बुधवार, २६ मार्च, २०२५

तुकोबारायांना सामाजिक साक्षात्कार -भांबनाथाचा डोंगर


 तुकोबारायांना सामाजिक साक्षात्कार -भांबनाथाचा डोंगर

स्थान : ता . हवेली जि . पुणे , चाकण ते तळेगाव महामार्गावर उत्तरेकडे २ कि.मी ,देहू पासून ६ कि.मी.


जगतगुरू तुकोबारायांचे जन्मगाव देहू हे इंद्रायणी माईच्या काठावर वसलेले आहे .लोणावळ्याच्या नागफणी डोंगरातून उगम पावणारी इंद्रायणी देहू पुढे आळंदी मार्गक्रमण करत तुळापूर तेथून भिमा नदीच्या रुपाने भूवैकुंठ पंढरीस चंद्रभागा बनते .तुकोबारायांच्या कर्जखाती अन वैश्वीक गाथा या माईनं जवळून पाहिल्या . आळंदीसही माऊंली समाधिस्त होतांना माईने अनुभवले . शंभू राजांच्या वेळी तर या माईने तुळापूरी आपल्या लेकरांचं स्वराज्यासाठीचं बलिदान कसं सोसलं असेल ती ही इंद्रायणी माईचं जाणते . जगातील सर्वच संस्कृतींच्या मूळ स्थानी नदी असते . सुख , समृद्धी , संकट ' संघर्ष या सर्व काळात आईच्या रुपात ही प्रत्येकाच्या सोबत असते .
             जगतगुरु तुकोबाराय याच माईच्या कुशीत रमले . जगाला वैश्वीक संदेश देणारी गाथा याच पवित्र भूमित रचली गेली .मराठी मायबोली भाषेच्या आदय महाकवींनी जन सामान्याच्या ह्यदयापर्यन्त पोहचून आंतरिक शुद्धता जपत धर्माचे खरे अधिष्ठान अंतःकरणाच्या शुद्धतेत असते असे सांगत ,उत्तम व्यवहारातून प्रपंचासाठी धन जोडा हे सांगणारे,भिक्षापात्र झिडकारणारे,सुखात हुरळून न जाता दुःखातही न खचणारे, मावळ्यांसाठी पाईकांचे अभंग रचियेता  असलेले स्वराज्याचे अध्यात्मिक गुरु,भेदाभेद अमंगळ आहे हे सांगणारे,देवाने मला कुणबी केले म्हणून धन्यता माणनारे,कुणालाही कधीही टोचून न बोलणारे ,सम ब्रम्हाची जाणिव करुन देणारे ,सोवळया ओवळ्या पासून निराळे असणारे,सर्व दिशा अन काळ  सदैव शुभच आहेत हे सांगणारे,नेहमी समाजात एकरूप होऊन राहणारे,प्रपंच परमार्थ सोबत करणारे,समाजासोबत तितकीच आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे,शोषण करणाऱ्याचे तोंड फोडा म्हणून सांगणारे,किर्तनाचा विकरा करणाऱ्यावर रोख ठोक बोलणारे,शेती,पर्यावरण,कुंटुंब,जन्म,मृत्यु,बालपण,म्हातारपण,राग,लोभ,मत्सर,चित्त,चिंता,पशू,पक्षी,प्राणी,मन,धन,पाणी,परिस,सोने,माती,कथा,दंतकथा,कळ,नवस,तीर्थ,जप,तप,व्रत,मंत्र,तंत्र,योग,याग,सिद्धी,मोक्ष,इंद्रिय,समाधी,संसार,गुरू ,शिष्य,युद्ध,शस्त्र,शद्ब, अश्या असंख्य विषयावर भाष्य करणारे जगतगुरू संत तुकाराम महाराजांची गाथा संपूर्ण विश्वाला तारणारी ठरली आहे .
          देहू पासून ६ कि.मी. अंतरावर असलेला भांबनाथाचा डोंगर म्हणजेच भंडारा डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमिस नतमस्तक व्हावे या उद्देशाने देहूवरून अगदी सकाळीच निघालो . चाकण - तळेगाव महामार्गावर उजव्या बाजूस डोंगराकडे जाणारा दुपदरी रस्ता दिसतो . घाट चढून पाच मिनिटात या डोंगरावर सहज पोहचता येते . आता या ठिकाणी संगमरवरी दगडात तुकोबारायांचे भव्य मंदिर निर्माण कार्य सुरु आहे . सुंदर नक्षी काम असलेल्या भव्य सभामंडपासह हे मंदिर उभे राहत आहे . विठोबा - रखुमाई , गणपती तथा शिवलिंग असलेले मंदिर येथे आहे . राहण्यासाठी धर्मशाळेची सोय देखील येथे आहे . आम्ही दर्शन घेऊन या डोंगरावर असलेल्या लेणी व गुफे कडे जाणारा मार्ग शोधू लागलो . जवळ पास बरीच वारकरी मंडळी दर्शनासाठी आल्याने त्यांनाही माहीत नव्हते . मग गुगल मॅप चा वापर करत आम्ही पुन्हा थोड आलो त्या मार्गाने पाच मिनिटच्या अंतरावर  खाली आलो व डोंगरावरीलच भंडारा हॉटेलच्या पश्चीम दिशेला पार्कीगच्या बाजूने डोंगर उतारावरुन अंधुक अशी पाऊल वाट दिसली .आम्ही भंडारा डोंगर या बाजूस खाली उतरतांना पायथ्याशी घनदाट जंगल दिसत होते . डोंगर उतार व पराड्या मधून कडे कडेने जातांना समोर काताळात पाण्याचे टाके दिसले . तेथेच काताळात कोरलेली गुफा होती . आता त्याला लाकडी दरवाजा बसविला गेला आहे . आत ही चौकोनी आकारात कोरली असून उजव्या बाजूने देवडी कोरली आहे एका व्यक्तीच्या विसाव्या येवढी जागा त्यात आहे . गुफा आतुन रंगविण्यात आली असून मध्य भागी अगदी समोर विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे. गुफे बाहेरही दोन देवड्या दोन्ही बाजूने होत्या आता मात्र त्याचे केवळ अवशेष दिसतात . अशी शैलगृहे ही वर्षावास म्हणून प्राचीन काळी असतं . कातळाच्या कपारीने पुढे अजून पाण्याची टाके आहेत वरच एक अर्धवट कोरलेली गुफा दिसते व बाजुलाच एक घुमटाकार बौद्ध स्तुप दिसतो वर चढण्यासाठी पायऱ्या पूर्वी होत्या असे अवशेष दिसतात . स्तुपा भोवती पूर्ण गोलाकार फिरता येते . पूर्वी यासाठी लाकडी छत असावे असे दिसते . या स्तुपाचा वरील भाग आता तुटलेला आहे वर छत्रावली नाही त्याखाली असलेली यष्टी नाही, हर्मिका पण तुटलेली आहे घुमटाकार भाग असून त्या खाली सुंदर नक्षीदार वेदिका पटटी असून त्या खाली गोलाकार मेधी आहे . हिनयान कालखंडातील हा बौद्ध लेणी समुह आहे . भाचे , कार्ले, ठाणाळे ,पितळखोरा, कान्हेरी व अजिंठा  मधील १० क्रमांकाचे लेणे हे हिनयान आहेत . पुढे अजून दोन लेणे बघायला मिळतात ही चौकोनी असून त्यात दोन- तीन व्यक्ती वास्तव्य करु शकतील येवढी जागा आहे . प्राचीन काळा पासून बौध्द अनुयायांचे धर्म चिंतनासाठी वास असे . ४०० वर्षा पूर्वी याच भंडारा डोंगरावर जगतगुरु तुकोबारायांचे वास्तव्य होते . निश्चितच या शांत व रमणिय ठिकाणी त्यांनी चिंतन केले असावे . सात दिवस महाराज या डोंगरावर होते . या ठिकाणी त्यांची पत्नी जिजाबाई ह्या त्यांना भाकरी घेवून यायच्या या संदर्भात त्यांच्या पायात रुतलेला काटा साक्षात पांडुरंगाने काढला अशी अख्यायिका सांगितली जाते . या डोंगरावरून त्यांचे भाऊ कान्होबा त्यांना देहूस घेऊन आले . ते घरी न जाता इंदायणी माईच्या काठावर आले अन कान्होबास कर्जखाती घेवून येण्यास सांगितली . त्यांचा परिवार हा अनेक पिढ्या पासून सावकारी मध्ये होता .तुकोबारायांनी त्यांच्या हिश्याची कर्ज खाती इंदायणीत बुडविली .  तुकोबारायांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला होता तो गुढ गहन व अध्यात्मिक स्वरुपाचा नव्हता तर तो सामाजिक स्वरूपाचा होता . संतत्वाची खरी कसोटी त्यांनी अगोदर स्वतः स लावली . समाजातील अन्याय , शोषण दुर करून मानवता प्रस्तापित केल्या शिवाय खरा निर्मळ ईश्वर मार्ग निर्माण होतो ही त्यांची धारणा होती .डॉ आ.ह. साळुंखे सर म्हणतात " श्वासोच्छवास जितक्या सहजतेने घडतो तितक्या सहजपणे त्यांनी कर्जखाती बुडविली होती " हे उच्च नैतीकतेचे जाणिवेतून उचललेले पाऊल ही उच्च कोटीची मानवता होती .
         महाभूमिच्या वारश्यातील भंडारा डोंगर हा सामाजिक साक्षात्काराचे क्रांतिस्थळ आहे .


संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...