सोमवार, २२ जानेवारी, २०२४

मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता

 मराठा साम्राज्याची जननी -स्वराज्यप्रेरिका जिजामाता




🚩🚩🚩🚩🚩🚩




आपल्या महाराष्ट्राच्या या  शौर्य भूमीकडे शिवजन्मानंतर पुढची दिडशे वर्ष तरी वाकडी नजर करण्याची कुणाची मजल झाली नाही,ज्याने हा प्रयन्त केला त्याला याच मातीत दफन व्हावं लागलं हा या मातीचा इतिहास आहे .शेकडो वर्षानंतरही स्वातंत्र्याची ज्योत आपल्या हयदयात तेवत ठेवत रयतेच्या कल्याणार्थ यदु- भोसलेवंशीय या स्वांतंत्र्य संग्राम आपल्या परिने लढत होते.रयतेच्या कल्याणाची भावना व या भूमीविषयीचा आदर हा त्यांच्या चरित्रातुन वारंवार जाणवतो.तत्कालीन परिस्थितीनुसार आपली बुध्दीमत्ता,शौर्य,स्वाभिमान, त्याग,संघर्ष,पराक्रम या जोरावर दोन्ही वंशीयांनी आपले अस्तित्व दाखवत एक दरारा निर्माण केला होता .या विषयावर मातृतीर्थ बुलढाणा जिल्हयाचे इतिहासकार श्री संतोषराव बाहेकर सर यांनी जाधव_भोसले घराण्याचा सखोल अभ्यास करून राजे लखुजी जाधवरावा सह महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांचे चरित्र आपल्या अखंड परिश्रमातून जगासमोर आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.जाधव -भोसले वंशातील आजपर्यन्त ज्ञात नसलेल्या वीरांचा इतिहास सरांच्या लेखणातून आमच्यासारख्या वाचकांना कळाला या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जुन वाचावा.




       खऱ्या अर्थाने मराठा साम्राज्याची पाया भरणी या दोन वंशीयाच्या त्याग व संघर्षात दिसते .मनात स्वाभिमान जागृत ठेवत त्यांच्या नेतृत्वात याच मातीतील अनेक ज्ञात-अज्ञात नरवीरांनी आपले बलीदान दिले.




बाबाजीराजे भोसले यांच्या वंश बेलीत त्यांना मालोजीराजे व विठोजी राजे हे दोन पराक्रमी पुत्र होते.मालोजीराजे यांचा विवाह फलटणचे देशमुख जगपाळराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई यांच्याशी झाला .मि.किक्रेड व रा ब. पारसनीस शेडगावकरांच्या बखरीनुसार असे म्हणतात की ,लखुजीजाधवरावांच्या शिफारशीवरून जगपाळरावाने आपली बहीण दिपाबाई मालोजीराजास दिली होती .त्यांच्या पोटी शहाजी व शरीफजी या पराक्रमी वीरांचा जन्तम झाला .विठोजीराजे यांना सुध्दा कर्तबगार आठ पुत्र होती .




     जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते.हेमाद्रिकृत व्रतखंडातील राजप्रशस्ती मधील यादवांची वंशावळ इतिहासकार श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या आधिकच्या संशोधनातून मांडलेली आहे .




जाधव, आदय देवगिरी घराणे




रामदेव यादव 




शंकर देव (मृत्यु १३३२)




गोविंद देव(१३१२-१३८०)




 ठाकूरजी (१३८० -१४२९)




भुकण देव उर्फ भेतोजी (१४३०-१५००)




 अचलकर्ण उर्फ अचलोजी(१५००-१५४०)




विठ्ठल देव उर्फ विठोजी(१५४० -१५७०)




लक्ष्मण देव उर्फ लखुजी(१५७०-१६२९)




   सिंदखेडराजा ही जाधवांची  राजधानी या ठिकाणी त्यांनी भव्य वाडयाचे निर्माण केले .या परिसरात अनेक पेठा वसविल्या .निळकंठेश्वर ,रामेश्वर,केशवराज आदि मंदिराचा जिर्णोद्धारासह अनेक लोकउपयोगी कामे केली .रंगमहाल,नृत्यमहाल आदि वास्तूची निर्मिती केली,साहित्य ,कला,स्थापत्य यामधे त्यांना ज्ञानासह रुची होती हे यावरुन दिसते .एका स्वतंत्र राज्याची ही नांदीच होती . २४००० पायदळ ,१५००० घोडदळ व ५२ चावडयांचे वतन पुढच्या काळात लखुजी राजे जाधवांनी स्वकर्तुत्वावर उभे केले होते.   




राजे लखुजी व म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ ला जिजाबाईचा जन्म झाला .




       भोसले -जाधव या दोन घराण्यामधील कर्तबगार वीरांनी त्या काळच्या सामाजिक,आर्थिक,राजकिय व वास्तव परिस्थितीचे भान ठेवत आपला स्वाभीमान राखत वाटचाल केलेली दिसतें.या सर्व बाबी जिजाबाईनी अगदी जवळून अनुभवलेल्या होत्या.




      महाबली शहाजीराजे व राजमाता जिजाबाई यांचा विवाह हा मध्ययुगीन इतिहासाला वळण देणारा ठरला.वेरुळचे भोसले व सिंदखेडचे जाधव हे दोन्ही तुल्यबळ मराठा घराणे होती .या विवाहाने दोन्ही कुटुंबात आनंद व उत्साह होता .प्रामुख्याने या विवाहसंमधी उत्तरकालिन लिखानामधे शहाजी -जिजाबाई यांच्या विवाहातून जाधव -भोसले वैराची कथानके सांगितली गेली .रंगपंचमीच्या दिवशी या दोघाचा विवाह बाबत दरबारात मालोजी राजेनी घोषणा केली होती व विवाह निश्चित केला पण याला जाधवाकडील स्त्रीयांनी लखुजीराजे सोबत ते आपल्या तोडीचे नाहीत असा वाद घातला व दुसऱ्या दिवशी लखुजी जाधवांनी आपण सहज बोललो असे मालोजीस सांगितले.पुढे मालोजीस व विठोजीस नोकरीवरून काढले व ते वेरुळला परत गेले .तेथे त्यांना गुप्त धन सापडले .त्यामधून त्यांनी  आपली फौज जमवली व सिंदखेडला येऊन विवाहाचा दावा केला .यापुढे त्यांनी निजामाचेही लक्ष वळवून विवाहासाठी दबाव आणला  व हा विवाह पार पडला पण या कथानकाला काही अर्थ उरत नाही हे लिखान उत्तर कालिन आहे.मालोजीराजे व दिपाबाई यांच्या विवाहासाठी राजे लखुजी जाधवांनी मध्यस्ती केली नसती.यावरून  त्यांचे नाते संबध त्यांच्या तोडीचे होते असे यावरून दिसते . समकालिन शिवभारतात अशी कोणतीच कथा नाही .परमानंद या विवाहाचे खूप सुंदर वर्णन करतो .शहाजीराजांना ऊतम लक्षणांनी युक्त,दयाशील,युद्धकुशल,महातेजस्वी असे म्हणतो व जिजामातेस विजयलक्षण ,कमलनेत्रा,कुळवान संबोधतो व यासाठी कुबेरासमान लखुजीजाधवांची अनुकुलता दर्शवितो .








सा तं महाशयं प्राप्य वपुरुज्वलम्।




गंगेव गुणगंभीरा व्यराजत महोदधिम् ।।




ज्याप्रमाणे शुभ्र खोल गंगा सागरास मिळाली असता शोभते त्याप्रमाणे तेजपुंज शरीर धारण करणारी गुणवती जिजाबाई गुण गंभीर थोर मनाच्या शहाजी पतींशी संयोग पावून शोभू लागली.हा समकालिन संदर्भ आहे .या  अनैतीहासिक विवाहा प्रसंगीच्या कथानकाचा संदर्भ पुढे खंडागळे हत्ती प्रकरणाशी जोडला जातो व त्यांच्या हाड वैराच्या कथा सांगितल्या जातात .वास्तविक हत्ती प्रकरण हे तात्कालिक प्रासंगिक होते. पुढे भातवडीच्या लढाईत लखुजीराजे यांच्या भमिकेवरून हे लक्षात येते .शिवभारतकारही याचा खुलासा करतो .श्री एस ए बाहेकर सरांनी आपल्या लिखानातून विश्वसनिय संदर्भ देवून याबाबत मांडणी केली आहे. भोसले जाधव असा कोणताही वाद नव्हता हे समकालिन संदर्भावरून दिसून येते.वास्तविक पाहता त्या काळात मराठा सरदारांचा वरचढपणा हा निजाम,आदिल व मोगलशाहीमधील सरदारांना खुपत असे .मलिक अंबरसारखे सरदार त्यांचा द्वेष करत.त्यांना महत्वाच्या मोहीमेंपासून दूर ठेवले जाई .त्याच्या पराक्रमाची दखलही त्या काळात त्यांच्या लेखनकारांनी घेतलेली दिसत नाही .या संघर्षामधून ही सर्व मंडळी जात होती .




राजे लखुजी यांचे वर्चस्व पाहून ,शहाजी राजे सारखी ही दोन शक्ती एकत्र येऊ नये म्हणून की काय ,खंडागळे हत्ती प्रकरण घडविण्यासाठी हवा दिलेली असू शकते यात शंकेला वाव मिळतो .२५ जुलै १६२९ म्हणजे देवगिरीवर निजामाच्या भेटीसाठी आलेले राजे लखुजी,पुत्र अचलोजी,नातू यशवंत तथा अमात्य अशी ४० जनांची अमानवी हत्या करण्यात आली .निजामाच्या डोक्यात त्याच्या वजीराने विष कालवून हा रक्तपात घडवून आणला होता.




      जिजाबाईच्या समोर हे सर्व प्रसंग घडत होते .रयतवत्सल जाधवरावांची ही लेक भोसले कुळाची लक्ष्मी आपला वारसा पुढे तेवत ठेवत स्वराज्याची प्रेरणादायी ठरली .अर्कज्ञ,सहस्रकरविक्रम महाबली शहाजीराजे यांची संकल्पणा त्यांचा त्याग,संघर्ष,पराक्रमातून स्वातंत्र्याची पहाट होण्यास सुरूवात झाली ." शहाजीराजे भोसले यांनी एक निजामपुत्र गादीवर बसवून ,त्यास एका किल्यात बंदीत ठेवून ,नाशिक,त्र्यबकेश्वर,संगमनेर,जुन्न२,ताब्यात घेऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला होता .''असे बादशहानामा सांगतो.१६२९ ते १६३६ पर्यन्त त्यांनी हा कारभार पाहीला.




       जिजाऊमासाहैबांनी स्वराज्यासाठी दोन वीर पुत्राना जन्म दिला .या मधे थोरले पुत्र संभाजी व छत्रपती शिवाजी राजे . शिवनेरीवर १९ फेब्रु १६३० ला  हा शिवसुर्य उगवला .मातृ-पितृ तथा स्वकुलीन पूर्वजांच्या अथक संघर्षाचा ,पराक्रमाचा,त्यागाचा वारसा मातेच्या संस्कारातून सतत पाझरत होता .शिवाजी राजे वयाच्या सहा वर्षापर्यन्त महाराष्ट्रातच होते .शिवनेरी व काही काळ सिंदखेडराजा येथे माता जिजाऊंच्या संस्कारात ते वाढत होते .शिवरायांच्या जन्मानंतर शहाजीराजे यांच्या यशात अधिकाधिक भर पडत गेली .कर्नाटकात बंगलुरु येथे शिवरायांचे बालपण वयाच्या बाराव्या वर्षापर्यन्त गेले .सातव्या वर्षोच शिवबाना लिपिचे ज्ञान झाले .त्यांच्यासाठी शहाजी-जिजाऊंच्या तालमित निष्नात आचार्य नेमले गेले.राजकारण,युद्धकौशल्य या सारखी राजा होण्यासाठी लागणारे संस्कार जिजाऊ-शहाजीराजेंनी शिवबावर केले व वयाच्या १२ व्या वर्षो  शिवबा 'सनय ' होऊन महाराष्ट्रात आले असे समकालिन शिवभारत सांगतो .एका राजाला लागणाऱ्या सर्व बाबी ध्वज,राजमुद्रा,अमात्य तथा विश्वासु सेवक शहाजीराजे यांनी जिजाऊ-शिवबा यांना  पुण्याच्या जहागिरिवर पाठविले.दुसऱ्या बाजू।ला थोरले पुत्र संभाजीराजे  ,तुकाबाई व पुत्र व्यंकोजीराजे यांना सोबत दक्षिणेत ठेवले.ही खऱ्या अर्थाने जिजाऊ-शहाजीराजे यांच्या संकल्पनेतील व प्रेरणेतील "स्वराज्य " म्हणजेच पुढच्या काळातील "मराठा साम्राज्याची" पायाभरनीच होती .स्वराज्यजननीचा हा महान त्याग होतां पती- पुत्रा पासून दुर राहून बाल शिवबाला घडवत रयतेचे राज्य निर्मायचे होते . स्वराज्यासाठी दोन छत्रपती घडविणाऱ्या या मातेचा आदर्श पुढे येसूराणीसाहेब,ताराराणीसाहेब यांनी घेतलेला दिसतो ."श्री सखी राज्ञी जयती ।"  ही शिक्का कटयार घेत आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळणारी संस्कृती आमची ,आणि त्या संस्कृतीचा वारसा त्यांना जिजाऊ मॉसाहेबाकडूनच मिळाला होता . एका छत्रपतींनी स्वराज्य उभं केल व दुसऱ्या छत्रपतींनी ते आपल्या खांदयावर शेवटच्या श्वासापर्यन्त तोलून धरलें.या पाठीमागे जिजाऊचेंच संस्कार होते .स्वराज्य स्थापनेपासून तर राज्यभिषेकापर्यन्त वेळोवेंळी मॉसाहेबांची प्रेरणा शिवरायासोबत होती. अफजल खानाच्या भेटी वेळी स्वराज्यासाठी पुत्र मोह बाजूला ठेवून छत्रपतींना विजयी आर्शिवाद देणारी राजमाता या मातीने बघीतली.....छत्रपती पन्हाळावेढयात असतांना प्रसंगी हातात तलवार घेऊन राजमाता सज्ज होतांना याच मातीने बघीतलं .......




जननी शिवराजस्य सा राजगिरी वर्धिनी।




महाराजांच्या आग्राभेटीच्या वेळी ते नजरकैदेत असतांना यशश्वीपणे स्वराज्य सांभाळण्याचं काम याच मातेने केले.....




एक लोककल्याणकारी छत्रपती  रायगडी सुवर्ण सिंहासनाधिश्वर होतांना याची देही आणि याची डोळा या मातेने बघीतले.....रायगडी छत्रपती सिहासनाधिश्वर होणे ही गोष्ट काही सामान्य नव्हती.हा शेकडो वर्षाच्या गुलामगिरीचा अंत होता ,ही एक सार्वभौमत्वाची नांदी होती नव्हे तर मध्ययुगीन इतिहासातील पहिला स्वातंत्र्य दिवसच होता .




      पुढच्या काळात या स्वराज्य रक्षणार्थ अनेक बलिदाने झाली याचे कारण एकच मॉसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आदर्श,स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण हेच आहे .यातूनच पुढे " मराठासाम्राज्य " अटकेपार गेले.दिल्लीच्या तत्खाला हलविण्याची ताकद मराठयात निर्माण झाली .




शंभूछत्रपतींनी ९ वर्ष आपल्या खांद्यावर स्वराज्य तोलून ठेवले त्यांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी आपल्या हयातीत ११वर्ष औरंगजेबास झुलत ठेवले ,रायगडावरून प्रतापगड,सज्जनगड,सातारा,पन्हाळा असा प्रवास करत छत्रपती राजाराम महाराज मोगलांना शह देत होते ,येसूराणीसाहेबांनी शंभूराजानंतर राजारामाचे मंचकरोहन केले व या मराठयाच्या राजास पकडण्यासाठी ओरंगजेबाने आपले सैन्य जंग जंग पछाडले होते




     पन्हाळगडावर राजाराममहाराज असतांना मोठया शिताफिने आपल्या अनेक सरदारासह वेषांतर करून ते जिंजीकडे निघाले




संताजी ,धनाजी,बहिजी ,खंडो बल्लाळ व आपले गुप्तहैरासह मार्ग क्रमण करत होते 




वाटेत अनेक मावळे शहिद झाले यात एका बेटावर छावणी असताना मोगलीसरदारानी (अबदुल खान)अचानक छापा टाकला  मराठयांनी जोरदार शह दिला यात मराठयाचा राजा पकडला गेला म्हणून त्यांना आनंद झाला पण तो नकली निघाला ,शिवा काशिदांसारखे एका अनामिक मावळयाचे आत्मबलिदान स्वराज्यासाठी झाले पुढे पन्हाळगड ते वेल्लोर हे अंतर ३३ दिवसात कापले 




   शिवरायांनी जिंजीचा किल्ला अभेदय करून ठेवला होता स्वराज्याची पुढची राजधानी जिंजी ,मद्रासकडील समुद्र किनाऱ्यापासून तर नाशिक पर्यन्त ,सहयाद्रीच्या कान्या कोपऱ्यात राजारामांच्या नेतृत्वात स्वराज्यच भगवं निशान फडकत होत  या काळात बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, संताजी जगताप, रूपाजी भोसले ,।बिदनूरच्या चन्नमा राणी,मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादीनी मोलाची साथ दिली .महाराणी येसूबाई व छत्रपती शाहूनी २९ वर्ष स्वराज्यासाठी वनवास भोगला.संताजी घोरपडे,धनाजी जाधवासारखी नरव्याघ्र आपल्या पराक्रमाची शर्थ लावून लढत राहिली  .पुढची सात वर्ष महाराणी ताराराणी साहेबांनी मोघलांना सळो की पळो करुन सोडले .लाखाचा लवाजमा घेऊन येणारा इराणपासूनचा बादशहा याच मराठा साम्राज्यात हतबल होऊन संपला.




 "जिजाऊ -शहाजी राजेची प्रेरणा,शिवरांयांचे प्रजावात्सल्य म्हणजेच स्वराज्य ,आणि स्वराज्य म्हणजेच स्वातंत्र्य   पुढे ते साहित्यवीर,स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांनी आपल्या खांद्यावर पेलले या स्वातंत्र्य युद्धात छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाईसाहेब सरकार,संताजी घोरपडे,धनाजी जाधव छत्रपती थोरले शाहूराजे ,द ग्रेट मराठा महादजी शिंदे पर्यन्त त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माची मावळे या स्वांतत्र्यसमरात लढली.




अटकेपार भगवा झेंडा फडकविणारे हेच स्वराज्यजननी जिजामातेचे "मराठा साम्राज्य ".




















संजय खांडवे




9011971122

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...