सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

लोकसंस्कृतीचा अविष्कार जपणारा सण: दिवाळी*

 *लोकसंस्कृतीचा अविष्कार जपणारा सण: दिवाळी*


जशी आपली प्राचीन सिंधू संस्कृती आहे तश्याच अनेक संस्कृती आपल्या पृथ्वीतलावर नांदून गेल्या. त्यांना 'सभ्यता' असेही म्हणतात. सभ्य लोकांनी निर्माण केलेली संस्कृती म्हणजे 'सभ्यता'. हजारो वर्षानंतरही आज जगाला प्राचीन संस्कृती विषयी विलक्षण आकर्षण आहे. याचे कारण त्यांच्या लोकजीवनातील परंपरेतून निर्माण झालेले आदर्श, आजही आपल्या जीवनाशी जुळून पहिले तर ते सरसच ठरतात. जगातील जवळपास संस्कृतीच्या मुळाशी माता आहे. जसे व्हिनस, इश्तार , मिनर्व्हा, आदि स्त्रीरूपदेवता इतर संस्कृतीत आढळतात. तशाच आपल्या मोहेंजो-दडो -हडप्पा या सिंधू संस्कृतीच्या प्राचीन शहरातील उत्खलनात मातृदेवतांची प्रतीके सापडली आहेत .पूर्वी समूहाने राहत असताना स्त्री त्या समूहाची प्रमुख असे .पुढे गण व्यवस्था अस्तित्वात आल्या व ती गणाची प्रमुख झाली. सृजनशीलता स्त्रीच्या अंगी होती. ती नवनिर्मितीची प्रेरणा होती .तिच्यामध्ये असलेल्या विशेष कार्याने ती मातृदेवतेच्या स्थानावर पोहोचली. निरीक्षणातूनच तिने शेतीचा शोध लावला. जन माणसांच्या नेणीवेत असलेली 'निऋती ' ही शेतीचा शोध लावणारी पहिली स्त्री ठरली.

     आपल्या प्राचीन संस्कृतीची नाळ कृषी परंपरेची अगदी घट्ट बांधलेली आहे .भाद्रपद अमावश्येच्या दुसऱ्याच दिवसापासून सणसमारंभाची रेलचेल दिसते .प्रदिर्घ वर्षाकाल संपल्यानंतर भूमाता धन, धान्य आणि सौंदर्याने भरून जाते. अश्विन शु. पासून नवरात्र उत्सवास म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजनास सुरुवात होते .अश्विन शु. पौर्णिमेला लक्ष्मीच्या आगमनानिमित्त जागरणातून "को जागर्ति" म्हणजे कोण जागे आहे अशी विचारणा करून आपल्या लेकरांच्या कृतीशीलतेची चाचपणी मातृदेवता करत असल्याची जाणीव होते. धन ,धान्य, समृद्धीचा व विचार ,आचार सदाचारांचा व परंपरेचा कोजागिरी हा मेळावा आपल्या कृषी परंपरेचा भाग ठरतो.

     महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा डॉ सरोजिनी बाबर यांनी 1990 ला संपादित केलेला दसरा दिवाळी हा ग्रंथ महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आरसाच ठरतो. आपल्या वाडवडिलांनी चालवत आणलेल्या प्रथा, परंपरेचे पुण्यस्मरणच या निमित्ताने होते. दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा सण आहे. इ. स. पूर्व पासून याचे पुरावे आढळतात. हीच समिक्षा या ग्रंथाच्या संपादनातून संपादकांनी केली आहे. दिवाळीला इ.स. 1 ते इ. स. 400 या काळात "यक्षरात्री" म्हटले जायचे. वात्सायनाच्या "कामसूत्र" या ग्रंथात हे नाव वापरल्याचे आढळते. आज पासून 1700 वर्षांपूर्वी "दिपप्रतिपदुत्सव" असे कनोजच्या राजाने आपल्या नागानंद या नाटकात म्हटलेले आढळते .कश्मीरमध्ये इ. स.800 च्या काळात नीलमन पुरानात "दिपमाला "असे संबोधले गेले. इ.स.949 मध्ये सोमदेव सूरीने लिहिलेल्या "यशस्तिलक" या ग्रंथात दिवाळीची वर्णने येतात. संत नामदेव ,संत ज्ञानेश्वराच्या समकालीन असलेल्या महानुभाव साहित्यातील "लीळाचरित्रात" तेलंग स्नान व ओवाळणीचा सोहळा वृत्तांत येतो. अबुल फजलच्या "एने अकबरी" मध्ये दिपावलीचे वर्णने आढळतात .अकबरही त्याच्या संपूर्ण महालात दीवे लावायचा .दौलत खांण्या समोर 40 फुट उंच स्तंभ रोवला जायचा व 16 दोरखंड लावून त्या स्तंभावर विशालदीप लावला जात असे. जैन धर्मातही चार दिवस दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. भगवान महावीरांच्या मोक्षानंतर या उत्सवास सुरुवात झाली. 2500 वर्षांपूर्वी अमावश्येच्या दिवशी त्यांचे निर्माण झाले होते .आता ज्ञानाचा दीप निघून गेले आहेत म्हणून आपण मातीचे दीवे पेटवून प्रकाश प्रज्वलित केला पाहिजे म्हणून ही परंपरा जपली जात आहे. प्रभू रामचंद्रांचे 14 वर्षे वनवासातून आगमन होणे या क्षणालाही या उत्सवाची दीपोत्सवाच्या रूपाने जोडले जाते.

      अश्विन महिन्यातील 12 वा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसालाच वद्य द्वादशी असे म्हणतात .गाई, म्हशी, शेळ्या ,मेंढ्या ही शेतकऱ्यांची खरी संपत्ती. "गाई, म्हशींनी भरला वाडा, बळीच राज्य '! अशी म्हणायची प्राचीन प्रथा आहे. वसुबारस हा कामेधेनूची पूजा करण्याचा दिवस आहे. कामेधेनू ही मनाची इच्छा पूर्ण करणारी असते. कामे धेनूचा समुद्रमंथनाचा संदर्भ कालिका पुरवण्यात येतो. दिवसभर उपवास करून कृषक संस्कृतीत गाई- वासरा विषयीचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो या दिवसाला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात.

     अश्विन महिन्यातील 13वा दिवस हा  धनत्रयोदशीचा असतो. वैद्यकशास्त्रात पूजनीय असलेल्या धन्वंतरी देवतेचा जन्म अश्विन शुद्ध त्रयोदशीला झाला अशी मान्यता आहे. समुद्रमंथनातून अमृत कलश याच देवतेने वर आणला होता असे पुराणात सांगितले जाते. दक्षिण दिशेला दिप लावून दीपदान करण्याची प्रथा या दिवशी आहे. यातून दक्षिण दिशेचे महत्त्व विषद होते .जैन धर्मात या सणास 'ध्यान तेरस' असेही म्हणतात. भगवान महावीर हे निर्वाणाच्या आधी योगनिद्रेत गेले म्हणून असे म्हटले जाते.  नरकचतुर्दशीला सुद्धा दिवाळीच्या सणात विशेष महत्त्व आहे. नरकासुराची कथा आपण ऐकत आलो आहोत नरक राजा आणि इंद्र यांचे वैर होते.पण श्रीकृष्णाने  नरकासुराचा वध केल्याची कथा पुरानात आहे. नरक राजाचे नाव या दिवशी या सणाला दिले गेले. रोगराई ,दुर्गंधी दूर व्हावी म्हणून घर स्वच्छ व पवित्र केले जाते न चुकता साफसफाई ,रंगरंगोटी नंतर तैलमर्दन व अभ्यंगस्नान अपरिहार्य असते. शरद काळामध्ये थंडीची चाहूल लागलेली असते आणि वातावरणामध्ये बदल झालेला असतो. आरोग्य विषयक बाबींशी संबंधित या गोष्टी जीवन सुखी आणि समृद्ध करणाऱ्या असतात. राजस्थानात हा दिवसाला "रूपचौदस" म्हणतात.अश्विन अमावश्येला येणारा लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा दिवस असतो कृषी परंपरेतील हा दिवस धान्य लक्ष्मीपूजनाचा मानला जातो नवीन घरात आलेल्या धान्याच्या राशीचे फळांचे पूजन या दिवशी केले जाते .धन हे धान्य नंतर आले. आजही आपण नववधूला घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने येत आहे असे मानतो .त्या नववधूच्या हातात धान्य घेऊनच घरात प्रवेश करतो. अगोदर देवाला नैवेद्य (शेतात पिकवलेल्या धान्यापासून) मगच कृषी संस्कृतीतील लोक भोजन करतात यामधून आपले आपल्या परंपरेची असलेले नाते किती दृढ आहे हे समजते. खरं तर लक्ष्मीचा संमंध पृथ्वीशी आहे. ती भूमाता आहे. कर्दमातून कमळ फुलतो व या कमळात लक्ष्मीचे वास्तव्य आहे म्हणून या भूमातेची पूजा म्हणजे कृषी आराधनाच आहे. पुरानांनी आठ लक्ष्मी सांगितल्या आहेत. धान्यलक्ष्मी ,धनलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी व राजलक्ष्मी या सर्व क्षेत्री मातृशक्तीच आहे जैन व बौद्ध साहित्यातही लक्ष्मीचा उल्लेख येतो पितळखोरा लेणी मधील गजलक्ष्मीचे पॅनल आजही मुंबईच्या संग्रहालयात आहे. लोणावळ्यातून उंबरखिंडीत उतरताना आम्हाला अनेक ठिकाणी गजलक्ष्मीची शिल्पे बघायला मिळाली होती. गजलक्ष्मी मध्ये दोन्हीही बाजूला गज म्हणजे हत्ती आपल्या सोंडेतून भूमीवर पाण्याचा वर्षाव करत आहे. हे सुफलतेचे प्रतीक आहे आज आपण नवीन चित्रांमध्ये गजांच्या सोंडेतून धनाचा वर्षाव होताना बघतो. आता सोन्या चांदीचे मूर्ती तथा शिक्के आपल्याला दिसतात. गृहलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, कुललक्ष्मी यामधून मातृशक्तीचा सन्मान होताना दिसतो.

       कार्तिक महिन्यातील प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. बळीराजाच्या स्मरणाचा दिवस, सम्राट बळीराजाच्या गौरवाचा दिवस." इडा पिडा टळो बळीच राज्य येओ" हे मौखिक परंपरेतून आपण ऐकत आलो आहोत विशेष करून ओवाळणी करत असताना स्त्रियांनी हा कानमंत्र पुढे पुढच्या पिढीला देत राहण्याचं काम केलं. पुरानकथांमध्ये बळीराजाची कथा सांगितली जाते. वामनाने कपटाने बळीला पातळात घातल्याची कथा आहे. प्राचीविद्यापंडित डॉ आ. ह. साळुंखे यांच्या बळीवंश या ग्रंथामध्ये बळीराजाची समीक्षा करण्यात करून बळीराजाला न्याय दिला आहे. महात्मा फुले यांनी देखील बळीराजाला कुलस्वामी संबोधिले आहे .हजारो वर्ष ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे .असा दानशूर ,जिवलग, आमचा लाडका, बळीराजा. तसेच महान तत्ववेता, संविभागी स्वतः सर्वज्ञ, समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना एकमेकांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी सम्राट बळीराजा. निर्मितीगर्भ कृषीला जपणारा, शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक सकारात्मक क्रियाशील समाज रचना घडवून आणणारा समाज शिल्पकार, कारस्थान कपटांना निर्मळ निरागस मनाने सामोरे जाणारा उन्नत महामानव, पराभवातही पराभूत न होणारा ,शांतताचित्त तत्त्ववेत्ता इतका जिवलग की सात काळजाच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका हा बळीराजा उदार व उदात्त होता.

जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात

*बळी सर्वस्वे उदार।* *जेणे उभारीला कर।*

       बळीराजा हा सर्व अंगाने उदार असा आहे. दान देण्यासाठी त्याने आपला हात वर केला आहे. पण वामनाने 'कहार' करून बळीराजाला पाताळात घालण्याचं काम केलं आहे .

*करूनी  काहार।*

*तो पातळी घातला।।* समतावादी संस्कृतीचा महानायक कार्तिक प्रतिपदेला म्हणजेच बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा राजा बळीराजा प्रजेला भेटायला येतो. अशी उदात्त भावना आहे या दिवशी ग्रामीण भागात बहीण भावाला ओवाळताना "इडा पिडा टळो बळीच राज्य येओ". असे पुटपुटते त्याच दिवशी वामनाने कपटाने बळीराजाला पातळात घातले आणि आपला बळीराजा आपल्याला पुन्हा भेटायला येतो तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा .याच दिवशी प्रजा आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करून बळीपूजन करत असते आणि आपल्या दानशूर संविभागी न्यायप्रिय अशा राज्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असते.

      कार्तिक वद्य द्वितियेस भाऊबीज साजरी होते .त्याला यम द्वितीय असेही म्हणतात. हा दीपावलीचा शेवटचा दिवस यमाने आपल्या बहिणीच्या म्हणजे यमीच्या घरी जाऊन ओवाळणी करून घेतली.  भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा सण आहे. पूर्वीच्या काळी दळण-वळण अभावी जवळची माणसं भेटणं अवघड व्हायचं त्यासाठी या सणास विशेष असे महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या सणाच्या दिवशी गाईच्या शेणाचे दहा गोळे करून अंगणात ठेवत असत. त्यावर पळसाची डहाळी टोचून ते वाळल्यावर छतावर फेकून दिले जाई. त्याला मेढे असे म्हणत. भाऊबीजेला भाऊ घरी आला की त्या  गोळ्यावर तापविलेल्या पाण्याने त्याला अभ्यंगस्नान बहीण घालत असे. लहानपणी भाऊरायांसाठीची जात्यावरची गाणी आपण आई ,आजी, आत्या यांच्या तोंडून  रामप्रहरी जात्यावर ऐकली आता मात्र हा लोकसंस्कृतीचा अविष्कार लोप पावत चालला आहे . जैनांमध्ये  देखील महावीरांचे भाऊ नंदीवर्धन  व बहीण सुदर्शनाची भाऊबीजची आठवण सांगितली जाते.

        सणांची नाळ ही लोकसंस्कृतीशी आपल्याला जुळलेली दिसते .विशेष करून कृषीसंस्कृतीशी ती अगदी जवळचं नातं सांगत असते. प्रत्येक भागा नुसार प्रथा व परंपरा या वेगवेगळ्या असतात आपल्या परंपरेत अनेक धार्मिक मिथके देखील सांगितली आहेत. पुराना मधूनही अनेक मिथके आलेली आहे. ही मिथकं आपल्याला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतात. कथा, दंतकथा, जातक कथा व मिथकं हे आपल्याला काहीतरी सांगून जातात. ती खोटी निश्चितच नसतात त्यातून सत्यता शोधावी लागते. या मिथकांच्या साह्याने आपण सत्यशोधन करू शकतो .यालाच मिथकशास्त्र असेही म्हणतात. या  आणि आपल्या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आपल्या परंपरेच्या माध्यमातून त्याचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करून आपण आपल्या संस्कृती सवर्धन व जतन करण्यासाठी साठी काम करू शकतो ही काळाची गरज आहे. नाहीतर येणाऱ्या पिढीला आपण आधुनिकतेच्या काळात आपल्या  मूळ प्रथा -परंपरेमध्ये सतत सर- मिसळ करून भेसळ देत राहू अशी भीती वाटते.



संजय खांडवे

9011971122

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

प्रयोगशील शिक्षकाची सेवापूर्ती*

 *प्रयोगशील शिक्षकाची सेवापूर्ती*

〰️〰️〰️〰️〰️✒️

न लगे चंदना सांगावा परीमळ।

वनस्पतिमेळ हाकारुनी।।

 अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी।

 धरिता ही परी आवरे ना।।


जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की चंदनाला आपल्याकडे सुगंध आहे हे सांगण्यासाठी त्याला वनस्पतींचा मेळावा भरून जाहीर करावं लागत नाही किंवा सांगावं लागत नाही. त्याचा असलेला सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत राहत असतो ते अंतर्यामी असतं ते स्वभावतःच बाहेर धावत अविष्कृत होण्यासाठी ते उतावीळ होत असतं चंदनाने ते आपल्या आत कितीही आवरून धरायचं म्हटलं तरीही त्याला ते आवरता येत नाही असा तो सुगंध असतो. नेमकं असंच चंदनासारखे झिजणारं आणि सुगंध देणारं व्यक्तिमत्व म्हणजे विष्णू धंदर सर!

 जे मुळात आत मध्ये दडलेल असतं त्या सुगंधाला अन झिजण्याला वारसा देखील असतो. अगदी चंदना प्रमाणेच तो मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे झिरपणारा असतो. आपल्या महाराष्ट्र भूमीच्या पवित्र मातीचा वारसा देखील चंदनाप्रमाणे झिजणारी आणि सुगंध देणारी माणसं तयार करण्याचाच आहे.

       मराठवाडा -विदर्भ सीमेवर असलेल्या बुलढाणा तालुक्यातील डोमरूळ या गावांमध्ये बळीवंशीय कुटुंबात विष्णू धंदर सरांचा जन्म झाला. शिक्षणाचा वसा आणि वारसा या कुटुंबाला आपल्या वडिलांपासूनच मिळाला. वडील स्व हिरामण धंदर हे निवृत्त मुख्याध्यापक होते. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढल्याने त्यांना सर्व सामाजिक समस्येची जाण होती. धाड परिसरातच जि प शाळतूनच आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य आपल्या वडिलांप्रमाणेच हाती घेतले. 1985 ला लोणार तालुक्यातील गुंजखेड या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून त्यांनी शिक्षणाचे हे महान कार्य सुरू केले. प्राथमिक शिक्षणापासून दूर गेलेली खेड्यापाड्यातील मुलं ही शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे त्यांना दर्जेदार व गुणवत्तार पूर्ण शिक्षण आपण दिलं पाहिजे हा ध्यास  मनात घेऊन गणित,विज्ञान व क्रिडा या आवडीच्या विषयाने त्यांनी या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आपल्या सेवेतील पहिली तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांनी धामणगाव धाड या ठिकाणी दिलेल्या आपल्या दहा वर्षाच्या सेवेत एक्स्ट्रा क्लास,रात्रीचे वर्ग,ग्रामिण क्रिडा स्पर्धेत धामणगावच्या क्रिडापटूनी खो-खो,कबड्डी,कुस्ती स्पर्धेत अनेकवेळा राज्य स्तरावर यश मिळवले असे अनेक उल्लेखनीय कामे केली. आजही या परिसरात सरांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतल्या जाते. त्यानंतर गिरडा बिरसिंगपूर,ऊबाळखेड,दाभा, व दहिद या अजिंठा डोंगर रांगेत वसलेल्या ग्रामीण भागात सरांनी आपली  सेवा पूर्णत्वास नेली . यामध्ये जिल्हा परिषद शाळा गिरडा तीन वर्ष व जिल्हा परिषद शाळा बिरसिंगपूर येथे आठ वर्ष आणि सेवानिवृत्त होताना ते "आय एस ओ" मान्यांकन मिळवून दिलेल्या दहिद बुद्रुक या गावातून उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून सेवा मुक्त होत आहेत.

         "विज्ञानाचा विष्णू" म्हणून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात ख्याती मिळवली. यामागे त्यांच्या परिश्रमाचा, मेहनतीचा,जिद्दीचा आणि एक विज्ञाननिष्ठ शिक्षक असल्याचा भाग आहे. 2002 मध्ये त्यांना डाॅ बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञा सूर्य पुरस्काराने मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत किनवट या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. बळीवंशीय कुटुंबातून आल्यामुळे त्यांच्या विज्ञानाच्या प्रकल्पावरही कृषी ची छाप होती. गिरडा या ठिकाणी असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मातीचे विविध प्रकार सर्वांच्या समोर आणले व त्यांच्या या विज्ञानाच्या प्रकल्पाला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला होता. म्हैसूर येथे राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये अंड्याची टरफलं व वापरलेली चहा पावडर पासून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या बालवैज्ञानिकांनी प्रयोगातून मांडला. राष्ट्रिय बालविज्ञान परिषदेत जिल्हा परिषदेची बिरसिंगपूर एकमेव शाळा सहभागी झाल्याने त्या वेळचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या प्रकल्पाचे कौतुक केले होते."चहा पावडर" चे सेंद्रिय खत या विज्ञानाच्या प्रयोगाला राज्यस्तरावर नागपूर या ठिकाणी सादर करण्याचा बहुमान त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला मिळाला. म्हैसूर या ठिकाणीही त्यांची निवड झाली. 2003 साली त्यांनी तालुका शिक्षण सल्लागार समितीवर काम केले. मा.नंकुमार जंत्रे साहेब व संभाजीराव सरकुंडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्याने जिल्हास्तरावर महत्त्वाचा सहभाग नोंदविला. 2004 मध्ये "पाणी फक्त मुळांना" हा गोहाती (आसाम) येथे राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनातील त्यांचा प्रयोग खूप गाजला. हा भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मणिंद्र शुक्ल यांच्या "धम्माल सुट्टी" या सदरामध्ये त्याची नोंद घेण्यात आली. 2006 मध्ये लातूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये "सुगरण चूल" ही मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याची मान उंचावणारी ठरली. यावेळी मा. विलासराव देशमुख व आताचे आपले पालकमंत्री मा. दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा त्यांच्या या प्रकल्पाला भेट दिली होती. भविष्यात विजेचा तुटवडा निर्माण होणार याची भान ठेवत त्यांनी चंद्रपूर या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये आधुनिक वॉटर हीटर हा प्रकल्प मांडला होता. या प्रकल्पाचे दखल सुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री मा. वसंत  पुरके यांनी घेतली शेगाव या ठिकाणी झालेल्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुद्धा "जैविक कीटकनाशक" या प्रकल्पातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारे सहकारी शिक्षक यांचेही नाव घ्यायला ते विसरत नाहीत. बिरसिंगपूर या शाळेत असताना  मा. उमेश जैन सरांची व मा सुभाष देवकर सरांची त्यांना फार मोठी साथ मिळाली होती. जि प उच्च प्राथमिक शाळा दहिद बुद्रुक या शाळेला आदर्श शाळा व आयएसओ मान्यांकन मिळून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्याचबरोबर त्यांच्या या प्रयत्नाला त्यांच्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी जी साथ दिली त्यांचेही आभार ते मानायला विसरत नाहीत. आपण करत असलेलं काम हे एक टीम वर्क असते अशी त्यांची सतत भावना काम करताना असायची . या सामूहिक प्रयत्नातूनच मला हे साध्य करता आले असेही ते म्हणतात.

          विज्ञानाच्या विष्णूची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची, ज्या समाजात आपण लहान चे मोठे झालो त्या समाजाप्रती सदैव कृतज्ञ असणं हे त्यांना आवडते. म्हणून त्यांनी त्यांच्या या कार्यासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी की जे एमबीबीएस, इंजीनियरिंग यासारख्या उच्च शिक्षणासाठी मोठी फी भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचं ध्यास त्यांनी अंगी घेतला आहे व त्या दिशेने त्यांचे कामही सुरू आहे आतापर्यंत त्यांनी तीन विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी फी उपलब्ध करून देण्याचे मोठं काम केलं आहे. हे काम सुद्धा एका सामूहिक जबाबदारीने ते करत आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना अधिकचा वेळ मिळेल आणि त्या वेळेत ते या पद्धतीने समाजाची सेवा करून समाजासाठी या देशासाठी आदर्श नागरिक घडवत राहतील असा त्यांचा मानस आहे. विज्ञानाच्या विष्णूने त्यांना शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या संधीचं सोनं केलं .आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले ते विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत बरेचसे सातासमुद्रा पारही आहेत. निश्चितच त्यांनी केलेल्या या कामाचं त्यांना या सेवानिवृत्तीच्या वेळी समाधानच आहे. येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्य घडत राहो या सदिच्छासह त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच कामना.



संजय खांडवे

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...