बुधवार, २६ मार्च, २०२५

तुकोबारायांना सामाजिक साक्षात्कार -भांबनाथाचा डोंगर


 तुकोबारायांना सामाजिक साक्षात्कार -भांबनाथाचा डोंगर

स्थान : ता . हवेली जि . पुणे , चाकण ते तळेगाव महामार्गावर उत्तरेकडे २ कि.मी ,देहू पासून ६ कि.मी.


जगतगुरू तुकोबारायांचे जन्मगाव देहू हे इंद्रायणी माईच्या काठावर वसलेले आहे .लोणावळ्याच्या नागफणी डोंगरातून उगम पावणारी इंद्रायणी देहू पुढे आळंदी मार्गक्रमण करत तुळापूर तेथून भिमा नदीच्या रुपाने भूवैकुंठ पंढरीस चंद्रभागा बनते .तुकोबारायांच्या कर्जखाती अन वैश्वीक गाथा या माईनं जवळून पाहिल्या . आळंदीसही माऊंली समाधिस्त होतांना माईने अनुभवले . शंभू राजांच्या वेळी तर या माईने तुळापूरी आपल्या लेकरांचं स्वराज्यासाठीचं बलिदान कसं सोसलं असेल ती ही इंद्रायणी माईचं जाणते . जगातील सर्वच संस्कृतींच्या मूळ स्थानी नदी असते . सुख , समृद्धी , संकट ' संघर्ष या सर्व काळात आईच्या रुपात ही प्रत्येकाच्या सोबत असते .
             जगतगुरु तुकोबाराय याच माईच्या कुशीत रमले . जगाला वैश्वीक संदेश देणारी गाथा याच पवित्र भूमित रचली गेली .मराठी मायबोली भाषेच्या आदय महाकवींनी जन सामान्याच्या ह्यदयापर्यन्त पोहचून आंतरिक शुद्धता जपत धर्माचे खरे अधिष्ठान अंतःकरणाच्या शुद्धतेत असते असे सांगत ,उत्तम व्यवहारातून प्रपंचासाठी धन जोडा हे सांगणारे,भिक्षापात्र झिडकारणारे,सुखात हुरळून न जाता दुःखातही न खचणारे, मावळ्यांसाठी पाईकांचे अभंग रचियेता  असलेले स्वराज्याचे अध्यात्मिक गुरु,भेदाभेद अमंगळ आहे हे सांगणारे,देवाने मला कुणबी केले म्हणून धन्यता माणनारे,कुणालाही कधीही टोचून न बोलणारे ,सम ब्रम्हाची जाणिव करुन देणारे ,सोवळया ओवळ्या पासून निराळे असणारे,सर्व दिशा अन काळ  सदैव शुभच आहेत हे सांगणारे,नेहमी समाजात एकरूप होऊन राहणारे,प्रपंच परमार्थ सोबत करणारे,समाजासोबत तितकीच आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे,शोषण करणाऱ्याचे तोंड फोडा म्हणून सांगणारे,किर्तनाचा विकरा करणाऱ्यावर रोख ठोक बोलणारे,शेती,पर्यावरण,कुंटुंब,जन्म,मृत्यु,बालपण,म्हातारपण,राग,लोभ,मत्सर,चित्त,चिंता,पशू,पक्षी,प्राणी,मन,धन,पाणी,परिस,सोने,माती,कथा,दंतकथा,कळ,नवस,तीर्थ,जप,तप,व्रत,मंत्र,तंत्र,योग,याग,सिद्धी,मोक्ष,इंद्रिय,समाधी,संसार,गुरू ,शिष्य,युद्ध,शस्त्र,शद्ब, अश्या असंख्य विषयावर भाष्य करणारे जगतगुरू संत तुकाराम महाराजांची गाथा संपूर्ण विश्वाला तारणारी ठरली आहे .
          देहू पासून ६ कि.मी. अंतरावर असलेला भांबनाथाचा डोंगर म्हणजेच भंडारा डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमिस नतमस्तक व्हावे या उद्देशाने देहूवरून अगदी सकाळीच निघालो . चाकण - तळेगाव महामार्गावर उजव्या बाजूस डोंगराकडे जाणारा दुपदरी रस्ता दिसतो . घाट चढून पाच मिनिटात या डोंगरावर सहज पोहचता येते . आता या ठिकाणी संगमरवरी दगडात तुकोबारायांचे भव्य मंदिर निर्माण कार्य सुरु आहे . सुंदर नक्षी काम असलेल्या भव्य सभामंडपासह हे मंदिर उभे राहत आहे . विठोबा - रखुमाई , गणपती तथा शिवलिंग असलेले मंदिर येथे आहे . राहण्यासाठी धर्मशाळेची सोय देखील येथे आहे . आम्ही दर्शन घेऊन या डोंगरावर असलेल्या लेणी व गुफे कडे जाणारा मार्ग शोधू लागलो . जवळ पास बरीच वारकरी मंडळी दर्शनासाठी आल्याने त्यांनाही माहीत नव्हते . मग गुगल मॅप चा वापर करत आम्ही पुन्हा थोड आलो त्या मार्गाने पाच मिनिटच्या अंतरावर  खाली आलो व डोंगरावरीलच भंडारा हॉटेलच्या पश्चीम दिशेला पार्कीगच्या बाजूने डोंगर उतारावरुन अंधुक अशी पाऊल वाट दिसली .आम्ही भंडारा डोंगर या बाजूस खाली उतरतांना पायथ्याशी घनदाट जंगल दिसत होते . डोंगर उतार व पराड्या मधून कडे कडेने जातांना समोर काताळात पाण्याचे टाके दिसले . तेथेच काताळात कोरलेली गुफा होती . आता त्याला लाकडी दरवाजा बसविला गेला आहे . आत ही चौकोनी आकारात कोरली असून उजव्या बाजूने देवडी कोरली आहे एका व्यक्तीच्या विसाव्या येवढी जागा त्यात आहे . गुफा आतुन रंगविण्यात आली असून मध्य भागी अगदी समोर विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे. गुफे बाहेरही दोन देवड्या दोन्ही बाजूने होत्या आता मात्र त्याचे केवळ अवशेष दिसतात . अशी शैलगृहे ही वर्षावास म्हणून प्राचीन काळी असतं . कातळाच्या कपारीने पुढे अजून पाण्याची टाके आहेत वरच एक अर्धवट कोरलेली गुफा दिसते व बाजुलाच एक घुमटाकार बौद्ध स्तुप दिसतो वर चढण्यासाठी पायऱ्या पूर्वी होत्या असे अवशेष दिसतात . स्तुपा भोवती पूर्ण गोलाकार फिरता येते . पूर्वी यासाठी लाकडी छत असावे असे दिसते . या स्तुपाचा वरील भाग आता तुटलेला आहे वर छत्रावली नाही त्याखाली असलेली यष्टी नाही, हर्मिका पण तुटलेली आहे घुमटाकार भाग असून त्या खाली सुंदर नक्षीदार वेदिका पटटी असून त्या खाली गोलाकार मेधी आहे . हिनयान कालखंडातील हा बौद्ध लेणी समुह आहे . भाचे , कार्ले, ठाणाळे ,पितळखोरा, कान्हेरी व अजिंठा  मधील १० क्रमांकाचे लेणे हे हिनयान आहेत . पुढे अजून दोन लेणे बघायला मिळतात ही चौकोनी असून त्यात दोन- तीन व्यक्ती वास्तव्य करु शकतील येवढी जागा आहे . प्राचीन काळा पासून बौध्द अनुयायांचे धर्म चिंतनासाठी वास असे . ४०० वर्षा पूर्वी याच भंडारा डोंगरावर जगतगुरु तुकोबारायांचे वास्तव्य होते . निश्चितच या शांत व रमणिय ठिकाणी त्यांनी चिंतन केले असावे . सात दिवस महाराज या डोंगरावर होते . या ठिकाणी त्यांची पत्नी जिजाबाई ह्या त्यांना भाकरी घेवून यायच्या या संदर्भात त्यांच्या पायात रुतलेला काटा साक्षात पांडुरंगाने काढला अशी अख्यायिका सांगितली जाते . या डोंगरावरून त्यांचे भाऊ कान्होबा त्यांना देहूस घेऊन आले . ते घरी न जाता इंदायणी माईच्या काठावर आले अन कान्होबास कर्जखाती घेवून येण्यास सांगितली . त्यांचा परिवार हा अनेक पिढ्या पासून सावकारी मध्ये होता .तुकोबारायांनी त्यांच्या हिश्याची कर्ज खाती इंदायणीत बुडविली .  तुकोबारायांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला होता तो गुढ गहन व अध्यात्मिक स्वरुपाचा नव्हता तर तो सामाजिक स्वरूपाचा होता . संतत्वाची खरी कसोटी त्यांनी अगोदर स्वतः स लावली . समाजातील अन्याय , शोषण दुर करून मानवता प्रस्तापित केल्या शिवाय खरा निर्मळ ईश्वर मार्ग निर्माण होतो ही त्यांची धारणा होती .डॉ आ.ह. साळुंखे सर म्हणतात " श्वासोच्छवास जितक्या सहजतेने घडतो तितक्या सहजपणे त्यांनी कर्जखाती बुडविली होती " हे उच्च नैतीकतेचे जाणिवेतून उचललेले पाऊल ही उच्च कोटीची मानवता होती .
         महाभूमिच्या वारश्यातील भंडारा डोंगर हा सामाजिक साक्षात्काराचे क्रांतिस्थळ आहे .


संजय खांडवे

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

समरभूमी -उंबरखिंड*

 *समरभूमी -उंबरखिंड*


ता खालापूर जि रायगड

पुणे पासून १०५ कि.मी. खालापूर -पाली मार्गावर शेंबडी फाट्या पासुन ४ कि मी



 पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज सुखरूप विशालगडी पोहचतांना गजापूरच्या पावनखिंडीत स्वराज्याच्या स्वामिनिष्ठतेचा थरार सिद्धीच्या सैन्याने अनुभवला होता . स्वामिनिष्ठतेच प्रतीक ठरलेल्या पावनखिंडी नंतर खिंडीत झालेली शिवचरित्रातील लढाई म्हणजे उंबरखिंडची लढाई आहे . मोगली झेंडा हाती घेऊन औरंगजेबाचा मामा शाहिस्ताखान हा पाऊन लाखाची फौज घेऊन दक्षिणेकडे निघाला होता. २८ जाने .१६६० ला तो औरंगाबादला पोहचला होता. अहमदनगर मार्गे तो ९ मे १६६० ला लाल महाल पुणे येथे आला .हडपसर , सासवड , चाकण आदि भागातील सर्व लहान मोठे वाडे , गढ्या इत्यादि वर त्याने ताबा केला . चाकणचा संग्रामदुर्ग घेण्यास मात्र त्याला ५६ दिवस लागले . हजारो मोगल विरुध्द  पाच सहा शेकडयात असलेले फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वात मराठे प्राणाची बाजी लावून लढले होते . शाहिस्ता तीन वर्ष स्वराज्यात ठान मांडून होता . याच काळात मोगली सरदार कारतलब खानाने परांडयाची म्हणजे प्रचंडपूरची विजयी मोहिम पूर्ण केली होती . या मोहिमेने शाहिस्ताखान त्याच्यावर खुष होता म्हणून त्याने सहयाद्री जिंकला म्हणजे शिवाजी राजाचे स्वराज्य कमकुवत होईल या उददेशाने सह्याद्री उतरुन कोकण जिंकावा या हेतूने कारतलब खानास कल्याण,भिवंडी , चौल, पनवेल, नागोठाणा घेण्यासाठी मोहिम सोपविली . देशावरून कोकणात उतरण्यास अनेक घाट वाटा आहेत . कारतलब खान भोर घाटातून कोकणात उतरेल असा अंदाज होता त्यावेळी महाराज राजगडी होते . शत्रूने मात्र पवन मावळातून तिकोना , तुंग , लोहगड , विसापूर ह्या सरक्षक दुर्गाच्या मधून 30 हजाराचे सैन्य घेऊन कुच केले वरील गडावरुन प्रतिकार होत नाही हे पाहून त्याचा आत्मविश्वास तर अजूनच वाढला होता या पवना खोऱ्यातून कुरवंडे गावातून हा घाट उतररुन उंबरखिंडीतील घनदाट जंगल पार करत लोणावळा परिसरातीत अंबेनळीच्या मार्गाने जावे लागते .

        हिंदवी परिवाराच्या मदतीने हा १५ ते १८ कि . मी चा उंबरखिंड पर्यन्तचा ट्रेक पूर्ण करता आला ज्या वाटेने हे सैन्य उतरले तो मार्ग आजही घनदाट अरण्य व जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेला आहे . लोणावळयातून कुरवंडे गावात वाहने सोडून ट्रेक सुरु होतो . गावातून उंच टेकडीवर पोहचल्यावर समोर उंच डोंगरी टोक दिसते तोच नागफणी डोंगर आहे एका तासाची चढाई याची आहे . त्याच्या खालीच इंद्रायणी मातेचे उगम स्थान आहे . नागफणी टेकडीवर महादेव मंदिर आहे . पण आम्ही उंबरखिंडीत उतरत असल्याने टेकडीच्या पायथ्याशी डाव्या बाजूच्या पाऊल वाटेने कडे डोंगर कड्यांचा आसरा घेत घटदाट जंगल पार करत दोन तासात एका पठारावर पाहचलो व तेथून पुन्हा घनदाट व जाळी मधून वाट काढत उतरून नदीच्या पात्रात उतरलो व समोर चावणी गाव दिसले . तेथुन पुढे पकक्या वाटेने उंबरखिंडीत पोहचता येते .हा ६ ते ७ तासाचा प्रवास आहे . हाच रस्ता पुढे शेंबडी फाट्यावर जाऊन पाली महामार्गाला मिळतो .

             शिवभारतात परमानंद या लढाईचे वर्णन करतो यात तो म्हणतो की शाहिस्ता खानाने कारतलब खाना सोबत महाबलवान महापराक्रमी कछप व चव्हाण , अमरसिह , मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे , अजिक्य रायबाधिन ( माहूरची जहागिरी यांच्याकडे होती मेहकर पर्यन्त हदद होती ) जसवंत कोकाटे , महाबाहू जाधव असे सेनानायक पाठवत आहे अस म्हणतो . त्याच बरोबर तुर्कताज खान, लोदी खान , गयासुद्दीन खान , हौद खान , राजा प्रद्युघ्न व अनिरुद्ध , सुराजी गायकवाड, दिनकर काकडे , कमळाजी गाढे असे बलाढय सरदार स्वराज्यावर चालून आलेत . पुण्यात लाखा भराचं सैन्य दाखल आहे आणि हे तीस हजाराचे सशस्त्र सैन्य अनेक मातब्बर सरदार  घेऊन कोकणावर जात आहे . मराठ्यांच सैन्य केवळ हजार दोन हजाराचं होत .शिवभारतात परमानंद शत्रू सैन्याचं वर्णन करतांना कळते की या लढाईत मावळयांचा पराक्रम किती मोठा आहे . कुरवंडे गाव ओलांडतांना त्यांना अडविले नाही जेव्हा शत्रु सैन्य दरीत घनदाट जंगलात उतरले तेव्हा गनिमी काव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला . या नियोजनात बर्हिजी नाईकांचा मोठा वाटा होता . प्रत्यक्ष आम्ही ज्या वेळेस उंबर खिंडीत उतरलो त्यावेळेस दोन्ही बाजूनी उंच टेकड्या व घनदाट जंगल यामधून अचानक सपा- सप बाणांचा वर्षाव झाल्याने शत्रु हतबल झाला असावा याची प्रचीती येते  . फेब्रुवारी असल्याने महाराजांच्या सैन्याने पानवठ्यावर अगोदरच कब्जा केला होता . नेताजी पालकरासह स्वतः शिवाजी महाराज या लढाईत उतरले होते . सपूर्ण चिलखती पोषाख व डोक्यावर शिरस्त्रान घालून हातात भाला कमरेस तलवार पाठीवर ढाल अन धनुष्य बाणासह शत्रुच्या वधासाठी घोड्यावर आरूढ होऊन महाराज स्वतः लढत आहे .

         सावित्रीई रायबाघिणीने कारतलबास म्हणाली शिवाजी रूपी सिंहाच्या आश्रयाखाली असणाऱ्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे वाईट काम केले . आजपर्यन्त दिल्ली पातशहाचे यश या अरण्यात बुडविले . दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापतीने ( शाहिस्ताखान)शत्रुच्या प्रतापरूपी अग्नी मध्ये तुला सैन्यासह टाकले . कारतलबाने रामबाघिणचा सल्ला ऐकला . या अरण्यात आंधळया सारखे सैरावैर झालेले शत्रू शरण आले . कारतलब खान व त्याचे शूर महाबाहु म्हणविणाऱ्या सरदारांनी महाराजास खंडणी पाठवून स्वतः स मुक्त करून घेतले . कुणी ढाल देऊन मुक्त झाले तर कुणी तलवार , घोडा व जवळील असेल नसेल ते देवून पळाले . स्वराज्यातील हा मोठा विजय होता या वेळी युद्ध सामुग्री सह अनेक मौल्यवान वस्तु देखील मिळाल्या .२ फेब्रु १६६१ ला उंबरखिंडीतल्या समरभूमीवर हा रणसंग्राम घडला .

             आज या समरभूमीच्या खिंडीत नदीच्या पात्रात विजयस्तंभ उभारला आहे . कुठलेही स्वराज्याचे नुकसान न होऊ देता हजार पटीतील सैन्य हतबल करून शरण आणले व स्वराज्य अधिक मजबूत झाले . हा संदेश येथे मिळतो . या स्मारकावर ढाल , तलवार, धनुष्य, भाला, भगवाध्वज सर्वोच्च असून महाराजांचे शिवभारतातील वर्णनाप्रमाणे शिल्प कोरले असून इतर बाजूस लढाईचा सक्षिप्त माहीती सह व आज्ञापत्र कोरले आहे . या खिंडीत कुरवंडे गावातून उतरतांना स्थानिक जाणकार व तज्ञा सोबतच समूहाने उतरावे .चार चाकी गाडीने शेंबडी फाटयावरुन जाणे सुरक्षित आहे .




संजय खांडवे

मंगळवार, ११ मार्च, २०२५

पवन मावळातील मावळा - किल्ले तिकोना

 पवन मावळातील मावळा - किल्ले तिकोना



स्थान : ता . मावळ जि पुणे , उंची १०९१मी ., पुणे वरून ६० कि.मी., मुंबई वरून १२०कि.मी.



अर्कज्ञ शहाजीराजे यांनी राजमाता जिजाऊ व बाल शिवबा व विश्वासु सरदार व अमात्यासह भगवा ध्वज व राजमुद्रा देऊन स्वराज्य स्थापनेसाठी पुणे प्रांतात पाठविले . राजमातांच्या मार्गदर्शनात सनय असलेल्या शिवरायांनी पुणे परिसरातील १२ मावळ प्रांतावर आपले लक्ष केंद्रित केले होते . त्या काळात मावळ म्हणजे ही नदीच्या खोऱ्यात वसलेली अनेक गावांची मिळून असलेली जनू एक प्रशासकिय विभागाच असायची .आंदर मावळ,कानद खोरे ,'कोरबारसे मावळ ,गुंजन मावळ,नाणे मावळ ,पौड खोरे,मुठा खोरे ,मोसे खोरे ,रोहिड खोरे ,वळवंड खोरे,हिरडस मावळ या सोबतच पवन मावळ हा भाग होता . पवना नदीच्या खोऱ्यात असलेला हा प्रांत असल्याने याला पवन मावळ म्हणत . या भागात असलेल्या कारले , भाजे , बेडसे ,भंडारवाडी,शेलारा या प्राचीन लेण्यावरून प्राचीन इतिहासात या भागाला खूप महत्व होते . हिनयान बौद्ध लेण्या असल्यामुळे कालखंडही लक्षात येतो . या परिसरातील हा व्यापारी मार्गही होता . त्याच्या रक्षणार्थ लोहगड,विसापूर , तुंग व तिकोना म्हणजे वितंडगड या सारखी मजबूत किल्ले अजूनही धिप्पाड छाती समोर करून उभी असलेली दिसून येतात .लोहगड , तिकोना व उंच निमुळता होत गेलेल्या तुंग किल्ल्याच्या मधून पवना नदी जाते आता या नदीवर मोठे धरण असल्याने त्या ठिकाणचा जलाशय आता अधिक मनमोहक वाटतो . पुणे - मुंबई जवळ असल्याने अनेक पर्यटक या भागात भेट देतात . पुण्याहून मुंबईकडे जातांना लोणावळ्याच्या अलीकडेच डाव्या बाजूला लोहगड व विसापूरच्या किल्ल्याचे दर्शन होते . तिकोना व तुंग अगदी जवळ असला तरी दोन्ही किल्ल्या पलिकडे असल्याने या महामार्गारुन     दिसत नाही .

         बहामणी नंतर निजामशाहीत मलिक अहमद निजामशहा असतांना त्याने या भागातील इतर किल्ल्यासह तिकोना देखील निजामशाहीत घेतला होता . काही काळ आदिलशाही व पुढे १६५७ मध्ये महाराजांनी हा स्वराज्यात घेतला . तेव्हा पासून पवन मावळातील हा मावळा स्वराज्य रक्षणासाठी ताठपणे उभा राहीला . पुरंदरच्या तहात स्वराज्य रक्षणार्थ हा मावळा मुघलांकडेही एक प्रकारे ओलीस राहिला होता. पण पुढे महाराजांनी पुन्हा स्वराज्यात घेतले . या किल्ल्यावर तिकोना वाडीमधून जाण्यासाठी पाऊलवाट आहे . या वाडीपर्यन्त सर्व प्रकारची वाहने पोहचतात व वाहनतळ देखील आहे . दाट जंगाला मधून पाऊल वाट सुरू होते व हळूहळू चढाई वाढत जाते . खडकाच्या खाच खळग्या मधून नागमोडी वळणे घेत जाणारी पाऊलवाट माथ्यावरील एका टेकडीवर घेऊन जाते . पलीकडच्या भागातील घनदाट जंगल नजरेस पडते . उजव्या हाताला वळन घेत गडाचा दिशेने पुन्हा चढाईची वाट सुरु होते दोन्ही बाजूचा परिसर न्हाहळता  येतो . यावरून या किल्ल्याचे महत्व समजते . वळण घेत पुढे गेल्यावर कृत्रीम पध्दतीने एका टेकडीस फोडून मधून मार्ग काढलेला दिसतो पूर्वी येथे मेटे म्हणजे चौकी असावी असे दिसते . समोरच आपल्याला काताळात कोरलेला पहीला दरवाजा दिसतो . साधरणतः ७ फुट उंच असलेल्या दरवाज्यातून आत जाताच डाव्या बाजूला अगदी दरवाज्या वरील छतासह अखंड पाषाणात कोरलेली मोठी देवडी आहे . येथून पायऱ्याने थोड चालत गेलो की आपण दोन बुरुजामधे असलेल्या वेताळ दरवाज्यात येतो आता मात्र हे बुरुज अर्धवट आहे आजू बाजूला इमारतीचे अवशेष दिसून येतात . पुढे याच वाटेने गेल्यावर डाव्या बाजूला गडाची सरक्षक देवता असलेली संपूर्ण पाषाणातून साकारलेली मोठी  चपेटदान मारोतीची मूर्ती आहे.हे सर्व वैभव पाहून पाय आपोआपोच बालेकिल्ल्याकडे खेचले जातात सवय नसलेल्यांना मात्र दमछाक होते . पुढे काही वाड्याचे अवशेष लागतात . त्याच्या समोरच काताळात कोरलेल्या अनेक गुफा आहे त्या समोर मोठे पाण्याचे टाके असून खाली उतरण्यास पायऱ्या आहे पाषाणात तळजाई देवीच्या मंदिरात नक्षीकामसुध्दा दिसून येते. येथून उजव्या बाजूस एक वाट जाते ही महादरवाज्या कडे जाते पूर्वी या मार्गाचा वापर होत असे .दोन बुरुजात कमानीचा दरवाजा असून तटबंदी व काही इमारतीचे अवशेष आहे . एका चोर वाटेने खाली गेल्यावर काही पाण्याचे खांब टाकी आहे . येथून पुन्हा परत यावे लागते व चुन्याच्या घाण्या पासून पुढे पायऱ्या दिसतात याची चढाई मोठी आहे येथून एका बुरुजात असलेल्या दरवाज्यातून वर जातो उजव्या हाताला काताळात कोरलेले मोठे जीवंत पाण्याचे टाके व त्यावर गुफा आहे . या ठिकाणी अर्ध गोलाकार बुरूज असून तो टेहाळणी साठी असे पुढे ८५अंशात असलेला पायरी मार्ग आहे सुरक्षेसाठी दोन्ही बाजुला लोखंडी जाड दोरखंड जोडला आहे समोरच पुन्हा एक दरवाजा  लागतो हा दरवाजा चांगल्या स्थितीत आहे . वर आल्यावर मोठा बुरुज आहे व बरीच मोकळी जागा असून या बुरजाला सुरक्षा व टेहाळणी साठी खिडक्या व चऱ्या आहेत . बाजूलाच एक पाऊलवाट काताळातील पाण्याची टाके समूह व गुफा असलेल्या भागात घेऊन जाते. या ठीकाणी काळजी घ्यावी लागते . पुन्हा परत येवून डाव्या बाजूला एका दगडाच्या वाटेने बालेकिल्यावरील वितंडेश्वर महादेव मंदिरा समोर पोहचतो येथेही वर येतांना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूस खोल दरी आहे . या मंदिराच्या खालीच अनेक खांब असलेले मोठे पाण्याचे टाके आहे . पाठीमागे इमारतीचे अवशेष असून तीन टोकास तीन बुरुज आहे त्यापैकी एका बुरुजावर आता ध्वज लावला आहे या बुरुजावरून गडाच्या सर्वात उंच भागावर पोहचता येते येथे आयाताकार इमारतीचे अवशेष बघायला मिळतात . खालच्या बुरुजावर प्रचंड मोठे पाण्याचे टाके आहे . खालून हा किल्ला लहान जरी वाटत असला तरी याचा व्याप खूप मोठा आहे . पाण्याची जागो जागी व्यवस्था व बालेकिल्ल्यावरील सदैव उपलब्ध असलेले पाणी हे तिकोण्याचे विशेषच आहे. येथून पवना जलाशयाचे व मावळ प्रांताचे सुंदर दृष्य बघायला मिळते .या गडाच्या पोटात अनेक गुफा व पाण्याचे टाकी आहेत पण दाट जंगली भाग असल्याने काळजी घ्यावीच लागते . जंगली प्राणी देखील या जंगलात आहेत त्याबाबतही सतर्क असावे उंच ठिकाणावर फोटो - सेल्फी आदिच्या बाबतीत काळजी घ्यावी . गडावर जातांना पुरेसे पाणी देखील सोबत असावे . प्लास्टीकादि कचरा आजीबात करु नये दिसल्यास गडावरुन खाली घेवून यावा .



संजय खांडवे

रविवार, २ मार्च, २०२५

तळागड - दुर्गेश्वराचा पहारेकरी

 

तळागड - दुर्गेश्वराचा पहारेकरी


ता. तळा जि. रायगड

पुणे वरून ताम्हणी घाट मार्गे १३० कि.मी , मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर पासून पश्चिमेस १६ कि.मी. ,उंची १००० फुट


प्राचीन काळापासून किल्ला हा सामान्य रयतेसाठी फार मोठा आधार असायचा स्वराज्यात तर रयतेचे आश्रयस्थान म्हणून किल्याची मुख्य भूमिका असायची . आप आपल्या कालखंडात राजे - महाराजे राज्याच्या सुरक्षतेसाठी मिलट्री बेस कॅम्प सारखे या किल्ल्याना महत्व देत असत . किल्ल्याचा एक बुरुज एक  शताग्नी म्हणून काम करायचा म्हणजे १०० शत्रू सैन्याशी एकाच वेळी लढण्याची त्या एका बुरुजाची क्षमता असायची . मग किल्ल्याला जेवढे मजबुत बुरुज व तटबंदी तेवढेच त्याची शत्रुशी लढण्याची शक्ती मोठी असायची . गडावरील पाणी व्यवस्थापण ,धान्यसाठवण व दारूगोळाशस्त्रागारादि बाबी अधिक बळकट बनविण्याचे काम करायचे .

शिव भारतात एक श्लोक आहे .


न दुर्ग दुर्गमित्येव दुर्गम मन्यते जनाः ।

तस्य दुर्गमता सर्व यत्प्रभुस्तस्य दुर्गमः॥

प्रभुणां दुर्गमं दुर्ग प्रभू दुर्गेण दुर्गमः ।

अदुर्गमत्वा दुभयोर्विदवीपेन दुर्गमः॥


गड केवळ अवघड आहे म्हणून लोक त्याला दुर्गम मानत नाही . दुर्गाचा स्वामी दुर्गम असणे ही गडाची खरी दुर्गमता आहे . किल्ल्या मुळे राजा जिंकण्यास कठिण होतो व राजामुळे किल्ले अजिंक्य होतात . किल्ला आणि राजा याचा सहसंमंध परमानंद येथे विषद करतो . रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रातही गड किल्याचे निकष सांगितले आहे. 

          कोकणात असलेला तळागड हा दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा एक अभेदय पहारेकरी सारखा उभा आहे . इंदापूर पासून १६ कि मी असलेला हा किल्ला पुरंदरच्या तहात  महाराजांनी १२ किल्ले जवळ ठेवतांना तळागड देखील स्वराज्यात ठेवला होता .मिर्झा राजे जयसिंगाच्या तपशिला प्रमाणे रायगडा सोबत इतर ११ किल्ल्यामधे तळागड होता . हा किल्ला चढाईस फारसा वेळ लागत नाही . तळे हे गाव या किल्ल्याच्या भोवती वसलेले आहे. या गावात अन परिसरात छोटी मोठी तळे आहेत ह्या तळ्यांचा अन गावाच्या नावाचा संमंध असावा . गावातूच अगदी मुख्य रस्त्यावरून गडाचे दर्शन होते .  दोन्ही टोकाकडे निमुळता होत गेलेला लांब जहाजा सारखा हा किल्ला दिसतो . त्याच्या दिशेने गावातील सिमेन्ट रस्ता आपल्याला गडाच्या अगदी पायथ्याशी घेऊन जातो . गावातील गावदेव  म्हसोबा देवता या ठिकाणी विराजमान आहे . येथून वळणा - वळणाचा रस्ता वरच्या दिशेने घेऊन जातो लाकडी चाकावर बसविलेली तोफ असलेल्या एका सपाट उंचवटयावर जातो . तटबंदीचे वलय येथूनच दिसायला सुरु होतात . कमीत कमी जागेत अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी तटबंदी वर दुहेरी तटबंदी बांधलेली दिसते . पुन्हा थोडे वर दगडी पायऱ्या ने चढत गेल्यावर एक पडझड झालेला प्रवेशद्वारा सारखा भाग दिसतो . याठीकाणी देखील एक तोफ बघायला मिळते . थोड़े पुढे चालत गेले की एक व्यक्ती चालत जाईल येवढ्या जागेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याच्या अगदी खाली एक मार्ग दिसतो पण तो आता बंद आहे . त्या ठिकाणी एक चौकी सारखी गोलाकार दगडी इमारत होती आता केवळ चौथरा आहे . समोरच काताळाच्या उतारावर भुयारा सारखी . कोरलेली पाण्याची  खांब टाके दिसून येतात . त्या वरच्या वाटेत उजव्या बाजूस काताळावर वीर हनुमानाची मुर्ती कोरली आहे बाजूलाच आनखी एक भुयारात कोरलेले पाण्याचे टाके आहे . या ठिकाणी हनुमान दरवाज्याचे अवशेष दिसून येतात .या दरवाज्यावर असलेले क्षरभशिल्प हनुमान मुर्ती जवळ ठेवलेले आहे . समोर चालत जातांना डाव्या बाजूला पाया मजबूत असलेली तटबंदी आहे व पुढील मोकळ्या जागेत तीन तोफा आहेत . वळण घेत पुढे वर चालत जातांना दगडी पायऱ्या आहेत डाव्या हाताला मजबुत तटबंदी आहे. वाटेत डाव्या बाजूस तटबंदीला अर्धवर्तुळाकार बुरुज आहे या ठिकाणी आता एक तोफ ठेवलेली आहे . आता आपण अगदी गडाच्या पठारावर पोहचतो या ठिकाणी देखील एक दरवाजा पूर्वी काळी होता चार स्तरावर तोफा अन चौकीची योजना या वाटेने तिहेरी तटबंदीच्या स्थापत्यात दिसून येते . गडाच्या या पठारावर फारशी मोकळी जागा नाही अनेक इमारतीचे अवशेष दिसून येतात पण किल्याच्या काताळावर तंतोतंत बांधलेली मजबूत तटबंदी अगदी आजही त्याच अवस्थेत आहे . गडाच्या पूर्वेस उजव्या बाजूला ध्वजस्तंभ दिसतो व या ठिकाणी वाडया सारखी इमारत असून त्यावर टेहाळणी बुरुज आहे . बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत . या इमारती मधील जंग्या व खिडक्या मधून सर्वदूर नजर ठेवून मारा करता येतो . निमुळत्या जहाजासारख्या असणाऱ्या अगदी मध्यभागावर पाण्याची तीन टाकी कोरलेली आहे यावरून या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी समोरच एक उध्वस्त वास्तु आहे तिला लक्ष्मी कोठी म्हणतात . बाजूलाच तरबंदी मध्ये शौचकुप आहे . त्याच्या समोर पुन्हा पाण्याची सात टाके कोरलेली आहेत . पाण्याच्या टाकी समुहा समोर छत नसलेले शिवमंदिर आहे गाभाऱ्यात शिवलिंग आकाराचे काताळात कोरले आहे आता त्या ठिकाणी नवीन शिवलिंग आहे . पुढं हा किल्ला अधिक निमुळता होत जातो व मजबुत अशी तटबंदी दिसून येते . समोरच अगदी टोकावर एक बुरुज आहे . वर चढण्यास काही पायऱ्या आहेत बुरुजाची स्थिती चांगली असून चऱ्या व जंग्या दिसून येतात हे या गडाचे अगदी शेवटचे टकमक टोकासारखे टोक आहे . या गडाला चढण्यास पाऊण तास व फेर फटका मारण्यास अर्धा - पाऊण तास लागतो .

         या गडावरून उत्तरेकडे घोसळगड दिसतो . पूर्वेस सावित्री नदीचे पात्र आहे पश्चिमेस समुद्र खाडी आहे. जवळच कुडे -मांदाडच्या बौध्द लेण्या असून आता त्या ठिकाणी विकासकामे सुरु असल्याची दिसतात . रायगड,हरिहरेश्वर , काशीद बीच , मुरुड जंजीरा , दिघी बंदर ही पर्यटन स्थळे या गडापासून जवळच आहे . प्राचीन सागरी व्यापारी मार्गावर तळागडचे विशेष महत्व तर होतेच पण स्वराज्यात हा किल्ला रायगडाचा पहारेकरी म्हणून होता . १६४८ च्या काळात हा स्वराज्यात आला होता . अफजली संकट काळात सिद्धीनं या किल्ल्यास वेढा दिला होता पण त्याला घेता आला नाही . महाराजांच्या महानिर्वाणानंतर मात्र सिद्दीनं हा किल्ला ताब्यात घेतला होता .



संजय खांडवे

पुणे वरून ताम्हणी घाट मार्गे १३० कि.मी , मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर पासून पश्चिमेस १६ कि.मी. ,उंची १००० फुट


प्राचीन काळापासून किल्ला हा सामान्य रयतेसाठी फार मोठा आधार असायचा स्वराज्यात तर रयतेचे आश्रयस्थान म्हणून किल्याची मुख्य भूमिका असायची . आप आपल्या कालखंडात राजे - महाराजे राज्याच्या सुरक्षतेसाठी मिलट्री बेस कॅम्प सारखे या किल्ल्याना महत्व देत असत . किल्ल्याचा एक बुरुज एक  शताग्नी म्हणून काम करायचा म्हणजे १०० शत्रू सैन्याशी एकाच वेळी लढण्याची त्या एका बुरुजाची क्षमता असायची . मग किल्ल्याला जेवढे मजबुत बुरुज व तटबंदी तेवढेच त्याची शत्रुशी लढण्याची शक्ती मोठी असायची . गडावरील पाणी व्यवस्थापण ,धान्यसाठवण व दारूगोळाशस्त्रागारादि बाबी अधिक बळकट बनविण्याचे काम करायचे .

शिव भारतात एक श्लोक आहे .


न दुर्ग दुर्गमित्येव दुर्गम मन्यते जनाः ।

तस्य दुर्गमता सर्व यत्प्रभुस्तस्य दुर्गमः॥

प्रभुणां दुर्गमं दुर्ग प्रभू दुर्गेण दुर्गमः ।

अदुर्गमत्वा दुभयोर्विदवीपेन दुर्गमः॥


गड केवळ अवघड आहे म्हणून लोक त्याला दुर्गम मानत नाही . दुर्गाचा स्वामी दुर्गम असणे ही गडाची खरी दुर्गमता आहे . किल्ल्या मुळे राजा जिंकण्यास कठिण होतो व राजामुळे किल्ले अजिंक्य होतात . किल्ला आणि राजा याचा सहसंमंध परमानंद येथे विषद करतो . रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रातही गड किल्याचे निकष सांगितले आहे. 

          कोकणात असलेला तळागड हा दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा एक अभेदय पहारेकरी सारखा उभा आहे . इंदापूर पासून १६ कि मी असलेला हा किल्ला पुरंदरच्या तहात  महाराजांनी १२ किल्ले जवळ ठेवतांना तळागड देखील स्वराज्यात ठेवला होता .मिर्झा राजे जयसिंगाच्या तपशिला प्रमाणे रायगडा सोबत इतर ११ किल्ल्यामधे तळागड होता . हा किल्ला चढाईस फारसा वेळ लागत नाही . तळे हे गाव या किल्ल्याच्या भोवती वसलेले आहे. या गावात अन परिसरात छोटी मोठी तळे आहेत ह्या तळ्यांचा अन गावाच्या नावाचा संमंध असावा . गावातूच अगदी मुख्य रस्त्यावरून गडाचे दर्शन होते .  दोन्ही टोकाकडे निमुळता होत गेलेला लांब जहाजा सारखा हा किल्ला दिसतो . त्याच्या दिशेने गावातील सिमेन्ट रस्ता आपल्याला गडाच्या अगदी पायथ्याशी घेऊन जातो . गावातील गावदेव  म्हसोबा देवता या ठिकाणी विराजमान आहे . येथून वळणा - वळणाचा रस्ता वरच्या दिशेने घेऊन जातो लाकडी चाकावर बसविलेली तोफ असलेल्या एका सपाट उंचवटयावर जातो . तटबंदीचे वलय येथूनच दिसायला सुरु होतात . कमीत कमी जागेत अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी तटबंदी वर दुहेरी तटबंदी बांधलेली दिसते . पुन्हा थोडे वर दगडी पायऱ्या ने चढत गेल्यावर एक पडझड झालेला प्रवेशद्वारा सारखा भाग दिसतो . याठीकाणी देखील एक तोफ बघायला मिळते . थोड़े पुढे चालत गेले की एक व्यक्ती चालत जाईल येवढ्या जागेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याच्या अगदी खाली एक मार्ग दिसतो पण तो आता बंद आहे . त्या ठिकाणी एक चौकी सारखी गोलाकार दगडी इमारत होती आता केवळ चौथरा आहे . समोरच काताळाच्या उतारावर भुयारा सारखी . कोरलेली पाण्याची  खांब टाके दिसून येतात . त्या वरच्या वाटेत उजव्या बाजूस काताळावर वीर हनुमानाची मुर्ती कोरली आहे बाजूलाच आनखी एक भुयारात कोरलेले पाण्याचे टाके आहे . या ठिकाणी हनुमान दरवाज्याचे अवशेष दिसून येतात .या दरवाज्यावर असलेले क्षरभशिल्प हनुमान मुर्ती जवळ ठेवलेले आहे . समोर चालत जातांना डाव्या बाजूला पाया मजबूत असलेली तटबंदी आहे व पुढील मोकळ्या जागेत तीन तोफा आहेत . वळण घेत पुढे वर चालत जातांना दगडी पायऱ्या आहेत डाव्या हाताला मजबुत तटबंदी आहे. वाटेत डाव्या बाजूस तटबंदीला अर्धवर्तुळाकार बुरुज आहे या ठिकाणी आता एक तोफ ठेवलेली आहे . आता आपण अगदी गडाच्या पठारावर पोहचतो या ठिकाणी देखील एक दरवाजा पूर्वी काळी होता चार स्तरावर तोफा अन चौकीची योजना या वाटेने तिहेरी तटबंदीच्या स्थापत्यात दिसून येते . गडाच्या या पठारावर फारशी मोकळी जागा नाही अनेक इमारतीचे अवशेष दिसून येतात पण किल्याच्या काताळावर तंतोतंत बांधलेली मजबूत तटबंदी अगदी आजही त्याच अवस्थेत आहे . गडाच्या पूर्वेस उजव्या बाजूला ध्वजस्तंभ दिसतो व या ठिकाणी वाडया सारखी इमारत असून त्यावर टेहाळणी बुरुज आहे . बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत . या इमारती मधील जंग्या व खिडक्या मधून सर्वदूर नजर ठेवून मारा करता येतो . निमुळत्या जहाजासारख्या असणाऱ्या अगदी मध्यभागावर पाण्याची तीन टाकी कोरलेली आहे यावरून या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी समोरच एक उध्वस्त वास्तु आहे तिला लक्ष्मी कोठी म्हणतात . बाजूलाच तरबंदी मध्ये शौचकुप आहे . त्याच्या समोर पुन्हा पाण्याची सात टाके कोरलेली आहेत . पाण्याच्या टाकी समुहा समोर छत नसलेले शिवमंदिर आहे गाभाऱ्यात शिवलिंग आकाराचे काताळात कोरले आहे आता त्या ठिकाणी नवीन शिवलिंग आहे . पुढं हा किल्ला अधिक निमुळता होत जातो व मजबुत अशी तटबंदी दिसून येते . समोरच अगदी टोकावर एक बुरुज आहे . वर चढण्यास काही पायऱ्या आहेत बुरुजाची स्थिती चांगली असून चऱ्या व जंग्या दिसून येतात हे या गडाचे अगदी शेवटचे टकमक टोकासारखे टोक आहे . या गडाला चढण्यास पाऊण तास व फेर फटका मारण्यास अर्धा - पाऊण तास लागतो .

         या गडावरून उत्तरेकडे घोसळगड दिसतो . पूर्वेस सावित्री नदीचे पात्र आहे पश्चिमेस समुद्र खाडी आहे. जवळच कुडे -मांदाडच्या बौध्द लेण्या असून आता त्या ठिकाणी विकासकामे सुरु असल्याची दिसतात . रायगड,हरिहरेश्वर , काशीद बीच , मुरुड जंजीरा , दिघी बंदर ही पर्यटन स्थळे या गडापासून जवळच आहे . प्राचीन सागरी व्यापारी मार्गावर तळागडचे विशेष महत्व तर होतेच पण स्वराज्यात हा किल्ला रायगडाचा पहारेकरी म्हणून होता . १६४८ च्या काळात हा स्वराज्यात आला होता . अफजली संकट काळात सिद्धीनं या किल्ल्यास वेढा दिला होता पण त्याला घेता आला नाही . महाराजांच्या महानिर्वाणानंतर मात्र सिद्दीनं हा किल्ला ताब्यात घेतला होता .



संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...