सोमवार, ९ जून, २०२५

महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

 



महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान - जि . अहिल्यादेवी नगर ता. अकोले ,समृद्धी महामार्गाच्या भारवीर पॉईन्ट पासून ४८ कि.मी

➖➖➖➖➖➖➖➖➖

        निऋत्तीने सर्व प्रथम शेतीचा शोध लावला . नवनिर्मिती व सृजनशीलतेचे प्रतीक ही स्त्रीच आहे . माणुस भटक्या अवस्थेत असतांना स्त्रीवरच सर्व जबाबदारी असायची व ती सक्षमपणे पार पाडत असतांना अनेक शोध लागत गेले . निसर्गातील निरिक्षणातून शेती व संगोपणातून वनस्पती औषधी सारखे शोध स्रीनेच लावले . भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

        जगातील अनेक प्राचीन संस्कृतीत नदीला मातेचे रूप मानत पूजन केले जाते. नदिचे स्री रुपातील शिल्पे देखील प्राचीन लेणी मंदिरात दिसून येतात .मातृपरंपरेत जलदेवता , सप्तमातृका म्हणजे साती आसरा , गावाबाहेर , चौरस्त्यावर , नदिकाठी असलेल्या मातृ देवता आदि भूमातांचे पूजन आपल्या कृषी परंपरेत होत आलेले दिसते . माय किंवा आई या नामस्मरणातून सुरक्षितता व जगण्याची प्रेरणा मिळत गेली . सटवाई, इंगलाई , कडजामाई, कमळाजाई, कानुबाई,कृष्णाई, खेडजाई , गडीआई ,चौंडाई, शिवाई ,हरणाई ,  शितलाई , शिरकाई , रेणुकाई, रंभाई, येडाई, मसाई, मुंबादेवी अशी अनेक मातृदैवते मोठ्या भक्ती भावे पूजली जातात . माय धुरपता या ग्रंथात संजीव भागवत यांनी तळेगावची राजमाय( नांदेड ) रामपुरीतील भागामाय(परभणी )शेलगावची यमुनामाय( नांदेड) इरळद - नळरदची देवयमाय ( परभणी ) दैठाण्याची विठामाय( परभणी ) अशी अलीकडच्या काळातील मातृ देवतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या लोकसंस्कृतीचा परंपरेने चालत आलेल्या गाणी यावरून अभ्यासपूर्ण अशी माहीती या ग्रंथातून दिली आहे .

      महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर कळसूबाईचे मंदिर आहे .कळसू नावाच्या मुलीची दंतकथा या शिखराशी जोडली जाते . सर्वांना मदत करणारी दुःख निवारण करणारी आईचे म्हणजेच मातृदैवताचे नाव ह्या सर्वोच्च शिखरास आहे . या ठिकाणी कळसू आईचा तांदळा मंदिरात स्थापित केलेला दिसतो . याची उंची १६४६ मी. आहे महाराष्ट्रात त्या खालोखाल असलेले साल्हेर (१५६७ मी), गळदेव(१५२२ मी), हरिशचंद्रगड तारामती (१४२४मी) ही शिखरे येतात . पुणे ,मुंबई , नाशिक ही महानगरे येथून जवळच आहेत आणि आता समृद्धी महामार्गामुळे कळसूबाई महाभूमिशी कमी वेळात जोडली गेली आहे . साहसी ट्रेक म्हणून नेहमीच पर्यटकांची प्रचंड गर्दी येथे दिसून येते . साधारणतः सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यन्तचा काळ हा ट्रेक साठी अनुकुल मानला जातो . पर्यटक अगदी मध्यरात्री नंतर पर्यटक येथून ट्रेकला सुरवात करून कुठेही दिसणार नाही असा सुर्योदय अनुभवतात . कळसूबाई  सर करण्यासाठी सर्वात सोर्ईस्कर वाट ही बारी गावातून जाते बारी हे गाव भंडारदरा - घोटी महामार्गावर आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनही येथून जवळ आहे. बारी गावात सायं पर्यन्त पोहचले तर गावात मुककामाची सोय होते शिवाय ट्रेक वरील मार्गावर छोट्या हॉटेल असून स्थानिकांचा टेन्ट सह जेवण - चहा-नास्ता मिळतो यातून त्यांना रोजगार मिळतो . भात शेतीतून मार्ग काढत दाट जंगलातून चढाई करत पाऊल वाटेने जावे लागते आम्ही सकाळीच पाच वाजता ट्रेक चालू केल्याने  करवंदींच्या गर्द जाळीतून अंधारात काजव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशाचा आनंद घेत जाता आले . स्थानिकाची मदत घेऊनच अंधारातून बॅटरीच्या मदतीने चालावे कारण जंगलातून अनेक वाटा आहेत व त्या रात्रीच्या अंधारात लवकर लक्षात येत नाही .पायथ्याशी डोंगर उतारावर भात शेती करतात . पायथ्याशी कळसू आईचे छोटे मंदिर आहे . समोर कमान लागते पायऱ्या - पायऱ्याची भात शेती, दाट जांभुळ ,करवंदी , आंबा आदि दाट झाडीतून प्रचंड चढाईचा मार्ग लागतो . लोंखडी सरक्षक कठडे केले असल्याने सुरक्षित पणे चालता येते काही ठिकाणी दगडी पायऱ्या व कोरलेल्या पायऱ्या आहेत . सर्वात अवघड लोखंडी पायरीचा मार्ग लागतो या ठिकाणी काळजी पूर्वक चालावे लागते . येथून निर्सगाचं अप्रतिम सौदर्य न्याहळता येते . कळसूबाईचे मुख्य शिखरही येथून नजरेस पडते . मोठ मोठ्या शिळा मधून प्रवास करत पहिल्या घाट माथ्यावर पोहचतो या ठिकाणी पाण्याची एक विहिर आहे व स्थानिकांची छोटी हॉटेल आहेत . समोरच उंच शिखर दिसते . लोखंडी रिलिंग व मुख्य शिखरावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत येथून लक्ष पूर्वकच चढाई करावी लागते . मग आपण पोहचतो मुख्य शिखरावर येथून समग्र अंशातून  निसर्ग फुललेला दिसतो अगदी विमानात बसल्याचा अनुभव येतो प्रचंड वारा आणि  ढगात गेल्याचा अनुभव मिळतो .शिखराच्या मध्यभागी कळसुबाईचे देऊळ आहे भगवा रंग आणि गोल घुमट असलेलं मंदिर आपलं  लक्ष्य वेधून घेते, मंदिरा शेजारी त्रिशुंलं आणि काही घंटा बांधलेल्या आहेत ..मंदिराच्या आत बसून देवीचं दर्शन घेतलं एका वेळेस दोन जण बसतील एव्हढीच जागा  आहे. या ठिकाणी एक साखरदंड असून तो खाली सोडून पुन्हा वर ओढला की कळूसआई आपली मनोकामना पूर्ण करते अशी भावना आहे .कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड यामध्ये मोठे घनदाट अभयारण्य आहे. येथे बिबट्या, कोल्हे, रानडुक्कर, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू मांजर, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. शिवाय मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरुड, शिंपी, सुगरणी, बगळे, करकोचे, खंड्या, याशिवाय स्थानिक तसेच परदेशी पक्षांचा मुक्त विहार येथे असतो . येथून साणंददरी , अमृतेश्वर मंदिर ,रतनगड,  भंडारदरा धरण , हरिशचंद्रगड, रंधा फॉल ही पर्यटन स्थळे जवळच आहेत .



संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*  ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः । मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापक...