बुधवार, २४ जून, २०२०

जालना स्वारी नंतर महाराजांनी या गडावर केले होते दिर्घकाळ वास्तव्य

पट्टगड /विश्रामगड



नाशिक -नगर सिमेलगत नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात .

 खिरवडी मार्गे गेल्यास अगदी पट्टया प्रमाणे पसरलेला हा दुर्ग नजरेस पडतो म्हणून याला पट्टागड असे जुने नाव आहे .गडाच्या अगदी पायथ्यापर्यन्त गाडी जाते व गडावर चढाई करतांना आत्ता कृत्रीम रस्ता तयार केला गेला आहे .त्र्यंबक दरवाज्याच्या बाजूने वनविभागाने एक कमान उभी केली आहे त्या ठिकाणी नाममात्र शुल्क आकारून नाव नोंदणी केली जाते .या ठिकाणी गडावर सापडलेल्या काही प्राचीन वस्तु जतन करून ठेवलेल्या दिसतात (तलवार,नाणी,दागिणे,खडे,आदि ) गडाची चढाई करतांना गडाची नकाशासह माहिती दर्शविणारे फलक लावलेले आहेत .भककम नैर्सगिक तटबंदी सोडता ज्या ठिकाणी गरज आहे अश्या ठिकाणी मजबुत तटबंदीचे अवशेष आढळतात .वाटेत या गडावर असंख्य गुहा कोरलेल्या अाहे,त्यात पाण्याचे टाके सुद्धा आहेत तसा ह्या गडाचे बांधकाम शेकडो वर्षापूर्वीचे {१२व्या -१३ व्या शतकातील}असावे असे दिसते .अलीकडच्या काळात ग्रामस्थानी पट्टादेवीचे मंदिर बाधलेले वाटेत दिसते गडावर पोहचताच अंबरखाना नजरेस पडतो याला राणीमहलही म्हणतात . एवढी एक इमारत गडावर बऱ्यापैकी दिसते यात आता आतमध्ये शिवचरित्रावरील असंख्य प्रसंग शिल्पामध्ये साकारलेले दिसतात .बाहेर शिवरायांचे सुंदर स्मारक आहे .बघताचक्षणी प्रत्येकजन नतमस्तक होतो येतांना वाटेत त्र्यंबक दरवाजाही लागतो .अंबरखान्याच्या मागच्या बाजूस उंचावर बालेकिल्ला असावा असे अवशेष् आहे .या किल्ल्याची उंची १३९२ मीटर आहे .

अंबरखाण्याच्या मागच्या बाजूने चालत गेले की दगडात कोरलेली पाण्याची भव्य टाकी दिसते हे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते








‌समोर पठारावरून सोनटेकडीकडे जातांना पाण्याचे १२ टाके दिसतात शुद्ध पाण्याने भरलेले हे टाके आहेत यापैकी काही टाके लिक  असल्याने त्यात पाणी दिसत नाही .या टाक्यातील निघालेल्या दगडापासून गडाचे बांधकाम होत असे .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C अाकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे .




                     हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी राजगडावरील काही दिवस सोडले तर इतर दिवस त्यांची रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड सुरु होती त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते ,शिवरायांनी जालना शहरावर स्वारी केली व यास्वारीनंतर रायगडाकडे परतत असतांना रनमस्तखान त्यांचा पाठलाग करत आला होता.सोबत बर्हिजी नाईक होते त्यांना या भागाची बरीच माहीती होती.रनमस्तखानाला चुकवत ते महाराजांना सुरक्षीत पट्टगडावर घेऊन आले .महाराजांनी १७ दिवस या किल्ल्यावर आराम केला .जातांनी या किल्ल्याला विश्रामगड असे नाव दिले .शिवरायांच्या वास्तव्याने अन पदस्पर्शने पावन झालेला हा गड भ्रंमंती करत असतांना प्रत्येक शिवप्रेमीना या गडाचा काना अन कोपरा एक प्रेरणा देवून जातो .
     पेशव्यानी सुध्दा या गडाचा उपयोग थंड हवेचे ठिकाण म्हणून केला.अश्या या किल्ल्यास एकदा तरी भेट दयावी .





      संजय खांडवे
      9011971122

‌       


शुक्रवार, ५ जून, २०२०

शिवराज्यभिषेक, उत्सव रयतेच्या स्वातंत्र्याचा !


शिवराज्यभिषेक ,उत्सव रयतेच्या स्वातंत्र्याचा !*
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिवजन्मापुर्वी सुमारे ४०० वर्षापासून आपल्या भारतीय भूमीवर परकीयांच्या आक्रमणानी कहर केला होता.त्रस्त रयत जुलमी शासकांच्या अाघाताने मेटाकुटीस आली होती .एखादया अनामिक आशेवर ही रयत कसतरी जगत होती .या काळात महाराष्ट्रात संत परंपरा आपली भागवती पताका डोक्यावर घेऊन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार करुन त्यांच्यात नैतिक बळ देण्याचं काम करत होते . संत नामदेव -ज्ञानदेव -चोखोबा -गोरोबा -सावता -तुकोबा ही संत श्रृखला आपलं काम करत होती .या काळात समाजात झालेला भेदाभेद ,स्वार्थी प्रवृती परकीयांना पोषक ठरली एके काळी ज्या भारतवर्षातून सोन्याचा धूर निघायचा तिथली रयत भयाने ग्रस्त झालेली,अन्यायात रक्ताळलेली, मायमाऊलीच्या आर्त किंकाळीने शेकडो वर्षापासून स्वातंत्र्याची वाट आसवलेल्या डोळ्यानी बघत होती .एक दिवस ती पहाट नककीच उगवेल या भाबडया आशेवर ही रयत जगत होती .
   जदूरायाचे जावाई शहाजीराजे भोसले ,राजे लखुजी जाधव हयानी त्या काळात आपल्या मनात स्वातंत्र्य,स्वाभिमान जागृत ठेवत तशी आस रयतेच्या मनात निर्माण करायला सुरूवात केली होती ,युद्धाचा प्रसंग नसे तेव्हा ही मंडळी रयतेच्या सुख -दुःखात रममान होत असत .जाधवरावांनी सिंदखेडचा कायापालट केला रयतवत्सलतेचे विचार बालपणीच जिजामातेनी अनुभवले. यशापयाशाच्या चर्चां,राजकिय डावपेच,न्यायनिवाडे,लढाईचे नियोजन,प्रशासन ह्या बाबी अगदी जवळून पाहिल्या . वैभवाचा परमोच्च शिखर त्या काळात वऱ्हाड परिसरात वाटू लागला. लखूजीराजे जाधवांनी विजयाच्या प्रेरीका असलेल्या जिजाऊंचा शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह लावून दिला .
शिवरायांच्या समक्ष त्यांनी कवी परमानंद कृत " शिंवभारत " या ग्रंथात या विवाहाचा उल्लेख येतो .शहाजीराजांच्या व जिजाऊंच्याअनेक गुणांचे वर्णन या ग्रंथात आले आहे .


" *जिजू: जागर्ति जगजीतले ।* "
शहाजीराजांच्या पत्नी जिजू या पृथ्वीतलावर जागृत आहे .ही जागृती स्वराज्य प्रेरीकेच्या रूपाने महाबली शहाजी राजे यांच्या संकल्पणेला अधिक बळ देण्याचे काम करत होती .यातूनच स्वाभिमानाने जगायला शिवविणाऱ्या स्वराज्याची पायाभरणी होत होती .संपूर्ण दक्षिणभारतात शहाजीराजेनी दरारा निर्माण केला होता .१६२९ ते १६ ३६ या काळातच शहाजीराजे यांची घोडदौडच सांगते की स्वराज्याचं वेड त्यांनी रयतेला कस लावून दिलय .
*शाह: आहिजहानस्य येदलिस्य च सेनया ।*
*अयुध्यत समास्तिस्त्र सहस्त्रकरविक्रम ॥*
सूर्याला जसे हजारो किरणे असतात तसे हजारो बाहू असलेले शहाजी यांनी शहाजहान व अदिलशहा यांच्यासोबत तीन वर्ष युध्द केले असे  कवी परमानंद लिहतो .

शिवजन्माची शिवनेरीवरील रम्य पहाट याच स्वराज्याच्या स्वातंत्र्य उत्सवाची नांदी होती.शिवशंभूसारखे वंशंवर्धक पुत्र ही माता स्वराज्यासाठी घडवत होती शिवनेरीवर शंभू -जयंतिचा विवाहाने पुढे वाटचाल सुरु झाली .
शिवरायांचे बालपण हे महाराष्ट्रातील धामधुमीच्या काळात शहाजीराजे सह बंगळुरुमध्ये गेले त्या ठिकाणी निष्नात अध्यापकांची व्यवस्था शहाजीराजे यांनी केली .युद्धकला,राजकारण,डावपेच,युद्धतंत्र,प्रशासन आदिसह विविध भाषा व लिपि मध्ये शिवबा पारंगत झाले खुद्द शहाजीराजे हे संस्कृत विषयाचे गाढे पंडीत होते. 


*आख्याति लिखितुं यावदाचार्यो ।*
*तावद द्वितियपेश्ये विलिख्य तमदर्शयेत ॥*
        कवी परमानंद आपल्या ग्रंथात सांगतो शिवरायांना पहीला वर्ण शिकविला तोपर्यत (त्याअगोदरच ) ते दुसरा वर्णही लिहून दांखवत असत येवढी विदवत्ता बालपणीच शिवरायामध्ये होती .
   वयाच्या ११ व्या वर्षी शिवराय' सनय ' झाले म्हणजे एका राजा होण्यासाठी जी पात्रता लागते ते सर्व गुण अवघ्या बालवयात त्यांनी धारण केले . राजा बनन्याची पूर्ण क्षमता असलेले पूर्ण संस्कार उभयतांनी त्यांच्यावर केले .प्रत्यक्ष युद्धतंत्र,राज्यकारभार,प्रजापालन,कृतज्ञता व नैतीकता हे संस्कार घरातच झाले . व पुण्यात वयाच्या १२ व्या वर्षी अमात्य,धनदौलत,सैन्यासह दाखल झाले . शहाजी राजे यांनी दिलेला भगवा ध्वज व स्वराज्याचा अर्थ सांगणारी राजमुद्रा ही ह्याच शिवराज्यभिषेकाची एका रयतेच्या स्वातंत्र्याचीच पहाट होणार असल्याचीच नांदी होती . हा आत्मविश्वास शहाजीराजे आणि जिजाऊ यांना होता .सोन्याचा नांगर चालवून उध्वस्त केलेली शापीत जागा पुण्यभूमी केली . रयतेच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न तरळू लागले .पुण्यात स्वराज्याची' साक्ष देणारा लाल महाल उभा राहीला . भूमी कसणारी हातं अधिक जोमाने कामाला लागली व बळकट झाली व प्रसंगी स्वराज्यासाठी हाती शस्र घेण्यास सज्ज होऊ लागली .मन -मस्तक -मनगट मजबूत होण्याचे काम सुरू झाले . सहयाद्रीच्या साक्षीने बारा बलुत्याना एकवटून गट -तटाचे वाद तंटे मिटवून ,जे आले त्यांच्या सह जे आले नाही त्यांच्याविना या स्वराजकार्यास सुरूवात झाली .शिवरायांनी तोरण्यावर स्वराज्याचे तोरण बांधून हया गिरिदुर्गाच्या साक्षीने भगवा ध्वज फडकू लागला .
  शिवरायांचे धाडस,शौर्य,बुंध्दीचातुर्य या जोरावर अनेक किल्ले स्वराज्यात जोडल्या गेले .हे संपूर्ण राज्य रयतेचे आहे या भावनेने हे स्वराज्य उभे केले विश्वासानं माणसं जवळ आली प्रसंगी प्राण देण्यासही मागे हटली नाही .लाख मेंले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे ही भावना कृतीतून निर्माण झाली .स्वराज्याच्या रक्षणार्थ राजांनी गड किल्ले निर्माण केले . त्या गडाची निमिर्ती कार्य त्यांचे  दिलेली नावे ही सार्वभौमत्व लोककल्याणकारी कार्याचीच साक्ष देतात . १६५६ मध्ये अरजोजी यादवाच्या वास्तुस्थापत्य कलेतून बांधलेला प्रतापगड १६५९ साली आलेले अफजलखानाच स्वराज्यावरील संकट परतावून लांवतो हे शिवरायांचे पुर्वानुमान कौशल्य कीती अगाध होते हे सांगून जाते .गड कोठे व का बांधावा हे तंत्र लक्षात येते .१० नोव्हे १६५९ ला अफजलखान संपतो,जीवाजी महाला,संभाजी कावजी व अन्य मावळ्याच्या पराक्रमाने व शिवरायांच्या युध्दतंत्राने शिवप्रताप घडतो येवढयामोठया विजयाचा कोणताही जल्लोश न करता शिवराय ११ नोव्हे ला लगेच पन्हाळगडाच्या मोहीमेवर निघतात व सातारा मार्गे जात अवध्या १८ दिवसात पन्हाळ्यावर स्वराज्याचा भगवा फडकवितात ही एका श्रेष्ट प्रजाहीतदक्षतेसाठी सदैव झटत असलेल्या छत्रपतीची घोडदौड होती .
शिवराय १८३०६ दिवस जगले त्यांचे बालपणीचे दिवस सोडले तर इतर दिवस केवळ अन केवळ रयतेच्या कल्याणार्थ झटतच राहीले .


  सिध्दी जोहर स्वराज्यावर चालून आला  त्या वेळेस शिवराय मिरजेच्या वेढयावर होते ते तेथून सुरक्षित राजगड,रायगड किंवा प्रतापगडावरही जाऊ शकत होले पण आपण स्वतःपन्हाळ् गडावर जाऊन स्वत्तःला वेढयात अडकवून घेतले सिध्दी स्वराज्यात न घुसता पन्हाळ्याकडे वळला रयतेला होणारा त्रास त्यांनी स्वतः जीव धोक्यात घालून थांबविला .शिवा काशिदांसारखी,विठोजी काटे,शंभूसिह जाधव,बाजीप्रभू देशपांडे ,जवळपास ३०० बांदल देशमुख मंडळी लाखाचा पोशिंदा जगविण्यासाठी कामी आली .
   याच वेळी शाहीस्तेखानाच संकट लाखाचं सैन्य घेऊन चालून येत होत ,फिरंगोजी नरसाळे चाकण धैर्याने राखत होते त्या वेळी राजगडावर राहणाऱ्या  शिवाजी राजांच्या आई  जिजाबाई ह्या हातात तलवार घेऊन सज्ज झाल्या होत्या हे खालिल श्लोकात परमानंद सांगतात .


*जननि शिंवराजस्य सा राजगिरी वर्धनी ।*
*जिजानां गिरीदुर्गनामवने वहिता भवत् ॥*

अशी ही महान माणसे लोकल्याणार्थ सिद्ध झाली होती . शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग अन्याय अत्याचाराविरूध्द लढण्यासाठी स्वाभिमान निर्माण करणारा आहे .पुढे महाराजांनी पुरंदरवरील संकटही मोठया धैर्याने ,चाणक्षतेने व अखंड सावधानता बाळगत परतवून लावले .
या स्वराज्याच्या कामात मुरारबाजी ,तानाजी मालुसरे सह अगणित ज्ञात अज्ञात मावळ्याचे बलिदान दुर्गदुगैश्वर रायगडाची उंची आभाळाच्याही वर टेकवून गेली .
   आई जिजाऊंच्या आज्ञेने शिवरायांनी राज्यभिषेकाची योजना आखली . भोसले कुळवंशीयांचे अथक पारिश्रम ,मावळ्याचे बलीदान यावर उभे राहिलेले राज्य ,६ जून ला क्षत्रियकुलवंत सिहासनाधिश्वर छत्रपती शिवरायांच्या रूपाने एका ऐतिहासिक पर्वास सुरूवात झाली .
३२ मन सोन्याच्या सिहासनावर आरूढ होऊन स्वतंत्र राज्यकारभारास सुरूवात झाली .  स्वंतत्र कालगणना शिवराज्यभिषेक शक सुरू करून शिंवराय शककर्ते झाले .समस्त मानवजातीचा उद्धार होईल अशी दिर्घकालिन धोरण व रचनाकरणार नितीवंत राजा रयतेला मिळाला .स्वतंत्र शद्बकोषाची निर्मिती,शिवराईची निर्मिती,स्वतंत्र शेतसारा धोरण,कृषी,पर्यावरण,जलव्यवस्थापण,न्यायव्यवस्था,व्यापार,आरमार,लष्कर,महसूल आदि लाेककल्याणकारी बाबी ह्या अधिक धोरणात्मक पद्धतीने छत्रपतीच्या आदेशाने अधिक प्रभावी राबविल्या जाणार हा आनद स्वराज्याचा प्रत्येक माणसाच्या मनात होता . प्रशासनात न्याय दंड आदी बाबीमध्ये अधिक सरलता निर्माण करणारा हा सोहळा होता .देशभरातून ,विदेशातून हया सोंहळ्यास हजारो महत्वाच्या व्यक्ती छत्रपतीच्या राज्यभिषेकास हजर होत्या .मराठा साम्राज्याच्या सार्वभौमत्वाचा ,रयतेच्या आनंदोत्सवाचाच हा सोहळा होता .आई जिजाऊंच्या डोळ्यातील एक एक आनंदाश्रु त्याची साक्ष देत होता .रायगडावर राज्यभिषेकापूर्वीची ती रात्र अगदी रोशनाईने दुर्गेश्वरास झळाळून टाकणारी होती .गडावर येणाऱ्या प्रत्येक मावळ्याचं या स्वराज्यासाठी खूप मोठ योगदान होत .हजारो मावळ्याच्या बलीदानाने शेकडो वर्षाची गुलामगिरी मोडीत काढणारा हा सुवर्ण क्षणत हत्ती ,घोडे,पालख्या,नजराने,रोशनाईने अजूनच उजळून आला असेल.
         क्षत्रियकुलवतंस महाराजाधिराज सिहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज या सुवर्णदिनी अभिक्षिक्त राजे म्हणून ३२ मन सोन्याच्या सिहासनावर आरूढ झाले शिवरायांना सार्वभौम राजे म्हणून विश्वात अधिकृत मान्यता मिळाली अदिलशाही,निजामशाही,मोगलशाहीच्या तख्ताला या मराठयाचा इतिहासातील  सुवर्णक्षणाने हादरा दिला .या क्षणानंतर सामाजिक,राजकीय,सांस्कृतीक क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन स्वराज्याची महती सपूर्ण विश्वात पोहचणार होती . याची प्रचिती शिवरायांच्या दक्षिण दिग्वीजय मोहीमेवरुन येते. 
म्हणून ही गोष्ट काही सामान्य राहीली नव्हती शिवराज्याभिषेक एक अलौकीकअजरामर घटना ठरली.
   *माता -मातृभूमी -माणसे* या त्रिसूत्रीवर आधारलेल स्वराज्य अन्याया विरूद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देंत राहते .

जय जिजाऊ
जय शिवराय
                                         *संजय खांडवे*
                                       *बुलढाणा*
                                             *9011971122*


सोमवार, १ जून, २०२०

तुमचा एक श्वास आमच्यासारख्याना नवसंजीवनी देणारा आहे



"आता आमच्या धडावर आमचेंच डोके असेल"
सोळा वर्षापूर्वी हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले अन खऱ्या अर्थाने माझ्या विचार करण्याच्या शैलीत बदल झाला .अन जीवनाकडे चिकित्सक दृष्टीकोनाने बघु लागलो 
         सरांचे "विद्रोही तुकाराम " वाचले व विद्रोहाचा अर्थ समजला,जगतगुरुचे सपूर्ण जीवनचरित्र कळाले व तुकोबाच्या या पुस्तकाने माझ्या वाचनछंदाला बळ मिळाले .
     "बळीवंश" मधून आपली ५००० वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती सरांच्या गाढया अभ्यासातून,आपण कल्पणाही करु शकत नाही येवढी मेहनत ,संस्कृतचे गाढे अभ्यासक ,सर्व प्राचीन ग्रंथाचे अभ्यासपूर्ण विवेचन करुन केलेली मांडणी विचार करायला लागणारी आहे
  "पुस्तक लिहतांना सरांनी वापरलेली सदर्भ सूची ,ग्रंथ याचेच एक पुस्तक बनते हे महत्वाचे "
      जाणण्याची इच्छा ही जीवन अधिक सुदर बनविते हे यातूनच कळाले .
         सरांनी मांडलेले चार्वाक समजून घेतांना सर्व सदर्भ जुळत गेले ,अन चार्वाकापासून वैचारिक प्रवासाला सुरूवात झाली आणि ती बाबासाहेबापर्यन्त मला कळाली 

        आ ह सरामुळे मलाच नाही तर लाखोंना खऱ्या अर्थाने तथागत कळाले " ।सर्वोत्तम भूमीपूत्र गोतमबुद्ध"
या पुस्तकामुळे मला बुध्दविचार कळाले येवढच नाही तर बुद्धसाहित्य जाणण्याची ओढ वाढली.
        आ ह सर मला असे एकमेव विचारवंत आहे असे वाटते की त्यांनी विचारांची चिकित्सा तर केली त्यावर लिखान केलेच पण त्या चिकित्सेची चिकित्साही केली व त्याचे लिखान सर्वापुढे मांडले ,बहुतेक लेखक लिखान करतात व त्यावर केलेली चिकित्सा मात्र त्यांना मांडता येत नाही ,उत्तरे देता येत नाही ,सदर्भही जुळत नाही

" देव माणता की नाही याही पेक्षा माणूसपण जपता की नाही हे महत्वाचे "
        जगत असतांना ही "माणूसपणाची शिकवण" सरांचे अगाध साहित्य सांगून जाते

प्राचिविदयाप्राप्त,संस्कृतचे गाढे अभ्यासक,जगातील जवळपास सर्व सस्कृतींचे अभ्यासक,आधुनिक तुकोबा,संत साहित्यावर अगाध लेखन करणारे,
आ ह साळुके सरांचा आज वाढदिवस,सर आपणास उदंड आयुष्य लाभो !

संजय खांडवे

रविवार, ३१ मे, २०२०

प्रतिकुलतेमधून मार्ग शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतले आम्ही ....


प्रतिकुलतेमधून मार्ग शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतले आम्ही .......

शेकडो वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीने असंख्य बदल पाहीले,शोषित -शोषकांचा खेळ पाहिला,न्याय -अन्यायाच्या गोष्टी अनुभवल्या,परकियांची आक्रमणे अनुभवली .याच मातीने परिवर्तनाची नांदी ठरणाऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणाऱ्या क्रांतीनेही जन्म घेतला ,सह्याद्रीच्या साक्षीने पेटून उठलेल्याची बलीदाने बघितली .बाराव्या शतकापासून आपल्या बुद्धीचा कस लावत सत्याचा शोध घेत समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचा विचार करुन त्यांचे जीवनमान उंचवणारे कार्य करत संत नामदेव,संत ज्ञानेश्व२,संत एकनाथ,चक्रधर स्वामी ,संत गोरोबा,संत चोखोबा,संत सावता,संत जनाबाई ,संत तुकाराम आदि वारकरी संताची अध्यात्मीक बळ देणारी सामान्याची मन,मस्तक,मनगट मजबुत कराणारे महान कार्य बघितले .कित्येक ज्ञात,अज्ञातांनी ह्या मातीसाठी देह झिजविला .
              ज्ञान,विज्ञान,साहस,शौर्य,प्रेरणा,आदर्श ही या मातीच्या कणा-कणात आहे.प्रतिकुलतेतही मार्ग काढण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे ,सतत सत्यासाठी संघर्ष करणाऱ्या विचारांचा वारसदार आपला महाराष्ट्र अाहे .शेकडो वर्षाच्या गुलामगिरी नंतर रयतेचा रांजा दुर्गदुर्गेश्वर रायगडी सिहासनाधिश्वर झाले ही गोष्ट काही सामान्य नव्हती त्या पाठीमागे तीन पिढयाचे अथक परिश्रम ,संघर्ष,नियोजन व त्याग आदी गोष्टी येतात आणि हेच सातत्य त्या सुवर्णक्षणास कारण ठरते .
               आज संपूर्ण जगाला एका भयावह कोविड 19 अश्या संकटाने घेरले अाहे त्याचे कारण अतिसूक्ष्म असा विषाणू आहे पण त्याची होणारी साखळी मात्र विघातक आहे व आपला देशही त्याला अपवाद नाही ,आज एकाच वेळी या साखळीचा वेढा पडलाय . रयत त्रस्त झाली आहे भविष्याचे चिंता मनात येत आहे,आत्मविश्वासाच्या बुरुजांना तडा जात आहे .आर्थिक संकटाचे काळे ढगही दिसायला लागले आहे, एकाच वेळी संकटाची श्रृखलाच येताना दिसत अाहे पण अखंड सांवधानता ठेवत नियोजन पूर्ण काम आपली सरकारं करतांना दिसत आहे याला तुमची आमच्या सारख्या संविधानात्मक मूल्ये जपणारी माणसं तन-मन-धनासह साथ लॉकडाऊनचे नियम पाळून देत आहे.मागच्या अनेक पिढयाच्या हयातीतही एवढी  कठीण परिक्षा पाहीलेल्याचा सांगोपांगही चर्चाही नाही .सोन्यासारख्या माणसांचा जीव महत्वाचा हा उद्देश पुढे ठेवून आपण लढत अाहोत.लॉकडाऊन,कोरनटाईन या सारख्या तहाची ,संधीची योजना आखून आपली पोलिस यंत्रणा,आरोग्य यंत्रनेमधील पोलिस अधिकारी,शिपाई,डॉक्टर्स,नर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स आपआपल्या कार्यक्षेत्रात एका  निष्णात योध्याप्रमाणे घराबाहेर निघून लढत अाहेत.ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेची बुरूजे कशी पुन्हा उभारायची हा आत्मविश्वास याच मातीत आहे हा इतिहासाचा वारसाच आम्हाला लाभलाय .
             आता आहे त्या ठिकाणाहून आपण करत असलेल्या व्यवसाय ,नोकरीतून थोडसं अधिकच काम करून राष्ट्रनिर्माणाच महान कार्य एक कोविड योद्धा म्हणून येणाऱ्या काळात तुम्हा आम्हाला करायचे आहे.राष्ट्रप्रथम ही संकल्पणा सार्थ ठरवायची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे.  "आमचं कर्म शिवराय " ह्या ब्रीदानुसार "शिव जागर मंच "ह्या माध्यमातून शिवविचारांचा प्रचार प्रसार करत कार्य करत राहणारे शिवविचारी सदस्याचा आमचा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांचा मंच आहे.सामाजिक,सांस्कृतिक,क्रिडा,कला,साहित्य,शिक्षण,आरोग्य आदि क्षेत्रासाठी काम या माध्यमातून अाम्ही खारिचा वाटा उचलून अामचं कर्म शिवराय ह्या हेतूने करत आहोत , अश्या असंख्य सेवाभावी लोक व संस्था या संक़टकाळी पुढ येतांना दिसत आहे .हीच आपल्या मातीत असलेली सकारात्मकता आहे.
      अाज आपल्या आर्थिक ,शैक्षणिक,व्यावसायिक,कृषी, लघुउदयोग या बाबीवर दुरोगामी परिणाम टाळण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे . ही आपल्याशी संमधीत क्षेत्र आहे यात आपला थेट सहभागही नोदविता येतो .
लॉकडाऊनच्या काळातही आपण आहे त्या जागेवरुन आपल योगदान देऊ शकतो .हया बाबी प्रसिद्वी शिवाय करण्याचं काम मंच करत आहे.
खारीचा वाटा महत्वाचा !
     प्रतिकुलतेमधूनही मार्ग कसा काढायचा हे महत्वाचे ,हे कामही आपण साखळी पद्धतीने करुन कृषी उदयोग जसे भाजीपाला ,फळे,धान्य आदी
लघु उदयोग जसे दुध,अंडी,कुकुटपालन,मत्सउदयोग,मसाले आदि
कारागिर /कौशल्यावर आधारीत  जसे वर्कशॉप,मोटार मैकेनिक,इलेक्ट्रीशीयन,प्लबर आदी
या व्यावसायिकांना सर्व नियम पाळून शिथिलतेच्या काळापासून उभ करण्याच महत्वाचं काम करावे लागेल. मंचच्या संपर्कातून ते करण्याच काम आम्ही करतच आहोत .लक्षात आलेल्यांचा कृषी मालाचे वितरणही सुरक्षा ठेवून करण्याच काम करतोय .गरज आपल्या संपर्काची आहे . एकमेकांच्या संवादातून आपल्याला प्रश्न सोडवत स्वयंपूर्णतेकडे जाणेही राष्ट्राच्या हितार्थ ठरेल.
         "बुट पॉलिश ते तेल मालिश " या व्यावसायिकतेकडे कोणतीही लाज न बाळगता वळावे लागणारच आहे .अंगीभूत कौशल्यावर आधारींत व्यवसाय उभारणीला येणाऱ्या काळात संधी मिळू शकते ,आमच्या शिव जागर मंचाशी जुळलेले कुलमखेड येथील सुनिल कानडजे हे एक चांगले उदा आहे .प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्या व्यवसायातील दर्जेदार कौशल्य आत्मसात करुन जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा अंगीकारुन अगदी शुन्यातून आपला व्यवसाय उभा करणारे ठरले .इडली-डोसा व्यवसायातून त्या त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रगती साधली आहे .
        कोविड १९ या संकटावर तर आपण निश्चितच मात करणार आहोत ! या संकटानंतर उगवणारी पहाट ही नवीन असणार आंहे .आपले कौशल्य ,जिद्द,चिकाटी व प्रामाणिकपणा समोर ठेवून आपण नव्या दमाने पुढ जाऊ या ! यात शिव जागर मंच निश्चितच आपली मदत करेल. अशी माणसं या मंचानं उभी केलीय !
शेवटी येणाऱ्या काळात एक तुकोबांचा अभंग  लक्षात घ्या
ढाल तलवारे गुंतीले हे कर । म्हणे मी झुंजार कैसे झुंजु ?॥
बैसविले मला येणे अश्वावरी। धावू पळू तरी आता कैसा ?॥
कितीही प्रतिकुल परिस्थिती जरी असली तरीही तिला काडीइतकेही महत्व न देता कर्त्यव्य पार पाडणारी माणसे महान होतात .
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव जागर मंच बुलढाणा
    
     
.

माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहीले तर आमचीही तलवार चालेल . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर


आदर्श ,तत्वशिल ,लोकाभिमुख राज्यकर्त्या

 
गौतमीबाई व मल्हाररावासारखे सासू सासरे नव्हे तर माता -पिताची माया देणारी महान व्यक्तीमत्व होळकर कुलप्रभेला लाभली .रयतेच्या सुख दुःखात रममाण होणारी ही माणसे शेवटपर्यन्त झटत राहीली. अहील्यादेवीनी आपल्या उभ्या अायुष्यात असंख्य संकटांना सामोरे जावे लागले .१७५४ मध्ये पती सूरजमल जाटासोबत लढाईत मारल्या गेले .पती सोबत त्याच्या नऊ पत्नी सती जात असतांना सती जाण्यासाठी अहिल्यादेवींचेही मळवट भरल्या गेले पण पित्यासमान माया ओतणाऱ्या मल्हाररावांनी रयतेसाठी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून थांबविले .पति बरोबर सती न जाता त्या काळातील व्यवस्थेला या रणरागिनीने लाथाडले व रयतेच्या कल्याणार्थ हातात तलवार घेतली .
       डोळ्यादेखत नऊ सवती सती गेल्या .मालेराव अवघ्या २२ व्या वर्षी मृत्यु पावले त्यांच्या पती सती गेल्या . नातसुना देखील त्यांच्या समक्ष सती गेल्या .जावाई यशवंतराव फणसेही कॉलराने गेले , मुलगी मुक्ता व तिच्या दोन सवतीही सती गेल्या येवढे दुःख या लोकमातेने पचवले .रयतेच्या सुखात मातेला सुख मिळतं असे हा मराठयांच्या इतिहासातील वारसा राजमातेने अगदी सक्षमपणे चालविला .
    शिल्प,कला,साहित्य या क्षेत्रातील काम त्या काळात भरभराटीस आणले.धर्मशाळा,अन्नछत्रे,विहीरी,तळे,कुंडे,रस्ते व धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार ही लोककल्याणकारी कामें या काळात पूर्णत्वास आणली शिंवरायांचे स्वराज्याकार्य पुढे चालु ठेवले . राज्यकारभारात धैर्य ,बुध्दीमता,चाणाक्षपणा व निर्भिडतेने अहिल्यादेवींनी वचक निर्माण केला .ज्या महलात त्या राहत त्या ठीकाणी कोणतीही सजावट नाही बडेजावपणा नाही ,थाट माट नांही ,राजमहल वाटावा असा खर्च त्यांनी कधीच केला नाही अगदी साधेपणाने प्रखरबाणा ठेवत त्यांनी राज्य चालविले .त्या स्वतःला रयतेची सेवा करणाऱ्या ईश्वराच्या सेवक समजत असत .
    त्यांनी आपल्या पूर्वजांच्या वारश्याचा त्यांच्या विचारांचा जाणिवपूर्वक व अखंड सावधानतेने सांभाळ केला याची प्रचीती त्यांच्या एका पत्रावरून येते ,त्यांचे राज्य घेण्यासाठी सैन्य घेऊन निघालेल्या रघुनाथपंतास त्या लिहतात ," आमच्या पूर्वजांनी कुणाची खुशमस्करी करुन हे राज्य कमाविले नाही तर रक्ताचे पाणी केले आहे मी एक अबला असहाय्य स्त्री आहे अशा भ्रमात कुणीही राहू नये .मी खांदयावर भाले घेंऊन समोर उभी राहीली तर,सगळे मनसूबे जागच्या जागी विरतील ,माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करुन पाहिले तर आमचीही तलवार चालेल.आपण माझे राज्य हिरवून घेण्याचे कपट रचून आलात ,आमच्याकडील फितुरास गाठले ,मला दुबळी समजलात की खुळी ? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा दृष्ट हेतू .आता आपली गाठ रणांगनातच पडेल .मी हरले तर किर्ती करून जाईल ,पण आपण स्त्रियाकडून हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही .अहिल्याबाईना तिच्या राज्या सह गट्ट करता येईल या भ्रमात न रहावे,त्यातच आपले हीत अाहे."
         अशी युद्धनिती वापरून व पाहिल्यांदाच महीलांच्या हातात शस्त्र देवून त्यांचे सैन्यदल तयार करुन रघुनाथपंतास उत्तर दिले. लोकमाता,राजमाता,रयतवत्सल पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !



                 संजय खांडवे
                9011971122

गुरुवार, २८ मे, २०२०

इरान -इराक मधील विकसित झालेली जलप्रणाली बऱ्हाणपूरात निर्माण केली गेली


        
                 

अश्या प्रकारे १०० कुंड्या आहेत
                  यातून पाण्याचा आवाज स्पष्ट येतो




 
  
                              
                                 नकाशा
                                लिफ्ट




मध्ययुगीन भारताच्या इतिहासात बऱ्हाणपूर हे शहर अत्यंत महत्वाचे होते या काळात या शहरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या अगदी मुघल बादशहा अकबर,जहागिर,शहाजहान या भागात बराच काळ होते औरंगजेब तर बरेच वर्ष या भागात राहीला.मराठयांचा इतिहासही या भागाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही .एका दिवसाचा परतीचा दौरा म्हणून नेहमी प्रमाणे अचानक महाशिवरात्र सुटी म्हणून आशीरगडाच्या भेटीसाठी म्हणून आदल्या रात्री आमचे सुरेश देवकर सर,गजानन राऊत,सर व सुशिल पनाड सरांचे नियोजन झाले . सकाळी ७ वाजता निघून १० वाजता बुलढाण्यावरुन बऱ्हानपूर पोहचलो तेथे सुरेश देवकर सरांचे मित्र बऱ्हानपूर मधील प्रसिद्ध वकिल अँड कलिम खान साहेब अामची वाटच पाहत होते त्यांच्याकडूनच सर्व शहराची माहीती आम्हाला दिवसभरात झाली मोहीम अाशीरगडाची होती पण दिवसभरात बऱ्हानपूरचा काना कोपरा फिरलो वकील साहेबांच्या आदर तिथ्यासह सर्व ऐतिहासिक माहीती मिळाली पर्यटनातून ज्या ठिकाणी जाताही आले नसते ती ठिकाणे त्यांनी दाखविली त्यावर प्रत्येक वास्तु नुसार सचित्र आपण माझ्या ब्लॉग वर पाहत आहातच !
      आपण आता पाहू या कुण्डी भंडारा / खुनी भंडारा विषयी ..।
बऱ्हानपूर हे शहर त्या काळचे महत्वाचे व्यापारी केद्र होते .सुरत जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा मानला जायचा .बरा२,जोधपूर,आग्रा,हैद्राबाद,औरंगाबाद ही महत्वाची शहरे व्यापारी दृष्टया बऱ्हानपूरशी जोडली गेली होती या बहुतेक महामार्गावर दुतर्फा झाडे जागोजागी विहीरी खोदलेल्या दिसतात .बऱ्हानपूर -सूरत बंदरातून टर्की,पोलंड,मास्को या देशात मलमलचा व्यापार चालत असे .जहागिर बादशहाच्या काळात बऱ्हाणपूर येथे टॉमस रो या इंग्रज व्यापाऱ्याला कपड्याच्या कारखाण्याची परवानगी देण्यात आली होती .
    अश्या शहरात व्यापार व प्रशासनच्या दृष्टीकोनातून ताप्ती नदीच्या काठावर शाही महल सारख्या अनेक इमारतीचे निर्माण झालेल दिसते .
कोणत्याही मोठया शहराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाण्याची व्यवस्था ही पाण्याची व्यवस्था जागतीक स्तरावर विचार करायला लावणारी आहे .
     मुगल शासक अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी असलेले अब्दुल रहीम खान खाना याने जहागिर बादशहाच्या काळात १६ १५ मध्ये या शहरासाठी अदभूत अश्या योजनेच्या माध्यमातून " कुण्डी भंडारा " निर्माण केले .

रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून
पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।
                                  ४०० वर्षापूर्वी या भव्य दिव्य योजनेच्या निर्माण कर्त्याचे वरील काव्य आहे.पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.
        सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या या कुंडी विशिष्ट अंतरावर ठेवत या कुंडीतून विहीरी प्रमाणे पाणी काढण्याची सोय केली हे पाणी शेती ,बाग,महल,सामान्य लोकासाठी उपलब्ध झाले .तयार करण्यात आलेल्या कुंडीत उतरुन साफसफाई करता येते .मागील काळात या योजने कडे दुर्लक्ष होते त्यात घाण व इतर बऱ्याच समस्या होत्या पण आता प्रशासनाने याची साफसफाई करून पर्यटनासाठी खुले केले आहे त्यातून परीसरातील गावाला पाणी पुरवठा होत आहे .पाणी अतिक्षय गोड व थंड आहे प्रशासनाने ८० फुट खोल नहर मध्ये उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली अाहे.
       कुण्डीत पाणी एका मुख्य हॉल सारख्या भागात जमा होते त्याचा धो धो आवाज अगदी स्पष्टपणे येतो. वायु दाबाच्या प्रणालीवर ही योजना आजही सुरू आहे .पूर्वी बऱ्हापूरात हे पाणी पोहचत होते पण आता काही भागात हे पाणी जाते कारण मधे बऱ्याच विहीरी व बोअर यामुळे याला फटका बसलेला दिसतो .
    सोबत या पाण्याच्या योजनेचा नकाशा दिला आहे की कशा पद्धतीने हे पाणी शहराच्या विविध भागात जायचे .यामध्ये सूखा भंडारा,मूल भंडारा,चिलाहरण भंडारा,कुंडी भंडारा हे भाग आहेत .याच कुंण्डी भंडाराला खूनी भंडारा सुद्धा म्हटलं जात याचं कारण पूर्वी त्या कुण्डीत खून झाले होते म्हणून स्थानिक त्याला खूनी भंडारा म्हणू लागले.
   अशी विस्मयकारी स्थळ प्रत्यक्ष पाहींली की एक वेगळी उर्जा शरीरात संचारते व मन पुढच्या मोहीमेकडे वळते .
    पुढच्या भागात आपण माहीती पाहू या अगबराच्याही अगोदरच्या काळात बांधल्या गेलेल्या व आजही सुस्थितीत असलेल्या प्रसिध्द शाही जामा मज्जीत विषयी..............


                       संजय खांडवे 
                        9011971122


रविवार, २४ मे, २०२०

हरीशचंद्रगड,साणंददरी निर्सर्गाचा एक महाअविष्कार



साधंण दरी सहयाद्रीतील एक निर्सगाचा महाअविष्कार !


भंडारदरा धरणाला वळसा घालत जात असतांना ढगात हरवलेले कळसूबाई


साम्रद येथून दिसणारा खुटा म्हणजे थम व त्या बाजूला दिसणारा रतनगड
साम्रद या ठीकाणी हिंदवी परिवाराचा दाखल झालेला ताफा व त्यामागे दिसणारा रतनगड व खुटा

त्या भागातील स्थानिक लोकांची पारंपारीक मालवाहतुक व्यवस्था








आशिया खंडातील क्रमांक २ ची ही साधंण दरी आहे,क्रमांक १ ची दरी ही नेपाळमध्ये आहे या दरीची लांबी २ कि मी आहे व रुंदी १० ते १२ फुट आहे काही ठिकाणी फारच अरुंद आहे,खोली ५०० ते ७०० फुटपर्यन्त आहे, अनेक लोक इथे ट्रेकींग साठी येतात हा कळसूबाई -हरिशचंद्रगड अभयराण्याचा भाग आहे .

आदरनिय आमदार दरवर्षी न चुकता आमच्यासोबत या मोहीमेत असतात,साधण दरीतून वर आल्यावर आमच्या मागच्या मावळयांची वाट पाहत आमदार बच्चू कडू साहेब व आम्ही निवांत अभराण्यात गप्पा मारतांना .


सायकाळी संपूर्ण भंडारदरा धरणाला फेरा मारुन येतांना सायंकाळचे दृष्य .


 

मोहीमेचा नकाशा

मोहीमेतील आमचे सहकारी प्रा सवडतकर सर,किशोर पवार सर ,रामदास काकडे सर

शनिवार, २३ मे, २०२०

शहाजहानने आपल्या लाडकी पत्नी मुमताजचे शव मृत्युनतर काही काळ याच ठिकाणी ठेवले

आऊखाना

बऱ्हानपूर शहरात ताप्ती नदीच्या काठावर शहराबाहेर आल्यावर ही ऐतिहासिक वांस्तु दिसते चारही बाजूने शेती आहे थोडा कच्चा रस्ता पार केला की संपूर्ण जवळपास आठ दहा एकर परिसराला बंदिस्त करणारी मजबूत तटबंदी आजही शाबूत आहे 
या वास्तुचे ऐतिहासिक महत्व असे सांगतात की शहाजहानची पत्नी मुमताजचे निधन याच परिसरात असतांना झाले ,त्यावेळेस मुमताजसाठी तयार होणारा महल पूर्ण झाला नव्हता ,तेव्हा ही वास्तु मुमताजचे शव ठेवण्यासाठी तयार करण्यात आली हाच तो आऊखाना 
इमारतीच्या चारही बाजूने पाण्याची रचना करुन इमारतीला असणाऱ्या तळघराच्या मध्यभागी त्यांना ठेवण्यात आले होते व नंतर ताजमहल पूर्ण झाल्यावर त्यांना आग्रा येथे नेण्यात आले .
   स्थानिक असे सांगतात खर तर ताजमहल येथेच बनणा२ होता पण शहाजहानच्या भूविशारदांनी पुढील काळात ताप्ती आपला प्रवाह बदलेल व महल नष्ट होईल म्हणूण तो आगरा येथे बनविण्यात आला.
    आऊ खाण्यासमोर एक महलही बघायला मिळतो ,या वास्तुची रचना ताजमहलाच्या आकाराचीच आहे .
    या ठिकाणी येणारे पाणी हे संतत चालू असायचे त्या काळात जमीनीखालून ४० फुट खोलातून नहर तयार केल्या गेल्या ,सपूर्ण बऱ्हानपूरला याच माध्य माने पाणी पुरविले जायचे .ही पाणी योजना "खूणी भंडारा" या नावाने ओळखतात ही नहर आपण सचित्र व शास्त्रीय दृष्टया कशी चालायची हे पुढील पोष्ट मध्ये बघूया !

जय जिजाऊ
             आऊखाण्याची तटबंदीची प्रशस्त भिंत
                            दुसरी बाजू
                     तटबंदीची आतील प्रशस्त जागा
             ताजमहल सारखा दिसणारा आऊखाना

            आऊखाण्यातील आतील भाग
    चारही बाजूने पाणी घेऊन जाणारा खोलगट भाग

                 पाण्यासाठीचे मोठे हौद

गुरुवार, १४ मे, २०२०

सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ ,शास्त्रकोविद स्वराज्यरक्षक शंभूराजे

सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ,शास्त्रकोविद स्वराज्यरक्षक शंभूराजे.....

      शेकडो वर्षापासून गुलामीत खितपत पडलेल्या या मातीत भोसले कुळवंशीयांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहीले ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी  तीन पिढया झटल्या तेव्हाकुठे आई जिजाऊंच्या प्रेरणेने ,शहाजीराजांच्या संकल्पणेने ,शिवरायांच्या धाडस,बुद्धीचातुर्य,विश्वास,अखंडसावधानतेच्या जोरावर स्वराज्य उभं राहीलं. ही काही सामान्य गोष्ट नव्हती !
 पुढे स्वराज्याच्या दुसऱ्या छंत्रपतींनी हे स्वराज्य आपल्या खांदयावर पेलून ठेवत स्वराज विस्तार केला.इतिहाचार्य वा सी बेद्रे यांचे शंभूचरित्रावरील संशोधन व लेखन हे शंभूचरित्राला योग्य दिशा देण्याच महान कार्यच आहे .इतिहासाचार्य कमल गोखलेही व इतिहाचार्य जयसिंगराव पवार सरही तेवढेच महत्वाचे !
‌"शहाजी महाराजांच्या महत्वकांक्षेतून सूचित झालेल्या व शिंवाजी महाराजांनी साकार केलेल्या हिंदवी स्वराज्याचा संभाजीराजे यांनी हिरेरीने सांभाळ केला".   

या एका वाक्यात मी खरे स्वराज्य रक्षक अनुभवले .
‌     अगदी बालपणा पासून आपल्या शंभुबाळाने असंख्य वादळे अनुभवली ,कुणाच्या वाटयाला येऊ नये येवढं दुःख एकटया शंभूराजांनी तुमच्या अामच्या कल्याणार्थ सोसले. कळतही नव्हतं त्या वयात मातृछत्र हरवलं , पुढं विदवत्ता व शौर्य हा दागिना धारण केलेल्या शंभूराजांनी ते पार करत अगदी आग्राभेटीचा थरार अन त्यानंतरचा स्वराज्यासाठी घडलेला अाग्रा ते राजगड प्रवासही आपल्या मृत्युच्या बातमीसह अनुभवला . पुढे त्यांनी गाजविलेला पराक्रम हा शद्वात बसवून सांगणेही शक्य नाही . पण अनेकांच्या लेखण्या शभूराजांचं विद्वत्ता व शौर्य लिहण्यास धजावल्याचं नाही उलट कथा,नाटकामधून वेगळेच चित्र रंगविले गेले पण सत्य जास्त काळ लपवून ठेवता येत नसत कारण असत्याला बुड नसतं ते कुठही लवंडतेच ! इतिहास हा साधनावर लिहला जातो ,संदर्भावर तपासला जातो तुमच्या आमच्यासारखी माणसं हया साधनांना,साहित्याना,संदर्भाना आपल्या बुध्दीपटलावर घासतात मगचं स्वीकारतात ,म्हणून हे शक्य झालं .
‌         शंभूराजांनी एकही लढाई हरली नाही आपल्या तलवारीच्या पात्यावर स्वराज्य पेलले,मोगल ,इंग्रज,पोर्तुगीज ,सिध्दी यांना सळो की पळो करून सोडले होते ही शौर्याची,पराक्रमाची व धाडसाची एक बाजू खूप महत्वाची आहे यात अर्कज्ञ शहाजीराजे,मॉसाहेब व छत्रपती शिवरायांच्या कार्याचा वारसा त्यांना खूप काही देवून जातो  या पराक्रमावर संदर्भ घेंत खूप काही लिंहणं अजूनही बाकी आहे असं मला वाटतं .
‌        ज्या वयात तुम्ही आम्ही घरातले बाळ होतो त्या वयात शंभूराजांनी संस्कृत भांषेवर प्रभूत्व मिळवून " बुधभूषण " या संस्कृत ग्रंथाची निर्मिती म्हणजे शेकडो वर्षानंतर या मातीमधली प्रतिभा उजळण्याचे साहित्य क्षेत्रातील महान कार्य होते अगदी प्रत्येक भारतीय कुटुंबाने हा ग्रथ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचा मन -मस्तिष्का पर्यन्त पोहचवावा असाच आहे. भोजपूरी भाषेतील नखशीख,नाईकाभेद,सातसतक या सारख्या महान ग्रंथांची निर्मिती ह्या साहित्यवीराने केली .
‌जगातील बहुतांश भाषेचे ज्ञान शंभूराजेंना होते .संस्कृत इतकिच हींदी भाषेचे ज्ञानही त्यांना होते .केशव पुरोहीत यांनी "राजाराम चरितम" या ग्रंथात शंभूराजांना सकलशास्त्र,विचारशील,धर्मज्ञ व शास्त्रकोविद असे म्हटले आहे .
‌      शंभूराजांचा बुधभूषण हा ग्रंथ अनुवादक डॉ प्रभाकर ताक़वाले सर यांचा अथक परिश्रमातून व संपादक अँड शैलजा मोळक व जिजाई प्रकाशन यांच्या माध्यमातून हातात आला . शंभूराजांच्या संस्कृत श्लो काचा अर्थ व अन्वयार्थ वाचकापर्यन्त पोहचला.हे एक ऐतिहासिक कार्यच म्हणावे लागेल. या साठी मराठा सेवा संघाचें संस्थापक शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर साहेबांची  अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे या ग्रंथामधून शंभू राजाचे विविध क्षेत्रात असलेले अगाध ज्ञान लक्ष वेधणारे आहे . 
‌पहिल्या अध्यायात आलेला ४ था श्लोकात शंभूराजे म्हणतात
‌अज्ञान कृष्णसर्पेण दंशिता भुवि मानवा :।
‌तेषा जीवन हेत्वर्थम नौमि जांड़गुलिकं गुरुम ।।
‌ अर्थ : या पृथ्वीवरी माणसे अज्ञानाच्या कृष्णसर्पने डसली गेली आहेत ,त्यांना जीवंत ठेवण्यासाठी गुरू नावाच्या विषवैदयकाची हेतुपुरस्पर निवड केली आहे त्यास मी नमन करतो यामधून अथांग ज्ञानसागररूपी छत्रपती ज्ञानार्जनाचे मोल लक्षात अाणून देतात.प्रस्तुत ग्रंथात संभाजीराजे विविध विषयावर भाष्य करतांना दिसतात ,यावर स्वतंत्रपणे लिहणे आवश्यक वाटते.एकटा बुधभूषण मधील भाष्य बघितले की शंभूराजे म्हणजे प्रकांडपंडीत विदवत्तेचे महामेरु आहेत हे लक्षात येते .
‌यामध्ये
‌राजनीति वरील भाष्य
‌देव देवतांना पूर्वजांना वंदन
‌स्वकुलावर काव्य
‌राज्यांची अंगे
‌राजाचे सहाय्यक
‌अमात्य
‌राजपुत्र  शिक्षण व त्याचे कर्त्यव्य
‌दुर्ग संपत्ती,दुर्ग प्रकार
‌दुर्ग रचना,धान्य कोठारे
‌दुर्गाध्यक्ष
‌राजाची कर्त्यव्य
‌राजाचे दोष
‌राजावरील संकटे
‌राजाचे आक्रमण
‌प्रकिर्ण ज्ञान
‌पशु,पक्षी,वनस्पती विषयी ज्ञान
‌आदी बाबीवर शंभूराजांनी भाष्य केले आहे हे प्रत्येक शिवशंभूप्रेमीनी नककीच अभ्यासावे .
‌ अर्थात  सकलशस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांनी अगाध ज्ञानाची निर्मिती केली अाहे .तीचा सखोल अभ्यास होऊन समोर येणे गरजेचे अाहे
‌आज एकत्रितपणे शंभूराजांचे साहित्य कुठे उपलब्ध नाही .यावर विचार होउन त्याची माडणी होणे गरजेचे आहें 
‌आज बुध्दीरूपी दागिना परिधान केलेल्या बुधभूषणकार छत्रपतीची जयंती 
‌जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
‌जय जिजाऊ
‌जय शिवराय
‌जय शंभूराजे

‌                                    संजय खांडवे
‌                                    9011971122
‌        

"

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...