बुधवार, १४ मे, २०२५

दोन हजार वर्षा पूर्वीचा व्यापारी मार्ग - नाणेघाट

 




दोन हजार वर्षा पूर्वीचा व्यापारी मार्ग - नाणेघाट


स्थान : जि . पुणे ता जुन्नर , जुन्नरहून 30  किं .मी .




इतिहास .चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या काळात वापरले जाणारे मार्ग-रस्ते समजून घेणे गरजेचे असते .यामुळे इतिहास समजून घेण्यास अधिक चांगली मदत होते.  आज जसे आपण दळण-वळणाच्या सोईसाठी महामार्ग बघतो अगदी तसेच महामार्ग प्राचीन काळी देखील अस्तित्वात होते . फक्त दळण - वळणाची साधने बदलत गेली .आधुनिक काळात असलेला समृध्दी महामार्ग हा त्याचे अलीकडचे उदाहरण आहे . ज्या -त्या काळातील मार्ग त्यांच्या आर्थिक , राजकिय , सामाजिक, सांस्कृतिक तथा व्यापार विषयक भरभराटीचे संकेत देत असतात . महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्र किनाऱ्या वरील प्राचीन बंदरातून ग्रीक , रोम , इजिप्तशियन आणि इतर युरोपियन व आफ्रीकन राष्ट्राचा  कोकण भागातून देशावर व्यापार चालत असे . अत्यंत प्राचीन व्यापरी मार्गाचे निर्माण सातवाहन काळात केले गेले . हा व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाट आहे .  २२०० वर्षापूर्वीचा देशातून -कोकणात जाण्याचा महामार्ग होता .महाराष्ट्रात सातवाहनाचे अत्यंत प्रभावशाली अशी राजसत्ता होऊन गेली .कला,साहित्य,व्यापार, उदयोग आदि क्षेत्रात या काळात खूप भरभराटी मिळाली होतीं .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सोपरिय,कलियण या सारखे बंदरे विकसित झाली .या बंदरात येणारा माल देशावरच्या प्रमुख शहरात जाण्यासाठी सह्याद्रीच्या महाकाय डोंगर रांगेतून वाट करुन आणने गरजेचे असल्याने नाणेघाट मधे डोंगर कोरुन हा मार्ग काढण्यात आला .या वाटेने वर आल्यावर त्या काळात व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले शहर जुन्नर लागते .नाणेघाट -जुन्नर -पैठण - तेर हा त्याकाळचा व्यापारी मार्ग  होता .पैठण तर सातवाहनांची राजधानीच ! त्याच भागात प्राचीन व्यापारी पेठ असलेले , नेवासा, भोकरदनही येते . अश्या प्रकारचा हा घाट मार्ग होता . आता आधुनिक काळा पर्यन्त  अनेक घाट निर्माण झाले . पनवेल खोपोली वरून लोणावळा येणारा खंडाळा घाट , माळशेज घाट , ताम्हणी घाट , भोर घाट अशी अनेक घाट आत्ताच्या काळात तंत्रतानाचा उपयोग करुन आधुनिक दळण-वळण करू लागली . आजही लोणावळ्यातून कुरवंडे गावातून नागफणी टेकडी जवळून उंबरखिंडीत उतरणारा कुरवंडे घाट असो की, धोंडसे, ठाणाळे लेणी जवळून सुधागड- तैला बैला जवळून जाणारा वाघजई घाट हे प्राचीन काळा पासून देशावर येण्यासाठी वापरात होते. नाणे घाट हा असा घाट होता की हजारो वर्षा पूर्वी काळा दगड खोदून तयार केला गेला . आज खाली असलेला दगड वापरातून अगदी गुळगुळीत झाला आहे .

     नाणेघाटा बाबत जुन्नर परीसरात एक दंतकथा संगितली जाते की नाना व गुणा या दोन भावांनी ही वाट डोंगर फोडून तयार केली . नाना- गुणा हे त्या काळातील मोठे व्यापारी होते . त्यासाठी दोन भावांनी स्वतंत्र ठिकाणी खोदकाम सुरु केले यात नानाने दक्षिणबाजूकडून व गुणाने उत्तर बाजूकडून काम सुरू केले .नानाने काम पूर्ण केले जो मार्ग आज दिसतो पण गुणा मात्र अपयशी ठरला त्याची वाट अपूर्ण राहिली .अपूर्ण वाट जीवधन किल्याच्या बाजूस दिसते .नानाची वाट पूर्ण झाली म्हणून त्याला नाणेघाट म्हणतात पण ही दंतकथा आहे याला ऐतिहासिक आधार नाही .ही दंतकथा मात्र प्राचीन काळापासून प्रचलीत आहे .

     गुणा व नाना या दोघांच्या मधे प्रचंड उंच कडा आहे त्या कड्याला नानाचा अंगठा म्हणतात .हजारो फुट खोल दरी आहे त्या कडयावरून खूप मोठा परीसर पाहता येतो पण पर्यटकांनी या ठीकाणी अत्यंत सावधनतेने वागावे अशी ही जागा आहे .

   डॉ शोभना गोखले यांच्या मते  'नना'ही कुषाणाच्या नाण्यावरील देवता होती .ही नाणी भारतात खूप प्रसिद्ध होती .पुढे या देवतेचा नना वरून नाणे असा अपभ्रंश झाला त्यावरून नाणे हा शब्द तयार झाला व ढोबळमानाने असे म्हणतायेईल की नाणे घाट ही एक पैसे देवाण घेवाणीची जागा असल्याने त्याला नाणेघाट असे नाव पडले .या घाटात उतरतांना सुरूवातीलाच एक दगडी रांजणं आहे सातवाहन काळात या वाटेने जाणाऱ्यास व व्यापाऱ्यास या राजणात कर ,जकात रुपाने नाणे टाकावे लागत असे .असे सांगतात दिवसातून दोन वेळेस हा रांजंणं चांदीच्या नाण्यानी भरून जायचा . ( असाच दगडी रांजण बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा नंदई या गावाच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात आहे .) सातकर्णी राजा व नाणेघाट मधील व्यापारासंमधी माहीती इतिहासात आढळते.ही वाट म्हणजे महाराष्ट्र व पाश्चात्य देश यांचा संबंध जोडणारी होती त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची बरीच  ओळख झाली .

     नाणे घाटाच्या वाटेने उतरतांना डाव्या बाजूच्या अंगठ्याच्या काताळात काही पाण्याची टाकी आहे व छोट्या गुफा देखील कोरलेल्या आहे . खाली उतरत गेल्यावर दोन्ही बाजूने काही लेण्या दिसतात .याला वर्षावास असे म्हणता येईल .लयनम् असे संस्कृत मध्ये ,प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणे म्हटल्या जाते .प्रवासात  व्यापारी वर्गास मुककाम  यासाठी ही बनविली गेली असावी यात शंका नाही .पाण्याच्या व्यवस्थेसाठी काही हौद देखील या ठीकाणी आहेत .डाव्या बाजूस  दोन महत्वपूर्ण लेण्या आहेत यामधे नयनिका हीचा ब्राम्ही लिपी मधील माहीतीपूर्ण शिलालेख भिंतीवर कोरण्यात आला आहे.सातवाहन राजवंशीय हा भारतीय इतिहासातील पहिल्या ज्ञात राजवंशीया पैकी एक आहे . यांचे नागवंशीयांशी संबंध प्रस्तापीत झालेले होते . ब्राम्ही लिपि ही भारतात वाचता आलेली सर्वात प्राचीन लिपि आहे व हा दक्षिण भारतातील लेणी मधील डाव्या व उजव्या भिंती वरील हा सर्वात मोठा शिलालेख आहे .या शिलालेखात यज्ञ व दान दिलेल्या मौल्यवान देणग्यांचे सविस्तर वर्णन आलेले आहे. अंकांचा वापर झालेला हा लेख आहे. सातवाहनांनी बौध्द धर्मास आश्रय देऊन परिसरातील बौद्ध लेणी खोदण्यास उदारपणे मदत केलेली दिसते.या शिलालेखावरून नयनिका /नागनिका ही सातवाहनाचा मूळ पुरूष सिमूर /सिमूक /श्रीमुख याची सून आहे,सार्वभौम सम्राट सातकर्णीची पत्नी,महारठी त्रणकथिर यांची कन्या आणि भायल ,वेदश्री व शक्तीश्री या सातवाहन पुत्राची माता होती .नागनिकेचे वर्णन करतांना प्राचीन काळातील स्त्रीयांच्या आदर्श प्रतिमेंचे चित्र उभे केले आहे.नागनिका या नावातच नाग स्त्री ही माहीती मिळते , नागकुलउत्पन्न श्रेष्ठ स्त्री ,ती महारथी त्रणकथिर नावाच्या महारठीची कन्या होतीं .नाग ही एक जमात होतीं .सातवहन काळात महाराठी ,महाजन ही पदे होतीं. त्या काळात पराक्रमी सरदारांच्या मुलीशी विवाह केली जात असत. नागनिकाचा एक वेगळा प्रभाव त्या काळात होता .तिच्या लेखावरून व शिल्पावरून हे लक्षात येते.नागनिकाशी संमधीत अनेक नाणी या परीसरात सापडली आहे .या ठिकाणच्या लेण्यात सातवाहन राजवंशांच्या मूर्ति व त्यांची नावे कोरली आहे मात्र काळानुसार आता केवळ पाय शिल्लक दिसतात .यामधे सिमूक,नागनिका,श्रीसातकर्नी,कुमार भायल,महारठी,त्रणकथिर,कुमार हुकश्री,कुमार सातवाहन यांचे अवशेष दिसतात .

      कोकणातून देशांवर येणारा हा मुख्य रस्ता म्हणजे नाणेघाट याच्या रक्षणार्थ बाजूलाच जीवधन किल्ला बांधलेला आहे .पुढे याच मार्गाच्या रक्षणार्थ हडसर ,चावंड,शिवनेरी या किल्याची निर्मिती याच काळात झाली .या मार्गाने सातवाहन राजधानी पैठण पर्यन्त व्यापारी राबता चाललेला दिसतो . हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अतिक्षय मनमोहक आहे . जुन्नर परिसरातीत गड किल्ले व असंख्य लेणी समूह त्याच बरोबर ढगांना चिरणारे उंच - उंच शिखरे निर्सगाच्या अप्रतिम सौदर्यची उधळण करतांना दिसतात . त्यातच स्थानिकांचे पर्यटकांना असलेले सहकार्य व त्यांनी केलेल्या घरघुती अप्रतिम मेजवाणीची आठवण तर सालोसाल विसरत नाही आणि पुन्हा - पुन्हा आपली पाऊले सह्याद्रीच्या दिशेने ओढत राहतात .



संदर्भ

नाणेघाट -श्री लहु गायकवाड

लेणी महाराष्ट्राची -डॉ दाऊत दळवी



संजय खांडवे

बुलढाणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...