्रथम मारुतीला हे सोन अर्पण करून सायंकाळी घरातील व शेतीच्या उपयोगी असणाऱ्या शस्त्रांचे पूजन करायचे. संपूर्ण गावभर आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन मोठ्यांच्या आशीर्वाद साठी आम्ही फिरायचो असा हा आम्ही अनुभवलेला दसरा सण अजूनही स्मरणातून जात नाही.

       विजयादशमी या सणाला काही पौराणिक सांस्कृतिक व ऐतिहासिक सुद्धा महत्त्व आहे. विजयादशमी ही साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जातो . धार्मिक मान्यतेनुसार अश्विन शुद्ध दशमीला याच दिवशी रामाने रावणाला हरवून विजय प्राप्त केला होता. महाभारतात पांडवांनी याच दिवशी आपला अज्ञातवास संपल्या नंतर शमीच्या झाडाच्या डोलीत ठेवलेली शस्त्रे बाहेर काढून ती सर्व शस्त्रे स्वच्छ करून  पूजनानंतर धारण केली होती. म्हणून शमीच्या झाडांची म्हणजेच आपट्याच्या झाडांची पाने याला विजयादशमीच्या सणामध्ये विशेष महत्त्व आहे. दशमीचे दिवशी पुरुषांनी ईशान्य दिशेला जाऊन शमीच्या वृक्षाखाली अपराजिता देवीची यथाचीत पूजन करावे म्हणजे  अपराजिता आपल्याला विजयाचा आशीर्वाद देते. अशी ही एक परंपरा काही ठिकाणी बघायला मिळते की त्या शमीच्या वृक्षाची पूजन केल्यानंतर वृक्षाच्या मुळाशी असलेली ओलसर माती पूजेच्या अक्षतासह घ्यावी  व ती वाजत- गाजत घरी आणावी. असेही शमी पूजन काही ठिकाणी केले जाते. विजयादशमीला शस्त्र पूजनाला विशेष असे महत्त्व असते.आपापल्या व्यवसायाशी निगडित असलेली साहित्याची पूजन त्या काळामध्ये केले जाते. पावसाळा संपला की शरद ऋतुला प्रारंभ होत असतो म्हणून  लढवय्यांच्या अंगी  उत्साह संचारत असे. लढाईसाठी लागणारी शस्त्रे पावसाळ्याच्या काळामध्ये वापरात येत नसत म्हणून ती आता बाहेर काढून सीमाल्लोघन करण्यासाठी स्वच्छ करून सज्ज ठेवत असत.

        आपल्या भारतात हिमालयापासून अगदी कन्याकुमारीपर्यंत विजयादशमी साजरा होत आलेली आहे. एवढेच नव्हे तर नेपाळमध्येही नवरात्र व दसरा साजरा केला जातो .तामिळनाडूमध्ये नवरात्र सण हा मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो. म्हैसूर मधील दसरा हा जगप्रसिद्ध आहे. चामुंडा देवीने महिषासुराचा वध केला अशी दंतकथा या म्हैसूरच्या बाबतीत सांगितली जाते. म्हैसूर राज्याची कुलदेवता असलेली चामुंडेश्वरी ही म्हैसूर मधील चामुंडी डोंगरावर वसलेली आहे. त्या ठिकाणी तिचे भव्य मंदिर आहे.  शहराच्या नावाची रूपे अशाच पद्धतीने बदलत गेली महेश मंडळ मग महेश पूर आणि आताचे म्हैसूर असे महिषासुरमर्दिनीचे निवासस्थान म्हणून म्हैसूर शहराला मानले जाते. बेळगाव मध्ये ही दसरा साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. राजस्थान हा शक्ती व शौर्याचा उपासक असलेला प्रदेश आहे. राजस्थानमध्ये ही नवरात्राला विशेष असे महत्त्व आहे येथे 'खडग' स्थापनेची परंपरा आहे. नऊ दिवस या खडगापुढे  दीप स्थापना करून ती परंपरा जपली जाते. हा नंदादीप अखंड नवरात्रीमध्ये तेवत ठेवला जातो .या काळात व्रत व खानपनाची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी आहे. उत्तर भारतात विजया दशमी व नवरात्र या काळात रामलीलाचे आयोजन केले जाते. मध्य प्रदेशांमध्ये 'नौरता' म्हणजेच नवरात्र 'गरभा' या भावना आविष्कारातून  हा विजयादशमी पर्यंत साजरा करण्याची परंपरा आहे . गुजरात मध्ये विशेष करून विविध प्रकारचा गरभा या काळामध्ये खेळला जातो .आंध्र प्रदेश मध्ये जवळपास महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो तीच परंपरा आपल्याला दिसते. बुंदेलखंडामध्ये याला 'सुअरा' असे म्हणतात. हिमाचल प्रदेशातील 'कल्लूचा' दसरा आहे. मनाली येथे विजयादशमीचे कार्य 'हिडंबा' देवी शिवाय पूर्ण होत नाही अशी परंपरा आहे. याच हिडिंबा देवीचा भाद्रपद शुद्ध द्वितीया मासारंभामध्ये मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पारध या गावी मोठा उत्सव होत असतो.

      तुळजापूरची तुळजाभवानी आई व कोल्हापूरची अंबाई मंदिरात अश्विन प्रतिपदेपासून तर दशमी पर्यंत मोठ्या प्रमाणात विविध परंपरेंची रेलचेल असते नवरात्रात गोमुखाजवळ पाच घट आणले जातात . एक सभा मंडपाच्या ईशान्येला दुसरा देवी समोरील शिव मंदिराजवळ तिसरा तिसरा  त्रिशूलाचा ओवरीत आणि इतर टोळ भैरव मंदिर आणि मातंगी मंदिर याजवळ हे घट बसविले जातात. ही तुळजाभवानी मंदिराची परंपरा आहे असेच घट हे अंबाबाईच्या मंदिरातही बसवले जातात यामध्ये सोने-चांदी, रत्न अगदी सात नद्यांचे पाणी आधी टाकले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या राज्याभिषेकप्रसंगी  अशाच प्रकारच्या घटांची रचना सिंहासनाजवळ केली होती. त्यामध्ये दूध, मध माणिक, मोती आदींची रेलचेल करून त्या घटाच्या काठावरती रेशमी सुशोभन केले होते. थोडक्यात घट रचनेला आपल्या भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. आदि मायेची रुपे असलेली ह्या देवींना चंडी ,दुर्गा ,काली, अन्नपूर्णा, आधी रूपांमध्ये नवरात्रात पुजले जाते आणि मग दशमीला म्हणजेच विजयादशमीला याचा समारोप होतो. शौर्य आणि मातृशक्तीला कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आपल्याला असत्याकडून -सत्याकडे, तमाकडून- तेजाकडे, अमंगला कडून- मंगलाकडे अस्थिरते कडून  स्थिरतेकडे घेऊन जाण्याचे काम करतो. प्रत्येक जण आंतरिक तळमळीतून हा विजयादशमीचा सोहळा आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर साजरा करताना दिसतो. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपण  येणाऱ्या काळात अज्ञान, अंधश्रद्धा ,अनारोग्य, भ्रष्टाचार ,अन्याय, अत्याचार यावर विजय मिळवू या. मानवतेचे, एकात्मतेचे, बंधूभावाचे, समानतेचे सोने जनमानसात वाटू या. हीच आपली खरी विजयादशमी.


संजय खांडवे

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

साकेगाव चा साकेश्वर

 *साकेगावचा साकेश्वर खुणवतोय!*




वेदकाळात उपासना व पूजन हा भक्तीमार्ग यज्ञ याग विधि च्या माध्यमातून होत असे , वेद आणि ब्राम्हण ग्रंथामधे विविध यज्ञीय क्रियांचा उल्लेख मिळतो .वेदकाळानंतर प्रचलित  यज्ञरूपी भक्तीमार्ग देवप्रतिकांची उपासना करण्यात परावर्तीत होत गेल्याचे दिसते .देवतांच्या पाषाण अथवा धातुच्या साकार झालेल्या मूर्ती पूजा प्रचलित झाली .या देवप्रतिमासोबत देवालय निर्माणचा उल्लेख अर्थर्ववेदात येतो .मूर्तिपूजनाचे प्रमाणरुप सिंधू संस्कृतीच्या काळातही दिसते .माता,पशूपतीनाथ,योनी,वृक्ष,शिवलिंग यांना पवित्र मानले जायचे .वेदातही शिवाला पशूपतीनाथ हा उल्लेख वारंवार येतो .

 भारताच्या पूर्व भागात शिव -रूद्र उपासनेचे विशेष महत्व आहे .तेवढेच महत्व आपल्या महाराष्ट्रातही दिसते . अगदी गुप्त काळापासून शिल्पकौशल्यावर आधारीत अनेक सुंदर शिव मंदीराचे निर्माण झाले .मराठवाडा तसेच विदर्भातही असे अनेक मंदिरे आहे .विदर्भातील मार्केण्डय मंदिर वगळता सर्व मंदिरे काळ्या दगडात बांधलेली आढळतात .त्यापैकीच एक साकेगावचे साकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आजही दिमाखदारपणे उभे आहे .चिखली वरून धाड कडे जातांना सहा -सात किलोमिटर अंतरावर, बुलढाणा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर  एका डोंगराच्या पराड्यात मुख्य रस्त्यावरूनच या मंदिराचे मोहक रूपाचे दर्शन घडते .बुलढाणा जिल्यात लोणार, धोत्रानंदई,मढ,सातगाव(विष्णु मंदिर)कोथळी येथे  या प्रकारची मंदिरे आहेत . मंदिराला प्राचीन काळी संपुर्ण तटबंदी असल्याचे दिसते .तटबंदीला एक प्रवेशद्वार आहे . दगडी शिळा पासून तयार केलेलं सुंदर असं गोपूर आपल्याला दिसते. या गोपुराच्या उंबरठ्यावर आपल्याला दोन कीर्ती मुखे कोरलेली दिसतात. या कीर्तीमुखां बाबत पुराण कथेमध्ये असे सांगितले जाते की, येणाऱ्या भाविकांचे पाप खाण्यासाठी याची रचना शिवाने मंदिरावर केली आहे .हे कीर्तीमुख म्हणजे राक्षस आणि त्या राक्षसाची भूक एवढी होती की त्याने त्याचं संपूर्ण शरीर खाऊन घेतल्यावरही ती भागली नाही म्हणून शिवाने त्याला वरदान दिले आपल्या मंदिरावर त्याला जागा देऊन त्या ठिकाणी भक्तीसाठी येणाऱ्या भाविकांचे पापे खाण्याचे काम त्याच्याकडे दिलं अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून मंदिरावर याचे निर्माण केल्या जाऊ लागलं. मंदिराला नंदीमंडप ,गूढमंडप व गाभारा असे भाग आहेत .

नंदीमंडपात तीन नंदीशिल्प आहेत . मंदिरात आत प्रवेश करताना दगडी द्वाराच्या वर गणेश शिल्प कोरलेले आहे संपूर्ण द्वारावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. आत प्रवेश करताच आपल्याला मंदिरातील कला शिल्पांचा अप्रतिम भाग नजरेच्या समोर येतो. आजही तो शाबूत आहे. सभामंडपाचे छत चार मुख्य खांबावर आधारलेले आहे.अंतराळातील दोन स्तभावर एक स्त्री चर्तुभूज असून चर्तुभूज गणेश विराजमान आहेत . सभा मंडपाचे खांब भार वाहक यक्षाने तोलून धरलेले आहे. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अन्वा येथील शिव मंदिरात ज्याप्रमाणे गणपती हा भार वाहकाचे काम करतो तसेच या मंदिरातही भारवाहक गणेशाचे सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळते. याशिवाय खांबाच्या अगदी तळाशी देखील गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. छतावर सुंदर नक्षीकाम केलेले असून दगडी गोल झुंबर वर कोरलेले आहे सभामंडपापेक्षा चार फुट खोल गाभारा आहे. गाभाऱ्यात उतरण्या अगोदर डाव्या आणि उजव्या बाजूला देव कोष्टकामध्ये गणेश व कुबेराची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या दारावर प्रतिहारी,मागल्यविहग,घटपल्लव आहेत . गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर अगदी मधोमध गणेशाची मूर्तीही आपल्याला दिसते. पाप खाणारी कीर्तीमुखे सुद्धा याद्वारावर आहेत. याचा अर्थ गाभाऱ्यापर्यंत पोहोचताना ही कीर्तीमुखे माणसाला त्याची पापे खाऊन पुण्यवान बनवून शिवलिंगापर्यंत पोहोचविण्याची रचना प्राचीन मान्यतेनुसार असावी. गाभाऱ्यात पूर्ण चंद्राकार शिवलिंग प्रतिष्टापित केलेले आहे. मंदिराचा अंतर्भाग जेवढा मनमोहक आहे तेवढाच तो बाह्य भागही आपल्याला आकर्षित करून घेतल्याशिवाय राहत नाही.  मंदिराची मुख्य गाभार्‍यावरील कळसाची रचना ही हुबेहूब अमृतेश्वराच्या मंदिरासारखीच भासते. नागरशैलीतील ही रचना असलेलं  शिखरी शिखर प्रकारातील आहे .त्यावर विविध लता आमल काच्या खालील भागात कोरलेल्या आहेत. शिखरावर आधारभूत अशी छोटी छोटी शिखरे आपल्याला भासतात. कळसावरील सुंदर नक्षीकाम आजही मनमोहक आहे .त्याकाळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष देत ते आजही उभे आहे . मंदिराच्या वरील भागात ब्रम्हा,शिव पार्वती ,महिषासूरमर्दिनीचे शिल्प आहेत.एका भागात कुस्तीचा प्रसंग आहे .गाभाऱ्याच्या बाह्य भागावर पाठीमागील शिवाची तांडवमुद्रेतील शिल्प आहेत . देव कोष्टात तयार केलेल्या मूर्ती शिल्पाचा दगड हा मंदिरात वापरलेल्या दगडापेक्षा थोडा वेगळा वाटतो. आपण प्राचीन मंदिरांना भेट देतो .त्या मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतो मंदिर निर्माण हे केवळ एवढ्या गोष्टीसाठी नसून यामागे एक गुढ असा अर्थ दडलेला असतो. थोडक्यात मंदिरावर निर्माण केल्या गेलेल्या प्रत्येक शिल्पाचा  अर्थ असतो. मंदिरावर घडविण्यात आलेल्या छोट्याशा कलाकृतीतही फार मोठा अर्थ दडलेला असतो यासाठी त्याचा अर्थ बोधन होणं आवश्यक आहे आणि हे अर्थबोधन अभ्यासातूनच साध्य करता येते. प्राचीन मंदिरे व मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बा. देगलूरकर यांच्या अभ्यासातून त्यांनी हे सिद्ध केलंय . ते म्हणतात

आपण वेरूळच्या कैलास लेणीत गेल्यास एक शिल्प अवश्य बघावं. आपण कोणत्याही प्राचीन मंदिरात मूर्ती पाहिल्यावर ती आपल्याला अर्धीच कळत असते मूर्तीच्या संपूर्ण अंतरंगात गेलो तर मूर्तीचा उलगडा होत असतो. यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सामाजिक बाबी असतात त्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला मूर्तीचे स्वरूप कळते.  पार्वती साधना करतांनाचे  शिल्प आहे मग ती ही साधना किंवा तपश्चर्या कशासाठी करत आहे यासाठी आपल्याला पुराणाच्या गोष्टीकडे वळावे लागते. मग लक्षात येते की शिवासाठी ती या ठिकाणी तप करत आहे. हे या मूर्तीवरून या ठिकाणी कळते इथपर्यंत ठीक आहे पण ही पार्वती कोण आहे? पती, पशु,पाश या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी  यामध्ये  दिसतात .पती हा शिव आहे. पाश म्हणजे हे सर्व प्राणी आहेत पार्वती हा जीव आहे आणि तो पती करता या ठिकाणी तपश्चर्या करतो आहे. म्हणजे जीव हा शिवा करिता तपश्चर्या करत आहे. हे या मूर्तीतून कळते हे या मूर्तीचा अर्थ बोधन आहे. "कल्याण सुंदर मूर्ती "शिवपार्वतीचा विवाह दाखवणारी मूर्ती ही पुढची मूर्ती या लेण्यांमध्ये आपल्याला दिसते. पार्वती शिवाचा हात हातात घेतलेला आहे, वास्तविक पाहता शिवाने पार्वतीचा हात हातात घेणे अपेक्षित आहे पार्वती शिवाकरिता तप करते मग तिला शिवाची प्राप्ती झाली. याच्यापुढे बघितल्यास आपल्याला अर्धनारी श्वराची मूर्ती दिसते. तप, प्राप्ती ,विवाह या तीन अवस्था या शिल्पामधून आपल्याला दिसल्या. म्हणजे "जीवाला शिवाची" प्राप्ती झाली आणि त्यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली आणि त्याचे पुढचे शिल्प जे आहे ते  अर्धनारीश्वराचं म्हणजे

  "जीव ब्रह्मा एवं ना पर: " 

या तीनही मूर्तीचा बोध अशा प्रकारे आपल्याला घ्यावा लागतो या मूर्ती स्वतंत्रपणे घेतल्या तर त्याचा वेगळा अर्थ निघतो फक्त अर्धनारीश्वराची मूर्ती म्हणजे " प्रकृती आणि पुरुष" यांचे एकत्रीकरण हे सांख्यदर्शन यामध्ये आपल्याला दिसते.

   इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे पार्वती ही पर्वत कन्या ती निश्चयी तसेच कठोर हृदय असते. तिचा निश्चय हा तिच्या श्रद्धेचा मापदंड आहे. तिला शिव हवा आहे. तिला त्याने आपले डोळे उघडायला हवे आहेत त्यांनी तिला प्रेमालिंगन द्यावे आणि विश्वाची मैत्री करावी असे तिला वाटते. इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे अनेक असुर, देव व मार्कंडे यासारखे ऋषी तपचर्या करतात आणि ईश्वराला प्रसन्न करतात ते त्यांच्या स्वतःसाठी लाभदायक ठरतील असे वर मागतात परंतु पार्वती इतरांचे कल्याण होईल असा वर शिवाकडे मागते. तिला शिव हवा आहे तो केवळ तिच्या वैयक्तिक सुखासाठी नसून साऱ्या विश्वाला लाभदायक ठरावा म्हणून हवा आहे तिच्या साधने पासून शिवची दर्याद्र बुद्धी आणि त्याच्या मनातील कणव जागृत व्हावी म्हणून ती निकराचे प्रयत्न करते. शिव नसेल तर सारे जिवंत प्राणिमात्र निसर्गाशीच जखडले जातात ,पण तो त्यांना त्यातून मुक्त करू शकेल गुरुत्वाकर्षणामुळे ते अडकलेले आहेत तो त्यांना त्यांच्या कृपादृष्टीने त्यातून सोडवू शकेल. 

           याशिवाय त्यांनी शिवाच्या चतुष्पाद सदाशिव या शिवाच्या चार पाय असलेल्या मूर्ती बाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे ही मूर्ती गडचिरोली येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरात आढळते बहुदा चार पाय असलेली शिव शंकराची मूर्ती नसते .मूर्ती आपण बघितल्यास दोन पाय खाली सोडलेले असून दोन पायांनी मांडी घातलेली आहे. डॉ. देगलूरकरांनी हे चार पाय आपल्याला शैव सिद्धांताकडे नेतात असे म्हटले आहे कारण शैव सिद्धांत चार प्रमेयावर  उभा आहे. ही चार प्रमेय म्हणजे चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद, व योगपाद होय. या सिद्धांतानुसार त्याचा अर्थ लावावा लागतों. सदाशिव स्वरूपातील या मुर्त्या खजुराहो येथे दोन आहेत आणि मार्कंडेश्वर येथे एक आहे असे सांगितले जाते. इतर अभ्यासकांनीही या मूर्तीचा अर्थ लावलेला दिसतो या स्वरूपातील शिव चतुष्पाद असणे म्हणजे शिवाचे अस्तित्व आणि प्रभाव सत्य, द्वापर, त्रेता आणि कली या चारही युगात आहे. त्यांचा प्रत्येक पाय एकेका युगाशी संबंधित आहे. अभ्यासकांच्या नजरेतून अशा पद्धतीने या दोन शिल्पांचा अर्थ आपण पाहिला अशी अनेक शिल्पे मंदिरावर असतात या प्रत्येकाचा काही ना काही अर्थ असतो आज साकेश्वराच्या मंदिरावर अशी अनेक शिल्पे आहेत की, जी अभ्यासाच्या प्रतीक्षेत आहेत.बाहेर अस्ताव्यस्त शिळाही आहेत की ज्या आजही संशोधनाच्या प्रतिक्षेत आहेत.मंदिराच्या वरच्या भागात सिता नान्ही म्हणून एक छोटी बारवही आहे .या बारवेत जीवंत पाणी आढळते .या प्राचीन पाणवठयाला मात्र आता आधुनिक मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोत  अडथळा ठरत आहेत .

एक वेळ अवश्य या प्राचीन वास्तुस अवश्य भेट देऊन याचे जतन होण्यासंदर्भात आपले योगदान असू दया ! साकेश्वर आपल्याला खुणवतोय!

                 


संजय खांडवे

बुलढाणा

९०११९७११२२

➖➖➖

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर

 मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर

➖➖➖➖➖➖➖

सर्व देवामधे श्रेष्ठ......

 मस्तकी चंद्र धारण केलेला......

सर्व लोकांचा एकच अधिपती......... मानवी मनातील भयगंड मोडून काढणारा....

देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात .....

असे देवादिदेव महादेव म्हणजेच 'शिव '

  महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आहेत .असेच एक अकराव्या शतकात बांधले गेलेले प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम  अविष्कार, नव्हे तर मूर्ती शास्त्र अभ्यासकांसाठी ही एक अभ्यास शाळाच म्हणता येईल.हे मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे . छत्रपती संभाजीनगर वरूनही याचं अंतर केवळ शंभर किलोमीटर आहे. जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .

     मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार 'शस्त्रोंत्कीर्णा 'हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी 'शैलजा' 'हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते . या मंदिराचे निर्माण होत असताना दोन प्रकारचे दगड वापरलेले दिसतात आज च्या घडीला ज्या दगडांचा दर्जा चांगला होता त्या दगडावर घडवलेले नक्षीकाम व शिल्पे ही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत परंतु जो दगड कमकुवत निघाला आज त्या दगडाचा मुरुमा मध्ये रूपांतर होतांना दिसत आहे. हे मंदिराचे निरीक्षण केल्यावर दिसते .

      पूर्वमुखी असलेल्या या मंदिराला तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे आहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत .

उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो . नक्षत्राकृती असलेल्या सभामंडपात गेल्यावर अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला  होतोच.

या मंदीराला ५०  गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे . शिवाची स्वायत्तता व त्याचे सामर्थ्य याचे द्योतक असलेला नंदी वर्तुळाकृती रंगशिलेत मध्यभागी स्थित आहे . या मंदिराच्या रंगशिलेला कक्षासन आहे .मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूचे कक्षासन आजही शाबूत आहे त्याच्या बाह्य भागावरील शिल्पाचे निरीक्षण केल्यास त्यावर आलाप व गायन करताना ची शिल्पे दिसतात. रंगशिलेच्या वरच्या भागांमध्ये आपल्याला विविध सूर सुंदरी यांची शिल्पे कोरलेली आहेत .यामध्ये बासरीवादीका, मृदुंगवादीका, खंजिरी वादिका ,मंजिरीवादिका, वीणावादिका, शालभंजिका आदी सूर सुंदरीची शिल्प काढलेली दिसतात.


*कांस्य बंन्सी विणा शंख मृदुंग खंजरी।* *विविधा वादिन्न वश्या च क्वचित नृत्य नायका।।*


 यावरून त्या काळात कलेला किती महत्त्व होते याची जाणीव होते. शिल्प शास्त्रामध्ये अशा 32 प्रकारच्या देवांगनांची माहिती येते यामध्ये काही नृत्यांगना आहेत आणि काही वाजंत्रीधारीनी आहेत. उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात पूर्ण चंद्र आकाराचे शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण आहे . गर्भ गृहाच्याद्वारा वरील अप्रतिम शिल्पे  ही चालुक्य, होयसळ कालीन पद्धतीचे वाटतात. मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते . द्वारावर गणेश पट्टी आहे या द्वाराच्या वर छताला बघितल्यास अप्रतिम असे भौमितिक आकृतीमध्ये निर्माण झालेली दोन झुंबर आजही आपलं मन आकर्षित करून घेतात. हे मंदिर मध्यम नवतालातील उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो . राज्य पुरातत्त्व विभागाकडे हे मंदिर सध्या संरक्षित असल्याने याची बऱ्यापैकी डागडुगी व निगा राखली जाते.

   विदर्भातील मंदिर व मूर्ती शास्त्राचे अभ्यासक विवेक चांदुरकर यांच्या सोबत अनेकदा या मंदिराचा अभ्यास दौरा केला .त्यांच्या सोबतच दौरा करत असताना यशवंत महाविद्यालय नांदेड येथील मंदिर व शिल्प अभ्यासात डॉ अरविंद सोनटक्के त्याचबरोबर सातारा येथील मंदिर व मूर्ती शिल्प अभ्यासक आदित्य फडके यांच्याकडूनही या मूर्ती शास्त्राची प्रयोगशाळा असलेल्या मंदिराची अभ्यासपूर्ण पाहणी करता आली. यावेळी पुरातत्त्व अभ्यासक तथा पुरातत्व संस्था सदस्य डॉ कामाजी डक हे सुद्धा सोबत होते .संपूर्ण भारतामध्ये अन्वा येथील एकमेव शिव मंदिर आहे की ज्या ठिकाणी आपल्याला विष्णूची 24 शक्ती रुपे ही मूर्तीच्या स्वरूपात बघायला मिळतात शैव व वैष्णव या दोन्हीचा समन्वय मंदिराच्या शिल्परचनेतून आपल्याला दिसतो. जेवढे अंतर्भागामध्ये आपल्याला मूर्ती शिल्प व नक्षीकाम दिसते तेवढेच बाह्यभागावरही संपूर्ण मंदिराची परिक्रमा केल्यानंतर आपल्याला सुंदर अशी शिल्पे नजरेस पडतात. या शिल्पांमध्ये उपपीठावर असलेल्या थरावर थर रचत गेलेल्या या मंदिर बांधकामात हंस पट्ट्या, कीर्तीमुख पट्ट्या व इतर भौमितिक आकार असलेल्या पट्ट्या दिसतात. मंदिराच्या बाह्य भागातही अनेक सुरसुंदरी व नर्तिका यांची सुंदर अशी शिल्प आजही दिसतात. यासोबतच साधकांच्या रूपामध्ये उभे असलेली मूर्ती रूपातील साधक आपल्याला मंदिरात जातांना उजव्या बाजूच्या बाह्य भागातील कोनाड्यात दिसतात. गाभाऱ्याच्या बाह्य भागामध्ये आपल्याला देवकोष्टकांची रचना दिसते आणि या अनेक मुर्त्या आहेत.  मंदिराच्या उजव्या बाजूला देवकोष्टकामध्ये असलेला गजांतकशिव आपल्याला दिसतो या शिवाला चार हात आहेत परंतु ते आता भग्न झालेले दिसतात.  पायाखाली हत्ती  आहे व हत्तीची  आता सोंड तुटलेली आहे. दक्षिण भारतात अशा स्वरूपाच्या मूर्ती बघायला मिळतात अशा मूर्ती या पाषाण आणि धातू स्वरूपातही निर्माण झाल्या आहेत या स्वरूपाच्या मूर्तीची निर्मिती पल्लव ,चालुक्य चौल आणि होयसळ यांच्या राजवटीत झाली आहे.  यांच्या कालखंडात या स्वरूपाची मूर्ती अत्यंत लोकप्रिय होती. प्राणी रूप धारण केलेल्या असुराचा वध जेव्हा देव करत असत त्या समयी तो असुर त्या विशिष्ट प्राण्याप्रमाणे धिप्पाड आणि शक्तिमान आहे किंवा होता असे लक्षात घ्यायचे असते . त्याचे नामोहरम करणारा देव व देवता त्यापेक्षा अधिक शक्तिमान होती असा त्यातून अर्थ बोध होत असतो .गजासुर संहार ही एक रूपक कथा असून त्यातून शिवाची शक्तिमानता प्रगट होते. अशाच देवकोष्टकामध्ये शिवनटेश्वर, वराहमूर्ती अशी अनेक रूपे असलेल्या मूर्ती सुद्धा आपल्याला बघावयास मिळतात त्याच सोबत आपल्याला विष्णूची 24 स्त्री शक्ती सुद्धा याच भागात दिसतात. मंदिराच्या उत्तर बाजूला गाभाऱ्याच्या बाहेर भागावर आपल्याला गणेशमूर्ती  नजरेस पडते. डाव्या सोंडेचा असलेला हा गणेश आहे. या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असाच एक गणपती आपल्याला भारवाहक यक्षा सोबत भारवाहक गणेश म्हणून मंदिराच्या आतील बाजूस खांबाला तोलून धरताना दिसतो. तो भारवाहक गणेश आहे ज्याची सोंड सध्या तुटलेली आहे. याच भागात खांबावर दोन नाग शिल्पे सुद्धा आहेत. कामशास्त्राचे मूर्ती अभ्यासक डॉ अरविंद सोनटक्के यांनी या मंदिरावर असलेल्या काम शिल्पाचा अभ्यास केला आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस एका खांबावर दोन ठिकाणी हे काम शिल्पे आहेत त्यांनी वाचता येण्याच्या कामसूत्रातून काही संदर्भ घेऊन या शिल्पाचा अभ्यास सुरु आहे याविषयी ही माहिती प्रत्यक्षपणे त्यांनी दिली. ही अत्यंत दुर्मिळ शिल्पे आहेत असे त्यांचे मत आहे. असे मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले हे शिवमंदिर अजूनही पर्यटकांपासून वंचितच आहे. आता या मंदिराच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रभरातून अभ्यासक येत आहेत बऱ्याच अभ्यासकांनी या मंदिरावर पीएचडी करण्याचे कामही सुरू केले आहे आपल्या भागात असलेले हे सुंदर शिवमंदिर आपण जरूर एकदा आपल्या नजरेखालून घालावे. पुराण कथाचे अभ्यासक देवदत्त पटनायक आपल्या शिवाची सात रहस्ये मध्ये म्हणतात की "मनात कसलीही कपटी भावना नाही म्हणून यांना भोलेनाथ म्हटले जाते ".शिवपार्वतीचा संयोग सत्तेच्या जोरावर नाही, कुणी विजेता नाही , विजय नाही दोघेही एकमेकांना सत्ता गाजविण्याची संमती देतात. एकमेकांवर शिरजोरी करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही हेच ते प्रेम आहे." मूर्तीशिल्पाच्या भावार्थ मधून हेच दिसून येते आणि आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या एवढ्या मोठ्या वैभवाचा आपण निश्चितच अर्थ लावला पाहिजे या शास्त्रामध्येच त्या काळाचे तत्त्वज्ञान व विचार दडलेले आहेत जे आपल्याला दिशा देणारे ठरतात.



संजय खांडवे

9011971122

बुलढाणा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...