सोमवार, १ मार्च, २०२१

पाषाणात कोरले प्राचीन धान्य कोठार असलेला किल्ले हडसर

सहयाद्रीच्या पर्वत रांगेत हरिशचंद्रगड,चावंडगड ,महिषगड या नाणेघाट परिसरात प्राचीन मार्गावरील सरक्षणार्थ बांधलेला हा हडसर /पर्वतगड येतो .सातवाहन,शिलाहार,यादव,या काळाचाही हा किल्ला साक्ष देतो .

    जयराम पिंडे यांच्या पर्णालपर्वतग्रणाग्रहणाख्याम या संस्कृत ग्रंथात हडसरचा उल्लेख येतो .


तथैव चामुंडगिरी हरिशचंद्रस्तथैन च।

महिषोप्यड्सरस्तांवद गृहीतावतिसंगरात ॥


चावंड,हरिशचंद्र,महिषगड,हडसर,हे किल्ले शिवाजी राजांनी जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे .

सहस्त्रकरविक्रम शहाजीराजे यांनी १६३६ -३७ मध्ये मोगलांशी केलेल्या माहुलीच्या तहात या किल्याचा उल्लेख येतो.१७०२ मध्ये  मराठयाकडून औंरगजेबाने जिंकून घेतला पुढे १७४८ मध्ये मराठयानी हा गड पुन्हा जिंकून घेतला .१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला .गडावर पोहचण्यासाठी दक्षिणेकुडून म्हणजे हडसर गावाच्या बाजूने खुंटीची वाट व खिंडीची वाट आहे .गडाला वळसाघालून आल्यावर पेठेची वाडी कडून पायरीचा राजमार्ग आहै .आम्ही पेठेची वाडी या गावकुसात आमची वाहणे उभी करुन सोबत पाण्याचा पुरेसा साठा सोबत घेऊन चढाई सुरू केली .

सरळ चढाईच्या पायऱ्या या गडाच्या मुख्य द्वाराकडे घेऊन जातात .एकाच दगडात कोरलेल्या नळीच्या पायऱ्या मन वेधून घेतात व दक्षिण बाजूस खिंडीची वाट दृष्टीस पडते.मुख्य दरवाज्यातून वर जातांना एकाच पाषाण काताळात कोरलेल्या नक्षीकामासह सदरी दिसतात .ही वाट पायऱ्या सह वळणघेत गडावरील पहील्या पाण्याच्या टाक्या पर्यन्त घेऊन जातात .त्या टाक्याच्या काठावर एक सुंदर छोटे शिवलिंग कोरलेले दिसते .आम्ही दक्षिण बाजूच्या कातर कडेने जाताना एक मोठा मातीचा तलाव दिसतो त्यात पाणी आहे व त्या तलावार्तगत छोटे छोटे टाके दिसतात .गाळ साचल्याने ते अदृष्य झाल्यासारखे दिसतात .त्या खालोखाल असलेल्या टाक्याचे गाळ उपसण्याचे काम सुरु आहे.त्या ठिकाणी एक समाधीही दिसते .पुढे गेल्यावर जमीनीत कोरलेले धान्याचे कोठार आहे एकाच अंखड दगडात शैलगृहाची निर्मिती आहे.नागमोडी वळने घेत वाट तयार करण्यात आली आहे ही वाट चौकात पोहचते व तीनही बाजूने धान्याची कोठारे आहे .बाहेर ओसरी सारखा भाग असून छोटे द्वार झरोके निर्माण करुन आत खाली सात ते आठ फुट खोल व १५X१५ फुट मापाच्या खोल्या धान्य साठविण्यासाठी आहेत .आत गर्द अंधार आहे .आतून काळवंडलेले या धान्य कोठारात राख दिसते .ही आग शेकडो वर्षापूर्वी धान्याला लागली होती त्याची ही राख असल्याचे सांगीतल जाते . पावसाचे व पाझरणारे पाणी कोठारात येऊ नये म्हणून दगडात पन्हाळ कोरलेले दिसते .धान्याच्या अगदी वरच्या भागात पाण्याने भरलेला तलाव आहे हे विशेष .

    गडाला फेरफटका मारत पूर्व दिशेला पोहचताच पूर्वेकडील खोल कातरकडा दिसते. शत्रूला चढाई करण्यास अशक्यच आहे .या भागात अनेक पाण्याचे टाके आहे .जीवंत पाण्याची झरे सुद्धा दिसतात . गडावर काही पाळीव गाय व दिसतात .पूर्वी  खाजगी जनावरे चरायला यायची पण वनविभागाने ही जनावरे गडउतार करण्यात आली पण काही जनावरे ही सापडली नाही त्यांची ही वंशावळ गडावर मुक्तसंचार करतांना दिसतात .खुंटीच्या वाटेच्या बाजूने प्रचड बुरुज आहे .प्रचंड मोठया दगडाच्या अवशेषात शैलगृहात देवीचे मंदीर आहे .त्यासमोर पाण्याने भरलेले दगडात कोरलेले पाण्याचे टाके आहेत .सपूर्ण गडाला गोल भ्रमंती करुन आल्यावर तलावाजवळ पोहचतो त्या ठिकाणी बाहेर नंदी असलेले। शिवमंदीर आहे .दक्षिणेला राजवाड्याचे दगडी अवशेष आहेत .

   हिंदवी परीवाराच्या माध्यमातून आदरनिय शिवरत्न शेटे यांच्या प्रेरणेने संपूर्ण परिवारासोबत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली .



संजय खांडवे

बुलढाणा


हडसर गडाची उत्तरेकडील कातरकडा ,पाठीमागे पेठेची वाडी आहे

गडावर जाण्याचा मुख्य राज मार्ग

राजमार्गावरील पायऱ्या


एकाच पाषाणात कोरलेला दरवाजा

मुख्य दरवाज्यात असलेली सैनिकासाठी दगडात कोरलेली नक्षीकाम असलेली खोली

गडाच्या उत्तरे कडील बाजूस जुन्नर वरून येताना हडसर या गावाकडून ही खिंडीची वाट
नळीच्या पाषाणात कोरलेल्या पायऱ्या


पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेले शिवलिंग
सेवाभावी संस्थेकडून टाक्यातील साचलेला गाळ काढने सुरू आहे

गडावरील तलाव
धान्यकोठाराकडे जाण्यासाठी कोरलेला मार्ग
धाान्य कोठार 



जीवंंत् झरा










खुंटी ची वाट

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

नाणेघाटाचा पहारेकरी"किल्ले चावंड"

 

नाणेघाटाचा पहारेकरी '"किल्ले चावंड "


हिंदवी परीवाराची कोरोना काळात योग्य ती काळजी घेत या वर्षीची हिवाळी मोहींम पार पडली .आमचे मार्गर्शक इतिहासकार डॉ शिवरत्न शेटे सरांच्या प्रेरणेतून ,दुर्गअभ्यासक श्रीकांत कासट सर परीवाराची धुरा आपल्या खांदयावर घेणारे संभाजी भोसले,अमोल मोहीते यांच्या नियोंजन पूर्वक कृती कार्यक्रमातून  अतिक्षय उत्साहवर्धक वातावरणात जुन्नर परिसर दोन दिवसात अभ्यासपूर्णरित्या जाणून घेतला .

     मोहीमेंचा पहिला दिवस ओझर येथील बेस कैम्प वरील आदरनिय शिवरत्न शेटे सरांचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्रगीताचे गायन करुन मोहीमेंला सुरूवात झाली .

    ओझर वरुन जुन्नरकडे आम्ही मार्गस्त झालो तेथून आपटाळे -नाणेघाट मार्गावर भव्य काताळरूपी डोंगरावर चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहचलो .औझर वरुन हा रस्ता एक ते दिड तासाचा आहे .नाणेघाट कडे जाणाऱ्या या मार्गावरून जातांना उजव्या बाजूला लोखंडी कमान दिसते .कमानीतून आत गेल्यावर १ की मी पुढे गेलो की आपण गडाच्या पायथ्याशी पोहचतो.पुढे हा रस्ता चावंडवाडीला जातो .भव्यदिव्य अश्या चावंड दुर्गाचे रूप समोर उभे राहते .याची उंची १०६५ मीटर येते. आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा सूर्यही या गडाच्या पाठीमागे  झाकलेला होता.

      या गडाला महाराजांनी स्वराज्यात घेतल्यावर प्रसन्नगड असे नाव दिले .या गडाला चामुंडगड,चावंडस,चाऊड,चामुंडगिरी ,जोंद,चौंद,चौड,जौंद अशी कालानुरूप नावे प्राप्त झाली .

 या गडाचा इतिहास फार प्राचीन आहे .नाणेघाटातून येणाऱ्या मार्गावरील हा पहारेकरीच म्हणावा लागेल .कल्याण बंदर,कोकण या मधून जे व्यापार देशावर चालायचे या साठी सातवाहन काळात जीवधन,हडसर व शिवनेरी सोबत या सुद्धा किल्ल्याची निर्मिती करण्यात आली .कुकडी नदीच्या खोऱ्यातून जाणाऱ्या या मार्गावर अचूकतेने लक्ष ठेवता येईल अशी रचना चावंड किल्याची आहे .

    १४८७ मध्ये मलिक अहमद या निजामाने हा किल्ला जिंकण्याचा उल्लेख आहे .शहाजी राजे यांच्या वतनदारीत १६३७ पर्यन्त हा किल्ला त्यांच्या ताब्यात होता नंतर मोगलाकडे गेला .१६७२ -७३ मध्ये जुन्नर परीसरातील हडसर,हरीशचंद्रगड आदी किल्ले शिवरायांनी जिंकून स्वराज्यात आणली त्या वेळी चावंड सुध्दा जिंकला होता व या गडाचा परिसर पाहून महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड ठेवले .पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला होता तेव्हा त्याने या किल्यावर सुरतसिंग गौड याला किलेदार नेमले होते पण तो यायच्या आतच हा किल्ला मराठ्यांनी जिंकला होता .पुढे लगेच गाजीउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला .पेशवे काळात हा किल्ला राजकैदी ठेवण्यासाठी होता .२ मे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला शेकडो तोफगोळे या किल्यावर इंग्रजांनी डागले होते .वर जाण्याच्या पायऱ्याही इंग्रजांनी ब्लॉस्ट करुन उडविल्या .त्याचे खानाखुणा आजही निरिक्षणातून जाणवतात .

      आता वनविभागाने काही अंतरापर्यन्त पायऱ्या बांधलेल्या आहेत .या नळीच्या वाटेने पुढे गेल्यावर प्रवेश द्वार दिसते .या पाषाणाच्या दरवाजावर मध्यभागी गणेशमूर्ति आहे .दरवाजातून वर गेल्यावर पाषाणात कोरलेल्या पायऱ्या आहेत वर जाताच एक छोटी तोफ आता बऱ्यापैकी तयार केलेल्या लाकडी चाकावर ठेवलेली आहे .डोंगरमाथ्यावर प्रचंड दगडाचे अवशेष नजरेस पडतात .जुने वाडे इमारती याचे जोते व त्याचे पडलेले भाग दिसतात .दाट झुडपातून डोंगर माथ्याकडे एक पाऊल वाट जाते या वाटेत झुडपात इमारतीचे  अवशेष दिसतात .ही वाट या गडावरील चावंडा देवीच्या मंदीराकडे घेऊन जाते .चर्तुभूज देवीची मूर्ती या मंदीरात आहे .दोन माणसा एवढी जागा असलेलं हे मंदीर आहे.मंदीराबाहेर दिपमालेचे अवशेष दिसतात .मंदीरापासून पूर्वेकडे गडाच्या पठारावर उतरत गेले की बरीच पाण्याची टाकी आहेत .पिण्यायोग्य पाणी एवढया उंचीवर उन्हाळ्यातही असते .गडाच्या उत्तर दिशेकडे ही पाऊलवाट चालत जात असता पुष्कर्णो बारव आहे या बारवेला कोरीव काम केलेले दिसते .बरीच शिल्पे ,खांब तुटलेली आहेत बाहेर नंदी आहे व शिव मंदीर आहे बारवेत जिवंत पाणी आहे .गडावर पाऊलवाटेवर कुठे काय आहे याचे छोटे फलक असल्याने बरीच अडचण दूर होते .याच परिसरात सप्तमातृका पाण्याचे टाके  आहे .सात प्रचंड मोठी टाके या काळ्या दगडात कोरलेले आहे .त्यात गडाव२ वर्षभर पुरेल येवढे पाणी आहे .या टाक्यात उतरण्यासाठी एका बाजूने दगडात कोरलेला पायऱ्यासह दरवाजा आहे त्यावर गणेशमूर्ति आहे एखादया वाडयात प्रवेश करावा असा हा दरवाजा आहे तो पाण्यापर्यन्त जातो .सातही टाके एकमेंकांशी जोडलेली आहे पण प्रत्येक टाकयाच्या पाण्याची पातळी वेगवेगळी आहे हे विशेष .साती आसरा या पाण्याच्या ठिकाणी असतात त्या सप्तमातृका याच्याशी संमधीत असाव्यात .कैलास लेणी मधील क्रमांक १४ च्या लेणीत गाभाऱ्यातील भिंतीवर सप्तमातृकाचे शिल्प आहेत .यात हंसारूढ -ब्राम्ही,नंदीवर -महेश्वरी,मयूरावर -कौमारी,गरुडावर -वैष्णवी,महिषावर -वाराही,गजावर -इंद्राणी ,घुबडावर -चामुंडा अशी वाहनावर ललितासनात या सप्तमातृका आहेत .ही सप्त मातृका आपल्या प्राचीन् परंपरेतील भाग आहे अगदी सिंधू संस्कृती पासून याचा संदर्भ जोडता येईल.यातील घुबडावरील चामुंडा या मातृकेवरुनच या गडाला चामुंडगिरी असेही म्हटले जायचे .ती या सप्त मातृकापैकीच एक आहे .

    गडाच्या उत्तरेकडील कातर कडेवर यादवकालिन गुफा आहेत .या गुफा सैनिक आधिवासासाठी वापरल्या जात असाव्यात .या ठिकाणाहून हजार मीटर उंचीवरुन कुकडी नदीवरील मणिकडोह जलाशय म्हणजेच शहाजीसागर जलाशयाचे निळेशार पाणी मन प्रसन्न करुन टाकते .येथून निमगिरी,हडसर ,शिवनेरी दृष्टीक्षेपात येतो .हरीशचंद्र डोंगररांगासुद्धा येथून दिसतात .पुन्हा वर सप्तमातृकाकडे चालत येऊन गडाचा नळीच्या वाटेकडे परत जातांना गडावर दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात .प्राचीन काळातील स्वच्छता गृह आजही त्या ठिकाणी बघायला मिळते .दगडात कोरलेले हे स्वच्छतागृहाचे भांडे आहे .पाण्याची व मलमूत्राची विल्हेवाट लावण्याची रचनाही स्पष्ट दिसते .गडाला खालून वर येणाऱ्या शञूला रोखण्यासाठी तटबंदीची गरज नाहीच एवढी ही प्रचड कातरकडा आहेत पण वरील लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही धोकादायक ठिकाणी तटबंदी आहे . गडावर राहण्या खाण्यासाठी व्यवस्था नाही पण गडाखालील चावंड वाडीत व्यवस्था होते असा हा प्रसन्नदूर्ग मनाला प्रसन्न करून जातो .



संजय खांडवे

9011971122






गडाच्या पायथ्याशी


काही अंतरापर्यन्त वनविभागाने केलेल्या पायऱ्या


अवघड ठिकाणी केलेली रिलिंग



पूर्वीच्या दगडी पायऱ्या




 गणेश मूर्ती कोरलेला गडाचा  मुख्य दरवाजा


वर पोहचतास ही तोफ 
दिसते




चावंंड देवीचेे मंदिर



गडाच्या पूर्व भागात असलेले पाण्याचे टाके



पुष्कर्णी बारव व महादेवाचे मंदीर



सप्तमातृका टाके

गडाच्या उत्तर दिशेला खाली दिसणारा कुकडी नदीवरील माणिकडोह धरण
(शहाजीसागर जलाशय)



यादवकालिन गुफांचा समुह (लेण्या)


गडावर असलेले प्राचीन काळातील शौच्छालय

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...