मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

नवा आचार विचार धर्म शिकवणारा संत..!!*

 *नवा आचार विचार धर्म शिकवणारा संत..!!*



 प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे संत गाडगेबाबांचे चरित्र 1952 ला त्यांनी लिहिले. अतिशय प्रभावी मांडणी प्रबोधनकारांनी केली संत गाडगेबाबांच्या असामान्य कार्याचे विवेचन अतिशय मार्मिकपणे व त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना जिवंत करून मांडलेल्या आहेत. लोकश्रद्धेला वळण लावणाऱ्या महापुरुषांचे जीवन चरित्र पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरते याची जाणीव प्रबोधनकारांना होती.  आपल्या प्रबोधनात्मक व परखड शैलीत संत गाडगेबाबा पुढील हजारो वर्षासाठी चरित्र रूपाने व शब्द रूपाने जिवंत केले . त्यांच्या आवाजातील मुंबई येथील त्यांचे शेवटचे कीर्तन तर नवीन आचार विचार धर्म शिकवते. परखड आवाजातील कीर्तन मेंदूत प्रचंड वैचारिक मंथन निर्माण करणारे ठरते.

     "नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू म्हणा, संत म्हणा, महात्मा म्हणा, काय वाटेल ते नाव द्या श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढेही लोकोत्तर परंपरा कोणी टिकवून चालवेल असेही वाटत नाही "असे प्रबोधनकार बाबांचे चरित्र लेखन करताना आपल्या मनोगतात लिहितात .अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव या गावी सखुबाई आणि झिंगराजी यांच्या पोटी डेबूजींचा जन्म झाला. झिंगराजी हे शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचे नातू होते.

   सुख वस्तुने अगदी सर्वकाही संपन्न होते. गुरे- ढोरे ,शेती आदि सर्व काही चांगलं सुरू होतं, पण अनेक अडाणी ,रुढी परंपरेने नेहमीच्या द्याव्या लागणाऱ्या कोंबडे- बकरे, दारूच्या नवसाने त्या काळात कहर केला होता .वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडगूस घालून दारूच्या पाटात बकऱ्याची कंदुरी प्रत्येक घरात झाली पाहिजे अशी रीतच होती .यातच झिंगराजींना दारूचे व्यसन लागलं यामुळे सखुबाई आणि छोट्या डेबुजी शिवाय झिंगराजी कडे शेवटी काहीच उरलं नव्हतं. "आता माझ्या डेबुजीचा सांभाळ कर, तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडेल, पण त्याला बोकड खाऊ दारुड्या देवांच्या नादी लावू देऊ नकोस." इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला होता. डेबुजी लहान असले तरी पुढील काळात त्यांच्या मनावर याचा प्रचंड परिणाम झाला असावा. चंद्रभान मामाने बहीण सखुबाई सह डेबुजी चा सांभाळ केला. मामाची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. याच व्यवस्थेत वावरत असताना सावकाराच्या कर्जापोटी चंद्रभान मामाचा ही बळी गेला. घर खर्चाला आळा घालत कष्ट करून सर्वकाही सुरू असताना शेतावर ताबा घेण्यासाठी आलेल्या तिडके सावकाराला डेबुजींनी मोठ्या हिमतीने पळून लावले होते. मातीत कष्ट करून घाम गाळून सोनं पिकविणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा ही डेबुजी जाणून होते. स्वाभिमानानं अन मेहनतीने काम करून सुखाचा घास खावा. ताठ मानेने जगावे, पण सावकारी पाशं, त्यातच अनिष्ट रूढी- परंपरेत, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला हा समाज मुक्तपणे श्वास आणि घासही घेऊ शकत नव्हता. डेबुजी हे जवळून पाहत होते पण करणार काय लहान असल्याने कोणी ऐकतही नव्हतं .त्यापुढे त्यांनी स्वीकारलेला मार्ग हा लोकोत्तर महापुरुषाकडे नेणारा ठरतो .गोवारी -भजन पार्टी पासून दगडांच्या चिपळांची टाळ करून भजन कीर्तनातून अभंगातून प्रबोधनाची सुरुवात त्यांनी केली.


तुका म्हणे सुख घेतले गोपाळी।

 नाचती कांबळी करुनि ध्वजा.।।

 करूनिया टिरी आपुलिया मांदळ।

 वाजविती टाळ दगडाचे।।

     खरे अन्नदान काय असते हे गोवारी -भजन पार्टीतून डेबुजीने दाखवून दिले." गड्याहो आपण तर सारेच जेवतो" पण ज्यांना कधी खायला सुद्धा भेटत नाही अशा उपेक्षितांसाठी त्यांनी खऱ्या अर्थाने कृतीतून अन्नदानास सुरुवात केली. असे अन्नदानाचे उत्सव दापुला डेबुजींनी अनेक केले. डेबुजींच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ होत गेल्या. "बुडती हे जन न देखावे डोळा" हा तुकोबारायांचा विचार डेबुजींच्याही मनात होताच. त्यांना मुलगा आणि मुलीही झाल्या परंतु त्यांनी कधीही कोंबडे -बकरे कापून प्रसंग साजरा केला नाही. मुलगा मुदगल याच्यात डेबुजींचा मोठा जीव होता. सहा महिन्याचा असताना तो अचानक गेला त्यावेळी त्यांच्या भाऊबंदांनी कोंबडे- बकरे न कापल्याने  असे अरिष्ट ओढावले असे ते म्हणू लागले ,पण स्थिर चित्त आणि असामान्य ध्येयाकडे धावणारे हे लोकोत्तर महापुरुष होते. 1 फेब्रुवारी 1905 रोजी पहाटे तीन वाजता मातोश्री सखुबाईचे हळुवारपणे दर्शन घेऊन कुंताबाई ह्या मुलगी आलोका व कलावतीला कुशीत घेऊन झोपलेले असताना भल्या पहाटे या क्रांतिकारी प्रयाणाचा प्रसंग घडला.

        तहानलेल्यांना पाणी पाजणारा, भुकेलेल्यांना अन्न देणारा, नग्न असणाऱ्यांना वस्त्र देणारा परमेश्वर त्यांनी सांगितला. संत विचारांचा व वारकरी परंपरांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता. संत कबीर ,संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांचे दाखले ते आपल्या कीर्तनातून सतत देत असत . या संतांसमोर मी कोणत्या झाडाची पत्ती! असे ते  म्हणत असत. प्रेम ,सहानुभूती ,करुणा, भूतदया हा त्यांच्या विचारांचा पाया होता. अविद्येचे अनर्थ त्यांनी त्यांच्या जीवन संघर्षातून जाणले होते, म्हणून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारा दिवा तुमच्या घरात प्रकाशमान ठेवा असे ते कीर्तनातून आवर्जून लोकांना सांगत असत. प्रसंगी घरातील ताट विका अंगावरील कपडयावर कमी खर्च करा पण लेकराले शिकवा.  हा त्यांचा कळवळा असे.

      माणसात देव शोधणारा संत म्हणजे संत  गाडगेबाबा! देव शोधता- शोधता देव होणाऱ्या तुकोबारायाच्या अभंगाचे दाखले त्यांच्या कीर्तनातून ते सतत देत.


देह असूनिया देव।

 वृथा फिरतो निर्दैव।।

 देव आहे अंतर्यामी ।व्यर्थ हिंडे तिर्थग्रामी।।

    बाबा दरवर्षी पंढरपूरला जात असत नाशिक आळंदी देहू अशा अनेक तीर्थस्थळावर त्यांनी भेटी दिल्या पण ते मंदिरात कधी दर्शनासाठी क्वचितच गेले असतील. तीर्थस्थळावरील परिसर स्वच्छ करून ते जनसेवा करत असत. त्या ठिकाणी घाट, धर्मशाळा, आश्रमशाळा, छात्रालय ,सदावर्त आदि लोकसेवा जोपासणारी लोककल्याणकारी स्थळे निष्काम कर्मयोगाने राष्ट्रकल्याणार्थ उभी केली. तीर्थक्षेत्री आलेल्या श्रद्धाळूंचा बुद्धिभेद त्यांनी कधी केला नाही. बाबांना पंढरपुरी आल्यानंतर कुणी विचारले "बाबा देवदर्शन घेऊन आलात का देवळातून?" त्यावर फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे नि घाटाकडे बोट दाखवत बाबा म्हणत," हा समोर जागता ,बोलता, नाचता विठ्ठल असताना देवळात जायचे कशाला? देव काय देवळात बसलाय वाटतं ?जिकडे नजर टाकावी तिकडे तो अपरापार भरलेला आहेच!."

       बाबा कीर्तना अगोदर त्या गावची स्वतः खराटा घेऊन स्वच्छता करायचे. सोप्या प्रचलित ओघवत्या भाषेत, जनमानसात रुजलेल्या शब्दात, त्यांच्याच बोलीभाषेत बाबांचे किर्तन असायचे. शाब्दिक चर्चेत ते कधीच अडकायचे नाही. तुकोबारायांनी जशी लोकभाषेतून अभंग रचना केली ,रसाळ दृष्टांत दिले तशीच वाणी बाबांचे असायची .जीवनात नेहमी घडणाऱ्या घटनांचे ते दाखले देत. कीर्तनस्थळी असलेल्या जेवणावळीत ते कधीच दिसले नाही ,उलट बाजूला जाऊन आपल्याजवळ असलेली अर्धी कोरी भाकर खाऊन ते लगेच कीर्तनाला हजर होत असत. कीर्तनाचा विकरा त्यांना तुकोबारायाप्रमाणेच मान्य नव्हता.


जेथ किर्तन करावे।

 तेथ अन्न न सेवावे।।

 बुक्का लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।।


हा त्यांचा नियम ते आवर्जून पाळायचे.


तुका म्हणे द्रव्य देती।

 घेती दोन्ही नरका जाती।।

     हा शोषणाचा बाजार त्यांनी कधीच तोडला होता. या शृंखला तोडणे गरजेचे होते. कोणत्याही शाळेत न गेलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा एक चालते बोलते विद्यापीठ होते. नवा आचार विचार धर्म शिकवणारा साधू आजच्या काळात अधिक समजून घेणे फार आवश्यक आहे. माणुसकीची पूजा करून देव शोधा ......!!!!आता असे लोकोत्तर कर्मयोगी युगपुरुष होणे नाही......!!!



संजय खांडवे बुलढाणा 90 11 97 11 22

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

हिवऱ्याच्या अनंतनाथास

 *हिवऱ्याच्या अनंतनाथास उदंड आयुष्य लाभो!!!!!!!*

♾️♾️♾️♾️♾️♾️🌷


#जे जे जेथे पावे । ते ते तेथे सर्मपावे सेवे ॥


#तुका म्हणे


नित्यानंद सेवा केद्राच्या माध्यमातून तुम्ही करत असलेली सेवा शद्वात बसणे शक्य नाही .


#फोडीले भंडार धन्याचा हा माल ।

#मी तो हमाल भार वाही।


या भावनेतून आपण हे काम करत आहात . आजच्या चमकेगीरीच्या काळात कोणताही लाभ ,मोह न ठेवता  कृतीशील समाजसेवेचा आदर्श आपण घातलात !

आम्ही आमच्या जवळ जे आहे ते देऊ शकत नाही आणि तुम्ही तुमच्याजवळ जे आहे- नाही ते भरभरून देता हा आमचा करंटेपणाच !

आम्ही आमचा वाढविला  तो पसारा अनं तुमच्या जवळ जो आहे तो पिसारा हे मात्र नककीच ! आपल्या कार्यास अनंत शुभेच्छा !

आम्ही मणभर नाही परंतु कणभराचे भागीदार नककीच असू !

तुमचा वाढदिवस आमच्या साठी शुभेच्छा देणारा पण त्या निरागस निराधारांसाठी मात्र आयुष्यात प्रकाश देणारा  !  दाखविणारा सूर्यचं जणू !

जो कधी मावळणार नाही तो अनंत ..........

सदैव चैतन्य ज्याच्यात खेळत राहते असा सचेतन......

गणिताच्या व्याख्येत  अमर्याद,अमाप.......

कोणत्याही मापात टाका,

#एक आदर्श शिक्षक

#वक्ता

#लेखक

#कवी

#निवेदक

#मित्र

#ज्याच्या ज्या नात्यात असेल त्या नात्यातही !

अगदी परिपूर्ण बसणारे आमचे मित्र ,

अगदी पहिल्या भेटीपासून ज्यांना आम्ही प्रेमाने "महाराज" म्हणतो. पण तुम्ही कधी "संधी साधू" मात्र वाटला नाही.......!!!! . तुम्ही उपेक्षितांना संधी देणारे आम्हाला दिसले. आपल्या मराठी भाषेलाच नव्हे तर इंग्रजीलाही अलंकार चढवणारे तुम्ही थोर सुवर्णकारही आहात. तुमच्या सहवासात हे आम्हाला पदोपदी जाणवत राहायचं . यात कुशल सुवर्णकाराच्या हातातून निर्माण झालेला हस्ताक्षर ही तितकंच माणिक मोत्यासारखं सुंदर .........!! हेवा वाटायचा आम्हाला !!!अश्या अष्टपैलू समाजशील, अनाथांचा नात असलेल्या असामान्य काम करणाऱ्या व्यक्तीमत्वास उदंड़ आयुष्य असायलाच हवे!!!

      अनंतनाथा .......!!!!

आम्ही आमचे घरटे कधीचेच विणले, त्या घरटयात आमच्या पिलांना आम्ही रोज त्यांच्या चोचीत दाणे भरवतोय, त्यांना आम्ही सर्व काही देतोय पण तू दुसऱ्याच्या अनाथ असाहय असलेल्या पिलांना आजच्या खुज्या युगात घरटी बांधून त्यांना दाणी भरवण्या सोबत उडणेही शिकवतोय,  हे  असामान्य काम सामान्य करूच शकत नाही ! आपल्या कार्यास आपल्या वाढदिवसा सह अनंत शुभेच्छा!बापमाणूस अनंता !



♾️🙏🏻 संजय खांडवे, बुलढाणा

शिवनेरी

 *शिवनेरी* 



*स्थान*- शिवनेरी ता. जुन्नर जि. पुणे , उंची 3500 फूट

*मार्ग*- पुणे पासून १०० कि.मी., पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगाव पासून 18 कि.मी., छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगर- बेल्हे- आळेफाटा मार्गे 208 कि.मी.


'"संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग "असे रामचंद्रपंत अमात्यांनी आपल्या आज्ञापत्रात लिहिले आहे. अनेक प्राचीन ग्रंथातही किल्ल्याचे महत्व विषद केले गेले आहे. एक किल्ला हजारो सैन्याचे काम करत असे,  एक बुरुज म्हणजे एक मोठी फलटणच असे, त्याचा अभेद्यपणा हा त्या राज्याच्या शक्तीचा भाग असे. सातवाहन काळापासून किल्ले-दुर्ग यांची निर्मिती सुरू झाली. त्यापैकीच एक शिवनेरी हा गिरीदुर्ग सातवाहन काळात  महत्त्वाचे केंद्र होता. समुद्रमार्गे ग्रीक ,रोमन, इजिप्त यांचा व्यापार भारताशी होत असताना जुन्नर -पैठण- भोकरदन- तेर आदी शहरांना जोडणाऱ्या मार्गातील महत्त्वाचे केंद्र जुन्नर होते. कोकणातून कल्याण ,सोपारा अशा पश्चिम किनारपट्टीवरील बंदरातून देशावर येण्यासाठी नाणेघाट या मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. नाणेघाटातून वर आल्यानंतर जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी या पहारेकरी किल्ल्यासोबतच आकाराने मोठा व तेवढाच अभेद्य ,चढाईस कठीण तथा सर्व सुख सोयीने युक्त असा शिवनेरी किल्ला होता.  हा किल्ला शिवनेर या खोऱ्यात येतो. महाकाय प्रचंड असा जमिनीवरून जहाजासारखा दिसणारा व आकाशातून महादेवाच्या पिंडीसारखा आकार असलेला या शिवनेरी किल्ल्याच्या दक्षिणेला मीना नदीवर वडज धरण आहे. किल्ल्याच्या उत्तरेला अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री दिसतो. पूर्व बाजूस मानमोडी लेणी समूह आहे व पश्चिमेस तुळजा लेणी समूह आहे. शिवनेरीच्या कातळात सुद्धा अनेक बौद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी या किल्ल्यावर झाला म्हणून शिवप्रेमींच्या हृदयात या किल्ल्याचे विशेष स्थान आहे .


यत: शिवगिरेर्मून्र्धि जात:स पुरुषोत्तम:।

तत: प्रसिद्धा लोकsस्य शिव इत्याभिधाsभवत।।

 

 समकालीन शिवभारत या ग्रंथामध्ये वरील श्लोक आला आहे. यामध्ये शिवनेरी गिरीदुर्गावर शिव या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला या किल्ल्याच्या नावावरून जनमानसात शिव हे नाव प्रसिद्धीस पावले.  रोज हजारो शिवप्रेमी या शिवजन्म स्थळावर नतमस्तक होतात. 

          जुन्नर शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून (चौकातून) किल्ल्याच्या दक्षिण बाजूने बरेच वरपर्यंत मोठ्या वाहनाने वाहनतळापर्यंत पोहोचता येते. इथूनच आपण पहिल्या क्रमांकाच्या दरवाजापर्यंत पोहोचतो याच वाटेने आपल्याला सात दरवाजे लागतात. थोड्या दगडी पायऱ्या चढून झाल्यावर महादरवाजा लागतो. असाच परवानगी दरवाजा, हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा ,पीर दरवाजा, शिवाबाई दरवाजा, फाटक दरवाजा, कुलापकर दरवाजा पार करत पुढे जात असताना किल्ल्याला असलेल्या भक्कम ततबंदीचे दर्शन होत जाते. यादव, शिलाहार ,बहामनी, मोगल काळात या किल्ल्यावर बांधकामे होत गेली .जवळ येईपर्यंत दरवाजे दिसत नाहीत पण प्रत्येक दरवाजे हे परस्परांच्या टापूत आहेत असे दिसतात. प्रवेशद्वारावर गणेशपट्टीचे दर्शन होते. समोरच कातळ कपारीतील शिवाई देवीचे मंदिर आहे .मूळ गाभारा प्राचीन आहे. मंदिराचे इतर बांधकाम बांधकाम पेशवेकालीन दिसते. कुलापकर दरवाजा ओलांडल्यानंतर उजव्या बाजूस खोल दरी आहे व त्या कपारीत पानपुढे आहेत त्यांना गंगा -यमुना असे म्हणतात. गडावर पाण्याची व्यवस्था मुबलक आहे असंख्य पाण्याची टाकी व तलावही आहेत. विशेष म्हणजे दुष्काळातही या टाक्यात पाणी राहते. याच पानवठयाच्या टाक्यातून व तलावातून काढलेला दगड बहुदा गडावरील इमारती बांधकामासाठी वापरला जात असे. विविध सत्ताधीशांच्या काळात परिस्थितीनुसार बुरुज, तटबंदी व इमारतीचे बांधकाम केले गेले तिथेच आपल्याला अंबरखाण्याची मोठी इमारत दिसते .यात धान्य ठेवले जात असे .मलिक अहमदच्या काळात अंबरखाण्याचे काम झाले. थोडे चालत गेल्यावर उजव्या बाजूस वर टेकड्यावर शिवकुंज इमारत दिसते ती आधुनिक काळातील आहे. येथे जिजाऊ व बाल शिवबा यांची धातूची मूर्ती आहे. समोरच कमानीची मशिद आहे. या मशिदीवर वरच्या बाजूस फारशी भाषेत दोन शिलालेख कोरलेले दिसतात .त्याखालीच पानपोढी आहे. ही अर्धी उघडी व अर्धी बंदिस्त आहे . ही प्राचीन काळातील आहे. याच पानपुढीच्या बाजूने खाली जुन्नर शहरात उतरणारा साखळीचा मार्ग आहे. ही वाट कातळ कडेतून जाते व अवघड आहे या वाटेतूनच बौद्ध लेण्यांमध्ये पोहोचता येते. मशीदच्या पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष दिसतात. या ठिकाणी हमाम खाना आहे .भूमिगत पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था यात दिसते. इस्लामी राजवटीत हे बांधकाम झाल्याची प्रचिती येते. असा हमामखाना म्हणजे स्नानगृह बऱ्हाणपूरच्या ताप्ती नदीच्या बाजूला असलेल्या महालात आजही चांगल्या अवस्थेत आहे. शिवनेरीवर अवशेषच दिसतात .समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळ असलेली दुमजली इमारत आहे. खालच्या खोलीत पाळणा ठेवलेला आहे. याच खोलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वर जाण्यास पायऱ्या आहेत. येथून पुढे समोरच्या टोकावर बदामी तलाव आहे. बदामी तलावाच्या मध्ये दगडी खांब आहे. खापरी पाईपचे अवशेषही या ठिकाणी दिसतात. त्या ठिकाणी त्या काळामध्ये कारंजाची व्यवस्था केलेली असावी असे दिसते .समोरच्या टोकावर इमारतीच्या अवशेषही आहेत तेथे कारागृह होते व त्या कारागृहाच्या समोरचा भाग हा कडेलोट म्हणून ओळखला जातो. तेथून गुन्हेगारांचा कडेलोट केल्या जायचा. 

         किल्ल्याचा एकंदरीत इतिहास पाहता हा किल्ला स्वराज्यात कधीच नव्हता. बहामणी, निजामशाही, मुघलशाही  या मध्ये हा किल्ला झुलत राहिला. शहाजीराजांच्या जहागिरीत हा किल्ला होता. 1630 ते 1636 हा कालावधी शहाजीराजांच्या जीवनातील एक अत्यंत धामधुमीचा कालावधी होता. स्वातंत्र्याची आस या मातीला लावून देणारे शहाजीराजे यानी  त्याकाळात या शिवनेरी किल्ल्याचे महत्त्व ओळखले होते. या किल्ल्याचा किल्लेदार विश्वासराज याची कन्या जयंती हिचा विवाह शहाजीपुत्र संभाजींशी झाला होता .तो याच शिवनेरी किल्ल्यावर झाला अशी नोंद आहे. यामुळेच जिजाऊ देखील शिवजन्माच्या वेळी सुरक्षिततेसाठी या किल्ल्यावरच शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था केली होती. 1636 नंतर निजामशाहीवर वचक बसवण्यासाठी शहाजहानने हा किल्ला  आपल्या ताब्यात घेतला होता. १६५७ व १६७८ अशी दोन वेळा या किल्ल्याला स्वराज्यात घेण्याची मोहीम आखली गेली परंतु ती अयशस्वी राहिली .पुढे पेशव्यांच्या वीरेश्वर चितळे या सरदाराने शिवनेरी किल्ला घेण्यात मोठी कामगिरी बजावली होती.  परंतु २० मे १८१८ रोजी पुन्हा इंग्रजांनी तो आपल्या ताब्यात घेतला .हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत रमणीय आहे. या किल्ल्याच्या परिसरात अनेक लेणी समूह आहेत . रमणीय असा माळशेज घाटही येथून जवळच आहे. एकट्या शिवनेरीच्या डोंगरातच 78 लेणी आहेत शिवाय अनेक पाण्याची टाकी देखील आहेत या लेण्यांमध्ये शिलालेख सुद्धा आढळतात आत मध्ये चैत्यगृह सुद्धा आहेत त्या ठिकाणी पोहोचणे मात्र अत्यंत अवघड आहे. दोन अष्टविनायक याच परिसरात येतात. ओझर, लेण्यांद्री व जुन्नर या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था आहे. निसर्ग सौंदर्य  मनमोहक आहे त्यामुळे हा परिसर निसर्गप्रेमी व इतिहास प्रेमींना सतत खुणवत असतो.




संजय खांडवे बुलढाणा

9011971122

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

लोकसंस्कृतीचा अविष्कार जपणारा सण: दिवाळी*

 *लोकसंस्कृतीचा अविष्कार जपणारा सण: दिवाळी*


जशी आपली प्राचीन सिंधू संस्कृती आहे तश्याच अनेक संस्कृती आपल्या पृथ्वीतलावर नांदून गेल्या. त्यांना 'सभ्यता' असेही म्हणतात. सभ्य लोकांनी निर्माण केलेली संस्कृती म्हणजे 'सभ्यता'. हजारो वर्षानंतरही आज जगाला प्राचीन संस्कृती विषयी विलक्षण आकर्षण आहे. याचे कारण त्यांच्या लोकजीवनातील परंपरेतून निर्माण झालेले आदर्श, आजही आपल्या जीवनाशी जुळून पहिले तर ते सरसच ठरतात. जगातील जवळपास संस्कृतीच्या मुळाशी माता आहे. जसे व्हिनस, इश्तार , मिनर्व्हा, आदि स्त्रीरूपदेवता इतर संस्कृतीत आढळतात. तशाच आपल्या मोहेंजो-दडो -हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या प्राचीन शहरातील उत्खलनात मातृदेवतांची प्रतीके सापडली आहेत .पूर्वी समूहाने राहत असताना स्त्री त्या समूहाची प्रमुख असे .पुढे गण व्यवस्था अस्तित्वात आल्या व ती गणाची प्रमुख झाली. सृजनशीलता स्त्रीच्या अंगी होती. ती नवनिर्मितीची प्रेरणा होती .तिच्यामध्ये असलेल्या विशेष कार्याने ती मातृदेवतेच्या स्थानावर पोहोचली. निरीक्षणातूनच तिने शेतीचा शोध लावला. जन माणसांच्या नेणीवेत असलेली 'निऋती ' ही शेतीचा शोध लावणारी पहिली स्त्री ठरली.

     आपल्या प्राचीन संस्कृतीची नाळ कृषी परंपरेची अगदी घट्ट बांधलेली आहे .भाद्रपद अमावश्येच्या दुसऱ्याच दिवसापासून सणसमारंभाची रेलचेल दिसते .प्रदिर्घ वर्षाकाल संपल्यानंतर भूमाता धन, धान्य आणि सौंदर्याने भरून जाते. अश्विन शु. पासून नवरात्र उत्सवास म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजनास सुरुवात होते .अश्विन शु. पौर्णिमेला लक्ष्मीच्या आगमनानिमित्त जागरणातून "को जागर्ति" म्हणजे कोण जागे आहे अशी विचारणा करून आपल्या लेकरांच्या कृतीशीलतेची चाचपणी मातृदेवता करत असल्याची जाणीव होते. धन ,धान्य, समृद्धीचा व विचार ,आचार सदाचारांचा व परंपरेचा कोजागिरी हा मेळावा आपल्या कृषी परंपरेचा भाग ठरतो.

     महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा डॉ सरोजिनी बाबर यांनी 1990 ला संपादित केलेला दसरा दिवाळी हा ग्रंथ महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आरसाच ठरतो. आपल्या वाडवडिलांनी चालवत आणलेल्या प्रथा, परंपरेचे पुण्यस्मरणच या निमित्ताने होते. दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा सण आहे. इ. स. पूर्व पासून याचे पुरावे आढळतात. हीच समिक्षा या ग्रंथाच्या संपादनातून संपादकांनी केली आहे. दिवाळीला इ.स. 1 ते इ. स. 400 या काळात "यक्षरात्री" म्हटले जायचे. वात्सायनाच्या "कामसूत्र" या ग्रंथात हे नाव वापरल्याचे आढळते. आज पासून 1700 वर्षांपूर्वी "दिपप्रतिपदुत्सव" असे कनोजच्या राजाने आपल्या नागानंद या नाटकात म्हटलेले आढळते .कश्मीरमध्ये इ. स.800 च्या काळात नीलमन पुरानात "दिपमाला "असे संबोधले गेले. इ.स.949 मध्ये सोमदेव सूरीने लिहिलेल्या "यशस्तिलक" या ग्रंथात दिवाळीची वर्णने येतात. संत नामदेव ,संत ज्ञानेश्वराच्या समकालीन असलेल्या महानुभाव साहित्यातील "लीळाचरित्रात" तेलंग स्नान व ओवाळणीचा सोहळा वृत्तांत येतो. अबुल फजलच्या "एने अकबरी" मध्ये दिपावलीचे वर्णने आढळतात .अकबरही त्याच्या संपूर्ण महालात दीवे लावायचा .दौलत खांण्या समोर 40 फुट उंच स्तंभ रोवला जायचा व 16 दोरखंड लावून त्या स्तंभावर विशालदीप लावला जात असे. जैन धर्मातही चार दिवस दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. भगवान महावीरांच्या मोक्षानंतर या उत्सवास सुरुवात झाली. 2500 वर्षांपूर्वी अमावश्येच्या दिवशी त्यांचे निर्माण झाले होते .आता ज्ञानाचा दीप निघून गेले आहेत म्हणून आपण मातीचे दीवे पेटवून प्रकाश प्रज्वलित केला पाहिजे म्हणून ही परंपरा जपली जात आहे. प्रभू रामचंद्रांचे 14 वर्षे वनवासातून आगमन होणे या क्षणालाही या उत्सवाची दीपोत्सवाच्या रूपाने जोडले जाते.

      अश्विन महिन्यातील 12 वा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसालाच वद्य द्वादशी असे म्हणतात .गाई, म्हशी, शेळ्या ,मेंढ्या ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती. "गाई, म्हशींनी भरला वाडा, बळीच राज्य '! अशी म्हणायची प्राचीन प्रथा आहे. वसुबारस हा कामेधेनूची पूजा करण्याचा दिवस आहे. कामेधेनू ही मनाची इच्छा पूर्ण करणारी असते. कामे धेनूचा समुद्रमंथनाचा संदर्भ कालिका पुरवण्यात येतो. दिवसभर उपवास करून कृषक संस्कृतीत गाई- वासरा विषयीचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवसाला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात.

     अश्विन महिन्यातील 13वा दिवस हा  धनत्रयोदशीचा असतो. वैद्यकशास्त्रात पूजनीय असलेल्या धन्वंतरी देवतेचा जन्म अश्विन शुद्ध त्रयोदशीला झाला अशी मान्यता आहे. समुद्रमंथनातून अमृत कलश याच देवतेने वर आणला होता असे पुराणात सांगितले जाते. दक्षिण दिशेला दिप लावून दीपदान करण्याची प्रथा या दिवशी आहे. यातून दक्षिण दिशेचे महत्त्व विषद होते .जैन धर्मात या सणास 'ध्यान तेरस' असेही म्हणतात. भगवान महावीर हे निर्वाणाच्या आधी योगनिद्रेत गेले म्हणून असे म्हटले जाते.  नरकचतुर्दशीला सुद्धा दिवाळीच्या सणात विशेष महत्त्व आहे. नरकासुराची कथा आपण ऐकत आलो आहोत नरक राजा आणि इंद्र यांचे वैर होते.पण श्रीकृष्णाने  नरकासुराचा वध केल्याची कथा पुरानात आहे. नरक राजाचे नाव या दिवशी या सणाला दिले गेले. रोगराई ,दुर्गंधी दूर व्हावी म्हणून घर स्वच्छ व पवित्र केले जाते न चुकता साफसफाई ,रंगरंगोटी नंतर तैलमर्दन व अभ्यंगस्नान अपरिहार्य असते. शरद काळामध्ये थंडीची चाहूल लागलेली असते आणि वातावरणामध्ये बदल झालेला असतो. आरोग्य विषयक बाबींशी संबंधित या गोष्टी जीवन सुखी आणि समृद्ध करणाऱ्या असतात. राजस्थानात हा दिवसाला "रूपचौदस" म्हणतात.अश्विन अमावश्येला येणारा लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा दिवस असतो कृषी परंपरेतील हा दिवस धान्य लक्ष्मीपूजनाचा मानला जातो नवीन घरात आलेल्या धान्याच्या राशीचे फळांचे पूजन या दिवशी केले जाते .धन हे धान्य नंतर आले. आजही आपण नववधूला घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने येत आहे असे मानतो .त्या नववधूच्या हातात धान्य घेऊनच घरात प्रवेश करतो. अगोदर देवाला नैवेद्य (शेतात पिकवलेल्या धान्यापासून) मगच कृषी संस्कृतीतील लोक भोजन करतात यामधून आपले आपल्या परंपरेची असलेले नाते किती दृढ आहे हे समजते. खरं तर लक्ष्मीचा संमंध पृथ्वीशी आहे. ती भूमाता आहे. कर्दमातून कमळ फुलतो व या कमळात लक्ष्मीचे वास्तव्य आहे म्हणून या भूमातेची पूजा म्हणजे कृषी आराधनाच आहे. पुरानांनी आठ लक्ष्मी सांगितल्या आहेत. धान्यलक्ष्मी ,धनलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी व राजलक्ष्मी या सर्व क्षेत्री मातृशक्तीच आहे जैन व बौद्ध साहित्यातही लक्ष्मीचा उल्लेख येतो पितळखोरा लेणी मधील गजलक्ष्मीचे पॅनल आजही मुंबईच्या संग्रहालयात आहे. लोणावळ्यातून उंबरखिंडीत उतरताना आम्हाला अनेक ठिकाणी गजलक्ष्मीची शिल्पे बघायला मिळाली होती. गजलक्ष्मी मध्ये दोन्हीही बाजूला गज म्हणजे हत्ती आपल्या सोंडेतून भूमीवर पाण्याचा वर्षाव करत आहे. हे सुफलतेचे प्रतीक आहे आज आपण नवीन चित्रांमध्ये गजांच्या सोंडेतून धनाचा वर्षाव होताना बघतो. आता सोन्या चांदीचे मूर्ती तथा शिक्के आपल्याला दिसतात. गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, कुललक्ष्मी यामधून मातृशक्तीचा सन्मान होताना दिसतो.

       कार्तिक महिन्यातील प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. बळीराजाच्या स्मरणाचा दिवस, सम्राट बळीराजाच्या गौरवाचा दिवस." इडा पिडा टळो बळीच राज्य येओ" हे मौखिक परंपरेतून आपण ऐकत आलो आहोत विशेष करून ओवाळणी करत असताना स्त्रियांनी हा कानमंत्र पुढे पुढच्या पिढीला देत राहण्याचं काम केलं. पुरानकथांमध्ये बळीराजाची कथा सांगितली जाते. वामनाने कपटाने बळीला पातळात घातल्याची कथा आहे. प्राचीविद्यापंडित डॉ आ. ह. साळुंखे यांच्या बळीवंश या ग्रंथामध्ये बळीराजाची समीक्षा करण्यात करून बळीराजाला न्याय दिला आहे. महात्मा फुले यांनी देखील बळीराजाला कुलस्वामी संबोधिले आहे .हजारो वर्ष ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे .असा दानशूर ,जिवलग, आमचा लाडका, बळीराजा. तसेच महान तत्ववेता, संविभागी स्वतः सर्वज्ञ, समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना एकमेकांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी सम्राट बळीराजा. निर्मितीगर्भ कृषीला जपणारा, शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक सकारात्मक क्रियाशील समाज रचना घडवून आणणारा समाज शिल्पकार, कारस्थान कपटांना निर्मळ निरागस मनाने सामोरे जाणारा उन्नत महामानव, पराभवातही पराभूत न होणारा ,शांतताचित्त तत्त्ववेत्ता इतका जिवलग की सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका हा बळीराजा उदार व उदात्त होता.

जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात

*बळी सर्वस्वे उदार।* *जेणे उभारीला कर।*

       बळीराजा हा सर्व अंगाने उदार असा आहे. दान देण्यासाठी त्याने आपला हात वर केला आहे. पण वामनाने 'कहार' करून बळीराजाला पाताळात घालण्याचं काम केलं आहे .

*करूनी  काहार।*

*तो पातळी घातला।।* समतावादी संस्कृतीचा महानायक कार्तिक प्रतिपदेला म्हणजेच बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा राजा बळीराजा प्रजेला भेटायला येतो. अशी उदात्त भावना आहे या दिवशी ग्रामीण भागात बहीण भावाला ओवाळताना "इडा पिडा टळो बळीच राज्य येओ". असे पुटपुटते त्याच दिवशी वामनाने कपटाने बळीराजाला पातळात घातले आणि आपला बळीराजा आपल्याला पुन्हा भेटायला येतो तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा .याच दिवशी प्रजा आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करून बळीपूजन करत असते आणि आपल्या दानशूर संविभागी न्यायप्रिय अशा राज्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असते.

      कार्तिक वद्य द्वितियेस भाऊबीज साजरी होते .त्याला यम द्वितीय असेही म्हणतात. हा दीपावलीचा शेवटचा दिवस यमाने आपल्या बहिणीच्या म्हणजे यमीच्या घरी जाऊन ओवाळणी करून घेतली.  भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा सण आहे. पूर्वीच्या काळी दळण-वळण अभावी जवळची माणसं भेटणं अवघड व्हायचं त्यासाठी या सणास विशेष असे महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या सणाच्या दिवशी गाईच्या शेणाचे दहा गोळे करून अंगणात ठेवत असत. त्यावर पळसाची डहाळी टोचून ते वाळल्यावर छतावर फेकून दिले जाई. त्याला मेढे असे म्हणत. भाऊबीजेला भाऊ घरी आला की त्या  गोळ्यावर तापविलेल्या पाण्याने त्याला अभ्यंगस्नान बहीण घालत असे. लहानपणी भाऊरायांसाठीची जात्यावरची गाणी आपण आई ,आजी, आत्या यांच्या तोंडून  रामप्रहरी जात्यावर ऐकली आता मात्र हा लोकसंस्कृतीचा अविष्कार लोप पावत चालला आहे . जैनांमध्ये  देखील महावीरांचे भाऊ नंदीवर्धन  व बहीण सुदर्शनाची भाऊबीजची आठवण सांगितली जाते.

        सणांची नाळ ही लोकसंस्कृतीशी आपल्याला जुळलेली दिसते .विशेष करून कृषीसंस्कृतीशी ती अगदी जवळचं नातं सांगत असते. प्रत्येक भागा नुसार प्रथा व परंपरा या वेगवेगळ्या असतात आपल्या परंपरेत अनेक धार्मिक मिथके देखील सांगितली आहेत. पुराना मधूनही अनेक मिथके आलेली आहे. ही मिथकं आपल्याला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतात. कथा, दंतकथा, जातक कथा व मिथकं हे आपल्याला काहीतरी सांगून जातात. ती खोटी निश्चितच नसतात त्यातून सत्यता शोधावी लागते. या मिथकांच्या साह्याने आपण सत्यशोधन करू शकतो .यालाच मिथकशास्त्र असेही म्हणतात. या  आणि आपल्या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आपल्या परंपरेच्या माध्यमातून त्याचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून आपण आपल्या संस्कृती सवर्धन व जतन करण्यासाठी साठी काम करू शकतो ही काळाची गरज आहे. नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण आधुनिकतेच्या काळात आपल्या  मूळ प्रथा -परंपरेमध्ये सतत सर- मिसळ करून भेसळ देत राहू अशी भीती वाटते.



संजय खांडवे

9011971122

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

प्रयोगशील शिक्षकाची सेवापूर्ती*

 *प्रयोगशील शिक्षकाची सेवापूर्ती*

〰️〰️〰️〰️〰️✒️

न लगे चंदना सांगावा परीमळ।

वनस्पतिमेळ हाकारुनी।।

 अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी।

 धरिता ही परी आवरे ना।।


जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की चंदनाला आपल्याकडे सुगंध आहे हे सांगण्यासाठी त्याला वनस्पतींचा मेळावा भरून जाहीर करावं लागत नाही किंवा सांगावं लागत नाही. त्याचा असलेला सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत राहत असतो ते अंतर्यामी असतं ते स्वभावतःच बाहेर धावत अविष्कृत होण्यासाठी ते उतावीळ होत असतं चंदनाने ते आपल्या आत कितीही आवरून धरायचं म्हटलं तरीही त्याला ते आवरता येत नाही असा तो सुगंध असतो. नेमकं असंच चंदनासारखे झिजणारं आणि सुगंध देणारं व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू धंदर सर!

 जे मुळात आत मध्ये दडलेल असतं त्या सुगंधाला अन झिजण्याला वारसा देखील असतो. अगदी चंदना प्रमाणेच तो मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपणारा असतो. आपल्या महाराष्ट्र भूमीच्या पवित्र मातीचा वारसा देखील चंदनाप्रमाणे झिजणारी आणि सुगंध देणारी माणसं तयार करण्याचाच आहे.

       मराठवाडा -विदर्भ सीमेवर असलेल्या बुलढाणा तालुक्यातील डोमरूळ या गावांमध्ये बळीवंशीय कुटुंबात विष्णू धंदर सरांचा जन्म झाला. शिक्षणाचा वसा आणि वारसा या कुटुंबाला आपल्या वडिलांपासूनच मिळाला. वडील स्व हिरामण धंदर हे निवृत्त मुख्याध्यापक होते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढल्याने त्यांना सर्व सामाजिक समस्येची जाण होती. धाड परिसरातच जि प शाळतूनच आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य आपल्या वडिलांप्रमाणेच हाती घेतले. 1985 ला लोणार तालुक्यातील गुंजखेड या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून त्यांनी शिक्षणाचे हे महान कार्य सुरू केले. प्राथमिक शिक्षणापासून दूर गेलेली खेड्यापाड्यातील मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे त्यांना दर्जेदार व गुणवत्तार पूर्ण शिक्षण आपण दिलं पाहिजे हा ध्यास  मनात घेऊन गणित,विज्ञान व क्रिडा या आवडीच्या विषयाने त्यांनी या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आपल्या सेवेतील पहिली तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांनी धामणगाव धाड या ठिकाणी दिलेल्या आपल्या दहा वर्षाच्या सेवेत एक्स्ट्रा क्लास,रात्रीचे वर्ग,ग्रामिण क्रिडा स्पर्धेत धामणगावच्या क्रिडापटूनी खो-खो,कबड्डी,कुस्ती स्पर्धेत अनेकवेळा राज्य स्तरावर यश मिळवले असे अनेक उल्लेखनीय कामे केली. आजही या परिसरात सरांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतल्या जाते. त्यानंतर गिरडा बिरसिंगपूर,ऊबाळखेड,दाभा, व दहिद या अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या ग्रामीण भागात सरांनी आपली  सेवा पूर्णत्वास नेली . यामध्ये जिल्हा परिषद शाळा गिरडा तीन वर्ष व जिल्हा परिषद शाळा बिरसिंगपूर येथे आठ वर्ष आणि सेवानिवृत्त होताना ते "आय एस ओ" मान्यांकन मिळवून दिलेल्या दहिद बुद्रुक या गावातून उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून सेवा मुक्त होत आहेत.

         "विज्ञानाचा विष्णू" म्हणून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात ख्याती मिळवली. यामागे त्यांच्या परिश्रमाचा, मेहनतीचा,जिद्दीचा आणि एक विज्ञाननिष्ठ शिक्षक असल्याचा भाग आहे. 2002 मध्ये त्यांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा सूर्य पुरस्काराने मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत किनवट या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. बळीवंशीय कुटुंबातून आल्यामुळे त्यांच्या विज्ञानाच्या प्रकल्पावरही कृषी ची छाप होती. गिरडा या ठिकाणी असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मातीचे विविध प्रकार सर्वांच्या समोर आणले व त्यांच्या या विज्ञानाच्या प्रकल्पाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. म्हैसूर येथे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये अंड्याची टरफलं व वापरलेली चहा पावडर पासून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या बालवैज्ञानिकांनी प्रयोगातून मांडला. राष्ट्रिय बालविज्ञान परिषदेत जिल्हा परिषदेची बिरसिंगपूर एकमेव शाळा सहभागी झाल्याने त्या वेळचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले होते."चहा पावडर" चे सेंद्रिय खत या विज्ञानाच्या प्रयोगाला राज्यस्तरावर नागपूर या ठिकाणी सादर करण्याचा बहुमान त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला मिळाला. म्हैसूर या ठिकाणीही त्यांची निवड झाली. 2003 साली त्यांनी तालुका शिक्षण सल्लागार समितीवर काम केले. मा.नंकुमार जंत्रे साहेब व संभाजीराव सरकुंडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्याने जिल्हास्तरावर महत्त्वाचा सहभाग नोंदविला. 2004 मध्ये "पाणी फक्त मुळांना" हा गोहाती (आसाम) येथे राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनातील त्यांचा प्रयोग खूप गाजला. हा भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मणिंद्र शुक्ल यांच्या "धम्माल सुट्टी" या सदरामध्ये त्याची नोंद घेण्यात आली. 2006 मध्ये लातूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये "सुगरण चूल" ही मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावणारी ठरली. यावेळी मा. विलासराव देशमुख व आताचे आपले पालकमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा त्यांच्या या प्रकल्पाला भेट दिली होती. भविष्यात विजेचा तुटवडा निर्माण होणार याची भान ठेवत त्यांनी चंद्रपूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये आधुनिक वॉटर हीटर हा प्रकल्प मांडला होता. या प्रकल्पाचे दखल सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री मा. वसंत  पुरके यांनी घेतली शेगाव या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुद्धा "जैविक कीटकनाशक" या प्रकल्पातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारे सहकारी शिक्षक यांचेही नाव घ्यायला ते विसरत नाहीत. बिरसिंगपूर या शाळेत असताना  मा. उमेश जैन सरांची व मा सुभाष देवकर सरांची त्यांना फार मोठी साथ मिळाली होती. जि प उच्च प्राथमिक शाळा दहिद बुद्रुक या शाळेला आदर्श शाळा व आयएसओ मान्यांकन मिळून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्याचबरोबर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी जी साथ दिली त्यांचेही आभार ते मानायला विसरत नाहीत. आपण करत असलेलं काम हे एक टीम वर्क असते अशी त्यांची सतत भावना काम करताना असायची . या सामूहिक प्रयत्नातूनच मला हे साध्य करता आले असेही ते म्हणतात.

          विज्ञानाच्या विष्णूची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची, ज्या समाजात आपण लहान चे मोठे झालो त्या समाजाप्रती सदैव कृतज्ञ असणं हे त्यांना आवडते. म्हणून त्यांनी त्यांच्या या कार्यासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी की जे एमबीबीएस, इंजीनियरिंग यासारख्या उच्च शिक्षणासाठी मोठी फी भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचं ध्यास त्यांनी अंगी घेतला आहे व त्या दिशेने त्यांचे कामही सुरू आहे आतापर्यंत त्यांनी तीन विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी फी उपलब्ध करून देण्याचे मोठं काम केलं आहे. हे काम सुद्धा एका सामूहिक जबाबदारीने ते करत आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना अधिकचा वेळ मिळेल आणि त्या वेळेत ते या पद्धतीने समाजाची सेवा करून समाजासाठी या देशासाठी आदर्श नागरिक घडवत राहतील असा त्यांचा मानस आहे. विज्ञानाच्या विष्णूने त्यांना शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या संधीचं सोनं केलं .आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले ते विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत बरेचसे सातासमुद्रा पारही आहेत. निश्चितच त्यांनी केलेल्या या कामाचं त्यांना या सेवानिवृत्तीच्या वेळी समाधानच आहे. येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडत राहो या सदिच्छासह त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच कामना.



संजय खांडवे

9011971122

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

*शरद पौर्णिमा: एक महोत्सव*

 *शरद पौर्णिमा: एक महोत्सव*



चंद्र आणि पृथ्वी या दोघांचं अतूट नातं आहे. पृथ्वीतलावर राहणारे जीव या चंद्राशी अनादी अनंत काळापासून जुळलेले आहेत. पृथ्वीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी चंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचे सौंदर्य हे चंद्रा मुळेच बहरले गेलं आणि या पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारे सौंदर्य हे तर फार मोठे विलोभनीय! हा झाला विज्ञानाचा भाग, अनादी अनंत काळा पासून जगातील जवळपास सर्वच धर्मामध्ये चंद्राला फार महत्त्व आहे. काल गणना देखील चंद्राच्या कलेशी संबंधित आहे. डोंगर, दऱ्यात ,वाडी, वस्तीमध्ये विकसित होत जाणारे आमचं लोकजीवन हे चंद्राच्या अमावस्या आणि पौर्णिमा यावर चालत आले आहे. आपले आजे- पंणजे हे त्यांच्या जीवनातील घडलेल्या महत्त्वाच्या घटना  कालबद्ध करत असताना पौर्णिमेच्या अगोदर इतके दिवस पौर्णिमेच्या नंतर तितके दिवस अशा स्वरूपामध्ये संचित ठेवायचे. आपले बहुतेक सण आणि उत्सव हे पौर्णिमा किंवा अमवश्या या सणाशी संबंधित आपल्याला दिसतात यामध्ये राखी पौर्णिमा ,वटपौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा तशीच कोजागिरी पौर्णिमा सुद्धा येते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. शरद ऋतूमध्ये येणारी ही अद्वितीय पौर्णिमा आहे. आपण साजरे करत असणारे सण हे कृषी परंपरेशी आपली नाळ जोडणारे आपल्याला दिसतात. त्यापैकीच एक कोजागिरी पौर्णिमा देखील आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. अश्विन शु. पौर्णिमा म्हणजे निरभ्र, निकोप, स्वच्छ ,सुंदर वातावरणात निसर्ग खुलून दिसावा असा हा क्षण ! धरती मातेने मानवाला धन धान्याच्या रूपात दिलेला प्रसाद म्हणजे घरे धन -धान्याने रूपाने भरभरून गेलेली आहे. निसर्ग आनंदी आहे आणि माणूसही आनंदी आहे. गाई -म्हशी दूध -दुपत्यांनी युक्त झालेल्या आहेत. नदी- नाले प्रचंड तुडुंब भरून वाहत आहेत. नदीपात्रही अगदी स्वच्छ झाले आहे. निसर्गात चोही बाजूंनी सुगंध दरवळत आहे. चांदणी रात्र ,निरभ्र आकाश सर्वकाही आल्हाददायक आहे. या आनंदी वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करत , उत्सव साजरा करणारा सण म्हणजे "कोजागिरी पौर्णिमा", अगदी प्राचीन काळापासून आपल्या भारतीय परंपरेत या सणाला विशेष असे महत्त्व आहे .उद्यान, एखाद्या मोकळ्या जागी किंवा उंच ठिकाणी सर्व जण एकत्रित येऊन रात्रीचे जागरण करत हा सण साजरा केला जातो. दूध- दुपत्यांचा काळ असल्यामुळे संथ आहारावर दूध आटवत या निरभ्र चांदण्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात हे दूध आटवले जाते आणि गप्पागोष्टी, प्रबोधन, गाणी, लोकगीते ,प्रवचन ,कीर्तन या माध्यमातून ही रात्र जागवली जाते. गुजरात मध्ये गरबा उत्सवाच्या माध्यमातून जागरण करून ही पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या भारतीय धार्मिक परंपरेनुसार रात्री लक्ष्मी माता घरोघरी जाणार आणि कोण कोण जागी आहे ? याची विचारणा करणार." को जागर्ति" म्हणजेच कोण कोण जागे आहे? याची विचारणा करणे असा अर्थ होतो. मानवाच्या कृतीशीलतेची ही चाचपणी या ठिकाणी होते .अश्विन प्रतिपदे पासून ते दशमी पर्यंत स्त्री- शक्तीचे महत्त्व आपल्या सण -समारंभामधून दिसते तेच पुढे या अश्विन पौर्णिमेत सुद्धा प्रतीत होताना दिसते .येथेही स्त्रीशक्ती रूपानं लक्ष्मी मातेचे आगमन होऊन ती आपल्या प्रजाजनांची विचारणा करते.  दारात उभी राहून त्यांना दर्शन देते, दारात आलेली लक्ष्मी परत जाऊ नये म्हणून हा जागरणाचा उत्सव आपण प्राचीन कालापासून करत आलेलो आहोत. त्या दिवशी लक्ष्मीपूजनालाही महत्व असते. प्राचीन पुरानानुसार महिषासुर मर्दिनी मातेची देखील कथा याबाबतीत सांगितली जाते. महिषासुरमर्दिनीचे जागरण या दिवशी केले जाते. आपल्या पूर्वजांनी लक्ष्मीचा अर्थ केवळ धन,दौलत अशा भौतिक बाबी किंवा सुख, समृद्धी असा नसून तो आपल्या जीवनमानाशी देखील संबंधित आहे. आपण जीवन जगत असताना कोणताही मोह ,माया, द्वेष ,मत्सर आदी च्या अधीन जाऊ नये. त्यापासून मुक्त असावे चंद्रा प्रमाणे शितल आणि स्वच्छ असावे. आपण चंद्राप्रमाणेच देणाऱ्याची भूमिका आपल्या जीवनात पार पाडावी. ऋतू परिवर्तनाचा मध्य साधणारा हा सण एक बौद्धिक , कला व विकास सामाजिक विकास साधणारा आहे. आपल्या प्राचीन लोकसंस्कृतीचा अभ्यास करत या लोकसंस्कृतीच्या खुणा जर आपण शोधू शकलो तर ही कृषी परंपरा आपल्या धार्मिक परंपरे ला कशी सलग्न आहे हे स्पष्टपणे जाणवते. 16 कलेमधून जाणारा हा चंद्र देवादिदेव आधी योगी महादेवांच्या शिरावर शोभून दिसतो. प्रकाशमान असलेला चंद्र त्याच्या शीतलतेतून आमच्याही जीवनमानामध्ये शितलता निर्माण करतो .


बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

शक्ती रुपे*

 *शक्ती रुपे*


भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

    रूपमंऽनोक्त आणि अपराजित सूत्रात खालिल नवदुर्गाचे स्वरूप सांगितले आहेत .

१)महालक्ष्मी


सहा भूजा असलेली वरद,त्रिशूल,ढाल,पानपात्र,नाग धारण केलेला आहे .


२)नंदा

ही चारभूजा धारी यक्षसूत्र,खडग,ढाल,पानपात्र धारी आहे.


३)क्षेमकरी

चार भूजा असलेली वरद, त्रिशूल, कमल, पानपात्र धारण केलेली आहे.


४) शिवदुती

ही चार भुजाधारी कमंडल, चक्र,ढाल पानपात्र घेवून आहे .


५)महाचंडी

ही खडग,त्रिशूल,घंटा,ढाल चार भूजाधारी आहे .


६)भ्रामरी

ही सुध्दा चार भूजाधारी खडग,डमरू,ढाल,पानपात्र धारी आहे.


७)सर्वमंगला

चार भूजा धारीणी माला,वज्र,घंटा,पानपात्र घेवून आहे .


८)रेवती

दंड,त्रिशूल,खडवांग,पानपात्र धारिणी देवी आहे .


९) हरिरिध्द

ही चार भूजा असलेली कमंडल,खडग ,डमरु व पानपात्र धारीणी आहे.

अशी नऊ नवदुर्गास्वरुप यामधे सांगितली आहे .

सप्तशती या ग्रंथा मधे नवदुर्गाची रूपे खालील प्रमाणे  एका श्लोकामधे सांगितली आहे .


प्रथमं शैलपुत्रीति द्वितिय ब्रम्हाचरणी ।

तृतीय चंद्रघंण्टेति,कुष्मण्डेती चर्तुर्थकम् ॥

पंचमं स्कधंमातिति,षष्ठं काव्यायनिति च ।

साप्तमं कालरात्रिती,महागौरिति चाष्टमम् ॥

नवम् सिध्दीदात्री च नवदुर्गा प्रर्कितिताः ।

उक्तान्येतानि नामानि ,ब्रम्हानैव महात्मनाः ॥


वृषभवाहन असलेली 'शैलपुत्री'


माला ,कमंडल धारण केलेली द्वि भूजा असलेली 'ब्रम्हाचरिनी'


व्याघ्र वाहन असलेली 'चंद्रघंटा'


व्याघ्र वाहन असलेली सहा भूजा असलेली धनुष्य,चक्रगदा,त्रिशूल आदी शस्त्र हाती असलेली 'कूष्मांडा'


सिंह वाहन असलेली चार भूजा धारी 'स्कंधमाता'


सिह वाहन असलेली चार भूजा धारी 'कात्यायनी'


गर्दभ वाहन असलेली अभय,खडग,त्रिशूल व पाश धारिणि 'कालरात्री '


नंदी वाहन असलेली 'महागौरी '


कमल वाहन असलेली चार भूजा धारी गदा,चक्र,पुस्तक ,कमलधारिणी 'सिद्धीदायी'


ही नव स्वरूपे या प्राचीन ग्रंथात येतात . याशिवाय स्त्री शक्तीची रूपे असलेल्या सप्त मातृका सुद्धा आपल्या परिसरात आपल्याला आढळतात त्यापैकीच ब्राम्हणी,माहेश्वरी,कौमारी,वैष्णवी,वाराही,इंद्राणी,रक्तचामुंडा

ह्या सप्तमातृका सुद्धा प्राचीन काळापासून पूजल्या जातात .या सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे देखील आहेत .वेरुळ लेण्यामध्ये या सप्तमातृकाचा पट आहे.यांच्या काखेत किंवा मांडिवर बालक सुद्धा बसलेले आढळतात . पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या सप्तमातृकाचे वास्तव्य आपल्याला दिसते.

भद्रकाली,महाकाली,चंडी,चामुंडा,रक्तचामुंडा ,महीषासूर मर्दिनी, लक्ष्मी महालक्ष्मी, महा सरस्वती ,श्रीदेवी सरस्वती, अंबा ,अंबिका भुवनेश्वरी ,अन्नपूर्णा गायत्री, गंगा, यमुना शितला, तुलसी, दुर्गा अशी अनेक देवीची म्हणजेच शक्तीचे रूपे आहेत ह्या शक्ती किंवा ही रूपे ओळखण्यासाठी त्यांच्या बहुकरांमध्ये असलेली शस्त्र त्यांनी धारण केलेले वाहन यावरून आपणास ती ओळखता येतात. या स्त्री शक्तींचा जागर अनंत काळापासून आपल्या पवित्र भूमीत होत आलेला आहे.



संदर्भ -भारतीय शिल्पसंहिता ,प्र ओ सोमपुरा तथा मंदिर लेणी भ्रमंती व शिल्प अभ्यासातून



संजय खांडवे

विजयादशमी :एक प्राचीन परंपरा* 〰️〰️〰️〰️〰️

 *विजयादशमी :एक प्राचीन परंपरा*

〰️〰️〰️〰️〰️


धन्य आजि दिन ।

जाले संतांचे दर्शन।।

 जाली पापातापा तुटी।

 दैन्य गेले उठाउठी।।

 जाले समाधान।

 पायी विसावले मन।।

 तुका म्हणे आले घरा। तो चि दिवाळी दसरा।।



 संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात दिवाळी, दसरा या दोन्ही सणाचा उल्लेख येतो .यामध्ये जगद्गुरु म्हणतात संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्यतेचा असतो. सगळी पाप- ताप  नाहीसे होत असतात आणि आपल्या जीवनातील दिनवाण्या  गोष्टी  दूर होतात आणि या संतांच्या पायी मन विसावलं की त्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होतं. जीव सुखावतो . त्यांचं घरी येणं म्हणजे तोच आपला दिवाळी आणि दसरा आहे. प्राचीन काळापासून दिवाळी आणि दसरा हे सर्वात मोठे सण मानले जात होते. संतांचे घरी येणे याचा संमंध जगद्गुरुंनी दिवाळी आणि दसरा या सणाची जोडला आहे. यावरून आपल्याला प्राचीन काळातील चालत आलेल्या या सणांचे महत्त्व समजते. मुळात भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव हे कृषी परंपरेशी निगडित आहेत जवळपास सर्वच सण हे कृषीशी नाळ जोडलेले आपल्याला दिसतात. सण आणि उत्सव हा समृद्धीच्या आणि भरभराटीच्या काळातील एक कौटुंबिक व समाज जीवनाशी समरस असलेला भाग आहे. अश्विन प्रतिपदे पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती पूजेचा कालखंड मानला जातो. शरद ऋतूमध्ये येणारा हा शक्ती पूजेचा उत्सव म्हणजे या काळात सृष्टी अत्यंत प्रसन्न झालेली असते. वर्षाकाळ संपून गेलेला असतो शेतकऱ्याच्या शेतात समृद्धी आणि संपन्नता ही ओतप्रत भरलेली असते सर्व बाजूने आनंदच आनंद असतो हा सर्वकाळ सुखाचा असतो. शेतीचा शोध स्त्रीने लावला. तिने तिच्या निरीक्षणातून हे संशोधन घडवून आणले. नवरात्रात नऊ दिवस मातीमध्ये नऊ प्रकारचे धान पेरून एक प्रकारे त्या धानाची उगवण क्षमता तपासली जाते की काय असेच वाटते.  स्त्री व माता म्हणजे भूमाता या सृजनतेच्या प्रतीक मानल्या गेल्या. नवनिर्मितीचा हा काळ मातृ शक्तीशी जोडणे सहाजिकच आहे. कोल्हापूरची अंबाआई, तुळजापूरची भवानी आई, पुण्याची जोगेश्वरी, आंबेजोगाईची जोगाई, माहूर, वणी ही जशी आपली शक्तीपीठे आहेत तशीच प्रत्येक गावागावात जाखाई,भोनाई, जोखाई, डोंगराई, मसाई, वांजाई, सोजाई, खामजाई, रेणुकाई, काली, मातृका, यल्लमा, मरीआई ,मरदडी, तेलाई, पोलरमा, शिवाई ,तुकाई,आजुबाई अशी प्रत्येक गावोगावी देवीची दैवत आपण अनादी अनंत कालापासून पूजत आलो. या दैवतांच्या सानिध्यात राहून आपण आपले कौटुंबिक संस्कार जसे लग्न ,मुंज ,जावळे ओटी भरणे, जोगवा मागणे जणूकाही त्यांच्या उपस्थितीतच करत आहोत असे जाणवते. त्या गावची लेक बाळ एकदा का होईना बाळ जन्मल्यानंतर त्याचं मस्तक  आईच्या पुढे टेकून आणते . आईचं ओटी भरणे आणि दहीभाताच बोनं देणे ही ती माऊली कधीही विसरत नाही. या परंपरा आपल्याला हेच दर्शवितात म्हणून नवरात्र हा शक्तीच्या कृतज्ञतेचा उत्सव मानला जातो.

        आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी हा या नवरात्रातील दहाव्या दिवशी येणारा महत्त्वाचा सण मानला जातो.

" दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा."

       बालपण चा प्रसंग आठवतो एकत्रित कुटुंब पद्धतीत आम्ही त्या काळात दसरा साजरा करण्यासाठी आमच्या आई-वडिलांसोबत आम्हीही गावाकडे सर्व एकत्रित यायचो. सर्वांनी नवीन कपडे घेतल्याचं कुतूहलही असायचं. त्यावेळेस  अगदी दुपारपासूनच घरच्या बैलगाड्या सजवण्याची लगबग सुरू होत असे. लाकडी बैलगाड्यांना गेरूच्या रंगाने रंगवून त्यावर चुन्याचे ठिपके मारून बैल जोडी अगदी पोळ्या मधल्या बैलांसारखी सजवून आम्हाला कामावरचा गडी त्या बैलगाडीत बसून शेताकडे शिलंगण खेळण्यासाठी घेऊन जायचा.गावातील पाच पन्नास गाड्या त्या वाटेने धुराळा उडवत धावत जायच्या आणि आपल्या शेतात असलेल्या आपट्याच्या झाडाची पानं तोडून सोनं म्हणून आम्ही ती लुटायचं याशिवाय शेतात असलेल्या ज्वारीची पानं आणि कंणस सोनं म्हणून घरी घेऊन यायचो. घरी आल्याबरोबर ती आपल्या दैवतापुढे ठेवून घरी ओवाळणी केली जायची व सर्वप्रथम मारुतीला हे सोन अर्पण करून सायंकाळी घरातील व शेतीच्या उपयोगी असणाऱ्या शस्त्रांचे पूजन करायचे. संपूर्ण गावभर आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन मोठ्यांच्या आशीर्वाद साठी आम्ही फिरायचो असा हा आम्ही अनुभवलेला दसरा सण अजूनही स्मरणातून जात नाही.

       विजयादशमी या सणाला काही पौराणिक सांस्कृतिक व ऐतिहासिक सुद्धा महत्त्व आहे. विजयादशमी ही साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जातो . धार्मिक मान्यतेनुसार अश्विन शुद्ध दशमीला याच दिवशी रामाने रावणाला हरवून विजय प्राप्त केला होता. महाभारतात पांडवांनी याच दिवशी आपला अज्ञातवास संपल्या नंतर शमीच्या झाडाच्या डोलीत ठेवलेली शस्त्रे बाहेर काढून ती सर्व शस्त्रे स्वच्छ करून  पूजनानंतर धारण केली होती. म्हणून शमीच्या झाडांची म्हणजेच आपट्याच्या झाडांची पाने याला विजयादशमीच्या सणामध्ये विशेष महत्त्व आहे. दशमीचे दिवशी पुरुषांनी ईशान्य दिशेला जाऊन शमीच्या वृक्षाखाली अपराजिता देवीची यथाचीत पूजन करावे म्हणजे  अपराजिता आपल्याला विजयाचा आशीर्वाद देते. अशी ही एक परंपरा काही ठिकाणी बघायला मिळते की त्या शमीच्या वृक्षाची पूजन केल्यानंतर वृक्षाच्या मुळाशी असलेली ओलसर माती पूजेच्या अक्षतासह घ्यावी  व ती वाजत- गाजत घरी आणावी. असेही शमी पूजन काही ठिकाणी केले जाते. विजयादशमीला शस्त्र पूजनाला विशेष असे महत्त्व असते.आपापल्या व्यवसायाशी निगडित असलेली साहित्याची पूजन त्या काळामध्ये केले जाते. पावसाळा संपला की शरद ऋतुला प्रारंभ होत असतो म्हणून  लढवय्यांच्या अंगी  उत्साह संचारत असे. लढाईसाठी लागणारी शस्त्रे पावसाळ्याच्या काळामध्ये वापरात येत नसत म्हणून ती आता बाहेर काढून सीमाल्लोघन करण्यासाठी स्वच्छ करून सज्ज ठेवत असत.

        आपल्या भारतात हिमालयापासून अगदी कन्याकुमारीपर्यंत विजयादशमी साजरा होत आलेली आहे. एवढेच नव्हे तर नेपाळमध्येही नवरात्र व दसरा साजरा केला जातो .तामिळनाडूमध्ये नवरात्र सण हा मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो. म्हैसूर मधील दसरा हा जगप्रसिद्ध आहे. चामुंडा देवीने महिषासुराचा वध केला अशी दंतकथा या म्हैसूरच्या बाबतीत सांगितली जाते. म्हैसूर राज्याची कुलदेवता असलेली चामुंडेश्वरी ही म्हैसूर मधील चामुंडी डोंगरावर वसलेली आहे. त्या ठिकाणी तिचे भव्य मंदिर आहे.  शहराच्या नावाची रूपे अशाच पद्धतीने बदलत गेली महेश मंडळ मग महेश पूर आणि आताचे म्हैसूर असे महिषासुरमर्दिनीचे निवासस्थान म्हणून म्हैसूर शहराला मानले जाते. बेळगाव मध्ये ही दसरा साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. राजस्थान हा शक्ती व शौर्याचा उपासक असलेला प्रदेश आहे. राजस्थानमध्ये ही नवरात्राला विशेष असे महत्त्व आहे येथे 'खडग' स्थापनेची परंपरा आहे. नऊ दिवस या खडगापुढे  दीप स्थापना करून ती परंपरा जपली जाते. हा नंदादीप अखंड नवरात्रीमध्ये तेवत ठेवला जातो .या काळात व्रत व खानपनाची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी आहे. उत्तर भारतात विजया दशमी व नवरात्र या काळात रामलीलाचे आयोजन केले जाते. मध्य प्रदेशांमध्ये 'नौरता' म्हणजेच नवरात्र 'गरभा' या भावना आविष्कारातून  हा विजयादशमी पर्यंत साजरा करण्याची परंपरा आहे . गुजरात मध्ये विशेष करून विविध प्रकारचा गरभा या काळामध्ये खेळला जातो .आंध्र प्रदेश मध्ये जवळपास महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो तीच परंपरा आपल्याला दिसते. बुंदेलखंडामध्ये याला 'सुअरा' असे म्हणतात. हिमाचल प्रदेशातील 'कल्लूचा' दसरा आहे. मनाली येथे विजयादशमीचे कार्य 'हिडंबा' देवी शिवाय पूर्ण होत नाही अशी परंपरा आहे. याच हिडिंबा देवीचा भाद्रपद शुद्ध द्वितीया मासारंभामध्ये मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पारध या गावी मोठा उत्सव होत असतो.

      तुळजापूरची तुळजाभवानी आई व कोल्हापूरची अंबाई मंदिरात अश्विन प्रतिपदेपासून तर दशमी पर्यंत मोठ्या प्रमाणात विविध परंपरेंची रेलचेल असते नवरात्रात गोमुखाजवळ पाच घट आणले जातात . एक सभा मंडपाच्या ईशान्येला दुसरा देवी समोरील शिव मंदिराजवळ तिसरा तिसरा  त्रिशूलाचा ओवरीत आणि इतर टोळ भैरव मंदिर आणि मातंगी मंदिर याजवळ हे घट बसविले जातात. ही तुळजाभवानी मंदिराची परंपरा आहे असेच घट हे अंबाबाईच्या मंदिरातही बसवले जातात यामध्ये सोने-चांदी, रत्न अगदी सात नद्यांचे पाणी आधी टाकले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या राज्याभिषेकप्रसंगी  अशाच प्रकारच्या घटांची रचना सिंहासनाजवळ केली होती. त्यामध्ये दूध, मध माणिक, मोती आदींची रेलचेल करून त्या घटाच्या काठावरती रेशमी सुशोभन केले होते. थोडक्यात घट रचनेला आपल्या भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. आदि मायेची रुपे असलेली ह्या देवींना चंडी ,दुर्गा ,काली, अन्नपूर्णा, आधी रूपांमध्ये नवरात्रात पुजले जाते आणि मग दशमीला म्हणजेच विजयादशमीला याचा समारोप होतो. शौर्य आणि मातृशक्तीला कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आपल्याला असत्याकडून -सत्याकडे, तमाकडून- तेजाकडे, अमंगला कडून- मंगलाकडे अस्थिरते कडून  स्थिरतेकडे घेऊन जाण्याचे काम करतो. प्रत्येक जण आंतरिक तळमळीतून हा विजयादशमीचा सोहळा आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर साजरा करताना दिसतो. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपण  येणाऱ्या काळात अज्ञान, अंधश्रद्धा ,अनारोग्य, भ्रष्टाचार ,अन्याय, अत्याचार यावर विजय मिळवू या. मानवतेचे, एकात्मतेचे, बंधूभावाचे, समानतेचे सोने जनमानसात वाटू या. हीच आपली खरी विजयादशमी.


संजय खांडवे

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

साकेगाव चा साकेश्वर

 *साकेगावचा साकेश्वर खुणवतोय!*




वेदकाळात उपासना व पूजन हा भक्तीमार्ग यज्ञ याग विधि च्या माध्यमातून होत असे , वेद आणि ब्राम्हण ग्रंथामधे विविध यज्ञीय क्रियांचा उल्लेख मिळतो .वेदकाळानंतर प्रचलित  यज्ञरूपी भक्तीमार्ग देवप्रतिकांची उपासना करण्यात परावर्तीत होत गेल्याचे दिसते .देवतांच्या पाषाण अथवा धातुच्या साकार झालेल्या मूर्ती पूजा प्रचलित झाली .या देवप्रतिमासोबत देवालय निर्माणचा उल्लेख अर्थर्ववेदात येतो .मूर्तिपूजनाचे प्रमाणरुप सिंधू संस्कृतीच्या काळातही दिसते .माता,पशूपतीनाथ,योनी,वृक्ष,शिवलिंग यांना पवित्र मानले जायचे .वेदातही शिवाला पशूपतीनाथ हा उल्लेख वारंवार येतो .

 भारताच्या पूर्व भागात शिव -रूद्र उपासनेचे विशेष महत्व आहे .तेवढेच महत्व आपल्या महाराष्ट्रातही दिसते . अगदी गुप्त काळापासून शिल्पकौशल्यावर आधारीत अनेक सुंदर शिव मंदीराचे निर्माण झाले .मराठवाडा तसेच विदर्भातही असे अनेक मंदिरे आहे .विदर्भातील मार्केण्डय मंदिर वगळता सर्व मंदिरे काळ्या दगडात बांधलेली आढळतात .त्यापैकीच एक साकेगावचे साकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आजही दिमाखदारपणे उभे आहे .चिखली वरून धाड कडे जातांना सहा -सात किलोमिटर अंतरावर, बुलढाणा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर  एका डोंगराच्या पराड्यात मुख्य रस्त्यावरूनच या मंदिराचे मोहक रूपाचे दर्शन घडते .बुलढाणा जिल्यात लोणार, धोत्रानंदई,मढ,सातगाव(विष्णु मंदिर)कोथळी येथे  या प्रकारची मंदिरे आहेत . मंदिराला प्राचीन काळी संपुर्ण तटबंदी असल्याचे दिसते .तटबंदीला एक प्रवेशद्वार आहे . दगडी शिळा पासून तयार केलेलं सुंदर असं गोपूर आपल्याला दिसते. या गोपुराच्या उंबरठ्यावर आपल्याला दोन कीर्ती मुखे कोरलेली दिसतात. या कीर्तीमुखां बाबत पुराण कथेमध्ये असे सांगितले जाते की, येणाऱ्या भाविकांचे पाप खाण्यासाठी याची रचना शिवाने मंदिरावर केली आहे .हे कीर्तीमुख म्हणजे राक्षस आणि त्या राक्षसाची भूक एवढी होती की त्याने त्याचं संपूर्ण शरीर खाऊन घेतल्यावरही ती भागली नाही म्हणून शिवाने त्याला वरदान दिले आपल्या मंदिरावर त्याला जागा देऊन त्या ठिकाणी भक्तीसाठी येणाऱ्या भाविकांचे पापे खाण्याचे काम त्याच्याकडे दिलं अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून मंदिरावर याचे निर्माण केल्या जाऊ लागलं. मंदिराला नंदीमंडप ,गूढमंडप व गाभारा असे भाग आहेत .

नंदीमंडपात तीन नंदीशिल्प आहेत . मंदिरात आत प्रवेश करताना दगडी द्वाराच्या वर गणेश शिल्प कोरलेले आहे संपूर्ण द्वारावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. आत प्रवेश करताच आपल्याला मंदिरातील कला शिल्पांचा अप्रतिम भाग नजरेच्या समोर येतो. आजही तो शाबूत आहे. सभामंडपाचे छत चार मुख्य खांबावर आधारलेले आहे.अंतराळातील दोन स्तभावर एक स्त्री चर्तुभूज असून चर्तुभूज गणेश विराजमान आहेत . सभा मंडपाचे खांब भार वाहक यक्षाने तोलून धरलेले आहे. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अन्वा येथील शिव मंदिरात ज्याप्रमाणे गणपती हा भार वाहकाचे काम करतो तसेच या मंदिरातही भारवाहक गणेशाचे सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळते. याशिवाय खांबाच्या अगदी तळाशी देखील गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. छतावर सुंदर नक्षीकाम केलेले असून दगडी गोल झुंबर वर कोरलेले आहे सभामंडपापेक्षा चार फुट खोल गाभारा आहे. गाभाऱ्यात उतरण्या अगोदर डाव्या आणि उजव्या बाजूला देव कोष्टकामध्ये गणेश व कुबेराची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या दारावर प्रतिहारी,मागल्यविहग,घटपल्लव आहेत . गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर अगदी मधोमध गणेशाची मूर्तीही आपल्याला दिसते. पाप खाणारी कीर्तीमुखे सुद्धा याद्वारावर आहेत. याचा अर्थ गाभाऱ्यापर्यंत पोहोचताना ही कीर्तीमुखे माणसाला त्याची पापे खाऊन पुण्यवान बनवून शिवलिंगापर्यंत पोहोचविण्याची रचना प्राचीन मान्यतेनुसार असावी. गाभाऱ्यात पूर्ण चंद्राकार शिवलिंग प्रतिष्टापित केलेले आहे. मंदिराचा अंतर्भाग जेवढा मनमोहक आहे तेवढाच तो बाह्य भागही आपल्याला आकर्षित करून घेतल्याशिवाय राहत नाही.  मंदिराची मुख्य गाभार्‍यावरील कळसाची रचना ही हुबेहूब अमृतेश्वराच्या मंदिरासारखीच भासते. नागरशैलीतील ही रचना असलेलं  शिखरी शिखर प्रकारातील आहे .त्यावर विविध लता आमल काच्या खालील भागात कोरलेल्या आहेत. शिखरावर आधारभूत अशी छोटी छोटी शिखरे आपल्याला भासतात. कळसावरील सुंदर नक्षीकाम आजही मनमोहक आहे .त्याकाळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष देत ते आजही उभे आहे . मंदिराच्या वरील भागात ब्रम्हा,शिव पार्वती ,महिषासूरमर्दिनीचे शिल्प आहेत.एका भागात कुस्तीचा प्रसंग आहे .गाभाऱ्याच्या बाह्य भागावर पाठीमागील शिवाची तांडवमुद्रेतील शिल्प आहेत . देव कोष्टात तयार केलेल्या मूर्ती शिल्पाचा दगड हा मंदिरात वापरलेल्या दगडापेक्षा थोडा वेगळा वाटतो. आपण प्राचीन मंदिरांना भेट देतो .त्या मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतो मंदिर निर्माण हे केवळ एवढ्या गोष्टीसाठी नसून यामागे एक गुढ असा अर्थ दडलेला असतो. थोडक्यात मंदिरावर निर्माण केल्या गेलेल्या प्रत्येक शिल्पाचा  अर्थ असतो. मंदिरावर घडविण्यात आलेल्या छोट्याशा कलाकृतीतही फार मोठा अर्थ दडलेला असतो यासाठी त्याचा अर्थ बोधन होणं आवश्यक आहे आणि हे अर्थबोधन अभ्यासातूनच साध्य करता येते. प्राचीन मंदिरे व मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बा. देगलूरकर यांच्या अभ्यासातून त्यांनी हे सिद्ध केलंय . ते म्हणतात

आपण वेरूळच्या कैलास लेणीत गेल्यास एक शिल्प अवश्य बघावं. आपण कोणत्याही प्राचीन मंदिरात मूर्ती पाहिल्यावर ती आपल्याला अर्धीच कळत असते मूर्तीच्या संपूर्ण अंतरंगात गेलो तर मूर्तीचा उलगडा होत असतो. यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सामाजिक बाबी असतात त्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला मूर्तीचे स्वरूप कळते.  पार्वती साधना करतांनाचे  शिल्प आहे मग ती ही साधना किंवा तपश्चर्या कशासाठी करत आहे यासाठी आपल्याला पुराणाच्या गोष्टीकडे वळावे लागते. मग लक्षात येते की शिवासाठी ती या ठिकाणी तप करत आहे. हे या मूर्तीवरून या ठिकाणी कळते इथपर्यंत ठीक आहे पण ही पार्वती कोण आहे? पती, पशु,पाश या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी  यामध्ये  दिसतात .पती हा शिव आहे. पाश म्हणजे हे सर्व प्राणी आहेत पार्वती हा जीव आहे आणि तो पती करता या ठिकाणी तपश्चर्या करतो आहे. म्हणजे जीव हा शिवा करिता तपश्चर्या करत आहे. हे या मूर्तीतून कळते हे या मूर्तीचा अर्थ बोधन आहे. "कल्याण सुंदर मूर्ती "शिवपार्वतीचा विवाह दाखवणारी मूर्ती ही पुढची मूर्ती या लेण्यांमध्ये आपल्याला दिसते. पार्वती शिवाचा हात हातात घेतलेला आहे, वास्तविक पाहता शिवाने पार्वतीचा हात हातात घेणे अपेक्षित आहे पार्वती शिवाकरिता तप करते मग तिला शिवाची प्राप्ती झाली. याच्यापुढे बघितल्यास आपल्याला अर्धनारी श्वराची मूर्ती दिसते. तप, प्राप्ती ,विवाह या तीन अवस्था या शिल्पामधून आपल्याला दिसल्या. म्हणजे "जीवाला शिवाची" प्राप्ती झाली आणि त्यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली आणि त्याचे पुढचे शिल्प जे आहे ते  अर्धनारीश्वराचं म्हणजे

  "जीव ब्रह्मा एवं ना पर: " 

या तीनही मूर्तीचा बोध अशा प्रकारे आपल्याला घ्यावा लागतो या मूर्ती स्वतंत्रपणे घेतल्या तर त्याचा वेगळा अर्थ निघतो फक्त अर्धनारीश्वराची मूर्ती म्हणजे " प्रकृती आणि पुरुष" यांचे एकत्रीकरण हे सांख्यदर्शन यामध्ये आपल्याला दिसते.

   इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे पार्वती ही पर्वत कन्या ती निश्चयी तसेच कठोर हृदय असते. तिचा निश्चय हा तिच्या श्रद्धेचा मापदंड आहे. तिला शिव हवा आहे. तिला त्याने आपले डोळे उघडायला हवे आहेत त्यांनी तिला प्रेमालिंगन द्यावे आणि विश्वाची मैत्री करावी असे तिला वाटते. इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे अनेक असुर, देव व मार्कंडे यासारखे ऋषी तपचर्या करतात आणि ईश्वराला प्रसन्न करतात ते त्यांच्या स्वतःसाठी लाभदायक ठरतील असे वर मागतात परंतु पार्वती इतरांचे कल्याण होईल असा वर शिवाकडे मागते. तिला शिव हवा आहे तो केवळ तिच्या वैयक्तिक सुखासाठी नसून साऱ्या विश्वाला लाभदायक ठरावा म्हणून हवा आहे तिच्या साधने पासून शिवची दर्याद्र बुद्धी आणि त्याच्या मनातील कणव जागृत व्हावी म्हणून ती निकराचे प्रयत्न करते. शिव नसेल तर सारे जिवंत प्राणिमात्र निसर्गाशीच जखडले जातात ,पण तो त्यांना त्यातून मुक्त करू शकेल गुरुत्वाकर्षणामुळे ते अडकलेले आहेत तो त्यांना त्यांच्या कृपादृष्टीने त्यातून सोडवू शकेल. 

           याशिवाय त्यांनी शिवाच्या चतुष्पाद सदाशिव या शिवाच्या चार पाय असलेल्या मूर्ती बाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे ही मूर्ती गडचिरोली येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरात आढळते बहुदा चार पाय असलेली शिव शंकराची मूर्ती नसते .मूर्ती आपण बघितल्यास दोन पाय खाली सोडलेले असून दोन पायांनी मांडी घातलेली आहे. डॉ. देगलूरकरांनी हे चार पाय आपल्याला शैव सिद्धांताकडे नेतात असे म्हटले आहे कारण शैव सिद्धांत चार प्रमेयावर  उभा आहे. ही चार प्रमेय म्हणजे चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद, व योगपाद होय. या सिद्धांतानुसार त्याचा अर्थ लावावा लागतों. सदाशिव स्वरूपातील या मुर्त्या खजुराहो येथे दोन आहेत आणि मार्कंडेश्वर येथे एक आहे असे सांगितले जाते. इतर अभ्यासकांनीही या मूर्तीचा अर्थ लावलेला दिसतो या स्वरूपातील शिव चतुष्पाद असणे म्हणजे शिवाचे अस्तित्व आणि प्रभाव सत्य, द्वापर, त्रेता आणि कली या चारही युगात आहे. त्यांचा प्रत्येक पाय एकेका युगाशी संबंधित आहे. अभ्यासकांच्या नजरेतून अशा पद्धतीने या दोन शिल्पांचा अर्थ आपण पाहिला अशी अनेक शिल्पे मंदिरावर असतात या प्रत्येकाचा काही ना काही अर्थ असतो आज साकेश्वराच्या मंदिरावर अशी अनेक शिल्पे आहेत की, जी अभ्यासाच्या प्रतीक्षेत आहेत.बाहेर अस्ताव्यस्त शिळाही आहेत की ज्या आजही संशोधनाच्या प्रतिक्षेत आहेत.मंदिराच्या वरच्या भागात सिता नान्ही म्हणून एक छोटी बारवही आहे .या बारवेत जीवंत पाणी आढळते .या प्राचीन पाणवठयाला मात्र आता आधुनिक मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोत  अडथळा ठरत आहेत .

एक वेळ अवश्य या प्राचीन वास्तुस अवश्य भेट देऊन याचे जतन होण्यासंदर्भात आपले योगदान असू दया ! साकेश्वर आपल्याला खुणवतोय!

                 


संजय खांडवे

बुलढाणा

९०११९७११२२

➖➖➖

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर

 मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर

➖➖➖➖➖➖➖

सर्व देवामधे श्रेष्ठ......

 मस्तकी चंद्र धारण केलेला......

सर्व लोकांचा एकच अधिपती......... मानवी मनातील भयगंड मोडून काढणारा....

देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात .....

असे देवादिदेव महादेव म्हणजेच 'शिव '

  महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आहेत .असेच एक अकराव्या शतकात बांधले गेलेले प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम  अविष्कार, नव्हे तर मूर्ती शास्त्र अभ्यासकांसाठी ही एक अभ्यास शाळाच म्हणता येईल.हे मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे . छत्रपती संभाजीनगर वरूनही याचं अंतर केवळ शंभर किलोमीटर आहे. जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .

     मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार 'शस्त्रोंत्कीर्णा 'हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी 'शैलजा' 'हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते . या मंदिराचे निर्माण होत असताना दोन प्रकारचे दगड वापरलेले दिसतात आज च्या घडीला ज्या दगडांचा दर्जा चांगला होता त्या दगडावर घडवलेले नक्षीकाम व शिल्पे ही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत परंतु जो दगड कमकुवत निघाला आज त्या दगडाचा मुरुमा मध्ये रूपांतर होतांना दिसत आहे. हे मंदिराचे निरीक्षण केल्यावर दिसते .

      पूर्वमुखी असलेल्या या मंदिराला तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे आहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत .

उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो . नक्षत्राकृती असलेल्या सभामंडपात गेल्यावर अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला  होतोच.

या मंदीराला ५०  गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे . शिवाची स्वायत्तता व त्याचे सामर्थ्य याचे द्योतक असलेला नंदी वर्तुळाकृती रंगशिलेत मध्यभागी स्थित आहे . या मंदिराच्या रंगशिलेला कक्षासन आहे .मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूचे कक्षासन आजही शाबूत आहे त्याच्या बाह्य भागावरील शिल्पाचे निरीक्षण केल्यास त्यावर आलाप व गायन करताना ची शिल्पे दिसतात. रंगशिलेच्या वरच्या भागांमध्ये आपल्याला विविध सूर सुंदरी यांची शिल्पे कोरलेली आहेत .यामध्ये बासरीवादीका, मृदुंगवादीका, खंजिरी वादिका ,मंजिरीवादिका, वीणावादिका, शालभंजिका आदी सूर सुंदरीची शिल्प काढलेली दिसतात.


*कांस्य बंन्सी विणा शंख मृदुंग खंजरी।* *विविधा वादिन्न वश्या च क्वचित नृत्य नायका।।*


 यावरून त्या काळात कलेला किती महत्त्व होते याची जाणीव होते. शिल्प शास्त्रामध्ये अशा 32 प्रकारच्या देवांगनांची माहिती येते यामध्ये काही नृत्यांगना आहेत आणि काही वाजंत्रीधारीनी आहेत. उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात पूर्ण चंद्र आकाराचे शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण आहे . गर्भ गृहाच्याद्वारा वरील अप्रतिम शिल्पे  ही चालुक्य, होयसळ कालीन पद्धतीचे वाटतात. मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते . द्वारावर गणेश पट्टी आहे या द्वाराच्या वर छताला बघितल्यास अप्रतिम असे भौमितिक आकृतीमध्ये निर्माण झालेली दोन झुंबर आजही आपलं मन आकर्षित करून घेतात. हे मंदिर मध्यम नवतालातील उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो . राज्य पुरातत्त्व विभागाकडे हे मंदिर सध्या संरक्षित असल्याने याची बऱ्यापैकी डागडुगी व निगा राखली जाते.

   विदर्भातील मंदिर व मूर्ती शास्त्राचे अभ्यासक विवेक चांदुरकर यांच्या सोबत अनेकदा या मंदिराचा अभ्यास दौरा केला .त्यांच्या सोबतच दौरा करत असताना यशवंत महाविद्यालय नांदेड येथील मंदिर व शिल्प अभ्यासात डॉ अरविंद सोनटक्के त्याचबरोबर सातारा येथील मंदिर व मूर्ती शिल्प अभ्यासक आदित्य फडके यांच्याकडूनही या मूर्ती शास्त्राची प्रयोगशाळा असलेल्या मंदिराची अभ्यासपूर्ण पाहणी करता आली. यावेळी पुरातत्त्व अभ्यासक तथा पुरातत्व संस्था सदस्य डॉ कामाजी डक हे सुद्धा सोबत होते .संपूर्ण भारतामध्ये अन्वा येथील एकमेव शिव मंदिर आहे की ज्या ठिकाणी आपल्याला विष्णूची 24 शक्ती रुपे ही मूर्तीच्या स्वरूपात बघायला मिळतात शैव व वैष्णव या दोन्हीचा समन्वय मंदिराच्या शिल्परचनेतून आपल्याला दिसतो. जेवढे अंतर्भागामध्ये आपल्याला मूर्ती शिल्प व नक्षीकाम दिसते तेवढेच बाह्यभागावरही संपूर्ण मंदिराची परिक्रमा केल्यानंतर आपल्याला सुंदर अशी शिल्पे नजरेस पडतात. या शिल्पांमध्ये उपपीठावर असलेल्या थरावर थर रचत गेलेल्या या मंदिर बांधकामात हंस पट्ट्या, कीर्तीमुख पट्ट्या व इतर भौमितिक आकार असलेल्या पट्ट्या दिसतात. मंदिराच्या बाह्य भागातही अनेक सुरसुंदरी व नर्तिका यांची सुंदर अशी शिल्प आजही दिसतात. यासोबतच साधकांच्या रूपामध्ये उभे असलेली मूर्ती रूपातील साधक आपल्याला मंदिरात जातांना उजव्या बाजूच्या बाह्य भागातील कोनाड्यात दिसतात. गाभाऱ्याच्या बाह्य भागामध्ये आपल्याला देवकोष्टकांची रचना दिसते आणि या अनेक मुर्त्या आहेत.  मंदिराच्या उजव्या बाजूला देवकोष्टकामध्ये असलेला गजांतकशिव आपल्याला दिसतो या शिवाला चार हात आहेत परंतु ते आता भग्न झालेले दिसतात.  पायाखाली हत्ती  आहे व हत्तीची  आता सोंड तुटलेली आहे. दक्षिण भारतात अशा स्वरूपाच्या मूर्ती बघायला मिळतात अशा मूर्ती या पाषाण आणि धातू स्वरूपातही निर्माण झाल्या आहेत या स्वरूपाच्या मूर्तीची निर्मिती पल्लव ,चालुक्य चौल आणि होयसळ यांच्या राजवटीत झाली आहे.  यांच्या कालखंडात या स्वरूपाची मूर्ती अत्यंत लोकप्रिय होती. प्राणी रूप धारण केलेल्या असुराचा वध जेव्हा देव करत असत त्या समयी तो असुर त्या विशिष्ट प्राण्याप्रमाणे धिप्पाड आणि शक्तिमान आहे किंवा होता असे लक्षात घ्यायचे असते . त्याचे नामोहरम करणारा देव व देवता त्यापेक्षा अधिक शक्तिमान होती असा त्यातून अर्थ बोध होत असतो .गजासुर संहार ही एक रूपक कथा असून त्यातून शिवाची शक्तिमानता प्रगट होते. अशाच देवकोष्टकामध्ये शिवनटेश्वर, वराहमूर्ती अशी अनेक रूपे असलेल्या मूर्ती सुद्धा आपल्याला बघावयास मिळतात त्याच सोबत आपल्याला विष्णूची 24 स्त्री शक्ती सुद्धा याच भागात दिसतात. मंदिराच्या उत्तर बाजूला गाभाऱ्याच्या बाहेर भागावर आपल्याला गणेशमूर्ती  नजरेस पडते. डाव्या सोंडेचा असलेला हा गणेश आहे. या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असाच एक गणपती आपल्याला भारवाहक यक्षा सोबत भारवाहक गणेश म्हणून मंदिराच्या आतील बाजूस खांबाला तोलून धरताना दिसतो. तो भारवाहक गणेश आहे ज्याची सोंड सध्या तुटलेली आहे. याच भागात खांबावर दोन नाग शिल्पे सुद्धा आहेत. कामशास्त्राचे मूर्ती अभ्यासक डॉ अरविंद सोनटक्के यांनी या मंदिरावर असलेल्या काम शिल्पाचा अभ्यास केला आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस एका खांबावर दोन ठिकाणी हे काम शिल्पे आहेत त्यांनी वाचता येण्याच्या कामसूत्रातून काही संदर्भ घेऊन या शिल्पाचा अभ्यास सुरु आहे याविषयी ही माहिती प्रत्यक्षपणे त्यांनी दिली. ही अत्यंत दुर्मिळ शिल्पे आहेत असे त्यांचे मत आहे. असे मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले हे शिवमंदिर अजूनही पर्यटकांपासून वंचितच आहे. आता या मंदिराच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रभरातून अभ्यासक येत आहेत बऱ्याच अभ्यासकांनी या मंदिरावर पीएचडी करण्याचे कामही सुरू केले आहे आपल्या भागात असलेले हे सुंदर शिवमंदिर आपण जरूर एकदा आपल्या नजरेखालून घालावे. पुराण कथाचे अभ्यासक देवदत्त पटनायक आपल्या शिवाची सात रहस्ये मध्ये म्हणतात की "मनात कसलीही कपटी भावना नाही म्हणून यांना भोलेनाथ म्हटले जाते ".शिवपार्वतीचा संयोग सत्तेच्या जोरावर नाही, कुणी विजेता नाही , विजय नाही दोघेही एकमेकांना सत्ता गाजविण्याची संमती देतात. एकमेकांवर शिरजोरी करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही हेच ते प्रेम आहे." मूर्तीशिल्पाच्या भावार्थ मधून हेच दिसून येते आणि आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या एवढ्या मोठ्या वैभवाचा आपण निश्चितच अर्थ लावला पाहिजे या शास्त्रामध्येच त्या काळाचे तत्त्वज्ञान व विचार दडलेले आहेत जे आपल्याला दिशा देणारे ठरतात.



संजय खांडवे

9011971122

बुलढाणा

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

रतनवाडीचा अमृतेश्वर*

 *रतनवाडीचा अमृतेश्वर*


भारतात मूर्तिपूजेची सुरुवात कधीपासून झाली यामध्ये संशोधकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मूर्ती पूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून आपल्याला काल निश्चितीसाठी मदत होते. हडप्पा व मोहेंजोदडो मधील सापडलेले अनेक अवशेष आपल्याला याची साक्ष देतात .मध्य एशियामधील पर्वतमय प्रदेशातील सुमेरियन या संस्कृतीमध्ये मानव देहधारी देवतांचा उल्लेख मिळतो. ही संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. प्राचीन मेसोपोटोमियातील संस्कृतीमध्येही पुरातत्त्व अवशेषावरून मूर्ती व शिल्पे आदींचे निर्माण झाल्या विषयाची माहिती मिळते. ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजेस सुरुवात झाली, स्वाभाविकच आहे त्या अगोदरच मूर्ती शिल्प बनविण्याच्या कलेचा विकास झाला असावा. मेसोपोटोमिया मध्ये इसवीसन पूर्व 15 शतकात मिश्र लोकांनी त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती भव्यसमारंभात विधीपूर्वक आणली होती. ही घटना मूर्ती पूजेच्या त्या काळापासून असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. पतंजलीभाष्य, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, महाभारत, आदिग्रंथामध्ये मूर्ती शिल्पे ,मंदिरे याचा उल्लेख आढळतो. पाणिनी देखील आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख करतात.

बौद्ध धर्मात लेणी निर्माणाची सुरुवात केली गेली त्या काळात शैलाश्रये ही ध्यान साधनेसाठी वापरली जात असत. हीनयान लेणीमध्ये स्तूपांची चैत्यगृहाची निर्मिती झाली ,पुढे महायानांनी मोठ्या प्रमाणात लेण्यांमध्ये बुद्ध मूर्तीचे निर्माण केले. महाराष्ट्रात जवळपास शेकडो च्या वर लेण्या आढळतात या लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला आपल्या देशात जवळपास सर्व धर्मात मूर्तिकलेला व शिल्पकलेला फार महत्त्व दिले गेले व यामधून मूर्ती पूजनासही सुरुवात झाली. शिव उपासनेला भारतात विशेष महत्त्व आहे. गुप्तकाळात मूर्तिकलेच्या दृष्टीने ठरलेला सुवर्णकाळ हा शिवाच्या मानव रुपी मूर्ती निर्माणास पोषक ठरला अशा मूर्तींची संख्या कमीच आहे पण लिंगमूर्ती ची संख्या अधिक निर्माण झाली. यामध्ये एकमुखी, बहुमुखी, द्विमुखी, पंचमुखी,  अष्टमुखी असे प्रकार आहेत पण गुप्तकाळात एकमुखी लिंग अधिक निर्माण झालेले आढळते. जीवाला शिवाची प्राप्ती आणि प्रकृती व पुरुष या प्रतीकांच्या रूपाने लिंग पूजेस प्रारंभ झाला. याचे आणखीही काही प्रकार आहेत यामध्ये स्वयंभू लिंग की जे नैसर्गिक भूमी मधून निघालेले असते .बाणलिंग  काकडी किंवा अंड्याच्या आकाराचे असते व ते पवित्र नदी मधून प्राप्त होते.


*छत्रभं त्रपुषाकारं कुक्कुं टाण्डनिभं तथा ।*

*अर्धेंन्दु सदृशं चाथ बुब्दुदाभं पंचमम्।।*


शिल्परत्नाच्या उत्तर भागात, दुसऱ्या अध्यायात छत्राप्रमाणे, काकडी प्रमाणे, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे तसेच अर्धचंद्र सदृश्य आणि जल थेंबाप्रमाणे अशा पाच प्रकारचा लिंगाचा वरचा भाग असतो असे म्हटले आहे. राजलिंग ,घटितलिंग मानुषलिंग ही बसवून तयार केली जातात .याचा आकार मोठा असतो.  राज लिंगामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे एक मुखी ,बहुमुखी असे प्रकार असतात घटित लिंगामध्येही अष्ठेत्तर लिंग, सहस्रलिंग असेही प्रकार येतात. 

 नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अनेक शिवमंदिरांचे निर्माण झाले. ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर  यासारखी ज्योतिर्लिंगे तर आपण ओळखतोच. याशिवाय महाराष्ट्राच्या अनेक भागात शिव मंदिरांचे निर्माण झाले मार्कंडेश्वर ,धुपेश्वर, माणकेश्वर, सिद्धेश्वर पाताळेश्वर ,हरिश्चंद्रेश्वर अमृतेश्वर ,असे अनेक मंदिरे सांगता येतील अशापैकीच एक अमृतेश्वर या शिवमंदिरास भेट देण्याचा योग आला नावाप्रमाणेच निसर्गाच्या सौंदर्यातून सतत अमृत वर्षाव होत रहावां असंच हे ठिकाण .अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या गंगेत सामावणाऱ्या प्रवरेचा उगम याच स्थानावरून होतो हेच ते शिवस्थळ आहे. प्राचीन मंदिराच्या पाठीमागे पाठीराखा सारखा वाटणारा प्रचंड असा प्राचीन रतनगड आपल्याला दिसतो.

  सानंददरी ,कळसुबाई, हरिश्चंद्रगड ,अलंग, मदन कुलंग ही सह्याद्रीची वैभव संपदा याच अमृतेश्वराच्या परिसरात आहे. पुण्यावरून 200 तर मुंबईवरून 180 किलोमीटर अंतरावर हा अमृतेश्वर येतो .संगमनेर- अकोले -राजुर - भंडारदरा मार्गे देखील पोहोचता येते. कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भागात हे मंदिर आहे.  भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरवर येणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे. भूमीज प्रकारातील नागरशैलीमधील सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या या काळ्या दगडात अप्रतिम नक्षीकाम असलेल्या प्राचीन मंदिराचे निर्माण झाले आहे. मुख्य मंदिरावर शिखरी-शिखर प्रकारातील छोटी छोटी शिखरे अगदी सूक्ष्म शिल्पकलेतून साकारलेली दिसतात. आमलकापर्यंत दोन्ही बाजूने चौकोनाकार लता कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे त्यासमोरच गाभारा आहे.  गाभाऱ्यातून पुढे सभामंडपात जाता येते.  सभामंडपातील खांबावरील कोरीव काम 1000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेच्या सुवर्ण युगाची आठवण करून देते. या सभा मंडपात आपण हरवून जातो. जणू काही पुन्हा त्या काळात गेलो की काय असा भास होतो भूमिती- बीजगणिताच्या कसोटीच्याही पलीकडे असणाऱ्या भौमितिक रचना, मूर्तिकाम, शिल्पपट ही आजच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानाला मागे टाकताना दिसतात.

यक्ष ,भारवाहक, प्राणी, पक्षी, वेदिका,  देव, दानव, अप्सरा, सुरसुंदरी आदी शिल्प येथे कोरलेली आहेत.  मंदिरावर काम शिल्पे देखील आहेत. पुराणातील समुद्रमंथनाचा देखावा येथे शिल्पीत केला आहे. गर्भगृहाच्या वर कीर्तीमुख, शंख व कमळ वेली आहेत बाहेरच्या भागातही कीर्ती मुख्य कोरलेली आहेत .प्रकाश योजनेसाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक प्राचीन मंदिराजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून पुष्करणी अथवा बारावाची व्यवस्था ही मंदिर स्थापत्यचा एक भाग असतो या ठिकाणी सुद्धा जवळच  20 फूट लांब-रुंद पुष्करणी आहे. यात चारही बाजूला देवकोष्टके आहेत.त्यात गणेश व विष्णूची मूर्ती स्थापित केलेली दिसते. बारावातील पाणी हे अमृतेश्वरासारखेच अमृतमय व नितळशार आहे. समुद्रमंथनातील प्राप्तरत्नांपैकी एक अशी ही पुष्करणी असल्याची कथा सांगितली जाते. समुद्रमंथनातून प्राप्तरत्नांपैकीच हा अमृतेश्वराचा निसर्गाचा परिसर आहे की काय असंच वाटायला लागतं. येथून काढता पाय घ्यावा असं कधी मुळी वाटतच नाही. इथेच अमृतेश्वराच्या कुशीत रमावं असंच वाटतं. पश्चिमेकडून रतनगड अडवतो त्याचा अंगठा ही आनंदाचा संकेत देत इथेच थांबा असं म्हणतो. पूर्वेकडील निळाशार भंडारदरा गारवा देत हेच म्हणतो  की तुम्हीही एकदा या अमृतेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अमृततुल्य जीवनात या अमृत रुपी निसर्गाचा आस्वाद घ्या.

जगात कुठेही जा सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही अगदी सूक्ष्मपणे न्याहाळा  असे सौंदर्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही.



संजय खांडवे

९०११९७११२२

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

Obc

 *मंडल दिनाच्या निमित्ताने...*

➖➖➖➖➖

आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातून जात असताना इतर मागासवर्गाच्या संदर्भात १९७८ मध्ये गठीत मंडल आयोगाची व त्याच्या संघर्षाची निश्चितच आठवण येते. आजच्याच दिवशी ७ ऑगस्ट १९९० ला मंडल आयोग इतर मागास प्रवर्गातील समुदायाला लागू करण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली. निमित्ताने या दिवसाची आठवण म्हणून देश भऱ्यात 'मंडल दिन' साजरा केला जातो. 


भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४० अन्वये देशातील इतर मागास प्रवर्गासाठी आयोग गठन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोगाची स्थापना २९ जानेवारी १९५३ रोजी करण्यात आली होती. ३० मार्च १९९५५ ला या पहिल्या आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला. या  आयोगासाठी १८२ प्रश्नाच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून व व्यापक दौऱ्यातून हा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. या मागासवर्गाच्या अहवालात २३९९ इतर मागास जातीचा समावेश करण्यात आला. पुढे हा आयोग चर्चेच्या माध्यमातून कसोटीवर टिकू शकला नाही. इतर मागास प्रवर्गात असलेल्या मोठ्या समुदायाची पुढील काळात सुद्धा असेच संघर्षाची शृंखला सुरूच होती. 


इतर मागास प्रवर्गात येणारा भारतामधील हा समुदाय प्रचंड मोठा होता. याची व्याप्ती संपूर्ण भारतभरामध्ये होती. कलम ३४० अन्वये यांना त्यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक बाबींचा अभ्यास करून त्यांना प्रगतीच्या प्रवाहामध्ये घेण्यासाठी विविध उपाय योजनांच्या माध्यमातून जोडणे अत्यंत आवश्यक होते.


*"समानता केवल समान लोगो के बीच होती है! असमान को समान के बराबर रखना असमानता को स्थिरता प्रदान करना है!"*

*

२० डिसेंबर १९८७ रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी एक आयोग गठित केल्याची घोषणा केली. हा आयोग म्हणजेच दुसरा मागासवर्गीय आयोग होता. या आयोगामध्ये पाच लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल होते. त्यामुळेच यांची या योगाची ओळख मंडल आयोग म्हणून सर्विकडे झाली. या आयोगामध्ये इतर चार सदस्य म्हणून दिवाण मोहनलाल, आर. आर. भोले, दिन बंधू साहू, के. सुब्रमण्यम, या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे बिहार राज्यांमध्ये संसद सदस्य होते. १९६७ ते ७० व पुढे १९७७ ते १९७९ हे लोकसभेचे सदस्य होते. 


या मागास आयोगाला काम करत असताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला. यामध्ये दिनबंधू साहू यांनी प्रकृती अस्वस्थामुळे राजीनामा दिला. ५ नोव्हेंबर १९७९ मध्ये ते या आयोगातून बाहेर पडले. व त्यांच्या जागी एस. आर. नायक यांची नियुक्ती करण्यात आली. १९७९ मध्ये लोकसभा भंग झाल्याने, पुन्हा या आयोगाच्या कामाची गती मंद झाली. पुढील काळात तीन वेळा या आयोगाचा अवधी वाढविण्यात आला. 


या आयोगाला १ जानेवारी १९७९ रोजी गठित करून पहिली मुदत  ही ३१ डिसेंबर १९७९ पर्यंत अहवाल देण्याचे ठरले. त्यापुढेही मुदत वाढ देण्यात आली. पुढची मुदतवाढ ही ३१ डिसेंबर १९८० पर्यंत वाढवण्यात आली. १९३१ च्या जनगणनेचे आकडे नसल्याने या आयोगाला अनंत अडचणीला सामोरे जावं लागत होते. १९८० मध्ये इंदिरा गांधी सरकार आले, आणि या मंडल आयोगाचा अहवाल तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानिजैलसिंग यांना सादर केला गेला. यावेळेस ३,७४३ विविध जाती आणि समुदायाचा समावेश मागास प्रवर्गात करून ४० शिफारस करण्यात आल्या. देशातील सामाजिक व शैक्षणिक मागास जातीचा शोध घेण्यासाठी आयोगाने ११ निकषाचा अवलंब केला होता. आणि तीन प्रमुख शीर्षकांतर्गत गटबद्ध केले गेले. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या बाबी तपासल्या गेल्या. ओबीसी ओळखण्यासाठी ११ निकष विकसित केले गेले. 


आयोगाने करून दिलेले शिफारशी या निश्चितच ओबीसींना नोकऱ्या मिळवून देण्यात नाही तर ओबीसींच खचलेल मनो धैर्य उंचावणारे होते. त्यांना त्यांच्या क्षमताची जाणीव परत मिळवून देण्यासाठी त्या यशस्वीच ठरणाऱ्या होत्या. या संदर्भात मंडल आयोगाने मांडली भूमिका ही अतिशय बोलकी होती. सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाची व्याख्या ठरविणारा आणि मापदंड निश्चित करणारा हा आयोगाचा अहवाल होता. याच अहवालानुसार मागासवर्गाची ओळख यातून झाली.


*आयोगाने ओबीसींसाठी सर्वसाधारणपणे पुढील शिफारसी केल्या*


ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्यावे. ओबीसी वर्गातील उमेदवारांची गुन्हा अनुक्रमे खुल्या स्पर्धेत निवड झाली असेल तर त्यांचा समावेश २७% कोठ्यात करू नये. ओबीसींना सर्व स्तरातील पदोन्नतीच्या बाबतीत वरील प्रमाणातच पदोन्नती द्यावी. राखीव जागांचा भरला न गेलेला कोटा पुढे तसाच ठेवावा. आणि त्यानंतरच तो राखीव नाही असे समजावे. थेट भरती करताना अनुसूचित जाती जमातीसाठी वयाच्या कमाल मर्यादेतून सूट दिली जाते ती ओबीसीसाठी ही लागू करावी. प्रत्येक श्रेणीच्या पदासाठी ज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी रोस्टर पद्धत अवलंबले जाते तशीच पद्धत ओबीसीसाठी ही स्वीकारावी. केंद्र आणि राज्य सरकारचे सार्वजनिक उद्योग राष्ट्रीयकृत बँका यांनाही सुचित केल्याप्रमाणे आरक्षण पद्धत जशीच्या तशी लागू करावे. सरकारकडून या न त्या मार्गाने आर्थिक मदत मिळालेल्या सर्व खाजगी क्षेत्रातील उद्योगांनाही सूचित केल्याप्रमाणे आरक्षणाची पद्धत लागू करावी. सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांनाही आरक्षणाच्या या कक्षेत आणावे.


७ ऑगस्ट १९९० रोजी व्ही.पी. सिंग सरकारच्या काळात हा आयोग लागू करण्यात आला. ही एक ऐतिहासिक घटना होती. देशातील बहुसंख्य असलेल्या ५२% इतर मागास प्रवर्गात येणाऱ्या समुदायासाठी उन्नतीचा व मनोधैर्य वाढवणारा हा दिवस होता.

            आज या मंडल आयोगमुळेच विशाल समुदायात असलेला हा इतर मागास प्रवर्ग आपली शैक्षणिक सामाजिक तथा आर्थिक उन्नती साधताना दिसत आहे. देशात या कमिशनमुळे जातीय बाबी नष्ट होऊन इतर मागास प्रवर्गातील समुदायांमध्ये वर्गीय चेतना जागृत झाली. ही अशीच जागृत राहावी या अपेक्षेसह मंडल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

➖➖➖➖🙏🏻🙏🏻

-संजय खांडवे 

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

ओबीसी

 *छत्रपती संभाजी नगरातील "ओबीसी चिंतन" हे देशव्यापी  मंथनाकडे .......*

➖➖➖➖➖➖➖    संजय खांडवे,बुलढाणा



              ओ बी सी आरक्षण हा मोठा संघर्षाचा विषय आहे.या व्यवस्थेत या समुदायाला स्थान निर्माण करण्यासाठी खूप मोठा काळ गेला .आज स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानंतरही परिस्थिती फारशी बदलली असे म्हणणे धाडसाचेच ठरेल . भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि या संविधानात स्वातंत्र्य ,समता, न्याय व बंधुता या वर आधारीत एक आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सखोल अभ्यासातून जगात आदर्श ठरणारी घटना आपल्याला दिली .

       या घटनेतील ३३० व ३३२ अधिनियमातून आणि १५(४) व १६(४)नुसार नोकरी मधे  एस सी ,एस टी साठी आरक्षणाची तरतुद केली गेली.त्याच बरोबर ३४० अधिनियमातील तरतूद नुसार ओबीसी आरक्षणासाठी आयोग गठीत करण्यात यावा व त्यानुसार ओबीसी प्रवर्ग ठरविण्यात यावा अशी तरतुद करण्यात आली होती .याला अनुसरुन काकासाहेब कालेलकर आयोग नेमण्यात आला होता. या नुसार त्यावेळी  ओबीसी मधे २२१८ जाती ठरविण्यात आल्या होत्या. देशात बहुसंख्येने  असलेल्या समाज वर्गाची हककाच्या लढाईचाच तो काळ होता असेच म्हणावे लागेल .१९७७ मधे  मा. मोरारजी देसाई सत्तेवर आले व त्यांनी बी.पी.मंडल कमीशनची स्थापणा केली.मोरारजी देसाई सरकार गेल्यानंतर मा  इंदिराजी गांधी सरकार सत्तेत असतांना १९८१ मधे मंडल आयोगाने आपला रिपोर्ट दिला .यानुसार ३७४३ जातींचा समावेश करण्यात आला.त्यानंतर पुढे अनेक घडामोडी झाल्या ओबीसी चळवळीना त्या ज्ञात आहे.पुढे मा. व्ही पी सिंग पंतप्रधान असतांना मंडल कमीशन लागू झाले .त्यानंतरही क्रिमिलेअरचा संघर्ष सुरुच होता .९० च्या दशकात ओबीसी समुदाय हया संविधानाने दिलेल्या हककाचा लाभार्थी ठरला .२७% आरक्षणाने भारतातील कान्याकोपऱ्यात असलेल्या शेवटच्या घटकाचा सामाजिक दर्जा उंचावण्यास मदत झाली .आजही बहुसंख्येने असलेला ओबीसी घटक जात- धर्म सोड्रून आपल्या न्याय्य हकक,अधिकारासाठी एकत्र येत आहे पण तो अधिक संघटीत होणे गरजेचे आहे.  

        आज ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या अधिकारी व कर्मचारऱ्यांचे अधिष्ठाण असलेली मजबूत संघटना  मा .सुनिल शेळके यांनी स्वेच्छानिवृत्तीपूर्वी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना  ही संघटना स्थापन केली होती . या संघटनाचे जाळे आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. विविध आरक्षणचा गुंता, न्यायालयीन लढे यामुळे संभ्रमित इतर मागासवर्गीय समूह या बाबी लक्षात घेता संघटनेचे कार्य व मार्गदर्शनाला  येणाऱ्या काळात महत्व प्राप्त झाले आहे.  ओबीसी विदयार्थी तथा पालकांना हे संघटन एका क्लीकवर  सामावून घेवून त्याच्या विदयालयीन,महाविदयालयीन शिष्यवृत्ती,प्रवेश तथा क्रिमिलेअर विषयक समस्या अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यन्त असलेल्या बांधवाला क्षणात सोडविण्यास मार्गदर्शक ठरणार आहेत . स्वतःची स्वंतत्र वेबसाईट व यॅप या प्रसंगी सुरू होणार आहे .यामधे सर्व प्रकारचे शासकिय आदेश व माहीती मार्गदर्शनासह उपलब्ध होणार आहेत या साठी या संघटनेचे तज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत .   बेखबर असलेला ओबीसी आता सोशलमिडीया , तंत्रज्ञानाच्या व स्पर्धात्मक युगात बाखबर करण्याचे काम या संघटनेने हाती घेतले आहे . शिबिराचे उदघाटन प्रा. डॉ. सुरज मंडल यांच्या हस्ते होणार आहे. बहुचर्चित मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे ते नातू असून ‘भविष्यातील ओबीसींचे आंदोलन कसे असायला हवे?’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. प्रमुख वक्ते तथा सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड हे ‘सद्यस्थितीत ओबीसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोरील आव्हाने’ हा विषय उलगडून सांगणार आहे. दुसऱ्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे हे ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती व त्यातील अडचणी या उपयुक्त विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

       छत्रपती संभाजीराजे नगरात या चिंतन शिबीराच्या निमित्ताने महाराष्ट्र भरातून संघटनेचे पदाधिकारी,अधिकारी हजेरी लावणार आहेत .या ऐतिहासिक नगरीमधील हे चिंतन देशभरातील ओबीसी चळवळीसाठी मंथन ठरणार आहे .


रविवार, २३ जुलै, २०२३

सुरेश देवकर सर

 *क्षितिजावरचा उगवता सूर्य.........*


एक व्यक्ती अनेक आघाड्यावर जेव्हा काम करते व त्या कामात ती आपली गुणवत्ता सिद्ध करते किंवा आपली ओळख निर्माण करते त्यावेळेस त्या व्यक्तीला "अष्टपैलू" म्हटले जाते आपण बहुदा हा शब्द क्रिकेटच्या संदर्भात अनेक वेळा वापरतो व तो त्या खेळा इतकाच मर्यादितही राहतो. त्या क्षेत्रातील विविध बाबीमध्ये निपुण असणारी व्यक्ती त्या-त्या क्षेत्रात अष्टपैलू ठरते, परंतु अनेक क्षेत्रात एक व्यक्ती आपल्याला यशश्वीवीपणे काम करताना दिसते त्यावेळेस  मात्र असे व्यक्तिमत्व अष्टपैलूच्याही पलीकडचे असते.मुळात हिऱ्याला  साधारणतः आठ पैलू  असतात .त्याला कनोरे असेही म्हणतात त्याला तासून ही बनतात व मग सर्व अंगाने अनंत काळापासून दडपलेला हिरा चमकतो.आपले अस्तित्व सिद्ध करतो . असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे सुरेश देवकर सर ! पश्चीम विदर्भातील सहकार तथा सामाजिक क्षेत्रातील एक उगवता सूर्यच !

      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले .त्यांचे वडील स्व.बाबुराव देवकर हे आर्मीमधे होते आई गीताई व बाबा सोबत मध्यप्रदेश मधील सागर या ठिकाणी  बहीण व दोघे भाऊ असा परिवार अत्यंत आनंदाने राहत होता .सरांचे दुसरी पर्यन्तचे शिक्षणही तेथेच झाले पण सेवेत असतांना बाबांना झालेल्या दुःखापतीमुळे त्यांना मूळ गावी परतावे लागले. बरेच वर्ष इलाज चालला पण त्या आजारात बाबा त्यांना सोडून गेले .मुळात देंशसेवेच्या कार्यातच अत्यंत कमी वयात बाबा सोडून गेले ,त्यावेळी सरांचे वय अकरा बारा वर्षाचे होते . आईंनी काबाड कष्ट करून त्यांना शिकवल .धामणगाव -धाड या ठीकाणी उच्चप्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले.पुढे बुलढाणा येथे  श्री शिवाजी शिक्षण संस्थेत व जिजामाता महाविद्यालयात ते शिकले.वडीलांच्या शिस्तीचा आदर्श व आईचे संस्कार व सोबत आपली जिद्द,धैर्य,बुध्दीमत्ता ,विचार,स्वभाव व महत्वाची आपली मेहनत यशाच्या शिखराकडे नेत होती. सर्वप्रथम त्यांना मलकापूर तालुक्यातील आव्हा या ठिकाणी तलाठी या पदावर नियुक्ती मिळाली अत्यंत तुटपुंजा पगार असल्याने त्यांनी आपलं पुढील शैक्षणिक काम सुरूच ठेवलं होतं येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेला त्यांनी संधी समजून आपलं काम सुरू ठेवलं होतं.त्यांच्यासाठी ती एक -एक पायरीच होती पुढे  तलाठ्याची नोकरी सोडून त्यांनी पैठण तालुक्यात ग्रामसेवक या पदावर नियुक्ती मिळवली. यामध्ये त्यांचा थोडा का होईना पगार वाढला होता, पण तिथेही त्यांचे मन रमले नाही .पुढे आयटीआय अकोला या ठिकाणी त्यांना भाषा निर्देशक म्हणून नियुक्ती मिळवली त्या ठिकाणीही त्यांनी काही वर्ष काम केलं तेथेही ते थांबले नाहीत पुढे अजून परीक्षा देत राहिले आणि या काळातच त्यांनी आपलं बीएडचं शिक्षणही पूर्ण केलं होतं म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांना वैजापूर या ठिकाणी नियुक्ती मिळाली. या दरम्यान त्यांनी राज्यसेवेच्या ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत मजल मारली होती . त्यावेळी परभणी जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या जागा निघाल्याने त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला शेवाळा या ठिकाणी माध्यमिक शिक्षक या पदावर नियुक्ती मिळवली तेथे त्यांनी वर्षभर काम केले . जिल्हा बदलीने त्यांनी आपला स्व जिल्हा गाठला आणि स्व जिल्ह्यात त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला धाड या ठिकाणी बदली करून घेतली .येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.जीवा भावाची अन विश्वासाची नाती या प्रवासात त्यांनी आपल्या  विचार- आचारातून निर्माण केली .सहकार अधिकारी असलेल्या अश्याच एका जीवाभावाच्या मित्राने सहकार क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला व सुरूवात झाली.ते नेहमी म्हणतात "एक चांगला दाना मातीत  पेरा असे हजारो  चांगली दाने मिळतात मग मी अशी चांगली माणसे अन विचार पेरण्याचा ध्यास घेतलाय़ ! आणि याची प्रेरणा मला शिवचरित्रातून मिळते "

       आज आदिती अर्बन हा वटवृक्ष उभा राहीलेला आपण पाहतो .त्याचे ब्रीदही तसेच आहे ," नाते विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे '' एक प्रचंड मोठा आदिती अर्बन परिवार त्यांनी उभा करून हजारो कुटुंबांना रोजगार उभा केला आहे .त्यांच्या संस्थेत काम करणारा प्रत्येक सदस्य ही संस्था आपली आहे याच भावनेनच काम करतो हा त्यांनी आपल्या माणसांमधे निर्माण केलेला प्रचंड विश्वास आहे हेच दाखवतो .

      सहकार क्षेत्रात तर आहेच पण त्यांचे वाचनही अत्यंत दांडगे!


हलवूनि खुंट। आधी करावा बळकट॥

 मग तयाच्या आधारे। करणे अवघेची बरे ॥


तुकोबांच्या विचारांचा त्यांचावर विशेष प्रभाव असल्याने 

 एवढ्या व्यापामधून आठवड्या महिन्याला नवीन आलेली पुस्तके विकत घेऊन वाचणे हा त्यांचा छंदच ! स्वतःचे घरातील सुसज्य ग्रंथालयाच आहे. नुसते पुस्तक वाचून ते थांबत नाहीत तर त्यावर तासंन -तास चर्चाही ,यातून चिकित्सा, तर्क आणि अनुमान आणि मग पुढे आपल्या विवेक बुद्धीवर तासणे हा त्यांचा या प्रचंड व्यापांमधील छंद आवाक करणारा आहे. इतिहास विषयक पुस्तकांची त्यांना विशेष आवड ! आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा त्यांना सार्थ अभिमान! शिवचरित्राचा अभ्यास तर त्यांचा सतत चालूच असतो. महाराजांचा विषय तर त्यांच्या चालण्या- बोलण्यातून सुरूच असतो. शिवचरित्रातील आठवणी  न काढणारा दिवस त्यांचा तर कधी उगवलाच नसेल !

          त्यांचा याच अभ्यासू व दुरदृष्टी  मधून त्यांनी त्यांच्या लक्षात की, प्रत्येक जिल्हयाला  वृत्तपत्र क्षेत्रात मुखपत्र आहे   पण आपल्याच जिल्हयाला नाही , की जे एकाच वेळी सपूर्ण जिल्हयात रोज पोहचते ,म्हणून आपल्या शहरातून सपूर्ण विदर्भात व पुढे मराठवाडयात रोज प्रकाशीत होणारे दैनिक आता आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्हयातून रोज प्रकाशीत होऊन ओळख निर्माण व्हावी  जनसामान्याच्या प्रश्नानां वाचा फुटावी.साहित्यिकांना,लेखकांना,कवींना संधी मिळावी हया हेतूने त्यांनी " दैनिक महाभूमि" या वृत्तपत्राचा लवकरच प्रकाशनाचा मानस योंजिला असून युद्धपातळीवर काम सुरू आहे .महीनाभरात ते वाचकांच्या हातात पडेलच !  

    यासोबतच त्यांना आनखी एक व्यासंग ! ऐतिहासिक वास्तूंना भेट देणे .त्यांचा अभ्यास करणे. तज्ञामार्फत त्या समजून घेणे .गड ,लेणी, मंदिरे ,बारव, विरगळ आदी ऐतिहासिक प्रतीके अभ्यासासह जतन व संवर्धनावर त्यांचा कृतीयुक्त जोर असतो.शिवजागर मंच सदस्य म्हणून त्यांचा या कार्यात सक्रिय सहभाग असतो .या प्राचीन वास्तुच्या सवर्धनासाठी   ते स्वतः या व्यस्ततेमध्ये सुद्धा वेळ देतात. ही गोष्ट काही सामान्य नाही.आपल्या परिसरातील अशी फार कमी ऐतिहासिक स्थळे असतील की जे त्यांनी भेट देवून पाहिले नसतील. फक्त भेटच नाही तर वेळ देऊन समजून घेण्याची त्यांची वृत्ती खरच अनुकरणीय आहे. ऐतिहासिक स्थळावर तर सुट्टीच्या दिवशी अख्खा दिवस घालवतात. एवढं करूनही कितीही दूर जावो आपण घरी नऊच्या आत पोहोचलो पाहिजे हा त्यांचा मानस असतो. वैयक्तिक जीवन मात्र त्या अत्यंत साधेपणाने जगतात.प्रचंड मित्राच्या गोतावळ्यात वावरणारा हा माणूस मित्रांना आपल्या जीवनात मोठं स्थान देतात.आपल्या माती अन माणसाप्रती प्रचंड कृतज्ञ असलेल्या या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस !

"ज्ञानाबरोबर ज्ञानाचा दर्प नव्हे ,तर सुगंध दरवळायला हवा " 

‌हा आदनिय आ. ह. साळूंखे सरांचा विचार आपणास तंतोतंत लागू पडतो .

‌हा सुंगध असाच सालो साल दरवळत राहो या शिवशुभेच्छा !

आई जिजाऊ त्यांना उदंड आयुष्य देवो!

➖➖➖➖

संजय खांडवे

9011971122

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

तुका आकाशा एवढा

 *तुका आकाशाएवढा......*

➖➖➖➖➖➖

         संजय खांडवे       9011971122


संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील संत परंपरेचे शिरोभूषण मानले जातात .वारकरी भागवत धर्माचा कळस जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आजही जनमानसात तुकारामांची अभंगवाणी सतत मुखोतगत असल्याचे दिसते. "इडापिडा टळो बळीचे राज्य येऊ दे"

 ही जशी मौखिक परंपरेतून मुखोतगत आहे अगदी तसेच तुकारामांचे असंख्य अभंग या महाराष्ट्राच्या जनमानसातून सदैव जीवंत राहिलेले दिसतात. त्यांनी अभंग लिहून ठेवले पण त्यांना ते बुडवावे लागले ही एक दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल.अगाध ज्ञानाच्या कसोटीवर तासून निर्मिलेली गाथा कर्मठ व्यवस्थेच्या पचनी न पडल्याने ती बुडविण्याची वेळ संत तुकारामांवर येणे याची कल्पनाच करणे कठीण आहे . भाबनाथाच्या (भंडारा) डोंगरावरील सामाजिक साक्षात्कारा नंतर  संत तुकारामांच्या चिकित्सेतून अभंगवाणीचा जन्म झाला .त्या अगोदर संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाटयाची असलेली कर्ज खाती  इंद्रायणीमध्ये बुडवली. हा त्यांना झालेला एक सामाजिक साक्षात्कारच होता .मला जर काही करायचे असेल तर सुरुवात ही माझ्यापासून केली पाहिजे ही त्या मागची  भावना होती. असा असत्याकडून सत्याकडे जाणारा मार्ग त्यांनी गाथेतून दाखविला. समाज मनात अज्ञानाकडून- ज्ञानाकडे, अंधाराकडून -प्रकाशाकडे ,दुःखाकडून- सुखाकडे, शोषणा कडून -मुक्ततेकडे, गुलामगिरी कडून स्वातंत्र्याकडे ,जाण्याची आस निर्माण झाली. आपण सिद्धी, स्मृती, श्रृती याचे अंकित नसून सर्वसमावेशक समचरणी पाठीराखा असलेल्या विठ्ठलाचे लेकरं आहोत. त्या विठ्ठलाने आम्हाला आता प्रचंड बळ दिले आहे. हा संत नामदेवांनी अकराव्या शतकात सांगितलेला संदेश "आमुचा विठ्ठल प्रचंड"  पुढे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चालविला. त्यांना साक्षात विठ्ठलाच्या रूपाने संत नामदेवांचा दृष्टांत झाला होता. नामदेवांनी सांगितलेल्या विठ्ठलाचा मार्ग पुढे संत तुकारामांनी चालू ठेवला.भय मुक्त होऊन विठ्ठलाचे बळ संततुकारामांना मिळाले . आपल्या अभंगातून मनामनात आणि घराघरात रुजविला. अभंग गाथेची रचना खुद्द स्वतः तुकाराम महाराजांनी  स्वहस्ताक्षरात केली. स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या या वह्यांचे पुढे काय झाले हे सांगणे कठीण आहे. त्यांना त्या बुडवाव्या लागल्या हे मात्र सत्य आहे .शाईने लिहिलेला कागद आपण कधीतरी तुकारामांना समजून घेताना पाण्यात बुडून बघितला पाहिजे. असे  वाटते.

 "कोरड्या वह्या निघाल्या उदकी।

 त्या तरी लुटुनि नेल्या भाविकी।

 प्रख्यात लोंकि व्हावया ॥ "

 अशी माहिती महिपतीने दिली आहे श्री तुकाराम बुवांचे अभंगाची गाथा मधील 1950 सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की "या निवाडयाच्या दिवसानंतर तो निर्याणापर्यंत भक्तीच्या व काव्याच्या माधुरीचा ज्यांत  परिपाक उरला होता असे अनेक अभंग तुकारामाने स्वहस्ते लिहून ठेवले असले पाहिजेत. त्या हस्तलिखिताचा अद्यापही पत्ता लागलेला नाही .खुद्द तुकारामांच्या घराण्यात देहुत पूजेस ठेवलेली अशी त्यांच्या हातची म्हणून जी वही दाखवितात ती फक्त २४८ अभंगच आहे. सारांश तुकारामांच्या हातचे समग्र लिखाण गेल्या शंभर वर्षात तपास करून सुद्धा मिळाले नाही व नजीकच्या भविष्यातील ते सापडेल असा संभव दिसत नाही."

     या प्रस्तावनेनंतर आज ७२ वर्ष उलटली यात काही शंका नाही तुकारामांची समग्र गाथा हा एक वेगळा विषय आहे. पण प्रश्न असा पडतो की तुकारामांना समजून घेताना गाथा बुडवावी लागणे अन गाथा वर येणे या दोन्ही क्रिया वेगवेगळ्या आहेत. दोन्ही क्रियेकडे आपण सारख्या दृष्टीने खरंच बघतो आहोत का? "गाथा बुडविणे" याकडे आपण सहजतेने पाहतो मात्र "गाथा वर येण्याच्या " क्रियेला अलौकिक दृष्टीने पाहतो, नव्हे तर त्यावर अभिव्यक्तही होत असतो. बुडवण्याच्या क्रियेची वर येणे ही प्रतिक्रियाच आहे असेच वाटते. त्यामागे काही अलौकिकता असेल असे वाटत नाही. स्वतः प्रयत्नवादी, विज्ञानवादी, विधीचे जाणते, मेणाहूनही मऊ, वज्रालाही भेदणारे, जे पाहिजे ते देणारे ,गांडीची लंगोटी सोडून देणारे प्रसंगी नाठाळाच्या मस्तकात काठी सुद्धा मारायला मागेपुढे न पाहणारे, माय बापाहूनही मायाळू, अमृता पेक्षाही गोड, लोकजालातून सुटलो म्हणून धन्यता मानणारे, देवालाही   प्रतिप्रश्न करणारे, बुवाबाजी भोंदूगिरी आणि चमत्कार नाकारणारे, असे संत तुकारामांच्या बाबतीत अलौकिक,चमत्कार होणे मनाला पटत नाही. इंद्रायणी मध्ये डुबलेल्या अभंग गाथेला पाहत तुकाराम महाराज तेरा दिवस माईच्या काठावर उपाशीपोटी बसून होते. पंचक्रोशीतील गावोगावाहुन आलेले लोक देहुत जमले, मुखोद्गत असलेले अभंग इंद्रायणीच्या साक्षीने दुमदुमू लागले. साक्षात पांडुरंग जणू जनता जनार्दनाच्या रूपाने मदतीस आला. संताजी जगनाडे महाराजांनी हे अभंग पुन्हा लिहून काढले. हा सामाजिक प्रक्रियेचाच भाग आहे. त्यांच्या ४२ वर्षाच्या आयुष्यात  त्यांनी अनेक दुःख सोसले, ते आत्मकेंद्री बनले आणि चिंतन करू लागले .त्या काळच्या कर्मठ विचारांचा तुकारामांसह त्यांच्या कुंटुंबियांना सुद्धा  प्रचंड त्रास झाला.

" सत्य असत्याशी  मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥

 या आपल्या विचाराने निरंतर ते कार्यरत राहिले. त्यांनी सत्याची कास कधीच सोडली नाही.संत तुकारामांची गाथा आज ३५० वर्षानंतर ही जगातील कोणत्याही कसोटीवर घासून -तासून बघा ती टिकतेच. आजही जीवनातील कोणत्याही प्रश्नाची उत्तर तुकारामांच्या गाथेत सापडतात.आज आपण कथा ,दंतकथा, चित्रपट, नाटके, कादंबऱ्या यासारख्या साधनातून आपल्या महामानवांच्या चरित्राचे चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण करून त्यालाच सत्य मानतो. त्यामध्येच आपली धन्यता असते. आपण चिकित्सेशिवाय ते स्वीकारणे यामुळे मोठा घोळ होतो. आज तुकाराम महाराजांनी घालून दिलेला आदर्श हा सत्यासाठी आणि संघर्षाचा आहे. तो आपण जपला पाहिजे "आता उरलो फक्त उपकारापुरता" या भावनेने जगणारे संत तुकाराम यांनी जनसेवेचे व्रत घेतले. त्यांनी जनसेवेतच पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाचा पर्याय या जगाला दिला. आंतरिक शुद्धता जपत धर्माचे खरे अधिष्ठान अंतःकरणाच्या शुद्धतेत असते असे सांगणारे,उत्तम व्यवहारातून प्रपंचासाठी धन जोडा म्हणून सांगणारे,भिक्षापात्र झिडकारणारे,सुखात हुरळून न जाता दुःखातही न खचणारे, मावळ्यांसाठी पाईकांचे अभंग रचियेता  असलेले स्वराज्याचे अध्यात्मिक गुरु,भेदाभेद अमंगळ आहे हे सांगणारे,देवाने मला कुणबी केले म्हणून धन्यता माणनारे,कुणालाही कधीही टोचून न बोलणारे ,सम ब्रम्हाची जाणिव करुन देणारे ,सोवळया ओवळ्या पासून निराळे असणारे,सर्व दिशा अन काळ  सदैव शुभच आहेत हे सांगणारे,नेहमी समाजात एकरूप होऊन राहणारे,प्रपंच परमार्थ सोबत करणारे,समाजासोबत तितकीच आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे,शोषण करणाऱ्याचे तोंड फोडा म्हणून सांगणारे,किर्तनाचा विकरा करणाऱ्यावर रोख ठोक बोलणारे,शेती,पर्यावरण,कुंटुंब,जन्म,मृत्यु,बालपण,म्हातारपण,राग,लोभ,मत्सर,चित्त,चिंता,पशू,पक्षी,प्राणी,मन,धन,पाणी,परिस,सोने,माती,कथा,दंतकथा,काळ,नवस,तीर्थ,जप,तप,व्रत,मंत्र,तंत्र,योग,याग,सिद्धी,मोक्ष,इंद्रिय,समाधी,संसार,गुरू ,शिष्य,युद्ध,शस्त्र,शद्ब, अश्या असंख्य विषयावर भाष्य करणारे जगतगुरू संत तुकाराम महाराज आकाशाएवढेच आहेत !


 " अनु रेणू थोडका ।तुका आकाशाएवढा ॥

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

*महाराष्ट्रातील लोकप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे*

 *महाराष्ट्रातील लोकप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे*

      आपल्या महाराष्ट्राच्या मातीला प्रबोधनाची अखंड परंपरा लाभलेली आहे. महात्मा फुले यांच्या रूपाने महाराष्ट्रभरात एक नवक्रांती निर्माण झाली आणि एक विचारशील क्रांती पुरुष म्हणून त्यांचे साहित्य ,विचार व कार्य पुढील काळात  मार्गदर्शक ठरले .1890 मध्ये महात्मा फुले दिवंगत झाले आणि या प्रबोधनकारी चळवळीला शाहू महाराजांच्या रूपाने पुन्हा एकदा एक नवीन नेतृत्व मिळालं. राजकीय स्वातंत्र्या बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे हे जाणून शाहू महाराजांनी बहुजन समाजास ''गती" व "मती " देण्याचे कार्य केले . त्याच काळात शाहू महाराजांच्या सोबत सत्यशोधक चळवळीचे लोकप्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनीही काम केले .

      17 सप्टेबर 1885 ला पनेवल कुलाबा येथे जन्मलेले प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमधील एक निडर ,चिकित्सक ,प्रखर प्रवक्ते,साहित्यिक ,लेखक,इतिहासकार तथा संपादक होते .त्यांनी आपल्या परखड व कठोर भाषेत समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न अत्यतं प्रभावीपणे नुसते  मांडलेच नाही तर प्रत्यक्ष ते सोडविण्यासाठी  निर्णायक भूमीकाही घेतल्या .त्यांनी लिहलेल्या क्रांतीकारी साहीत्यात महात्मा फुले यांचा आदर्श जाणवतो .लोकहीतवादी आगरकरांचीही प्रेरणा दिसते .महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळच म्हणता येईल  त्यांनी  ,कला,साहित्य,नाटक,चित्रपट,वृत्तपत्र,छायाचित्रकार,शिक्षक,टंकलेखक,वक्ते,विचारवंत,इतिहासकार,पटकथा संवादलेखक आदि क्षेत्रामध्ये त्या काळात फार मोठे कार्य केलेले आहे अस कोणते क्षेत्र त्या काळात तरी उरले नव्हते की ज्या मधे प्रबोधनकारांनी काम केले नसेल़.

        त्या काळात बालविवाह, विधवा केशवपन, देवळा मधील पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही, अस्पृश्यता , हुंडाबळी याविरूध्द सदैव जागृत राहत लढा दिला.माझी जीवनगाथा या समग्र आत्मचरित्रपर वाड़मयात या विषयीचे अनेक प्रसंग त्यांनी लिहले आहे .त्यांचे वाड़मय वाचत असताना आपण जी "ठाकरे शैली" म्हणतो  ती खऱ्या अर्थाने जाणवते .जणू काही प्रबोधनकार स्वतः आपल्या समोर बोलत असल्याचा भास हे वाड़मय वाचतांना प्रत्येक वाचकाला नककीच होतो .हिंदू ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणजे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे त्यांच्यामधील तोच बाणा आणि तोच परखडपणा आमच्या पीढीने बाळासाहेबांमधे पाहिला  हे प्रबोधनकारांच्या साहित्यामधीत शैलीवरून कळते . त्यांचे  साहित्य हे महाराष्ट्रातील तळागाळातीत लोकांच्या जीवनशैलीतील एक भागच होता . आपल्या प्रभावशाली इतिहासा बरोबरच त्यांनी सामाजिक समस्याची उकलही आपल्या साहित्यातून करण्याचे अनमोल काम केले .कोदंण्डाचा टणत्कार,दगलबाज शिवाजी,देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे,खरा ब्राम्हण,भिक्षुकशाहीचे बंड,हिंदू धर्माचे दिव्य ,ग्रामण्याचा इतिहास ही त्यांची काही गाजलेली साहित्य होय . माझी जीवनगाथा हे त्यांचे खंडमय आत्मचरित्र होय.याशिवाय  उठ मराठा उठ , श्री गाडगेबाबा, संस्कृतीचा संग्राम, काळाचा काळ, शेतकऱ्यांचे स्वराज्य, कुमारीकांचे शाप, रंगो बापूजी,वत्कृत्वशास्त्र व कला, समर्थ रामदास, पंडिता रमाबाई असे विविध साहित्याची विषय त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून हाताळले आणि त्या काळात महाराष्ट्रामध्ये फार मोठी वैचारिक चळवळ उभी केली. 

          प्रबोधनकार नेहमी म्हणायचे की "मी राजकारणी नसून समाजकारणी आहे. मी पुस्तकी सुधारक नव्हे, सुधारणाग्रणीची  पुस्तके वाचून किंवा व्याख्याने ऐकून माझ्या मनाचा कल हिंदूच्या सुधारणा वादाकडे वळलेला नाही. माझे बालपण व तारुण्य मुळात अशा काळात गेले की त्यावेळी पांढर पेशा समाजात संताप जनक रुढी बोकाळलेल्या होत्या." प्रबोधनकारांनी त्या काळात ओळखले होते की शहरी संस्कृतीत चार दोन लोक शिकून समाजामधे जागृती करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देवू शकतो पण माझ्या तळागाळात अनिष्ठ रूढी परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या माझ्या ग्रामीण भागातील बांधवांचे काय ? शहरी भागापेक्षा त्यांचा टक्काही फार मोठा होता .अभयाने लिहणारे व बोलणारे सत्वशील इतिहास भक्त म्हणून ख्याती असलेले प्रबोधनकार ठाकरे हे यामुळेच लोकप्रबोधनकार ठरतात .  

          माझी जीवनगाथा मधे ते लिहतात "ठाकरे " मूळचे भोर संस्थानातील पाली गावचे.तेथे आजही ठाकरे घराणे असावी , पालकर ठाकरेंशी नावापुरता संबंध आला त्यापुढे नाही ."धोडपकर" असेही त्यांचे जादा आडनाव आहे. पण त्यांचे वडील किंवा ठाकरे बंधू या आडनावाच्या आड वळणाला फारसे कधी गेले नाही नाशिक जिल्ह्यात धोडप नावाचा किल्ला आहे तेथे आमच्यापैकी एक पूर्वज किल्लेदार होते इंग्रजांनी या किल्ल्याला वेढा दिला बरेच दिवस या धोडपकरांनी त्यांना दाद दिली नाही. किल्ल्यावरचा दाना- वैरण संपला आणि त्यांनी दिलेल्या निकरीचा लढयात  ते कामी आले. तेव्हापासून धोडपकर हे आडनाव आमच्या घराण्याला चिकटले. मात्र सगळेच ठाकरे धोडपकर नाहीत.त्यांचे आजोबा भिकोबा धोडपकरांनी हेच आडनाव पुढं आमरण चालविले. ठाण्यावरून त्यांच्या आजोबा यांची बदली पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात झाली. तेथे त्यांनी एक लहान घर बांधले आणि धोडपकरांचे ते "पनवेल कर "बनले. आजोबांनी आमरण जरी धोडपकर आडनाव चालवले तरी त्यांच्या वडिलांनी मात्र शाळेत त्यांचे नाव घालताना " ठाकरे" आडनावाची पुनर्घटना केली आणि ती आजवर चालत आली आहे याच " ठाकरे " नावाची छाप आजही महाराष्ट्रावर दिसते .

        दशावतारी दारिद्रय अनुभवलेल्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळेच वलय दिसते .बावीस वेळा आषाढी -कार्तिकेची वारी करणारे त्यांचे आजोबा प्रचंड स्वाभिमानी ,अभयी,विज्ञाननिष्ठ होते त्यांचे अनेक प्रंसंग जीवनगाथेत आहेत. प्लेगच्या देवीचा प्रसंग प्रत्येक वाचकाने वाचावा असाच आहे.

       प्रबोधनकारांचा या पुढील ज़ीवन प्रसंग अधिकच संघर्षमय आहे .संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करणाऱ्या प्रबोधनकारांवर राजर्षी शाहू महाराजांनी पुत्रवत प्रेम केले .त्याना हे कार्य करत असतांना त्रासही झाला .पुण्यात तर त्यांच्या द्यरासमोर अनेकदा मेलेले गाढवेही टाकली गेली .जीवंतपणी स्वतः प्रेतयात्राही त्यांनी पाहिली पण,घाबरतील ,डगमगतील ते "ठाकरे " कसले!

        

"समाजपरिवर्तनाची ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तीमत्व किती मनस्वी बहुरंगी आणि जिद्दीचे होते याचा प्रत्यय या आठवणीवरून येतो " प्रारंभीच्या काळात दारीद्राचे दशावतार बघावे लागले अनेक आघात सहन करावे लागले ,अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले असे सांगतात 

    कुसुमाग्रजांनी सांगीतलेल एक वाक्य प्रबोधनकारा बाबत मनात नितांत आदर अन उर्जा देणारे वाटते ''आर्थिक विवचंना असतानाही त्यांनी आपली लेखनी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही "

        या भूमीच्या दशेच्या काळात दिशा देण्याचे काम  विचारांशी  प्रामाणिक असलेल्या निर्भिड  लोकप्रबोधनकारांनी केले .प्रत्येक तरूणांनी त्यांचे साहित्य अभ्यासावे  येवढचं त्यांच्या जयंती निमित्ताने.............!


लोकप्रबोधनकारास विनम्र अभिवादन


संजय खांडवे

9011971122

शनिवार, १८ जून, २०२२

विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर

 विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर


नागपूर पासून सुमारे दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे मार्कंण्डेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिराला भेट देण्याची संधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला मिळाली. विदर्भात उन्हाची तीव्रता एवढी की अक्षरशः अंग लाहीलाही करत घामाघूम होत होते. 45 अंश तापमानात चंद्रपूर, गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून जाताना ही तीव्रता अधिकच जाणवते. नागपुर वरून चंद्रपूरचा प्रवास

















भद्रावती मार्गे तीन तासाचा, व पुढे चंद्रपूर  शहरातून बाहेर निघतात घनदाट जंगलाचा भाग लागतो .लोहारा -घंटा चौकी- चिचपल्ली मार्गे एक दीड तासाचा प्रवास करून मूल या गावाला आपण पोहोचतो .या दरम्यान बरेच अंतर घनदाट जंगलातूनच जावे लागते .आमची भ्रमंती संपूर्ण बस किंवा खासगी सार्वजनिक वाहतूकीतून सुरू होती.या अगोदरचे तीन मुककाम आमचे चंद्रपुरात असल्याने आम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होतो . मूल हे तालुक्याचे ठिकाण त्या ठिकाणी आम्हाला तेथील नायब तहसीलदार श्री यश पवार साहेबांची खूप मोठी मदत झाली. ते मूळचे जळगावचे असल्याने अधिकच जवळीक! मुळात या नक्षलग्रस्त जिल्ह्याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आमच्यासोबत लोकमतचे उपसंपादक विवेक चांदुरकर व इतिहासाचे अभ्यासक प्रमोद टाले हे होते. दोघांचाही इतिहास व प्राचीन वास्तू चा गाढा अभ्यास असल्याने हा मार्कण्डेंश्वर  निश्चित पावणारच होता. तहसीलदार साहेबांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला मार्कंडे श्वराकडे चामोर्शी मागे घेऊन निघाले. मूल पासून 30 किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर हे मंदिर आहे. चामोर्शी हा गडचिरोलीतील तालुका या तालुक्यात हे मंदिर येते. चामोर्शी पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु तेथून मार्कंण्डेश्वराच्या मंदिरापर्यंत रस्ता थोडा कच्चा आहे.गावात पोहचताच 'मराठा ' धर्मशाळा दिसते . असे सांगितले जाते की, गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने ही मराठा धर्मशाळा येथे उभी राहिली. राम प्रसाद महाराज जयस्वाल यांनी ती पुढे नेण्याचं काम केलं .थोडेसे समोर गेले की मंदिरांचा समूह दिसतो व समोर असलेले वैगंगेचे विस्तीर्ण पात्र आपल्या नजरेस पडते. दक्षिण वाहिनी वैनगंगा इथे वळसा घालून उत्तरवाहिनी होते. येथील वालुकामय भाग हा जणू समुद्रच भासतो. साधारणपणे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये मोठमोठी शहरे, सांस्कृतिक व धार्मिक केंद्रे ही नदीच्या काठावरच वसलेली आहेत. त्यापैकीच एक मार्कंण्डादेव म्हणजेच मार्कंण्डेश्वराचे मंदिर ,विदर्भाची काशी !

         विदर्भातील मंदिराचा विचार केल्यास जवळपास सर्वच जिल्ह्यात प्राचीन मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे यादवकालीन किंवा त्यापुढील कालखंडातील आहेत. हे मंदिर मात्र यादव काळा पूर्वीचे आहे. साधारणतः दहाव्या किंवा अकराव्या शतकातील हे मंदिर असावे असे अभ्यासकांचे मत आहे.  विदर्भातील यादवकालीन सर्वच मंदिरे ही काळ्या दगडातील आपणास घडविलेली दिसतात, पण महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर याला अपवाद आहे. याची घडण ही लाल पाषाणातील आहे. खजुराहो शिल्प घडणीशी  या मंदिरातील शिल्पाचे साम्य आढळते. नागर शैली मधील ही मंदिरे आहेत खजुराहो मध्ये सुद्धा याच शैलीचे मंदिर आढळतात. म्हणूनच विदर्भाची काशी म्हणून या मंदिराला संबोधले जाते. केवळ ही दुर्गम भागात असल्याने या पवित्र अतिप्राचिन वास्तूकडे पर्यटक जरा कमीच दिसतात. प्राचीन पुराणकथा नुसार मुंडक ऋषिस  शिव कृपेने मार्कंण्डेय यांचा जन्म झाला मार्कंण्डेयास १६ वर्षांचेच आयुष्य लाभले होते, पण शिव कृपेने व भक्तीने ते यमा पासून  मुक्त झाले असे सांगितले जाते. पूर्वी या ठिकाणी तेवीस-चोवीस मंदिरांचा समूह होता. आता पुरातत्व विभागाने या वास्तूस संरक्षित केले असून मंदिराची झालेली पडझड ही शास्त्रीय पद्धतीने जिर्णोध्दारीत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंदिरासह इतर काही मंदिराचे शिखर कोसळलेले आहे. बऱ्याच छोट्या मंदिरांचा केवळ सांगाडाच येथे उभा आहे. शेकडो वर्षापासून ही मंदिरे येथे उभी आहेत. या मधील काळात त्यांनी अनेक राजकीय ,सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. नैसर्गिक संकटाचा ही सामना केलेला आहे. भव्य दिव्य वैनगंगेच्या काठावर असल्याने प्रचंड महापुरे देखील सोसली असतीलच यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झालेली दिसते पण आता या मंदिराचे चांगले काम सुरू आहे.

         नदीच्या बाजूने मंदिरसुहात येण्यास एक द्वार व समोरील बाजूस एक मुख्य प्रवेशद्वार आहे द्वारावर सुंदर दगडी शिळांचे गोपूर निर्मिले आहे. आजही ते मजबूत स्थितीत उभी आहे. द्वाराच्या दगडी चौकटीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही बाजूनी छोटे-छोटे यक्ष या गोपूरास तोलून धरणारे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला संपूर्ण मजबूत तटबंदी असलेल्या या मंदिराच्या तटबंदीवर जाण्यासाठी अर्धवट दगडी जिना आपल्याला दिसतो.पूर्वी या तटबंदीवरून टेहाळणी करता येत असावी.  समोरच शिवलिंग ठेवलेले एक महाकालेश्वराचे छोटे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर देव-देवतांचे शिल्पे आहेत त्याच्याच समोरासमोर वरदविनायकाचे व तेवढेच सुस्थितीत असलेले लहान मंदिर आहे. सुरसुंदरी व गज शार्दुल शिल्पे या मंदिराच्या खालील भागात कोरलेली आहे. पुढच्या भीमाशंकर मंदिराच्या बाहेर डमरुधारी शिवपार्वती व मंदिराची ही शिल्प या मंदिरासमोर आहेत. बाजूलाच अनेक देवदेवतांची सुंदर शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आहेत .चौरंगावर बसलेल्या पार्वतीसह महादेवाचे अत्यंत सुंदर शिल्प हे सांगाडा उभा असलेल्या एका छोट्या मंदीराच्या समूहांमध्ये आपल्याला दिसून येते.

    समोरच आपल्याला मुख्य मंदिराचे दर्शन होते. तीन प्रवेशद्वार असलेले सभामंडपा सह गाभारा अशी रचना आहे. सभागृहाच्या भिंती नव्याने बांधलेल्या दिसतात.गाभार्‍याच्या द्वारावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले आहे. खांबावर साखळीत लटकवलेल्या घंटांचे शिल्प कोरलेले आहे. त्याखाली अत्यंत सुंदर अशी श्री गणेशाची मुर्ती शिल्पे सुद्धा आहेत. गाभार्‍यातही देवांगणा गजशार्दूल ही शिल्पे आहेत .मुख्य खांबावर यक्ष मंदिराचा भार सांभाळतानाच शिल्प आहे .आतील बाजूस सुंदर नक्षीकाम पट्टी आहेत. ब्रम्हा ,विष्णू महादेवाची ही सुंदर शिल्पे या सभामंडपात कोरलेली आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच नदीच्या बाजूला एक नंदीमंडप होता. आता तो तुटलेला असून त्यावरील छत सुद्धा कोसळलेले आहे नंदी साठी नदीच्या बाजूने केलेले भव्य  नंदीमंडप याठिकाणी असावा असे यावरून दिसते. मुख्य मंदिराच्या समोर एक नंदीची रचना होती मुख्य मंदिरा बाहेरील भागात चारही बाजूने कीर्तिमुखे कोरलेली आहेत. त्या किर्तीमुखा च्या खाली सुंदर असे आम्रपालीचे शिल्प एका ठिकाणी आपल्याला दिसते.  मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत सुबक अशी शिल्पे कोरलेली आहेत यामध्ये देवी-देवता, शिव ,भैरव सुरसुंदरी, नृत्य अप्सरा, अजस्त्र व्याल ,त्रिमुख ब्रम्ह ,कालभैरव, जगदंबा ,लक्ष्मी, पार्वती अष्टदिग्पाल, ब्रम्हा सरस्वती ,विष्णू ,पदम निधी ,कार्तिकेय ,नृत्य गणेश ,सूर्य आदींची शिल्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात आजही ती जिवंत असल्याचाच भास आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय नाही. या व्यतिरिक्त मंदिराच्या समूहामध्ये यमधर्म मंदिर, मुर कुंड ऋषी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ध्यान मंदिर, मृत्युंजय मंदिर ,उमा शंकर मंदिर ,दशावतार मंदिर ,गणेश मंदिर, आदिशक्ती महिषासूर्मर्दिनी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर आधी देवदेवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत बहुतेक मंदिरावर आमलक व कळस आजही दिमाखात उद्या असलेले आपल्याला दिसतात मुख्य मंदिर मात्र याला अपवाद आहे मुख्य मंदिराच्या द्वारा समोरच आता भैरवाच्या उभ्या स्थितीतले भव्य दोन शिल्प लावण्यात आलेली आहेत त्यामधील नक्षीकाम हे जिवंत असलेले जाणवते उभ्या भैरवाच्या मुकुटा मधील कीर्तिमुख स्पष्ट दिसतो मुंडन माला धारण केलेल्या या दोन शिल्पांमध्ये कमालीचे साम्य जाणवते ती एकाच शिल्पकाराने घडविली असावे असे वाटते .

     महिषासुर मर्दिनी मंदिराच्या सरळ रांगेत आठ छोट्या मंदिरांचा समूह आहे .यांच्या कळसाची रचना पिरॅमिड स्वरूपाची आहे. यामध्ये या परिसरातील अनेक देव देवतांची शिल्पे  सुरक्षित ठेवलेली दिसतात. काम सुरू असल्याने प्रत्येक शिल्प पाहणे शक्य नव्हते, या शिल्पांमध्ये सुरसुंदरी, देवांगना, मातृका, नृसिंह, वर्धमान ,वराह देवता आदी शिल्पे आहेत बाहेरील काम सुरू असल्यामुळे मंदिराच्या प्रत्येक शिळेला व शिल्पाला नंबर कोडिंग करून योग्य त्या ठिकाणी बसविण्याचे काम सुरू आहे .पडलेल्या अवशेषांमध्ये मंदिरांचे आमलक ,उदयता, विर जा ,जागृता ,गजा कांता शिल्पे अजूनही जिवंत वाटतात मकरीका सिंहाचे म्हणजे व्यालाचे भाग मकरासारखे असलेली सिंह असे सिंह पुढच्या भागात स्थापित केलेले असतात अशी शिल्पे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. शिवलिंग सुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये आहेत वीरगळ असलेले शिल्प सुद्धा येथे आढळते. यापैकीच एक दंतेश्वरी स्तंभ आहे सर्वात वरच्या भागात कीर्तिमुख त्याखाली श्रीकृष्णाचे शिल्प शिल्प एका बाजूस आपल्याला बघावयास मिळतात अनेक मोठमोठ्या दगडी शिळा देखील या ठिकाणी दिसतात.रामायणातील जटायु प्रसंग,राम रावण युद्धाचे सुंदर शिल्पे एका पट्टीत कोरलेले आहेत .गजशार्दूलाचे अनेक शिल्पे आहेत .

      एवढे वैभव शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होते .ज्या काळात राज्यात राजकीय स्थैर्य व आर्थिक सुबद्धत्ता असते त्याच काळात अशी उच्च कोटीची कला असलेली महान कार्य होत असतात. विद्या व कलेचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे ही वास्तू होय .पुराणकाळात एकूण 32 विद्या आणि चौसष्ठ कला सांगितले आहेत याच कलेच्या माध्यमातून हे निर्माण झाले या निर्माण यामागील भाव शोधणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक शिल्प हे आपल्याला एक स्वतंत्र संदेश देते. प्रत्येकाच्या निर्माण यामागे एक भाव एक विचार एक तत्वज्ञान एक संदेश आहे. हे आज आपण शोधून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे. एवढी आशा आपण आपल्या प्राचीन वारसा कडून निश्चितच घेऊया व आपल्या पूर्वजांनी या अशा महान वास्तू निर्माण केल्या त्या केवळ आणि केवळ आपल्याला काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी आहेत .याचा शोध आपण निश्चितच घेतला पाहिजे अन्यथा काळाच्या ओघात या अशाच झिजत राहतील आणि आपण मात्र यापासून वंचित राहू !

आपल्या प्राचीन वारशाला न्याहाळत असताना प्रचंड उन्हातही त्याचा त्रास जाणवला नाही याचं कारण एकच जे बघत होतो ते अलौकिक होते .



➖➖➖➖➖➖➖

संजय खांडवे

बुलढाणा 

9011971122

➖➖➖➖➖

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...