मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

रतनवाडीचा अमृतेश्वर*

 *रतनवाडीचा अमृतेश्वर*


भारतात मूर्तिपूजेची सुरुवात कधीपासून झाली यामध्ये संशोधकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मूर्ती पूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून आपल्याला काल निश्चितीसाठी मदत होते. हडप्पा व मोहेंजोदडो मधील सापडलेले अनेक अवशेष आपल्याला याची साक्ष देतात .मध्य एशियामधील पर्वतमय प्रदेशातील सुमेरियन या संस्कृतीमध्ये मानव देहधारी देवतांचा उल्लेख मिळतो. ही संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. प्राचीन मेसोपोटोमियातील संस्कृतीमध्येही पुरातत्त्व अवशेषावरून मूर्ती व शिल्पे आदींचे निर्माण झाल्या विषयाची माहिती मिळते. ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजेस सुरुवात झाली, स्वाभाविकच आहे त्या अगोदरच मूर्ती शिल्प बनविण्याच्या कलेचा विकास झाला असावा. मेसोपोटोमिया मध्ये इसवीसन पूर्व 15 शतकात मिश्र लोकांनी त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती भव्यसमारंभात विधीपूर्वक आणली होती. ही घटना मूर्ती पूजेच्या त्या काळापासून असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. पतंजलीभाष्य, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, महाभारत, आदिग्रंथामध्ये मूर्ती शिल्पे ,मंदिरे याचा उल्लेख आढळतो. पाणिनी देखील आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख करतात.

बौद्ध धर्मात लेणी निर्माणाची सुरुवात केली गेली त्या काळात शैलाश्रये ही ध्यान साधनेसाठी वापरली जात असत. हीनयान लेणीमध्ये स्तूपांची चैत्यगृहाची निर्मिती झाली ,पुढे महायानांनी मोठ्या प्रमाणात लेण्यांमध्ये बुद्ध मूर्तीचे निर्माण केले. महाराष्ट्रात जवळपास शेकडो च्या वर लेण्या आढळतात या लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला आपल्या देशात जवळपास सर्व धर्मात मूर्तिकलेला व शिल्पकलेला फार महत्त्व दिले गेले व यामधून मूर्ती पूजनासही सुरुवात झाली. शिव उपासनेला भारतात विशेष महत्त्व आहे. गुप्तकाळात मूर्तिकलेच्या दृष्टीने ठरलेला सुवर्णकाळ हा शिवाच्या मानव रुपी मूर्ती निर्माणास पोषक ठरला अशा मूर्तींची संख्या कमीच आहे पण लिंगमूर्ती ची संख्या अधिक निर्माण झाली. यामध्ये एकमुखी, बहुमुखी, द्विमुखी, पंचमुखी,  अष्टमुखी असे प्रकार आहेत पण गुप्तकाळात एकमुखी लिंग अधिक निर्माण झालेले आढळते. जीवाला शिवाची प्राप्ती आणि प्रकृती व पुरुष या प्रतीकांच्या रूपाने लिंग पूजेस प्रारंभ झाला. याचे आणखीही काही प्रकार आहेत यामध्ये स्वयंभू लिंग की जे नैसर्गिक भूमी मधून निघालेले असते .बाणलिंग  काकडी किंवा अंड्याच्या आकाराचे असते व ते पवित्र नदी मधून प्राप्त होते.


*छत्रभं त्रपुषाकारं कुक्कुं टाण्डनिभं तथा ।*

*अर्धेंन्दु सदृशं चाथ बुब्दुदाभं पंचमम्।।*


शिल्परत्नाच्या उत्तर भागात, दुसऱ्या अध्यायात छत्राप्रमाणे, काकडी प्रमाणे, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे तसेच अर्धचंद्र सदृश्य आणि जल थेंबाप्रमाणे अशा पाच प्रकारचा लिंगाचा वरचा भाग असतो असे म्हटले आहे. राजलिंग ,घटितलिंग मानुषलिंग ही बसवून तयार केली जातात .याचा आकार मोठा असतो.  राज लिंगामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे एक मुखी ,बहुमुखी असे प्रकार असतात घटित लिंगामध्येही अष्ठेत्तर लिंग, सहस्रलिंग असेही प्रकार येतात. 

 नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अनेक शिवमंदिरांचे निर्माण झाले. ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर  यासारखी ज्योतिर्लिंगे तर आपण ओळखतोच. याशिवाय महाराष्ट्राच्या अनेक भागात शिव मंदिरांचे निर्माण झाले मार्कंडेश्वर ,धुपेश्वर, माणकेश्वर, सिद्धेश्वर पाताळेश्वर ,हरिश्चंद्रेश्वर अमृतेश्वर ,असे अनेक मंदिरे सांगता येतील अशापैकीच एक अमृतेश्वर या शिवमंदिरास भेट देण्याचा योग आला नावाप्रमाणेच निसर्गाच्या सौंदर्यातून सतत अमृत वर्षाव होत रहावां असंच हे ठिकाण .अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या गंगेत सामावणाऱ्या प्रवरेचा उगम याच स्थानावरून होतो हेच ते शिवस्थळ आहे. प्राचीन मंदिराच्या पाठीमागे पाठीराखा सारखा वाटणारा प्रचंड असा प्राचीन रतनगड आपल्याला दिसतो.

  सानंददरी ,कळसुबाई, हरिश्चंद्रगड ,अलंग, मदन कुलंग ही सह्याद्रीची वैभव संपदा याच अमृतेश्वराच्या परिसरात आहे. पुण्यावरून 200 तर मुंबईवरून 180 किलोमीटर अंतरावर हा अमृतेश्वर येतो .संगमनेर- अकोले -राजुर - भंडारदरा मार्गे देखील पोहोचता येते. कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भागात हे मंदिर आहे.  भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरवर येणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे. भूमीज प्रकारातील नागरशैलीमधील सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या या काळ्या दगडात अप्रतिम नक्षीकाम असलेल्या प्राचीन मंदिराचे निर्माण झाले आहे. मुख्य मंदिरावर शिखरी-शिखर प्रकारातील छोटी छोटी शिखरे अगदी सूक्ष्म शिल्पकलेतून साकारलेली दिसतात. आमलकापर्यंत दोन्ही बाजूने चौकोनाकार लता कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे त्यासमोरच गाभारा आहे.  गाभाऱ्यातून पुढे सभामंडपात जाता येते.  सभामंडपातील खांबावरील कोरीव काम 1000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेच्या सुवर्ण युगाची आठवण करून देते. या सभा मंडपात आपण हरवून जातो. जणू काही पुन्हा त्या काळात गेलो की काय असा भास होतो भूमिती- बीजगणिताच्या कसोटीच्याही पलीकडे असणाऱ्या भौमितिक रचना, मूर्तिकाम, शिल्पपट ही आजच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानाला मागे टाकताना दिसतात.

यक्ष ,भारवाहक, प्राणी, पक्षी, वेदिका,  देव, दानव, अप्सरा, सुरसुंदरी आदी शिल्प येथे कोरलेली आहेत.  मंदिरावर काम शिल्पे देखील आहेत. पुराणातील समुद्रमंथनाचा देखावा येथे शिल्पीत केला आहे. गर्भगृहाच्या वर कीर्तीमुख, शंख व कमळ वेली आहेत बाहेरच्या भागातही कीर्ती मुख्य कोरलेली आहेत .प्रकाश योजनेसाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक प्राचीन मंदिराजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून पुष्करणी अथवा बारावाची व्यवस्था ही मंदिर स्थापत्यचा एक भाग असतो या ठिकाणी सुद्धा जवळच  20 फूट लांब-रुंद पुष्करणी आहे. यात चारही बाजूला देवकोष्टके आहेत.त्यात गणेश व विष्णूची मूर्ती स्थापित केलेली दिसते. बारावातील पाणी हे अमृतेश्वरासारखेच अमृतमय व नितळशार आहे. समुद्रमंथनातील प्राप्तरत्नांपैकी एक अशी ही पुष्करणी असल्याची कथा सांगितली जाते. समुद्रमंथनातून प्राप्तरत्नांपैकीच हा अमृतेश्वराचा निसर्गाचा परिसर आहे की काय असंच वाटायला लागतं. येथून काढता पाय घ्यावा असं कधी मुळी वाटतच नाही. इथेच अमृतेश्वराच्या कुशीत रमावं असंच वाटतं. पश्चिमेकडून रतनगड अडवतो त्याचा अंगठा ही आनंदाचा संकेत देत इथेच थांबा असं म्हणतो. पूर्वेकडील निळाशार भंडारदरा गारवा देत हेच म्हणतो  की तुम्हीही एकदा या अमृतेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अमृततुल्य जीवनात या अमृत रुपी निसर्गाचा आस्वाद घ्या.

जगात कुठेही जा सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही अगदी सूक्ष्मपणे न्याहाळा  असे सौंदर्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही.



संजय खांडवे

९०११९७११२२

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

Obc

 *मंडल दिनाच्या निमित्ताने...*

➖➖➖➖➖

आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातून जात असताना इतर मागासवर्गाच्या संदर्भात १९७८ मध्ये गठीत मंडल आयोगाची व त्याच्या संघर्षाची निश्चितच आठवण येते. आजच्याच दिवशी ७ ऑगस्ट १९९० ला मंडल आयोग इतर मागास प्रवर्गातील समुदायाला लागू करण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली. निमित्ताने या दिवसाची आठवण म्हणून देश भऱ्यात 'मंडल दिन' साजरा केला जातो. 


भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४० अन्वये देशातील इतर मागास प्रवर्गासाठी आयोग गठन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोगाची स्थापना २९ जानेवारी १९५३ रोजी करण्यात आली होती. ३० मार्च १९९५५ ला या पहिल्या आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला. या  आयोगासाठी १८२ प्रश्नाच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून व व्यापक दौऱ्यातून हा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. या मागासवर्गाच्या अहवालात २३९९ इतर मागास जातीचा समावेश करण्यात आला. पुढे हा आयोग चर्चेच्या माध्यमातून कसोटीवर टिकू शकला नाही. इतर मागास प्रवर्गात असलेल्या मोठ्या समुदायाची पुढील काळात सुद्धा असेच संघर्षाची शृंखला सुरूच होती. 


इतर मागास प्रवर्गात येणारा भारतामधील हा समुदाय प्रचंड मोठा होता. याची व्याप्ती संपूर्ण भारतभरामध्ये होती. कलम ३४० अन्वये यांना त्यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक बाबींचा अभ्यास करून त्यांना प्रगतीच्या प्रवाहामध्ये घेण्यासाठी विविध उपाय योजनांच्या माध्यमातून जोडणे अत्यंत आवश्यक होते.


*"समानता केवल समान लोगो के बीच होती है! असमान को समान के बराबर रखना असमानता को स्थिरता प्रदान करना है!"*

*

२० डिसेंबर १९८७ रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी एक आयोग गठित केल्याची घोषणा केली. हा आयोग म्हणजेच दुसरा मागासवर्गीय आयोग होता. या आयोगामध्ये पाच लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल होते. त्यामुळेच यांची या योगाची ओळख मंडल आयोग म्हणून सर्विकडे झाली. या आयोगामध्ये इतर चार सदस्य म्हणून दिवाण मोहनलाल, आर. आर. भोले, दिन बंधू साहू, के. सुब्रमण्यम, या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे बिहार राज्यांमध्ये संसद सदस्य होते. १९६७ ते ७० व पुढे १९७७ ते १९७९ हे लोकसभेचे सदस्य होते. 


या मागास आयोगाला काम करत असताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला. यामध्ये दिनबंधू साहू यांनी प्रकृती अस्वस्थामुळे राजीनामा दिला. ५ नोव्हेंबर १९७९ मध्ये ते या आयोगातून बाहेर पडले. व त्यांच्या जागी एस. आर. नायक यांची नियुक्ती करण्यात आली. १९७९ मध्ये लोकसभा भंग झाल्याने, पुन्हा या आयोगाच्या कामाची गती मंद झाली. पुढील काळात तीन वेळा या आयोगाचा अवधी वाढविण्यात आला. 


या आयोगाला १ जानेवारी १९७९ रोजी गठित करून पहिली मुदत  ही ३१ डिसेंबर १९७९ पर्यंत अहवाल देण्याचे ठरले. त्यापुढेही मुदत वाढ देण्यात आली. पुढची मुदतवाढ ही ३१ डिसेंबर १९८० पर्यंत वाढवण्यात आली. १९३१ च्या जनगणनेचे आकडे नसल्याने या आयोगाला अनंत अडचणीला सामोरे जावं लागत होते. १९८० मध्ये इंदिरा गांधी सरकार आले, आणि या मंडल आयोगाचा अहवाल तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानिजैलसिंग यांना सादर केला गेला. यावेळेस ३,७४३ विविध जाती आणि समुदायाचा समावेश मागास प्रवर्गात करून ४० शिफारस करण्यात आल्या. देशातील सामाजिक व शैक्षणिक मागास जातीचा शोध घेण्यासाठी आयोगाने ११ निकषाचा अवलंब केला होता. आणि तीन प्रमुख शीर्षकांतर्गत गटबद्ध केले गेले. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या बाबी तपासल्या गेल्या. ओबीसी ओळखण्यासाठी ११ निकष विकसित केले गेले. 


आयोगाने करून दिलेले शिफारशी या निश्चितच ओबीसींना नोकऱ्या मिळवून देण्यात नाही तर ओबीसींच खचलेल मनो धैर्य उंचावणारे होते. त्यांना त्यांच्या क्षमताची जाणीव परत मिळवून देण्यासाठी त्या यशस्वीच ठरणाऱ्या होत्या. या संदर्भात मंडल आयोगाने मांडली भूमिका ही अतिशय बोलकी होती. सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाची व्याख्या ठरविणारा आणि मापदंड निश्चित करणारा हा आयोगाचा अहवाल होता. याच अहवालानुसार मागासवर्गाची ओळख यातून झाली.


*आयोगाने ओबीसींसाठी सर्वसाधारणपणे पुढील शिफारसी केल्या*


ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्यावे. ओबीसी वर्गातील उमेदवारांची गुन्हा अनुक्रमे खुल्या स्पर्धेत निवड झाली असेल तर त्यांचा समावेश २७% कोठ्यात करू नये. ओबीसींना सर्व स्तरातील पदोन्नतीच्या बाबतीत वरील प्रमाणातच पदोन्नती द्यावी. राखीव जागांचा भरला न गेलेला कोटा पुढे तसाच ठेवावा. आणि त्यानंतरच तो राखीव नाही असे समजावे. थेट भरती करताना अनुसूचित जाती जमातीसाठी वयाच्या कमाल मर्यादेतून सूट दिली जाते ती ओबीसीसाठी ही लागू करावी. प्रत्येक श्रेणीच्या पदासाठी ज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी रोस्टर पद्धत अवलंबले जाते तशीच पद्धत ओबीसीसाठी ही स्वीकारावी. केंद्र आणि राज्य सरकारचे सार्वजनिक उद्योग राष्ट्रीयकृत बँका यांनाही सुचित केल्याप्रमाणे आरक्षण पद्धत जशीच्या तशी लागू करावे. सरकारकडून या न त्या मार्गाने आर्थिक मदत मिळालेल्या सर्व खाजगी क्षेत्रातील उद्योगांनाही सूचित केल्याप्रमाणे आरक्षणाची पद्धत लागू करावी. सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांनाही आरक्षणाच्या या कक्षेत आणावे.


७ ऑगस्ट १९९० रोजी व्ही.पी. सिंग सरकारच्या काळात हा आयोग लागू करण्यात आला. ही एक ऐतिहासिक घटना होती. देशातील बहुसंख्य असलेल्या ५२% इतर मागास प्रवर्गात येणाऱ्या समुदायासाठी उन्नतीचा व मनोधैर्य वाढवणारा हा दिवस होता.

            आज या मंडल आयोगमुळेच विशाल समुदायात असलेला हा इतर मागास प्रवर्ग आपली शैक्षणिक सामाजिक तथा आर्थिक उन्नती साधताना दिसत आहे. देशात या कमिशनमुळे जातीय बाबी नष्ट होऊन इतर मागास प्रवर्गातील समुदायांमध्ये वर्गीय चेतना जागृत झाली. ही अशीच जागृत राहावी या अपेक्षेसह मंडल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

➖➖➖➖🙏🏻🙏🏻

-संजय खांडवे 

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

ओबीसी

 *छत्रपती संभाजी नगरातील "ओबीसी चिंतन" हे देशव्यापी  मंथनाकडे .......*

➖➖➖➖➖➖➖    संजय खांडवे,बुलढाणा



              ओ बी सी आरक्षण हा मोठा संघर्षाचा विषय आहे.या व्यवस्थेत या समुदायाला स्थान निर्माण करण्यासाठी खूप मोठा काळ गेला .आज स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानंतरही परिस्थिती फारशी बदलली असे म्हणणे धाडसाचेच ठरेल . भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि या संविधानात स्वातंत्र्य ,समता, न्याय व बंधुता या वर आधारीत एक आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सखोल अभ्यासातून जगात आदर्श ठरणारी घटना आपल्याला दिली .

       या घटनेतील ३३० व ३३२ अधिनियमातून आणि १५(४) व १६(४)नुसार नोकरी मधे  एस सी ,एस टी साठी आरक्षणाची तरतुद केली गेली.त्याच बरोबर ३४० अधिनियमातील तरतूद नुसार ओबीसी आरक्षणासाठी आयोग गठीत करण्यात यावा व त्यानुसार ओबीसी प्रवर्ग ठरविण्यात यावा अशी तरतुद करण्यात आली होती .याला अनुसरुन काकासाहेब कालेलकर आयोग नेमण्यात आला होता. या नुसार त्यावेळी  ओबीसी मधे २२१८ जाती ठरविण्यात आल्या होत्या. देशात बहुसंख्येने  असलेल्या समाज वर्गाची हककाच्या लढाईचाच तो काळ होता असेच म्हणावे लागेल .१९७७ मधे  मा. मोरारजी देसाई सत्तेवर आले व त्यांनी बी.पी.मंडल कमीशनची स्थापणा केली.मोरारजी देसाई सरकार गेल्यानंतर मा  इंदिराजी गांधी सरकार सत्तेत असतांना १९८१ मधे मंडल आयोगाने आपला रिपोर्ट दिला .यानुसार ३७४३ जातींचा समावेश करण्यात आला.त्यानंतर पुढे अनेक घडामोडी झाल्या ओबीसी चळवळीना त्या ज्ञात आहे.पुढे मा. व्ही पी सिंग पंतप्रधान असतांना मंडल कमीशन लागू झाले .त्यानंतरही क्रिमिलेअरचा संघर्ष सुरुच होता .९० च्या दशकात ओबीसी समुदाय हया संविधानाने दिलेल्या हककाचा लाभार्थी ठरला .२७% आरक्षणाने भारतातील कान्याकोपऱ्यात असलेल्या शेवटच्या घटकाचा सामाजिक दर्जा उंचावण्यास मदत झाली .आजही बहुसंख्येने असलेला ओबीसी घटक जात- धर्म सोड्रून आपल्या न्याय्य हकक,अधिकारासाठी एकत्र येत आहे पण तो अधिक संघटीत होणे गरजेचे आहे.  

        आज ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या अधिकारी व कर्मचारऱ्यांचे अधिष्ठाण असलेली मजबूत संघटना  मा .सुनिल शेळके यांनी स्वेच्छानिवृत्तीपूर्वी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना  ही संघटना स्थापन केली होती . या संघटनाचे जाळे आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. विविध आरक्षणचा गुंता, न्यायालयीन लढे यामुळे संभ्रमित इतर मागासवर्गीय समूह या बाबी लक्षात घेता संघटनेचे कार्य व मार्गदर्शनाला  येणाऱ्या काळात महत्व प्राप्त झाले आहे.  ओबीसी विदयार्थी तथा पालकांना हे संघटन एका क्लीकवर  सामावून घेवून त्याच्या विदयालयीन,महाविदयालयीन शिष्यवृत्ती,प्रवेश तथा क्रिमिलेअर विषयक समस्या अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यन्त असलेल्या बांधवाला क्षणात सोडविण्यास मार्गदर्शक ठरणार आहेत . स्वतःची स्वंतत्र वेबसाईट व यॅप या प्रसंगी सुरू होणार आहे .यामधे सर्व प्रकारचे शासकिय आदेश व माहीती मार्गदर्शनासह उपलब्ध होणार आहेत या साठी या संघटनेचे तज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत .   बेखबर असलेला ओबीसी आता सोशलमिडीया , तंत्रज्ञानाच्या व स्पर्धात्मक युगात बाखबर करण्याचे काम या संघटनेने हाती घेतले आहे . शिबिराचे उदघाटन प्रा. डॉ. सुरज मंडल यांच्या हस्ते होणार आहे. बहुचर्चित मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे ते नातू असून ‘भविष्यातील ओबीसींचे आंदोलन कसे असायला हवे?’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. प्रमुख वक्ते तथा सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड हे ‘सद्यस्थितीत ओबीसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोरील आव्हाने’ हा विषय उलगडून सांगणार आहे. दुसऱ्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे हे ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती व त्यातील अडचणी या उपयुक्त विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

       छत्रपती संभाजीराजे नगरात या चिंतन शिबीराच्या निमित्ताने महाराष्ट्र भरातून संघटनेचे पदाधिकारी,अधिकारी हजेरी लावणार आहेत .या ऐतिहासिक नगरीमधील हे चिंतन देशभरातील ओबीसी चळवळीसाठी मंथन ठरणार आहे .


प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...