बुधवार, २३ एप्रिल, २०२५

करवंड गुणवंताबाई राणीसाहेबांच्या स्मारकाच्या प्रतिक्षेत.....

 



करवंड गुणवंताबाई राणीसाहेबांच्या स्मारकाच्या प्रतिक्षेत.....


स्वराज्यजननि राजमाता राष्ट्रमाता जिजाबाईसाहेबांचे माहेर सिंदखेडराजा हे विदर्भातील बुलढाणा जिल्हयात येते . मातृतिर्थ जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्हयास ही ओळख आपल्या समृद्ध व गौरवशाली इतिहासामुळे प्राप्त झाली आहे . देवगिरीच्या यादवांचे वंशज राजे लखुजीराव जाधव यांनी आपल्या रयतवत्सल कार्य कर्तुत्वाने स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्याचे काम सुरू केले होते. जिजामातेच्या जन्म प्रसंगी याच विदर्भभूमीत हत्तीवरुन साखर वाटली गेली होती . पुढे जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. शेकडो वर्षाची गुलामगिरी या शिवतेजाने मोडीत काढत रयतेमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान जागृत करणारे स्वराज्य उभारले .

           स्वराज्याचं विदर्भाशी नातं फार जुनं आहे . आज भारतभरातून मातृतिर्थ सिंदखेडराजास १२ जानेवारीस लाखो स्वराज्य प्रेमी राजमाता जिजाऊ जन्मस्थळावर व जिजाऊ सृष्टीवर नतमस्तक होण्यासाठी येतात .बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे गाव देखील जाधव - भोसले वंशीयांच्या नाते संमधातील महत्वाचे आहे . आज हे आपण एक गाव म्हणून बघतो पण कधी काळी५२ बुरुजी करवंड म्हणून ओळख असलेले आता केवळ अवशेष घेऊन शेवटच्या घटका मोजत आहे . छत्रपती शिवरायांना एकूण आठ पत्नी होत्या . जिजाऊआई साहेबांनी महाराजांचे आठ विवाह घडवून आणले . आईसाहेबांची पूर्वानुमान या मागे  होते . फलटणच्या  निंबाळकर घराण्यातील सईबाईसाहेब (१६४०) ह्या पहिल्या पत्नी होय . त्यानंतर शिर्के घराण्यातील सगुणाबाईसाहेब (१६४१),मोहिते घराण्यातीत सोयराबाईसाहेब(१६५० ), मोहिते घराण्यातीत पुतळाबाईसाहेब(१६५३ ), विचारे घराण्यातील लक्ष्मीबाईसाहेब (१६५६ ),गायकवाड घराण्यातील सकवारबाईसाहेब (१६५७ ), जाधव घराण्यातील काशीबाईसाहेब(१६५७), इंगळे घराण्यातीत गुणवंताबाईसाहेब (१६५७) असे विवाह महाराजांचे झाले . या मध्ये महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार घराण्याशी भोसलेवंशीयांचे नातेसंमध निर्माण झाले होते व स्वराज्य कार्यास त्याचा हातभारही लागत होता . करवंड येथील इंगळे घराण्या मधीत गुणवंताबाई राणीसाहेबांशी महाराजांचा विवाहामुळे करवंड ही छत्रपती शिवरायांची सासुरवाडी ठरते .इतिहासाची अशी सोनेरी किनार ती पण छत्रपती शिवरायांशी निगडीत असल्याने  फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे .येवढेच नाही तर महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांच्या राणीसाहेब दिपाबाईसाहेब ह्या देखील करवंडच्या इंगळे घराण्यांच्याच आहे म्हणजेच राजमाता जिजाउंच्या दोन सूना ह्या आपल्या विदर्भातील करवंड या गावच्याच आहेत .शिवरायांच्या राज्यभिषेका प्रसंगी रायगडावर दिड महिना अगोदर पासून व्यंकोजी राजे सोबत दिपाराजे यांचे वास्तव्य होते .

              समकालिन शिवभारतात परमानंदाने वर्णिलेली स्वराज्यातील पहिली मोठी  लढाई शिरवळ ठाणे , सुभान मंगल किल्ला व बेलसर छावणी परिसरातील  लढाई फतेहखाना सोबत झाली होती.बाजी पासलकरांच्या नेतृवात  मोठा विजय प्राप्त झाला होता . स्वराज्यनिष्ठेसाठी बाजी पासलकरांचे पहिले मोठे बलिदान या लढाईत झाले . या वेळी शिवरायांचे वय केवळ १८ वर्षाचे होते या लढाईचे परमानंद शिव भारतात वर्णन करतांना "शृंगारस्यगरांगानामिंगालकुलसंभव " यमाप्रमाणे भयंकर युद्धांगाचा शृंगार ज्याचे भाल्याचे टोक असे शिवाजी इंगळे असा उल्लेख करतो . या पराक्रमी सरदाराचा उल्लेख करतांना त्यांचा अतुलनिय पराक्रम  दिसून येतो .  दुसऱ्या एका श्लोकात  इंगळे यांनी २५ , पोळांनी  १२, चोरांनी १४ , घाटग्यांनी २३, वाघाने १६ असे वीर एका क्षणात ठार मारिले असे वर्णन करतो .या लढाईत गोदाजी जगताप , भिमाजी वाघ , संभाजी काटे , भिकाजी चोर , वीर कावजी या शूर वीरांनी आपले शौर्य दाखविले . आदिलशाहिला वचक बसविणाऱ्या या लढाईत शिवाजी इंगळे या सरदाराची भूमिका महत्वाची होती .या शिवाय अफजलखान प्रसंगा वेळी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांच्या स्थानी अभिमानी काताजी इंगळे हे देखील नाव येते .परमानंद     "कावुकियेनकंकाभ्यामिंगालेनाभिमानिना" या शद्बात वर्णन करतो .संभाजी कावजी , येसाजी कंक , कोंडाजी कंक , जीवा महाला, विसाजी मुरंबक , संभाजी करवर , सुरजी काटे, कृष्णाजी गायकवाड व इब्राहिम सिंद्धी यांच्या सोबत त्यांनी शिवरायांचे अंगरक्षक म्हणून रक्षण केले या वीरा पैकी जीवा महाला यांच्या सतर्कतेने  महारांजांचे पुढील २१ वर्ष स्वराज्यास मिळाले . अजून असे अनेक संदर्भ इतिहासात मिळू शकतात .निश्चीतच स्वराज्याप्रति स्वामिनिष्ठ असलेल्या या इंगळे घराण्याचा इतिहास उलगडणे अधिक महत्वाचे वाटते .तीनशे वर्षापूर्वी हे इंगळे राजवंशीय तंजावर स्थलांतरीत झाल्यामुळे येथील वतन हे दुर्लक्षित राहीले .५२ बुरुजी या करवंड वतनातील परीसरात अनेक संदर्भ सापडू शकतांत . या परिसरात अशी कागदपत्रे वा अन्य भौतिक संदर्भ साहित्य असल्यास स्वतःहून समोर येणे गरजेचे आहे . यातून  स्वराज्याच्या एका मोठ्या निष्ठावान घराण्याचा इतिहास विदर्भातून समोर येऊ शकतो . जिजाऊ मातेच्या या दोन कर्तुत्ववान सूनांचे माहेर आजही उपेक्षितच आहे . या दोनही राणी साहेबांचे  स्मारक या ठिकाणी उभे राहिले पाहिजे त्याच बरोबर आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या गढी, बुरुज व तेथील समकालिन अवशेष संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहेत . या कार्यासाठी बुलढाणा येथे सुनिल जंजाळ यांनी बावन्न बुरजी करंवंड बचाव समितीच्या माध्यमातून इतिहासप्रेमी संघटन उभे केले आहे . हरिरुद्र राजे इंगळे आता तंजावरहून मूळ वतनी येऊन या मोहीमेत काम करत आहे .गणेश निकम, संजीवनी शेळके , अरविंद बापू  हे स्थानिकांच्या मदतीने जनजागृती करत आहे . प्रा जगदेवराव बाहेकर ,जयश्रीताई शेळके पाठपुरावा घेतांना दिसतात . नुकतेच प्रा . जगदेवराव बाहेकर यांनी मा . जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री यांना सविस्तर पत्रव्यवहार देखील केला आहे .कर्तुत्ववान व महापराक्रमी व छत्रपती भोसले वंशीयांचे ऋणानुंबंध या मातीशी असल्याने या भूमीचा आम्हास सार्थ अभिमान आहे आणि वाटत राहील .













संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड* (भाग - २ )

 


शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*




(भाग - २ )




स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग


विजापूरकरांच्या तोफा ह्या पन्हाळ्यावर सरळ मारा करण्यास अक्षम ठरत होत्या तेव्हा इंग्रज हेन्री रिव्हिग्टनने दारु गोळा पुरविला फिलिफ गिफाड हा इंग्रज अधिकारी त्यांच्यासोबत होतां. या तोफांनी गडाचे मोठे नुकसान केले म्हणजे लढाई केवळ विजापूरकरांच्या विरोधात नव्हती तर इंग्रजही त्यांच्यासोबत होते एकाच वेळी दोन शत्रूशी महाराजांना लढावं लागत होतं. पुढे इंग्रजांचा हिशोबही महाराजांनी बाकी ठेवलेला दिसत नाही १६६१ मध्ये  इग्रजांच्या राजापूरच्या वखारीला वर हल्ला करून सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करुन त्यांना रायगडावर आणले होते .

पावसाने आपले रौद्र रूप धारण केले . गडावरून पाण्याचे लोट वाहू लागले नदी नाले तुडूंब झाली पण वेढा अजून मजबूत झाला. महाराजांनी विचार केला की शत्रूवर सरळ हल्ला करून काहीच साध्य होणार नाही उलट यात आपली माणसे कामी येतील. या वेढयातून निसटायचंच हा बेत महाराजांनी पक्का केला.१२ जुलै १६६०च्या सकाळी गडाच्या पूर्वेकडील दरवाजा पहिल्यांदा उघडला गेला या दरवाज्यातून चार माणसे बाहेर आली ती म्हणजे गंगाधर पंत, त्र्यंबकपंत व त्यात सैनिकाच्या वेषात दोन गुप्तहेर . पांढरं निशाण घेऊन ती खाली येत होती ते पाहून सिद्धीला आनंद झाला शिवाजी राजे शरण येत आहेत हा या पांढऱ्या निशाणाचा याचा अर्थ होता." आम्ही किल्ला स्वाधीन करून देण्यास राजी आहोत आमच्या जीवास काहीएक धोका नाही असे अभय दिल्यास आम्ही स्वतः किल्ल्याच्या खालच्या माचीवर तहाचे बोलणे करण्याकरिता येतो".

असा निरोप पंताच्या हस्ते पाठविला तेवढ्याच वेळात सोबत आलेल्या दोन गुप्तहेर सिद्दीच्या सैन्यात मिसळून त्यांनी अशी अफवा पसरवली की शिवाजी राजे व सिद्दी जोहर यांच्यात आदिलशहा विरुद्ध संगनमत झाले आहे. सिद्धी स्वामिनिष्ठ नव्हता हे त्याच्या सैन्याला चांगलेच माहित होते या कारणाने का होईना सतत चार महिने बायको पोरांपासून दूर असलेले ते सैनिक आता लवकरच घरी जायला मिळणार या कल्पनेने गाफिल झाले.

     १२ जुलै १६६० हा दिवस गडावर खूप महत्त्वाचा होता आता वेढ्यातून कसे बाहेर पडायचे याची खलबतं सुरू झाली. छत्रपतींचं एक तत्व व होतं की ते कोणतीही मोहीम आखतांना आपल्या विश्वासू लोकांना सोबत घेऊन चर्चा करत , त्यांची मतं जाणून घेत यात ।लहान-मोठा असा भेद कदापिही नसे. त्याच दिवशी सायंकाळी गडावरील तीन मजली इमारत म्हणजे सज्जा कुटी या ठिकाणी मसलते सुरू झाली यात खुद्द छत्रपती समवेत नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभू सिंह जाधव रायाजी बांदल, विठोजी काटे, शिवाजी काशीद व बांदल सरदार उपस्थित होती. कुणी सांगितलं महाराजांनी पुसाटी  बुरुजाकडून जावे. कुणी म्हणत होतं दुतोंडी बुरुजाकड्रून जावे. मग एक सूर समोर आला की महाराजांनी पालखीत बसून बाहेर पडावं व या दोन पालख्या असाव्यात एका पालखीत खरे शिवाजी व दुसऱ्या पालखीत सोंगातले शिवाजी! सोंगातले शिवाजी म्हटल्याबरोबर सर्वांच्या नजरा वळाल्या त्या शिवाजी काशीदांकडे! अगदी हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे शिवाजी काशिद या बैठकीस उपस्थित होते. महाराजांची आणि त्यांची ओळख अवघ्या दोन चार महिन्यापूर्वीची ! पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या  नेबापुर गावातील सामान्य न्हावी कुटुंबातील हे शिवाजी काशीद . शिवरायांच्या स्वराज्याचं वेड लागलेले शरीरयष्टीने अगदी महाराजांसारखे केशभूषा ही अगदी तशीच ! हा वीर लाखाच्या पोशिंदयासाठी एका क्षणात सर्वस्व ओवाळायला तयार झाला आपले काय होणार याची स्पष्ट जाणीव शिवाजी काशीद यांना होती शिवरायांनी प्रजे मध्ये निर्माण केलेला विश्वास एक- एक नरवीर जन्माला घालत होता त्यापैकीच एक शिवाजी काशीद. मग ठरले दोन पालख्या सजल्या व राजदिंडी मार्गे गडा बाहेर पडण्याचे ठरले. महाराजांचा अंगरखा, शेला, शिरस्त्राण व रत्नजडित तलवार सर्वात महत्त्वाचं महाराजांची आई भवानीचा प्रसाद असलेली कवड्याची माळ घालून शिंवाजी काशिद अगदी आरश्यात प्रतिबिब दिसावे असे एकमेंकांना भासू लागले .रात्री दहाच्या सुमारास पालख्या निघाल्या . वाहून नेणाऱ्या भोयांनाही माहीत नव्हत की खरे शिवाजी कोणत्या पालखीत बसलेत ! आषाढ शुद्ध पौर्णिमा, काळेकुट्ट ढग दाटून आलेले धो -धो कोसळणारा पाऊस या अंधारातून मार्ग काढत जायचे होते गुप्तहेर व वाटाडयांनी समोर अगोदर मार्ग शोधून ठेवले होते या किर्र अंधारात शत्रूला भनक न लागता निघायचे होते. वीज चमकल्यावर आपण दिसतो की काय या विचारांने त्यांच्या मनात धडकी भरायची.

      आज ज्या ठिकाणी तुरुकवाडी गाव आहे त्या गावाच्या सुमारास या दोन्ही पालखी आल्या.किर्र अंधारात झुडूपात हालचाल झाली ,शत्रूच्या हेराना सुगावा लागल्याची खात्री झाली .ती वेळ मार्गस्थ होण्याची होती पाठलाग करण्याची नव्हती.  या ठिकाणाहून पुढे मलकापूर मार्गे विशालगडावर जाणारा राजमार्ग होता.  शिवाजीराजेंनी शिवाजी काशिदांची गळाभेट घेतली व ३०० मावळे सोबत देऊन शिवाजी काशिदांची पालखी मलकापूर या नेहमीच्या सोप्या मार्गे पाठविली.त्याच ठिकाणाहून माळुंगे मार्गे मसाई पठारावरून अवघड वाटेने महाराजांची पालखी निघाली .जंगलातून जाणारा तो मार्ग होता .

   सिद्दीच्या छावणीत खबर पोहोचली शिवाजी राजे वेढ्यातून सुटले सिद्धी चौताळला त्याने आपला जावई सिद्धी मसूद याला पालखीच्या रोखाने पाठवले महाराज विशालगडावर जातील या हेतूने त्याने मलकापूर मार्गे पाठलाग सुरू केला. महाराजांचे युद्धनीती तील कौशल्य या ठिकाणी दिसून येते. नव्या दमाने तीन हजाराचा घोडदळासह ताफा घेऊन मसूद घोड्यावर निघाला त्याने शिवाजी काशिदांच्या पायी जाणाऱ्या पालखीला गाठले. हात घाईची लढाई झाली पण लढाईत स्वारस्य नव्हते, त्याला शिवाजी हवे होते. शिवाजी हाती आले म्हणून मसूद जाम खुश झाला व ही पालखी घेऊन तो छावणीत आला. आल्याबरोबर जोहरने शिवाजीराजास पहिले त्याने जसे ऐकले होते तसेच अगदी तसेच शिवाजी राजे त्याच्यासमोर होते तोच रुबाब ,तोच बाणेदारपणा, तोच थाट, मृत्यूचे यत्किंचित सुद्धा भय चेहऱ्यावर नव्हते. शिवरायांची शिनात्ख करेल अशी एकच व्यक्ती त्या ठिकाणी होती ती म्हणजे फाजल खान . आपल्या बापाच्या वधाच्या वेळी प्रत्यक्ष त्याने राजेंना बघितले होते . ओळख परेड सुरू झाली . महाराजांना तो न्याहळून बघू लागला. काय त्याच्या मनात शंका आली आणि त्याने महाराजांचे शिरस्त्राण एका हाताने सरकवले आणि जोरात ओरडला धोका हुआ ! ये शिवाजी नही है ! कारण त्याला माहीत होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत लढतांना महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती हे त्याच्या  पक्क लक्षात होतं. मग शिवाजी काशीदांना विचारणा सुरू झाली पण मृत्यूचं भय थोडादेखील त्यांच्या चेहर्‍यावर नव्हतं खात्री तर तेव्हाच पटली होती की जेव्हा शिवाजी काशीद पालखीत बसले होते पण लाखाचा पोशिंदा साठी लाखांचे बलिदान झाले तरी चालेल ही भावना त्या नरवीरांच्या मनात होती. सिद्धी चवताळला "बोल कोण आहेस तू ?'' पुन्हा तेच उत्तर आले "शिवाजी!'' जेव्हा लक्षात आले ती सत्य आता बाहेर आलाच आहे तेव्हा बाणेदारपणे म्हणाले" मी ऽ ऽमी शिवाजी काशीद !" ( क्रमशः )


संजय खांडवे

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*

 शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*


(भाग -१ )


स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग




१० नोव्हेबर १६५९ , शिवप्रताप  भूमीमध्ये अफजली  संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की, आमची माती व माणसे याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो. स्वराज्यातील स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या  संघर्षाला या प्रसंगाने अधिक बळकटी मिळाली होती. विजापूरची आदिलशाही या घटनेने धास्तावली होती. आता शिवाजीराजांना शह कोण देणार ? या चिंतेने शोधाशोध सुरू झाली होती अफजलखानाचा पुत्र फाजल खान हा बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चवताळला होता अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याची विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अफजलखानाचा बंदोबस्त केल्याबरोबर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११नोव्हेंबर १६५९ ला सातारा मार्गे कोल्हापूर परिसर पादाक्रांत करण्यासाठी शिवराय निघाले.महाराजांना १८३०६ दिवसाचे आयुष्य लाभले या  दिवसात महाराजांनी विजयाचा आनंदोत्सव किंवा विश्राम या गोष्टीला रयतेच्या कल्याणाचा पुढे  कधीच स्थान दिलेली दिसतच नाही. हे शिवचरित्रातील एक महत्वाचे वैशिष्ट्य होय.१८ किल्ले अवघ्या २० दिवसात घेतले .१ डीसेंबर १६५९ ला पन्हाळ्यावर भगवा फडकला महाराजांना बहुतेक किल्ले बिनाहरकत मिळाले पण रांगणा खेळणा हे किल्ले छापे मारून घ्यावे लागले याच खेळणा किल्ल्याला विशेष प्रयत्न करावे लागले म्हणून महाराजांनी विशाल गड असे नाव दिले. विजापूरकरांच्या अंमलात असलेल्या भागात शिवाजी राजे यांची वेगळीच धाक व दरारा निर्माण झाला. अनेक सरदार नुसते नाव ऐकून घाबरू लागले विजापुरी दरबार शिवाजी महाराजांचे बंड कसे मोडावे या फिकरीत पडलेला होता. कोणताही मातब्बर विजापुरी सरदार समोर येत नव्हता कित्येकांचे मत होते की आदिलशहाने स्वतः मोहिमेवर जावे त्यांच्या पदरच्या कोणत्याही सरदारावर भरवसा ठेवणे बरोबर नाही. बरेच सरदारांचे मत आदिलशहाने जाऊ नये असे होते कारण शिवाजी महाराजांनी आपल्या धाडस, बुद्धिमत्ता व पराक्रमाने जरबच तशी बसवली होती.


या परिस्थितीत सिद्दी जोहर हा तेलंगणा मधील कर्नूल प्रांतातील सरदार समोर आला.  हा हबशी असून पराक्रमी होता त्याचा बादशदहा सोबत पूर्वी बेबनाव होता पण पुन्हा माफी मागून तो बादशहाच्या  सेवेत होता. मागील घटना वरून त्याची स्वामीनिष्ठता ही संशय घेणारी होती .त्याच्यासोबत फाजल खानही आपल्या बापाचे उसने घेण्याकरता तयारच होता. अफजलखानाच्या दुप्पट एवढे सैन्य घेऊन मोठ्या लव्या जमाने तो स्वराज्यावर चालून आला .याच वेळी जंजिऱ्याच्या सिद्धीने कोकण भागात स्वारी करावी असे बादशहाने सांगितले . सिद्धी जोहर, फाजल खान, सिद्दी मसूद व अनेक सरदारासह ते स्वराज्याच्या दिशेने निघाले. ज्यावेळेस सिद्धी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी महाराज हे मिरजेचे वेढयात होते मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला महाराज वेढा देऊन होते त्यांनी संपूर्ण आयुष्यात दोन वेळा वेढे दिले पहिला वेढा हा मिरजेचा दुसरा तंजावर, वेल्लोर या तामिळनाडू प्रांतातील आहे. सिद्धी चाल करून येत आहे हे पाहून महाराज स्वराज्यातील दक्षिण भागातीत त्या वेळचे  सर्वात शेवटचे टोक आणि नुकताच घेतला पन्हाळा या कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावर येऊन थांबले. बऱ्याच वेळी सांगितले जाते की महाराज वेढयात अडकले होते पण महाराजांनी प्रत्यक्षात स्वतःला अडकवून घेतले होते असेच म्हणावे लागेल. दहा महिन्यापूर्वीच अफजल खाना सारखा बलाढ्य सरदार स्वराज्यात घुसून, नासधूस करत रयतेला त्रास देत स्वराज्याची मोठी हानी करणारा ठरला होता.तसे पुन्हा व्हायला नको हयाची काळजी महाराज घेत होते .कारण सिध्दीचे सैन्यबळ आता त्यावेळच्या अफजलखानाच्या सैन्या पेक्षा दुप्पट होते . मिरजेतून महाराज सुरक्षितपणे रायगड ,राजगड किंवा प्रतापगड या ठिकाणी जाऊ शकत होते पण महाराजांनी तसं केलं नाही याचं कारण असे की महाराज आज या ठिकाणी गेले असते तर सिद्दीने आपला मोर्चा तिकडे वळविला असता या ठिकाणावर पोहचण्यासाठी तो स्वराज्यातून गेला असता व यामुळे सामान्य रयतेची पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले असते म्हणून केवळ आपल्या रयतेसाठी शिवरायांनी स्वतःला या वेढ्यात अडकून घेतलं असंच म्हणावे लागेल.यामुळे सिध्दी हा पन्हाळा परिसरातच थबकला .


२ मार्च १६६० सिद्दीने पन्हाळा या रांगड्या किल्ल्यास चारी बाजू कडक वेढा दिला एक मुंगी सुद्धा आत बाहेर जाणार नाही असा तो  वेढा होता याच वेळी स्वराज्यात कल्याण भागात आबाजी सोनदेव, वाडीच्या सावंतासाठी बाजी पासलकर व घाटावर मोरोपंतास आसपासच्या मुलखावर कडेकोट बंदोबस्तास सांगितले. नेताजी पालकरांना बाहेरून जोहरच्या सैन्यावर छापे घालून हैरान करावयास सांगितले भर उन्हाळ्यात हा वेढा सिद्दीने अधिक मजबूत केला महाराजांचा अंदाज होता सिद्धी किती दिवस वेढा ठेवेल ? पन्हाळ्याच्या धो- धो पावसात हा वेढा एक दिवस ढिला पडेल. पण सिद्धी चा अंदाज त्याहीपेक्षा वेगळा होता, राजे किती दिवस गडावर राहतील एक दिवस दाना -पाणी संपलं कि आपोआप शरण येतील दोघांच्याही अंदाजाप्रमाणे चार महिने हा वेढा कायम होता . सिद्धी तसूभरही हल्ला नाही त्याला  वाटू लागले की शिवाजी राजे आपल्याला हळू हळू शरण येतील जे कुणालाही जमलं नाही हे यश मला मिळेल व आपल्याला विजापूर दरबारात मोठी बढती मिळेल.अखंड सावधानता जोपासणारे शिवराय त्यांनी गडावर दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा दारुगोळा भरून ठेवला होता सिद्धी ने कितीही गराडा घातला तरी काही होणार नव्हते पण प्रश्न होता स्वराज्याचा! आपण एका जागी तर असेच अडकून पडलो तर आपला कोंडमारा होईल स्वराज्यातील इतर प्रशासनाची व सुरक्षिततेची चिंता शिवरायांना होती म्हणून या वेढ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे हे शिवरायांना चांगलंच माहीत होतं .त्याचवेळी दिल्लीकडून  शाहिस्तेखान लाखभर फौज घेऊन चाल चाल करून येण्याच्या बेतात होता.

          महाराज पन्हाळयावरून राजदिंडी दरवाज्यातून १३ जुलै १६६० च्या रात्री पालखीतून बाहेर पडले . पुढे विशाल गडापर्यन्तचा किर्र जंगलात दऱ्या खोऱ्यातून जाणारा मराठयांच्या शौर्यभूमि वरील शौर्यमार्ग  ज्या वाटेने आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री धो-धो कोसळणाऱ्या काळ्या कुट्ट अंधारात राजदिंडी दरवाज्यातून म्हाळुंगी व पुढे मसाई पठारावरून - पांढरपाणी मार्गे महाराज मावळ्या सह वेढ्यातून बाहेर पडले होते या शौर्य मार्गाचा साक्षीदार होत हिंदवी परिवाराच्या नियोजनबद्ध मोहिमेतून ह्या मार्गावरून चालण्याची संधी मिळाली . वीर शिवाजी काशिदांच्या बलिदानासह बाजीप्रभू देशपांडे सह ३०० बांदल मावळ्यांचा स्वराज्यनिष्ठेसाठी दिलेले बलिदान व इतर अवस्मरणिय आपल्या वैभशाली इतिहासाच्या पाउल खुणा पावनखिंडीतून पुढच्या भागात.......!!



संजय खांडवे

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

आमच्या लेखणीस धार आली.......

 आमच्या लेखणीस धार आली.......



जिजाऊ रथयात्रा २०२५ विशेष



प्रियः प्रजानां दातैव  न पुनर्द्रविणेश्वर: ।

आगच्छन्काड्र.क्ष्यते   लोकैर्वारिदो  न वारिधिः।


         छत्रपती संभाजी राजे आपल्या प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.

       आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ.

         कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश सेवा संघाने पुढे चालवला .

*"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा.*

      मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला.शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. मराठा सेवा संघ हे एक विचारांचे संघटन असल्याने मानवतावादी मूल्य रुजविण्याचे कार्य न्याय , स्वातंत्र्य , समता व बंधुता हा महामानवांचा विचार प्रबोधनाचा जागराचे शिवकार्य  गेल्या अनेक वर्षापासून करत आहे . चिकित्सक व विवेक बुद्धीचा वापर करण्याची सवय असल्याने महाविद्यालयीन काळापासून  आमच्या सारखे नवतरुण सपूर्ण महाराष्ट्र भरातून पहिल्या जिजाऊ रथ यात्रेत मोठ्या संख्येने जोडल्या गेलो. आपल्या विचारधारेची आपली माणसं आपल्या महापुरषांच्या सत्य विचारांच्या पेरणी साठी सोबत असतांना पाहून अधिकच बळ आले . त्या काळात तरुणांमधील  वैचारीक प्रबोधनाचा आलेख चढता होता . सामाजिक माध्यमे नसल्याने वाचनाकडे कल अधिक होता .

"आता आमच्या धडावर आमचेंच डोके असेल"

वीस वर्षापूर्वी हे पुस्तक आमच्या वाचण्यात आले अन खऱ्या अर्थाने आमच्या विचार करण्याच्या शैलीत अधिकच बदल झाला .अन जीवनाकडे चिकित्सक दृष्टीकोनाने बघु लागलो .प्राचिविदयाप्राप्त,संस्कृतचे गाढे अभ्यासक,जगातील जवळपास सर्व सस्कृतींचे अभ्यासक,संत साहित्यावर अगाध लेखन असलेले  ऋषीतुल्य डॉ आ . ह . साळुंखे   सरांचे "विद्रोही तुकाराम " वाचले व विद्रोहाचा अर्थ समजला,जगतगुरुचे सपूर्ण जीवनचरित्र कळाले व तुकोबाच्या या पुस्तकाने माझ्या वाचनछंदाला बळ मिळाले . आज त्यांनी सांगितलेले शब्दरुपी धनाने कुबेराचा शेजारीच झालो की काय अस कधी कधी वाटत अन शब्द रुपी शस्त्रे सदैव सत्याच्या लढाईत सोबत आहेत . रोज लेखणरूपी तलवार घासण्याचे काम याच विचार धारेतून मिळाले .


सांगावे ते बरे असते हे पोटी ।

दुःख देते खोटी बुद्धी मग ॥

आपला आपण करावा वेव्हार ।

जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥  

     गाथेतून ही वैचारिक ताकद मिळणे सुरु आहे.

     "बळीवंश" मधून तर आपली ५००० वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती सरांच्या गाढया अभ्यासातून,आपण कल्पणाही करु शकत नाही येवढी मेहनत ,संस्कृतचे गाढे अभ्यासक ,सर्व प्राचीन ग्रंथाचे अभ्यासपूर्ण विवेचन करुन केलेली मांडणी विचार करायला लागणारी आहे

  "पुस्तक लिहतांना सरांनी वापरलेली सदर्भ सूची ,ग्रंथ याचेच एक पुस्तक बनते हे महत्वाचे "

      जाणण्याची इच्छा ही जीवन अधिक सुदर बनविते हे यातूनच कळाले .

         सरांनी मांडलेले चार्वाक समजून घेतांना सर्व सदर्भ जुळत गेले ,अन चार्वाकापासून वैचारिक प्रवासाला सुरूवात झाली आणि ती शिव - शाहू - फुले अन बाबासाहेबापर्यन्त आम्हाला कळाली . आ ह सरामुळे तर लाखों बहुजनांना  खऱ्या अर्थाने तथागत कळाले " सर्वोत्तम भूमीपूत्र गोतमबुद्ध"

या पुस्तकामुळे आम्हाला बुध्दविचार कळाले येवढच नाही तर बुद्धसाहित्य जाणण्याची ओढ वाढली. त्यांनी विचारांची चिकित्सा तर केलीच पण  त्या चिकित्सेची चिकित्साही केली व त्याचे लिखान सर्वापुढे मांडले ,बहुतेक लेखक लिखान करतात व त्यावर केलेली चिकित्सा मात्र त्यांना मांडता येत नाही ,उत्तरे देता येत नाही ,सदर्भही जुळत नाही. 

" देव माणता की नाही याही पेक्षा माणूसपण जपता की नाही हे महत्वाचे "

        जगत असतांना ही "माणूसपणाची शिकवण व उच्चकोटीतील नम्रपणा " सरांचे अगाध साहित्य सांगून जाते . त्यांच्या ह्या आदर्शातून आमच्या सारख्यांच्या लहान - लहान लेखणीच्या तलवारी रोज घासण्याच बळ मिळत राहते . कॉम्रेड शरद पाटलांच्या साहित्याची ओळख झाली अन समजून घेण्याचे काम आम्ही करतोय .प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळचं  होते . त्यांच्या समग्र साहित्यातून डोळ्यात अंजन घातल्या गेले .प्रा डॉ अशोक राणा सरांच्या सहवासात तर मिथकशास्त्र समजून घेऊन आम्ही त्यावरही लिहायला शिकलो . मंदिर, लेणे  अन गडकोटाची ओढ लागून जतन अन संवर्धनाचं महत्वही कळाले . मुलुख मैदानी तोफ गंगाधर बनबरे सरांकडून परखडपणा व चळवळीतील सातत्य शिकलो . अनेक चांगली माणसे भेटत गेली .हे केवळ घडलं क्रांतिपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी उभारलेल्या मराठा सेवा संघाच्या वटवृक्षामुळेच ' ! स्वराज्यजनि राजमाता व महाबली शहाजीराजे यांच्या त्याग व संघर्षातून विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार आहे . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघाने आकार घेत देशभरात या विचाराने अनेक मोठी माणसे घडविली

त्यांना  लढायला शिकविले......

सत्यासाठी.....

वाचायला शिकविले....

चिकित्सेसाठी.......

बोलायला शिकविले .....

न्यायासाठी.......

आज जिजाऊ रथ यात्रेच्या निमित्ताने " मराठा जोडो अभियानातून " सर्वांनी सर्व अंगाने एकत्र यावे हीच अपेक्षा .


 



संजय खांडवे

बुलढाणा जिल्हाध्यक्ष  इतिहास कक्ष मराठा सेवा संघ

9011971122

पुस्तकांसाठी जगणारा अवलिया.......!!!*

 *पुस्तकांसाठी जगणारा अवलिया.......!!!*


📕📕📗📕📗📕📗📕📗📕

              आताच्या काळात फार कमी लोक असतील की जे पुस्तकाच्या विश्वात रममान होतात. कदाचित आमच्याकडे पुस्तके ही नसतील एवढी स्वतः च्या घरात त्या पुस्तकांसाठी कपाट असलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद टाले सर ! पुस्तकांसाठी वाटेल ते करण्याची तयारी या व्यक्तिमत्त्वाची असते . अगदी दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तक कुणाकडे आहे असे जरी कळाले तरी त्या पुस्तकास खरेदी करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी टाले सरांची असते . विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचावे म्हणून बुलढाणा शहरात पुस्तके बघण्यासाठी गेलेले  सर ! ज्यावेळेस अशी पुस्तके मिळत नाहीत त्यावेळेस त्यांनी खचून न जाता आता आपणच छत्रपती शिवरायांवरील चरित्र ग्रंथ तथा संदर्भ ग्रंथ तथा संदर्भ साधने एकत्रित केली पाहिजे हा ध्यास त्यांना लागला आणि त्यातूनच हे मातृतिर्थ बुलढाणा नगरीमध्ये भव्यदिव्य असे मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय उभे राहिले .

               मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय बुलढाणा सारख्या शहरात उभे राहणे ही काही सामान्य गोष्ट नाही कारण ज्यावेळेस त्यांच्या संपूर्ण ग्रंथालयामधील पुस्तकांवरून आपण नजर फिरवली तर असे लक्षात येते की जी पुस्तके आपण कधी बघितली देखील नाही अशी दुर्मिळातील दुर्मिळ आणि जुन्यात अत्यंत जुनी असलेली पुस्तके सर संग्रहित करत आहेत . छत्रपती शिवरायांवरील जवळपास सर्वच चरित्र ग्रंथ त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची शिवकालीन असलेली पत्रकार संग्रह पेशवेकालीन पुस्तक संग्रह मराठ्यांचा समग्र इतिहास अगदी वि का राजवाडे यांच्यापासून तर डॉ आह साळुंखे सरांची सर्वच पुस्तके त्यांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत . इंग्रजांनी लिहिलेले संदर्भ ग्रंथ त्याचबरोबर मोगलकालीन कालखंडावर असलेले संदर्भ ग्रंथ , संत साहित्यावरील प्रचंड साहित्याचा साठा त्यांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे . विष्णुपुराण ,शिव पुराण आदी सर्वच पुराणांसह अत्यंत दुर्मिळ काळात लिहिली गेलेली पुराणग्रंथ त्याचबरोबर रामायण महाभारत यावर आधारलेले संपूर्ण ग्रंथ सार आदरणीय सरांच्या वाचनालयामध्ये आहेत . भारतरत्न डॉ बाबासाहेबांवरील चरित्र ग्रंथ , अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य तथा दलित साहित्य ग्रंथालयात उपलब्ध आहेत .

        महिनाभरात आठ ते दहा हजाराची पुस्तके स्वखर्चातून सर विकत घेत असतात आम्ही सरांच्या संपर्कात राहून निश्चितच या संदर्भ ग्रंथालयाचा लाभ घेत आहोत जे संदर्भ आम्हाला कधी सापडले नाहीत जे ग्रंथ आम्हाला कधी अगदी डोळ्यानेही बघायला मिळाले नाही ते केवळ आणि केवळ टाले सरांच्या या अलौकिक असामान्य कार्यामुळे आम्हाला बघायला मिळत आहे .छत्रपती शिवरायांचा छत्रपती, संभाजी राजांचा सत्य इतिहास संदर्भासह याच ठिकाणी आम्ही शोधत आहोत विविध गड किल्ल्यावरील असलेले अत्यंत दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह त्याचबरोबर विविध ग्रंथातील संदर्भ आम्ही आमचे लिखाण करत असताना त्यामधून घेत आहोत आणि निश्चितच यामुळे नवनवीन माहिती जगाच्या समोर येत आहे एक ज्ञानाचा भंडार म्हणून सरांनी उभं केलेलं हे ग्रंथालय बुलढाणाकरांसाठी भूषणवह आहे .आतापर्यंत जवळपास 25 ते 30 लाखांची पुस्तके सरांच्या घरांमध्ये त्या वाचनालयामध्ये आहेत याचबरोबर इतरही छंद सर जोपासतात यामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ नाण्यांचा संग्रह असेल किंवा इतिहासकालीन एखादी संदर्भ असलेली वस्तू जरी सरांना दिसली तर सर त्या वस्तूची वाटेल ती किंमत मोजतात आणि आपल्या इतिहासाप्रती आपल्या पुर्वजाप्रती कृतज्ञ राहून त्यांची सेवा करत असल्याची भावना ते व्यक्त करतात आणि या मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयाचा फायदा उपयोग हा बुलढाणा करांनी घेतला पाहिजे अशी भावना ती यातून व्यक्त करतात खरंच पुस्तकांसाठी जगणारा अवलिया आपल्या मातृतिर्थ शहरात आहे आणि त्यांचा सहवास आम्हाला लाभतो आहे म्हणून त्या परिसराच्या सानिध्यात राहून आमचं सोनंच होत आहे . आज आदरणीय सरांचा वाढदिवस सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिव शुभेच्छा !

       मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्या महामानवांचा सत्य इतिहास जगासमोर येऊ या सदिच्छासह आदरणीय सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

📕📕📕📕📕📕📕📕♦️

संजय खांडवे

बुधवार, २ एप्रिल, २०२५

बौध्द,जैन व हिंन्दूचे प्राचीन शिल्पग्राम - भद्रावती

 बौध्द,जैन व हिंन्दूचे प्राचीन शिल्पग्राम - भद्रावती


स्थान : ता. भद्रावती जि . चंद्रपूर , चंद्रपूर वरून २५ कि.मी.व नागपूर पासून १२५ कि.मी.



बौध्द ,जैन  व हिन्दू धर्मियांचे प्राचीन वारसा लाभलेले विदर्भातील अत्यंत महत्वाचे शहर म्हणजे भद्रावती होय . खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भद्रावतीच्या भूमित अनेक राजवटी होऊन गेल्या यामधे सातवाहन , वाकाटक, राष्ट्रकुट, मौर्य, गुप्त , चालुक्य, यादव, गोंड या सर्वाची अगदी दोन अडीच हजार वर्षा पासूनचे प्राचीन भौतिक संदर्भ हया शहराच्या भ्रंमती मधून दिसून येतात . जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रचंड उकाड्यात आम्ही भद्रावती परिसरात होतो . इतिहासकार तथा प्राचीन लेणी मंदिरे व शिल्प या विषयातील प्रकांड अभ्यास असलेले आमचे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व डॉ अशोक राणा सर सोबत चंद्रपुरात असतांना अगोदरचे तीन दिवस विवेक चांदुरकर व प्रमोद टाले हया अभ्यासकांसोबत भद्रावती विषयी बरीच चर्चा झाली होती म्हणून आम्हाला भद्रावतीची विशेष ओढ लागली होती .

               महामार्गापासून शहरातील  बाजारपेठेमधून शहराच्या अगदी पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाजूला विजासन बौद्ध लेणी टेकडी आहे . पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने बऱ्यापैकी या लेणीचे संवर्धन झाले आहे . वर जाणाऱ्या पायऱ्याने आपण या लेणीमध्ये जातो. बाह्य भागात बऱ्याच देवड्या आहेत यामध्ये काही शिल्प देखील बघायला मिळतात जाताना उजव्या बाजूच्या देवळीत हीनयान कालखंडातील बौद्धस्तुप उठावदार शिल्पात कोरले आहे अशा स्वरूपाचे एकमेव शिल्प बघायला मिळते या शिल्पात छत्रावली, यष्टी ,हर्मिका, अंड, वेदिका आणि मेधी असे सर्व भाग असलेले  स्तुप कोरलेले दिसते . उजव्या बाजूस अस्पष्ट असा शिलालेख आहे .आत जाताना गजपृष्टाकार छत असलेली कमानीतून समोर ' ध्यान मुद्रेतील बौद्ध मूर्ती दिसते . आठ ते दहा फूट रुंद व 50 ते 60 फूट लांब अशी ही आत मधली साधारणतः रचना आहे . लेणीच्या डाव्या व उजव्या बाजूस देखील अशाच स्वरूपाची आणखी आत मध्ये गजपृष्ठाकार आकारात कोरलेली लेणी असून त्यामध्ये देखील भगवान गौतम बुद्धाची ध्यानस्थ मुद्रा कोरलेली आहे . हीनयान व महायान पंथाचा समन्वय या लेणीमध्ये दिसून येतो त्यामुळे या लेणीचा कालखंड हा दोन हजार वर्षापूर्वीचा असावा . विदर्भात फार कमी लेण्या बघायला मिळतात सालबर्डी, पातुर यासारख्या ठिकाणी लेण्या आहेत . विजासन टेकडीच्या पुढे  देखील अशा स्वरूपाची काही शैलगृहे आहेत . गौराळा वरदविनायक हे भद्रावती पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मंदिर आहे या मंदिरात भव्य अशी गणेश मूर्ती असून हे मंदिर देखील प्राचीन आहे या मंदिराच्या बाहेर एक सुंदर छोटी लेणी आहे . या छोट्याशा लेणीत विष्णूचे वराह ,नृसिंह अवतार शिल्पे कोरलेली आहेत . लेणी बाहेर देखील बरीच शिल्पे आहेत .लेणीत स्पष्टपणे पायथ्याशी भारवाहक यक्ष या छोट्याशा लेणीचा भार तोडून धरताना दिसतात मंदिराच्या आत मध्ये प्राचीन उमाशंकर , नंदी शिल्प तथा शिवलिंग देखील बघायला मिळते .

           भद्रावती शहराचे नाव ज्या ग्रामदैवतेवरून पडले त्या भद्रनाग देवतेचे मंदिर शहराच्या अगदी मध्यभागी आहे . शेष नागाचे स्वतंत्र असलेले एकमेव मंदिर या शहरात आपल्याला बघायला मिळते .नऊ फण्याची शेषनागाची मूर्ती गाभार्‍यात विराजमान  आहे. 36 खांबावर असलेले हे प्राचीन मंदिर आणि प्रत्येक खांबाच्या पायथ्याशी असलेला भारवाहक यक्ष दिसून येतो . या मंदिरात एक शिलालेख देखील आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या छोट्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूने विष्णू मूर्ती स्थापित केली असून दरवाजावर भारवाहक यक्ष आपले स्वागत करतो. मंदिराच्या आत मध्ये शेषशायीअसलेली भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती आहे . मंदिर परिसरात  पायऱ्यांची दगडी चिरेबंदी  भव्य विहीर आहे . या परिसरात एक विरगळ देखील दिसून येते. शहरात एक प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील आहे . मंदिर अगदी लहान असून या मंदिराच्या समोर प्राचीन दगडी खांब उभा केलेला आहे या दगडी खांबावर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत . हा मंदिर समूह व दगडी खांब आता सिमेंटीकरण्याच्या प्रचंड अशा सभा मंडपाच्या आत घेण्यात आलेला आहे .

               भद्रावती शहराचे आणखी एक वैभव म्हणजे शहराच्या पश्चिम भागात असलेला भुईकोट किल्ला याला भांदकचा किल्ला देखील म्हणतात . पूर्व बाजूस भव्य असे कमानीचे प्रवेशद्वार या किल्ल्याला आहे लाल दगडात बांधलेला चौकोनी आकाराचा हा किल्ला आहे . साधारणपणे किल्ल्याचे बुरुज हे गोलाकार स्वरूपाचे असतात मात्र या किल्ल्याचे बुरुज हे चौकोनी आहेत दरवाजा देखील दोन चौकोणी बुरुजाच्या मध्ये आपल्याला दिसतो असे आठ बुरुज या किल्ल्यास आहे . आत मध्ये साधारणपणे तीन साडेतीन एकरचा भाग असून तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या असून बुरुजाच्या आणि प्रवेशद्वाराच्या वरील भागात जंग्या आहेत . पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने बऱ्यापैकी संवर्धन सुरू आहे . किल्ल्याच्या आत मध्ये अनेक इमारतींचे वाड्यांचे अवशेष दिसून येतात.  किल्ल्यामध्ये असलेली पायऱ्यांची विहीर अजूनही चांगल्या स्थितीत आहे L आकारात असलेल्या पायऱ्या असून मजबूत अशा पाषाणात बांधलेली ही विहीर या किल्ल्यास पाणी पुरवण्याचे काम करत असे . विहिरीत उतरण्यासाठी तीन ठिकाणी मधून पायऱ्या मार्ग आहे . जसा पाण्याचा स्तर असेल तसा या पायऱ्यांचा उपयोग होत असे प्रचंड असा तीन मजली महाल या विहिरीत दिसून येतो .सुंदर असे कमानी वरील नक्षीकाम व या कमानीवरील सुंदर कोरीव पट्ट्या आपले मन मोहून घेते या विहिरीच्या वरच्या भागावर मोट बसविलेली असायची त्याचे अवशेष आता दिसून येतात वरील बाजूस तीन मोठे हौद असून दगडी पन्हाळाच्या माध्यमातून संपूर्ण किल्ल्यास व येथील बाग बगीचा देखील पाणी पुरवले जात असल्याचे दिसून येते . संपूर्ण दगडी चिरेबंदी बांधकामात असलेल्या विहिरीच्या मात्र एका बाजूस नंतरच्या काळात केलेले विटाचे बांधकाम आढळते हे एक या विहिरीचे गुढ आहे . विहिरीच्या तळात बाहेर आलेला एक महाकाय दगड दिसतो असे सांगितले जाते की हया दगडाच्या पलीकडून एक भुयारी मार्ग विजासन लेणे भागात निघतो . पश्चिम बाजूस एक छोटे द्वार देखील या भुईकोटस आहे याचे मुख दक्षिण बाजूस केले आहे या छोट्या प्रवेशद्वारावर एक मुख मुद्रा कोरलेली आहे . भद्रावती शहर हे शिल्पांचे शहर मानले जाते या परिसरात असलेले अनेक प्राचीन लेणी व मंदिरे  परिसरातील आढळलेले मूर्ती शिल्प या  कोटात ठेवण्यात आलेली आहे . मासा भेदनारा अर्जुन हा भिंतीवरील शिल्पात कोरलेला आहे त्या परिसरामध्ये शीर तुटलेला ढेरपोट्या कुबेराची मूर्ती हातात साप व धनाचे हंडे त्याच्यासोबत आहेत त्याचबरोबर शंकर पार्वती , महिषासुर मर्दिनी ,भगवान महावीर ,गौतम बुद्ध नृसिंह अवतार, वराह अवतार गदा चक्रधारी भगवान विष्णू , गणेश तथा नर्तकी वीरगळ आणि कधीही न पाहिलेल्या बऱ्याचश्या अनाकलनिय मूर्ती शिल्प या ठिकाणी बघायला मिळतात .

          जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर केसरीया भगवान पार्श्वनाथ यांचे सुंदर मंदिर या ठिकाणी आहे . हे मंदिर नवनिर्मित असून संपूर्ण संगमरवरी दगडांमध्ये बारीक शिल्प कला मध्ये बांधण्यात आले आहे . या मंदिर संस्थानाकडून अनेक सेवाभावी उपक्रम चालविले जातात त्याची प्रचिती या मंदिराला भेट दिल्यानंतर येते . भगवान पार्श्वनाथाची अत्यंत प्राचीन मूर्ती या मंदिरामध्ये आहे या पद्मासन स्थितीत असलेल्या मूर्तीची उंची 152 सेंटीमीटर असून अत्यंत मनमोहक ही मूर्ती आहे पार्श्वनाथ भगवानचे वाहन नागफणा आहे. ही फणायुक्त अत्यंत सुबक अशी मूर्ती शिल्प केवळ भद्रावती येथेच दिसून येते .

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...