मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )



शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )

➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . अकोले जि. अहमदनगर
उंची : १३९१ मी
मार्ग :  समृध्दी महामार्गावरून सिन्नर किंवा भारवीर इंटरचेंज जवळून उतरून, किंवा संगमनेर वरून अकोले - राजूर मार्गे जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्सगाचं अप्रतीम सौदर्य हे सहयाद्रीत च बघायला मिळते . याच कुशीत अहमदनगर व नाशिकच्या अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात . सर्वतीर्थ जटायु मंदिर टाकेद व सिन्नर येथील प्राचीन गोंडेश्वर  मंदीर जवळच आहेत . एका भल्या मोठ्या लांब पट्टया सारखा दिसणारा हा गिरीदुर्ग पट्टा गड मन प्रसन्न करतो . शिवाजी महाराजांनी या किल्यावर काही दिवस विश्रांती केली होती म्हणून याचे नाव विश्रामगड पडले . वरील मार्गाने आपण पट्टावाडी जवळ पोहचलो की डांबरी रोडने थोडे पुढे गेले की आधुनिक काळातीत एक सिमेन्टची कमान दिसते . या ठिकाणी चौकी आहे .नाम मात्र प्रवेश फी भरून प्रवेश मिळतो . वनखात्याच्या माध्यमातून या परिसरात सवंर्धनाचे काम झालेले दिसते . समोरच एक तोफ व आताच्या काळात बसविलेला हत्ती दिसतो . समोरच किल्याच्या माहिती विषयीचे नकाशासह फलक दिसून येतात यावर नजर फिरवून गेले म्हणजे भ्रमंती करतांना किल्ला चांगला समजून घेता येतो . वळणदार चढाई करत गेले की वन खात्याने बनविलेला पायऱ्या लागतात वाटेतच आताच्या काळात बनविलेला एक दरवाजा वजा स्वागत कमान लागते . तटबंदीचे अवशेषही नजरेस येतात . या वाटेने चढाई करत असतांना काताळात कोरलेल्या लहान मोठ्या गुफांचा समूहच आहे . सैनिकांच्या निवाऱ्या साठी वापरला जात असावा असे दिसते . यामधे एक लक्ष्मणस्वामी गुफा आहे  बाहेर देवदेवतांची सुंदर शिल्पे आहेत .येथूनच आपल्याला दोन काताळाच्या मध्ये असलेल्या चीऱ्यात भव्य तटबंदी बांधलेली दिसते . पुढे वर  चढत आल्यावर एक प्रशस्त गुफा आहे २५ ते ३० व्यक्ती राहू शकतील अशी आहे . थोड्याच अंतरावर एक छोटा भुयारी मार्ग आहे आत पाणी साचलेले दिसते . उजव्या बाजूला मजबुती ने उभा असलेला त्र्यंबक दरवाजा आहे . या वाटेने पट्टावाडीत उतरता येते . काळ्या दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून गेले की एक पाण्याचे टाके आहे .या टाक्याचे दोन भाग आहेत अगदी शिवनेरीवरील साखळी मार्गा जवळ असलेल्या टाक्यासारखे आहे . अष्टभूजाधारी पट्टादेवी मंदिर या टाक्याच्या परिसरात आहे . 
              पठारावर पोहचत आलो की मेघडंबरी मधे असलेला शिवरायांचा अर्धाकृती पुतळा पाहिल्यावर येणाऱ्या  मावळयाचा थकवा नाहीसा होतो अन प्रत्येकजन जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देत आपसूकच नतमस्तक होतो . पाठीमागे अंबरखाना दिसतो . किल्यावरी ही वास्तु सुस्थितीत आहे आत शिवचरित्रातील अनेक प्रेरणादायी प्रसंग उठावदार शिल्पामधे आहे . शिवराज्याभिषेकाचा प्रसंग जीवंत वाटणाऱ्या मूर्ती रूपाने उभारला आहे .अंबरखान्याच्या आजू बाजूला जुन्या वाडे व वास्तुचे अवशेष आढळतात . हा किल्ला नैर्सगीक कातळाची तटबंदी लाभलेला आहे हे प्रचंड लांबलचक पठारावर गेल्यावर  कळते . येथून सोन टेकडी व त्याच्या विरुध्द बाजूस जाता येते . पाण्यासाठी अनगिणत टाके हजारो वर्षापूर्वी येथे निर्माण केले गेले व ते आजही वापरात आहेत .
     कोकणवाडीच्या बाजूला कडेलोट दरवाजा आहे . त्याच्या पुढे कोकण दरवाजा आहे दोन्हीचेही आता फक्त अवशेष दिसतात . शिवकालिन बंधारा आजही पाणी साठवून ठेवण्याचे काम करतो . त्याच्या खाली सुद्धा अजून एक तलाव आहे म्हणजे पट्टा किल्या वरील थोड देखील पाणी वाया जात नाही त्याच्या बाजूला तटबंदी व बुरुज दिसतात . पठारावर काताळात कोटलेल्या अजस्त्र पाण्याच्या टाकी आहेत . समोरच बारा टाके समुह आहे . बरेच टाके भूमीगत पद्धतीने आतुन जोडलेली आहेत पाणी अत्यंत शुद्ध व थंड आहे . बारा टाकी समुहा पेक्षा आकाराने मोठ्या  सात टाक्यांचा समूह आहे . यासोबतच अनेक गुहा किल्यावर आहेत त्यापैकी एक धान्यकोठार म्हणून आहे .ऐसपैस जागा असलेल्या या गुहेत जमीनीत धान्यसाठवणी साठी दोन खोल राजंणा सारखे कोठ्या आहेत प्राचीन काळापासून याचा उपयोग होत असावा .
          किल्यावरील सर्वात उंच भाग म्हणजे सोनटेकडी या टेकडीकडे जातांना डाव्या बाजूला कातरकडा आहे सुरक्षेसाठी लोखंडी रिलिंग आहे . सोनटेकडीच्या सर्वोच्च शिखरावर सुरक्षित केलेला व्हयु पॉईन्ट आहे . वारा प्रचंड वाटत असल्याने काळजी घ्यावी लागते .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C आकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे आहे .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे .पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी अहोरात्र रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड  केली .त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते , शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या किल्यास विशेष महत्व आहे . महाराजांनी१६ ते १९ नोव्हेंबर १६७९ मध्ये जालनापूरवर स्वारी करून लुटले . महाराजांनी व्यकोजीराजे यांना लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख येतो .मुघल मुलुखाच्या या स्वारीत त्यांनी चांंगला वचक बसविला त्यावेळी शहजादा मुअज्जम हा औरंगाबादातच होता . त्याला वळसा घालून महाराज संगमनेरकडे निघाले त्यावेळी अहमदनगरहून येणाऱ्या  रणमस्तखा, आसिकखान व जाबताखान यांच्या ८ ते १० हजार फौजेने महाराजांच्या सैन्यावर हल्ला  केला . त्यावेळी सिदोजी निंबाळकर , हंबीरराव मोहिते , संताजी घोरपडे , मानाजी मोरे हे महाराजा सोबत होते . सिदोजी व हंबीररावांनी रणमस्तखा सोबत लढाई केली व महाराजांना स्वराज्य कार्यासाठी लागणारी लूटीच्या सर्व सामानासह पट्टा किल्याकडे पाठविले या लढाईत सिदोजीराव धारातीर्थी पडले स्वराज्य कार्यासाठी इतरही सरदारांनी जीवाची पर्वा न करता लढाई जिंकली या महान बलीदानानेच महाराजांना पुढे जाणे शक्य झाले .ही लढाई पावनखिंडच्या लढाईची आठवण करून देते . महाराज बर्हीर्जी नाईकांच्या सुचविलेल्या मार्गानुसार म्हाळुंगी नदीच्या काठाने 30 नोव्हेंबर १६७९ रोजी  पट्टा किल्यावर पोहचले . या ठिकाणी ते १७ दिवस होते . हा किल्ला अत्यंत मजबूत होता मुबलक पाणी ,तटबंदीची व घनदाट जंगलाची सुरक्षितता व मोठी शिबंदी ह्या कारणाने महाराज येथे थांबले . रमणीय निर्सग व आरोग्यास उत्तम असे वातावरणाने महाराज समाधानी झाले असावे . महाराजांच्या आयुष्यातील ही शेवटची मोहीम ठरली . या किल्यावर केलेली विश्रांती यामुळे या किल्यास विश्रामगड असे नाव पडले. 



संजय खांडवे

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

चावंड किल्ला

प्राचीन व्यापारी मार्गाचा पहारेकरी : किल्ले चावंड
➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . जुन्नर जि. पुणे
उंची : ३४०० फुट
मार्ग : जुन्नर वरून आपटाळे मार्गे २० कि मी., छत्रपती संभाजी नगरहून नगर - आळेफाटा किंवा समृध्दी महमार्गारून सिन्नर जवळून उतरून जाता येते 
➖➖➖➖➖➖➖

जुन्नर परिसरातील शिवनेरी नंतर अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणजे चावंड किल्ला होय . याला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद ,प्रसन्नगड अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली . गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला आहे . हा किल्ला दुर वरून पाहताच एक महाकाय दगड़ा सारखा दिसतो . चारही बाजूने नैर्सगिक कातरकडा आहेत . त्यामुळे पूर्वीच्या युध्दतंत्रा नुसार शत्रूंना  हा गड चढाई करण्यास अशक्य असे . त्या कातरकडावरही काही ठिकाणी तटबंदी केल्याचे अवशेष आजही दिसतात .
            जुन्नरवरून नाणेघाट मार्गावरील आपटाळे मार्गे तास दिड तासात आपण चावंडवाडी कमान असलेल्या फाट्यावर पोहचतो कमानीतून थोड आत गेले की डाव्या बाजूला एक छोटी घरघुती हॉटेल व पार्कींग साठी जागा आहे . उजव्या हाताला समोर महाकाय चावंड किल्ला दिसतो आम्ही सकाळी नऊच्या  सुमारास किल्ल्याच्या छायेत होतो सूर्य त्यामागे लपला होता . वनविभागाच्या हददीतून चालत असतांना आताच्या काळातील बाधीव पायऱ्याने चढाईस सुरुवात करावी लागते . १५ ते २० मिनिटाची बांधीव पायऱ्याची वळण घेत जाणारी श्रृंखला संपली की खडकात फसविलेले लोखंडी रिलिंग दिसतात पूर्वी पायऱ्या होत्या पण त्या ब्लांस्टींग करून इंग्रजांनी उडविल्या . वाट एकेरी आहे पण लोखंडी आधाराने खोल दरीची भिती कमी होते . कमी अधिक ठिकाणी लोखंडी वायर रोपही आधाराला आहेत . थोड पुढं गेले की नळीच्या आकाराच्या खोलगट चरीतून दगडी पायऱ्या चढत गेले की , थोड्या ओट्या सारख्या भागात येतो . या ठिकाणी आलेला शत्रू बरोबर दोन बुरुजांच्या टापूत येतो .  डाव्या हाताला गणेश दरवाजा दिसतो . येथील दरवाजा व बुरुजाच्या अर्ध्याच्या अधिक भाग त्याच जागेवरील अखंड दगडात कोरलेला आहे व उर्वरीत वरील भाग दगडाने बांधीव आहे . मध्यभागी सुंदर गणेशाची मूर्ती शिल्प आहे . पुढे काही पायऱ्या चढून गेले की  तोफ नजरेस पडते . इथपर्यन्तच्या चढाईस तास दिडदासाचा वेळ लागतो . आजूबाजूला अनेक इमारतीचे दगडी अवशेष आढळतात . उंच वाढलेले गवत अन दाट झाडीमधेही वाडे आदि इमारतीचे भाग दिसतात . या उंच गवतामधे अनेक पायवाटा आहेत त्या भुलभुलैय्या सारख्या वाटतात . किल्ल्याच्या मध्य भागाकडे उंच टेकडीकडे चालत गेल्यावर  चावंड देवीचे दगडी मंदिर दिसते . मंदिर अगदी छोटे आहे आजू बाजूला कोरीव दगडांचे अवशेष आहे . हा भाग बाले किल्या सारखा वाटतो . समोरच एक दगडी दिपमाळ आहे . समोर मिळेल तशी पायवाट चालत गेले की पाण्याची काही टाके वाटेत लागतात . या ठिकाणी एक दगडी शौचकुप बघायला मिळतो . ड्रेनीज ची व्यवस्था सह याचा वापर कसा होत असावा याचीही प्रचीती येते. थोड चालत गेलं की एक पुष्करणी आहे त्याच्या समोर अत्यंत कोरीव दगडांचे पडझड झालेले शिव मंदिर व समोर नंदी आहे . पुष्करणी मधे पाणी असून त्या ठीकाणी सात 
कोनडे कोरलेले आहे. उजव्या बाजूला पायवाटेने  गेले की माणिकडोह (शहाजी सागर ) धरणाचे विहंगम दृष्य दिसते व ही वाट आपल्याला लेणी समुहाकडे घेवून जाते . दगडात कोरलेल्या लेण्या हया धान्य कोठार किंवा सैन्याच्या निवासासाठी वापरत असावे . पुन्हा परत वर येऊन थोडे पुढे गेले की सप्तमातृका टाके नजरेस येते . पाण्याची ७ टाके एकमेकांना जोडलेली दिसतात . एकाच दगडात ही पाण्यासाठी कोरली गेली . खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आत जाण्यासाठी दगडात दरवाजा कोरलेला आहे त्यावर गणेशाची मुर्ती आहे . सप्तमातृका ह्या पाण्याचा देवता आहेत ह्या जलस्त्रोताचे रक्षण करतात . प्रत्येक पाण्याच्या टाक्यांची पाण्याची पातळी वेग वेगळी आहेत. वेरूळ च्या कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत . पटना येथील बिहार म्युझिअम मध्ये या सात मातृ कांची सुंदर शिल्पे जतन करून ठेवली  आहेत . तशीच छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्राहलय मुंबई येथे सुद्धा अशी सुंदर शिल्पे बघायला मिळतात.ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली . येथूनच उगम पावणाऱ्या कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .
      किल्ल्यावर मुककामाची सोय नाही पण जेवण्याची सोय पायथ्याशी चावंडवाडीत होते .  किल्ल्यावर जातांना पाणी सोबत घेवून जावे . चढाई साठी ग्रीफ असलेले बुट वापरावे . पाण्याच्या खाली बाटल्या परत येतांना खाली आणाव्यात .कातरकडा काटकोनात असल्याने फोटो किंवा सेल्फी काढतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

महा वारसा

*महा वारसा*

विश्वाची निर्मिती संदर्भात चर्चा करतांना जो महत्वाचा विचार समोर येतो की,   एका मोठ्या महाविस्फोटातून विश्वाने आकार घेतला . अगणित धुलीकण व वायु पासून ही आकाशगंगा तयार झाली .आईनस्टाईन व स्टिफन हॉकीन्स सारख्या जगविख्यात शास्त्रज्ञांनी याची मांडणी केली . असंख्य कोटी वर्षाच्या कालखंडाच्या उत्क्रांती नंतर पाणी- सूक्ष्मजीव - जलचर आदि जीवांचे स्थित्यांतरे होऊन मानवी उत्क्रांती होत मानव अश्मयुगापर्यन्त आला . निर्सग शक्ती पुढे लीन होत ताम्रपाशान काळापर्यन्त आला .पृथ्वी , जल , वायू, अग्नी या निर्गुण शक्ती ची उपासना करत जंगलात समूहाने पर्वत गुहा आदि अधिवासात राहू लागला . मध्यप्रदेशातील  भोपाळ जवळील भिमबेटका या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यावर दहाहजार वर्षापूर्वीचा मानवी संस्कृतीची कल्पना येते . आजही शाबूत असलेल्या भित्ती चित्रावरून त्या काळच्या लोकजीवनाची प्रचीती येते . पुढे हाच मानव वसाहतीच्या समृध्दी बरोबरच सृजन व सुफलतेच्या मातृदेवतांचे उपासना करत तो निर्गुण उपासनेकडे वळू लागला . मग याच गरजेतून कृत्रीम अधिवास , वर्षावास , शैलगृहे , लेणी , मंदिरे , सुरक्षितते साठी  दुर्ग, गावांना तटबंदी ,प्रार्थना स्थळे आदि निर्माण झाली विविध राजवटीत त्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक तथा सुरक्षाविषयक व सांस्कृतीक परिस्थिती नुसार वास्तु निर्माण कार्य केले गेले .
      ऋग्वेदामधे तटबंदी करून लोक राहत व ही तटबंदी जल , गिरी , वाळवंट, खंदक, कृत्रीम तटबंदी , विषारी वनस्पती याची असत व त्या अधिवासास 'पूर ' म्हणत . सिंधू संस्कृतीमधेही अशीच कृत्रीम  तटबंदी पूरांना होती. ही पूर म्हणजे दुर्गच !  महाभारतातही शांतीपर्वात दुर्गाची माहिती येते . रामायणातही दुर्गाचा उल्लेख आलेला आहे . कौटिल्याच्य अर्थशास्त्रात सुद्धा अध्याय 2 मधे दुर्गरचना व किल्याची नगररचनेचे विवेचन केले गेले आहे . 'अभिलाषितार्थचिंतामणी ' या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर दुर्गाचे नऊ प्रकार सांगतो .रघुनाथपंत हनुमंते कृत 'राज्यव्यवहारकोषात ' दुर्गवर्ग म्हणून स्वंतत्र प्रकरण आहे . 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ' असे रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहलेल्या आज्ञापत्रातील दुर्ग या प्रकरणात येते.
धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।
वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥
छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .
           लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली . सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो.   दुर्ग हे व्यापारी मार्गावरील पहारेकरी तर लेणी ह्या आश्रयगृहे म्हणून होती . नाणे घाटाच्या व्यापारी मार्गातील सर्वच किल्ले व लेणी याची साक्ष देतात . लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला . सातवाहन , वाकाटक ,गुप्त , राष्ट्रकूट , चालुक्य , यादव आदि काळात अनेक मंदिर व शिल्पे निर्माण झाली. पुढील काळात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार केला. शेकडो बारव, तलाव घाट व पाणवठे लोकोपयोगासाठी  बांधले . अशा या समृध्द व भव्य निर्माणा मागे आपल्या पूर्वजांची एकजूट दिसते . हजारो वर्षानंतर आजही टिकून असल्याने या निर्माण कार्यातील प्रामाणिकपणा, वैज्ञानिक अचूकता , स्थापत्य निपुणता , भौगोलिक ज्ञानाची परिपूर्णता जाणवते . हा आपल्या महाभूमिचा समृद्ध वारसा आहे. आज मात्र हा काळाच्या ओघात नष्ट होत आहे . गडकोट, बुरुज ' तटबंदी ढासाळतांना दिसत आहे . बहुतेक वारसास्थळे तर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली दिसतात .अनेक प्राचीन मंदिरे व लेण्या सर्वधनाच्या प्रतिक्षेत आहेत .लेण्या मधील प्राचीन चित्रशैली पुसत चालली आहे. कोणे एके काळी मुबलक पाणी पुरवणारी प्राचीन बारव , पुष्कर्णी व तलाव गाळवटत आहेत . प्राचीन मंदिराचे सिमेंटीकरण व त्यावरील आधुनिक रंगलेपन हे मूळ वास्तु पासून दूर घेवून जात आहे . स्मृतीपटलातून दूर होत आहे . आपल्या पूर्वजांच्या डोळयांनी जे पाहीले ते पुढच्या पिढीतील डोळ्यांना आता आहे तसे तरी  बघायला मिळेल की नाही याची शाश्वती कमीच वाटायला लागली आहे . *दै महाभूमि मध्ये प्रत्येक सोमवारला " महा वारसा " या साप्ताहिक सदरामध्ये आपल्या महाराष्ट्र भूमितील प्रत्यक्ष भेटी दिलेल्या गड किल्ले ,लेणी , मंदिरे , बारव आदि प्राचीन वारसा स्थळांचे ऐतिहासिक महत्व विश्वासर्ह संदर्भासह आम्ही वाचकापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत . गड किल्ले ,लेणी ,मंदिरे या विषयी सविस्तर माहिती सह भ्रमंतीकारांना पोहचण्याचा मार्ग व त्या ठिकाणची महत्वाची ठिकाणे , संभाव्य धोके टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आदि विषयी माहिती देणार आहे या माध्यमातून आपल्या प्राचीन महा वारसा  संवर्धन व जतनाच्या कार्याची छोटीशी सुरुवात करत आहोत .*


संजय खांडवे
इतिहास अभ्यासक 
9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...