सोमवार, २१ जुलै, २०२५

पातुर येथील नानासाहेबांचा वाडा



पातुर येथील नानासाहेबांचा वाडा

➖➖➖➖➖➖

स्थान : ता पातुर जि अकोला , अकोल्यापासून ३३  कि .मी , खामगावपासून ६९ कि .मी .

➖➖➖➖➖➖➖

पाणिनीच्या अष्टाधायी नुसार वास्तु हा ' वस' या धातू पासून आला आहे . वसन्ति यत्र मानवा: अश्या अर्थाने देखिल वास्तु हा शब्द  वापरला जातो . अगदी झोपडी पासून सदन , भवन, वाडा , हवेली,महल, प्रासाद , राजमहल ही मानवी अधिवासाच्या वास्तु आहेत . यामध्ये  महल हा अरबी शब्द आहे . हवेली हा फार्शी मधून आलेला शद्ब आहे या दोन्हीचा अर्थ मंदिर , वाडा अथवा सुशोभित , सुरक्षेसह सर्व सुख सोईने युक्त अशी त्या स्थानिक परिसरातील महत्वाच्या कुंटुंबाचा वंश परंपरेनुसार चालत असलेला अधिवास असतो . ग्रीक व रोमन संस्कृतीत मधे उघडा चौक  ठेवून प्रासाद व चारही बाजूने इमारतीची रचना ठेवण्याची पद्धत होती हवा खेळती राहणे व सुरक्षा हा त्या मागचा उद्देश राहत असे .

      नैसगिक गुहा ,वर्षावास, मानव निर्मित शैलगृहे , लेणी , गड दुर्ग, मंदिरे  या क्रमाने मानवी अधिवासाचा प्रवास स्थानिक परिस्थिती नुसार राहीलेला दिसून येतो . मध्ययुगीन कालखंडात हवेली , महल, वाडा या सारख्या वास्तु मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या त्या काळच्या सामाजिक , राजकीय परिस्थिती नुसार राजे , अमात्य, 'सरदार , जहागीरदार , मामलेदार आदि महत्वाचा लोकांनी याचे निर्माण केले . एखादा सरदार मोहीमेवर जातांना घरातील कुटुबियांच्या सुरक्षेसाठी वाडा , गढी यासारख्या मजबुत तटबंदी , बुरूज व दरवाज्यासह सज्ज असलेल्या वाडयात वास्तव्य करत असत . वेळ प्रसंगी त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग देखील अनेक वाड्या मधून काढलेले असत . घडीव दगड , विटा , जुना, माती तथा सागवानी लाकडांचा कलात्मक पद्धतीने वापर करून वाडे बनविले जात असत . महाराष्ट्रातील सर्वच भागात असे वाडे आजही बघायला मिळतात .राजस्थान , मध्यप्रदेश , गुजरात मध्ये राजघराण्यांचे मोठे सुसज्ज तथा शिल्पकलेचा अप्रतीम संगमातून महल तथा राजवाडे आजही चांगल्या स्थितीत आहेत . इंदौरचा होळकरांचा वाडा त्यापैकीच एक आहे. महाराष्ट्रातही चांदवड येथील भव्यदिव्य वास्तु मन प्रसन्न करते.येवल्यामधील दगडी वाडे , सासवड तथा पुणे परिसरात ही अश्या सुंदर वास्तु आहेत . पैठण , परभणी, जालना , पंढरपूर , सोलापूर, सातारा, सांगली या भागातही भ्रमंती करतांना अश्या अनेक वास्तु आहेत बहतेक वाड्यामधे वंशपरंपरेने वास्तव्य देखील सुरु आहे . व्यक्ती अथवा घराण्याच्या नावाने वाड्यांची ओळख दिली जाते .

        अशीच एक सुंदर वास्तु आकाराने जरी मोठ मोठ्या वाड्या पेक्षा लहान असली तरी वास्तुशास्त्राचे सुंदर रूप वऱ्हाड प्रांतात बघायला मिळाले .पातुर येथील प्राचीन लेणी समूहाला भेट देण्यासाठी गेलो असता  बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले  प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे असे पातुर शहर की ज्याला  सुवर्णनगरीदेखील म्हणतात .याच पातुरला नानासाहेबांचे पातुर असेही ओळखतात . लेणीच्या समोरच उंच टेकडीवर रेणुका आईचे ठाणे आहे . या ठिकाणी आईचा मोठा उत्सव असतो . त्याच्याच पाठीमागे नानासाहेबांचा प्राचीन वाडा आहे . वास्तुकलेचा हा अप्रतीम नमुना आहे .वीटा,दगड,चुना व माती मध्ये  बांधकामशैली असलेले हे ठिकाण आहे .टेकडीवरील प्रसिध्द रेणूका देवीच्या मंदीराजवळून हा वाडा प्रतिकृती रुपाने अगदी सुंदर दिसतो  .आता नवीन बाळापूर वरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपास ला लागूनच हा वाडा आहे .

    वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला आहे मजबूत लाकडात हे बनविले गेले आहे .त्यावर नगारखाना आहे .सपूर्ण वाडा हा बंदीस्त असून , त्या बंदिस्त तरबंदी वर ऐसपैस जागा आहे व त्या खाली सुंदर विटांचे छत कमानी सह आहे . वर जाण्या साठी पायऱ्या आहेत .चार कोपऱ्यावर चार मजबूत बुरुज आहे .वाडयाच्या मध्यभागी मंदीर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे .नानासाहेब हे पातुर येथील श्रद्धास्थान (संत विभूती)मानले  जातात त्यांची समाधी म्हणजे हा मंदीर स्वरूपाचा वाडा आहे त्याला स्थानिक लोक नानासाहेबाचे मंदीर किंवा नानासाहेबांचा वाडा असेही म्हणतात . स्थानिकाच्या माहीतीनुसार या ठिकाणी  मोठी यात्रा  भरायची ती यात्रा एक महीना चालायची बाहेर सभामंडप आहे त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षिकामासह कमानी आहेत .मंदीराला देवळ्या असून त्यात आता तुटलेल्या अवस्थेतील मूर्ति आहेत्त .सभामंडपातच गोड पाणी असलेली बंदीस्त विहीर आहे.मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते .त्या पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आनखी दोन समाधी आहेत त्यावर एक दगडात कोरीव नक्षीकाम केलेली अंबारीसह अशी सुंदर हत्तीची मूर्ती आहे .ही मुर्ती शिल्प कलेच अप्रतीम उदाहरण आहे .

संपूर्ण वाड्याला मजबूत कोट आहे .या कोटात कमानीसह बांधकाम करुन त्यावर वीटाचेंच छत असलेले निवासादी साठी तयार केलेले दिसतात .एकाच वेळी शेकडो व्यक्ती सुरक्षितपणे राहतील अशी व्यवस्था या वाड्याचा बांधकाम रचनेनुसार आहे .कमानीच्या खोलीमधून अरुंद असा जीना वर कोटावरील छतावर घेऊन जातो .या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते .याच इमारतीचा तळघरही असल्याचे दिसते पण त्याचा रस्ता बंद आहे .मंदिरासमोर तीन एकत्र स्वरूपाच्या दिपमाळा आहे .या वाडयात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पूर्वी झालेले आहे.नानासाहेबांचे पातुर अशी या शहराची ओळखच आहे .या वाटेवरून जात असतांना  अवश्य बघावा असा हा वाडा आहे. अश्या वास्तुंचे जतन व संवर्धन झाले पाहीजे .


संजय खांडवे

मंगळवार, १५ जुलै, २०२५

लेकी बाळींसाठी महाराजांनी बांधलेली पाण्याची विहिर

 


लेकी बाळींसाठी महाराजांनी बांधलेली पाण्याची विहिर

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान - पांढरेपाणी , ता . शाहूवाडी , जि . कोल्हापूर


पाणी.......!! हा जगभरातील प्राचीन संस्कृतीच्या भरभराटी मधील मुख्य गाभा आहे . यामुळे हजारो वर्षापूर्वीच्या अनेक ज्ञात - अज्ञात संस्कृती या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाल्या . सुपीक जमीन , दळणवळण आदि बाबी हया नदीच्या परिसरात मानवी जीवन अधिक सुखकर बनवितात व यापुढे जाऊन व्यापार वाढतो संस्कृतीचे देवान घेवान होऊन कला , साहित्य , स्थापत्य याचा विकास होत जातो . मेसोपोटामिया  सभ्यता ही नील नदीच्या कुशीत वाढली . सिंधू नदीच्या खोऱ्यात अत्यंत प्रगत अश्या सिंधू संस्कृती जन्मास आली . पीली नदीच्या खोऱ्यात चीनी संस्कृती वाढली असे जगभरात अनेक सभ्यता सांगता येतील त्याचा मूळ आधार पाणी हाच राहीला आहे . भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळापासून असलेले अवशेष आजही सापडतात . भिमबेटका हे ठिकाण त्याच परिसरात येते . माणूस भटक्या अवस्थेत होता तेव्हाचे अवशेष आजही तेथे चित्ररूपाने कायम आहेत . गंगा , ब्रम्हपुत्रा आदि नदयांच्या खोऱ्यातही हजारो वर्षापासून असेच होते . नदीच्या प्रलयात अनेक अज्ञात अवशेष हजारो वर्षापासून जमीनीत गडप झालेले आहेत. सिंधु नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो ' हडप्पा या ठिकाणी उत्खलनात प्राचीन शहरे वर आली . त्यांची त्या काळची नगर रचना , पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था ही आजही आदर्श मानली जाते . २९ x २३ फुट असलेले पाण्याचे कुंड हा त्या ठिकाणचा पाण्याचा पाणवठा हा विशेष आहे . ४०० वर्षापूर्वी दक्षिणेचे प्रवेशद्वारा असलेल्या बऱ्हाणपूर या शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी कुण्डी भंडारा हया वास्तुचे निर्माण झाले .

*रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून*

*पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।*

                                पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.

        सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या. आजही ती योजना बऱ्याच अंशी कार्यान्वित आहे . पूर्वीचे औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असलेली पवनचक्की व या शहरातून काढलेल्या जमिनीतून भूमिगत असलेल्या प्राचीन पाण्याच्या नहरी हे त्याकाळच्या प्रगत व्यवस्थेचे उदाहरण म्हणावे लागेल . कन्नड तालुक्यातील पितळखोरा या लेणीमध्ये देखील डोंगर उतारावरून वाहत आलेले पाणी एकत्रित करून त्याचा वापर कसा करावा याचे वास्तुशिल्प आजही त्या ठिकाणी जिवंत आहे . 

         जागतिक दर्जाचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या ठिकाणी असलेले गोमुखातून पडणारे पाणी हा देखील त्या काळातील वास्तुशिल्पाचा तसेच प्रगत जल व्यवस्थापनाचा अद्भुत नमुना आहे असे लहान मोठे अनेक गोमुख रचना असलेले पाण्याचे स्त्रोत महाराष्ट्रात आहेत . याची भूमिगत रचना अजूनही आपच्या स्थापत्यशास्त्रास पूर्णपणे समजू शकली नाही .

          शिवजन्म पूर्व काळ आणि शिव जन्मानंतरच्या काळातही महाराष्ट्रात पाणी या स्त्रोतासाठी फार महत्त्व दिले गेले . गडकोटावर गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारे पाणी असो किंवा जनसामान्यांच्या रोज रहाटी साठी लागणारे पाणी असो या दोन्हीचे व्यवस्थापन त्या काळातील जाधव -भोसले वंशियामधील रयत वत्सल लोकांनी केले .

         राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचे जन्मस्थळ असलेले राजे लखोजी राजे जाधव यांच्या सिंदखेडराजात पाणी व्यवस्थापनाचे अनेक उदाहरणे सापडतात त्या ठिकाणी निर्मिलेल्या वास्तु ह्या केवळ राजवंशीयांसाठी नसून त्या जनसामान्यांच्या उपयोगात कशा येतील याची व्यवस्था केलेली दिसते . यामध्ये चांदणी तलाव, सजना बारव, मोती तलाव , पुतळा बारव ही आजही जिवंत अवस्थेतील पाणी व्यवस्थापनाच्या वास्तू जनतेच्या सेवेत दिसून येतात . १६०६ मध्ये मालोजीराजे भोसले यांनी पाणी व्यवस्थापणार्थ शिंगणापुरी तळे बांधिले असा उल्लेख आढळतो . आक्टो . १६५४ मध्ये दक्षिण भारतात मल्लसमुद्र शिलेवर मोजे . मुंदुवाडी ता . कोलार येथे संभाजीराजे यांच्या प्रतिनिधिने तलाव बांधण्यासाठी जमीन दिल्याचा उल्लेख येतो. स्वराज्यात 350 च्या वर गडकोट किल्ले होते त्यापैकी अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले व अनेक किल्ल्यांचा डागडुगी करून ते अधिक बळकट करण्याचे काम महाराजांनी केले . गड किल्ल्यावर पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे शिवकालीन पाणीसाठवण योजना ही अत्यंत काटेकोरपणे पाळली जायची . दुर्ग दुर्गेश्वर रायगड आपण जर बघितला तर यावर गंगासागर तलाव, हत्ती तलाव ,कोळींबतलाव, त्याचबरोबर कुशावर्त तलाव यासह बारा टाकी समूहासारखी अनेक प्राचीन पाण्याची स्त्रोत रायगडावर आहेत . अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही रायगडावर पाणी शिल्लक असल्याची दाखले आढळतात . वाघ दरवाज्याच्या बाजूने असलेला कुशावर्त तलाव त्याची भिंत जर आपण बघितली तर त्या भिंतीच्या मधोमध खाली गोमुख बसवलेले आहे . ही रचना अजूनही आपल्या विचार कक्षेच्या पलीकडची आहे .एखाद्या गावात जर थांबले तर पाणवठ्या वरचे पाणी गरजे पेक्षा जास्त घेऊ नका... वापरू..... नका अशी सक्त ताकिद महाराजांनी आपल्या मावळयांना दिलेली होती .

       रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात सांगितले आहे . "तैसेच गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा . पाणी नाही आणि ते स्थळ तर आवश्यक बांधणे प्राप्त जाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे ऐसी मजबूत बांधावी .गडावरी झराहि आहे, जैसे तैसे पाणीही पुरते, म्हणून तितक्यावर निश्चिती न मानिता उद्योग करावा . कीनिमित्त की, जुझामध्ये भांडियाचे आवाजा खाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो , तेव्हा संकट पडते . याकरिता तैसे जागा जकिरियाचे पाणी म्हणोन ,दोन-चार तळी टाकी बांधोन ठेवून त्यातील पाणी खर्च होऊ द्यावे . गडाचे पाणी बहुत जतन राखावे . " एवढे सूक्ष्म नियोजन शिवरायांचे होते महाराज जलतज्ञ होते त्यांना भूगर्भाचाही तेवढाच अभ्यास होता . भूगर्भानुसार कोणत्या ठिकाणी कोणती पाण्याची योजना राबवावी हे त्यांना ज्ञात होते .

         रयतेच्या कल्याणार्थ झटणाऱ्या छत्रपतींना राज्य व्यवस्था सांभाळतांना युद्धादि धामधुमितही रयतेच्या प्रश्नाची जाण होती . याची प्रचीती पावनखिंड जवळच असलेल्या पांढररेपाणी  गावात असलेल्या एका छोटयाश्या विहिरीवरून येते . पन्हाळयाच्या वेढ्यातून रात्रीच्या प्रहरी बाहेर पडून मसाई पठार - धनगरवाडी या मार्गाने महाराज सकाळी तांबड फुटतांना या गावात पोहचले होते . येथून चार-पाच किलोमीटर अंतरावर पावनखिंड आहे त्या पावनखिंडीतच स्वराज्याच्या मावळ्यांनी  स्वामीनिष्ठतेची कसोटी दिली आणि स्वराज्यासाठी महान बलिदान देवून महाराजांना सुखरूप विशालगडी पाठवले . पांढरपाणी गावात पावनखिंडीकडे जात असताना गावातुन उजव्या बाजूला शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली विहीर असा फलक दिसतो. तेथून थोडं खाली गेल्यानंतर ती विहीर दिसते विहीर अगदी छोटी आहे परंतु दगडाने मजबूत अशी बांधलेली ही विहीर पाणी घेण्यासाठी खाली उतरण्यास गोलाकार पायऱ्या सुद्धा आहेत . आजही त्या विहिरीचे स्वच्छ सुंदर निर्मळ पाणी महाराजांचे आठवण करून देते . स्थानिकांनुसार अशी आख्यायिका सांगितली जाते की महाराज एकदा विशाल गडी जात असताना या गावात थांबले असता एका वृद्ध महिलेने महाराजास भाकरी खाण्यास दिली त्यावेळेस महाराजांनी त्या वृद्ध महिलेस काय पाहिजे आहे हे विचारले असता तिने सांगितले की ,महाराज उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई आहे म्हणून पाण्याची  काही तरी व्यवस्था करावी  .महाराजांनी विशालगड घेतल्यानंतर त्या ठिकाणी ही विहीर बांधून दिली असे सांगितले जाते . स्वराज्यातील लेखी बाळींना पाण्यासाठी वन वन करायला लागू नये म्हणून महाराजांनी स्वतः ही विहीर बांधून दिली आणि या भागातील ले की बाळींचा पाण्याचा प्रश्न सोडवला  . पावनखिंड मोहिमेवर जाणाऱ्या प्रत्येक मावळ्याने या विहिरीस जरूर भेट द्यावी आणि महाराजांच्या जनसामान्यांसाठी असलेल्या पाणी व्यवस्थापनाचे हे वैश्विक स्थापत्य सर्वांना ज्ञात करून आपले राजे हे रयतेच्या अगदी शेवटच्या घटकाचाही विचार किती सूक्ष्म पद्धतीने करायचं हे दाखवून द्यावे .



संजय खांडवे

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बुधभूषणकार शंभूछत्रपतींचे दुर्ग निरुपण ➖➖➖➖➖➖➖➖➖

 


बुधभूषणकार शंभूछत्रपतींचे दुर्ग निरुपण

➖➖➖➖➖➖➖➖➖

सकलशास्त्रकोविद छ्त्रपती संभाजी राजे भोसले यांनी बुधभूषण या संस्कृत ग्रंथांच्या द्वितिय अध्यायात दुर्ग निरूपण आले आहे .

        'दुर्ग 'या शब्दाचा मूळ अर्थच दुर्गम असलेला ,जाण्या येण्यास अत्यंत कठीण,अवघड असा हा दुर्ग असतों दुर्गाला किल्ला असेही म्हटले जाते या सर्व बाबींचे विवेचन संभाजीराजे दुर्गाविषयी देतात .तो कसा असावा ,गडाचा कुठला भाग कोठे असावा याचे शास्त्र शुद्ध विवेचन  छत्रपती शंभू राजांनी केले आहे.


धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।

वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥


छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .

 १)नरदुर्ग

 २)वार्क्षदुर्ग

 ३)धन्विदुर्ग

 ४)अम्बु दुर्ग

 ५)महीदु र्ग

 ६)गिरि दु र्ग

त्याचे विवेचन खालिल प्रमाणे करतात .

  *नरदुर्ग*

हा दुर्ग म्हणजे माणसांनी वेढलेला ,शूरविरांची दुर्गम व्युहरचना केलेला,गूढ भूलभुलैय्या ,चक्रव्युव्हाप्रमाणे एकमार्गी लढवैय्यानी तटासह वेढलेला किल्ला तर्क चतुरंगसैन्याने तयार होतो

*वार्क्षदुर्ग (वनदु र्ग )*

घनदाट जंगलाचे सरक्षण असणारा दुर्ग ,वन ह्या दुर्गाचे सरक्षण करतो .हा गर्द झाडी मध्ये सशस्त्र सैन्याने सज्ज असा किल्ला असत्तो .

 *धन्विदुर्ग*

हा दुर्ग म्हणजे धर्नूधारींनी सुसज्ज असा असतो .हा अनेक प्रकारच्या प्रगट -अप्रगट योध्यानी व्युहरचना केलेला असतो.     

*अब्दुर्ग (जलदुर्ग)*

चारही बाजूने पाण्याने वेढलेला हा दुर्गप्रकार आहे .पाण्यामधील मजबूत खडक असलेल्या बेटावर हा दुर्ग उभारला जातो.शेकडो वर्षापासून अश्या दुर्गाची प्रचंड दगडापासून बनविलेली तटबंदी या दुर्गाचीं वादळ वाऱ्यात ,प्रचंड लाटातही सरक्षण करत असतात .पिण्याच्या गोड्या पाण्यासह लागणाऱ्या इतर सर्व सोयी गडावर आढळतात .जंजीरा ,विजयदुर्ग,खांदेरी,सिधुदुर्ग ही महाराष्ट्रातील जलदुर्ग होय .जंजीरा स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजे यांनी त्याचा बाजूलाच पदम् दुर्गाची निर्मिती केली होती .

*महीदुर्ग*

हा भूईकोट किल्याचा प्रकार आहे.खंदकांनी वेढलेला जमीनीवरील हा भूईकोट किल्ला असतो .बारा हात उंच बुरुज /तटबंदी त्यावर फिरण्यास प्रशस्त फांजी व तटबंदीवरील चर्या किल्ला अजिंक्य बनवतात .चाकण ,अहमदनगर ,सोलापूर येथील किल्ले भूईकोट प्रकारात येतात .

लाल किल्ला याच प्रकारात येतो .किल्याच्या चारही बाजूने खंदक खोदून त्यात सुसर मगरी सोडून त्याला अधिक दुर्गम केले जात असे .नळदुर्ग हा भूईकोट किल्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे .

*गिरिदुर्ग*

या प्रकारात किल्याच्या चारही बाजूने पर्वत ,दरी,कातरकडा असतात .चारही बाजूने दुर्गसरक्षणार्थ तटबंदी व बुरुज असतात .

संभाजी राजे यांनी गिरिदुर्ग हा अत्यंत प्रशंसनिय मानला आहे .गिरिदूर्गाविषयी विवेचन करतांना स्वतंत्र श्लोक बुधभूषण मध्ये आला आहे.


सर्वेषामेव दुर्गाणां गिरिदुर्ग प्रशस्यते ।

दुर्ग च परिखोयेतं वप्राट्टालकसंयुतम ॥


या सहा दुर्गामध्ये गिरिदुर्ग हा प्रशंसनिय व प्रशस्त मानला जातो .दुर्ग हा वप्र आणि अट्टालक यांनी युक्त असावा .असे शंभूराजे म्हणतात  .स्वराज्याची पहीली राजधानी राजगड हा गिरिदुर्गच !

दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड हा सुद्धा गिरिदूर्ग प्रकारातच येतो .स्वराज्यातील बहुतेक किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारात येतात .

     असे सहा दुर्गप्रकाराचे विश्लेषण शंभूराजे यांनी केले आहे .महाराष्ट्राचे खरे वैभव या दुर्गातच आहे .हे शंभूनृपाने जाणले होते .

         या व्यतिरिक्त दुर्गाचे त्यांच्या वैशिष्टयावरून इतर प्रकार पडतात .

*मृददुर्ग*

मातीपासून तयार केलेला किल्ला

*अश्मदुर्ग*

निव्वळ दगडापासून तयार केलेला किल्ला.

*इष्टीकादुर्ग*

विटा व चुन्यामध्ये बांधलेला किल्ला.

*मरुदुर्ग*

वाळवंटात बांधलेला किल्ला.

*दारूदुर्ग व मेंढेकोट*

वेळू व लाकडांनी बांधलेला किल्ला .

*नृदुर्ग*

हत्ती,घोडे,रथ,पायदळ असे चतुरंग सेनेचे सरक्षण असलेला किल्ला.

असे इतरही प्राचीन ग्रंथात दुर्गाविषयी नोंदी आहेत . शंभूराजानी दुर्गावरील प्रत्येक भागाचे महत्व व उपयोगीतेचे विवेचन केले आहे शिवाय गडाचे प्रत्येक भाग व त्याचे महत्व संभाजी राजेंनी केले आहे.त्यांनी मांडलेले बारकावे हे आजच्या हजारो अभियंत्यानी व शास्त्रज्ञानी एकत्रीत येऊन मांडणी करता येणार नाही ती केवळ एकटया शंभूराजेंनी केलेली दिसते. यामध्ये या दुर्ग निरुपमातील प्रत्येक श्लोकातील शब्द अन शब्द बरेच काही सांगून जातो . एका झुंजार योध्यातील अपूर्व वास्तुविशारदता की जी शास्त्राच्या कसोटीवर टिकते ,यातील बारकावे हे सटीकतेने अभेद्यता वाढवितांना दिसतात .एक दुर्ग आपल्या राज्यासाठी कश्या पद्धतीने सज्ज असावा याचे भाष्य करताना संभाजीराजे पुढे म्हणतात -

         दुर्गावर एकाच वेळी १०० च्या वर लोकांचा नाश करणारी  यंत्रे दुर्गावर असावी शेकडो यंत्रानी तो दुर्ग सगळीकडून सज्ज असावा .राजाने या किल्याच्या मधोमध संपूर्ण साधनांनी युक्त असा ,सर्व बाजूनी काळजीपूर्वक विचार करुन विविध आयुधे,सुरक्षितते साठी गुप्त असा ,सर्व ॠतुमध्ये फळे ,फुले ,वृक्ष व जल देणारा शुभ्र असा राजवाडा तयार करावा.असा राजवाडा हा किती सुरक्षित असेल याची आपण कल्पना करू शकतो .अश्या देश कोश आदि सर्व साधने व वस्तु याच्या योगाने सुरक्षित झालेल्या उत्तम,स्वच्छ ,निर्मल,शुभ्र गुणांनी युक्त अर्थात पवित्र नगरात ,राजकीय चिन्हे संपन्न अश्या राजमंदिरात राजाने वास करावा.

       दुर्गामध्ये लांबलचक आयाताकार रांगा तयार कराव्यात .त्यापैकी एका पत्किंच्या टोकास चौथऱ्यावर प्रार्थनास्थळ असावे .दुसऱ्या रांगेच्या चौथऱ्यावर राजाचे राहण्याचे ठिकाण निर्माण करावे .तिसऱ्या चौथऱ्यावर धर्माध्यक्षाचे स्थान असावे .चौथ्या चौथऱ्यावर अग्रभागी गोपुरांची रचना करावी .अश्या स्वरूपाची चौरस, आयताकृती किंवा गोलाकार अशी तीन प्रकारची नगरचना करून घ्यावी असे संभाजी राजे सांगतात .

*अर्धचंद्रप्रकारं च वज्रकारं च कारयेत्*


शेवटी त्रिकोन यामधे याप्रमाने अर्धचंद्राकार किंवा वज्र आकाराची रचना करावी .

       राजवाडयाच्या दक्षिण दिशेला कोशागार करणे योग्य आहे व त्या कोशागाराच्या दक्षिण भागात गजशाळा म्हणजे हत्तीशाळा असावी .धनरक्षणाची ही रीत प्रशंसनिय आहे .अशी रचना ही संभाजी राजे यांच्या दुरदृष्टी व वास्तु विशारद असल्याचाच भाग म्हणावा लागेल .

       दुर्गावरील यज्ञशाळेचे मुख हे गजशाळेच्या पूर्वेस किंवा उत्तरेस करावे .दक्षिणपूर्वमध्य म्हणजे आग्नेय दिशेला आयुधागार बनविणे योग्य आणि तेथेच शेजारी रथ,शकटशास्त्र,धर्मज्ञ व दुसऱ्या कर्मशाळा असाव्यात .थोडक्यात या दिशेला सर्व औद्योगिक विभाग असावा .पुरोहीताचे घर राजवाड्याच्या डाव्या बाजूला करावे त्या भागात मंत्री ,ज्योतिषशास्त्र वेत्ता आणि राजवैदयाचे निवासस्थान असावे .महाभागांची निवासस्थानेही तयार करावीत .गाईचे गोठे,द्योडयाच्या पागा तयार कराव्यात .अश्वशाळा उत्तराभिमुखी असावी .राजाने अश्व रात्रभर नजरेखाली ठेवावेत व त्या अश्व शाळेत कोंबडे ,वानर,ठेवावीत .

गाई,हत्ती,घोडे इ.च्या मलाचे उत्सर्जन,देवदैवादिक कृत्ये सूर्य मावळल्यानंतर  करू नये असे संकेत दुर्ग निरूपणात संभाजी राजे देतात .

    योद्धे,शिल्पशास्त्रज्ञ अशा सर्वांना उत्तर घरे द्यावीत आणि मंत्रविदयाजाणकार व ज्योतिषांना तसेच घरे द्यावी .किल्यामधे मोठमोठे रोग उद्भवतात .राजाने गाई ,घोडे,हत्ती यांच्या रोगाचे निदान करण्यासाठी व रोगस्वरूप त्यांचे परिणाम यांचा सर्व अंदाज व्यक्त करून त्यावरील औषधांचे जाणकार वैद्याना किल्यात राहण्यास जागा  द्यावी .कुशल शीलवान ब्राम्हणांना दुर्गामध्ये स्थान असावे पण काही काम नसलेल्यांनी तेथे गर्दी करू नये .असे संभाजी राजे सांगतात .बुधभूषण या ग्रंथाच्या द्वितिय अध्यायातील दुर्ग निरुपणातील या बाबी संभाजीराजे एक कुशल योद्धा,सर्वश्रेष्ठ युवराज,थोर साहित्यीक,विचारवंत,तत्ववेत्ता त्याचबरोबर वास्तुज्ञास्त्र विशारद असल्याचेही स्पष्ट होते .दुर्गशास्त्राचे असलेले ज्ञान व त्यांनी केलेली बुधभूषण मधील दुर्गाविषयीची संपूर्ण मांडणी याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून मांडणी केल्यास अधिक स्पष्टता येईल.


संदर्भ


 बुधभूषण

 लेखक - छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले





संजय खांडवे

शुक्रवार, ४ जुलै, २०२५

बलदंड विंचूकडयाची साथ लाभलेला - लोहगड

 



बलदंड विंचूकडयाची साथ लाभलेला - लोहगड

➖➖➖➖➖➖➖

स्थान - ता .मावळ जि . पुणे , पुण्यावरून ६० कि.मी., उंची -३३८९ फुट

➖ .➖➖➖➖➖➖➖

     सहयाद्रीच्या भूगोलात फिरतांना महाभूमिचा प्रेरणादायी अन नवचैत्यन्य निर्माण करणारा इतिहास आपसुखच डोळ्यासमोर उभा राहतो . माय भूमिच्या रंध्रा - रंध्रात त्याग अन संघर्षाच्या आठवणी साठवल्या गेल्या आहेत . प्रत्यक्ष त्या स्थळी गेल्यावर जागृत झाल्या सारख्या वाटतात . जणू त्या घटनेचे आपण कधी काळी साक्षीदारच होतो की काय असा भास होतो . सह्याद्रीच्या मातीतच ही खरी जादू आहे .

          कुरवंडयातील नागफणी टेकडी पासून पवना अन इंद्रायणीच्या साक्षीने लोहगड , तिकोना ( वितंडगड ) , तुंग ( कठीणगड ) , विसापूर सोबतच प्राचीन भाजे , कार्ला , बेंडसे यासारख्या बौद्ध लेणी समुहात लोणावळा परिसराचं निर्सग सौदर्य अत्यंत फुलून जाते . पावसाळ्यात तर हा परिसर पुणे - मुंबईकरांनी हाऊसफुल होतो . या परिसरातील नावाप्रमाणेच अंगीभूत लोहा सारखा प्रचंड कणखर असलेला लोहगड पर्यटकांनी फुलून गेलेला असतो . पुण्यावरून लोणावळा मुंबई महामार्गाने जातांना मळवली पासून डाव्या बाजूस वळावे लागते . पुण्यावरून रेल्वेमार्गाने मळवली स्टेशनवरही उतरता येते . येथून  भांजे लेणी समूहाजवळून रस्ता पुढे अत्यंत चढाई व वळणाचा घाट चढून गायमुखखिंडीतून लोहगडवाडीत पोहचतो. पुण्यावरून देखीत कामशेत- पवनाजलाशयाच्या काठाने येणाऱ्या मार्गाने लोहगडवाडीत पोहचता येते . लोहगडाची दाट जंगलातून संपूर्ण परिक्रमा साहसी व प्रशिक्षित गिर्यारोहक करतात त्यांना या परिक्रमेत लोहगडच्या कठीण काताळात अनेक लहान गुफे सारखे लेणीसमूह व टाके आढळले आहेत . सामान्य पर्यटकाने हे साहस करू नये .  हजारो वर्षा पूर्वीचे बौध्द -जैन लेणी समूह या परिसरात आहे . लोहगड - विसापूर सारखे दुर्ग हे लष्करी तळा सारखे ज्या - त्या राजवटीच्या काळात सज्ज असल्यासारखे होते व आजही तसेच ताठ मानेने उभे आहेत .

         लोहगडवाडीतून पायरी मार्गाने गड चढाईस सुरुवात होते . दाट झाडी मधून दोन चार वळणे घेत वर गेले की वर प्रचंड मोठ्या बुरुजाचे दर्शन होते . या मधून निमुळती वाट काढत गेले की पहिला दरवाजा लागतो .हा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा , दोन्ही बाजूने गणेशाची मूर्ती शिल्प कोरली आहेत वर सुंदर कमान व तेवढेच आकर्षक नक्षीकाम नगाखाण्यासह दिसून येते . थोडे चालत गेले की समोरच एक तुटतेल्या तोफेसह चार तोफा आहेत व बाजूलाच एक देवनागरी लिपिमधील शिलालेख आहे . बाजूलाच एका बुरुजावर दगडी रेखीव घुमटासह मजबूत अशी खोली आहे यातून खाली नजर ठेवण्यास चऱ्या आहेत निवडक सैनिकासाठी विश्राम व्यवस्था येथे असावी . बाजूला मजबूत अशी तटबंदी आहे .वर नजर फिरवताच एकमेकांच्या सुरक्षेच्या कक्षेत येणाऱ्या बुरजांची रचना दिसून येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गडाच्या नावा प्रमाणे लोह धातू सारखी मजबूत अन रेखीव अशी आजही आहेत . पुढे काही पायऱ्या चढून सैनिकांच्या गस्तीसाठी मोठा मोकळा भाग दिसून येतो . प्रंचड मजबूत तटबंदी अन येथून एक भुयारी मार्ग देखील आहे व बाजूच्या कोपर्यातून एक चोर दरवाजा देखील आहे . ऐसपैस असलेल्या तटबंदीवर महादरवाज्याच्या रक्षणार्थ अर्ध गोलाकार बुरुज अगदी मधोमध वर जाणाऱ्या दगडी पायऱ्या हा येथील स्थापत्य शैलीचा अप्रतिम नमुना आहे . येथून उजव्या बाजूला तटबंदी सह निमुळता मार्ग वर जातो व वळणावर काताळात दोन पाण्याची टाकी आहेत आजही अगरी काचासारखे स्वच्छ पाणी या टाक्यात आहे. पुढे नजरेस पडतो तो नारायण दरवाजा, याच्या दोन्ही बाजूस देवळ्या आहेत . शिवनेरी सारखी दरवाज्यावर दरवाजे व मजबूत तटबंदी अशी रचना या दुर्गाची आहे . सर्वात शेवटी व सर्वात मोठा हनुमान दरवाजा आपले लक्ष वेधून घेतो . शेवटी जर शत्रू या दरवाज्या समोर पोहचलाच तर चारही बाजूच्या तटबंदीच्या रचनेत त्याचे लढणे अशक्य आहे . हनुमान दरवाज्याच्या दोन्ही बाजूस सरक्षक देवता हनुमंताचे शिल्प आहे . दरवाज्याचे नक्षीकाम अप्रतिम आहे . आत आल्यावर इंग्रजी एल आकारात इमारतीचा भाग आहे .या ठिकाणी गडावर येणारे - जाणारे तथा इतर प्रशासकिय काम चालत असावे . उजव्या बाजूस पुन्हा एक कमान आहे व या कमानीतून वर आल्यावर एक घुमटाकार इमारत आहे . त्याच्या बाजूलाच शिवकालिन सभागृह (सदरेची ) इमारतीचा ओटा आहे त्यावर आता दोन तोफा आहे . संपूर्ण गडाला अगदी तटबंदी वरून फेरा मारता येतो . विसापूर किल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यास इमारतीचे काही अवशेष दिसून येतात . त्याच्या समोरच काताळात कोरलेली घोड्याची पागा आहे . चारा - पाणी व्यवस्थेसाठी आत छोटे हौद आहेत . या पुढे असे चालत गेले की लक्ष्मी कोठीची गुहा आहे समोर मोठा हॉल व आत तीन ते चार टप्प्यात खोल्या कोरल्या आहेत . एकाच वेळी शंभरच्या जवळपास लोक या गुहेत आसरा घेऊ शकतात . या कोठी वरून गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी सातवाहन काळापर्यन्त या गडाचा इतिहास पोहचतो . गुप्त, चालुक्य, राष्टकुट, यादव, बहामनी , निजामशाही, आदिलशाही, मोगल, शिवरायांचे स्वराज्य , पेशवाई व इंग्रज या सर्व राजवटीत लोहगडाची लोहाची भूमिका होती . १६४८ च्या आसपास लोहगड महाराजांनी घेतला होता . पुढे राजकिय तडजोडीत पुरंदरच्या तहात २३ किल्ल्यात लोहगड पण होता . १६७० मध्ये पुन्हा महाराजांनी त्याला स्वराज्यात घेतले . कारतलब खान , अमरसिह, रायबाधिन हे स्वराज्यावर चाल करत कोकणाच्या स्वारीवर जातांना याच जंगलातून कुरवंडे गावातून उंबरखिंडीत उतरतांना महाराजांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. १६६४ मध्ये सूरतेची केलेली लुटीतील खजाना नेतोजी पालकरांच्या नेतृत्वात या गडावर याच लक्ष्मी कोठीत ठेवला गेला होता . समोर गेल्यावर गायमुख खिंडीच्या वर एक दर्गा आहे . गडाच्या मध्यभागी उंच माथा आहे याला फेरा मारत निसर्ग निर्मित प्रंचड भिंती सारख्या विंचूकड्याकडे पोहचतो . पंधराशे मीटर लांब व तीस मीटर रुंद विंचवाचा सोंडेसारखा गडाच्या उंचीच्या थोडा खाली आहे . या बलदंड विंचूकडयाची साथ सदैव गडास राहीली आहे येथून सर्वदूर नजर ठेवता येते . माचीवर आयाताकृती पाण्याचे टाके आहे . अगदी टोकावर मजबूत चिलखती बुरुज आहे . खाली भुयारी मार्गाने या बुरुजास गोल फेरा मारता येतो . माचीवरून फिरतांना बहुतेक ठिकाणी काळजी घ्यावी लागते . परत हनुमान दरवाज्याच्या दिशेने जातांता काताळात कोरलेते अनेक पाण्याची टाकी आहेत . एका छोट्या टाकीत पिण्यायोग्य अत्यंत गार पाणी आम्हाला पिण्यास मिळाले . १६ कोनी प्रचंड मोठा पाण्याचा दगडी तलाव त्यात उतरण्याचा पायरी मार्ग सोबतच पाणी वर काढणे व सोडण्याची प्राचीन प्रणाली या वास्तुत बघायला मिळते . बाजूलाच वरच्या दिशेने एक छोटे शिवमंदीर आहे व त्याच्या पाठीमागे सुद्धा एक दगडी बांधकाम केलेला पाण्याचा सुंदर तलाव आहे . गडावर पाण्याची व्यवस्था अगदी चांगली असल्याने या गडाची प्राचीन राजकीय कारकिर्द ही महत्वाचीच राहिली आहे . इतर छोटे तलावही आहेत पण आता ते गाळात गाळले गेले आहेत . विविधरंगी रानफुले अन गवतामुळे याचे सौदर्य अधिकच मोहक दिसते . लोहगड  उतरतांना समोर दिसणारा तुंग , तिकोणा अन विसापूर , पवनेचे अप्रतिम निसर्ग सौदर्य आनखी पुढचे मुककाम वाढवा असेच खुणवत असतो .



संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...